Saturday, January 24, 2015

मै तो सुपरमॅन ...

मध्ये काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवरती मेसेज आला होता, संभाजी महाराजांबाबत. शंभूराजांचं अमानवी वर्णन त्यात केलं होतं. उंची सात फुट काय? आणि तलवारीचं वजन ६५ किलो काय? सिंह-वाघांचे जबडे हाताने उभे फाडत ... वगैरे वगैरे बरच काही. कपाळाला हात लावावा इतकाही तो मेसेज विशेष नव्हता. त्या आधी शिवाजी महाराजांवरती देखिल एक मेसेज फिरत होता - व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाने रायगडवर येऊन तिथली माती बॅग मध्ये घेतली, सुभाषबाबू हिटलरला भेटायला गेले तेव्हा हिटलर शिवरायांवरचे पुस्तक वाचत बसला होता; अश्या अनेक सुरस रम्य कथा त्यात होत्या. हे मेसेज हसून सोडून द्यायचे असतात.

आपले राष्ट्रपुरुष हे "अमानवी" किंवा १००% आदर्शांचा  आणि फक्त सद्गुणांचाच तितका पुतळा असायलाच हवेत हा आपला हट्ट का असतो हे मला समजत नाही. मुघलांसमोर हार न मानलेले सगळे महायोद्धे अश्या अनुयायी + मावळ्यांसमोर आपली तलवार निमुटपणे म्यान करतात. मला शाळेच्या अभ्यासक्रमात जनार्दन लवंगारेंचा "महापुरुषांचा पराभव" म्हणून एक धडा होता. महापुरुषांचा पराभव हा शत्रू करत नाहीत तर त्याचे अनुयायीच करतात हे सप्रमाण त्यांनी सांगितले होते. तो धडा दुसर्‍या चालीवरती वाचायची गरज मला वाटली. म्हणजे नेत्याने - आदर्शाने जे नीतीनियम घालून दिले त्याला हरताळ फासणे हा वेगळाच मुद्दा आहे, मात्र आपल्या आदर्शाने काडीचीही चूक करता कामा नये ... नव्हे!!! त्यांनी चूक केली असेल तरी ती चूक नव्हतीच हा जो काही आपल्या समाजाचा हट्ट असतो त्याचे कौतूक करावे तितके कमी आहे.

ते क्षत्रियकुलावतंस शिवाजीराजे झाले म्हणून झोपतानाही कंबरेला तलवार असायलाच हवी ही अपेक्षा करणारे आपल्याकडे बहुसंख्य मिळतात हे स्वानुभवाने सांगतोय. बरं, चार खर्‍या गोष्टि ह्यांना ससंदर्भ समजवाव्यात तर "महापुरुषांचा" अपमान झाला असं गावभर बोंबलत फिरतात. आजकाल सोशल नेटवर्किंगच्या साईट्स असल्याने भोंग्याच्या रिक्षांचे पैसे देखिल भरायची गरज उरलेली नाही. म्हणजे जसं पोरगं उकाड्याने कितीही कावलं असलं तरी बहुतांशी आयांचा त्याला गोंड्याची कानटोपी चढवायचा जो हट्ट असतो; त्याच पद्धतीने इतिहासातील महापुरुषांच्या मोठेपणाची हौस ह्या महाभागांनाच असते. मोबाईलवरती आलेले मेसेज व कादंबर्‍या हे ह्या महाभागांचे "संदर्भ" असतात. वरुन ते महापुरुष जातीनिहाय वाटून घेतलेले असतात. आंबेडकरवादि सावरकरांकडे बघत नाहीत, सावरकरवादि गांधींकडे बघणार नाहीत, गांधीवादी कुणाकडेच बघणार नाहीत.

मी तरी खोटं का बोलू? ८-१० वर्षांपूर्वीपर्यंत मी सावरकरांपलीकडे बघत नव्हतो. पण वय, वाचन, अक्कल वाढत गेली तशी निदान दुसर्‍या बाजूचं म्हणंणं ऐकायची तयारी झाली. फाळणीच्या बाबतीत डॉ आंबेडकरांचे बरेचसे विचार "प्रॅक्टिकल" होते. वास्तवाला धरुन होते तर सावरकरांचे विचार हे कितीही राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेले होते तरी ते आत्यंतिक आदर्श असे "हिंदू" विचार होते. व मुळात हातातली परीस्थिती कुठल्याही कारणाने निसटल्यावर सावरकरांचे ते विचार प्रत्यक्षात येऊ शकत नव्हते ह्याची जाणीव झाली. शिवाय स्वा. सावरकर अथवा डॉ. आंबेडकर हे "इतिहासकार" खचितच नव्हेत ह्याची जाणीव झाली. ते "विचारवंत" होते असं म्हणता येईल व त्यांच्या दृष्टिने समाज जसा होता अथवा व्हायला हवा होता ती उदाहरणे इतिहासातून हुडकून लोकांसमोर ठेवली. स्वा. सावरकरांवरती जसा आत्यंतिक व एकांगी हिंदूत्वाचा शिक्का मारुन लोकं मोकळे होतात तसेच डॉ आंबेडकरांवरती देखिल धम्माबाबत त्यांनी जे विचार मांडले त्यावर धम्मप्रसारासाठी डॉ. आंबेडकरांच्याही १०० वर्ष आधीपासून काम करणार्‍या जगभरातील संस्थांनी "श्रीयुत आंबेडकरांनी त्यांना हवा तो धम्म मांडला खरा धम्म नव्हे!" अशी टिका केली होती. या प्रकारच्या समकालिन टिका आपण लक्षात घ्यायला हव्यात. त्यांच्यात काही तथ्य असेल तर निदान ते ध्यानात घ्यायला हवे.

