Saturday, January 14, 2012

"गुरुदक्षिणा"

कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति,
तसे मराठे गिलिचे साचे कलित लढ़ले पनिपति॥


- १४ जानेवारी १७६१, राष्ट्रावरचं संकट मराठ्यांनी आपल्या छातीवर झेललं. मराठे गिलच्यांविरुध्द एकाकि झुंझले. अभिमन्यूप्रमाणे झुंझत झुंजत देह ठेवला. उभ्या भारतातून एक हरीचा लाल मराठयांबरोबर पाय रोवून पानिपतात उभा राहिला नाही. मराठ्यांनी पाय गाडून युध्द केलं. रक्त मांसाचा चिखल झाला. मराठ्यांचा भावी पेशवा मारला गेला. पुण्यातल्या प्रत्येक घरातला एक जण तरी पानिपतावर कापला गेला. "दो मोती गलत, दस-बीस अश्राफात,
रुपयों
की गिनती नही|"
पण माझ्या दृष्टीने पानिपतावरती झालेला पराभव हा खरा पराभव नाही. कारण १८व्या शतकाच्या शेवटि तब्बल १४ वर्ष लाल किल्यावरती "भगवा" फडकत होता हा इतिहास आहे. मराठ्यांनी दिल्लीची वजीरीच नव्हे जर सगळी दिल्लीच पुन्हा मांडिखाली दाबली हा खरा इतिहास आहे. महादजी शिंद्यांनी एकेका रजपुताला सुटा करुन करुन पिदवला हा खरा इतिहास आहे,  "गढ मै गढ चित्तोड गड बाकि सब गढियॉ।" म्हणून लैकिक मिळवलेला किल्ला जवळपास वर्षभर लढल्यावर आणि डोळे पांढरे व्हावेत इतका तिखट प्रतिकार झाल्यावर ’महान’ सम्राट अकबराला मिळाला होता ..... मराठ्यांनी बोल - बोल म्हणता तो १८ दिवसांत जिंकला होता हा खरा इतिहास आहे. नजिबाचा नातू "गुलाम कादिर" याने "अली गोहर" बादशहाला आंधळे केल्याबद्दल व बादशाहाच्या कुलातील स्त्रीयांना भर दरबारात नग्न केल्याची शिक्षा म्हणून मराठ्यांनी त्याला टाचेकडून मानेकडे जिवंत सोलून ठार मारला होता व नंतर दिल्लीच्या लाहोरी दरवाज्याजवळ ३ दिवस टांगून ठेवला होता हा खरा इतिहास आहे. पानिपताला जबाबदार असलेल्या नजीबाची कबर मराठ्यांनी सुरुंग लावून उडवून दिली हा खरा इतिहास आहे..
म्हणूनच म्हणतोय खरा पराभव पानिपतावर नव्हे तर इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात झालाय, पुस्तकांच्या पानांवरती झालाय. दुसर्‍या महायुध्दातील दोस्तांच्या डंकर्कच्या पळपुटेपणाला कौतुकाने माना डोलावून "यशस्वी माघार" म्हणणारे मात्र पानिपतावर देह ठेवून राष्ट्र वाचवणारे पराभूत झाले असं म्हणतात तेव्हा त्यांची किव येते.
आज अडिचशे वर्षानी त्याच्याकडे बघताना केवळ "पराभव" म्हणून न बघता "गुरुदक्षिणा" म्हणून बघा. मराठ्यांनी शिवछत्रपतींना दिलेली "गुरुदक्षिणा". राष्ट्रावरचं संकट आपल्या छातीवर घ्यायची संथा त्या महामानवाने मराठ्यांना दिली होती. त्या संथेची गुरुदक्षिणा म्हणजे "पानिपत".
 - सौरभ वैशंपायन.

