Saturday, October 29, 2011

गंध

गेल्या महिन्यात घरी रंगकाम चालू होतं, मला तो रंगाचा विशिष्ट वास फार आवडतो. दमेकरी लोकांना त्रास होतो म्हणून आजकाल स्मेललेस - गंधरहित रंग येतात. ज्यांना त्रास होतो त्यांच ठिक आहे, पण आठवडाभर घरात तो नव्या कोर्‍या पेंटचा वास आला नाहि तर रंगकाम झालय हे डोळ्यांना दिसलं तरी मनाला पटत नाहि. काहितरी कमी आहे असं वाटत राहतं.

"गंध" हि सजिवांना मिळालेली किती सुंदर गोष्ट आहे? विचार करता करता लक्षात आलं कि आपलं रोजचं आयुष्य सुध्दा किती गंधाळलेलं आहे. किती म्हणून गंध मोजाल? नव्या कोर्‍या पुस्तकांचा तो विशिष्ट वास? आणि नव्या दप्तरचा, छत्रीचा, रेनकोटच्या रबराचा किंवा प्लास्टिकचा नवा नवा वास .... शाळेत असतानाचा जूनचा सुरु झालेला पाऊस आणि या सगळ्यांचा एकत्रीत गंध मी कधीच विसरु शकत नाही.

पावसावरुन आठवलं उन्हाने रापून तडे गेलेल्या जमीनीवर पहिल्या सरी पडल्या कि वातावरणात एक सुखावणारा मातीचा गंध पसरतो. त्या वासाला दुसर्‍या कशाचीहि सर नाहि, कॉम्पिटिशन तर नाहिच नाहि. का ते माहित नाहि पण कालिदासाच्या मेघदूताचे नाव निघाले कि आपसूक हा गंध नाकाजवळ पिंगा घालतो, स्वर्गिय काव्य तितकाच स्वर्गिय गंध त्यामूळेहि असेल कदाचित. तो मातीचा वास अंगभर माखून घ्यावासा वाटत राहतो.

डोंगर दर्‍यात व त्यातुनही दाट जंगलातून फिरताना तुडवल्या गेलेल्या रोपट्यांचा - गवताचा एक टिपिकल वास आपली सोबत करत असतो. पावसाळा असेल तर पचपचीत झालेल्या ट्रॅकपॅन्टला गुडघ्यापर्यंत तोच वास असतो. त्याच डोंगर दर्‍यांतल्या गुहांमध्ये - लेण्यांमध्ये रात्र काढा कधीतरी, वटवाघुळांनी - पाकोळ्यांनी भरलेल्या त्या गुहांतला तो उग्र दर्प किंवा सरळ दुर्गंधच म्हणायला हरकत नाहि, छातीभरुन श्वास घेऊच देत नाहि. हां नाहि म्हणायला गड किल्यांवरच्या मंदिरात जिथे गावकरी नेमाने दिवा-बत्ती करतात तिथे तेलाचा, खांबांना पुसलेल्या शेंदुराचा मिक्स वास असतो. त्या वासानेहि अंधार्‍या रात्रीत आपसूक सुरक्षित वाटतं.

हे झालं डोंगर दर्‍यांच, पण प्रत्येक गावाला - शहराला स्वत:चा गंध असतो. एप्रिल महिन्यात कोकणात एखाद्या आमराई जवळून संध्याकाळी चक्कर मारा बरं. आंबेमोहराचा घमघमाट आणि कोकण हे समिकरण डोक्यात कसं आपोआप फिट्ट बसेल. किंवा एखाद्या गोठ्याजवळून जाताना शेण - गवत यांचा एक थंडगार गंध परत परत घेत रहावासा वाटतो. उन्हाळ्याच्या दिवसात, सकाळिच शेणाने सारवलेल्या पडवीत करकरणारी काथ्याच्या दोर्‍यांची खाट, त्यावर जाडं भरडं कांबळ टाकून रात्री तारे मोजत मोजत झोपण्यातलं सुख अवर्णनिय आहे. ते सुख जितकं मोकळ्या आकाशाखाली झोपण्यातलं असतं तितकच नकळतपणे त्या सारवलेल्या अंगणाचा येणार्‍या गंधाच देखिल असतं.