मुळात महापुरुष असोत अथवा आपल्या दृष्टिने खलपुरुष असोत पहिल्यांदा त्या गुणदोषांसकट इतिहासातील ते पात्र स्वीकारायला हवं. तरच इतिहास समजायला सुरुवात व मदत होते. खलपुरुषांचा चांगला गुण अथवा महापुरुषाचा वाईट गुण नाकारुन काही मिळणार नसते ना इतिहास बदलणार असतो. शिवाय जे कर्तृत्व गाजवले अथवा ज्या चूका झाल्या त्या पूर्वायुष्यात कि उत्तर आयुष्यात ह्यावर विचार व्हायला हवा. आधी चूका करुन नंतर इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावे असे काही अचाट - अफाट करुन दाखवले असेल तर उत्तमच. मात्र राघोबांसारखे आधी अटकेपार झेंडे गाडायचे व नंतर इंग्रजांशी चुंबाचुंबी करायची असे असेल तर कपाळाला हात लावावासा वाटतो. अर्थात अटकेपारचा झेंडा ही जमेची बाजू घ्यायची व उत्तर आयुष्यातून काय करायचं नाही? हे शिकायचं. इतिहास हा धडा घेण्यासाठी असतो. एकमेकांच्या उरावर बसण्याकरता नव्हे हे समजून घ्यायची वेळ आली आहे.

शेकडो वर्षांनी अथवा काही दशकांनी आपल्याला एकसंध इतिहास दिसू शकतो, आधीच्या व नंतरच्या घटना संगतीवार दिसतात पण त्याकाळी तो इतिहास "LIVE" असतो हे आपण लक्षात घ्यायला हवं. दुसरी गोष्ट  इतिहासातील पात्रांची मनोभूमिका आपण अनेकदा लक्षात घेत नाही. सर्वात मोठे उदाहरण छत्रपती शंभूराजे. आजकाल - "शंभूराजे मुघलांना जाऊन मिळाले ते शिवाजी महाराज व शंभूराजे यांचा मुघलांना चकवायला ठरवलेला संयुक्तिक राजकिय डाव होता." असं सांगितलं जातं. पण त्यात घरातल्या स्त्रीयांना कसं काय समाविष्ट केलं ह्याचं उत्तर कोणी देत नाही. वर्षभर आघाडी शांत ठेवायची म्हणून भूपाळगड प्रकरण होऊ देतील? भूपाळगडावरती सातशे जणांचे हात तोडले गेले, भूपाळगड पाडला गेला. हे केवळ एक डाव म्हणून शिवराय कसे होऊ देतील? ती संभाजी महाराजांची तरुण वयातल्या उसळत्या रक्ताची चूक होती हे लक्षात घ्यायला हवं. उलट संभाजीराजे त्यांच्या शीघ्रकोपी स्वभावाला धरुनच वागले. शीघ्रकोप हा त्यांचा स्वभाव होता त्याला कोणी काहीच करु शकत नाही. त्या शीघ्रकोपी व्यक्तित्वासकट त्यांचा इतिहास मान्य करायला हवा. आणि हा शीघ्रकोप पुढेही गोवा स्वारीत पोर्तुगीज विजरई दिसल्यावर वहात्या पाण्यात घोडा घालणे असो अथवा कलशाची बाजू घेऊन शिर्क्यांवर केलेला हल्ला असो कायम दिसून येतो. एखादा गुण चांगला की वाईट हा प्रश्नच नाही परीस्थितीनुरुप तो गुण चांगला - वाईट असा बदलू शकतो. त्यामूळे शीघ्रकोपी शंभूराजांचे व्यक्तित्व एकदा लक्षात घेतले की इतिहास सुटसुटित होतो.

संभाजीराजांची मनोभूमिका अत्यंत शांतपणे लक्षात घ्यायची गरज आहे. सख्खी आई नाही. वयाच्या नवव्या वर्षी राजकारणासाठी मुघलांचा मनसबदार म्हणून जावं लागतं, मागोमाग आग्र्याचं जीवघेणं संकट, जीव वाचावा म्हणून का होईना पण खुद्द वडीलांनीच जिवंतपणी श्राद्ध घालणं,  मग परत मुघलांशी शांतता हवी म्हणून पुन्हा मनसबदार होणे. हे सगळं वयाच्या १२-१४ पर्यंत बर्‍याच अंशी अनाकलनिय असेलही. वडील सांगतात ते चांगलच असेल हा समजूतदारपणा असेलही, पण शारीरिकच नव्हे तर जे वैचारीक दृष्ट्या उमलण्याचं फुलण्याचं वय असतं त्या वयात संभाजीराजे जगावेगळ्या मनस्थितीतून गेले ह्यात वाद नाही. अश्या घडामोडी कुणा पिता-पुत्राच्या आयुष्यात आल्यासं दुसरं उदाहरण नाही. उलट म्हणूनच मुघलांना जाऊन मिळणे अथवा पुढे शिवाजी महाराज जिवंत असताना अघोर मार्गाला जाऊन केलेला कलषाभिषेक असो, संभाजी महाराजांच्या जुन्या दुखावलेपणाची संगती लागायला सुरुवात होते. आज ३५०-३७५ वर्षांनी आपण बघताना शिवराय हे सगळं सगळं स्वराज्यासाठी करत होते हे आपल्याला समजतं पण आपण मागे जाऊन संभाजीराजांच्या त्या त्या वयात स्वत:ला त्या जागी ठेवायचा प्रयत्न जरी केला तरी मनात शेकडो प्रश्न उभे रहातात.

