Showing posts with label राष्ट्र. Show all posts
Showing posts with label राष्ट्र. Show all posts

Tuesday, April 22, 2014

आर या पार ... दोनो तरफ मोदी सरकार!!!




जसा जसा महाराष्ट्रातल्या निवडणूकिचा शेवटचा टप्पा व १६ मे चा दिवस जवळ येत चालला आहे तसे अनेक फेसबुक स्टेटस वर नरेंद्र मोदि भारताचे पंतप्रधान झाले तर एक हुकुमशहा सत्तेवर येईल. दंगली होतील. अल्पसंख्यांक्य धोक्यात येतील. भारत कसा सेक्युलर आहे, मोदि म्हणजे प्रति-हिटलरच, RSS म्हणजे मुसोलिनीच्या ब्लॅक कॅपचा भारतीय अवतार आहे हे सांगण्याचं पीक आलं आहे. अनेक तथाकथित विचारवंत देश सोडून जाण्याची भाषा करु लागले. (म्हणजे "यांच्या" म्हणण्यानुसार जर मोदि "संकट" असतील तर हे ज्या लोकांबाबत "कळवळा" आहे त्यांना सोडून पळून जाणार असं समजायचं का? अर्रर्र असं कसं? ) आजकाल यांचा त्रागा, हा राग येण्यापेक्षा कीव व त्याहीपुढे मनोरंजन बनत चालला आहे. गेल्याच आठवड्यात सेक्युलरपणाचा बिल्ला छातीवरती लावून फिरणार्‍या देशभरातल्या समस्त मोठ्या मोठ्या विचारवंतांनी, लेखकांनी, साहित्यिकांनी वगैरे वगैरे वगैरे वगैरे लोकांनी एकत्र येऊन मोदिंना विरोध दर्शवला. पण जागा भरायला तेव्हढीच एक बातमी ह्याहुन तीची दखल कितपत घेतली गेली हे शोधावं लागेल.

एकतर  हा शुद्ध मूर्खपणा आहे कींवा मग उघड उघड लबाडी आहे. मुळात भारतीय समाजात व्यक्तीपूजा असली तरी हुकुमशाही मान्य करणारी मानसिकता नाहीये. आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधींसारख्यांचे सिंहासन जनतेने हादरवून सोडले. आणि आता तर सोशल मिडिया व इतर साधने इतकी प्रभावी आहेत की जनतेला कुठल्याही कारणाने दडपणे शक्य नाही. एखाद्या राज्यात एकहाती सत्ता चालवण्यासारखे वेगळे, "देश" पातळीवर तसे वागणे शक्य नाही. एक सरळ साधी गोष्टि आहे कत्तली करणारा हूकूमशहा तयार व्हायला कुठेतरी लष्कराचा सपोर्ट असायला लागतो. सुदैवाने भारताची व भारतीय लष्कराची मानसिकता अशी कधीच नव्हती व नाहीये. हे असे काही करायचा वेडगळपणा भाजपा - मोदि करणे शक्यच नाही. मोदी सत्तेवर येऊन कत्तली करतील वगैरे म्हणणारे मुर्खांच्या नंदनवनात आहे. मोदिंचा बागुलबुवा आता अजून मोठा करता येणार नाही ह्याची जाणीव त्यांच्या विरोधकांना झाली आहे.

आता मुख्य प्रश्न असा आहे की मोदि इथवर कसे आले? व नमो लाट अशी अनिरुद्ध का झाली आहे? ह्यातली पहीली मुख्य बाजू आहे की लोकांना कॉंग्रेसची कमालीची चीड आली आहे. महागाई, हतबलता, संरक्षणाची वाताहात, अंतर्गत सुरक्षेचे वाभाडे, लोकांशी संपूर्ण तुटलेला संवाद, अंगात आलेली मुजोरी व सर्वांचा कळस म्हणजे अनिर्बंध बोकाळलेला भ्रष्टाचार. कॉंग्रेसी चेहरा देखिल लोकांना डोळ्यांसमोर नकोसा झालय. हे सर्वात मोठे कारण आहे. दुसरी बाजु अथवा कारण आहे - गेल्या १० वर्षात मोदिंनी केलेला गुजरातचा विकास. महाराष्ट्र गुंतवणूकित, उद्योगांत गुजरातपेक्षा अग्रेसर आहे असं आकडे दाखवून सांगतात तेव्हा ज्या परीस्थितीत मोदि तिथे मुख्यमंत्री म्हणून नेमले गेले, त्यानंतर मोजून काही दिवसांत झालेले गोध्रा व त्यावरची प्रतिक्रिया म्हणून झालेली भयानक दंगल, कसलाही प्रशासकिय अनुभव नसताना ह्या सर्व गोष्टि हाताळणे खचित सोपे नव्हते व गेली १०-१२ वर्ष त्याच गोष्टिवरुन विरोधकांनी मांडलेला छळवाद - सगळ्याला हा माणुस पुरुन उरला हे लक्षात घ्यायला हवे. हे सगळे सांभाळत असताना त्यांनी गुजरातचा विकास केलाच शिवाय दंगलीत दोषी असलेल्या अनेकांना शिक्षा झाली. युट्युब मधील एका व्हिडिओ मध्ये पाकिस्तानी पत्रकारांशी बोलताना खुद्द ओवेसी सारखा माणूस बोलून गेला की गुजरात मधील अनेक गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे व होते आहे. पण लोकांनाच कंटाळा येईपर्यंत विरोधकांनी बोंबाबोंब केली त्याने मोदि आपसूक मोठे होत गेले. जितकं मोदिंना दडपण्याचा प्रयत्न केला उलट तितके त्यांना इंधन मिळाले. उलट आज अनेक मुस्लिम मोदिंना पाठिंबा जाहिर करताना दिसत आहेत. निदान त्यांचा विरोध खूपच निवळला आहे हे नक्की.

राहुल गांधी ह्या माणसाची एकंदर पाचपोच किती आहे ह्यावर अनेकांनी उघड उघड प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. अर्णव गोस्वामीच्या मुलाखतीत त्याचा किती पराकोटिचा गोंधळ उडाला होता हे  देशाने बघितलं आहे. अर्णवचे प्रश्न काय होते - ह्याने उत्तरं काय दिली? हे जगाने बघितलंय. हा माणूस भर सभेत काय बरळतो त्याच्या अनेक क्लिप्स सगळीकडे फिरत असतात. हे असंच काही बरळल्याने २ वर्षांपूर्वी त्याच्या दरभंग्याच्या सभेत तर तरुणांनी इतका राडा घातला की ह्याला मान खाली घालून गाशा गुंडाळावा लागला होता. भावनिक दृष्ट्या राहुल गांधी अस्थिर व उपचारांवर असल्याबाबत विकिलिक्स मध्ये देखिल नोंदवलं गेलं. जिथे जिथे राहुल गांधींनी प्रचार केला तिथे तिथे कॉंग्रेस पार झोपली. ३/४ महिन्यांपूर्वी ३ राज्यातील विधानसभा पार पडल्या तेव्हा आपल्या परीवारातील लोकांनी देशासाठी कसे प्राण दिले आहेत हा एकच विषय घेऊन राहुल गांधींनी किमान ५/६ सभा रेटल्या. आपल्या आजी - वडिलांबाबत कुणालाही आत्मियता असणे समजण्यासारखे देखिल आहे. पण मग त्याच बरोबर हे पण त्यांनी सांगायला हवं होतं की राजीव गांधींच्या मारेकर्‍यांबाबत सहानुभुती असलेले करुणानिधी हे त्यांच्या सरकारमधले भक्कम खोड आहेत. व राजीव गांधींचा बळी घेणार्‍या तमिळ वाघांचे गालगुच्चे घ्यायची त्यांना खोड आहे.

गरिबी ही मानसिक अवस्था आहे असं ह्या महान समाजमानसशास्त्रज्ञांच म्हणणं होतं. लोकपाल आंदोलन, निर्भया प्रकरण झालं तेव्हा हे महाशय अनेक दिवस गायब झाले होते. त्याखेरीज पक्षातील जेष्ठ व त्याही पुढे देशाचे पंतप्रधान जो निर्णय घेतात तो "नॉन-सेन्स" कसा आहे हे पत्रकारांसमोर त्या ठरावाच्या चिंध्या करुन त्यांनी जग जाहीर केलं. हेच महाशय भाजपात जेष्ठांना कसं डावललं जाते त्यावर गेल्या आठवड्यात बोलत होते तेव्हा मला राहुन राहुन कौतुक वाटलं. ह्यांच्या मातोश्रींनी सीताराम केसरींना जणू शाल श्रीफळ देऊन लाल किल्यावरती त्यांचा जाहीर सत्कारच केला होता. दिल्लीत  विधानसभेसाठी शीला दिक्षितांच्या प्रचाराची राहुल गांधीनी सभा घेतली तेव्हा भर सभेतून लोकं उठून चालती झाली. मुळात कॉंग्रेस व त्यांच्या युवराजाचीच परीस्थिती गंभीर आहे.  पक्षातले जुने जाणते लोकांच्या रोषाला इतके घाबरले आहेत की अनेकांनी निवडणूक लढवायला नकार दिला. सोनिया गांधीनी यावेळी प्रचारात फार रस घेतलेला नाही. महाराष्ट्रातील सभा तर त्यांनी तब्येतीचे कारण सांगुन टाळल्या. पवारांना देखिल राहुलचे नेतृत्व मान्य नाही, त्यांनी देखिल मुंबईच्या सभेकडे पाठ फिरवली. एकंदर काय? कॉंग्रेसला या निवडणूकित ३ आकडी जागा कमावता आल्या तरी खूप आहे.