प्रत्येक घराला, घराच्या प्रत्येक खोलीला, खोलितल्या कपटांना आपापला गंध असतो. आवरण्याच्या निमित्ताने जुनी पेटि उघडली कि त्यातुन विशिष्ट गंध येतो. तो गंध केवळ त्या वस्तूंचा नसतो .... आठवणींचा देखिल असतो. जुने - लहानपणीचे कपडे, फोटो, मळक्या किंवा मोडक्या तरीहि हव्याहव्याश्या वाटणार्‍या - न टाकवणार्‍या बाहुल्या किंवा खेळणी. त्यांचा ठेवणीतला वासच फार लाडिक असतो, म्हणजे, कामात डोकं घालुन बसलं असताना कोणीतरी छोट्या छोट्या हातांनी मागुन गळ्याला मिठी मारावी आणि बोबडं बोबडं "चल ना लेऽऽऽ खेलूया आपन!" असं म्हणाव ....  कि टाकायला म्हणून काढलेल्या जवळपास सगळ्या गोष्टि परत तश्याच त्या पेटित जातात.

अजून एक सुखावणारा प्रसन्न वास म्हणाजे सणासुदिच्या दिवशी किंवा घरात शुभ कार्य असताना स्वयंपाक खोलीतून येणारा अन्नाचा एक विशिष्ट मिश्र वास. एरवी कधी तेच सगळे पदार्थ जसेच्या तसे केले तरी "तो" गंध इतर दिवशी नाहि येत हेहि खरआहे. खास करुन मसाला उदबत्तीची सुगंधी वलय पंक्तीत आजूबाजूला तरंगत आहेत, पानात वरण-भात-साजूक तूप, केळं घालून केलेला नैवेद्याचा शीरा किंवा खीर, बटाट्याची भाजी, डाळिंबीची उसळ या दोन - चार पदार्थांचा मुख्य व त्यात कोशिंबीरी, पातळ भाज्या, लोणची यांचा "मी पण! मी पण!!" करत मिसळला गेलेला सुगंध ... वा (.... मी खुलासेवार वर्णन करत अजून नाही लिहू शकत कारण मला भूक लागायला सुरुवात झालीये आता!). म्हणजे आधी गंधाने, मग डोळ्यांनी व त्यानंतर जीभेने अन्नाची चव घेतली जाते.

गंध नसता तर अनेक सुखांना मुकलो असतो. Anosmia नावाचा आजार असलेल्यांची गंध घेण्याची जाणीव कमी कमी होत जाते, अश्यांची नंतर काय घुसमट होत असेल? मध्ये "गंध" याच नावाने एक मराठी चित्रपट आला होता त्यात HIV बाधीत व्यक्तीची भूमिका मिलिंद सोमणने उत्तम वठवली होती त्यात त्याच्या गंध घेण्याच्या ताकदीवर परीणाम झाला असतो त्यातली मनावर सर्वात जास्त ओरखाडा काढणारी गोष्ट म्हणजे त्याची बायको (सोनाली कुलकर्णी) न्हाऊन आल्यावर तो तिच्या ओल्या केसांचा गंध घेत असतो पण तो गंध न आल्यावर त्याने दाखवलेली बेचैनी आतवर बोच लावणारी आहे. या उलट तसाच चित्रपटातला संदर्भ पण सुखद शेवट करणारा म्हणजे "श्वास" चित्रपटाचा शेवट, कोकणात आपण आपल्या गावात आलोय हे अंध झालेल्या छोट्या्या परश्याला तो आपल्या गावाचा ओळखीचा हवाहवासा वाटणारा गंध छातीभर भरुन घेतल्यावर समजते, त्यावेळच्या त्याच्या आनंदाने वाजविलेल्या टाळ्या आपल्याहि चेहर्‍यावर आपसूक आश्वासक हसू आणतात.

