Wednesday, April 29, 2009

परीभ्रमणे कळती कौतुके

१ फेब्रुवारी तारीख उजाडली तशी माझी दिवसांची उलटि मोजणी सुरु झाली. उत्तर भारताची सफर करायला मी अधीर झालो होतो. मुळात वैष्णोदेवीच्या निमित्ताने उत्तरेत जात होतो, म्हणुन परत येताना अमृतसर – दिल्ली– मथुरा - आग्रा असे करुन यायचे ठरवले. ६ तारखेला मुंबईहुन निघालो वैष्णोदेवी ला म्हणजे जम्मुला.मुंबईहुन श्री. दुग्गल दरवर्षी किमान ५००-६०० जणांना घेउन हि यात्रा करतात. देवीवर त्यांची अपार श्रध्दा आहे. ना नफा - ना तोटा तत्वावर ते हि यात्रा नेतात. अतिशय सुंदर व्यवस्था असते. विशालने याबद्दल सांगितले तेव्हाच जायचे हे नक्कि झाले. बर कटराला जाईपर्यंतचा खर्च म्हणजे सिंगल तिकिट – जातानाचे गाडितले जेवण/सुकामेवा/आयस्क्रीम/फळे/चहा/नाश्ता – कटरात रहायची सोय- व तिथले२ दिवसांचे जेवण/चहा-नाश्ता यांचा एकुण खर्च यावर्षी १९००/- फक्त आला होता. थोडक्यात फक्त वैष्णोदेवी ला जाऊन येण्याचा खर्च २५००/- पर्यंत आटपु शकतो. या शिवाय दुग्गलांनी एक चांगली मोठी ट्रॅव्हल बॅग, एक ताट, भांडे, एक नॅपकिन, आणि ब्रश-पेस्ट-साबण असे टॅव्हलिंग किट दिले होते ते वेगळेच. थोडक्यात घरुन बुड हलवुन बांद्रा टर्मिनसला गाडित टेकवायचे कष्ट तेव्हढे घ्यायचे होते.

६ तारखेला बांद्रा टर्मिनस वरुन सकाळी ७:३० ला ’जम्मुतावी उर्फ स्वराज्य’ गाडित बसलो. गाडि गुजरात –राजस्थान - मध्यप्रदेश – राजस्थान – दिल्ली – हरीयाणा – पंजाब मार्गे जम्मुला जाते. स्वत:चा कॅटाररचा व्यवसाय असल्याने दुग्गलांनी गाडीत खाबुगीरीची भरपुर सोय केली होतीच, म्हणजे गाडित सकाळी नाश्त्याला ढोकळा,समोसा,अळुवडि, २ ब्रेड स्लाइस, जाम-बटर असा सरंजाम होता. मग दुपारचे जेवण त्यात पनीरची भाजी, दाल - जीरा राईस होता. जेवणा पाठोपाठ सुकामेव्याची पाकिटे, चॉकलेट आयस्क्रीम, मग फळे म्हणुन द्राक्षे असा अक्षरश: मारा करत होते. तो खाऊन होत नाहि तोच संध्याकाळचा नाश्ता म्हणुन बिस्कीटे आणि अमुल कुल ची बाटली हातात थोपवली. इतके खाऊनहि संध्याकाळी ६:१५ ला रतलामला पोहोचलो तिथे रतलामचे पोहे खाल्लेच वा! झकास! थोडक्यात पोटावर लाडिक अत्याचार सुरु होते. रात्रीचे जेवण सुध्दा मटारची सुंदर भाजी आणि रोटि होती.

नागदा – कोटा करत ७ तारखेच्या पहाटे ४:४० ला नवी दिल्लीला पोहोचली सगळी गाडि थंऽऽऽऽड पडली होती. नवी दिल्ली स्टेशनच काय कोणी न्यूयॉर्क आलय असं सांगितलं असत तरी उबदार पांघरुणा खालुन कोणीहि बाहेर आलं नसतं. स्वेटर-हातमोजे विकणारे गाड्यांच्या डब्यात शिरुन त्यांचा धंदा करत होते. एका चक्कर मध्येच त्यांची बॅग अर्ध्याने हलकी झाली. त्यांच्या ओरडाण्यानेच जाग आली तेव्हा कळले नवी दिल्ली स्टेशन आले आहे. चाळावलेली झोप ये –ये करुन परत बोलवण्यात १० मिनिटे गेली. थेट ७:३५ ला जाग आली. अंथरुण आवरेपर्यंत अंबाला(सकाळी ७:४५))आलेच, तिथे कुलचा खाल्ला. पुढे लुधीयाना(१०:००) जालंधर(११:००) अशी स्टेशन घेत अखेर दुपारी ४:३०ला जम्मुला थडकली गाडिची खरीवेळ २:३०pm होती पण हा उशीर होतोच, उलट विशाल तर मागच्या वर्षीपेक्षा दिड्तास लवकर पोहोचलो म्हणुन खुषच होता. स्टेशन बाहेर पडलो. गारवा जाणवत होता. बाहेर दुग्गलांनी बसची सोय करुनच ठेवली होती. जम्मु ते कटरा साधारण ५०-५४ कि.मी चे अंतर २ तासात कापता येते. गाडि सुरु झाली तशी, गार वार्‍यामुळे पहिल्या ५ मिनिटातच गाडिच्या सगळ्या काचा बंद झाल्या होत्या. उजव्या हाताला दरी ठेवुन गाडि एक-एक पिनबेंड घेत रस्ता कापत होती. मध्ये मध्ये पाण्याची डबकि देखिल दिसत होती दोन दिवसांपूर्वीच पाऊस पडुन गेला होता हे नंतर समजलं. उंचावर असल्याने इथे अंधार लवकर होतो. ६ वाजताच काळोख पसरायला सुरुवात झाली तसे समोरच्या उंच पहाडावर अगदि माथ्यापर्यंत दिव्यांची एक माळच गेली होती. ती दाखवत विशाल म्हणाला “हि दिव्यांची रांग बघ, सगळा वैष्णोदेवीचा रस्ता आहे. सर्वात वर भैरवनाथाचे मंदिर आहे. वैष्णोदेवीचे मंदिर पहाडाच्या त्या भागात येते ते इथुन दिसत नाहि.”


साधारण संध्याकाळी ७ वाजता कटरात पोहोचलो. सम्मोर वैष्णोदेवीचा पर्वत होता. पांढर्‍या-पिवळ्या दिव्यांची एक रेष अगदि माथ्याला भीडली होती अगदि “नव लाख वीजेचे दिप तळपती येथ…!” असाच झगमगाट होता. दुग्गलांनी जम्मु-काश्मीर पर्यटन विभागाच्याच यात्री निवासात सगळी सोय केली होती. आवरायला सोपे जावे म्हणुन आम्हि सहा जणांनी वेगळ्या दोन खोल्या घेतल्या. अतिशय छान खोल्या होत्या. समोर रात्रभर तो दिव्यांनी नटलेला डोंगर दिसत होता. रात्री ९:३० ला निवासा मागेच जेवणाची सोय होती. आम्हि जेवुन कटराच्या बाजारात एक फेरफटका मारला. सकाळी लवकर निघायचे ठरवुन आम्हि आपापल्या खोलीत झोपायला गेलो.

सकाळी ४:३० ला उठुन आवरले पण तरी निघायला ७:३० झालेच. वैष्णोदेवीच्या यात्रेत पायथ्यापासुन माथ्या पर्यंत “अर्धकुंवारी – वैष्णोदेवी – भैरवनाथ” अशी मंदीरे आहेत. एका दिवसात तीन्हि करणं थोडं कठीण काम आहे. कारण कटरा ते भैरवनाथ हे अंतर फक्त १४-१५ किमी असलं तरी सगळा चढ असल्याने सवय नसल्यास थकवा येतो. शिवाय अर्धकुंवारी मुळ वाटेपेक्षा २ किमी डावीकडे असल्याने जाऊन-येऊन ते ४ किमी होतं. थोडक्यात संपुर्ण टप्पा हा परतीच्या प्रवासासकट ३० किमी आहे. वरती दर्शनासाठी एक पर्ची खाली कटारामध्येच घ्यावी लागते हि फुकट असते आणि संस्थानाच्या संगणकिकृत कार्‍यालयात मिळते यात किती माणसे आहेत, कोण पर्ची घेतय त्याचं नाव, पुरुष-स्त्रीया-मुले यांची संख्या यांची नोंद असते. पर्ची घेतल्या पासुन ६ तासांत मंदिराकडे निघावं लागतं. मात्र हि पर्ची नसेल तर वैष्णोदेवी मंदिरापासुन मागे फिरावं लागतं त्यामुळे ज्यांना हे माहित नाहि ते शिंगरा सारखे हेलपाटे घालुन मरतात. बहुदा सुरक्षा आणि मुख्यत: रोज येणार्‍या भक्तांची संख्या मोजण्याची हि चांगली सोय आहे. वर डोंगरावर रांगा लावायला फारशी मोकळी जागा नसल्याने पायथ्याशीच या पर्चीची सोय केली आहे. इथे वर जायला घोडे – हॅलिकॉप्टर यांची सोय आहे. पंजीकृत घोडेमालकांकडुनच घोडा घ्या असे कार्यालयात बोर्ड लावले आहेत. जाऊन – येऊन ६२५/- रु मध्ये हि यात्रा करता येते. मात्र अर्धकुंवारीचे याशिवाय १२५/- रु वेगळे घेतात. हॅलिकॉप्टरचा एक वेळचा प्रौढांसाठीचा खर्च १३००/- रु आहे.

हर्षदला पायाला दुखापत असल्याने डॉक्टरांनी “आधीच पाय बोंबललाय, घोडा किंवा पालखी करुन जाणार असलास तरच जा!” अशी तंबी दिल्याने तो घोड्यावरुनच जाणार हे ठरलं होतं. मग सगळेच घोड्यावरुन जायचे असे ठरले. चालत तीन्हि होणं कठीण आहे घोड्याने वेळ तरी वाचेल म्हणुन सगळे तयार झाले. मला मिळालेल्या घोड्याचे नाव “बादल” होतं. घोड्याचे मालक त्यांना डोगरी भाषेत आदेश देत होते. “इकोड्डा” हॅक-हॅक असे काहितरी वसा-वसा घोड्यावर ओरडायचे, कि घोडा दुडक्या चालीने भराभर पुढे जायचा. डोगरी भाषेत इक्कोड्डा म्हणाजे घोडा. पायरी आली की आपण पुढे व्हायचं आणि उतार आला कि मागे व्हायचं हे घोडे मालकाने सांगितल होतं. घोड्यावर तसा पहिल्यांदाच बसत होतो. पण मजा वाटली. मध्येच त्याच इक्कोड्ड-इक्कोड्डा झालं कि घोडं धावायचं मग त्याचीहि सवय झाली आपोआप रीकिबीत पाय रोवुन घोड्याबरोबर वर-खाली होण्याचं तंत्र जमु लागलं. आजुबाजुनी परतीचे घोडे अगदि खेटुन जात होते. रस्त्यातली माणसं जागा करुन देत होती क्षणभर पूर्वी कोण्या सरदार-राऊताची स्वारी आली कि रस्त्यातली लोकं कशी भराभरा कडेला होत असतील याचा अंदाज आला. पण घोडा खरच मांडिला झेपला पाहिजे नाहितर मांड्या भरुन येतात. विषेशत: घोड्या बरोबर वर-खाली होण्याचे तंत्र जमले नाहि तर अंजर-पंजर ढिले होतात. नंतर रात्री माझीहि पाठ भरुन आली होती. घोड्यावरुन उतरल्यावर जर एखाद्या कट्ट्यावर बसलो तर बुड नावाचा अवयव आहे याची जाणीव होत होती. पण बाकि त्रास झाला नाहि. एकुण घोड्यावरचा प्रवास छान होता, घोडा धावताना त्याच्या गळ्यातल्या घुंगरांचा लयबध्द आवाज त्याच्या टापांच्या आवाजाशी फ्युजन साधत होता. कधी उजव्या हाताला तर कधी डाव्या हाताला खाली खोलवर कटरा शहर दिसत होते. इथले पहाड मातीचे आहेत भुशभुशीत. बर्‍याच ठिकाणी भूस्खलन झालेले दिसत होते. वर वर मात्र कातळ लागतो.

रस्त्यात खाण्या-पिण्याची भरपुर दुकाने आहेत. सगळी फुले-प्रसादाची दुकाने ऐन पायथ्याशी आहेत. नंतर मात्र खाण्याचीच दुकाने लागतात. अगदि बरीस्ता, CCD, देखिल इथे पोहोचले आहेत. शिवाय इथे कोवळे मुळे गाजरं हिरवी चटणी किंवा मसाला लावुन मिळतात. गोटि सोडा देखिल इथला प्रसिध्द प्रकार आहे. इथे खाण्या-पिण्याची ददात नाहि. जम्मु-कटरा-डोडा हे तसे बरेच आतंकवादि हल्ले झेललेले भाग आहेत. त्यामुळे इथे बरीच सुरक्षा आहे. दर दिड दोन किमीवर एक चौकी बसवली आहे आणि तिथे सामान कन्व्हेअर बेल्टवर मेटल डिटेक्टर ने चेक केले जात होते. त्यामुळे दर २ किमी नंतर घोड्यावरुन पाय उतार व्हावे लागत होते किमान ३ वेळा तरी हे चेकिंग झाले. घोड्यांचे खोगीर देखिल तपासले जात होते. इथे मध्ये मध्ये विश्रांती घेण्यासाठी आडोसे आणि चौथरे केले आहेत. जेणेकरुन पाऊस आला तरी माणुस भिजत नाहि. पिण्याच्या पाण्याची सोय देखिल ३-४ ठिकाणी केलीये. भक्तांसाठी दर एका किमीवर स्वच्छतागृहे बांधली आहेत. सध्या घोड्यांसाठी एक वेगळा रस्ता काढला आहे. फक्त घोडेस्वारच त्या रस्त्याने जातात. असे चेकिंग होत, कधी घोड्यांना तर कधी आम्हाला आराम मिळावा म्हणून थांबत वरती पोहोचायला १२:३० झाले होते.