नीट व शांतपणे विचार केल्यास भाजपा - मोदि वगळता दुसरा ऑप्शन सध्या उपलब्ध नाहीये. कॉंग्रेस - राहुल गांधींचा तर दूर दूरपर्यंत प्रश्न येत नाही कारण ह्या पारिस्थितीला तेच जबाबदार आहेत. मग दूसरा ऑप्शन काय? मुलायमसिंग यादव? ममता बॅनर्जी? मायावती? जयललिता? करुणानिधी? नितीशकुमार? की कम्युनिस्ट? ह्या तिसर्‍या आघाडिचं भंपक काडबोळं देशाचं वाट्टोळं करेल, क्षणभर मानलं की असंल अस्थिर सरकार आलं तर कॉंग्रेस बाहेरुन पाठिंबा देऊन वर्षभर हे बाहुले चालवेल आणि लोकांच डोकं थंड झालं किंवा ह्या कडबोळ्यांमुळे अजून बिघडलं की आहेतच पुन्हा निवडणूका व सत्ता जाईल कॉंग्रेसकडे. नकोच रे बाबा! रहाता राहिला "आप", ४९ दिवसांत सरकार व जनतेला वार्‍यावर सोडून पळून जाणारे ह्या देशाचा कारभार किती दिव्य करतील याचा तर विचारही करवत नाही. BTW त्यावरुन आठवलं गेले १५ दिवस केजरीवाल कॅमेरासमोरुन पूर्णत: गायब झाले आहेत. गेल्या महिन्यात तर मिडियाने त्यांची इतकी हवा केली होती की बास रे बास. ३/४ ठिकाणी मार खाल्यापासून पेपर मध्ये देखिल एकाही ओळीची बातमी आली नाहिये.

एकीकडे सेक्युलर तुणतुणे वाजवून हेच ढोंगी दुसरीकडे हे मात्र  बदनाम झालेल्या इमामांना जाऊन भेटतात. मायावती मुस्लिमांना एकत्र येऊन जात्यांध्यांना विरोध करायला सांगतात तेव्हा नाही बरं सेक्युलर देशाला तडे जात???? गेल्या १० वर्षात देशाची अवस्था अति झालं आणि हसु आलं ह्याच्याही पलीकडे गेली आहे. हे सगळं निस्तरुन रुळावर आणायला देशाला किमान पुढली १० वर्षे भक्कम सरकार व सशक्त नेतृत्व हवे आहे! मोदिंना देशांतर्गत प्रश्नांबरोबरच देशा बाहेरील कारणांसाठी सत्तेवर आणणे मला गरजेचे वाटते. १६ मे ला भाजपा - नमो सत्तेवर आल्यास १७ मे पासून घरा घरातून सोन्याचे धूर निघू लागतील ह्या भ्रमात कोणीच नाहीये. यांनी केलेलं निस्तरायलाच २ वर्ष निघून जाणार आहेत. त्याच दरम्यान घरचं झालं थोडं ह्या धाटणीचे आंतरराष्ट्रिय प्रश्न निर्माण होऊ घातले आहेत. डोळे आणि डोकं उघडे ठेवले तर सामान्य लोकांना देखिल ते प्रश्न दिसू शकतील.

आपली लोकशाही ही सर्वात मोठी लोकशाही असली तरी "समजूतदार" लोकशाही नाहीये. मी मरण्या आधी भारतीय निवडणूक ही जात, धर्म, राज्य, त्यातले पाणी वाटप, वीज, रस्ते यांच्यापेक्षा आर्थिक स्थिरता, नोकर्‍या, तंत्रज्ञान, संरक्षण, औद्योगिक धोरण, पर्यावरण,  परराष्ट्र धोरण, तेल,  देशाची आयात - निर्यात यांसारख्या विषयांवर जाहीर खडाजंगी होऊन पार पडलेल्या बघू इच्छितो. (पण अगदिच मला १५० वगैरे वर्षांच व्हायचं नाहीये. थोडसं आधी हे शक्य होईल अशी माफक अपेक्षा आहे. :p ) अर्थात त्यासाठी पाणी - वीज - रस्ते - घरं - शिक्षण - अन्न ह्या मुलभूत गरजा पूर्ण होणे गरजेचे आहे.


..... म्हणूनच - अबकी बार मोदि सरकार!!!

 - सौरभ वैशंपायन.

Saturday, January 14, 2012

"गुरुदक्षिणा"

कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति,
तसे मराठे गिलिचे साचे कलित लढ़ले पनिपति॥


- १४ जानेवारी १७६१, राष्ट्रावरचं संकट मराठ्यांनी आपल्या छातीवर झेललं. मराठे गिलच्यांविरुध्द एकाकि झुंझले. अभिमन्यूप्रमाणे झुंझत झुंजत देह ठेवला. उभ्या भारतातून एक हरीचा लाल मराठयांबरोबर पाय रोवून पानिपतात उभा राहिला नाही. मराठ्यांनी पाय गाडून युध्द केलं. रक्त मांसाचा चिखल झाला. मराठ्यांचा भावी पेशवा मारला गेला. पुण्यातल्या प्रत्येक घरातला एक जण तरी पानिपतावर कापला गेला. "दो मोती गलत, दस-बीस अश्राफात,
रुपयों
की गिनती नही|"
पण माझ्या दृष्टीने पानिपतावरती झालेला पराभव हा खरा पराभव नाही. कारण १८व्या शतकाच्या शेवटि तब्बल १४ वर्ष लाल किल्यावरती "भगवा" फडकत होता हा इतिहास आहे. मराठ्यांनी दिल्लीची वजीरीच नव्हे जर सगळी दिल्लीच पुन्हा मांडिखाली दाबली हा खरा इतिहास आहे. महादजी शिंद्यांनी एकेका रजपुताला सुटा करुन करुन पिदवला हा खरा इतिहास आहे,  "गढ मै गढ चित्तोड गड बाकि सब गढियॉ।" म्हणून लैकिक मिळवलेला किल्ला जवळपास वर्षभर लढल्यावर आणि डोळे पांढरे व्हावेत इतका तिखट प्रतिकार झाल्यावर ’महान’ सम्राट अकबराला मिळाला होता ..... मराठ्यांनी बोल - बोल म्हणता तो १८ दिवसांत जिंकला होता हा खरा इतिहास आहे. नजिबाचा नातू "गुलाम कादिर" याने "अली गोहर" बादशहाला आंधळे केल्याबद्दल व बादशाहाच्या कुलातील स्त्रीयांना भर दरबारात नग्न केल्याची शिक्षा म्हणून मराठ्यांनी त्याला टाचेकडून मानेकडे जिवंत सोलून ठार मारला होता व नंतर दिल्लीच्या लाहोरी दरवाज्याजवळ ३ दिवस टांगून ठेवला होता हा खरा इतिहास आहे. पानिपताला जबाबदार असलेल्या नजीबाची कबर मराठ्यांनी सुरुंग लावून उडवून दिली हा खरा इतिहास आहे..
म्हणूनच म्हणतोय खरा पराभव पानिपतावर नव्हे तर इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात झालाय, पुस्तकांच्या पानांवरती झालाय. दुसर्‍या महायुध्दातील दोस्तांच्या डंकर्कच्या पळपुटेपणाला कौतुकाने माना डोलावून "यशस्वी माघार" म्हणणारे मात्र पानिपतावर देह ठेवून राष्ट्र वाचवणारे पराभूत झाले असं म्हणतात तेव्हा त्यांची किव येते.
आज अडिचशे वर्षानी त्याच्याकडे बघताना केवळ "पराभव" म्हणून न बघता "गुरुदक्षिणा" म्हणून बघा. मराठ्यांनी शिवछत्रपतींना दिलेली "गुरुदक्षिणा". राष्ट्रावरचं संकट आपल्या छातीवर घ्यायची संथा त्या महामानवाने मराठ्यांना दिली होती. त्या संथेची गुरुदक्षिणा म्हणजे "पानिपत".
 - सौरभ वैशंपायन.

Tuesday, December 6, 2011

जझीरे मेहरुब

पायात बारीकसा काटा घुसावा आणि अनेक प्रयत्न करूनहि काढता न आल्याने बघता बघता त्याचं कुरुप व्हावं, असे दोन काटे दख्खन प्रांतात घुसले एक होते "निझाम" आणि दुसरे होते "सिद्दि". अगदि भारत स्वतंत्र होऊन आपापली संस्थाने नाईलाजाने भारत अथवा पाकिस्तानात विलीन करावी लागली तोवर हे वेगळेपण राखून होते.