जे घडलं त्यात चूक ना महाराजांची होती ना संभाजीराजांची त्या - त्याक्षणी एक राजा अथवा राजपुत्रच नव्हे तर एक व्यक्ती म्हणून जे वाटलं ते त्यांनी केलं. आपण दोहोंची बाजू समजून घ्यायला हवी. खासकरुन शंभूराजांची. आणि बाजू समजून घेणे म्हणजे जे कटू घडलं त्यावर मखमालिशी करणं नव्हे. संभाजीराजे अत्यंत बुद्धीमान होते आणि अश्या माणसांची घुसमट लवकर होते. त्यांच्या मनासारखं व त्यांना आव्हान देईल असं काम मिळालं नाही की अश्या बुद्धीमान लोकांच "आपली इथे किंमत नाही" हे मत फार लवकर बनतं. कदाचित अश्याच परीस्थितीत मनाचा कोंडमारा होऊन ते मुघलांना जाऊन मिळाले. मात्र ते ज्या तिरमीरीत उठून मुघलांना जाऊन मिळाले त्याहून जास्त ओढीने स्वराज्याकडे परत आले. आपलं ऐकणारं इथे कोणीच नाही संतापाच्या भरात आपण आपल्याच माणसांना त्रास दिलाय हे ज्याक्षणी लक्षात आलं त्याक्षणी त्यांनी परतायचा निर्णय घेतला.

दुसरी गोष्ट बाकरें गुरुजींना दिलेले दानपत्र एक -एक ओळ सुटी करुन वाचली की संभाजीराजांचे संपूर्ण व्यक्तीमत्व तपशीलवार डोळ्यासमोर उभे रहाते. ते स्वत: संभाजीमहाराजांनी दिलेले दानपत्र असल्याने ऐतिहासिक दृष्ट्या ते अमुल्य आहे. यामध्ये ते आजोबा शहाजीराजे व वडिल शिवाजी महाराज यांच्या शौर्याची, पराक्रमाची, दानशूरतेची, प्रजाहीतासाठी असलेल्या तळमळीची प्रचंड स्तुती करतात. मात्र शिवराय "वडिलांच्या भूमिकेत कमी पडले" असा सूर एका वाक्यात दिसून येतो. ते सगळं वाचताना पंचपक्वानात कचकन दाताखाली बारिकसा खडा यावा तसं एकक्षण वाटतं, पण संभाजीराजांच्या बाजुचा विचार करता यात मला काहीच वावगे वाटत नाही. मी परत सांगतो जे घडलं त्यात चूक ना महाराजांची होती ना संभाजीराजांची. शिवाजी महाराजांना स्वराज्याचा गाडा हाकायचा होता. पण त्यात ते कुटुंबाला वेळ देऊ शकले नाहीत आणि ते शक्यही नव्हतं. अन्यथा स्वराज्य उभं रहातंच ना. पण वडिलांकडून मुलाच्या ज्या अपेक्षा असतात त्यांची अपेक्षा संभाजीराजांनी उमलत्या वयात केली असेल व व्यस्त वेळामुळे महाराज त्या पूर्ण करु शकले नसतील तर संभाजीराजांची घालमेल होणं स्वाभाविक होतं.

वडील - मुलाच्या नात्यातला हा तडा इतरही अनेक थोरा मोठ्यांच्या बाबतीत दिसून येतो. मग ते लोकमान्य टिळक - श्रीधरपंत टिळक असोत अथवा महात्मा गांधी व हरीलाल असोत. लोकमान्य टिळक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात वैचारिक भूमिकेत अजिबात पटत नसे. त्याचे पडसाद अगदी केसरी विरुद्ध मूकनायक अश्या स्वरुपातही उमटले. पण लोकमान्य टिळकांचे पुत्र श्रीधरपंत हे मात्र बाबासाहेबांचे जीवलग मित्र बनले. बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते की बाळ गंगाधर टिळक हे खरे लोकमान्य नव्हेत. तर श्रीधरपंत हेच खरे लोकमान्य. श्रीधरपंत देखिल बाबासाहेबांना इतके जवळचे मानत की त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी शेवटचे पत्र लिहीले ते डॉ आंबेडकरांना. श्रीधरपंतांचं असं जाणं बाबासाहेबांनाही भावनिक पातळीवरती फार हेलावून टाकणारं होतं. तीच गोष्ट गांधीजी व त्यांचा थोरला मुलगा हरीलालची. तुम्ही असाल जगासाठी बापू - महात्मा ... "माझे वडील कुठे आहेत?" हा त्यांचा स्वाभाविक प्रश्न होता. व त्यांना तो प्रश्न पडायचे कारण सर्वात मोठा पुत्र असल्याने वडिलांचा आपल्या हातातून सुटत चाललेला हात त्यांनी अनुभवला होता. इंग्लंडला जाऊन वकिलीच्या उच्च शिक्षणाबाबत वडिलांनीच घेतलेली विरोधाची भूमिका ही "स्वातंत्र्यसैनिक" म्हणून घेतलेली होती. तो नकार एक तरुण, काहीतरी करुन स्वत:ला सिद्ध करायला धडपत असणारा "मुलगा" म्हणून हरीलाल यांच्या मनाला लागणं हे आपण समजून घ्यायला हवं. ह्या नात्यांच्या नाजूक गाठी हलक्या हातानेच सोडवाव्या लागतात. दोहोंची भूमिका समजून घ्यावी लागते.

