Friday, June 10, 2016

मुस्लिम धर्मातील चार्वाक - अकबर बादशहा!

कुठल्याही गोष्टीच्या दोनच नव्हे तर अनेक बाजू असू शकतात हे मी इतिहासाचा वाचक अथवा साधा अभ्यासक म्हणून सांगु इच्छितो. सरळसोट मापदंड लावणे अनेकदा अंदाज चुकवू शकते. एक व्यक्ती चांगली म्हणजे दुसरी व्यक्ती ठार वाईटच असते असं नाही. किंवा वाईट असलीच तरी जे चांगलं होतं ते चांगलंच अथवा चूकीचं होतं ते चूकीचंच होतं होतं हे मान्य करुन पुढे जायची गरज असते. दोन्ही व्यक्तींच्या वागण्याला वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक, वैचारीक कारणे असतात. ती समजून न घेता दात-ओठ खाऊन तुटून पडणे तत्कालिन समाधान देत असेलही पण त्याला ठोस आकार येईलच असे नाही. अकबर बादशहाच्या बाबतीत अनेकदा असे मापदंड लावले जाताना दिसतात. एकतर तो सरळसोट निधर्मी महान वगैरे असतो किंवा पुर्णत: क्रुर तरी असतो. शिवाय अकबराची कुठलीही एक बाजू उजळून दाखवली की लग्गेच त्याचा आपल्याला हवा तो अर्थ लावून धोपटायला दोन्ही बाजूची लोकं मोकळी होतात. अकबराबाबत इतिहास दाखवतो तेच ससंदर्भ चार बरे वाईट शब्द बोललो तर लोकांना धर्म बुडल्यागत कळ उठते. अकबराबाबत बरे बोलणे म्हणजे राणाप्रतापाचा अपमान वगैरे ठरवून लोकं मोकळी होतात. पुर्ण म्हणणे काय आहे हे मत का बनले वगैरे आगा-पिच्छा माहीत नसताना घरात फोटो लावा आणि पुजा करा वगैरे अनाहुत सल्लेही मिळतात. अकबराला पेनच्या एका फटक्यात किंवा कि-बोर्डच्या एका लेखात उडवून लावावा इतका अकबर साधा माणूस खचित नव्हता. त्याने घेतलेल्या निर्णयांनी भारताच्या लष्करी, राजकिय व मुख्यत: धार्मिक बाजूंवरती दूरागामी परीणाम झाले हे लक्षात घ्यावेच लागेल. अकबर हा आदर्श माणूस अथवा राजा नसेलही पण तो अतिउत्तम "राजकारणी" होता हे अजिबात नाकारता येत नाही.

अकबर सत्तेवरती आला तोच १४-१५ वर्षाच्या कोवळ्या वयात. अकबर शहाणा होईतो बैरामखान त्याचा पालक होता. अकबर "निरक्षर" होता. सुरुवातीचा सर्व वेळ शिकारींत जात असे. अकबराकडे जे काही म्हणून शहाणपण होतं ते त्याने निरिक्षणातून व प्राण्यांकडून जमवले होते. मग ते क्रौर्य असो वा मनाचा मोठेपणा. "स्व" ची जाणीव झाल्यावरती बैरामखानला मक्केला पाठवून मग मागहुन आजूबाजूच्या बंडखोरांना ताळ्यावर आणून सत्ता मिळवण्याचा अकबराचा इतिहास वादळी आहे; त्याची नशिबाशी जुगार खेळण्याची बेफिकीर वृत्ती, संतापी स्वभाव, डुख धरायची वृत्ती ह्याकडे कल असलेला आहे. अकबराचा इतिहास हा वयानुसार येत जाणारी समज व त्यायोगे माणूस कसा बदलत जातो ह्याचे फार मोठे उदाहरण आहे. 


अकबर हा शब्दश: विक्षिप्त होता. त्याच्या विक्षिप्तपणाचे अनेक खरे-खोटे किस्से आहेत. अकबराची, सत्ता टिकवण्यासाठी धडपडणारा तरुण ते सत्तेसाठी वाट्टेल ते राजकारण - समाजकारण करणारा बादशहा आणि नंतर स्वयंघोषित प्रेषित बानलेला सम्राट ही वाटचाल स्तिमीत करणारी आहे. अकबराच्या काळात ग्रंथसंपदा, अनेक उत्तम व भव्य वास्तू, अनेक शहरे उभी राहीली. जनानखान्या बरोबर त्याचा पीलखाना म्हणजे हत्तींचा भरणा ह्याबाबत अनेक आश्चर्यकारक कथा आहेत. अकबराच्या कारकिर्दिवरती शेकडो पुस्तके लिहीली गेली इतका हा विषय मोठा आहे. पण मला मुख्य भर द्यायचा आहे तो धार्मिक व राजकिय  बाबतीत.