"राजापूरचे शिद्दि ’घरात जैसा उंदिर तैसा शत्रू’" हे महाराजांचे बोल संपूर्ण सत्य ठरले. निझाम - सिद्दि इतके चिवट कि देशाच्या दुर्दैवाने ते मराठ्यांना पुरुन उरले. जंजिरा जिंकण्यासाठी मराठ्यांनी काय केले नाही? पण किल्ला जिंकला म्हणता म्हणता माशी शिंकायची व सिद्दि पुन्हा तग धरायचा व वेळ मिळताच उचल खायचा. तब्बल ३२० वर्षे हा पापग्रह कोकण किनार्‍याला ग्रासून होता. भौगोलिक दृष्ट्या लहानश्या पण अती महत्वाच्या ठिकाणी सिद्यांनी आपली कधीच न निघणारी पाचर ठोकून ठेवली होती.

इतिहासाचा विचार करताना, शिवाजी महाराज हे इतरांपेक्षा दशांगुळे मोठे का ठरतात? हे बघण्यासाठी त्यांचे शत्रू किती क्रूर, शूर, कपटी, मुत्सद्दि, चिवट व बलाढ्य होते हे समजून घेतले पाहिजे. त्यांची तुलना महाराजांशी केली कि त्यावेळि व त्यानंतर महाराजांसारखा पट्टिचा राजकारणी झाला नाहि, चलाख योध्दा झाला नाहि, द्रष्टा किंवा राज्यकर्ता झाला नाहि हे सत्य अजून हजारो पटींनी उजळून समोर येतं.

काहि बाबी एकमेकांत इतक्या गुंतल्या असतात कि त्या वेगळ्या काढताच येत नाहित. मराठ्यांचे आरमार व जंजिरा हे इतिहासात एकमेकांना इतके छेद देतात कि "Pick-a-stick" च्या खेळासारख्या घटना एकमेकांवर अवलंबून आहेत. एकिला पकडायला जावं तर दुसरीला धक्का लागतो, तीला सोडवायला जावं तर ती अजून चार काड्यात दडली असते. थोडाफार प्रयत्न करताना मला जे काहि हाताला लागलं ते इथे मांडतोय. चला पहिली स्टीक उचलूया?  - कोण होते हे सिद्दि???

आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍यावरचे इथिओपिया आणि एरिट्रिया माहित आहे? त्याच इथिओपियाच्या उत्तरेकडिल व एरिट्रिया च्या दक्षिणेकडिल काहि भागाला पूर्वी ’अ‍ॅबेसिनिया’ म्हणत, नंतर तर इथिओपियालाच अनेक नकाशात अ‍ॅबेसिनिया हे नाव मिळालेलं दिसतं. "हबश" लोकांनी इथे बरीच तलवार गाजवली स्वत:चे राज्य निर्माण केले. सिद्यांची कुळकथा सुरु होते ती इथुनच. सध्याचा सौदि अरेबिया म्हणजेच आधीचा अरबस्तानचा शेजार असल्याने हे कट्टर मुस्लिम बनले. आफ्रिकेतून जगभर गुलामांचा व्यापार होत असे. अ‍ॅबिसिनिया त्याला अपवाद कसे ठरेल? अमेरीका - युरोपमध्ये स्पॅनिश - पोर्तुगिज लोकं आफ्रिकेतील गुलाम नेत तर पूर्वेकडे अरबांनी या व्यवसायाला ’बरकत’ आणली. या हबस लोकांची भारताला पहिली ओळख झाली ती गुलाम म्हणून तरी किंवा व्यापारी म्हणून तरी. साधारण १२ व्या शतकाच्या आसपास ह्या हबस लोकांच्या वस्त्या भारताच्या पश्चिम किनार्‍यांवर पसरु लागल्या. मुळचे आफ्रिकि असले तरी इथल्या स्थानिकांबरोबर शरीरसंबध आल्याने पिढ्या न पिढ्या नाकि-डोळि बदलत गेल्या. पोर्तुगिजांचे पांढरे पाय ज्या अशुभ दिनी भारताला लागले त्याच दिवशी भारताबरोबर हबश्यांचेहि ग्रह नीचीचे झाले असे म्हणावे लागेल. पुढे इतर युरोपिय देखिल इथे हातपाय पसरु लागल्याने अरब-हबश्यांना आपला बाजार आवरता घ्यावा लागत होता.

जंजिरेकर सिद्यांचा ध्वज.


मात्र जात्याच चिवट, स्वामीनिष्ठ, कामसू, साहसी, शूर व क्रूर असल्याने या गुणांच्या जोरावर सिद्यांनी इथल्या बहमनी सत्तेत प्रवेश केला. मोठ्या पदांपर्यंत चढले. आपल्या लोकांना आणून इथली वस्ती वाढवली. मलिक अंबर हे सर्वात मोठं उदाहरण. दारिद्र्याने हैराण झालेल्या आई-बापाने या आठ वर्षाच्या पोराला बगदादला चक्क गुलाम म्हणून विकलं, तिथुन त्याला निझामशहाच्या चंगेजखान नामक मोठ्या मंत्र्याने अहमदनगरला स्वत:चा गुलाम म्हणून आणलं. मधल्या काळात निझामशाहिची वाताहात सुरु झाली पण स्वत:च्या कर्तृत्वावरती तो निझामशाहित वजीर पदापर्यंत पोहोचला. मुघलांना, बिदरशहाला, आदिलशहाला आलटुन पालटून तो धक्के देत राहिला, कधी मैत्री करत राहिला. नंतर नंतर त्याची ताकद इतकि वाढली कि दिल्लीहून पळून आलेल्या शहॉंजहानला त्याने शहाजीराजांच्या हाती सोपवले व मुघलांशी उघड शत्रुत्व पत्करले. मलिक अंबरच्या काळात निजामशाहि २ वेळा बुडता बुडता त्याने वाचवली. शहाजीराजांसारख्या हुशार व कर्तबगार मराठ्यांची एक फळिच या मलिक अंबरने उभी केली. शहाजीराजे व मलिक अंबर यांचा सुरुवातीला स्नेहसंबध होता, नंतर मात्र दोघांत दुरावा आल्याचे जाणवते. मलिक अंबर निसंशय एक उत्तम प्रशासक, कुशल सेनापती होता. त्याने शेतसार्‍याची जी पध्दत दख्खनप्रांतात लागु केली ती अगदि इंग्रजांच्या काळापर्यंत नावाजली गेली. असे अनेक हबशी निजामशाहि - आदिलशाहित होते.

जंजिर्‍याच्या जन्माची कथा मात्र बहमनी काळातच सुरु होते. झालं असं कि  इ.स.१४८२-८३ मध्ये जुन्नर प्रांताचा सुभेदार असलेल्या मलिक अहमदने कोकणवरती स्वारी केली. वर्षभर हि मोहिम चालली. त्याने १४८५-८६ च्या दरम्यान दंडा-राजपुरीच्या मेढेकोटाला धडक दिली. हा लाकडि परंतु भक्कम मेढेकोट बांधला होता कोळ्यांनी. व त्यांचा म्होरक्या होता रामाऊ पाटिल. त्याने मलिक अहमदला किनार्‍यावरुनच परतवला. पुढे बहमनी सत्तेचे पाच छकले उडली त्यात या मलिक अहमदने आपले बस्तान अहमदनगरला पक्के करुन १४९० मध्ये निजामशाहिची स्थापना केली. गादिवर येताच त्याने आपला पेरीमखान नामक मर्जीतला सरदार रामाऊ पाटलाच्या बंदोबस्तासाठी धाडला. पेरीमखान हुशार होता. त्याला माहित होतं लढून काहि हा खवळल्या दर्यातला मेढेकोट हाती लागणार नाहि. त्याने कपट खेळायचे ठरवले. त्याने ३ गलबते मेढेकोटाच्या टप्यात आणली व आपल्या माणसांबरोबर काहि दारूची पिंपे रामाऊ पाटलाला ’भेट’ म्हणून पाठवली. त्याच बरोबर विनंती केली कि आपण रेशमी कापडाचे व दारुचे व्यापारी आहोत. या मुक्कामात आंम्हाला संरक्षण पुरवावे अशी विनंती. त्या बदल्यात पैसा - दारु वगैरे देऊ. दारुच्या पिंपानी आपली नशा पसरवायला सुरुवात केली. रामाऊ पाटलाने त्याला मान्यता दिली. गलबतातून उपकाराची परतफेड व मैत्रीचा हात म्हणून अजून दारुची पिंपे मेढेकोटात पाठवली गेली. शिवाय सुरक्षा मिळावी म्हणून काहि रेशमी कापड्याच्या पेट्या न तपासताच मेढेकोटात येऊ दिल्या. दारु पिऊन रामाऊ पाटिल व त्याचे साथीदार झिंगले. मध्यरात्री त्या पेट्यांतून ११७ माणसे बाहेर पडली व दिसेल त्याला कापून काढायला सुरुवात केली. रामाऊ पाटिल कैद झाला. त्याला निजामशहा पुढे उभे केले. त्याने मोठ्या मनाने त्याला "आपलेसे" केले .... आता रामाऊ पाटलाचे नवे नाव होते - "एतबारराव". मुस्लिम धर्म स्वीकारुन त्याने नगर वरुन परतून मेढेकोटात पाय ठेवला पण पेरीमखानशी त्याचे जमेना. मग सोप्पा उपाय, निजामशहाने त्याची गर्दन मारायचा हुकूम पाठवला. कोळ्यांचे राज्य संपले. आणि सिद्यांचे सुरु झाले. इतिहासातील चुकांतुन धडा घ्यायचा असतो, त्या परत होऊ द्यायच्या नसतात, कदाचित या घटनेला समोर ठेवूनच शिवछत्रपतींनी कुठल्याहि गडावर आणि सैन्याच्या छावणीत दारु-नशा, स्त्रीया यांना संपूर्ण बंदि केली होती. एखादा नियम मोडणारा मिळालाच तर गर्दन मारण्याचे कडक हुकूम होते. (पानिपताच्यावेळि मराठ्यांना मुख्य नडले ते हेच, हाहि शिकण्यासारखा इतिहासच आहे.)