Thursday, January 12, 2012

... प्रसंगी अखंडित वाचित जावे॥




माझं सर्वात आवडतं स्वप्न म्हणजे घराची एक भिंतभर एक छान सुटसुटित कपाट आहे आणि ते कपाट भरुन मराठी - हिंदि - इंग्रजी भाषेतील शेकडो विषयांवरची हजारो उत्तमोत्तम पुस्तकं आहेत. हाताशी भरपूर वेळ आणि गरमा गरम कडवट - कडक कॉफिचा वाफाळता कप आहे. मग उठुन सावकाश एक एक पुस्तक न्याहाळत पुढे सरकत एखादं सुंदरसं पुस्तक काढून निवांत वाचत बसलोय. सुऽऽख! अर्थात अजून तरी हे "स्वप्नच" आहे. भिंतभर कपाटहि नाहिये व तितकि पुस्तकही नाहियेत. पण खरच उत्तम पुस्तकं विकत घेणं हि माझ्यासाठी 'गुंतवणूकच' आहे. कधीतरी मॅजेस्टिक किंवा राजहंस प्रकाशनाच्या दुकानात चक्कर मारली, कि, हवी ती आणि हवी तितकि पुस्तकं घेण्यासाठी आपल्याकडे तेव्हढा तगडा बॅंक बॅलन्स सध्यातरी नसल्याचे अपरंपार दु:ख होते. खरंच, मागे एकदा माझ्या मावशीने म्हंटलं तसं पुस्तकांसाठी बॅंकेने कर्ज द्यायला सुरुवात केली पाहिजे, मी लग्गेच अर्ज करुन भरपूर कर्ज काढीन.
पहिल्या पावसानंतर मातीला जो बोलका घमघमाट सुटतो ना? तितकाच मला नव्याकोर्‍या पुस्तकाचा गंध आवडतो. नविन पुस्तक घरात आणलं कि पहिलं काम म्हणजे त्यावरती नाव, विकत घेतल्या दिवसाचा दिनांक टाकणे आणि त्याला प्लॅस्टिकचं कव्हर घालणं. उत्तमोत्तम पुस्तक वाचणं त्यांचा संग्रह करण्या इतकच त्यांना कव्हर्स घालणे हे सुध्दा माझं आवडिचं  काम आहे. म्हणजे आई आपल्या लहान मुलांना कपडे घालते ना? तितकच लडिवाळ काम आहे हे. आणि पुस्तक खराब होऊ नये म्हणून कव्हर घालणं जितकं महत्वाचं असतं ना? तितकच ते पारदर्शक असणं मला गरजेचं वाटतं, पुस्तकाला मुखपृष्ठ - मलपृष्ठ असतात त्यांची मांडणी हि देखिल एक सुंदर कला आहे. पुस्तकाला पारदर्शक कव्हर घातलं नाहि तर त्याची मांडणी करणार्‍या कलाकाराच्या कलेला हेटाळल्यागत - दुर्लक्षित केल्यागत होतं. अनेकदा मी दुसर्‍या कोणाची चांगली पुस्तकं वाचायला आणली असतील तर परत देताना त्याला कव्हर नसेल तर छान कव्हर घालून देतो [बघा... विचार करा,  कोण कोण उत्तम पुस्तकं वाचायला देताय मला? :-D ].

अर्धाधिक लोकं पुस्तक ज्याप्रकारे वापरतात ना? ते बघून डोकं फिरतं. मुख्यत: वाचून झालेली खूण म्हणून जी लोकं पुस्तकाचे कोपरे दुमडतात [काहि महामुर्ख लोकं चक्क "अर्ध" पान दुमडताना मी स्वत: बघितली आहेत .... मेंदूला कमी सुरकुत्या असण्याचे लक्षण आहे हे! x-( ]  ना? ती लोकं अत्यंत बेशिस्त वाटतात मला. मग भले इतर गोष्टित कितीहि हुशार व टापटिप असोत. मुक्या जनावरांना विनाकारण मारणारे आणि पुस्तकांचे कोपरे दुमडणारे एकाच रांगेतले आहेत माझ्यासाठी.  खरंतर २०० पानांपेक्षा जाड असलेल्या पुस्तकाला स्वत:चा बांधणीतल्या  दोरीचा बुकमार्क हवा अस  माझं वैयक्तिक मत आहे.  तरी पुस्तकं म्हंटली कि पुस्तकासाठी मग आपोआप बुकमार्क्स ओघाने आलेच. विकत घेतलेले, भेट म्हणून मिळालेले, घरीच बनवलेले असे बरेचसे बुकमार्क्स आहेत माझ्याकडे. स्टॅम्प जमविण्याबरोबरच बुकमार्क्स देखिल जमवतोय आजकाल.