अकबर सत्तेवरती येणे हा हिंदूंसाठी "buffer Period" होता हे आपण लक्षात घ्यायला हवे.  सत्ता स्थापून ती पक्की होईतो २-४ प्रसंग सोडले तर अकबराने सरसकट कत्तल केलेली नाही. उलट अकबर एक आदर्श "राजकारणी" होता. फायदा असेल तेव्हा जमेल तितके उपसून काढा व कठिण प्रसंग असताना कमीतकमी नुकसान होऊन टिकून रहाण्याचे कसब अकबराने दाखवले. त्यासाठी त्याने साम-दाम-दंड-भेद जमेल तिथे, जमेल तसे व जमेल तितके वापरले. अनुभवाने शहाणे होऊन त्याने रजपुतांशी संघर्ष होईतो टाळला. रजपुतांशी संघर्ष करुन आपण शक्तीहीन होत जाऊ व आज ना उद्या आपली सत्ता जाईल हे त्याने हेरले. मोठ्या धूर्तपणे रजपुतांना समजावून अथवा दमात घेऊन एकएकाला फोडून आपल्या भजनी लावले. रजपुतांची सत्ता कायम ठेवण्याच्या बदल्यात त्यांच्याशी रक्तसंबध जोडायची सुरुवात अकबराने केली व ती मुघलांच्या पुढील पिढ्यात सुरु राहीली. ह्यावेळी घाबरलेले अथवा आपला फायदा बघणारे रजपूत अकबराच्या ह्या जाळ्य़ात अडकले. एकच झेंडा शेवटपर्यंत वाकला नाही - "उदयपुर." अकबराच्या रजपुतांसाठी ३ अटी होत्या १) आपल्या घराण्यातील एक उपवर मुलगी अकबराला द्यावी,  २) दरवर्षी एक ठराविक रक्कम खंडणी म्हणून अकबराला द्यावी व  ३) अकबराला कुर्निसात करुन त्याच्या समोर गुढगे टेकावेत. राणा प्रतापांनी ह्यातले काहीच मान्य केले नाही. अखेर अकबराने राणा प्रतापांसाठी पहिल्या २ अटी देखिल काढून टाकल्या. आपल्या समोर आपला शत्रू गुढघे टेकतो आपल्याला कुर्निसात करतो हा अहं सुखावणारा भाग तसेच राजकिय दृष्ट्या इतरांसाठी ह्याचे निघणारे सुचक अर्थ एक बादशहा म्हणून अकबराला हवे असणे फार सहाजिक होते. पण इथे राणा प्रतापांचा स्वाभिमान अकबराच्या गर्वापेक्षा दृढ व मोठा ठरला. राणाप्रताप शेवटपर्यंत झुकले नाहीच. म्हणूनच पुढल्या पिढ्यांसाठी कायमचे ते "राणांचे" - "महाराणा" असे आदर्श बनले.

अकबराने जनान्यातील रजपूत स्त्रीयांना हिंदू सण साजरे करायची परवानगी दिली. तो स्वत: त्या सण-समारंभात सामिल होऊ लागला. हे त्याकाळच्या मुस्लिम धर्ममार्तंडांना न झेपणारं होतं. पुढे पुढे तर त्याने रजपुत स्त्रीयांच्या सहवासात येऊन मांसाहार बंद केला. जेवण्याच्या पध्दतीत हिंदुंच्या अन्नाप्रमाणे बदल होत गेले. त्याने हिंदु सण साजरे केले अथवा अन्नाच्या सवयी बदलल्या म्हणून अकबर महान वगैरे अजिबात होत नाही. मात्र ह्याचा तत्कालिन "राजकारणावरती" व समाजावरती प्रभाव पडला होता हे नक्की. कालांतराने लोकांना तो आपसूक आपल्यातला वाटू लागला. त्याच बरोबर त्याच्या अश्या वागण्याने मुल्ला-मौलवींचा जळफळाट सुरु झाला. अकबराचा धार्मिकतेचा प्रवास आणि संघर्ष सुरु होतो तो इथुन.
 