पहिला मूर्तजा निजामशहाच्या काळात वारंवार ढासळणार्‍या मेढेकोटाच्या जागी पक्के दगडि बांधकाम करायला सुरुवात झाली. १५६७ ते १५७१ असे चार वर्षे मर-मर खपवून घेऊन अर्धा मैल लांबीचा, सुमारे दिड मैल परीघाचा व १९ बुरुजांचा बलदंड व तितकाच देखणा पाणकोट किल्ला उभा राहिला - "जझीरे मेहरुब". इ.स. १६१८ मध्ये सिद्दि सुरुलखान हबशी हा जंजिर्‍याचा पहिला हबशी सुभेदार बनला. १६२० मध्ये त्याची जागा सिद्दि याकूतने घेतली. तर एकाच वर्षाने सिद्दि अंबर जंजिर्‍याचा सुभेदार झाला. १६३६ च्या तहानुसार हा भाग मुघलांनी विजापूरकरांना दिला. आणि सिद्दि - विजापूरकरांचे खटके उडायला सुरुवात झाली. मात्र सिद्दिशी झुंझत रहाण्यापेक्षा विजापुरने त्याला चुचकारून नागोठण्यापासून ते बाणकोटापर्यंतच्या समुद्रावरची त्याची सत्ता मान्य केली. त्या बदल्यात सिद्याने विजापुरकरांचा समुद्रि व्यापार व मक्केला जाणारे लोक यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्विकारली. हबश्यांनी एकंदर ३२५ चौ मैल प्रदेशावर निरंकूश सत्ता निर्माण केली. याची उत्तर सीमा म्हणजे कुंडलिका नदि तर दक्षिण सीमा होती बाणकोटची खाडि. पूर्वेला रोहा, माणगाव, व महाड तालुक्यातील काहि गावे देखिल होती. ४० मैलांचा अरबी समुद्राचा किनारा, रोह्याच्या खाडिचा ४ मैलांचा तर खाली बाणकोटच्या खाडिचा १७ मैलांच्या भागात हबश्यांचा सुखनैव वावर असे. मात्र त्यांचे मुख्य ठिकाण होते दंडाराजपुरी व मुरुडचा जंजिरा किल्ला.



१६४२ मध्ये सिद्दि अंबर पैगंबरवासी झाला. गादिवरती वंश परंपरागत हक्क नसे. कर्तृत्ववान सरदाराला ते पद मिळत असे. सिद्दि अंबर नंतर सिद्दि युसुफ जंजिर्‍याच्या गादिवरती आला. १६५५ मध्ये त्याच्या जागी सिद्दि फतखान अधिकारावरती आला. अर्थात गादिवरती कोणीहि आला तरी जनतेला काहि फरक पडत नसे. ते हालातच दिवस काढत. दिवस-रात्र कधीहि हबश्यांची टोळकि गावात शिरत कत्तल करत, स्त्रीया, तरुण मुले यांना पकडून गुलाम म्हणून विकायला घेऊन जात. अनेकदा स्त्रीयांवर अत्याचार करुन नंतर त्यांना समुद्रात फेकून देत. प्रत्यक्षात गुन्हा केला असो वा नसो त्यांनी ज्याला गुन्हेगार ठरवले त्याच्या पायांना धोंडा बांधून समुद्रात ढकलायला सिद्यांना मजा वाटे. अनेकांना पोत्यात घालून समुद्रात ढकलत. काहिंना उकळत्या तेलात टाकत. पकडलेल्या कोळ्यांच्या - गावकर्‍यांच्या तोंडात सक्तीने गोमांस कोंबून सक्तीचे धर्मांतर हि रोजचीच बाब झाली होती. किमान नाक-कान कापून सोडून दिले जाई. प्राण भय असले तरी गाव सोडून जाता येत नसे. दोन कारणे - कमालीचे दारीद्र्य असल्याने अख्या कुटुंबासकट कोकणातून - घाटावरच्या प्रवासासाठी देखिल लोकांकडे पैसे नसत. आणि एकटे दुकटे पळून जावे तर सिद्यांकडे बक्षिसाच्या अमिषाने कोणी चूगली केली तर उरले सुरले झोपडे देखिल राख होई, घरातल्या लेकि सुनांच्या अब्रूवरती जाहिर घाला पडे, तरूण पोरे गुलाम म्हणून तरी नेली जात किंवा समुद्रात तरी फेकली जात. सुक्या बरोबर ओले जळावे तसे त्यांचे शेजारी विनाकारण सिद्यांच्या जाचाला बळी पडत.

अशीच कोणीतरी मोरोबा सबनीस नावाच्या बापुड्याची निष्कारण चुगली सिद्याकडे केली - कासाच्या किल्यावरती राहणार्‍या या साध्या माणसाने जिवतीचे चित्र श्रावणात भिंतीवर लावून त्याची पुजा केली. कोणीतरी सिद्याचे कान फुंकले सबनीस तुमच्यावर जादू-टोणा करतो आहे. या हबश्यांचा भूत-प्रेत-चेटूक यावर पराकोटिचा आंधळा विश्वास. हे कळताच बिचार्‍या मोरोबांना तोफेच्या तोंडि दिले. हरी आवजी चित्रे नामक सद्‌गृहस्थाला खंडोबाच्या दर्शनाहुन यायला उशीर झाला, या कारणावरुन आधीच आजारी असलेल्या सिद्दि अंबरने खंडोबासमोर माझ्यावर चेटूक करतो या निरर्थक संशयाने त्याला व त्याच्या भावाला गोणीत भरून समुद्रात भिरकावले. बायका मुलांना गुलाम म्हणून विकायला काढले. त्यांच्या सुदैवाने त्यांच्या भावानेच - विसाजीपंत तुंगारे यांनी सांगितलेली रक्कम भरुन त्यांना विकत घेतले. पुढे हरी आवजी चित्र्यांचाच मुलगा "बाळाजी आवजी चित्रे" याला राजापूर मोहिमेच्या वेळि महाराजांनी हेरले व आपला चिटनीस बनवुन त्याच्या गुणांचे चीज केले. ह्या इतिहासाला ज्ञात असलेल्या चार-दोन गोष्टि, अश्या हजारोंना ह्या क्रूर हबश्यांनी जंजिर्‍यावरुन समुद्राचा तळ दाखवला.

पण १५ जानेवारी १६५६ रोजी एकूणच इतिहासावर दूरागामी परीणाम करणारी एक घटना घडली - जावळि प्रांतावर स्वराज्याचा भगवा फडकला. जावळि टाचेखाली आल्यावर मग महाराजांना कोकणाचे दारच सताड उघडले. जावळि पाठोपाठ त्यांनी उत्तर कोकण जिंकला. महाराज - सिद्दि समोरासमोर उभे ठाकले. आता संघर्ष अटळ होता व तितकाच तो गरजेचाहि होताच. त्राहि त्राहि करणार्‍या कोकणी जनतेला त्राता दिसला. १६५७ च्या पावसाळ्यात महाराजांनी सिद्यावरती मोहिम काढली. ३१ जुलै १६५७ रोजी शिवरायांच्या आज्ञेवरुन रघुनाथ बल्लाळ सबनीस थेट दंडा-राजपुरीवरती सुमारे ७ हजार सैन्यानिशी चालून गेले. तळे-घोसाळे झटक्यात काबीज करुन मराठी पाते राजापुरीत घुसले. रघुनाथपंतांनी सिद्याला जरब बसवली. त्याने तहाचे बोलणे लावले. व स्वराज्याला तोशीस देणार नाहि असा शब्द दिला.