आजी मला अजूनहि पुस्तकांचा  एक श्लोक नेहमी ऐकवते -

"जलात् रक्षेत्, तैलात रक्षेत्। रक्षेत शिथिलबंधनांत्।
मूर्ख हस्ते न दातव्यम्। एवं वदती पुस्तकम्।"

हा श्लोक ऐकतच मोठा झालो असेन किंवा घरातली इतर माणसे पुस्तके कशी वापरतात ते बघूनहि असेल, पण पुस्तकांना जपायला शिकलो. खरंतर कुठलेहि पुस्तक एका बाजूने दुमडले आणि वाचतोय हे मला आवडत नाहि, पण निदान १०० पानी पुस्तकांपर्यंत हे ठिकहि आहे त्याहुन जाड पुस्तक दुमडलं, किंवा त्याच्या मुखपृष्ठाची - मलपृष्ठाची ’भरतभेट’ घडवून आणली कि टाळकंच सरकतं माझं. डोळ्यांच्या काळजीसाठी  झोपुन वाचणे चूकच आहे, पण कधीतरी बाहेर छान पाउस पडत असतो हवेत मस्त  गारवा आला असतो अश्यावेळी उबदार पांघरूण घेऊन वाचत पडण्याचा स्वाभाविक मोह होतोही. कधीकधी अगदी शेवटची १०-१२ पानं उरली असतात डोळ्यांवर झोपहि असते पण पुस्तक सोडवत नसतं अश्यावेळि लोळत पुस्तक वाचलं जातं. तरीहि   २५०-३०० पानी पुस्तक असेल तर ते झोपून वाचणे टाळतोच. अश्याने त्याची शिलाई उसवते. ती खिळखिळी होतात आणि त्याची पाने ग्रीष्म ऋतुत झडल्यागत होऊन काहि दिवसांत पुस्तक "निष्पर्ण" होण्याची भीती असते.  मग उरलेल्या २ पुठ्यांनी हवा घेत बसावे लागते.

काहि लोकांना खात - खात वाचायची सवय असते. पुस्तक चांगलं असेल तर क्वचित मी सुध्दा ती चूक करतो, पण खाताना पुस्तक असलंच तर ते डाव्या गुडघ्याजवळ ठेवून वाचतो म्हणजे त्यावर काहि सांडायची भीती नसते. तसेच काहि पराकोटिच्या अभ्यासू लोकांना पुस्तकावरतीच "नोट्स" काढायची सवय असते. एकतर पुस्तकावर मला माझं किंवा कोणाचंहि नाव सोडून दुसरा ठिपकाहि आवडत नाहि आणि काहि विद्वान पेनाने चक्क त्या परीच्छेदाच्या वर - खाली आजूबाजूला गिचमिड गिचमिड करत काहितरी लिहुन ठेवतात किंवा फरा - फरा रेषा मारतात. विशेषत: वाचनालयातून आणलेल्या पुस्तकांवर हे अत्याचार हमखास झालेले दिसून येतील. दहावीला - बारावीला देखिल जिथे वर्गात पुस्तकावरती खूणा करुन ठेवा असं शिक्षक सांगत तिथेहि मी पेन्सीलने खूणा केल्या होत्या व खोटं वाटेल पण एक -दोन पुस्तकांवरच्या त्या खूणा परीक्षा झाल्यावरती मी इमाने - एतबारे रबराने खोडल्याचंहि मला आठवतय.

 पुस्तकाला - ग्रंथांना जवळच्या मित्रासारख प्रेमाने किंवा घरातल्या वृध्द माणसासारखं आदराने वागवलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. मुक्याने कितीतरी बोलत असतात ती आपल्याशी. लक्ष दिलं नाहीत तर बिचारी निमूट पडून रहातात. त्यांना वेळिच खायला घाला, एकदा तरी बाहेर फिरायला न्या अशी मुक्या पाळीव प्राण्यासाठी करावे लागते तसेही काही नसते. मात्र दोन - चार महिन्यातून एकदा धूळ झटकावी (आता पुस्तकं वापरात असतील तर ती देखिल बसत नाहि), वाळवी लागू नये म्हणून कपाटाच्या कोपर्‍यात चार डांबराच्या गोळ्या सरकवाव्यात इतपत केलं कि झालं. फार अपेक्षा नाहित.

मी काहि इतरांना ग्रंथपालाचा कोर्स करा असं म्हणत नाहिये, (त्यात पुस्तकांची काळजी कशी घ्यावी यावरच पुस्तकं असतात.) पण इतपत जपणूक केलीत तरी हेहि नसे थोडके. असो.... तर .... मी जेव्हा माझं नवीन घर बांधीन ना? तेव्हा एक मोठी भिंत भरुन कपाट तयार करुन घेईन आणि त्यात शेकडो विषयांवरच्या हजारो उत्तमोत्तम पुस्तकांचा संग्रह करीन.  मग एखाद्या दिवशी आराम खुर्चीतच "चचलो"  तरी पुलंच किंवा इतिहासाचं एखादं सुंदरसं पुस्तक माझ्या छातीवर  पालथं ठेवलेलं असेल. फक्त ते श्वासानी वर खाली होत नसेल इतकंच.

 
- सौरभ वैशंपायन