अजमेरला तापल्या वाळूत नागव्या पायाने चालत जाऊन मुलासाठी नवस करणारा अकबर नंतर नंतर खूप बदलत गेला. जनानखान्यामुळे रजपूत स्त्रीयांच्या सहवासात तो आलाच होता पण पुढे त्याने आपल्या दरबारातील लायक अश्या हिंदू लोकांना महत्वाची पदे देऊ केली. राजा तोरडमल, बिरबल, तानसेन वगैरे सर्वांच्या ओळखिची नावे आहेत. ह्या लोकांकडून त्याने समाजातील हिंदू लोकांच्या पध्दती समजावुन घेतल्या. हिंदुंवरील जिझिया हा अपमानकारक कर काढून टाकला. दुसरीकडे शिखांना जमीन दान केल्याचेही उल्लेख आहेत. अकबर समोर दिसेल तेच मानणारा व तर्काच्या कसोटीवर सगळ्या गोष्टी तासून बघणारा होता. दरबारातील मुल्ला-मौलवींशी भाषा - माणसाचे संवाद करणे वगैरे बाबतीत त्याचे वाद झाले. मुल्ला-मौलवी नेहमीप्रमाणे फरीश्ते येऊन मानवाला भाषा शिकवून गेले वगैरे बरळू लागले तसे अकबराने हे चूकीचे आहे. मुल आजूबाजूच्यांकडे बघून शिकते हे ठासून सांगितले पण मुल्ला-मौलवी धर्मग्रंथाच्या बाहेर यायला तयार नव्हते. "विक्षिप्त" अकबर जागा झाला त्याने शहरा बाहेर दूर एका निर्जन ठिकाणी एक महाल बांधला व राज्यातील काही मोजकी तान्ही मुले तिथे ठेवली. त्यांना सांभाळणारे सगळे मुके बहिरे ठेवले. आणि ४-५ वर्षांनी त्या मुलांना सगळ्यां समोर आणल्यावर ते फक्त प्राण्यांसारखे आवाज तितके काढत होते. ही कथा जर खरी असेल तर त्याने मुल्ला-मौलवींची तोंडे बंद केली पण त्या मुलांच्या आयुष्याशी तो खेळला हे देखिल खरे.

त्याने उत्तर आयुष्यात अनेक
हिंदु - ख्रिश्चन - जैन - बौध्द तत्वज्ञांबरोबर त्या त्या धर्माबाबत सविस्तर व सखोल चर्चा  केली. १५७६च्या सुमारास अकबराने फत्तेपुरसिक्री मध्ये एक खासबागेत "इबादतखाना" नामक एक मोठी वास्तू बांधून घेतली. त्याला चार मोठी दालने बांधून घेतली. भिन्न भिन्न दालनात वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना बसवत असे. त्यांना समोरासमोर बसवून तो वाद घडवूण आणि. ज्याची मते पटत त्याला बक्षिसी दिली जाई. गोवेकर पोर्तुगिझ ख्रिस्तींनी अकबराला ख्रिस्ती बनवण्यासाठी चर्चेचे हर एक प्रयत्न केले. एका पाद्रिने तर मी हातात बायबल घेऊन अग्निदिव्य करायला तयार आहे मुस्लिम धर्मगुरुने तेच करुन दाखवावे असे आवाहनही दिले. अकबर मधल्या काळात ख्रिस्ती धर्मात नको इतका रस घेऊ लागला. फादर अक्वाविया, मान्सेराट, हेन्रीक असे तीन धर्मगुरु जाऊन अकबराला भेटले. अनेक भेटवस्तू बायबलची प्रत अश्या हेटी त्यांनी अकबराला दिल्या. अकबराने ते बायबल मस्तकावर धारण केले. पाद्रिंना आपल्या राज्यात धर्मप्रसार करायची सुट दिली. चर्च ऊभारायला परवानगे दिली. त्यांच्या प्रार्थना स्थळांत जाऊन तो देखिल गुडघे टेकून येऊ लागला. मात्र अकबराने बाप्तिसमा घेतला नाही. ख्रिस्ती लोक फारच मागे लागल्यावर त्याने आपला बारा वर्षांचा मुलगा मुराद ह्याला  काही महिन्यांकरता ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करायला लावला. मात्र घरातील लोकांनी अकबरावरती जणू अघोषित बहिष्कार टाकला. बायकांनी आम्ही असले प्रयोग करणार नाही असे निक्षून सांगितले. अखेर अकबराने आपले प्रयोग आपल्यापुरतेच ठेवले.