एकदा विचार करुन बघा आपलं आयुष्य या गंधांनी किती सुखकर बनवलय. चार दिवस घरा बाहेर असाल तर घराचं दार उघडल्यावर आधी मनभरुन घराचा ऊबदार गंध घ्या, घर त्यानेच तुमचं स्वागत करेल. जेवण झाल्यावर एकदा नॅपकिनला हात - तोंड पुसण्या ऐवजी कधीतरी घरातल्या आजी, आई, मावशीच्या पदराला तोंड पुसा, तो गंध साठवून घ्या.

तसा शैक्षणिक दृष्ट्या  "ढ" असल्याने आजवरच्या आयुष्यात दुसरं काहिहि नसेल पण मी एक गोष्ट शिकलोय, रंग आणि गंध या दोन गोष्टि फार सुंदर आणि हळव्या असतात तुम्हि त्यांना जितका जीव लावाल तितकच ते तुमचं आयुष्य रंगीत करतील -  गंधाळलेलं करती. क्वचित तो गंध दु:खाचाही असेल, वादळि रात्रींचा अनामिक सुगंध देखिल असेल. पण तो गंध खरा असेल, निर्मळ असेल ..... अगदी एका हातात मोर्चेल घेऊन दुआ देत फिरणार्‍या फकिराच्या त्या धुपाटण्यातल्या गंधा इतकाच.

 - सौरभ वैशंपायन.

Saturday, October 8, 2011

के मरके भी किसी को याद आएंगे ….






तो रोज सकाळि उठल्यावर आरश्यात स्वत:च्या प्रतिबिंबाला विचारायचाआज तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असल्यास तू जगाला काही नविन देणार आहेस का?” याचं उत्तर सलग काही दिवस नकारार्थि आलं कि तो बेचैन व्हायचा. आणि मग झपाटल्यागत काहितरी शोधायचा. आणि मग काही महिन्यांनी त्याच्याच नव्हे तर जगभरातीलटेक्नोसॅव्हिलोकांच्या आयुष्यात एक अभूतपूर्व असा मोठा दिवस उगवायचा …. परवा स्टीव जॉब्जच्या आयुष्यातला खरच शेवटचा दिवस होता …. पण त्याने आजवर लोकांना जे काही दिलं ते संपूर्ण उमजायलाच अजून काहि वर्ष जातील. जाण्याआधी सुध्दा स्टीव तू आंम्हाला कधीही संपणारी स्वप्न दिलीस, आम्ही अजून काय अपेक्षा ठेवाव्यात?
ह्याला स्वादुपिंडाचा कर्करोग आहे, हा पुढच्या सहा महिन्यांचाहि पाहुणा नाहिये!” हे डोळ्यात पाणी आणून जगातील नामांकित डॉक्टरांपैकि एकाने सांगितल्यावर ह्या पठ्याने सहा महिने सोडा …. तब्बद दहा वर्षे मृत्युशी पैजा लावल्या आणि त्या जिंकत आला. रोज सकाळि तो प्रतिबिंबाच्याच नाही तर मृत्युच्या डोळ्यात डोळे घालुन विचारायचाआज शेवटचा दिवसबोल नविन काय देणार?” हे करायला जिगर लागते. ती स्टिवकडे अर्थात होती. स्टिव तू आमचा हीरो होतास आणि राहशील.

स्टीवबद्दल गेले दोन दिवस टिव्ही, इंटरनेट, वर्तमानपत्र सर्वत्र “सबकुछ” येतय. त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सगळं काही. नविन काही सांगावं असं दिसत तरी नाहीये. पण आमची पिढी २ सफरचंदांची गोष्ट कधीच विसरु शकणार नाही. एक म्हणजे झाडावरुन न्यूटन नामक महाभागाच्या टाळक्यात पडलेलं ते सफरचंद (आणि त्याच्यामुळे शाळेत डोक्याला ताप करुन ठेवणारे गुरुत्वाकर्षणाचे नियम. …तो नारळाच्या झाडाखाली का बसला नव्हता हा त्यावेळचा माझ्या डोक्यातला पहिला विचार होता!) आणि दुसरं एका बाजूने एक चावा घेतलेलं “Apple” चं सफरचंद.
लोकं झाडाचं बी लावून त्याची फळ घेतात, ह्याने त्या अर्ध्या खाल्लेल्या सफरचंदासकट स्वत:ला अविश्रांत मेहनतीत गाडून घेतलं आणि नंतर त्या झाडाला येणारी फळ कल्पनेबाहेर रसाळ होती. 