इतिहास हा दरवेळी तलवारींनी खेळलेला - रक्ताळलेला नसतो. त्याला नात्याचेही अत्यंत हळवे पदर असतात. ते हातावर बसलेल्या फुलपाखरागत हळुवार हाताने सांभाळावे लागतात ह्याचं भान आपल्याला यायला हवं. एकदा संभाजीराजांची मनोभूमिका अंशत: अनुभवली तरी संभाजीराजे मुघलांना जाऊन मिळाले ह्यावर पांघरुण घालायची गरज उरत नाही. उलट नंतर त्यांचा त्या सगळ्यातून बाहेर पडून डोळे दिपवून टाकणारा पराक्रम व मृत्यूलाही धीरोदात्तपणे सामोरे जाणारी वीरवृत्ती अजून लखलख करत तेजाळते.

मी काय लिहीलय हे कदाचित काही त्रस्त समंधांना समजणारही नाही. तो त्यांना महापुरुषांचा अपमान, संभाजीराजांना बदनाम वगैरे करण्याचा डाव वाटेल कारण ती लोकं झोपतानाही कंबरेला एक अदृष्य़ तलवार लटकवून झोपतात. ह्याच त्रस्त समंधांपासून इतिहास जपण्याची विनंती करणारा हा लेख. आपले महापुरुष सुद्धा "माणूस" होते "सुपरमॅन" नव्हते. त्यांनाही राग-लोभ-प्रेम-तिरस्कार-भीती-करुणा अश्या सहाजिक मानवी भावना होत्या. त्यांच्या हळव्या भावना आपण समजून घेण्याचा साधा प्रयत्नही केला नाही तर स्वत:ला अनुयायी तरी का म्हणवून घ्यायचे? आपले हट्ट व अवाजवी अपेक्षांचे ओझे इतिहासातील महापुरुषांच्या खांद्यावर टाकणे आपण थांबवायला हवे. एखाद्या मेसेजमध्ये कधीच न घडलेल्या गोष्टी ठोकून देऊन महापुरुषांना मोठे करण्याइतके आपण मोठे झालो नाही ह्याची जाणीव ठेवावी. महापुरुषांनी आधीच इतके करुन ठेवले आहे की त्यांना खोट्या ठिगळांची गरज नाही. त्यामुळे जगातल्या सगळ्याच गोष्टिंची अपेक्षा एकाच व्यक्तीकडून करण्यात काही हशील नाही हे आजकालच्या वैचारीक "सुपरमॅन" असलेल्यांनी समजून अमानवी मेसेज तयार करणे अथवा अजून पुढे दहा जणांना पाठवणे थांबवायला हवे.

अजून काय लिहीणे? सुज्ञ असा!

 - सौरभ वैशंपायन.

Wednesday, January 21, 2015

परींदे - Birds in War.

"मेरी इजाजत के सिवा यहॉं परींदा भी पर नही मार सकता!" हा संवाद अनेकदा आपण ऐकला असेल. पण पूर्वीपासून खरोखर ह्याचा प्रत्यय युद्धभूमीवर येत असे. पूर्वी एखाद्या किल्याला/गावाला वेढा दिला की शत्रू शरण येईपर्यंत तो वेढा राबवला जात असे. मग बाहेरुन मदत मागायची कशी? सोप्पे उत्तर, प्रशिक्षित केलेले "कबूतर" पाठवायचे. त्याच्या पायाला चिठ्ठी बांधायची व सोडायचे. मग अश्या कबुतरांना थांबवण्यासाठी प्रशिक्षित तीरंदाज नेमले जायचे. पण बाण असा जाऊन जाऊन किती उंच व किती दूर जाणार? मग उपाय म्हणून "ससाणे" पाळून त्यांना प्रशिक्षित करत व ते ससाणे कबुतरांवरती सोडले जात. पण समजा एकाचवेळी ढीगभर कबुतरं उडवली तर? .... ससाण्यांचीही मग फौज तयार केली जात असे. जोवर शत्रू टेकीला येत नाही तोवर आत - बाहेर कोणी जाणार नाही ..... "पाखरु" पण नाही.