महाराजांनी जंजिर्‍यावर मोठ्या अश्या ३ मोहिमा काढल्याच. पण मुख्यता महाराजांच्या दूरदर्शी स्वभावाला अनुसरुन त्यांनी केलेली गोष्ट म्हणजे मराठा आरमाराची निर्मिती. इतर सर्व सत्तांच्या आरमारांचा आनंद होता. सगळा समुद्र किनारा परकियांनी वाटून खाल्ला होता. इतकेच कशाला? पोर्तुगालच्या राजाने आपल्या पोरी बरोबर इंग्लंडच्या चार्ल्स दुसरा याला हुंडा म्हणून काय दिले? तर मुंबई बंदर. इथवर हे सोकावले होते. स्वत:चे बलाढ्य आरमार हा एकच उपाय होता. महाराजांनी पोर्तुगिजांकडुन नव्या छोट्या बोटि बांधून घेतल्या. मग व्यापार्‍यांना संरक्षण या नावा खाली त्यावर हलक्या तोफाहि चढवल्या व बोल बोल म्हणता आरमाराचा आकार त्याला दिला. पोर्तुगिजांनी कपाळाला हात लावला, पण आता उशीर झाला होता. पोर्तुगिजांनी अधिक मदितीसाठी नकार दिल्यावर पुढे महाराजांनी फ्रेंचांबरोबर मैत्री वाढवून तोफा व नौकाबांधणीचे नवे तंत्रज्ञान आपलेसे करायला चालना दिलेली दिसते. पण हि यादि मोठी होती - अरब, डच, फ्रेंच, पोर्तुगिज, इंग्रज, कुडाळकर सावंत या खेरीज सर्वात मोठी डोकेदुखी होता सिद्दि!

महाराजांनी केलेली राजकारणे बघुन मती गुंग होते. सिद्याला चाप लावायला महाराजांनी कुठवर मजल मारावी? महाराजांची जहाजे व माणसे - मक्का -मस्कत - इराण - कॉन्गो पर्यंत जाऊन आली. शत्रुचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने सिद्दिचा राग करणार्‍या मस्कतच्या इमामाची दाढी महाराजांनी इथुन कुरवाळली. महाराजांची जहाजे एकिकडे व्यापार्‍यांना संरक्षणाच्या नावाखाली मक्केपर्यंत जात होतीच पण महाराजांनी इतिहासातली एक आश्चर्यकारक घटना घडवून आणली. कोणाला स्वप्नातहि असे स्वप्न पडले नसेल, पण महाराजांनी प्रत्यक्षात थेट मुघलांच्या खजिन्यालाच हात घातला ... महाराजांनी सूरत लुटली. गजांत लक्ष्मी स्वराज्यात आली. इतक्या पैश्यांची सोय महाराज स्वराज्यात कुठे कुठे करायची याच विचारात होते. लागोपाठ महाराजांनी कुडाळ - फोंड्यावर मोहिम काढली. त्यात मिळालेल्या विजयाने उत्साहित होऊन लखम सावंतांना आश्रय दिल्याचे कारण काढून महाराजांनी पोर्तुगिजांच्या प्रदेशावर चालून गेले. त्यांनी घाबरुन काहि तोफा व नजराणा देऊन सुटका करुन घेतली. लखम सावंतांना सरळ करुन महाराज मालवणात आले. मालवण किनार्‍यावर उभे असताना समुद्रातून एक बेट बाहेर डोकावत होते. महाराजांनी जवळ उभ्या असलेल्या कृष्णा सावंत देसाईं व भानजी प्रभू देसाईंना विचाले ते बेट कुठले? उत्तर आले - "कुरटे".

निवडक बोटि कुरटे बेटाच्या दिशेने निघाल्या. खडक चुकवत बोटि कुरटे बेटाला लागल्या. बेटावर फेरी मारता मारताच महाराजांमधला दुर्गस्थापत्यविशारद सगळा अदमास घेत होता. शुध्द खडक, चहूबासूस समुद्र,सर्पाकार तरांडि, अभोवार अवघड खडक, शत्रूची तरांडी येण्यास तीन कोस ठाव नाहि. "चौर्‍यांशी बंदरी ऐसा जागा दुसरा नाहि!" महाराजांनी सुरतेच्या लक्ष्मीला कुरटे बेटावरती सढळ हस्ते रीते केले. लक्ष्मीला पुन्हा माहेर दिले. "... आदौ निर्विघ्नतासिध्दर्थं श्रीमहागणपतीपूजनं करीष्ये!" - २५ नोव्हेंबर १६६४ या दिवशी महाराजांच्याच हस्ते मुहुर्ताचा चीरा बसला. ऐन समुद्रात किल्ला उभा राहु लागला. पाच खंडि शिसे ओतुन पाया बनवला त्यावर चिरे उभे राहिले. चुन्याच्या गिलावांनी सहा हात रुंदिचे बेचळिस बुरुज आणि भक्कम तट उभे राहिले. जवळपास सव्वातीन हजार मजूर सुमारे ३ वर्ष राबत होते. महाराजांनी सिंधुदुर्ग उभारायला अगदि पोर्तुगिजांही मदत घेतली. जेव्हा तट उभारायला दगड कमी पडू लागला तो फोंडा व आंबोली घाटातून आणला. बांधकामात शत्रूचा आथळा येऊ नये म्हणून पाच हजारांचे सैन्य, काहि जहाजे, तोफा तीन वर्ष खडा पहारा देत होते. गोविंद विश्वनाथ प्रभू जीव ओतून आज्ञेबरहूकुम काम करत होते. सिद्याची मधून मधून छोटि छोटि आक्रमणे होतच होती पण अखेर २९ मार्च १६६७ रोजी बांधकाम पूर्ण झाले. सिद्दि रागाने मनगटे चावत बसला. अठरा टोपिकर कपाळावर हात धरुन बसले "चौर्‍यांशी बंदरी ऐसा जागा नाहि, अठरा टोपिकरांचे उरावर अजिंक्य शिवलंका" उभी राहिली.

इतकं सगळं महाराज का करत होते? उत्तर सोपे होते - ज्याचे आरमार त्याचा समुद्र. जंजिर्‍याला मिळवण्यासाठी महाराजांनी अजून काहि केले असेल तर रात्रंदिवस जंजिर्‍यावरुन भडिमार होत असतांनाहि जंजिर्‍या समोरीलच हाकेच्या अंतरावरील कांसाच्या बेटावरती पद्मदुर्ग बांधुन काढला. राजापुरीच्या उरावर दुसरी राजापुरी उभी केली. महाराज स्वराज्याच्या कार्याबाबत किती गंभीर होते हे बघा - राजपुरी प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक, पद्मदुर्गाच्या बांधकामाचे संरक्षण करणार्‍या दर्यासारंगाला व दौलतखानाला पैसा व रसद वेळेत पुरवत नव्हता. दर्या सारंगाने महाराजांकडे तक्रार केली महाराजांनी कडक शब्दात त्याला लिहिले - "पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या उरावरती दुसरी राजापुरी वसवली आहे. त्याची मदत व्हावी .... हबशियांनी काहि देऊन आपले चाकर तुम्हाला केले असतील त्या करता ऐसी बुध्दी केली असेल! तरी ऐशा चाकरास ठिकेठाक केलेच पाहिजे! ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा करु पाहतो?... या उपरी बोभाटा आलियाउपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर, गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतीजा तुम्हास पावेल, ताकिद असे." हे पत्र १६७५ मधले आहे, म्हणजे राज्याभिषेकानंतरचे. स्वराज्याच्या कार्यात महाराज धर्म - जात - पंथ बघत नसत.

महाराजांच्या आग्रा भेटि च्या आधी व नंतर घटना इतक्या वेगाने घडल्या कि महाराजांना एकेका राजकारणाला उसंत मिळत नव्हती. मिर्झाराजांच्या मृत्युनंतर सिद्याने उचल खाल्ली. अखेर महाराजांनी १६६९ च्या मे मध्ये सिद्याला चेचायचाच हे ठरवून मोहिम काढली. तसाहि अंतस्थ कलहाने जंजिरा बेजार होता, सिद्दि खैरीयत, सिद्दि संबूल, सिद्दि कासिम, हे सिद्दि फतहेखानाशी भांडून प्राणभयाने पळून गेले होते, नुसत्या संशयावरुन सिद्दि फतहेखानाने ७५ जण कापून काढले होते. संधीचा फायदा घेऊन महाराजांनी  त्याचे तळे - घोसाळे इत्यादि सात किल्ले जिंकले. सिद्दि फतहखान घाबरुन जंजिर्‍यात जाऊण बसला. जून १६६९ च्या एका पत्रात सिद्याने मुंबईच्या इंग्रजांकडे मदतीची याचना केल्याचे समजते पण सुरतच्या इंग्रजांनी "शिवाजीशी वैर घेण्याची आपली आज तरी तयारी नाहि, त्याला खिजवले जाईन असे काहि करु नका, दुसर्‍याच्या भांडणात पडू नये!" असे स्पष्टपणे बजावले. मराठे दंडा-राजापुरीत पोहोचले. सिद्याचा जमिनीवरचा मार्गच बंद झाला. समुद्रातहि अनेक तारवे उतरवून महाराजांनी समुद्राकडून त्याची कोंडि चालवली. जंजिर्‍यावर लांब पल्ल्याच्या ५७२ तोफा व भरपूर दारुगोळा होता. भांडून जंजिरा मिळण्याची शक्यता फारशी नव्हती पण हल्ले करण्याबरोबरच महाराजांनी मुख्यत: जंजिर्‍याची उपासमार करायचे ठरवले. या राजकारणात सिद्याने मुघलांना ओढले. सुरतेच्या मोंगल अधिकार्‍याने महाराजांना वेढा उठवायचे हुकूम दिले महाराजांनी तो दुर्लक्षीत करुनच कोलून लावला. अखेर मुघलांच्या ताब्यात किल्ला देण्याची भाषा सिद्दि करु लागल्याने कल्याणचा मुघल सुभेदार लोदिखानालाहि महाराजांनी दूर ठेवले. यावेळि मात्र इंग्रजांनी तो किल्ला मुघलांना मिळू नये म्हणून आपण विकत घेऊ असे सिद्याला कळवले. पण सिद्दि याला तयार झाला नसावा.