फळांनी लगडलेल्या झाडालाच लोकं दगड मारतात हा न चूकणारा नियम आहे. तसे याच्याहि बाबतीत घडले. ज्याला पेप्सीतून आपल्या कंपनीकडे बोलावताना “आयुष्यभर गुळचट पाणी विकण्यापेक्षा माझ्या बरोबर येऊन अजून काहीतरी चांगलं कर!” हे सांगितलेल्या भागिदारानेच अंतर्गत सत्तास्पर्धेत स्टीव्हला बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरा कोणी असता तर हाय खाल्ली असती पण “नकोसा होणं” ते “हवाहवासा वाटणं” हा प्रवास तो जन्मल्या क्षणापासून ते आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्यांवर तो करत आला होता. त्याने पिक्सर हि नविन कंपनी स्थापन केली, वॉल्ट डिस्ने सारख्या जगप्रसिध्द कंपनीबरोबर भागीदारी करुन जगातली पहिली संपूर्ण अनिमेटेड फिल्म “टॉय स्टोरी” बनवली. वॉल्ट डिस्नेच्या संचालक मंडळात जाऊन बसला. या सगळ्यातून परत नवं विश्व उभं केलं, आणि परत त्याच Apple  कंपनीत ताठ मानेनं भागीदार म्हणून प्रवेश केला. हे सगळं केवळ आत्मविश्वासावर कमावलं होतं. त्याची प्रतिभा व मॅनेजमेंट स्किल्स काय होती हे US मध्ये दाखल केलेल्या ३३८ पेटंटमध्ये स्टीव्ह फाउंडर किंवा को-फाउंडर आहे हे जाणून घेतल्यावर समजते …. याहुन अधिक सांगणे न लगे.


साधारण १९७४-७५ ची गोष्ट असेल, मन:शांतीच्या शोधार्थ स्टीव्हने भारताची वारी केली. जाताना तो परत गेला ते बुध्द धम्म स्वीकारुन आणि बरोबर भारतीय अध्यात्मिक विचार घेऊनच. त्याच्यावरच्या या विचारांचा पगडा त्याने स्टॅनफोर्ड विश्वविद्यालयात केलेल्या भाषणात दिसून येतो. त्याने मृत्यू विषयी मांडलेले तत्वज्ञान भारतीय अध्यात्माच्या फार जवळचे आहेत. स्टीव्हला एक उत्तम उद्योजक म्हणून कल्पनातीत लोकप्रियता मिळालीच पण लोकांना तो आवडायचा त्याच्या नवनवीन, अफाट आणि तंत्रज्ञान जगताला एका रात्रीत बदलून टाकणार्‍या कल्पनांमुळे. लोकांना तो आपला वाटायचा, त्याच्या प्रोडक्टमध्ये त्याने “I” ठेवला होता. “I-Phone”, “I-pod”, I-pad” असं म्हंटल्यावर  “माझं गॅजेट” म्हणून लोकांना आपसूक त्या प्रोडक्ट विषयी आपलेपण वाटायचं. एक यशस्वी संशोधक म्हणून जगलेल्या स्टीव्हने मृत्युला इतक्या जवळून बघितले होते कि मृत्युमध्ये सुध्दा त्याला शोधच दिसला, त्या स्टॅनफोर्ड मधील भाषणात तो म्हणाला होता – “death is very likely the single best invention of life” ….. आपला स्टीव्ह कसल्याश्या नविन शोधा करता फार दूर निघून गेलाय. माझ्या Appel I-POD वरती गाणी ऐकताना मला राहून राहून “अनाडि” चित्रपटातील एका गाण्याच्या दोन ओळी आठवत आहेत – “के मरके भी किसी को याद आएंगे, किसीकि आसूओ में मुस्कुराएंगे …. जीना इसीका नाम है।“

 - सौरभ वैशंपायन.