ससाणे वगैरे पाळण्याचे उल्लेख ४ हजार वर्षाहुन जुने आढळतात. मेसेपोटेमिया मध्ये ह्याची सुरुवात झाली असे समजले जाते. तरी पण  साधारण हे असे ससाणे, गरुड वगैरे पाळण्याची पद्धत मुख्यत: उझबेगीस्तान, मंगोलिया, किरगिझस्तान वगैरे भागात फार पुरातन आहे. पुढे हुणांनी ती पद्धत युरोपात नेली तर मंगोलांनी आपल्याकडे. म्हणूनच आपणही अनेक मुघल शासक मनगटांवरती ससाणे वगैरे घेऊन उभे असलेले अनेक चित्रात बघतो. सम्राट अकबराचे एक असेच चित्र प्रसिद्ध आहे. शहजहान सकट इतर अनेक मुघलांची, चांद-बीबी वगैरेंची देखिल अशी ससाणे हातावरती घेतलेली मुघल शैलीची चित्रे आहेत. अर्थात ही चित्रे समकालिनच होती असेही म्हणता येत नाही. रंगीत चित्रे तर सरळ सरळ गेल्या १५०-२०० वर्षात काढली गेली यात शंका नाही. एकंदरच ससाणा हे सामर्थ्य, क्रुरता, वेग, बेदरकारपणा, शौर्य वगैरेंचे प्रतिक मानले गेले. त्यामुळे ससाणे पाळणं हा छंद मुघल शासकांत दिसून येतो. तसे तर पूर्वीचे अनेक शासक, अनेक प्राणी पक्षी पाळत. मोर, पांढरी कबुतरं व पोपट वगैरे तर फारच सहज आढळून येतात. वाघ, बिबट्यांचे बछडे लहानपणीपासून बाळगून ते देखिल पाळले जात. पण अशी चित्र म्हणून आढळतात ती बव्हंशी ससाण्याला मनगटावर बसवलेलीच.

एकंदरच ससाणा हा जगभरातील संस्कृतीत मानाचे स्थान पटकवलेला पक्षी दिसून येतो. इजिप्शियन संस्कृतीत तर तो रक्षकाच्या रुपात देखिल दिसतो. मानवी धडांवरती ससाण्याचे डोके असलेली अनेक चित्रे आढळुन येतात. इजिप्शियन राजांच्या मुकुटावरती पुढील बाजूस नाग व मागच्या बाजूला ससाण्याचे पंख पसरलेले चित्र अथवा मुर्ती मिळतात.चीन, जपान मध्ये तिसर्‍या - चौथ्या शतकात, अरबस्तानात ५ व्या शतकात, तर युरोपात आठव्या शतकात ससाणे पाळण्याचे स्पष्ट उल्लेख मिळायला सुरुवात होते. कुराणात ससाणा, शिकारी कुत्रे वगैरेंनी केलेली शिकार "हलाल" समजली जात असल्याने अरबस्तानात देखिल शिकारीसाठी ससाणे पाळले जात. १३ व्या शतकात तैमुर मिर्झा नामक अरबी इसमाने "बाझ नामा-यी नासिरी" हा ससाण्यांवरील ग्रंथच पर्शियन भाषेत लिहीला.

इसवीसन ९०३ मधली किएव्ह मधली एक कथा सांगितली जाते - की ड्रेव्हलियन्सने किएव्हच्या राजाला मारल्याने "ओल्गा" ही त्याची बायको किएव्हची राज्यकर्ती बनली. किएव्ह व ड्रेव्हलियन्समध्ये दिर्घकाळ युद्ध सुरु होतं. नवर्‍याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी तीने अनेकदा ड्रेव्हलियन्सना खोटे बोलून फसवून ठार केले. नंतर ड्रेव्हलियन्सचा एक मोठा गट तीने पकडला त्यांनी गयावया केल्यावरती त्यांना प्रत्येकी ३ चिमण्या व ३ कबुतरे द्यायला सांगितली. मागणी विचित्र होती. पण जीव वाचवायला त्यांनी ती मिळवून दिली. तीने ड्रेव्हलियन्सना सोडून दिले. जशी संध्याकाळ झाली तशी तीने त्या कबुतरांच्या व चिमण्यांच्या पायाला दोर्‍याने व ओल्या कापडातुन "सल्फरचे" तुकडे बांधुन त्यांना सोडून दिलं म्हणे. त्या चिमण्या व कबुतरे आपल्या नेहमीच्या घरातील वळचणीत शिरले थोड्याचवेळात त्या सल्फरचा हवेशी संयोग होऊन ते पेटले व ड्रेव्हलियन्सचे अख्खे गाव आगीच्या वेढ्यात पडले. अशी एक कथा "ओल्गा ऑफ किएव्ह" म्हणून मिळते.

आधी सर्व सामान्य शिकारी जमातींचा म्हणून ओळखला जाणारा हा वारसा पुढे पुढे प्रतिष्ठेची बाब समजली जाऊन फक्त आर्थिक वा शासकिय उतरंडित उच्चवर्गियांचा हा "छंद" झाला. FALCONRY मध्ये केवळ ससाणा न रहाता इतर अनेक ताकदवान पक्षी समाविष्ट झाले. इतकेच कशाला पुढे पुढे युरोपात तर कोणी कुठला ससाणा अथवा तत्सम पक्षी पाळायचा ह्याचे काटेकोर नियमच बनले. सम्राट, राजा, राणी, राजपुत्र, राजकन्या, प्रधान, दरबारी लोक, धर्मगुरु, शासकिय अधिकारी अशी ती उतरंड लागत गेली. सम्राट असे तो सुवर्ण गरुड, गिधाड, व ससाण्यातील "मर्लिन" नामक प्रजात पाळू शकत असे, बाकी कोणाला हे पक्षी पाळायचे अधिकार नव्हते. राजा "ग्रे-फाल्कन" प्रजात बाळगत असे, राणी अथवा राजकुमार "पेरीग्रीन" प्रजातीचे ससाणे पाळत असत. अर्थात युरोपातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रजाती पाळायचे नियम होते. मात्र ढोबळ मानाने वरीलप्रमाणेच नोंदि मिळतात.