मात्र दुसरीकडे त्याने उलेमांच्या मनमानीला चाप लावायला धार्मिक अधिकार आपल्याकडे घ्यायला सुरुवात केली. "मला किती लग्न करायचा अधिकार आहे?" असा प्रश्न त्याने मौलवींना विचारला. अकबराची अनेक लग्ने झाली होतीच. कुराणानुसार चारच लग्न करु शकता अथवा पहीली चार लग्नच शरियानुसार अधिकृत आहेत असे सांगणार्‍यांना त्याने हाकलून दिले. पुढे पुढे तर हे मुल्ला-मौलवी एकमेकांत भांडू लागले व इबादतखान्याचा आखाडा होण्याची वेळ आली. म्हणून जिथे मौलवींना निर्णय देता येणार नाही तेथे कुराणाला अनुसरुन बादशहास गरजेपुरते बदल करण्याचा अधिकार आहे असा करारनामा शेख मुबारक नामक आपल्या विश्वासू माणसाला तयार करायला सांगितला व मौलवींना त्यावर सह्या करायला लावले. अकबराच्याच तुकड्यावरती त्यांची पोटे भरत असल्याने त्यावर निमुटपणे सह्या झाल्या. काही दिवसांनी अकबराने धार्मिक न्यायदान करणार्‍याला काढून टाकले. पण हे असंच चालू राहीलं तर आपली आणि ह्या भूमीत मुस्लिम धर्माची धडगत नाही हे ओळखून मुल्लामौलवींनी अकबराच्या विरोधात असंतोष पसरवायला सुरुवात केली. अकबराला हे प्रकरण खरंच जड गेलं. पण त्याने अत्यंत निष्ठूरणे हे बंड विझवले. आणि शेकडो मुल्ला-मौलवींना पकडून चौकशी केली व दोषी मौलवींना बाजारात गुलाम म्हणूण विकले व त्या बदल्यात चक्क बैल आणले. का? तर बैल जास्त उपयोगी आहेत. त्याने काही मशिदि पाडून चक्क घोड्यांचे तबेले ऊभे केले. अकबराने अनेक बाबी इस्लामच्या बाहेरीलच नव्हे तर इस्लामच्या पूर्ण विरुद्ध केल्या. आईकडून इराणी असल्याने तो सूर्य आणि अग्नि पूजक बनला. मोठा खर्च करुन त्याने आपले प्रतिनीधी इराणाला किर्मान येथे पाठवले आणि तिथल्या मंदिरातील पवित्र अग्नि आणविला. सूर्य हा सर्वांना उर्जा देतो त्याची उपासना करायला हवी हे तोच सांगु लागला. अकबर सूर्य नमस्कार घालत असे. "अकबरनामा" व "ऐन-इ-अकबरी" ह्या ग्रंथांचा कर्ता अबुल फजल ह्याला बिरबल आणि तोडरमल जबाबदार असून त्यांनी बादशहाला बिघडवले असे तो म्हणतो. अकबरने ह्याच अबुल फजल कडून महाभारताचा अनुवाद करवून घेतला वरुन त्यात जस्स दिलय तस्सच भाषांतर कर एकही शब्द तुझ्या मनातला लिहायचा नाही अशीही तंबी दिली. काफरांचे हे ग्रंथ वाचल्यामुळे मला जहन्नुममध्ये जावं लागेल अशी भीती वाटाल्याचेही अबुल फजल लिहीतो.

अकबराची केस दिवसेंदिवस मुल्ला-मौलविंच्या हाताबाहेर जाऊ लागली. आईकडून इराणी पध्दतीचा वारसा असल्याने तो "नवरोज" हा पारशी लोकांचा नववर्षाचा पहीला दिवस मोठ्या समारंभात साजरा करत असे. इस्लाममध्ये "दर्शन देणे" असा काही प्रकार नाही. अकबर मात्र सकाळ - संध्याकाळ लोकांना सज्जात उभं राहुन "दर्शन" देऊ लागला. हीच प्रथा पुढे मुघल घराण्यात कायम राहीली हे आपण लक्षात घ्यायला हवे. लोकांचाही तो अवतारी पुरुष किंवा धर्माची नव्याने स्थापना करणारा बारावा इमाम आहे ह्याची खात्री पटली. अकबर जी फळे वाटत असे ती लोकं प्रसाद म्हणून नेत. अकबर स्वत:च्या पायाचे तीर्थ आजारी लोकांत वाटत असे. अकबराने पैगंबराच्या अनेक कृतींना चूक ठरवले. पैगंबर स्वर्गात फिरुन आल्याची कथा ही खोटी असल्याने तो मौलवींना उघड बोलून दाखवू लागला. अकबराने १५८३च्या सुमारास गोवध बंदि केली. दाढी राखण्यावर त्याने चक्क बंदि आणली. बहुदा त्यामुळे हातभर वाढलेल्या दाढ्या गायब होऊन अकबराचा एकंदर दरबार "सटासट" दिसत असेल. ह्याच दरम्यान अकबर चक्क गंध लावून दरबारात येऊ लागला. कुत्रा व डुक्कर हे प्राणी साधे असून त्यांना अपवित्र वगैरे मानू नये असे जाहीर केले. त्याच्या आवडत्या कुत्र्याची त्याने चक्क कबर बांधली. अकबराने मुल्ला-मौलवींच्या डोक्यावरती फोडलेला बॉम्ब म्हणजे त्याने सर्व धर्मातील त्याला पटलेल्या व चांगल्या वाटणार्‍या गोष्टी एकत्र करुन १५८२ च्या सुमारास लाहोर मुक्कामी स्वत:चा "दिन-ए-इलाही" हा धर्म स्थापून स्वत:ला प्रेषित घोषित केले. तोवर जगभराच्या इस्लामच्या इतिहासात असला धार्मिक धरणीकंप झाला नव्हता. अर्थात त्याला हाताच्या बोटावरतीच मोजता येतील इतपतच अनुयायी मिळाले. अबुल फझलने अठरा लोकांची नावे नोंदवली आहेत. त्या धर्माची जबरदस्ती त्याने कुणावरही केली नाही. तो धर्म केवळ नोंदवला गेला व त्याच्या बरोबरच लुप्त झाला. अरे हो अजून एक! आयुष्याच्या एका टप्यावरती कधीतरी अकबराची गंगेवरती फार श्रद्धा बसली. त्याला पीण्यासाठी फक्त गंगेचंच पाणी लागे. अगदि स्वारीसाठी तो शेकडो किमी दूर असला तरी त्याच्यासाठी गंगेच्या पाण्याची खास सोय केली जात असे. तो हींदूप्रमाणे गंगेला पवित्र मानत असे. इस्लाममध्ये हा देखिल प्रकार नाही.