मग गेट नंबर ३ वर आमचे चेकिंग करुन आत सोडले आम्हि तिथे एल लॉकर घेऊन आम्हा सहा जणांच्या वस्तु तिथेच ठेवल्या. चामड्याची वस्तु, मोबाईल मंदिरात नेउ देत नाहित. मोजा काढुन पाय जमिनीवर टेकवला तशी एक थंऽऽऽऽड शिरशीरी डोक्यापर्यंत गेली. आम्ही सगळ्या वस्तु त्या लॉकर मध्ये ठेवुन वैष्णोदेवेच्या मंदिराकडे आलो. वैष्णोदेवीची आणि या मंदिराची अख्यायिका अशी सांगितली जाते कि वैष्णोदेवीचा जन्म दक्षीणेतील रत्नाकर सागर नावाच्या घरात जन्म झाला. त्याने तिचे नाव वैष्णवी ठेवले. लहानपणीच ती संन्यासीण/जोगीण झाली आणि राम रुपातील विष्णुला ती आपला पती मानु लागली. जेव्हा सीतेच्या शोधार्थ निघालेले श्रीराम तेथे पोहोचले तेव्हा त्यांनी तिला वचन दिले कि या जन्मी मी एकपत्नी व्रत घेतले आहे. मात्र तोवर उत्तरेत जाऊन हिमालयातील त्रिकुट पर्वतरांगेतील माणिक डोंगराच्या गुहेत तप कर, जर तु तप करुन परमपदाला पोहोचलीस तर मी कल्की रुपात मी तुझ्याशी लग्न करेन. या बदल्यात त्रिकुटाने राम-रावण युध्दात रामाचा विजय व्हावा म्हणुन ९ रात्री न झोपता देवादिकांची प्रार्थना केली. देवी तप करत तिथे राहु लागली पुढे कटारा जवळलीच हंसाली गावातील तिच्या श्रीधर नावाच्या भक्ताकडे देवी लहान मुलीच्या वेषात गेली. आणि त्याला पुजा करुन भंडारा कर लोकांना प्रसादाचे जेवण दे. श्रीधरने सगळ्यांना जेवायला बोलावले त्यात भैरवनाथ या मांत्रिकाला देखिल निमंत्रण गेले(काहि कथा म्हणातात कि गोरखनाथांनी भैरवनाथाला देवी बद्दल अजुन जाणुन घेण्यास पाठवले होते). त्याने श्रीधरची परीक्षा घ्यायची ठरवली आणि जर जेवण कमी पडले तर त्याचे भयानक परीणाम होतील अशी धमकी दिली मात्र देवीमुळे श्रीधर वाचला. देवी बद्दल अजुन जाणुन घ्यायला भैरवनाथ देवीचा शोध घेऊ लागला तेव्हा त्याला समजले की हि साध्वी नसुन दैवी शक्ती असलेली मुलगी आहे जी सतत धनुष्य-बाण घेऊन फिरत असते व तिच्या रक्षणासाठी मोठी वानरे व सिंह आजुबाजुला फिरत असतात. आपले तप अखंड सुरु रहावे म्हणुन देवी पुढील नऊ महिने गर्भजून किंवा अर्धकुंवारीच्या गुहेत लपली तिला तहान लागली तेव्हा तिने जमिनीत बाण मारुन पाण्याचा प्रवाह काढला तोच आजचा बाणागंगा तिथे जवळच तिच्या चरणपादुका देखिल उमटल्या आहेत. भैरवनाथ जेव्हा या गुहेपाशी पोहोचला तेव्हा देवी दुसर्‍या मार्गाने सटकुन अजुन वरच्या गुहेत गेली जी आज वैष्णोदेवीची गुंफा म्हणुन ओळखतात. भैरवनाथ तिथेहि पोहोचला तेव्हा प्रथम देवीच्या रक्षणा करता हनुमान तेथे आला व भैरवनाथाशी लढु लागला. शेवटि न राहवुन देवी बाहेर आली तीने कालीचे रुप धारण करुन श्रीकृष्णाकडुन भेट म्हणून मिळालेल्या सुदर्शन चक्राने भैरवनाथाचे मुंडके उडवले ते वर जाऊन पडले तेच भैरवनाथ मंदिर. मग भैरवनाथाच्या शीराने तीची माफी मागितली तेव्हा देवीने त्याला सांगितले कि माझ्या दर्शना नंतर तुझे दर्शन घेतल्यावरच माझ्या दर्शनाचे पुण्य मिळेल अन्यथा नाहि. पुढे आपल्याला कोणी त्रास देऊ नये म्हणुन देवीने ३ पिंडिंचे रुप घेतले आणि तिथेच राहिली. इथे श्रीधर बेचैन झाला व तो देवेच्या शोधात वणवण भटकत या गुहेत पोहोचला. त्याने देवीची हर तर्हेने विनवणी केली देवी प्रसन्न जाली आणि तेव्हा पासुन हि यात्रा सुरु झाली.

मंदिराकडे गेल्यावर परत एकदा शेवटाचे चेकिंग झाले ज्यांच्याकडे चामड्याच्या वस्तु होत्या त्या सरळ एका डब्यात फेकुन देत होते. अखेर आम्हि दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. हि गुंफा ३० मीटर लांब आहे. व साधारण ३ मीटर उंच आहे. दर्शन घेताना नमस्कार करुन देवीला आपले हात दाखवायची पध्दत आहे. इथे हात दाखवणे हे अवलक्षण नसुन सुलक्षण आहे. देवी तुमचे ग्रहयोग बदलते व तुम्हांला सुखाचे दिवस येतात असा समज आहे. पंधरा मिनिटे रांगेत उभे राहिल्यावर देवीचे दर्शन मिळाले. आत तीन पिंडि आहेत. डावीकडुन क्रमाने काली – वैष्णोदेवी – लक्ष्मी अश्या त्या पिंडि समजल्या जातात. उजवीकडे वळायला एक चिंचोळा मार्ग आहे जो बाहेर निघतो. बाहेर आल्यावर एका खिडकीपाशी खडिसाखर आणि देवीच्या प्रतीमा असलेले एक नाणे प्रसाद म्हणुन दिले जाते. ते घेऊन आम्हि पुढे आलो. सावलीत आलो कि थंडि वाजायची उन खुप बरं वाटायच. जेवणाची वेळ टळुन गेली होती भुकहि लागली होती म्हणुन तिथेच मंदिराशेजारील कॅन्टिन मध्ये राजमा-भात घेतला – वा!! तसा मला राजमा फारसा आवडत नाहि मात्र इतका सुरेख राजमा मी आधी खाल्ला नव्हता. वाफाळता राजमा-भात खाऊन तरतरी आली.

पुढे भैरवनाथाकडे निघालो, वर पोहचुन समोरच्या डोंगरांपलिकडे नजर गेली खुप दुरवर हिमशिखरे दिसत होती. एका स्थानिकाने सांगितले ते काश्मीर घाटितले डोंगर आहेत तिथवर पोहोचायला एक दिवस सहज जाईल. ते पर्वत इतके सुंदर होते कि दहा मिनिटे सगळ जग विसरुन आम्हि ती शिखरे डोळ्यात साठवुन घेत होतो. अखेर फोटो वगैरे काढुन घेतले आणि भैरवनाथाच्या दर्शनाला गेलो. एका बाजुला हवन सुरु होते लोकं थोडि थोडि उदि घेउन जात होते. भैरवनाथा वरुन आम्हि अर्धकुंवारीकडे कुच केले. ते खरच थोडं आड्वाटेवर आहे आता सगळ्या सोयी आहेत म्हणुन जास्त त्रास जाणवत नाहि मात्र २०-२५ वर्षापूर्वी ते खरोखर एका बाजुला असेल. आम्हि पायर्‍यांचा रस्ता घेउन पटापट खाली उतरत होतो. अर्धकुवारीपाशी परत एक पर्ची घ्यावी लागते ती घेतली तर आमचा ३२४ व नंबर होता म्हणजे किमान ३ तास हरी हरी. तसेहि पाच वाजत आले होते व ६ वाजता अर्धकुंवारी गुंफा बंद होते. त्यामुळे दर्शन मिळण्याची शक्यता नव्हती. थोडि वाट बघुन गर्दिचा अंदाज घेतला मात्र मग निघायचे ठरले. रमतगमत सुर्यास्ताचे रंग अनुभवत आम्हि खाली उतरत होतो. खाली कटारात आमच्या खोलीवर यायला आंम्हाला ८:३० झाले होते. देवीचे दर्शन पूर्ण झाले होते. ज्यासाठी घरुन निघालो होतो ते पूर्ण झाले होते. जेवुन आम्हि बॅग भरायला घेतली. दुसर्‍या दिवशी सकाळची गाडी होती. सकाळि उठुन आवरण्यापेक्षा झोपायला उशीर झालेला परवडतो.

जम्मुची धावती सफर वैष्णोदेवीच्या निमित्ताने झाली होती. जम्मु – लोकं असं मानतात कि जंबुलोचन नावाच्या राजाने हि ख्रिस्तपूर्व १४०० वर्षांपूर्वी हि जागा वसवली त्याच्या जंबु वरुन जम्मु हे नाव आलं. जंबुलोचन शिकारीला गेला असताना त्याला एक विचित्र दृष्य दिसले बकरी आणि सिंह असे दोघहि तावी नदिच्या किनारी एकाच टिकाणि पाणी पित होते. ते बघुन त्याने शिकार थांबवुन इथे एक नगर – जंबुनगर वसवायचा निश्चय केला. त्याचा भाऊ बाहुलोचन याने तावी नदिच्या किनारीच बाहु किल्ला बांधला आजहि तो एक महत्वाचा ऐतिहासिक ठेवा समजला जातो. सध्याचा किल्ला हा डोगरा राजांनी बांधुन घेतला आहे. सध्या त्या किल्ल्यात कालीमातेचे मंदिर आहे. जम्मु जवळील “अखनुर” या गावाचे उल्लेख महाभारतातहि आहेत म्हणे, इथे हरप्पा संस्कृतीची काहि पाळे-मुळे देखिल सापडली होती. पुढे मौर्य, कुशाण कुशाणाशहा अश्या वंशांकडे जम्मु गेला. नंतर Hephthalites राजांकडे गेला मग शाहि आणि सरते शेवटि गझनवी राजांनी तो इसवी सन १००० मध्ये जिंकला. पुढील सत्ता स्पर्धेत तो अर्थात मुघलांकडे आला, तदनंतर शिखांकडे. आणि अखेर भारताच्या इतर भागांप्रमाणे ब्रिटिशांकडे आला. फाळणी नंतर हा भारताकडे आला, मात्र १९४८ च्या युध्दात जम्मु-काश्मीरचा बराच भाग पाकिस्तानकडे गेला आज आपण त्याला POK म्हणुन ओळखतो. राजा हरीसिंग हे डोगरा घराण्याचे राजे त्यावेळि तिथे आपले संस्थान राखुन होते.

दुसर्‍या दिवशी दुपारी २ ची गाडी असल्याने किमान १०:३० पर्यंत कटरावरुन जम्मुकडे कुच करणे गरजेचे होते कारण मधल्या प्रवासाला २ तास लागतात. थोडा बफर टाईम ठेवुन आम्हि निघालो. येताना संध्याकाळ होती म्हणुन आजुबाजुचे फारसे बघता आले नव्हते. परतीच्या प्रवासात आजुबाजुचे रौद्र पहाडि सौंदर्य बघताना २ तास कसे गेले समजले नाहित. मधुनच तावी नदिचे हे भले मोठ्ठे पात्र दिसत होते. सगळे पात्र पांढर्‍या राखाडी गुळगुळित गोट्यांनी भरले होते. नदिला तसे पाणी कमीच होते. ऐन हिमालयीन नदि असल्याने हि नदि सुद्धा उथळ पण वेगवान होती. जम्मु स्टेशनला आमचे सामान कन्व्हेअर बेल्ट वर टाकले, ते मेटल डिटेक्श्तर मधुन स्कॅन होऊन पलिकडे परत मिळाले. अमृतसरवरुन जाणारी टाटा एक्सप्रेस १ नंबरवर लागलीच होती. अर्धातासाने दरवाजे उघडले आणि आम्हाला आत शिरता आले. गाडित परत गप्पा-टप्पांना ऊत आला. गाडित एक दोन अडिच वर्षांचा छोटासा दोस्त देखिल भेटला. मुंबईचेच कुटुंब होते. अमराठी असुन त्याची आई सुंदर मराठी बोलत होती. त्याच्याबरोबर मस्ती झाली, मग थोडं खाऊ-पिऊ झालं. अमृतसरसाठी एकुण सहा तास प्रवास करावा लागणार होता. रग्गड वेळ होता. हळु हळु त्या AC बोगीत सगळे आडवे झाले आणि २ तास झकास झोप काढली.

साधारण रात्री ८:३० ला अमृतसर आले. बरोबरचे कुटुंब देखिल तिथेच उतरले. गाडीतनं उतरलो आणि अमृतसरच्या थंडिने स्वागत केले. स्टेशन बाहेर पडुन रिक्षा केली आणि ठरल्या हॉटेलवर आलो. तिथे रिक्षात ५-६ जण सहज बसु शकतील अशी व्यवस्था आहे. रीक्षातुन जाताना चेहर्‍यावर येणारा थंड वारा नकोसा वाटत होता. अमृतसरचे वातावरण पहिल्याच क्षणी आवडले. लोकं तसे निवांत आहेत पण मुंबई बाहेर कुठेहि हिच परीस्थिती आहे मग अमृतसर कसे अपवाद असेल? आवरुन सुवर्णमंदिरात जायचे ठरले. नाहि म्हणायला मंदिरात पोहोचायला रात्रीचे १०:३० होऊन गेले. मंदिराचा बाजुचा परीसर खूप मोठा आहे. मात्र व्यवस्थापनाने सोयी अतिशय छान करुन ठेवल्या आहेत. उजवीकडिल जोडा घर मध्ये बुट काढले. डोक्यावर रुमाल घट्ट बांधला आणि ’आटा मंडि देओरीच्या’ प्रवेशद्वाराने मंदिरात शिरलो. मंदिरात जाताना मध्ये तळवे बुडतील इतपत पाणी खेळवलेली जागा आहे, जेणेकरुन आपोआप पाय धुतले जातात. अमृतसरच्या थंडीत पाण्यात पाय घालायचे जीवावर आले होते, नाईलाजाने पाय आत घातला आणि… वाह चक्क कोमट पाण्याची व्यवस्था होती. पाण्याचा उबदार स्पर्ष फारच सुखावह होता, पाऊल पुढे टाकुन नजर वर केली. सुवर्ण मंदिराचे पहिलेच दर्शनच त्या पवित्र वास्तुच्या प्रेमात पाडणारे होते. रात्री हज्जारो दिव्यांच्या प्रकाशात मंदिराचा संपुर्ण सोन्याने मढवलेला वरील मजल्याचा भाग चमकत होता. मंदिराच्या पाचहि कळसांवर नजर ठरत नव्हती. त्याचे सोनेरी झळाळणारे प्रतिबिंब अमृतसरच्या पवित्र सरोवरातील पाण्यावर डुलत होते. मात्र यावेळि मंदिरातुन उलट्या दिशेने एक रांग निघाली होती बरोबर कर्णे, ताशे होते. क्षणभर कळेना काय नक्कि होतय ते. लगबगीने तळ्यापाशी आलो तळ्याच्या मध्यभागी असलेल्या मंदिराला जोडणर्‍या रस्त्यावरुन गुरुग्रंथसाहेबाची मिरवणुक निघाली होती. आम्हि सगळे अंतर पार करुन तिथे जाईतो तो घोळका अकाल तख्तच्या इमारतीत पोहोचला सुद्धा. थोडे खट्टु होऊन आम्हि मंदिराकडे वळलो.

सुवर्ण मंदिर…
सुवर्ण मंदिराच्या जवळ सरकु लागलो तशी त्याची भव्यता डोळ्यात भरु लागली. मुख्य दारावर एक आलिशान झुंबर लटकले होते. तळ्याच्या मधल्या रस्त्यात दोन्हि बाजुला दिव्यांची रोषणाई होती. मंदिराचे सोन्याचा मुलामा दिलेले त्याचे वरचे २ मजले आणि कळस झगमगत होते. आत पोहोचलो तर सगळा गाभारा म्हणा किंवा मुख्य जागा म्हणा मोरचेलाने साफ करत होते नोटा-नाणी एकत्र केली जात होती. मुख्य जागे भोवती गुडघ्या इतक्या उंचीचे रॉड चे चौकोन बनवले आहेत त्याच्या बाहेर उभं राहुन दर्शन घ्यायचं. त्याच्या आत गादि होती आणि भगव्या रंगाचा स्वच्छ कपडा त्यावर अंथरला होता. याच ठिकाणी एक गुडघ्या इतक्या उंचीचा चौकोन ठेवला होता त्यावर देखिल गादि होती आणि त्याची जी सरबराई चालली होती त्यावरुन गुरुग्रंथसाहेब त्यावरच ठेवत असणार हे उघड होते. शिवाय जवळ एक तलवारहि ठेवली होती. साफ करणारे अकाली असावेत कारण सगळ्यांच्या कंबरेला कृपाण होते. अंगात निळ्या रंगाचे गुडग्याखाली येणारे झगे होते. डोक्यावर निळी किंवा पिवळी पगडि. नुसत्या गादिलाच इतरांप्रमाणे नमस्कार करुन आम्हि बाहेर पडलो. प्रथमत: फोटो काढु कि नको हा संभ्रम होता. कारण सुरक्षेच्या दृष्टिने फोटो काढु देतात का हे नक्कि माहित नव्हतें. कृपाण आणि भाले धारकांच्या गराड्यात नसती आफत कोण ओढावुन घेईल? मात्र लगोलग आजुबाजुला ४-६ फ्लॅश उडले तसा धीर एकवटुन एका भालाधारी द्वारपाल सरदारजीला विचारलं – “ओ जी यहाँ फोटो ले सकते है?” एखादं गणिताचं प्रमेय विचारलं असावं असं त्याने माझ्याकडे बघितलं आणि अर्ध्या मिनिटाने उत्तर दिलं – “हाँ लेकिन जल्दि!” मग काय खचा-खच फ्लॅश वर फ्लॅश. वेऽऽऽऽऽड लागायचं बाकि होतं. जो रात्रीच्या वेळी सुवर्ण मंदिर बघतो तो त्या वास्तुच्या प्रेमात पडल्या खेरीज राहत नाहि. हा ऍंगल तो ऍंगल शक्य त्या सगळ्या कोनातुन - अंतरातुन मंदिराचे फोटो काढायला घेतले. त्यातुन मैथिलीने नविन डिजीटाल कॅमेरा घेतल्याने वेगवेगळ्या मोड वरचे प्रयोग सुरु होते. जो मोड चांगला वाटत होता त्यावर नव्याने फोटोंचा रतिब घालत होतो. समाधान होत नव्हते. प्रसाद देण्यासाठी मुख्य दारावर दोन जण उभे होते. मुगाच्या डाळीचा शिरा प्रसाद म्ह्णुन दिला जातो. त्यात इतकं तुप असतं कि प्रसाद खाऊन झाल्यावर सगळ्या अंगाला त्याने मालिश सहज करता आली असती. प्रसादासाठी दोन्हि हातांची ओंजळ करायची असते एक हात पुढे केला तर “बेअक्कल कुठचा” अश्या तर्हेनं बघुन प्रसाद देत नाहित.
प्रसाद देणारा एकदम भला माणूस होता. मंदिराबाबतची सगळी माहिती त्याने आपणहुन दिली. “कहाँ से आये हो? कहाँ उतरे हो?” वगैरे जुजबी माहिती विचारल्यावर आपणाहुन म्हणाला - “अगलीबार आओगे तो यहाँ धर्मशाला मे मुफ्त मै जगाह मिलेगी, इसके पिछे और नयी इमारते बनवां रहे है!” त्याने एका वास्तुकडे हात करत सांगितले. त्या वास्तुला देखिल सोन्याचे कळस होते वर त्रिकोणी झेंडा फुरफुरत होता अगदि मंदिराच्या समोरची वास्तु होती. मी चटकन विचारलं “सरदारजी, यहि अकाल तख्त है ना?” तसे दाढी मागुन प्रसन्न हस्त उत्तरला – “हाँ जी, यहि तो है हमारा सबकुच, हम तो मिट्टि के पुतले है!” अजुन दोन – चार गोष्टि सांगुन निघुन गेला.