मात्र पुढे पुढे हा केवळ छंद न रहाता "युद्धात" वापरायचे साधन बनला. वरती सांगितले तसे शत्रुकडून संदेश घेऊन उडलेली कबुतरं; हे ससाणे मधल्यामध्ये पकडून ठार करत. अगदि दुसर्‍या महायुद्धापर्यंत ह्याचा वापर केला जात असे. पहिल्या महायुद्धात तर फ्रेंच व जर्मन्स संदेश वहनाचा खात्रीशीर मार्ग म्हणून कबुतरे वापरत. अगदि ही पोस्टल सर्विस "पाठीवरती" मिरवली जात असे. व गरज पडेल तिथुन ह्या कबुतरांना सीमेवरुन मुख्य तळाकडे अथवा शत्रुच्या सीमेपलीकडे सोडले जात असे. पहिल्या महायुद्धातला हा सरसकट वापरला गेलेला
प्रकार होता. स्वीस सैन्याने देखिल ह्याचा वापर केला. अमेरीकन सिग्नलिंग सर्विसच्या कबुतरांनी फ्रेंचांची फार मोठी मदत केली. इतकेच काय तर "चेर अ‍ॅमी" नामक कबुतरीने त्या काळतले अत्यंत महत्वाचे असे १२ संदेश अत्यंत योग्यवेळी पोहोचवल्याने तीला फ्रेंचांकडून चक्क "Croix de Guerre with Palm" म्हणून "मरणोत्तर" अवॉर्ड दिला. आपल्या शेवटच्या खेपेत बिचारीला पंखात, छातीत व पायात छर्रे लागुन ती गंभीर जखमी झाली तरीही तीने तो अत्यंत महत्वाचा संदेश पोहोचवून ७७च्या डिव्हिजन मधील २०० अमेरीकन सैनिकांचे प्राण वाचवले. अमेरीकन्सनी फ्रेंच सरहद्दिवरती अशी १२ कबुतर केंद्रे उघडली जिथे कबुतरे येऊन संदेश पोचवत. तब्बल १५०० कबुतरे त्यांनी यासाठी वापरली. अश्या कबुतरांना war/homing pigeons म्हणत. त्यांना ठार मारणं अथवा जखमी करणं देखिल 21A कायद्याखाली गुन्हा ठरवण्यात आलं होतं. "homing pigeons देशाचे महत्वाचे काम करत आहेत. त्यांना मारु नका, सरकारला मदत करा. त्यांना ठार करणं, जखमी करणं हा गुन्हा असून असे करताना कुणी आढळल्यास त्याची माहीती पोलिस, लष्कर वगैरेंना द्या. गुन्हेगाराला ६ महिन्यांची कैद, १०० पाउंड दंड अथवा दोन्हीची शिक्षा आहे." असे संदेश देणारी पत्रके जागोजागी लावली होती. शिकार करणार्‍यांची माहीती देणार्‍याला ५ पाउंडाचे बक्षिस सुद्धा होते.


दुसर्‍या महायुद्धात तर कहर तेव्हा झाला जेव्हा जर्मन सेनाधिकारी व नाझींच्या क्रूर अश्या SS संघटनेचा सर्वेसर्वा "हिमलर" हा स्वत: कबुतरांचा प्रेमी होता. व तो "German National Pigeon Society" चा अध्यक्ष देखिल होता. त्याने जर्मनीतील शक्य तितकी कबुतरे पकडायचा त्यांना पाळायचा व प्रशिक्षित करायचा घाट घालता.  या कबुतरांचा वापर निरोप पोचवणारी यंत्रणा म्हणून करायचे ठरवले. ब्रिटिश गुप्तहेर संस्था MI5 हिने अश्या कबुतरांचा छडा लावायचे व ती थांबवायचे ठरवले. ब्रिटिश कागदपत्रांनुसार अशी कबुतरे १९४० पासूनच बेल्जियन, बाल्कन प्रदेश व पश्चिम हॉलंडमधील छुप्या "गेस्टापोंना" निरोप पोहचवायला ये जा करत. मग ब्रिटिशांनी ह्याला आळा घालण्यासाठी "ससाण्यांची गस्त" सुरु करायचे ठरवले. शेकडो ससाणे प्रशिक्षित केले गेले व त्यांनी अश्या कबुतरांना पकडायला अथवा ठार करायला सुरुवात केली. ब्रिटिश कागदपत्रांत दोन पकडल्या गेलेल्या कबुतरांबाबत एक गंमतीशीर नोंद आढळते. त्यांना "युद्धकैदि" ठरवले गेले - "Both birds are now prisoners of war working hard at breeding English pigeons." एकिकडे माणसे तर जीव खाऊन लढतच होती मात्र त्या बरोबर जर्मन कबुतरे विरुद्ध ब्रिटिश ससाणे असं आकाशातलं विचित्र युद्ध देखिल सुरु झालं होतं. 