सहा महिन्यात महाराजांनी सिद्याचं भिजकं मांजर करून टाकलं. अखेर अभयदान मिळाल्यास आपण जंजिरा मराठ्यांना देऊ असा निरोप त्याने महाराजांना पाठवला. जंजिरा स्वराज्यात येण्याची शुभचिन्हे दिसू लागली ... इतक्यात सिद्दि खैरीयत व सिद्दि संबूळ हे दोन चिवट हबशी मराठ्यांविरुध्द उभे राहिले. मराठ्यांचा वेढा चूकवून ते किल्यात शिरले. आधी त्यांनी सिद्दि फतहेखानाला बाबापुता करुन शरणागती पत्करु नकोस असे समजावले, मात्र फतहेखान घाबरला होता तो ऐकेना. अखेर त्याला कैद करुन जंजिरा या तिघांनी आपल्या हातात घेतला, सिद्दि संबूल त्यांचा म्होरक्या बनला. काफराला शरण जाण्यापेक्षा भांडताना मरुन जाऊ या त्वेषाने ते लढू लागले. सिद्दि संबुलाने मुघलांशी संधान बांधले. मुघलांचा रेटा स्वराज्याकडे आला तसा जंजिर्‍याची मोहिम महाराजांनी आखडती घेतली. जंजिरा वाचला. आता महाराजांनी त्याला मधाचे बोट लावायचे ठरवले ऑगस्ट १६७० मध्ये त्यांनी सिद्याला पत्र लिहिले - "मी माहुली आणि इतर किल्ले जिंकून घेतल्यावर तू कसा तिकाव धरणार? त्यापेक्षा जंजिरा मला देऊन टाकलास तर माझ्या सैन्याचा प्रमुख करेन!" अर्थात सिद्दि यालाहि बधला नाहि. तरी महाराज जंजिरा जिंकण्यासाठी कुठवर प्रयत्न करत होते हे समजुन येईल. महाराजांसारखा राजकारणी, दुर्गस्थापत्यविशारद, अद्वितीय योध्दा व द्रष्टा असलेला माणूस जंजिर्‍याच्या माग इतका हात धुवुन लागला होता यावरुन जंजिर्‍याचे महत्व ओळखायला हवे.

इतर राजकारणात जंजिरा काहि महाराजांच्या डोळ्यासमोरुन हलत नव्हता. त्यांनी जंजिरा जिंकून देणार्‍यास १ मण सोने व अजून काहि बक्षिसे जाहिर केली. होळिच्या सणासाठी महाराज रायगड जवळच मुक्काम करुन होते. होळिची शिकारीसाठी त्यांना जळातील "मगरच" हवी होती. होळिचा दिवस उजाडला. दंडा-राजपुरीमधील  मराठ्यांनी देखिल होळिचा सण साजरा केला. खरे म्हणजे नियमानुसार किल्ला - छावणीत कुठलेहि मादक पदार्थ आणायला बंदि होती मात्र मराठे नशेत होते (बहुदा भांगच असावी). आणि सिद्याचा हल्ला आला. ४००-५०० माणसांनी दंडा-राजपुरीवरती हल्ला केला. समुद्रातुन - जमिनीवरुन हल्ला चढवला. मराठे गोंधळले. तरी तटावरुन चढणार्‍या काहि सिद्यांना त्यांनी कापून काढले. मात्र वाढता जोर बघून सिद्यांवर दारुगोळा वापरावा म्हणून दारु कोठार उघडले, अचानक अपघात झाला आणि अख्खे दारुचे कोठार जबरदस्त भडका होऊन उडाले. सिद्दि - मराठे दोघेहि घाबरले, पळापळी सुरु झाली. अचानक  सिद्दि याकूत ओरडू लागला "खस्सू खस्सू!" - हि सिद्यांची युध्दगर्जना. आपला नेता सुखरुप आहे हे बघून सिद्यांना चेव चढला मराठ्यांची सरसकट कत्तल सुरु झाली. जंजिरा मराठ्यांना मिळण्याऐवजी दंडा-राजपुरीच पडली. यावेळि महाराज जवळपास चाळिस मैल लांबवरच्या एका गावात झोपले होते, एखाद्याला आपल्या ध्येयाचा किती पराकोटिचा ध्यास असू शकतो हे समजेल -  राजपुरीत हे नाट्य घटत असताना तिथे महाराज अचानक दचकून जागे झाले, निकटच्या लोकांना बोलावून म्हणाले - "राजपुरीवर काहितरी संकट कोसळले आहे खास!"
ताबडतोब जासूद - हरकारे निघाले. दुसर्‍या दिवशी बातमी आली - राजापुरी हातची गेली.

"सिद्दि, उदरातली व्याधी!" या व्याधीवर महाराजांनी आता "विदेशी" औषोधपचार करायचे ठरवले. सुरतेहुन कुमक मिळाल्याने असेल पण सिद्दि मुजोर झाला. इंग्रजहि सिद्याशी संधान बांधून होते. महाराजांनी एकाच दगडात दोन पक्षी मारायचे ठरवले. महाराजांनी इंग्रजांना सिद्यांविरुध्द मदत मागितलीच, पण दुसरीकडे डचांना "आम्हि मुंबई मिळवून देण्याकरता आमचे ३ हजार सैन्य देतो, बदल्यात डचांनी दंडा-राजपुरी घेण्यासाठी मराठ्यांना मदत करावी!" असा करार रिकलॉफ नामक डच वकिलाशी केला. इंग्रजांना हे कळताच "धरणी पोटात घेईल तर बरे!" असे त्यांना वाटले असावे. लगोलग इंग्रजांनी सिद्दि - मराठे यांच्यात तह घडवून आणतो वगैरे बोलणी लावली. हा तह झाला नसला तरी सिद्दि - इंग्रज नरमले हे मात्र खरे.

यानंतर चार वर्ष तुलनेने जंजिर्‍याची आघाडि शांत होती. ऑगस्ट १६७६ मध्ये मोरोपंत पेशव्यांनी दहा हजार सैन्या सकट दंडा-राजपुरीवरती मोठी आघाडि उघडली. रामनगरचे चिवट कोळी राज्य मराठ्यांना शरण आले होते. सिद्दि मात्र समर्थपणे दावा मांडत होता. मोरोपंतांनी पद्मदुर्गावरील सोनकोळ्याच्या म्होरक्या लाय पाटिल यांना बोलावून घेतले.  - "तुम्ही चाकर श्रीशिवछत्रपतींचे. सरकारची चाकरी निकडिची पडली तरी कराल की नाही?"  लाय पाटिलांनी उत्तर दिले - "जी आज्ञा ते प्रमाण!" लगेच पंतांनी आपली कल्पना सांगितली. कल्पना अंगावर काटा आणणारी होती, तीचा स्वीकार करणे म्हणजे आपणहुन यमदुतांना मिठी मारायला जाण्यागत होते - "जंजिरे यांसी शिड्या मात्र तुम्हि लावून द्याव्या. आम्हि हजार बाराशे धारकरी तयार केले आहेत."  पण लाय पाटिल व त्याचे साथीदार वाघाच्या काळाजाचे असावेत अन्यथा कलालबांगडि, चावरी, लांडाकासम सारख्या राक्षसी तोफा आ वासून शत्रूचा ग्रास घ्यायला आसुसल्या होत्या त्याला शिड्या लावण्याचे धाडस स्वप्नातहि कोणी केले नसते. त्यांनी चक्क जंजिर्‍याला शिड्या लावल्या. काय अडचण आली ते इतिहासाला ठाऊक नाहि, परंतु रात्र संपून पहाट होऊ लागली तरी पंतांचे धारकरी आलेच नाहित. आता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. सिद्याला कळले असते तर सगळे मारले गेलेच असते शिवाय सिद्दि सावध झाला असता. पहाट होता-होता लाय पाटिल नाईलाजाने परत फिरले. झाल्या प्रकाराने मोरोपंत ओशाळले - "आम्हापासून कोताई जाली, धारकरी याहि माघार घेतली, आम्हापासोन अंतर पडले हे खरे!" मोरोपंत रायगडि परतले ते लाय पाटलांना घेऊनच. महाराजांपर्यंत हा पराक्रम पोहोचला होताच. महाराजांनी लाय पाटिल, पद्मदुर्गाचे हवालदार, सरनौबत, कारकून यांचा यथोचित सन्मान केला. लाय पाटलाला महाराजांनी पालखीचा मान दिला. लाय पाटिलांना नम्रतापूर्वक तो नाकारला - "जी आम्हि दर्यावरले लोक, पालखी नको!" महाराज उलट अजून खुष झाले. महाराजांमधला गुणग्राहक व दाद देणारा जाणकार जागा झाला, महाराजांनी पेशव्यांना आज्ञा केली - "गलबत बांधोन त्या गलबताचे नाव "पालखी" ठेऊन लाय पाटिल यांचे स्वाधीन करणे!" याच वेळि लाय पाटलाला दर्याकाठी सरपाटिलकिहि बहाल केली. जंजिर्‍याने पुन्हा मराठ्यांना हुलकावणी दिली.