सुवर्ण मंदिर आणि अकाल तख्त याबाबत प्रत्येक शिखाच्या अश्याच भावना असतात. आणि का असु नये? हेच ते अकाल तख्त ज्याने बलाढ्य मुघल सत्ते विरुध्द टक्कर दिली. हेच ते सुवर्ण मंदिर ज्यात ऑपरेशन ब्लु स्टार झाले होते. सामान्यातला सामान्य शिख सुध्दा या दोन गोष्टिंबाबत फार भावनिक असतो. शिख धर्माची स्थापना गुरु नानकांनी केली. गुरु नानक मुळात राजा कुशच्या म्हणजे श्रीरामाच्या मुलाच्या वंशावळीतील मानण्यात येतात. त्यांच्या नंतर शिखांचे नऊ गुरु झाले. गुरु नानक(१४६९ – १५३९), गुरु अंगद(१५३९ – १५५२), गुरु अमरदास(१५५२ – १५७४), गुरु अर्जुनदेव(१५८१ – १६०६), गुरु हरगोविंद(१६०६ – १६४५), गुरु हरीराय(१६४५ – १६६१), गुरु हरीकिशन(१६६१ – १६६४), गुरु तेगबहादुर(१६६४ – १६७५), गुरु गोविंदसिंग(१६७५ – १७०८) असे एकुण दहा गुरु आहेत. मग गुरु गोविंद सिंगांनी जाहिर केले कि माझ्या नंतर कोणीहि गुरु बनणार नाहि. गुरुग्रंथसाहिब हाच गुरु समजण्यात यावा. गुरुग्रंथाला आदिग्रंथ देखिल म्हणतात. शिख मुर्तीपुजा करत नाहिते. शिखांना रोजच्या जीवनात मार्गदर्शन करायला एक ग्रंथ असावा म्हणून गुरु अंगद यांनी या ग्रंथाचे काम सुरु केले. अमरदासांच्या काळात त्यात प्रगती झाली व बरीच भर पडली. अखेर अर्जुनदेवांनी ग्रंथाचे मुळ संकलन गोविंदवाल येथुन आणले व त्यात अनेक हिंदु व मुस्लिम संत – पीरांची पदे घातली. हे सगळे काम रामसर तलावाच्या जवळ संत व फकिरांच्या मदतीने एका तंबुत करण्यात आले. गुरुदास भल्ला याने हे लेखन केले. १६०४ मध्ये त्या ग्रंथाचे लेखन पूर्ण झाले.व त्या ग्रंथाची देखभाल करायला भाई बुढ्ढा याला ग्रंथी नेमण्यात आले. प्रस्तुत ग्रंथात पहिल्या पाच गुरुंची एकुण ४८३९ पदे आहेत व १४ हिंदु व कबीरा सकट २ मुस्लिम संतांची इतर पदे आहेत. व नवने गुरु तेगबहादुर यांची काहि पदे आहेत. ग्रंथाच्या शेवटि रागमाला व मुंडवनी अशी २ प्रकरणे आहेत. संत नामदेवांची ६१ पदे गुरुग्रंथसाहेबात आहेत. नामदेवांनी पंजाबात १८ वर्षे वास्तव्य केले होते.या पदांखेरीज त्यानंतर ग्रंथसाहेबात कुठलीहि भर घातली नाहि. सर्व गुरुद्वारात गुरुग्रंथाची प्रत सुशोभित रेशमी कपड्यात ठेवली जाते व त्यावर चवर्‍या ढाळतात. याची सेवा करायला जो नेमतात त्याला ग्रंथी म्हणातात. त्याला गुरुवाणीचा भरपूर अभ्यास करावा लागतो. सर्व गुरुद्वारात हा ग्रंथ ठेवला जातो व याचीच पुजा अर्चा करतात. गुरुद्वारामध्ये दिनक्रम ठरलेला असतो – जपुजी(नानककृत), सुखमनी(अर्जुनदेवकृत), आसा दि वार, जाप व आनंद(अमरदासकृत) हे नित्याचे प्रात:कालिन पाठ तर सायंकाळी रहरासीचा पाठ, प्रार्थना व प्रसाद होतो. शिखांचे पाच “क” कार असतात – केश, कृपाण, कडे, कच्छ आणि कंगवा या गोष्टि धारणा करणार्‍याला खालसा अथवा सरदार म्हणतात. थोडक्यात प्रत्येक सरदार हा शिख असतो पण प्रत्येक शिख सरदार असेलच असे नाहि.

बिआस(व्यास) नदिवर वसलेले अमृतसर १५७७ मध्ये स्थापन झाले.या ठिकाणाला प्रथम साक असे नाव होते. शिखांचे चौथे गुरु रामदास यांना वाटले कि शिखांसाठी एक मंदिर असावे. त्यांनी आधी तलाव खोदायला घेतला त्याचेच नाव अमृत सरोवर. हि जमिन मुळात अकबराने रामदासांना दिली होती. प्रथम तिथे रामदासपूर नावाची वसाहत वसली मग वरील कारणाअने त्याचे नाव अमृतसर असे झाले. हे सरोवर ४७५ फुट लांब व रुंद आहे. या सरोवराच्या मध्यभागी सुवर्णमंदिर आहे. याचा चौथरा ६५ फुट आहे. हे मंदिर शिखांचे पाचवे गुरु अर्जुनसिंग यांनी पूर्ण केले. याचा पाया २८ डिसेंबर १५८८ रोजी पीर मुहम्मद उर्फ हजरत मियाँ यांनी घातला. साधारण १० वर्षे हे काम सुरु होते. सरोवराच्या पश्चिमेला २०० फुट लांब पुल आहे. महाराजा रणजितसिंहने या मंदिरासाठी अपार धन दिले होते. या दरम्यान याचे छत व भिंतींना सोन्याचा वर्ख लावला गेला. साधारण १०० किलो सोने यासाठी वापरात आणले होते. मंदिराच्या पश्चिमेला अकाल तख्त आहे. रोज सकाळी ५ वाजण्याच्या आधी अकाल तख्त मधुन गुरुग्रंथसाहिब मंदिरात आणतात व रात्री मंदिरातुन परत अकाल तख्त मध्ये वाजतगाजत नेतात. १६ ऑगस्ट १६०४ पासुन हि प्रथा गुरु अर्जुनदेवांनी बाबा बुधा याला सांगुन चालु केली. १७६२ मध्ये अहमदशहा अब्दालीने सुवर्ण मंदिराची नासधुस केली होती. मात्र दल खालसा च्या भाई देसराजने त्याची १७७६ मध्ये पुर्नबांधणी केली. अमृतसरच्या मंदिरात मोफत लंगर चोवीस तास सुरु असतो. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात जुबी वृक्ष म्हणून झाड आहे. ४५० वर्षांपूर्वी बाबा गुजहाजी यांनी याच वृक्षाखाली बसुन मंदिरचे बांधकाम बघितले होते. तर अकाल तख्ताचे काम १५८९ मध्ये सुरु होऊन शिखांचे सहावे गुरु हरगोविंद यांनी १५ जुन १६०६ मध्ये ते पूर्ण केले. तेथे शिख गुरुंच्या तलवारी व ध्वज ठेवले आहेत. शिखांचे हे न्याय स्थान आहे.शिखांचे पाच पवित्र तख्त आहेत – अकाल तख्त(अमृतसर), पटणासाहेब, केशरगढ, नांदेड व दमदमसाहेब(भतिंडे). शिखांमध्ये पंथहि बरेच आहेत. – अकाली पंथ, उदासी पंथ, कूका पंथ, खालसा पंथ, ग्यानी पंथ, नानकशाहि, निरंकारी पंथ, निर्मल पंथ, निहंग पंथ, भगत पंथ, सिंग सभा, सुथराशाहि पंथ, सेवा पंथ हंदाली पंथ असे १४ मुख्य पंथ निश्चित सांगता येतात. यापैकी शिख पंथच अकाली पंथ म्हणुन ओळखला जातो. अकाल म्हणाजे कालरहित. सत श्री अकाल हि त्यांची घोषणा आहे. या नंतर ३० मार्च १६९९ मध्ये गुरु गोविंददासांनी “खालसाची” स्थापना केसरगढ(आनंदपूर) केली. त्यांच्या हाताखाली २०००० वेषधारी खालसा अनुयायी तयार झाले. हे मुळात लढवय्ये अनुयायी होत.


रात्री ११:३० ला परत हॉटेलवर आलो. दुसर्‍या दिवशी परत सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग आणि अटारी(वाघा) बॉर्डर बघायचे ठरवले होतेच. दुसर्‍या दिवशी दुपारनंतर अटारीला जाण्यासाठी हॉटेलवाल्याच्या ओळखिने गाडि ठरवली. सकाळी आवरुन निघायला ९:३० वाजले. हॉटेल बाहेर निघालो तो भरपुर अंधारुन आलं होत आणि रीप रीप पावसाला देखिल सुरुवात झाली होती. एका रिक्षावाल्याला पकडले आणि सुवर्णमंदिराकडे चल म्हंटल तर साहेबाने १५०रु. मध्ये आम्हा सगळ्यांना अमृतसर फिरवतो म्हणाला.
त्याने प्रथम सुवर्ण मंदिरात नेले. रात्रीचे कौतुक सोहळे कमी होते म्हनून कि काय पुढला तासभर सुवर्ण मंदिर परीसरात फिरत होतो. मग दर्शनासाठी रांगेत उभं राहिलो. सुदैवाने पाऊस देखिल जवळपास थांबला होता. साधारण १५-२० मिनिटांनी आत जायला मिळालं. जाड-जुड ग्रंथ साहेब ठेवला होता त्यासमोर भजन-किर्तन सुरु होते एकजण त्यावर चवर्‍या ढाळत उभा होता. नमस्कार करुन बाहेर पडलो. अमृतसर मंदिरा पासुन मोजुन २-३ गल्ल्या सोडुन जालियनवाला बाग आहे.

जालियनवाला बाग चटकन ओळखु येणार नाहि अशी आहे. एका काळ्या रंगाच्या भिंतीवर रंग उडालेल्या अक्षरात जालियनवाला चे नाव लिहिले आहे. गेटवर एक उदासिन पोलिस बसला होता. एका बोळातुन आत गेल्यावर उजव्या हाताला एक फलक लावलाय – “यह धरती लगभग दो हजार निर्दोष हिंदुस्तांनियोंके रक्त से पवित्र हुई है। जो कि १३ अप्रैल १९१९ को ब्रिटिश सरकार की गोलियो का निशाना बने। इस जमीन को लोगो से चंदा एकत्रित करके इसके मालिकोंसे खरीदा गया।“ वाचल्यावर सर्रकन अंगावर काटा उभा राहिला. २००० मुडदे? म्हणजे जालियनवालाच्या बलिदानाचा इतिहास कितीहि जवळचा वाटत असला - तोंडपाठ असला तरी त्या प्रत्यक्ष ठिकाणी उभं राहुन तो फलक वाचताना भिरभिरायला होतं. म्हणजे आम्हि ज्या बोळातुन आत आलो त्याच बोळातुन जनरल डायर नामक राक्षस आत आला असेल मागोमाग शे-दिडशे सैनिक ३-३ च्या ओळिंमध्ये मार्च करत आले असतील, जनरल डायरने खुनशी आवाजात सैनिकांना पोझीशऽऽन अशी ऑर्डर दिली असेल त्या मैदानात जुलमी रौलट कायद्याला विरोध करायला जमलेल्या हजारो लोकांची चल बिचल झाली असेल आणि कुठलीहि पूर्व सूचना न देता…..फायऽऽऽर अशी ऑर्डर डायरने दिली असेल हां इथुनच!!! तसच लिहिलय इथे “लोगों पर गोली यहाँ से चलाई थी।“ एक हजार सहाशे पन्नास गोळ्या…..इथुनच सटासटा गोळ्या सुटल्या असतील. वय-लिंग-जात-धर्म कसलाहि विचार न करता गोळ्या फक्त निशाणा शोधत निघाल्या असतील काहि निशाण्यावर बसल्या असतील तर काहि आसपास – त्या काय समोरच्या भिंतीवर आहेत अजुन गोळ्यांच्या खुणा. आणि मागच्या बाजुला “शहिद कुआँ” गोळ्यांपासुन वाचण्यासाठी काहि अभागी जीव हिच्या आश्रयाला धावले होते कोरड्या विहिरीत उड्या टाकल्या काहिंचे हात-पाय मोडले काहिं वरुन उड्या मारणार्‍या इतर लोकांच्या वजनाखाली दबुन गुदमरुन मेले. काहिच झाले नाहि अश्या आविर्भावात मग्रुर पावले टाकत गाडिच्या धुराची वलये काढत जनरल डायर निघुन गेला असेल. नंतर आठवडाभर अमृतसरचा पाणीपुरवठा बंद होता. कोल्ह्या-कुत्र्यां खेरीज कोणालाहि जालियनवालात प्रवेश नव्हता. जे वाचले होते त्यांना ओल्या वेताचे १००-१०० फटके खाल्यां नंतरच बोळातुन सरपटत बाहेर जावे लागत होते. १०० फटके खाल्यावर कातडि जवळापास लोंबायला लागत असे.