दुसर्‍या महायुद्धात शह - काटशह देणे सुरु होते. निरोप अथवा खुणांसाठी चिन्हे काढलेले वीजेचे खांब, विशिष्ट
पद्धतीने कापणी केलेली शेते, घराबाहेर लटकवलेल्या संस्थयास्पद वस्तू ह्या MI5 चे लक्ष बनल्या होत्याच पण कुणी कबुतर पाळणारा आढळलाच तर MI5 त्याला कधीही चौकशीसाठी उचलेल याचा भरवसा उरला नव्हता. याच दरम्यान ब्रिटनने देखिल कबुतरांचा "उडते बॉम्ब" म्हणून जर्मन विमानांविरुद्ध अयशस्वी वापर केला होता. MI5 खेरीज MI14  व MI16 देखिल ह्यावर विचार करु लागली होती. ह्या कबुतरांच्या अंगावरती अगदि जीवाणूंच्या डब्या लावून शत्रू प्रदेशात सोडायच्या कल्पना त्यांच्या डोक्यात आल्या होत्या. ४०० कबुतरांना यासाठी प्रशिक्षण द्यायचे ठरले होते मात्र हा प्रोजेक्ट गरजेपेक्षा खूप जास्त खर्चिक आहे असा शेरा मारुन हे प्रकार थांबवले गेले.


पहिल्या महायुद्धात तर कबुतरांच्या गळ्यात कॅमेरा अडकवून शत्रुंच्या प्रदेशांचे वरुन फोटो काढण्याचे प्रयत्न जर्मन्सने केले होते. अर्थात हाती फार काही लागले नाही. पण ती कल्पना भन्नाट होती यात वाद नाही. नंतर तसा प्रयत्न कुणी केल्याचे उदाहरण नाही. मात्र दुसर्‍या महायुद्धात ब्रिटिशांनी तब्बल अडिच लाख कबुतरांना ह्या युद्धात खेचले. व या पैकी ३२ कबुतरांना 21st डिकन्स मेडलने गौरविल्याची नोंद आहे. हा पुरस्कार म्हणजे प्राणी - पक्षी यांचा "व्हिक्टोरीया क्रॉस" समजला जातो. वरती उल्लेख केलेल्या अमेरीकन "चेर अ‍ॅमी" कबुतरीप्रमाणेच ब्रिटनचे "विल्यम ऑफ ऑरेंज" नामक कबुतर "21st डिकन्स मेडल" या शौर्य पुरस्काराचे मानकरी ठरले. त्याच्या मुळे अर्नहेमच्या युद्धात तब्बल २००० ब्रिटिश सैनिकांचे प्राण वाचले. जर्मन्सच्या सुसज्ज वेढ्यामुळे संदेश पोहोचवायला रेडियो सेटचा वापर करता येत नव्हता तेव्हा विल्यम ऑफ ऑरेंजने ती कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. यासाठी साडेचार तासात त्याने तब्बल ४०० किमीचा प्रवास केल्याची नोंद आहे.  पण ब्रिटिशांना रानटी ससाण्यांचा वेगळाच प्रश्न उभा राहीला अनेकदा हे ससाणे ब्रिटिशांचे निरोप आणणारी कबुतरेच ठार मारत. विशेषत: दक्षिणेकडे इंग्लिश चॅनल पार करुन येणारी कबुतरे ह्या ससाण्यांच्या भक्ष्यस्थानी पडत. अश्या ६०० रानटी ससाण्यांना त्यावेळी गोळ्या घालून ठार केले. अनेक घरटी नष्ट केली. अनेक अंडी नष्ट केली. अखेर रोनाल्ड स्टिव्हन्सने कबुतरांप्रमाणेच ससाणे पकडून त्यांना लष्करी उपयोगासाठी वापरता येईल हे सुचवले.

अमेरीका व जपानच्या मधील उत्तर पॅसिफिक महासागरात "मिड वे" बेटांवरती अमेरीकेने १९४०च्या आसपास आपला नाविक व हवाई तळ बनवला. इथून जी विमाने ये-जा करत त्यांच्यासाठी सर्वात मोठा धोका होता तो इथे असलेल्या "सीगल" पक्षांच्या. ते एखाद्या क्षेपणास्त्रासारखे विमानांवरती येऊन धडकत अथवा विमानांच्या इंजिनमध्ये ओढले जात त्याने विमानचे नुकसान होई अथवा संपूर्ण विमानच कोसळण्याचा धोका होता. त्यांना सुरुवातीला शॉटगन्सने ठार केले जाई पण सीगल्सची संख्याच इतकी प्रचंड होती की ह्या प्रकारांना आळा बसत नव्हता. एक उपाय म्हणून तिथे अमेरीकन नेव्हीने काही ससाणे पाळले आणि त्यांच्या भीतीने धावपट्टिच्या बाजूने सीगल फिरकणे जवळपास बंद झाले. आज जगभर अनेक ठिकाणी ही पद्धत वापरली जाते.