अकबर हा माणूस एकंदरच विचित्र होता. अकबरनामा नुसार त्याला लहानपणापासून अंधाराची भिती वाटत असे, तो आपल्या दोन मजली शाही तंबूच्या बाहेर पुरुषभर उंचीच्या मेणबत्या रात्रभर जाळत ठेवत असे. पहाटे फटफटलं की मग थोडावेळ झोपत असे. रात्रभर मशाली व शेकोट्यांच्या प्रकाशात विवीध खेळ, मल्लांच्या कुस्त्या, गायन,  आणि अगदिच हटके म्हणाल तर रात्रीबेरात्री बैल, हत्ती, कोंबड्या-कबुतर्‍यांच्या झुंझी वगैरे बघत बसे. असाच एकदा उधळलेला बैल त्याच्या अंगावरती येऊन अकबर जखमी झाला होता. पण त्याला एकंदरच पशु-पक्षांचा शौक होता. तो शिकार वगैरे करत असे पण त्याच बरोबर पकडलेल्या प्राण्यांच्या, पक्षांच्या - किड्यांच्या झुंजी ला्वत असे. काचेच्या पेटीत २ कोळी कींवा नाकतोडे सोडून त्यांची मारामारी व दुसर्‍याला पकडून खाऊन टाकणे वगैरे फार रस घेऊन बघत असे. हत्तींप्रमाणे त्याला कबुतरांचाही फारच शौक होता. उत्तमोत्तम जातींची कबुतरे त्याने जमवली होती. महालाच्या गच्चीत जाऊन ती कबुतरे उडवायचा छंदच होता त्याला. त्याने त्या छंदाला नावही एकदम रोमॅंटिक दिले - "इश्कबाजी." पारव्या-कबुतर्‍यांच्या एकंदरच "गुट्टरग्गुम" आवाजामुळे आणि एकमेकांशी चावटपणे वागण्याची पध्दत बघून त्याला हे नाव सुचले का हे कळायला मार्ग नाही.  हे असले प्रकार करणारा  विक्षिप्त अकबर न्यायदानाचे नियम मात्र काटेकोर ठेवी. भूक लागली असताना, न्यायदानाच्या आधीच दुसर्‍या कारणाने चीडचीड होऊन मग न्यायासनावर बसले असल्यास किंवा आधीच्याला कडक शिक्षा दिली असताना पुढल्या प्रकरणात लगोलग शिक्षा अथवा निर्णय न द्यायचा नाही असा नियम त्याने बनवला होता. कारण अश्या मनस्थितीत गरजेपेक्षा जास्त कठोर शिक्षा अथवा अविचारी निर्णय दिला जाऊ शकतो असे त्याचे तर्काला धरुन असलेले मत होते.