सुन्न मनाने तिथल्या एका नविन वास्तुत प्रवेश केला, इथे सध्या सगळ्या क्रांतिकारकांची सुंदर तैलचित्रं लावली आहेत. कर्तारसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर, मदनलाल धिंग्रा, उधमसिंग, भगतसिंग-राजगुरु-सुखदेव, मादाम कामा, श्यामजी कृष्ण वर्मा अश्यां बरोबर कर्झन वायली आणि मायकेल ओडवायर या ब्रिटिश अधिकार्‍यांची चित्रे सुध्दा आहेत त्यात त्यांच्या वध भारतीय क्रांतिकारकांनी का केला हे ३ भाषांत तिथे लिहिले आहे. आवर्जुन बघण्यासारखे प्रदर्शन आहे. कारण आमचा शाळकरी इतिहास हाच मुळात १९२० नंतर सुरु होतो आणि व्हाया १९४२ तो लाल किल्ल्यावर संपतो. १९२० च्या आधीच्या घटना, क्रांतिकारकांचा इतिहास आणि आझाद हिंद सेनेचा इतिहास हे प्रत्येकि एका धड्यात संपतात. तसेहि या गोष्टिंना महत्व आहेच कुठे? माथेफिरु क्रांतिकारकांना दुसरे उद्योग धंदे नव्हते म्हणुन ते मारोकाटो का पंथ उघडुन जे मुडदे पाडत फिरत होते नाऽऽऽ?? जालियनवाला बद्दल ब्रिटिशांनी तरी कुठे अजुन जाहिर माफी मागितली आहे अजुन? हे सो कॉल्ड मानवता जपणारे ब्रिटिश किती क्रुर होते हे त्यांनी डायरला निर्दोष मुक्त केले तेव्हाच समजले. डोक्यात संताप आणि बधीरता घेऊन तिथल्या स्मारकाचे दर्शन घेऊन आम्हि निघालो. मग रिक्षावाल्याने २ मंदिरांत नेले एक वैष्णोदेवी मंदिर तिथे वैष्णोदेवी मंदिराची मिनी प्रतिकृती आहे म्हणजे गुहाच तयार केलीये छोटिशी आणि मग बाहेर निघाल्यावर भरपूऽऽऽऽऽर वेगवेगळे देव त्या मंदिरात सर्वत्र होते बोले तो देवांची को-ऑप हाऊसिंग सोसायटीच होती. तिथुन त्याने अजुन एका मंदिरात नेले हे मंदिर तर सुवर्ण मंदिरची हुबेहुब प्रतिकृती आहे. कृष्णाचे मंदिर होते ते. या मंदिरापाशी आलो आणि परत पावसाला सुरुवात झाली. तसेहि २:३० वाजत आले होते. अटारीसाठे गाडिला ४ वाजता बोलावले होते. मंदिरा बाहेरच्याच एका छोट्याश्या टपरीवर चहा-कॉफि आणि ब्रेड-बटर टोस्ट खाल्ले पाऊसाने थंडि बर्‍यापैकी वाढल्याने गरमा गरम चहा आणि ब्रेड-टोस्ट खाताना मिळणारं सुख हे शब्दांच्या पलिकडच होतं. हॉटेलवर पोहचलो. तेव्हा गाडीवान दादा ओमनी घेऊन ऑलरेडि पोहोचला होता. पाच मिनिटात आलो असे सांगुन वर जाऊन थोडं फ्रेश झालो आणि निघालो.

अमृतसर – अटारी हे अंतर साधारण ४४ किमी आहे. तासाभरात आम्हि अटारीला पोहोचलो. आत जाताना ३ ठिकाणी चेकिंग होते. आत प्लॅस्टिकची पिशवी नेऊ देत नाहित. आपण नेहमी ज्याला वाघा बॉर्डर म्हणतो ती मुळात अटारी सीमा आहे वाघा हे पाकिस्तानकडिल सीमेचे नाव आहे. तिथे दर सकाळी- संध्याकाळी न चुकता ध्वजवंदना दिली जाते. संपूर्ण जगात हे असे एकच ठिकाण आहे जिथे रोज दोन देशांचे सैनिक ध्वजारोहण करताना वा ध्वज उतरवताना मोठा कार्यक्रम करतात व हस्तांदोलन करतात. आम्हांला आत सोडले तसे डावीकडिल जीन्याने आम्हि वर पब्लिक गॅलरीत गेलो समोर BSF चे कार्यालय आहे. गॅलरीत स्त्रीयांना गेटच्या जवळचे स्थान दिले आहे तर पुरुषांना कार्यालया समोरचे. त्यामुळे आम्हि इकडॆ तर बरोबरच्या दोघी गेटच्या जवळील भागात गेल्या. गर्दि झाल्यावर मोठ्ठ्या आवाजात देशभक्तीची गाणी लावली. आपल्याकडे तुडुंब गर्दि होती पाकिस्तानचा भाग मात्र शांत शांत होता मोजुन १००-१५० जण असतील. आपोआप दोहो बाजुंनी नारेबाजी सुरु झाली. इथेहि मराठी माणसे भरपुर होती कोणीतरी मध्येच “ शिवाजी महाराज किऽऽऽऽ!” अशी ललकारी दिल्यावर सगळ्यांनी जीव काढुन जयऽऽऽ असा प्रतिसाद दिला. मग किमान १५-२० मिनिटे शिवरायांचा दरबार भरला होता. तिकडुन देखिल पाकिस्तान जिंदाबाद चे नारे लावले जात होते. इथुन वंदे मातरम चे. असे वाक् युध्द बराचवेळ सुरु होते. ्त्यातुन रेहमानचे वंदे मातरम किंवा चक दे इंडिया लागले कि आपल्याकडचा उत्साह ओसांडुन वाहत होता.

पलीकडे लाहोर दिसत होते. वाघा बॉर्डर पलीकडचे लाहोर बघुन बैचैनी वाढतच गेली. मोजुन ६२ वर्षांपूर्वी “तो” भाग माझ्या मातृभूमीचा हिस्सा होता. काय नाहिये त्या सीमेपलीकडे? पाणीनीचा सिंध, हिंदु संस्कृतीचा पहिला हुंकार जिथे उमटला असेल - जिच्या काठावर जगातला सर्वात जुना ग्रंथ असा ऋग्वेद लिहिला गेला ती सिधु नदि, हरप्पा – मोहंजोदाडो, मराठी माणासाचा मानबिंदु –ज्यापलीकडे राघोभरारींनी भगवा फडकवला होता ती “अटक”. प्रतिमुंबई असलेली कराची जिथे राष्ट्रिय कॉंग्रेसची अनेक अधिवेशने झाली असतील. आणि खुद्द लाहोर?? त्या बद्दल काय बोलणार? प्रत्यक्ष श्रीरामाच्या सुपुत्राने “लव” ने जे “लवपुर” वसवले तेच आजचे लाहोर. स्वातंत्र्यपूर्व काळात तर लाहोर म्हणजे क्रांतिकारकांचे आग्यामोहोळ बनला होता. दक्षीण भारत सोडता भारताच्या कुठल्याहि भागात एखादे क्रांतिकारी कृत्य झाले तर त्यावर लाहोरचा शिक्का असायचाच. महाराष्ट्र-पंजाब-बंगाल या तीन प्रांतात कधी काय घडेल हे सांगता येत नसे. इथे महाराष्ट्राने हाक दिली कि पंजाब ओ द्यायचा आणि पंजाबने ओ दिली कि त्याचा परीणाम, बंगाल पेटुन उठायचा. लाहोरच्या सेंट्रल जेल मध्ये ३ वेड्या पीरांनी फाशीच्या निर्दयी-राठ दोरांची हजार-हजार चुंबने घेतली असतील. वंदे मातरम! च्या जय घोषात त्यांच्या गळ्याभोवती ते दोर आवळले गेले असतील आणि मग जेलरच्या हातातला रुमाल खाली पडल्यावर पायाखालची फळी सरकली असेल, मग काहि क्षणांची जीवघेणी तडफड होऊन याच मातृभूमीला परत नऊ महिन्यांनी भेटायची अनिवार ओढ मागे ठेवुन ३ कलेवर तिथे झुलत राहिली असतील. भगतसिंग – सुखदेव – राजगुरु, मेल्यानंतर देखिल त्यांच्या प्रेतांची विटंबना झाली. कुर्हाडिचे घाव घालुन त्यांची विच्छिन्न प्रेते पोत्यात घातली आणि रावी नदिच्या काठी भडग्नी दिला. पण …. पण आज लाहोर मध्ये ते सेंट्रल जेल आहे कुठे? तिथल्या पिढीला ना भगतसिंगांचा त्याग माहितीये ना ते सेंट्रल जेल. “शहिदों कि चितांओ पर लगेंगे हर बरस मेले, वतन पे मिटनेवालोंका यहि बाकि निशान होगा।“ हे स्वप्न तसेच राहिले. मिळाले काय? फाळणी? रक्तपात?? जेव्हा रामप्रसाद बिस्मिलांनी “सरफरोशी कि तमन्ना..” लिहिलं तेव्हा
“है लिए हथियार दुश्मन ताक में बैठा उधर, और हम तैयार हैं सीना लिए अपना इधर।
ख़ून से खेलेंगे होली गर वतन मुश्क़िल में है, सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है।“
या ओळी त्यांच्या येणार्‍या पिढ्या एकमेकां विरुध्द वापरतील अशी त्यांना कल्पनाहि नसेल. आताहि तेच तर चालु होत. भारतमाता कि जय – पाकिस्तान जिंदाबाद हे काय वेगळं सांगत होते?

सारख त्या सीमेपलीकडे जावसं वाटत होतं. पण कितीहि वाटलं तरी त्या सीमेपलीकडे मला जाता येणार नव्हतं. व्हिसा नामक एका कागदि चिठोर्‍याची गरज त्यासाठी लागणार होती. खुप वाटत होतं पलीकडे जावं किमान ५-७ हजार वर्षांच्या इतिहासाला प्रेमाने कुरवाळावं पण ते शक्य नव्हतं. त्या तिथे उभं राहिलो आणि प्रथमच इतिहासाकडे तटस्थपणे बघितलं तेव्हा मला ना जीनांची बाजु जाणुन घ्यायची होती ना सावरकरांची ना गांधींची. असं का घडलं? कोण चुकलं? कोण बरोबर होतं? कोणी स्वार्थीपणा केला? कोण पराभूत झाले? हे सगळे प्रश्न गळुन पडले. सत्य फक्त इतकच होतं कि ६२ वर्षांपूर्वी २ देश निर्माण झाले, जे शेजारी रहात होते ते एकमेकांच्या जीवावर उठले. आजहि त्यात खंड नाहि. दोघांत संशयाची दरी होती – आहे – राहिल. सुदैवाने आज भारतात लोकशाहि आहे. भारत – पाकिस्तान हे दोन देश दोन चित्रे दाखवतात. एक दंडुकेशाहिच दुसरा लोकशाहिचं. पाकिस्तानात लोकशाहि कधीच मुळ धरु शकली नाहि.

अचानक बिगुल वाजले तशी तंद्रिं भंगली. सहा उंच जवान आधी २ आणि मग ४ असे गेट कडे शिस्तित सरसर पुढे जाऊ लागले. एक सरदारजी ऑफिसर त्यांना आदेश देत होता. सगळीकडे उत्साह ओसांडुन वाहत होता. त्यांचे चालणे – पाय खांद्याच्या उंचीला आणुन आपटणे. सगळं कसं रोमांचक होतं. मधुन मधुन जमावांतुन येणारे जयघोष जवानांचा उत्साह वाढवत होते. पलिकडे जर घोषणा सुरु झाल्या तर लोकांना सिचना देणारा जवान आमच्याकडे बघुन त्याचे मनगट तोंडाजवळ न्यायचा, कि काय ते समजुन आम्हि बोंब मारायचो किंवा आरडाआओरडा करुन त्यांचा आवाज दाबुन टाकायचो. हा संपुर्ण कार्यक्रम तिथेच जाऊन बघण्या-अनुभवण्यासारखा आहे. दोन्हि देशांचे झेंडे एकमेकांना क्रॉस होतात तेव्हाचा क्षण खरोखर कॅमेरात पकडण्यासारखा असतो. मात्र मला पाऊस असल्याने कॅमेरा बाहेर काढताच आला नाहि. तरी बरं बरोबर छत्री होती. आमच्या समोर दोन गोरे येउन उभे राहिले. अखेर त्यांची दया येऊन आम्हि आमच्या छत्रीत दोन गोर्‍यांना वळचणीला घेतलं. अतिथी देवो भव: च्या जाहिरातीत घ्यावा असा तो क्षण होता. ते हे सगळं डोळे विस्फारुन बघत होते. आपल्या जवानांनी केलेल्या करमाती बघुन “ओह वंडरफुल! लुक हि इज व्हेरी इन्थुजियास्टिक!” अशी दाद आपसुक त्यांच्याकडुन येत होती. पाऊस पडल्याने तापमान चटकन खाली आलं. बोटं गार पडली होती. सगळं संपल्यावर बाहेर आलो तसे समोर किमान सव्वासहाफुटाचा उभा आडवा जवान, त्यात त्याच्या डोक्यावर लाल-पिवळा तुर्रा असलेली भारदस्त पगडि, तरतरीत नाक, आवाजात जबर असा एक अवाढव्य देह उभा होता. मग त्याच्या बरोबर फोटो सेशन झाले. शेवटि आम्हिच होतो मग कहां से हो? क्या करते हो? वगैरे जुजबी माहिती त्याने विचारली. तो हरीयाणाचा होता. त्याला शेकहॅन्ड केल्यावर गारव्याने बधिरता आलेला हात सुध्दा बोंबलुन उठला. आर्मीवाले कसा कडक शेकहॅन्ड करतात हे माझ्या नातातल्या युनिफॉर्म सर्विस मधल्या लोकांमुळे माहित होतं ….पण इतका कडक?? तिथेच BSF ने कॅन्टिन उभं केलय. तिथले प्रत्येकी ४-४ समोसे हादडले गरमा-गरम चहा घेतल्यावर जे काहि म्हणून स्वर्गिय सुख मिळालाय अहाहाऽ!

परतीच्या वाटेवर डोकं फिरावं अशी गोष्ट घडली. गाडिचे वायपर्स चालत नाहियेत हे अर्ध्या रस्त्यात आल्यावर समजले. संध्याकाळ त्यातुन पाऊस, रस्ता दिसेना ड्रायव्हर अर्धा गाडिबाहेर डोकावुन सारखी काच पुसत होता. सगळ्यांनी त्याला परोपरीने सांगुन बघितलं कि बाबा बाजुला गाडि लाव तासभर उशीर झाला तरी चालेल कायमचा उशीर व्हायला नको. पण हा ऐकायलाच तयार नाहि. वायपर्स बदलायचे म्हणजे त्याच्या खिशाला चाट लागली असती. कदाचित गाडि त्याच्या मालकिची नसावी, तो फक्त चालवत असावा मिळालेले पैसे कोणी इथे घालवायला सांगितले असे मालकाने विचारले तर पगारहि जायचा म्हणुन बहुदा तो टाळाटाळ करत होता. मैथिली तर या रेट ने बडबड करत होती, कि ते ऐकुन ऐकुन थोड्या वेळाने त्याला मराठी बोलता आले असते. अखेर पाऊस थांबला आणि अखेरची(म्हणजे प्रवासाची) पंधरा मिनिटे नीट गेली. रात्री जेवायला खैबर नावाच्या हॉटेल मध्ये गेलो म्हणजे दोन्हि दिवशी रात्री जेवायला तिथेच जात होतो. छान हॉटेल होते.

दुसर्‍या दिवशी दिल्लीसाठी निघायचे होते. सकाळचीच गाडि होती. समोर एक पंजाबी कुटुंब होतं, साधारण आपल्या नशिबातच आगाऊ कार्टि यावी असं यावेळीहि घडलं. पण मुलं आगाऊ का होती हे त्यांच्या आई – वडिलांनी देखिल सिध्द केलं. त्यांतल्या बायका इतक्या बडाबड करत होत्या कि सिट फाडुन त्यातला कापुस काढुन कानात घालवासा वाटत होता(म्हणाजे साधारण बायका जितक्या म्हणून बोलतात त्यापेक्षाहि किमान पाचपट जास्त बोलत होत्या) त्यांचा नेहमीच्या बोलण्याचा आवाज हा गाडि हाकणार्‍या मोटरमनशी बोलावं इतपत होता. त्यातुन त्या हसल्या कि गाडिचा डबा हा चालण्यामुळे हलत नसुन त्यांच्या हसण्या-बोलण्याने थरथरत असावा असे वाटायचे. बोले तो इरीटेटिंग या प्रकारात सगळी गोष्ट येत होती. समाधान एकाच गोष्टिचे कि खाणं-चहा सगळं कसं असं आपोआप टेबल वर येत होतं. चहा/ब्रेकफास्ट जागच्या जागी मिळाल्यावर कित्ती बर वाटतं? साधारण १२ वाजता आम्ही नवी दिल्लीला पोहोचलो. मला वाटलं होतं कि वाटेत गाडि पानिपत स्टेशनला थांबेल पण तसं झालं नाहि. प्रत्यक्ष पानिपत जिथे घडलं तिथे नाहि तरी किमान त्या स्टेशनला पाय लावायची इच्छा होती. पण सोनपत, भागपत, पानिपत असं एका मागोमाग एक निघुन गेलं आणि माझी जरा निराशाच झाली. आता विशाल, गिरीश-साक्षी आमच्या बरोबर राहणार नव्हते ते मुंबईला परतणार होते. त्यांची ४ची राजधानी होती. आम्हि टाटा च्या जिंजर हॉटेल मध्ये रुम बुक केल्या होत्या. नवी दिल्ली स्टेशनच्या अगदि समोरच आहे. मस्त सोय आहे, सेल्फ सर्विस आहे पण इतर कसलाहि त्रास नाहि. रुम्स तश्या लहान तरी सुटसुटित आहेत. लॉन्ड्रि सर्विस, इंटरनेट्ची सोय, खाली कॅफे, त्याच बिल्डिंग मध्ये केमिस्ट आणि पुस्तकांचे दुकान – अजुन काय हवय २-३ दिवसांच्या वास्तव्यासाठी? शिवाय हे हॉटेल टाटाने IRTC बरोबर भागीदारीत उघडल्याने टाटाच्या इतर ठिकाणच्या जिंजर चेन पेक्षा इथे रुम्स स्वस्तच आहेत. जरा आराम करुन ते तिघं राजधानी साठी निघाले. ते गेल्यावर आम्हि परत आडवे.