१६७६ च्या मध्यावर जंजिर्‍यात पुन्हा भांडणे लागली. सिद्दि संबुल व सिद्दि कासिम यांच्यात वितुष्ट आले. औरंगजेबाने दंडा-राजपुरीची जहागिरी सिद्दि कासिमला दिली. मात्र सिद्दि संबूल त्यावरुन आपला हक्क सोडायला तयार नव्हता. ऑक्टोबर १६७७ मध्ये मुंबईच्या माझगाव बंदरा जवळ दोघांत छोटि लढाई देखिल झाली असावी. मात्र मुघलांनी सिद्दि कासिमची बाजू घेतल्याने सिद्दि संबूल हताश झाला व तडक मराठ्यांना येऊन मिळाला. १६७७ च्या दिवाळित सिद्दि कासिमने याचा राग काढायला मुंबई बंदरातून बाहेर पडून कोकण किनारपट्टिवरील जनतेत लुट चालवली. एप्रिल १६७८ मध्ये तो परत मुंबई-बंदरातील छावणीत गेला. या सर्व प्रकरणाच्या दरम्यान महाराज कर्नाटक स्वारीत होते. मे १६७८ मध्ये ते रायगडावर परत आले. सिद्दि कासिमला धडा शिकवायला ४ हजार सैन्यासह दर्यासारंग व दौलतखानाला पनवेलला पाठवले. मराठी आरमाराने माझगाव बंदरात सिद्याच्या आरमाराची कोंडि करुन त्याचे आरमार जाळून काढावे असा महाराजांचा मनसुबा होता. एकदा सिद्याचे आरमार पांगळे केले कि सिद्दि संबूळचीच मदत घेऊन जंजिर्‍याला भगदाड पाडायला वेळ लागणार नाहि असा महाराजांचा सहाजिक पवित्रा होता. पण सिद्दि कासिमने शहाणपणाने आपली सर्व गलबते सुरतेकडे हाकली. नंतर समुद्र खवळला असल्याने मराठी आरमाराला मोठी हालचाल करता आली नाहि. पोर्तुगिज व इंग्रज हे सिद्याच्या बाजूने उभे राहिले. कारण त्यांना माहित होते कि एकदा सिद्दिचा पाडाव होऊन जंजिरा महाराजांना मिळाला कि महाराज पश्चिम किनारपट्टिवरुन त्यांनाहि हाकलून देतील. सर्व कारणांनी जंजिरा घेण्याचा मनसुबा पुन्हा उधळला गेला. या घटने नंतर मात्र महाराजांना जंजिर्‍यावर मोठी मोहिम काढता आली नाहि.

महाराजांच्या निर्वाणानंतर सत्ता छत्रपती शंभूराजांकडे आली. शंभूराजांनी ९ वर्षात १००हुन अधिक लढाया केल्या. त्या हिशोबाने महिन्याला एक मोठी लढाई त्यांनी केली. त्यांना स्वस्थता मिळालीच नाहि. त्यांच्या या सर्व लढायांचा अभ्यास होणे गरजेचे आहेच पण जंजिरा मोहिम हि त्यांच्यातल्या कल्पक योध्याची नव्याने ओळख करुन देतात. औरंगजेबाची फूस मिळाल्याने सिद्याने स्वराज्यात घुसून पनवेल ते चौल पर्यंतचा पट्ट लुटला, जनतेला अक्षरश: उध्वस्त केले. संभाजीराजे संतप्त झाले. दौलतखानाच्या हाताखाली दिडशे गलबते दिली. व मोहिम दादजी रघुनाथाला देऊन सांगितले - "तुम्ही सिदिचा पाडाव करुन या, अष्टप्रधानातील एक पद तुम्हांस देऊ!" दादजी - दौलतखानाने १६८२ साली जंजिरा वेढला महिनाभर किल्यावर तोफा डागल्या. तट काहि ठिकाणी कोसळला पण सिद्दि दाद देईना. तो सुध्दा तोफा चालवून एका ठराविक अंतरापेक्षा मराठी गलबतांना जवळ येऊ देत नव्हता. संभाजी महाराजांनी आता अंतर्भेद करायचे ठरवले. खंडोजी फर्जंद, ज्यांनी साठ मावळ्यांच्या साथीने पन्हाळ्यासारखा बुलंद किल्ला स्वराज्यात आणला त्यांची निवड यावर केली. मी संभाजीचा हाडवैरी, महाराज गेल्यावर जुन्या जाणत्यांची पत्रास शंभूराजा बाळगत नाहि वगैरे खोटि कारणे देऊन ते काहि लोकांसोबत सिद्याला मिळाले. सिद्दि खूष झाला. मात्र तेथली एक बटकि हुशार निघाली. तीला कोंडाजी फर्जंदांचे खरे स्वरुप कळले तिने लगोलग सिद्याला सगळे सांगितले. कोंडाजींसारखा योध्दा सिद्याने हालहाल करुन मारला. बहुदा त्यांचे मुंडके संभाजी राजांना भेट म्हणून पाठवले होते. संभाजी महाराज अतिशय दु:खी झाले. मराठे झाल्या प्रकाराने हादरले त्याचा फायदा घेऊन सिद्याने जोर केला व मराठी आरमारावर तुटुन पडला. मराठ्यांना माघार घ्यावी लागली.

हा पराभव व कोंडाजींचा मृत्यु संभाजी महाराजांच्या जीव्हारी लागला. आपल्या स्वभावाशी सुसंगत अशी धक्कादायक योजना आखली. प्रभू रामचंद्र लंकेपर्यंत सेतू बांधू शकतात तर राजपुरीच्या किनार्‍यापासून ते जंजिर्‍यापर्यंतची खाडी असे कितीसे अंतर आहे? लगोलग कामाला सुरुवात झाली. जळातून  - स्थळातून सिद्याला चिमटित पकडायचा निश्चय शंभूराजांनी केला. अर्धाधिक खाडि भरली देखिल. सिद्याची त्यावर होणारी आक्रमणे परतवून लावली जात होती रोज सेतु जंजिर्‍याच्या जवळ येऊ लागला. सिद्याला आपली मृत्यू घंटा ऐकू येऊ लागली. थोड्याच दिवसात राजापुरीचे दगड जंजिर्‍याला लागणार हे दिसत होते पण सिद्याने सुदैव कि औरंग्याने स्वराज्यात रेटा वाढवला संभाजीराजांना हि मोहिम सोडुन स्वराज्याच्या दुसर्‍या आघाडिवरती धावून जावे लागले. मात्र दादजी रघूनाथ मागे राहून वेढा चालवत होता. पण शंभूछत्रपती असे तडकाफडकी गेल्याने सैन्यातला उत्साह निश्चित कमी झाला. पावसाळ्यात आरमाराचा वेढा हटवावा लागला. याचा फायदा घेऊन सिद्याने उलटा हल्ला केला व दादजी रघूनाथालाच महाडपर्यंत पिटाळले. इतकेच नव्हे तर सूड म्हणून दादजी रघूनाथाच्या बायकोचे अपहरण केले.

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तर उलटच घडले. स्वराज्यावर औरंग्याचा वरवंट फिरत होता. त्याने स्वराज्याची राजधानीही जिंकली, औरंगजेबाने हा किल्ला घेतला खरा पण तो सांभाळणे त्याला जड होऊन बसले. कारण गायकवाड, गोळे यांसारखे स्वराज्याचे पाईक, कांगोरी किल्यावरुन त्याला सतावत होतेच. गड मिळुनही जीवाला स्वस्थता लाभेना. अखेर वैतागुन त्याने किल्ला जंजिर्‍याचा सिद्दि खैरीयतखान याला दिला. मराठ्यांना दुर्दैवाने जंजिरा कधीच जिंकता आला नाही, पेला ओठाशी आला म्हणतानाच दरवेळि तो उडवला जात असे. मात्र सिद्यांनी गडावर जवळपास ४० वर्षे फतकल मांडली होती. अखेर ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठांनी घेतला.