तर असा हा अकबर. अनेक पैलू असलेला विचित्र, विक्षिप्त आणि कधी कधी दिलदार असलेला. अकबरच्या राजकिय, सामाजिक, आर्थिक बाबी. प्रशासन, लढाया, कौटुंबिक कलह, त्याचे हत्तींवरील प्रेम वगैरेंवर एक एक लेख होईल. पण ह्यात थोडीशी राजकिय बाजू व मुख्यत: धार्मिक बाजू दाखवण्याचा उद्देश हा आहे. की बहुदा अकबर हा इस्लाममधील आजवरचा एकमेव "चार्वाक" असावा. उत्तर आयुष्यात त्याने अनेक कृतीतून मुल्ला-मौलवींच्या नाका कांदे लावावे लागतील असे निर्णय घेउन ते राबवले. सांगायचा मुद्दा हा की प्रत्येक धर्मात अधून मधून असले "चार्वाक" व्हायला हवेतच अन्यथा धर्ममार्तंड त्या-त्या धर्माचे डबके बनवतात.

मुस्लिम धर्मातला चार्वाक -" अकबर" .....  अकबराची ही बाजू जास्त उजळून दाखवणे सध्या गरजेचे आहे.


 - सौरभ वैशंपायन.

Thursday, June 9, 2016

श्री. म. माटे हे नाव महाराष्ट्राला नवीन खचित नाही. अस्पृष्यता निवारण चळवळ, साहित्य निर्मिती अश्या २ आघाड्यांवरती त्यांनी बरेच काम केले होते. १९४३ सालच्या महाराष्ट्र साहीत्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. त्यांच्या लेखनाचे २ खंड २००७ मध्ये देशमुख प्रकाशनाने प्रकाशित केले. त्यापैकी दुसर्‍या खंडात त्यांनी "अस्पृष्टांचा प्रश्न" असा एक दिर्घ प्रबंध लिहिला आहे. प्रचंड अभ्यास व स्वानुभवावरुन लिहिलेला हा प्रबंध असून पूर्वापार चालत आलेल्या बिनडोक रुढी परंपरांनी भारताचे कसे नुकसान केले ह्यावर त्यांनी अनेक स्मृतींमधले दाखले देऊन, अनेक बखरींमधले उतारे देऊन दाखवून दिले आहे. हा प्रबंध वाचताना मला महाराष्ट्रात अस्पृष्यांच्या परीस्थितीबाबत थोडेसे वाचायला मिळाले. अस्पृष्यांना गावगाड्य़ात अनेक हक्क असत असं ते म्हणतात. बिदरच्या बादशहाने एका महार घराण्याला एका गावची बावन्न हक्कांची हक्कदारी दिली असे ते नोंदवतात. ते ५२ हक्क कुठले हे शोधायची गरज आहे. महार - मांग ह्यांच्या हक्कांची नोंद पैठणच्या ब्रह्मवृंदांकडे जी निर्बंधपुस्तके असतात त्यात दिली होती. महार - मांग यांच्यातील हक्कांबाबतच्या तंट्यात पैठणच्या ब्रह्मवृंदाने त्याच निर्बंध पुस्तकांचा आधार घेउण तो तंटा सोडवला होता (म.इ.सा खंड २० लेखांक १७४) हे ससंदर्भ ते नमुद करतात.

पूर्वीच्याकाळी एखाद्या आरोपीला दिव्य करावे लागत असे. त्यात महाराच्या मताला बरीच किंमत असे. शाहु रोजनिशी नुसार शके १६६५ मधल्या फुरसुंगीच्या पाटिलकी बद्दल तंटा ऊभा राहीला. कामठे-बोराडे आणि गायकवाड ह्यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप झाले. कृष्णावेण्णा संगमस्थळी गोतसभा भरली. वादि-प्रतिवादी व येसनाक महार संगमाच्या पात्रात शिरले. दिव्य पार पाडताना येसनाकाने कामठ्यांना उजव्या हाताने बाहेर काढले व गायकवाडांना डाव्या हाताने. कामठ्यांना निम्मी पाटीलकी व वडिलकीचा मान मिळाला. गोतसभेने येसनाकाचा निकाल मान्य केला. इतकेच नव्हे तर खामगावात शिवेच्या हद्दिच्या वादात निळनाक महाराने आपला मान घेतला व तो जिथवर चालत गेला ती हद्द गावकर्‍यांनी मान्य केली (रा खं ६ पृष्ठ १११) ह्याचा अर्थ पिढ्यानपिढ्या जपून ठेवलेल्या माहीतीच्या आधारावर गावाची शिवारे ठरविण्याचा मान महारांना होता. बेलसर येथे नाव्ही व गरुड समाजात रहायच्या जागेच्या वाटणीवरुन झालेला कज्जा असाच महाराच्या डोईवरती देवीचा अंगारा व पांढरीचा भेंडा देऊन "नावियांची जागा पुरातन असेल तिथवर चालत जावे" असे ठरले व केलेला निवाडा मान्य केला.