डोळे उघडले ते थेट ८ वाजुन गेले होते. मी, हर्षद – मैथिली तिघांनी आवरले आणि “इंडिया गेट” कडे निघालो. साधारण दहा मिनिटांच्या रीक्षेतील प्रवासाने आम्हि इंडिया गेट समोर पोहोचलो. रात्री पिवळ्या रंगात संपूर्ण इंडिया गेट न्हाऊन निघाले होते. इंडिया गेटच्या जसजसं जवळ जाऊ लागलो तशी त्यांची भव्यता समजु लागली. इंडिया गेट भोवती पोलिसांचा पहारा होता. एक मिडियाची व्हॅन देखिल उभी होती. इंडिया गेट पहिल्या महायुध्दातील व अफगाण युध्दातील शहिद झालेल्या ९० हजार सैनिकांच्या आठवणीत उभे केले आहे. नवी दिल्लीचे नगररचनाशास्त्रज्ञ एडविन ल्युटेन हेच याचेहि आर्किटेक्ट होते. भारतीय सैनिकांना समर्पित असलेले हे सर्वात मोठे स्मारक आहे. इंडिया गेटच्या इमारतीच्या मध्यावर बंदुकिची नळी जमिनीकडे व त्यावर शिरस्त्राण अशी खुण असलेली ’अमर जवान” ज्योत आहे. ७१ च्या पाक युध्दातील जवानांच्या आठवणीत ही ज्योत उभी केली आहे .२६ जानेवारी १९७२ मध्ये इंदिरा गांधींच्या हस्ते ह्या ज्योतीचे अनावरण केले. तेव्हा पासुन दर २६ जानेवारीला राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री व तिन्हि दलांचे प्रमुख त्यांना पुष्पचक्र अर्पण करतात. ज्योती समोर तीन्हि दलांचे झेंडे फडकत असतात. व सैनिकांचा अहोरात्र पहारा असतो. दर २० मिनिटांनी पहार्‍यावरचा जवान बदलतो. एकमेकांची जागा घेण्याची व पापणी न लवता ज्योतीकडे टक लावुन पाहण्याची त्यांची मिनिटभराची कसरत/परेड देखिल पाहण्यासारखी असते. अतिशय शिस्तीत हे सगळं होतं. आपल्याला थेट ज्योती जवळ जाता येत नाहि. इंडिया गेट भोवती सुरक्षा व पावित्र्य या दोन्हि कारणांनी साखळीचे रींगण केले आहे. व त्यात चार जण सतत फिरत असता. तुम्हि जर त्या साखळ्यांना खेटुन उभे राहिलात तर लग्गेच तुम्हांला लष्करी खाक्यात अतिशय प्रेमाने हटकतात.

इंडिया गेटच्या एका बाजुला एक उंच मेघडंबरी आहे. एडविन ल्युटेन यांनी महाबलीपुरम येथील एका मेघडंबरीवरुन प्रेरीत होऊन त्याची बांधणी केली आहे. त्यात स्वातंत्र्यपूर्व काळात जॉर्ज पंचम यांचा पुतळा होता. मात्र स्वातंत्र्यानंतर तो हटवण्यात आला आहे. सध्या ती मेघडंबरी रीकामी आहे. मेघडंबरीच्या पलीकडला रस्ता मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम कडे जातो. पुढे मग तोच उजवीकडे रस्ता पुराना किला वगैरे भागात जातो. तर डावीकडे प्रगती मैदान कडे जातो. इंडिया गेटच्या दुसर्‍या बाजुला म्हणजे वेस्ट एन्डला थेट नाकासमोर राष्ट्रपती भवनाकडे जाणारा रस्ता आहे. म्हणजे राजपथ पूर्व – पश्चिम पसरला आहे. रात्री इंडिया गेटकडुन राष्ट्रपती भवन बघण्यात देखिल खुप आनंद मिळतो. राष्ट्रपती भवन कडे जाणारा रस्ता दोहो बाजुंनी रस्त्यावरच्या दिव्यांनी उजळलेला असतो. राष्ट्रपती भवनकडे दिव्यांच्या दोन रांगाच गेल्या असतात. राजपथचे जर मधोमध भाग केले तर उत्तरेकडे कॅनॉटप्लेस हा दिल्लीचे हृदय म्हणावे असा भाग आहे एकदम हॉट एन हॅपनिंग! तर दक्षीणेकडे अकबररोड त्याला येऊन मिळतो. अकबर रोड म्हणजे सगळ्या मंत्र्या-संत्र्यांचे बंगले व पक्षाची कार्यालये किंवा “हाय कमांड” इथे आहेत. या खेरीज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश, न्यायाधीश, उपराष्ट्रपती वगैरे यांचे बंगले याच अकबर रोड वर आहेत.

नवी दिल्ली हि प्लान्ड सीटि आहे. एड्विन ल्युटेन व त्यांचे सहकारी हर्बट बेकर यांच्या कल्पनेतुन ह्याची नगररचना झाली आहे. पुर्वीच्या रायसिना पिंड या शिखांच्या गावामधील जागेत - रायसिना हिल वर बेकर यांनी व्हॉइसरॉय हाऊस उभे केले आज तेच राष्ट्रपती भवन म्हणुन ओळखले जाते. त्याच्या बाजुच्या सेक्रेटरीस्ट बिल्डिंग्स ज्यांना आज नॉर्थ ब्लॉक व साऊथ ब्लॉक असे म्हणतात त्या देखिल बांधुन काढल्या. राजपथला पूर्वी “किंग्स वे” असच नाव होतं. अर्थात राजपथ ने त्याचा अर्थ तोच राहतो पण निदान भारतीयकरण झाले हे समाधानाचे आहे. व्हॉइसरॉय हाऊसला मध्यावर ठेवुन सगळ्या नगराची बांधणी झाली. मग पार्लिमेंट हाऊस व संसद मार्ग यांचीहि रचना बेकर यांच्या कल्पनेतुन झाली. १२ डिसेंबर १९११ रोजी जॉर्ज पंचम यांनी त्यांची राजधानी कलकत्याहुन दिल्लीस हलवायचे ठरवले. आणि मग मुळ दिल्ली जवळच नवी दिल्ली बांधायला घेतली. हे सगळे बांधकाम १९१२ ते १९३१ मधील आहे. १९३१ मध्ये संपुर्ण प्लान्ड दिल्ली उभी राहिली. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले तरी नवी दिल्ली शहराचा संपूर्ण ताबा १९५६ मध्ये भारत सरकारला मिळाला. राष्ट्रपती भवन देखिल ५० साली भारतसरकारच्या ताब्यात आले.

रात्री ११ पर्यंत आम्हि इंडिया गेट भोवतीच घोटाळत होतो. वेगवेगळ्या ऍंगल्सनी त्याचे फोटो घेत होतो. वर पौर्णिमेचा चंद्र होता. बर्‍यापैकी थंडि देखिल होती. अखेर घड्याळ बघितलं तेव्हा चला टळुया इथुन असं वाटलं. दिल्लीत रिक्षा बरीच महाग आहे. बर जी रिक्षा केली तीने हॉटेलपासुन दुरच सोडलं. अखेर विचारत विचारत आम्हि जिंजरला पोहोचलो तेव्हा साडे अकरा वाजत आले होते. खालीच कॅफे मध्ये थोडसं खाल्लं. दुसर्‍या दिवशी पहाटेच ताजमहाल बघायला जायचं होतं म्हणून पटापट निजानिज केली.

सकाळी सातलाच निघालो. एक गाडि ठरवली होती. सकाळी हॉटेलमधुन बाहेर पडलो आणि दिल्लीची थंडि अनुभवली. तरी डेनिम जॅकेटवर भागत होतं पण बोटांची टोकं गाऽऽर पडली होती. मध्ये एका ढाब्यावर थांबुन आलु के पराठे हाणले दोन पराठ्यात पोट पॅक. दिल्ली सोडुन आम्हि उत्तर प्रदेशात शिरलो आणि ट्रॅफिक मधला बेशिस्तपणा लग्गेच जाणावला. दिल्ली – आग्रा हे अंतर २०० किमी आहे. मथुरा मार्गे NH2 हा रस्ता आग्र्याला जातो. साधारण साडेतीन – चार तासाचे ड्राइव्ह करावे लागते. प्रथम गाडिवाल्याने आम्हाला मथुरेतील इस्कॉन टेंपल मध्ये नेले. तेथे ११:१५ ला पोहोचलो. आत गेलो तर सगळे देव दरवाजे लावुन आराम करत होते. मंदिरात समजले कि मुर्त्यांसमोरचे दरवाजे १२ वाजता उघडणार. आम्हि परत बाहेर आलो. गाडिवाला म्हणाला अर्ध्यातासा साठी दर्शन चुकवु नका. मगशी आम्हि आत जाताना आंम्हाला मोबाईल आत नेता येणार नाहि, कॅमेरा आत नेता येणार नाहि असे सुरक्षा रक्षकाने सांगितले होते. हर्षद बाहेरच थांबला होता. आम्हि वस्तु गाडित ठेवल्या होत्या. परत जाताना हर्षद ने गाडितला मोबाईल बरोबर घेतला. सुरक्षा रक्षकाने त्याला अडवले तसे हर्षदने त्याला “टोक” काढली “गोरोंको सब माफ है? उस परदेसी लडकि को देखो – वो मोबाईल साथ मै लिये घुम रहि है ऊसे कुच नहि कहोगे? मै इसकि कंप्लेंट करनेवाला हुं, वैसे भी आप सरकारी लोग नहि हो!” तो गडबडला “वो साहब…वो हमें.. “ पण हर्षद ने त्याला झटकले आणि आम्हि आत गेलो. अर्ध्या तासात देवा समोरचे दरवाजे-पडदे उघडले आणि आत श्रीकृष्ण, राधा, बलराम राम –कृष्ण यांच्या सुंदर मुर्ती सजवल्या होत्या. मग आरती झाली. आरती म्हणणारे दोघे आणि पुजा करणारा एक जण गोरे चमडिवाले होते. पण हिंदि उच्चार चांगले होते. आजुबाजुला बरेच गोरे होते. मग दोन्हि हात आधी आकाशाकडे करुन तसेच खाली बसत आणि मग लोटांगण घालत. हा प्रकार पाचेक मिनिटे सुरु होता. शेवटि आम्हि स्वामी प्रभुपाद यांच्या पुतळ्यापाशी आलो. तिथे एकाने आम्हाला पकडले आणि “हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे।“ हा जप १०८ वेळा करा आणि अनुभुती घ्या वगैरे सांगायला सुरुवात केली तसे मी आणि मैथिलीने त्याला उलट्या चार गोष्टि सांगितल्या. मग त्याला समजले कि गीता केवळ आमच्यासाठीच बनली आहे. बिचारा इस्कॉनचा गंडा सोडुन आमच्यामागे यायचा म्हणुन पाच मिनिटांच्या बौध्दिकानंतर आम्हि थांबलो.

इस्कॉनमधुन निघायला १२:४५ वाजले. ताज महालकडे आम्ही कुच केले,थंडिचे दिवस असल्याने उन्हाचा मुळिच त्रास होत नव्हता. आग्र्यात शिरलो दुपार झाली होती. तशी सर्व ठिकाणी शांतताच होती. आग्रा या स्थानाचा पहिला उल्लेख महाभारतात अग्रवन या नावाने येतो. सध्याचे आग्रा शहर सिकंदर लोदिने १५०६ मध्ये वसवले १५२६ ते १६२८ या दरम्यान आग्राच मुघल साम्राज्याची राजधानी होते. मधल्या काळात हिंदु राजा हेमु विक्रमादित्य याने आग्रा-दिल्ली जिंकुन पुन्हा काहि काळ हिंदुंचे राज्य आणले होते. त्याच्या झंझावाता पुढे आग्र्याने न लढताच शरणागती दिली होती असे इतिहास सांगतो. ताज महाल शिवाय फत्तेपुर सिक्री, आग्रा किल्ला, अकबराची कबर, मानकामेश्वर मंदिर, गुरु का ताल, जामा मशिद, राम बाग, माहताब बाग अशी बरीच ठिकाणे आहेत. वेळेच्या बंधनामुळे दुर्दैवाने आम्हाला फक्त ताज महालच बघता आला.

गाडिवाल्याने ताजच्या सर्वात जवळच्या पार्किंग लॉट मध्ये गाडि पार्क केली. सर्वात जवळ असलेला पार्किंग लॉट किमान दिड किमी दुर आहे. उत्तरप्रदेश सरकारने ताजच्या साधारण एक दिड किमीच्या परीसरात गाड्यांना बंदि केली आहे. घोडागाड्या – इलेक्ट्रीक कार्स तिथे उपलब्ध केल्या आहेत. त्यातुन प्रवास करणारे मुख्यत: परदेशी पाहुणे असतात. एका घोडेगाडि वाल्याने सांगितले प्रत्येकी २० रुपये घेऊन ताजच्या प्रवेशद्वारापाशी सोडतो. दिड किमी साठी ६० रुपये?? अरे मुंबईते सुद्धा देत नाहि रेऽऽऽ असं झालं होत आम्हांला. आम्हि चालतच निघालो. दुर ताजचा संगमरवरी घुमट दिसत होता. प्रवेशद्वारापाशी गेलो. हर्षदच्या मावशीचे यजमान सरकारी अधिकारी आहेत. त्यांच्या हाताखाली काम केलेले एक सहकारी दिलीप यांनी त्या सकाळीच ताजच्या प्रवेशद्वारावर आमचे पास तयार करुन घेतले होते. तिथे आमच्या बॅगचे चेकिंग झाले. आत सोडल्यावर तिथल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ऑफिसरलाच भेटलो. त्याला पुर्व कल्पना असल्याने आमची बरीच सरबराई केली. अर्धातास गप्पा – टप्पा झाल्यावर त्याने एक पोलिसवाला वॉकिटॉकि सकट आमच्या बरोबर दिला. त्यांचे नाव करणसिंग होते. मग पुढचे चार तास आम्हि आणि ताज. ताजचे त्याच्या मोठ्या प्रवेशद्वारातुनच दिसणारे प्रथम दर्शन तुम्हांला संमोहित करते. आणि ताज कडे पडणारे प्रत्येक पाऊल ताजचे विराट आणि अंगावर येणारे रुप खुलवत जाते. त्या वास्तुत इतके भारावलेपण आहे कि क्षणभर तो ताज महाल कि तेजो महाल हा वाद विसरायला होते. ज्या कोणा अजोड बुध्दिमत्ता असलेल्या इसमाच्या टाळक्यात हि वास्तु उभी राहिली त्याच्या आणि ज्या हजारो हातांनी हि वास्तु अहोरात्र खपुन तयार केली त्या अनाम हातांची हजार चुंबने घ्यावीशी वाटतात.