आज FALCONRY हा जगभरात लोकप्रिय खेळ/छंद म्हणून ओळखला जातो. जगभरात फाल्कनर्सचे क्लब्स आहेत. त्यांच्यात स्पर्धा देखिल घेतल्या जातात. शर्यतीच्या घोड्यांची जसी खास पैदास केली जाते तशीच ससाण्यांची, घुबडांची, गरुडांची खास पैदास केली जाते. दोन वेगवेगळ्या प्रजातींचे असे शिकारी पक्षी वापरुन मिश्र प्रजातींच्या ससाण्यांची, गरुडांची वगैरे पैदास करतात. अर्थात युरोपियन देशात व अमेरीकेत ह्यावरती कडक नियम घातले आहेत. कतार, युनायटेड अरब अमिरात वगैरे देशात देखिल हा प्रचंड लोकप्रिय खेळ आहे.  मंगोलियामध्ये तर घोडेस्वारी व  FALCONRY हे जवळपास त्यांच्या संस्कृतीचे भाग आहेत. मंगोलियात ह्याचा उत्सव करतात व त्या निमित्ताने स्पर्धा भरवल्या जातात.

मला पक्षांच्या युद्धातील सहभागाबाबत या  लेखाच्या निमित्ताने अनेक दुवे वाचनात आले. अनेक क्लब्सच्या साइट्स बघितल्या, हजारो फोटो बघता आले. कुठला फोटो निवडू हा प्रश्न पडावा असे त्यात शेकडो सुंदर सुंदर फोटो होते पण खालच्या फोटोपाशी आलो आणि त्या फोटो वरची लिहीलेली कॅप्शन १००% पटली त्याच चित्राने FALCONRY व युद्धातील पक्षी याची तोंडओळख करुन देणार्‍या लेखाचा शेवट करतो -



 - सौरभ वैशंपायन.

Wednesday, January 7, 2015

वाण्याची गोष्ट

आयुष्यात प्रथमच लहान मुलांसाठी काहीतरी लिहीलंय. कविता सुचताना मजा वाटली, पण एकंदर कठिण काम होतं. लहान लहान ८-१० शब्दांचीच कडवी करा, त्यातच यमक बसवा. बोजड शब्द नकोत. त्यात गोष्ट असायला हवी. मोठ्यांच्या दृष्टिने कविता कितीही निरर्थक असली तरी लहान मुलांना मजा वाटून ते त्यांच्या डोळ्यांसमोर उभं रहायला हवं. हे इतकं सांभाळताना मुख्य गोष्ट मात्र पूर्ण बोंबलली, ती म्हणजे लहान मुलांसाठी असल्याने जास्तीत जास्त ५-७ कडव्यांत कविता संपायला हवी होती. माझी एक मैत्रिण म्हणाली "कविता मजेदार आहे, पण लहान मुलांसाठी तू जवळपास "खंड-काव्य" लिहीलं आहेस!" :-D :-D .....  तसं तिच्या म्हणण्यातलं तथ्य मान्य करायला हवं कारण मुलांना एका जागी इतका वेळ बसवत नाही. मात्र तरीसुद्धा ही कविता इतरांना वाचायला द्याविशी वाटली. लहान मुलांच्या एखाद्या कार्यक्रमात कवितेतून गोष्ट म्हणून मात्र ही सादर करता येईल १० मिनीटांची काव्य - नाटुकली टाईप काहीतरी निघू शकेल यातून. :-p

===========

हिरवे नावाचे,
कोरडे गाव,
गावात होता,
पाण्याला भाव.

गावात होता,
हुशार वाणी,
धान्या बरोबर,
विके पाणी.

जमवली त्याने,
भरपुर नाणी,
मुलगी त्याची,
सुंदर शहाणी.

मुलीचं म्हणे,
करीन लग्न,
सुखी संसारात,
होईल मग्न.

पण .....

बबलू टबलू,
गाव-गुंड,
ताडमाड उंच,
चाल थंड.

बबलू बारीक,
टबलू लठ्ठ,
डोक्याने पण,
दोघे मठ्ठ.

बबलू टबलू,
दाणगट फार,
करती चोरी,
देती मार.

बबलू टबलू,
घरात आले,
वाण्याचे सगळे,
पैसे नेले,

वाण्याला लागली,
खूप मोठी चिंता,
मुलीचे लग्न,
कसे होईल आता?

कोण पैसे,
परत आणेल?
बबलू टबलूला,
फटके हाणेल?

गावातला पिंट्या,
कवि - गायक,
लोकांना वाटे,
त्रासदायक.

कविता करी,
फार टुकार,
लोक म्हणती,
बेकार बेकार.

आवाज त्याचा,
खूप भसाडा,
काचा फुटती,
जाऊन तडा.

वाण्याला सुचली,
मोठी युक्ति,
गुंडांपासून,
मिळेल मुक्ति.

पिंटूला बोलावुन,
केला प्लॅन,
पिंटू बसला,
लावून ध्यान.

वाणी गेला,
बबलूकडे,
पैज लावली,
सोन्याचे कडे.

पैज होती,
भलतीच धीट,
पिंटूच्या कविता,
ऐकायच्या नीट.

बबलू गेला,
पिंटूसमोर,
कवितेला म्हणे,
देईन वन्समोअर.

कविता ऐकुन,
मोजुन पाच,
बबलू झाला वेडा,
करु लागला नाच.

टबलूला ह्याचा,
आला राग,
हिरवे गावात,
भागमभाग.

पिंटुची त्याने,
पकडली मान,
पिंटुने घेतली,
मोठी तान.

टबलूचे फुटले,
दोन्ही कान,
कानात बोटे,
सोडली मान.

बबलू टबलू,
दोघे मिळुन,
गावाबाहेर,
गेले पळुन.

 - सौरभ वैशंपायन