१७६० मध्ये कर्ज निवारण्यासाठी पेशव्यांनी काही काळ कर्जपट्टी बसवली. त्याची वसूली महारांकडूनही होऊ लागली. नाणे मावळातील महारांनी एकत्र येऊन अर्ज केला की "आमच्याकडून अशी पट्टी आजवर घेतली गेली नाही सबब ह्यापुढेही घेतली जाऊ नये असा पेशजीचा करार आहे" पेशव्यांनी तात्काळ त्यांना सुट दिली. काही उध्वस्त झालेली गावे वसवताना गावकरी व बलुतेदारांबरोबर महारांना देखिल त्यात कायम केले. त्यासाठी शंभर रुपये कर्ज व पाच खंडी धान्य सरकारातून दिल्याची नोंद थोरले माधवराव रोजनीशीत आहे. (पृ ३५). जमिनीची पहाणी करुन सरकारने आकारलेल्या करातून महारांना दरशेकडा रुपये ५ ची सुट दिल्याची नोंद तसेच मौजे कळंबी प्रांत मिरज येथील एका गाववरतीच जप्ती आणली पुढे चौकशी अंती तो गाव राजनाक वल्लद काळनाक महाराकडे पूर्वीपासून असून तो हुजुर चाकरी करतो हे समजतच गावचा मोकासा व महसून त्याकडे परत केला आणि गाव जप्तीतून मोकळी केली (थो. मा. रो. भा १ पृष्ठ ३१० नोंद क्रमांक ३४०). पाली गावच्या भोयी महारास सरकारचा अधिकारी म्हणून कुलकर्णी, खोतपाटीलांसारखाच गावठाण माफ केल्याचे नानासाहेबाच्या रोजनीशीतील उल्लेखात कळते (रो भा पृ २०३). पंढरपुरात राडिचा खेळ होत ती जागा खणून तयार करायचा मान महारांचा असे. एका वर्षी बडवे तो खणू लागताच तंटा ऊभा राहीला व सवाई माधवराव रोजनीशी भाग ३ पृष्ठ २८५ नुसार निकाल महारांच्या बाजूने देऊन बडव्यांना सख्त ताकिद केली. १७८९ मध्ये कात्रज गावानजिक महार, चांभार व मांग समाजाची वस्ती होती ती. काही कारणाने मोडावी लागली. लगोलग हुजुरातीतून २५१ रुपये आणि ३०० वासे नवीन घरे बांधण्यासाठी दिल्याचे सवाई माधवराव रोजनिशी ३-२८६ नुसार स्पष्ट होते.

महारांकडे गावच्या रक्षणाचे काम असे. शके ९७३च्या सूडी मधील कानडी शिलालेखात तराळांचा उल्लेख आहे व हे गावाचे चोर - दरोडेखोरांपासून रक्षण करणारे तराळ मुख्यत: महार असत असे माटे म्हणतात. गावकीच्या भांडणाचे निकाल होत त्यात महार, मांग व चांभारांच्याही सह्या होत व निशाणी म्हणून महाराची काठी, मांगाची दोरी व चांभाराचा इंगा अश्या निशाण्या असत. असे महजर बरेच मिळतात. हुजुरपागेत बिगार म्हणूनही काम असे. आरमारात चांभांरांची नेमणूक होत असे. पुणे, राहुरी, खेड, संगमनेर, जुन्नर, पारनेर, नेवासे, कर्डे, बेलापूर, गांडापूर ह्या ठिकाणी ३१३ महार, ५४ मांग, ५२ चांभार हुजुरकामी असल्याचा उल्लेख नानासाहेबांच्या रोजनीशीत आहे. तसेच हुजुरपागेत २७७ महार राबते म्हणून होते. राणोजी भोसल्यांकडे यांच्या पागेत असेच महार होते. लढाईत जखमी माणसाला परत पिछाडिवरती आणायचे काम महार करत. (सवा माध रो भा १-४३) इ.स. १७७८ मध्ये तळेगावाहुन लष्करातील जखमी लोकांना पुण्यास हलविण्यासाठी महारांचेच पथक होते (सवा माध रो भा २ पृ ४३). वसईच्या मोहीमेत अतिशय उत्तम पोहोणारे "पेटेकरी" हे महार - मांग होते. त्यावेळी महत्वाची माणसे, पत्रे वगैरे पाण्यातून एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहोचविण्याचे जोखमीचे काम ह्याच बहाद्दरांनी केले (पे.द. ३-२०९). देहू, बांबुर्डी, भिमथडी, नागेवाडी-सातारा, भांबुर्डे अश्या अनेक ठिकाणची पाटिलकी देखिल महारांकडे होती. जंजिरा मोहिमेत सिद्दी सातच्या बाजूने कोंडनाक महार लढत होता अशी नोंद ब्र.स्वा चरीत्रात आहे. त्याची नावासकट नोंद घेतली आहे म्हणजे कोंडनाक सिद्दीकडील महत्वाचा माणूस असणार. याखेरीज पेशवे सनदा १७- ३०४ नुसार महारांचे "हुलस्वारांचे पथक" असे.बहुदा शत्रुला हुल देऊन दुसरीकडे लक्ष वळविण्याचे काम हे पथक करीत असावे असे नावावरुन दिसते.