बुर्‍हाणपुरात मुमताज महल चौदाव्या बाळंतपणा नंतर पैगंबरवासी झाली. मरताना म्हणे तीने शहजहानला सांगितले कि माझी कबर अशी बनवा कि जगात कुठेहि अशी दुसरी वास्तु नसेल (मुघल सम्राट असला म्हणुन काय झाले शेवटि बिचारा नवराच कि, त्यानेहि हो म्हंटले). तीच्या मरणानंतर एका वर्षाने ताज महालचे बांधकाम सुरु झाले १६३२ मध्ये सुरु झालेले काम १६५३ पर्यंत सुरु होते. अखेर १६५७ मध्ये परंपरागत रक्तरंजीत स्पर्धेत सत्ता औरंगजेबाकडे आल्यावर त्याने आजारी बापाला कैदेत टाकले. व अखेर शहाजहान मेल्यावर त्याच्या इच्छेनुसार त्याला मुमताज महल शेजारीच दफन केले. ताजमहाल हा एका डोक्यातुन अवतरला नसुन काही वास्तुथापत्य शास्त्रज्ञ एकत्र येऊन बांधलेले हे काम आहे. अब्द उल-करीम मामुर खान, मकरामत खान व उस्ताद अहमद लाहोरी अश्या तीन आर्किटेक्ट्सची नावे मिळतात. लाहोरी त्यांच्यातील प्रमुख होते. संपुर्ण बांधकाम करायला त्यावेळी ५ लाख रुपये खर्च आला होता. सगळे संगमरवर राजस्थानातील मकराना येथुन आणले. बाकि २८ प्रकारचे दगड, व मौल्यवान रत्ने, ह्या गोष्टी पंजाब, तिबेट, श्रीलंका, चीन, पर्शिया, अफगाणिस्थान, अरेबिया इथुन मागवल्या गेल्या. ताजवरचे कोरीवकाम बघताना डोळे विस्फारले जातात. इतके सुंदर कोरीवकाम त्यांनी कसे केले असेल? कोणती हत्यारे वापरली असतील? आणि बर्याच ठिकाणी तर एकाच आकृतीच्या मिरर इमेज आहेत त्या इतक्या हुबेहुब आहेत कि खरोखर कोणीतरी आरसा धरला असावा. ताजच्या भिंतींवरच्या अनेक आकृत्या या एकसंध आहेत. म्हणजे फुलाच्या पाकळीपासुन ते कुंडिपर्यंत एक अखंड कोरीवकाम आहे. त्यावरुन हलका हात फिरवला तर माणसाची नस जशी हाताला जाणवते तसे ते काम हाताला जाणवते. एकाच मापाची दहा दहा फुटी सलग बारीक नक्षीदार जाळी, एकमेकांत गुंफलेल्या वेली. लाल, केशरी, नीळ्या रंगातील फुले, हिरव्या रंगाची पाने हे खुप जिवंत आहेत. करणसिंगांनी तिथल्या एका गाईडला आमच्या बरोबर दिले. त्याने आतले काम दाखवताना डोळ्यांच्या ऊंचीला असलेल्या एका वीतभर आकाराच्या पट्टीवरील पाना-फुलांवर खिशातला पेन-टॉर्च चालु करुन टेकवला. तेव्हा त्या नीळ्या किंवा केशरी फुलांतुन आणि हिरवट पानांतुन प्रकाश आत गेला आणि शब्दश: त्यांच्या मागुन कोणीतरी दिवा धरावा असा इफेक्ट आला. हे असे काम आधी कधीच बघितले नव्हते आणि कदाचित दुसरीकडे बघायला मिळणे कठीण. आणि हि पाने-फुले बाहेरुन त्यात बसवली आहेत, म्हणजे संगमरवरावर इंचभर खोल कोरीवकाम करुन मग त्यात त्या वेगवेगळ्या रंगाचे दगड, वेली, पान, फुले यांचे आकार बनवुन आत अडकवले आहेत.

शहाजहान - मुमताज महलच्या कबरींभोवती जाळी बसवली आहे. अप्रतिम कलाकुसर. मंद प्रकाश, थंड फरशी आणि घुमणार्या पारव्यांचा आवाज याने आतले वातावरण गंभीरच असते. जर शांतता असली तर इथे घुमटाखाली उच्चारलले शब्द मिनिटभर सहज घुमत राहतात असे गाईडने सांगितले.मुळ कबर म्हणे खाली आहेत. खाली जायचा दरवाजा बंद केलाय व या त्यांच्या प्रतिकृती आहेत. ताज महालच्या या भागाला म्हणजे मुळ इमारतीला “रझा – इ – मुनावरा” म्हणतात. मुमताज महलच्या कबरीवर आणि ताजमहालच्या प्रवेशद्वारांवर कुराणातील आयता अथवा सुराह लिहिल्या आहेत. त्यापैकी मुमताज महलच्या कबरीवरील सुराहचा अर्थ – “इथे कायमसाठी नीजलेला जीव हा पुण्यात्मा होता त्याला कुठलेही क्लेष न होता जन्नत मिळो” – असं म्हणतात कि देवाचे आसन धरलेले चार देवदुत संपुर्ण कुराणात एकदाच बोलतात तीच हि ओळ. याखेरीज दोन्हि कबरींवर भरपुर वेली-पाना-फुलांची नक्षी आहे. शहाजहानच्या कबरीवर एक उंचवटा आहे. पुरुषाची कबर ओळखता यावी म्हणुन तो उंचवटा आहे असे म्हणतात. मुमताज महलची कबर वास्तुच्या मध्यभागी असुन नंतर शहाजहानची कबर नंतर पश्चिमेला बनवली आहे. आत फोटो काढायला बंदि आहे. ताजच्या प्रवेशद्वारावर लिहिलेल्या आयता वैशिष्ट्यपुर्ण आहेत. म्हणजे त्यांची जाडि खालपासुन वरपर्यंत एकाच आकाराची दिसते. त्याचे कारण वर जाणारे कोरीवकाम हे आकाराने जाड करत गेले आहेत त्यामुळे वर – वर जाऊन सुध्दा आकार तितकाच वाटत राहतो. कबरीच्या भागात जाताना बुट काढावे लागतात. किंवा बुटांवर एक आवरण चढवावे लागते. बरोबर करणसिंग असल्याने चिंता नव्हती. त्यांनी खिशातुन तीन सॉक्स सारखे जोड काढले व बुटांच्या वरुन घालायला सांगितले. तेच घालुन आम्हि आत जाऊन आलो.

ताज एक गारुड आहे. तुम्ही त्या वास्तुभोवती जितके फिरता तितके तिच्यात गुंतत जाता. त्याचा मुख्य दरवाजा – “दरवाजा-इ-रौजा” वास्तुकलेचे सुंदर उदाहरण आहे. दरवाज्यातुन आत गेल्यावर समोर दोन पुरुष उंचीच्या प्रचंड चौथर्यावर दक्षिणाभिमुख ताज दिमाखात उभा आहे. बाजुला ताजच्या उंचीशी स्पर्धा करणारे आणि वरच्या बाजुला निमुळते होत गेलेले चार मिनार आहेत. या मिनारांचे वैशिष्ट्य म्हणजे ते बांधुन काढतानाच बाहेरच्या बाजुला २ डिग्रीने झुकवले आहेत जेणेकरुन जर भुकंप झाला तरी मिनार बाहेर कोसळतील व मुळ वास्तुला धक्का लागणार नाही. वास्तुकलेतील अनेक आश्चर्ये ताजच्या बांधकामात दिसतात. मुळात त्याची मोजमापे इतकि अचुक कशी घेतली असतील हेच मोठे कोडे आहे. मुख्य दरवाजा, मधल्या पट्यातली कारंजी व ताजच्या मुख्य इमारतीच्या दरवाज्याचा मध्य इतका एक रेषेतील आहे कि त्या अचुकतेचा विचार करताना सामान्य माणुस डोकं खाजवत रहावा. दरवाजा-इ-रौजा व ताज महाल यांच्या मधल्या जागेत चार प्रशस्त बगिचे बनवले आहेत. चार बगिच्यात प्रत्येकि चार असे एकुण १६ सुंदर गवताचे वाफे बनवले आहेत. मध्यभागी अगदि काटकोनात छेदणारे + च्या आकाराचे पाण्याचे हौद आहेत त्यातच कारंजी खेळवली आहेत. एकमेकांना येऊन मिळणारे हे हौद जन्नत मधील चार नद्यांचे प्रतिक आहेत. व मध्यभागी असलेला हौद “हौद-अल-क्वथार” म्हणजे स्वर्गात पोहचल्यावर पुण्यात्म्यांची तहान भागवणारा हौद समजतात. पश्चिमेकडे असलेली मस्जिद आणि पूर्वेच्या बाजुला जवाब म्हणजे मस्जिदिचेच प्रतिबिंब भासणारा मेहमानखाना आहे. मेहमानखान्यात पुर्वी कबरीवर चादर चढवायला आलेल्या प्रतिष्ठितांच्या भेटीगाठी होत. ताजमहालच्या उत्तरेला यमुना वाहते. सध्या यमुना काळवंडली आहे. नदि पलीकडे म्हणे शहाजहानला काळा ताज बांधायचा होता, स्वत:ची कबर म्हणुन. पण त्याची तब्येत बिघडली व औरंगजेबाने त्या आधीच त्याला कैदेत टाकले. आपली शेवटची सात वर्ष आग्रा किल्यातील मुमताज महलसाठी खास बांधुन घेतलेल्या “मुसम्मन बुर्ज” इमारतीतच दुरुन ताज बघत बघत त्याने घालवली. यात किती खरे किती खोटे तो पैगंबरवासी शहाजहानच जाणे पण आजहि यमुनेच्या पलिकडे ताजमहालच्या चौथर्याला लागेल इतकि प्रचंड जागा मोकळी सोडली आहे. तिथेच माहताब बाग म्हणजे चांदण्यात फिरताना समोरचा ताज बघायला बनवलेली बाग होती असे सांगतात. यमुनेला सतत येणार्या पुरामुळे सध्या तिथे ओसाड जमिन दिसते.

करणासिंगांशी गप्पा मारताना त्यांना विचारले “आपने तो ताज को पुनम कि रात मै भी देखा होगा?” त्यावर मनमोकळे हसत म्हणाले “जिहॉं!! ऐसी खुबसुरत जगह शायदहि कही होगी!” आणि मग साडे चार च्या उन्हात ताजच्या द्वारावरच्या आयता चमकत होत्या. त्यांच्याकडे बोट दाखवुन ते म्हणाले “पुनम कि रात पुरा ताज इसी तरह जगमगाता है!” त्यांचा हेवा करावा तितका कमी वाटला. ताजचे शेकडो ऍंगल्स कॅमेरात पकडले. मिनाराचे, मशिदिचे, जवाबचे, दरवाजा-इ-रौजाचे अनेक फोटो काढले. मन भरत नव्हतं. एखादा ऍंन्गल राहिला नाही ना? असे वाटत होते. सुर्य मावळतीकडे झुकत होता आणि ताज सोनेरी रंगात न्हायला लागला. घुमटावर पडणारे पिवळे-तांबुस उन. घुमटाभोवती चक्कर मारत परत मिनार आणि घुमटाच्या खाली आश्रय घेणारे कबुतरांचे थवे आणि दुरच्या कुठल्यातरी मशिदित दिली जात असलेली अजान……..सगळेच अविस्मरणीय. त्यांनाच विचारले इथे अजुन काय बघण्यासारखे आहे? त्यावर म्हणाले “आग्रा फोर्ट है! वो सामने!.... लेकिन छह बजे बंद होता है! अब तो सवापॉंच बज गये है!......वहॉं पहुचतेहि आपको और आधा घंटा लगेगा।“ मग आम्हि ठरवले ताजच बघायचा. त्यावर त्यांनीच उपाय सांगितला – “अजी आप यहॉ जो म्युझियम है उसे देख सकते है!” म्युझियम मध्ये खरच अनेक गोष्टि ठेवल्या आहेत. दुर्मिळ चित्रं, शस्त्रे, अन्नात विष मिसळल्यास रंग बदलणारे दगडि ताट. नकाशे, ताज मधले वेगवेगळे दगड ते कुठुन आणले त्यांची जगाच्या नकाशासह दिलेली माहीती. उत्तम म्युझियम आहे.

अखेर साडेसहा पर्यंत ताजच्या फिरुन परत कंत्रोलरुम मध्ये गेलो. त्या ऑफिसरला भेटुन त्याला धन्यवाद दिले. त्याने विचारले “कितने दिन हो दिल्ली मै?” एकच दिवस आहोत परवा पहाटे जातोय असे म्हंटल्यावर तोच हिरमुसला झाला – कारण दिल्लीत काय काय बघा, व कुठे काय खा याची यादिच त्याने आमच्यासाठी केली होती ती फुकट जाणार याची चिंता त्याच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती. तो पंजाबी असल्याने खाण्याचा शौकिन होता त्याने किमान २०-२२ हॉटेल्स ची लिस्ट दिली. काहि नाहि तरी कॅनॉटप्लेस ला एका साऊथ इंडियन माणासाचे हॉटेल आहे तिथे जाऊन साऊथ इंडियन डिशेश खाऊन बघा हे सांगायला विसरला नाही. बाहेर पडल्यावर आधीस समोर भेळवाला होता त्याकडे भेळ हाणली. दुपारी ताजमुळे तहानभुक हरपली होती त्याची जाणीव आत्ता झाली. साधारण ७ वाजता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेत भरपुऽऽर पेठा घेतला. मध्ये एका धाब्यावर परत पराठे आणि पनिरचे पदार्थ हादडले. काहिहि म्हणा उत्तरेत खाण्याची चंगळ असते हे समजुन चुकलं. हॉटेलवर पोहोचायला रात्रीचे बारा वाजुन गेले. इथे एका गोष्टिची आठवण कायम झाली – दिल्लीत भाड्यावर गाडि घेतली तर गाडि जिथली असेल तिथुन तुम्हाला जिथे पिकअप केले जाते तिथपर्यंतचा खर्च घेतात वर परत तुम्हांला जिथे सोडतात तिथु परतीचा खर्च देखिल घेतात. आम्ही जी गाडि घेतली होती तो आमच्या हॉटॆल पासुन ७ किमीवर रहात होता म्हणजे त्याला दोन्हि वेळचा खर्च द्यावा लागला. आधी हे आचरट प्रकार सांगितले नसल्याने बरीच हुज्जत झाली. शिवाय कारण नक्कि आठवत नाहि पण ३००-४०० रुपये अधिक खर्च द्यावा लागला होता. म्हणुन जर तुम्हि उत्तरेत फिरायला जाणार असाल तर सगळ्या अटि चार-चारदा समजावुन विचारुन घ्या. अन्यथा दिल्लीतले ठग कधी गंडा घालतील ते सांगता येत नाही. अखेर जेवुन झोपायला दिड झाला होता. सकाळी उठुन दिल्लीत फिरायचे होते जंतरमंतर, कुतुबमिनार, लाल किल्ला, नॅशनल म्युझियम बघायचे होते. शेवटच्या दिवसाचे मनातल्या मनात प्लॅनिंग करता करता कधीतरी डोळा लागला.

जाग आली तर ९:१५ होऊन गेले होते. रात्री थकुन आल्यावर त्यातुन झोपायला उशीर झाल्याने इतक्या उशीरा उठलो होतो. पांघरुण फेकुनच उठलो आधी हर्षद-मैथिलीच्या रुम वर फोन लावला तिथेहि तिच कथा. हर्षद म्हणाला कि गाडि १०:३० ला येणार आहे. म्हणजे अजुन अर्धातास तरी झोप होणार होती. मऊ-मऊ दुलई घेऊन परत ताणून दिली. वरच्या बोनस अर्ध्या तासाच्या झोपेनंतर दिवसाची सुरुवात एकदम समाधानकारक झाली, हा म्हणजे दूधवाल्याने आपणहुन मापभर दुध जास्त घालावं किंवा भाजीवाल्याने चार मटार शेंगा वरुन टाकल्यावर गृहिणींना जसा आनंद होतो त्या कॅटेगरीतला आनंद होता. आवरुन निघायला साधारण ११ वाजले. सर्व प्रथम गाडि जंतर - मंतर ला न्यायला सांगितली. भारत भरात ५ जंतर मंतर किंवा यंत्र मंत्र आहेत. महाराजा जयसिंग दुसरे यांनी १७२४ ते १७३५ या दरम्यान हि यंत्रे बनवुन घेतली. खगोलिय अभ्यास करण्यासाठी त्यांची बांधणी केली. जंतर मंतर मध्ये सम्राटयंत्र, रामयंत्र, जयप्रकाश यंत्र व मिश्रयंत्र यांचा समावेश आहे. खरे तर जंतर मंतर समजावुन घ्यायचं असेल तर दिवसं कमी पडेल. पण इथे समजावुन द्यायलाच कोणीहि नाहि. रामयंत्राचे आरे सुद्धा मोडले आहेत. सम्राटयंत्रावर जाण्याचा रस्ता बंद! अर्थात बंद नसता तरी काय फरक पडला असता? समजणार तर काहिच नव्हते. कॉलेजची मुलं-मुली या यंत्रांच्या पायर्यांवर बसुन चकाट्या पिटर होती. अजुबाजुला सुंदर बागा लावल्या आहेत, कोणी तिथल्या झाडांखाली दुपारची झोप घेत होतं. एकुण जयसिंगानी ज्या कल्पकतेनं व ज्या कारणासाठी ह्या वास्तु बांधल्या होत्या त्या लोकांपर्यंत पोहचु शकेल असा कुठलाहि मार्ग नव्हता. नाहि म्हणायला २ तास तिथे मोडले.

दोन तासांनी आम्हि कुतुबमिनारकडे निघालो. हर्षदला दिलीपकाकांचा कॉल आला – “कुठे आहात?” हर्षदच्या बोलण्यावरुन त्यांचे प्रश्न समजत होते. नंतर हर्षदच्या चेहर्यावर आनंदमिश्रीत आश्चर्य होते त्याने मोबाईल खिशात टाकला आणि ड्रायव्हरला सांगितले “दिलीपजीने गाडि जनपथ पे कॉंग्रेस ऑफिसके सामने खडि करने के लिये कहॉं है!” मग आमच्याकडे बघत हर्षद म्हणाला – “दिलीपकाकांनी राष्ट्रपतीभवनचे पास बनवुन घेतले आहेत!” पुढली दोन मिनिटे कोणी काहिच बोलले नाहि. अकबर रोड वर गाडी थांबवली. दहा मिनिटात दिलीप काका आले त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये नेले. चहा – कॉफि घेऊन आम्हि राष्ट्रपती भवनाकडे निघालो. विजयचौक ओलांडला तशी संसदभवनाची वास्तु उजव्या हाताला उभी राहिली. दिलीपकाका गाडित पुढे बसले होते मागे वळुन म्हणाले – “मी संसदभवनाचे पासेस मिळवायचा प्रयत्न केला होता पण किमान ३ दिवस आधी अर्ज करावा लागतो, शिवाय आजच रेल बजेट आहे. आज नाहि कोणाला सोडणार तिथे!” म्हणे म्हणे पर्यंत सिग्नल सुटला. गाडि राजपथवरुन राष्ट्रपतीभवनाकडे धावु लागली.

राष्ट्रपती भवन – भारताच्या प्रथम नागरीकाचे “घर”. मुळात राष्ट्रपती भवन भारताच्या व्हॉइसरॉयसाठी रहायला बनवला गेलेला वाडा होता. त्याला व्हॉयसरी हाऊस म्हणत. एडविन लॅन्डसीर ल्युटेन्स व बेकर हे दोघे राष्ट्रपती भवनाचे स्थापत्यशास्त्रज्ञ होते. रायसिना हिल वर ३०० एकर जागेत ह्या वास्तुला बनवले आहे. १४ जुन १९१२ मध्ये बांधकामाला सुरुवात झाली, पुढील वीस वर्ष या वास्तुची उभारणी होत होती. व्हॉयसरी हाऊसच्या आवारातच सेक्रेटरीएट बिल्डिंग बांधुन काढल्या आज त्याच नॉर्थ ब्लॉक व साऊथ ब्लॉक म्हणुन ओळखल्या जातात. रायसीना हिलच्या पायथ्याशी या वास्तु आहेत. सध्या साऊथ ब्लॉक मध्ये परराष्ट्र व्यवहार कार्यालय आहे. दोन्हि ब्लॉक मागे टाकुन गाडि रायसीना हिलचा चढ चढु लागली. ३ ठिकाणी थांबवुन गाडिची झडती झाली. २ ठिकाणी नावे, गाडिचा नंबर यांची नोंद घेतली. आत कॅमेरा – पेनड्राईव्ह सारख्या वस्तु आत नेण्यास मनाई असल्याने त्या वस्तु बॅग मध्ये टाकल्या व गाडितुन उतरुन आम्ही राष्ट्रपती भवनासमोर उभे राहिलो. त्या भव्य वास्तु समोर उभं राहताना अभिमानानी उर भरुन आला, मध्यावरच्या उंच घुमटावर तिरंगा फडकत होता. ती भव्यदिव्य वास्तु बघताना डोळे विस्फारले गेले. पहार्यावर गुरखा रेजिमेंट होती. उंची कमी पण बांध्याने मजबुत आणि नजरेत सावधपणा घेऊन उजव्या कानावर झुकलेली शानदार गुरखा कॅप तोलत शेकडो जवान ठिकठिकाणी दक्ष अवस्थेत उभे होते. प्रवेशद्वारापाशी २ चकाकत्या तोफा आ वासुन उभ्या होत्या. राष्ट्रपतीभवनाच्या समोर जयपुर कॉलम आकाशाकडे सरसरत वर जाऊन “स्टार ऑफ इंडिया” ला धरुन उभा होता. मुळात हा स्टार ऑफ इंडिया १८८५ साली जो ब्रिटिशांचा भारतातील युनियन फ्लॅग होता त्याच्या मध्यावरचा स्टार होय. या स्टारच्या डोक्यावर इंपिरीयल क्राऊन असायचा.

आत गेलो पहिल्याच दालनात सध्याच्या राष्ट्रपती (राष्ट्राध्यक्षा??) डॉ प्रतिभा पाटिल यांचा फोटो लावला होता. मग डावीकडे रीसेप्शन वर दोन जण बसले होते त्या हॉलमध्ये एका काचेच्या पेटित संपूर्ण राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती ठेवली होती. त्या मोठ्या हॉल मध्ये राजेंद्रबाबूंपासुन ते प्रतिभा पाटिल यांच्यापर्यंत राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या सर्व व्यक्तींचे फोटो त्यांच्या सेवेच्या कालखंडासकट लावले होते. रीसेप्शन जवळच आमची नावे घेतली व फोटो काढुन पासेस तयार केले. मग आमच्या बरोबर एक सुटाबुटातला स्मार्ट माणूस राष्ट्रपती भवन दाखवायला पाठवला. परत आमची झडती झाली आणि मग आत सोडले. त्याने सर्वप्रथम आम्हांला राष्ट्रपती भवनाच्या तळघरात असलेल्या म्युझियम मध्ये नेले. ते म्युझियम सुध्दा जमिनीखाली २ मजली होते. त्यात भाराताच्या पहिल्या व्हॉइसरॉय पासुन ते माऊंटबॅटनपर्यंत सगळ्यांची लाईफ साइझ पेंटिंग्स लावली आहेत. वॉरेन हेस्टिंग पासुन सुरु होणारा इतिहास सरकत सरकत माऊंटबॅटनपाशी थांबताना फक्त “बघण्यात” किमान तास-सव्वा तास निघुन गेला. त्यांच्याखाली त्यांचा कार्यकाल दिला होता. मला त्याक्षणापासून आतापर्यंत एक गोष्ट समजली नाहिये – ह्या वस्तु इतक्या व्यवस्थित सांभाळुन ठेवल्या बद्दल पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास पोहचवला म्हणून कौतुक करावे कि गुलामीची मानसिकता अजुन गेली नाहिये असं समजून दु:ख मानावं?? त्या पेंन्टिंग्समध्येहि डलहौसि, कनिंग, कर्झन, चेम्सफोर्ड, आयर्विन, वेव्हेल, माऊंटबॅटन यांच्या चित्रा समोर उभं राहताना आपोआप कपाळावर आठी येत होती….. एक भारतीय म्हणुन तसे तर सगळेच अत्यंत अप्रिय होते पण यांचा इतिहास व सत्ता बळकट करण्यासाठी यांनी केलेले विशेष प्रयत्न त्याला कारणीभूत असावेत. माऊंटबॅटनतर भारताची फाळणी करणारा महाभागच होता. बंगालची फाळणी करणार्या कर्झनपेक्षाहि संतापजनक. याने नेहरुंना सांगितले होते – “स्वातंत्र्य मिळाले तरी राष्ट्रपती भवनाच्या मुख्य दालनात माझे चित्र कायम असावे!” पुढच्यावेळी तो आला तेव्हा त्याचे चित्र त्या जागेवर नव्हते हे बघुन जाम गुस्सा झाली होती स्वारी. त्याच म्युझियम मध्ये फ्रान्सच्या राजाराणीचे चित्र देखिल होते. एक मोठा पृथ्वीगोल आहे. युनियन जॅक एका पेटित ठेवलाय. एक पंचधातुंचा मोठाच्या मोठा युरोपियन स्टाईलचा किंग्स क्राऊन ठेवलाय. त्या क्राऊन मध्ये किमान ३-४ राजांची डोकी मावली असती. राणीची चांदिची खुर्ची ठेवली आहे. लॉर्ड माऊंटबॅटन व लेडि माऊंटबॅटन यांचे ६-७ फुटि संगमरवरी पुतळे ठेवले आहेत. कलाकुरस म्हणुन अतिशय सुरेख व तुकतुकित पुतळे आहेत.

सगळे बघुन झाल्यावर त्या माणासाने अजुन खालच्या भागात नेले तिथे भारताच्या राष्ट्रपतींच्या सरबराईत ज्या गोष्टि वापरल्या जातात त्या ठेवल्या आहेत म्हणजे चहा प्यायच्या कपांपासुन ते रात्रीच्या जेवणापर्यंत काय-काय करतात? त्यासाठी कोणते साहित्य वापरले जाते? खास मेजवानी असेल तर कुठली क्रोकरी वापरतात ती सगळी तिथे मांडुन ठेवली होती. खरतर हे सगळं बघण्यात मजा येत होती पण दिलीपकाका घाई करत होते इथुन नॅशनल म्युझियम मध्ये जायचे आहे तर सगळे पटापटा बघा. नॅशनल म्युझियम मध्ये एका ओळाखिच्या माणसाला देखिल आमची नावे सांगुन म्युझियम मधले खास भाग माहितीसकट फिरवायची व्यवस्था केली होती. मग फारसा वेळ न दवडता आम्हि राष्ट्रपती भवनाच्या वरच्या मजल्यांकडे निघालो. बरोबरचा माणूस सगळी माहिती देत होता. तिथली पेंन्टिंग्स, वेगवेगळ्या वस्तू, त्या कोणी कुठल्या राष्ट्रपतींना भेट म्हणुन दिल्या? किंवा कुठल्या राष्ट्रपतींनी कुठली वस्तु राष्ट्रपतीभवनाला सजवायला आणली ते सांगत होता. त्या सगळ्यात दोन गोष्टिंनी मनात कायम जागा केली आहे एक म्हणजे भगवान बुध्दांची कंबोडियातुन आणलेली भव्य मुर्ती. या मुर्तीच्या मागे जी प्रभावळ आहे ती हातांची प्रभावळ आहे. व १००० हातांची प्रभावळ व खुद्द भगवान बुध्दाचे २ हात असे मिळुन एकुण १००२ हातांनी सजलेली ती मुर्ती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इजिप्तच्या पंतप्रधानांनी माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना दिलेले दगडि चित्र. या चित्रात वाळवंटात एक माणूस उंटासकट जाताना दाखवला आहे आणि हे चित्र वेगवेगळ्या रंगांच्या दगडांचा वापर करुन बनवले आहे. अतिशय सुंदर चित्र होते! मधल्या कॉरीडोअर मध्ये सगळ्या राष्ट्रपतींचे फोटो लावले होते. छतावर पानावेलींचे चित्र असलेले सुंदर कापड लावले होते. कॉरेडोअरच्या एका भागाकडे बोट दाखवुन त्या माणसाने सागितले “महामहिम राष्ट्रपतीजी का कार्यालय उस दरवाजे के पिछे है!” अर्थात तिथे विनापरवानगी जायला बंदि होती. चार सुरक्षा रक्षक तैनात होते.

आम्हि एक एक दालन ओलांडत एका प्रशस्त हॉल मध्ये आलो. इतका प्रचंड हॉल क्वचितच कुठल्या वास्तुत बघायला मिळाला असेल. संपूर्ण हॉल मध्ये मऊ गालिचा अंथरला होता. अतिशय सुंदर नक्षीकाम केलेला तो गालिचा चार – सहा माणसे उकिडवी बसुन मऊ ब्रशने साफ करत होती. समोर साधारण वितभर उंचीचा चौथरा होता व त्याच्यावर एक खुर्ची ठेवली होती. त्या खुर्ची समोर पिवळसर रंगाचा एक २x२ चा चौकोनी गालिचा अंथरला होता. “अशोका हॉल” बरोबरच्या माणसाचे शब्द ऐकुन तिथे काय समारंभ होतात हे एका क्षणात लक्षात आले.हाच तो हॉल जिथे बालश्री पुरस्कारांपासून ते भारतरत्न पुरस्कारांपर्यंत सगळे अतिशय मानाचे नागरी किंवा लष्करी पुरस्कार खुद्द राष्ट्रपतींच्या हातुन दिले जातात. त्याने वर छताकडे बोट दाखवले त्या अख्या हॉलच्या छतावर एक अखंड चित्र होते. मध्यभागी घोड्यावर बसलेला राजा व आजु बाजुला त्याचे सैनिक आहेत असे ते चित्र होते. कोणा अफगाणिस्थानच्या राजाचे ते चित्र होते व अफगाणिस्थानच्या राष्ट्रपतींनी ते भेट म्हणून दिले होते. त्या चित्राचे वैशिष्ट्य म्हणाजे हॉलच्या कुठल्याहि कोपर्यात उभे राहिलात तरी तो राजा आपल्याकडेच बघतोय असं वाटतं. हे सगळं फार भव्य-दिव्य होतं. एक सेकंद थांबुन “त्याने विचारले – बाहरसे एक गुंबद देखा था? जिसके उपर हमरा राष्ट्रध्वज लहरा रहा था?? वह गुंबद अब बिलकुल हमारे सिर के उपर है!” हे वाक्य ऐकल्यावर क्षणभर अंगावर रोमांच उभे राहिले. आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ती जागा भारताच्या सर्वात महत्वाच्या जागांपैकी एक आहे. आणि भारतातील सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या वाड्यावरच्या झेंड्याखाली उभं राहण्याचं सुख समजायला तो अनुभव स्वत:हून घ्यावा लागतो. कदाचित काहि जणांना यात काहिहि विशेष वाटणार नाहि .पण माझ्यासारखं इतिहासाचं वेड असलेले माझ्या भावना नक्कि समजु शकतील. समोरच ती जागा होती जिथे उभं राहून भल्या भल्या अवलियांनी आयुष्यभर मेहनत घेऊन एखाद्या कार्याला सर्वस्व देऊन जे कमावलं असतं त्याची पावती समस्त भारतीयांतर्फे खुद्द राष्ट्रपती देतात. एक गोष्ट मान्य करावी लागेल - त्या जागेसमोर उभं राहताना एक क्षणभर मोह झाला कि त्या चौथर्यावरच्या पिवळ्या गालिच्यावर उभं रहावं! तसं केलं असतं तरी कोणी काहिहि बोललं नसतं पण लगेच स्वत:ला आवरलं आणि स्वत:ला बजावलं – लेका तिथे उभं रहायचा विचार करण्याचीहि सध्या तरी तुझी लायकी नाहिये!