तसेच एका पाटिलकीच्या प्रकरणात भांडण राजाराम महाराजांपर्यंत गेले. राजाराम महाराजांनी दावा सांगणाअर्‍या महारांनी वैराटगड जिंकून दाखवायचे "दिव्य" करावे आणि बागेवाडीची पाटिलकी मिळवावी असे ठरविले. महारांनी मोठ्ठा पराक्रम करुन वैराटगड स्वराज्याला परत मिळवून दिला व ती पाटिलकी मिळवली. माटे गुरुजींनी एक घटना दिली आहे परंतु संदर्भ दिला नाहीये - खर्ड्याच्या लढाईत शिवनाक महाराचे पथक होते. हा तांसगावकडील कळंबी गावचा वतनदार. शिवनाकाचा तळ इतर ब्राह्मण आणि मराठा सरदारांच्या शेजारी पडला. लोकांत कुरकुर सुरु झाली. ती सवाई माधवरावांपर्यंत आली. त्यावेळी बैठकीत पाटणकर म्हणून वृद्ध सरदार होते. ते कडाडले - "ही तलवार बहदूरांची पंगत आहे येथे विटाळचांडाळ काही नाही!" श्रीमंतांनी तोच निकाल दिला. शिवनाकाचे पथक तिथेच सारख्याच मानाने राहीले. वसईच्या मोहीमेत तुकनाक महाराने मांडवीजवळील मोर्चे उत्तम रीतीने सांभाळले. त्याचा सन्मान करताना पेशव्यांनी कंठी-तोडे देऊन गौरव केला. आबा चांदोरकरांनी पेशवे काळातील तब्बल ४४ महार पथकदारांची नावे प्रसिद्ध केली होती - १) आपनाक २) उमनाक ३) उपनाक ४) कालनाक ५) कासनाक ६) कुसनाक ७) केरनाक ८) खंडनाक ९) गोमनाक १०) गोंदनाक ११) चांगनाक १२) चिमणनाक १३) चिडनाक १४) जाननाक १५) झुकनाक १६) तुकनाक १७) दमेनाक १८) दसनाक १९) दादनाक २०) देवनाक २१) धावनाक २२) धूळनाक २३) धोंडनाक २४) नागनाक २५) पदनाक २६) पुजनाक २७) बदनाक २८) बाणनाक २९) माळनाक ३०) मायनाक ३१) मेघनाक ३२) येमनाक ३३)येसनाक ३४) रामनाक ३५) राजनाक ३६) राणनाक ३७) लाहालानाक ३८) वामनाक ३९) सटवानाक ४०) संभनाक ४१) सिवनाक ४२) सुकनाक ४३) सुबनाक ४४) सिदनाक

ह्यावरुन इतके नक्कीच उघड आहे की पेशव्यांवरती जो जातीभेदाचा सरसकट आरोप केला जातो त्याला ऊभा छेद देणारे हे संदर्भ आहेत. उत्तर पेशवाईत महारांच्या गळ्यात मडके आणि कंबरेला खराटा बांधला जात असे ह्याला एकही समकालिन पुरावा ऊपलब्ध नाही. तशी काही प्रथा असती तर किमान एक लिखित पुरावा अगदि सहज मिळाला असता तो देखिल इंग्रजांच्या जवळच्या काळातील. इंग्रज अथवा परकियांकडूनही एकही ओळ ह्यावर लिहीली गेली नाही. त्याकाळातील समाज सुधारकांकडून असे काही लिखाण उपलब्ध नाही. ह्या सगळ्या ऐकिव गोष्टी आहेत व एकाचे दोघांना दोनांचे चारांना करत पसरलेले आहे.
लेखनसीमा।

- सौरभ वैशंपायन

=============
संदर्भ -
१) निवडक श्री. म. माटे : खंड २
२) पेशवे थोरले माधवराव रोजनीशी