त्या माणसाने मग समोरच्याच एक लांबलचक हॉल मध्ये नेले. तिथे मध्यभागी एक लांऽऽऽबलचक टेबल होते खुर्च्या काढल्या होत्या, पण तो डायनिंग हॉल आहे हे ओळखणं सहज शक्य होतं. किमान शंभर माणसं सहज मेजवानीत सहभागी होऊ शकतील इतके मोठे टेबल तर नक्किच होते. भींतीवर वेगवेगळी शस्त्रास्त्रे लावली होती. आजुबाजुच्या टेबल वर अनेक फ्लॉवरपॉट ठेवले होते. तसेच प्रत्येक फ्लॉवरपॉटच्या वर वेगवेगळ्या राष्ट्रपतींची तैलचित्रे लावली होती. त्यात डॉ. कलामांचे चित्र मला सर्वात जास्त आवडले. ते बघायला पुढे गेलो तसे खिडकितुन खाली फुलांनी बहरलेली बाग दिसली. मैथिलीली हाक मारुन मी बाग दाखवत होतो तेव्हा तो माणूस स्वत:हुन म्हणाला – “मोगल गार्डन्स – उसेहि देखने अब निचे जानेवालें है! वह सामने जो लॉन है वहॉ अगर कोई खास व्यक्ती के सम्मान मै समारोह होता है तब वहि खाना दिया जाता है ! वहिं आलिशान पार्टि रखि जाती है!” त्याच्या मागोमाग आम्हि मुघल गार्डन्स कडे वळलो. मध्ये एका ठिकाणी बेकर यांचा पुतळा होता त्या अर्ध पुतळ्याकडे बोट दाखवुन त्याने सांगितले कि राष्ट्रपतीभवनाचे ते आर्किटेक्ट होते. जीना उरताना त्याने माहिती दिली यहॉ कुल ३४४ कमरे है!” यावर मी विचारले “गर कोई यहॉ पे खो जाता है तो उसे ढुंडने केलिये कोई सिस्टम है?? या हर दिन एक कमरा इस हिसाब से लगभग सालभर वो आदमी अंदर हि अंदर घुमता रहता है??” यावर तो खदाखदा हसला. आता ३४४ खोल्या म्हंटल्यावर माझा प्रश्न अगदिच चुकिचा म्हणता येत नाहि. खाली पोहोचल्यावर वेड लागायचं बाकि होतं. दोन हातांच्या ओंजळी इतका एक एक गुलाब होता. रंगांची तर गणानाच नव्हती. या खेरीज शब्दश: जेवणाच्या ताटाच्या आकारा एव्हढ्या सुर्यफुलांचे ताटवे होते. त्या माणसाने आंम्हाला एक कुंडितले वडाचे बोन्साय दाखवले साधारण कंबरेइतके उंच वडाचे झाड फक्त ८१ वर्षांचे होते. खरंतर बोन्साय प्रकारच मला आवडत नाहि. पण ८०-८१ वर्षांचे वडाचे झाड कुंडित वाढवणार्यांची कमाल मान्य करावी लागेल. मग गुलाबांच्या बागेकडे वळलो जवळपास तीनशे - साडे तीनशे जातींचे गुलाब होते तिथे. मुघल गार्डन्स मध्ये तेव्हा लोकांची बरीच गर्दी होते कारण दर वर्षी फेब्रुवारी महिन्यातील दुसर्या आठवड्यात सामान्य जनांसाठी मुगल गार्डन खुले असते हे नंतर समजले. अर्थात त्यातल्या विशिष्ट भागांमध्ये जाण्यावर बंदि असते पण बरोबरच्या माणसामुळे आम्हाला तोहि भाग बघायला मिळाला. दिलीपकाका घाई घाई करत होते घड्याळात पाच वाजले होते आणि नॅशनल म्युझियम ५:३० वाजता बंद होते.

सगळं बघुन आम्हि बाहेर आलो तर राष्ट्रपतीभवनासमोर काहि लोकं फोटो काढत होते. कॅमेरा आत न्यायला बंदि आहे, बाहेरुन फोटो काढायला परवानगी आहे असे समजल्यावर धावपळीत एक फोटो सेशन झाले. दिलीपकाकांची घाई सुरु होतीच. अखेर त्यांनी जवळपास आम्हाला किडनॅप करुन गाडित बसवले. आणि गाडिला म्युझियमकडे नेण्यास सांगितले पण तेच झाले आम्हि तिथे पोहोचेपर्यंत सव्वापाच होऊन गेले असल्याने आम्हि म्युझियम मध्ये पाय ठेवेतो त्याची दालने बंद व्हायला सुरुवात झाली. तिथे एका दालनात नौदलाची मेडल्स ठेवली होती. एकाच दलात इतके बहुमान असतील असं स्वप्नात सुध्दा वाटलं नव्हतं. बाजुलाच १९७१ च्या युध्दातील पाक शरणागतीचं शिल्प लावलं होतं. पाकिस्तानकडुन ले.जन. नियाझी शरणागतीच्या करारावर स्वाक्षरी करत आहेत आणि भारताचे ले.जन. जगजितसिंग अरोरा शेजारी बसले आहेत. कुणाहि भारतीयाची छाती अभिमानाने फुलुन येईल अश्या क्षणाचे ते शिल्प होते. या खेरीज विविध दालनांतुन अनेक सुंदर व प्राचिन मुर्ती ठेवल्या होत्या. अखेर साडेपाचला लगोलग आम्हाला बाहेर पडावं लागलं.

आम्हि आमचा मोर्चा आता कुतुब मिनारकडे वळवला. कुतुबुद्दिन ऐबक या पहिल्या मुस्लिम शासकाने अफगाणिस्थानातील जाम मिनारतीवरुन प्रेरणा घेऊन दिल्लीत हा मिनार उभारायचे ठरवले. पण ११९३ मध्ये हे बांधकाम सुरु केले. पाया बांधुन तो पैगंबरवासी झाला वरचे ३ मजले त्याच्यानंतर गादिवर आलेल्या अल्तमशने १२३० मध्ये तर शेवटाचा पाचवा मजला १३८३ साली फिरोजशहा तुघ्लक ने बांधुन पुर्ण केला. १३६८ मध्ये एकदा वीज कोसळुन मिनाराचे नुकसान झाले होते. १५०३ मध्ये परत वीज कोसळुन नुकसान झाल्याने सिकंदर लोदिने त्याची डागडुजी केलीह होती. केवळ वीटांनी बांधुन काढलेला इतका उंच मिनार जगात दुसरीकडे कुठेहि नाहि. कुतुबमिनार उभारायला तेथील २७ जैन मंदिरे धुळीस मिळवीली. कुतुबमिनार रचणार्यांनी मिनारावर “इति श्री विश्वकर्मा प्रसादे रचित्” अशी पाटि कोरुन बसवली आहे. ह्याहुन मोठा दैवदुर्विलास तो कुठला? कुतुब मिनार पायथ्यासे १४.२ मिटरच्या व्यासाचा तर सर्वात वरचा मजला २.७५ मिटरचा आहे. त्याची एकुण उंची ७२.५ मिटर आहे. त्यावर कुराणातील आयता कोरुन बसवल्या आहेत. कुतुब मिनारच्या आजुबाजुला अनेक कबरी आहेत, १-२ मशिदि आहेत. कुतुबमिनार समोरच एक लोखंडि खांब आहे. गेली हजारवर्षे तो तिथे ऊन – पाऊस खात उभा आहे पण अजुनहि त्याला गंज चढलेला नाहि हे विशेष. डोकं खाजवायला लावणारी गोष्ट निश्चितच आहे कि इतकं शुध्द लोखंड कसं बनवलं हजार वर्षांनी देखिल विना तेलपाणी उघड्यावरचा खांब गंजलेला नाहि. त्या खांबाबद्दल अशी श्रध्दा आहे कि खांबाला पाठ लावुन हात मागे केले व जर पाठुन तुमचे हात जुळले तर मनातील इच्छा पुर्ण होते. तो खांब लोकांनी खराब करु नयेत म्हणून सध्या त्या खांबा भोवती सरकारने कुंपण घातले आहे …. त्यामुळे माझ्या मनातल्या अनेक सुप्त इच्छा अपुर्या राहिल्या. तशीहि संध्याकाळ झाली असल्याने तिथले सुरक्षा रक्षक सगळ्यांना बाहेर जायला सांगत होते. मग झटपट फोटो काढुन आम्हि बाहेर पडलो. आता गाडि परत हॉटेलकडे धावु लागली. काच खाली केली तसा दिल्लीचा गार वारा चेहर्यावर आला. पुन्हा कॅनॉटप्लेसचा झगमगता भाग बघताना दिल्ली सिक्स मधले गाणे डोक्यात घुमत होते “ये दिल्ली है मेरे याऽऽर, बस इश्क मुहब्बत …प्याऽऽर!” दुसर्या दिवशी पहाटेची ट्रेन होती. आता पायांना घराची ओढ लागले होती आणि डोक्यात शेकडो विचार होते. उत्तरेतील पहिली सफर सुफळ संप्पन्न झाली होती.


- सौरभ वैशंपायन.

Saturday, April 11, 2009

वदले छत्रपती...

शिवछत्रपतींसारखा द्रष्टा राजा हजार वर्षांतुन एकदा होतो. शिवछत्रपतींना आपण एक कुशल योध्दा व अतिकुशल राजकारणी म्हणुन ओळखतो पण त्याच बरोबर छत्रपती शिवराय हे कुशल संघटक व जनतेची पोटच्या पोरा प्रमाणे काळजी घेणारे त्यांचा प्रतिपाल करणारे जाणते राजे होते. इतिहासार्य वि. का राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा अतिशय बारीक अभ्यास केला आहे. त्यांनी "मराठ्यांच्या इतिहासाची साधने" हा अनेक खंडांचा ग्रंथच लिहुन काढला आहे. त्यातील एक पत्र इथे देतो आहे. यात महाराजांनी आपल्या अधिकार्‍यांना व सैनिकांना जनतेला त्रास होणार नाहि यासाठी कसे वागावे व घोडे - सैनिक यांची काळजी कशी घ्यावी हे अतिशय स्पष्टपणे लिहिले आहे. महाराज किती दुरवरचा विचार करत हे या आज्ञापत्रावरुन दिसुन येते.

-----------------------------------------------------

मशरुल अनाम राजश्री जुमलेदारानी व हवालदारानीं व कारकुनानी दिमत पायगो मुक्काम मौजे हलवर्ण ता। चिपळूण मामले दाभोळ प्रति राजरी शिवाजी राजे सु ॥ अर्बा. सबैन अ अलफ. कसबे चिपळुणीं साहेबीं लष्कराची विले केली आणि याउपरी घाटावरी कटक जावें ऐसा मान नाहि. म्हणून एव्हां छावणीस रवाना केलें. ऐसीयास, चिपळुणी कटाकाचा मुक्काम होता ताकरींता दाभोळाच्या सुबेयांत पावसाकाळ्याकारणें पागेस सामा व दाणा व वरकड केला होता तो कितेक खर्च होऊन गेला. व चिपळुणा आसपास विलातीत लष्कराची तसवीस व गवताची व वरकड हरएक बाब लागली. त्याकरीतां हाल काहि उरला नाही. ऐसे असतां वैशाखाचे वीस दिवस, उनाळा, हेही पागेस अधिक. बैठ पडली. परंतु जरुर जाले त्या करितां कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे.त्यास, तुम्हि मनास ऐसा दाणाअ, रातीब, गवत मागाल, असेंल तोवरी धुंदी करुन चाराल, नाहींसे जालें म्हणजे मग काहीं मग पडत्या पावसांत मिळाणार नाहीं, उपास पडतील, घोडी मरायास लागतील. म्हणजे घोडीं तुम्हीच मारीली ऐसें होईल व विलातीस तसवीस देऊं लागाल. ऐशास, लोक जातील, कोण्ही कुबभ्याचेथील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटें, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करूं लागलेत म्हणजे जी कुणबीं घर धरुन जीवमात्र घेऊन राहिले आहेत तेहि जाऊं लागतील. कितेकौपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल कीं मोंगल मुलकांत आले त्याहूनहि अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल तेव्हां रयतीई ब घोडियांची सारी बदनामी तुम्हांवर येईल! हे तुम्ही बरे जाणून, सिपाही हो अगर पावखलक हो, बहुत यादी धरुन वर्तणूक करणें. कोण्ही पागेस अगर मुलकांत गांवोगांव राहिले असाल त्याणीं रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाहीं. आपल्या राहिला जागाहून बाहीर पाय घालाया गरज नाहीं. साहेबीं खाजानांतून वाटणिया पदरीं घातलिया आहेती. ज्याला जे पाहिजे, दाणा हो अगर गुरेंढोरें वागवीत असांल त्यांस गवत हो, अगर फाटें, बाजीपाले व वरकड विकावया येईल तें रास घ्यावे, बाजारास जावे, रास विकत आणावें. कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाहीं. व पागेस सामा केला आहे तो पावसाळा पुरला पाहिजे. ऐसे तजविजीनें साणा रातीब कारकून देत जातील तेणेंप्रमाणे घेत जाणें, कीं उपास न पडतां रोजबरोज खायाला सांपडे आणि होत होत घोडीं तवाना होत ऐसे करणें. नसतीच कारकुनासी धसपस कराया, अगर अमकेंच द्या तमकेंच द्या ऐसे म्हणाया, धुंदी करुन खासदारकोठींत, कोठांरात शिरुन लुटाया गरज नाही व हालीं उन्हाळ्याला आहे तैसें खलक पागेचे आहेत, खण धरुन राहिले असतील व राहतील, कोण्ही आगट्या करितील, कोणी भलतेच जागा चुल्ही, रंधनाळा करितील, कोण्ही तंबाकूला आगी घेतील, गवत पडिले आहे ऐसे मनास ना आणिता म्हणजे अविस्राच एखादा दगा होईल. एका खणास आगी लागली म्हणजे सारे गवत व लहाळ्या आहेत तितक्या एकेएक जळों जातील. तेव्हां मह काही कुणबियांच्या गर्दना मारल्या अगर कारकुनांस ताकीस करावी तैसी केली तर्ही कांही खण कराया एक लाकुड मिळणार नाहीं, एक खण होणार नाहीं. हे तो अवघियाला कळतें. या कारणें, बरी ताकीद करुन, खासेखासे असाल ते हमेषा फिरत जाऊन, रंधनें करिता, आगाट्या जाळिता, अगर रात्रीस दिवा घरांत असेल, अविस्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. खण, गवत वांचेल ते करणें. म्हणजे पावसाळा घोडीं वाचली. नाही तर मग, घोडीं बांधावी न लगेत, खायास घालावे नलगे, पागाच बुडाली!!! तुम्ही निसु=ऊर जालेत!!! ऐसे होईल. याकारणें तपशिलें तुम्हांस लिहिले असें. जितके खासे खासे जुमलेवार, हवालदार, कारकून आहा तितके हा रोखा तपशिलें ऐकणें, आण हुशार राहाणें वरचेवरी, रोजाचारोज, खबर घेऊन, ताकीद करून, येणेंप्रमाणें वर्तणूक करितां ज्यापासून अंतर पडेल, ज्याचा गुन्हा होईल, बदनामी ज्यावर येईल, त्यास, माराठियाची तो उज्जत वाचणार नाहीं, मग रोजगार कैसा? खळक समजों जास्ती केल्यावेगळ सोडणार नाही. हे बरे म्हणून वर्तणूक करणें. छ १२ सफर.


(मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड ८ – वि. का राजवाडे)

-----------------------------------------------------


मशरूल – लोकमान्य, अनाम – लोक, जुमलेदार – सरकारी अधिकारी, हवालदार – तालुक्याचा अधिकारी, दिमत – पदरचे, तैनात. पायगो – खाजगी उत्पन्नाचा प्रांत, मामले – परगणा, प्रदेश. अर्बा – चार, सबैन – सत्तर, अलफ – हजार, कटक – सैन्य, पागा – घोडदळ, अजार – उपद्रव, विले – व्यवस्था, सामा – साठा, रातीब – रोजची सामग्री, धुंदी - हल्ला, तसवीस – उपद्रव, पावखलक – पायदळ, यादी धरून – आठवण ठेवून, रास घ्यावे – पैसे देऊन घ्यावे, ज्याजती - जबरदस्ती, कलागती – भांडण, खलक – सैनिक, रंधनाळा – स्वयंपाकाचे मोठे चुलाणे, अविस्राच – अचानक, खण – तंबू, तजविज – तयारी. लहळे – गंजी भारे, अंतर पडेल – दुर्लक्ष केले जाईल, निसूर – निश्चिंत, छ १२ – तारीख बारा. सफर – मुस्लीम कालगणनेचा दुसरा महिना.

Friday, April 3, 2009

शिवजन्म

सुर्य लोपला, फाल्गुन वद्य तृतिया तिथी
नऊ दिन नऊ मास जाहले वाट पहावी किती?
सुखस्वप्नांच्या समिधा आणि हवी आसवाचे
शिवनेरीवर जन्म घेतसे भाग्य मातृभूचे - १


पूर्ण होतसे यज्ञ त्याक्षणी पुत्र कामनेचा
हर्षभराने फुटला पान्हा मातृ भावनेचा
कृतार्थतेने भरले लोचन आज माऊलीचे
शिवनेरीवर जन्म घेतसे भाग्य मातृभूचे - २


कर्णे जाहले तप्त, नगारे बडवी छाताडे
नाद दृगोच्चर ऐकुन त्यांचा शहारले कडे
शिवनेरीवर पाट वाहिले दुधा मधाचे
शिवनेरीवर जन्म घेतसे भाग्य मातृभूचे - ३


सुर्यदर्शना नेती बालक होता ते जागे
तेज पाहुनी परस्परांचे, क्षण दिपले दोघे,
स्वकरांनी रवि कुरवाळी मुख प्रतिबिंबाचे
शिवनेरीवर जन्म घेतसे भाग्य मातृभूचे – ४

- सौरभ वैशंपायन
(३ मार्च २००९ - रामनवमी)