दोन गाद्यांच्या स्पर्धेतही मराठ्यांनी सिद्याला स्वस्थता लाभू दिली नाहि. त्यातून पेशवे बाळाजी विश्वनाथ या सिद्यामुळेच श्रीवर्धन मधून परागंदा झाले होते. त्यामुळे त्यांना कोकणी जनतेची स्थिती माहितहि होती व सिद्यावर रागही होताच. इ.स. १६८९ च्या सुमारास म्हणजे शंभूछत्रपतींच्या हत्येनंतर सिद्दीने उचल खाल्ली त्यामुळे त्यांना श्रीवर्धन सोडावे लागले. भट घराणे आंग्र्यांना सामिल आहेत या संशयाने सिद्दिने भट घराण्याचा छळ चालु केला. त्यांच्या "जानोजी" नावाच्या भावास सिद्दीने पोत्यात घालुन समुद्रात बुडवल्याची कथा आहे. त्याच किंवा तशाच कारणास्तव पिढीजात देशमुखी सोडून "बाळाजी भट" हे "भानु" कुटुंबा बरोबर सातार्यास आले. सिद्दीच्या हशमांनी पाठलाग सुरु केल्या वर मुरुड येथील वैशंपायन कुटुंबाकडे त्यांनी काही आठवडे आश्रय घेतला. बाळाजी बरोबर असलेल्या "भानु" कुटुंबात ३ भाउ होते. "हरी महादेव, बाळाजी महादेव आणि रामजी महादेव." त्या पैकी "बाळाजी महादेव" हा "नाना फडणवीस" याचा आजा.१७१६ मध्ये आग्र्यांनी सिद्दिवरती हल्ल चढवताच बाळाजी विश्वनाथांनी त्यांना मदत केली. सिद्दि त्याने नरमला. १७४६ मध्ये मध्येहि असच झालं, मात्र "सिद्दि सात रावणासारखा दैत्य" असून नानाजी सुर्वे यांनी त्यांचा नेता युध्दात मारला, त्यामुळे सिद्दि रेहमान गळपटला, मराठ्यांना शरण आला. आपल्या १२ महालांपैकि ७ महाल पेशव्यांना दिले.

१७५६ साली मात्र होऊ नये ते घडले कान्होजी जिवंत असेतो कोकणाला गोर्‍यांच्या पांढर्‍या पायांचा स्पर्ष झाला नाही. मानाजी - तुळाजी हे त्यांचे दोन पुत्र. आरमारी युध्दात तुळाजी अतिशय प्रविण होता. इंग्रजांचे एक गलबतहि त्याच्या नजरेतून सूटत नसे. इंग्रज कान्होजीला कावले होते. शाहू महाराजांनी त्याला सरखेल पदवीहि दिली. तुळाजीने, मानाजीला दूर सारुन सगळे विजयदुर्गाला मुख्य ठिकाण बनवून आरमार आपल्या हातात घेतले. मात्र पेशव्यांशी त्याने वैर धरले. पेशव्यांनी मानाजीचा पक्ष घेतला. हे बघून तुळाजी अजून बिथरला. त्याने पेशव्यांना दिली जाणारी सालाना थैली बंद केलीच, वरुन मानाजीला सुईच्या अग्रावर राहिल इतकि मातीहि देणार नाहि असा दुर्योधनी पवित्रा घेतला. पेशव्यांनी थैलीसाठी वकिल पाठवला त्याचे नाक कापून त्याला परत धाडले. आता पेशवे गप्प बसणे शक्य नव्हते. पण तुळाजीला ताळ्यावर आणावे इतके आरमार नव्हते. इथे इतिहासातली एक घोडचूक घडली मराठ्यांनी इंग्रजांची मदत मागितली. इंग्रज याचीच वाट बघत होते. १७५६ मध्ये अ‍ॅडमिरल वॉट्सन समुद्रातुन तर कर्नल क्लाईव्ह जमिनीवरुन विजय दुर्गावर तुटुन पडले. इंग्रजांच्या मार्‍याने गलबते पेटू लागली. विजयदुर्गावरच्या इमारती आगी लागून कोसळू लागल्या. तब्बल ७० गलबते आगिच्या भक्ष्यस्थानी सापडली. तुळाजीने सगळी सत्ता मानाजीला देऊन हात झटकले. तुळाजी नेस्तनाबुत झाला पण शिवछत्रपतींनी दूरदृष्टिने अथक मेहनत घेऊन उभे केलेले आरमार आता पक्षाघाताचा झटका आल्यागत झाले. उंदरावरच्या रागापोटि घराला चुड लावण्याचा प्रकार झाला. मराठ्यांच्या आरमाराचा दरारा जवळपास संपला. वरुन पुढल्या दोन वर्षांकरता विजयदुर्ग इंग्रजांकडे गेला. याचे दुरागामी परीणाम होणार होते.

१७६१ मध्ये रामजी बिवलकर, नारो त्र्यंबक, रघोजी आंग्रे यांसारखे झुंझार पुरुष जंजिर्‍यावर चालून गेले. पेशव्यांनी यावेळिही इंग्रजांची मदत घेतली. सिद्याची कोंडि करुन तो कधी शरण येतो याचीच वाट सगळे बघत होते. पण सिद्दी वस्ताद. त्याने वेढ्यातून पळ काढला व थेट मुंबईला जाऊन इंग्रजांचे पाय धरले. इंग्रजांनी उरले सुरले आरमार सज्ज करुन ते जंजिर्‍याजवळ आले. व मराठ्यांना उलट प्रश्न विचारला - "जंजिर्‍यावर हल्ला का केलात? तुम्हि आमचे मित्र, सिद्दिहि आमचा मित्र त्याने जंजिरा व कासा आमच्या स्वाधीन केला आहे त्यामुळे जंजिर्‍यावरचा हल्ला हा इंग्रजांवरचा हल्ला आहे. इथून निघून जा अन्यथा आंम्हाला तोफांचा वापर करावा लागेल!" त्यांनी जंजिर्‍यावर युनियन जॅक फडकावला, सिद्दि पुन्हा वाचला. मराठ्यांना हात चोळत बसावे लागले, कारण एकच - १६५६ मध्ये बुडवलेल्या आपल्याच गलबतांची भुते आता मराठ्यांना त्रास देत होती. तेव्हा आरमार असते तर इंग्रजांशी सागरी हुतुतु खेळता आला असता. नपेक्षा इंग्रज मध्ये पडलेच नसते. इंग्रजांनी हि दमदाटि केव्हा केली असेल??  उदगीरच्या लढाईत निजामाला पेशव्यांनी लोळवले होते तेव्हाची, तेव्हा पानिपत व्हायचे होते, मराठ्यांचे राज्य अटक ते कटक पसरले होते, दिल्लीला मराठे डाव्या पायाच्या अंगठ्याखाली चेपत होते तेव्हाची. हे इंग्रज कश्याच्या जोरावर करत होते? तर बलाढ्य आरमाराच्या. विजयदुर्गाचे प्रकरण मराठ्यांना जंजिर्‍यावरती इतके महाग पडेल असे वाटलेहि नसावे.

जंजिरा घेण्याचा शेवट्चा मोठा प्रयत्न म्हणजे नाना फडणविसांनी केलेले राजकारण. त्यावेळि जंजिर्‍यावर सिद्दि बाळुमियॉ होता. पण त्याचा सेनापती सिद्दि अबदुल्ला याने गादि बळकावली. सिद्दि बाळुमियॉ पळून पुण्यास आला. नाना फडणवीसांनी त्याला घोळात घेतले "एवीतेवी तुझी पाय काहि जंजिर्‍याला लागणार नाहित, त्यापेक्षा तो तु आम्हांला दे, त्याबदल्यात तुला स्वतंत्र जहागीर देऊ!" हा करार इंग्रजांच्याच मदतीने झाला. सिद्दि बाळुमियॉला सुरतेजवळ असलेली सचिन नामक सुपिक प्रांताची जहागीर दिली त्याने "कागदावरती" जंजिरा मराठ्यांना दिला. मात्र इंग्रजांनी यावेळि थातुरमातुर कारणे दाखवून हात वर केले, जंजिर्‍याला जिंकू शकेल असे आरमार मराठ्यांकडे नव्हते त्यामुळे सिद्दिला धक्काहि लागला नाहि.


पुढे इंग्रजांचे राज्य भारतावर सव्वाशे वर्षे होते. जंजिरा मात्र संस्थान म्हणूनच राहिले. अखेर भारत स्वतंत्र झाला तेव्हाच जंजिर्‍यावरचा सिद्याचा अंमल संपला आणि जंजिर्‍याचे संस्थान भारतात विलिन झाले. अशीहि साठा उत्तराची असफल  कहाणी संपूर्ण झाली.

 - सौरभ वैशंपायन
=============================
संदर्भ -
१) शककर्ते शिवराय - शिवकथाकार विजयराव देशमुख
२) महाराजांच्या मुलुखात - शिवकथाकार विजयराव देशमुख
३) महाराष्ट्राची धारातीर्थे - पं. महादेशशास्त्री जोशी.
४) राजाशिवछत्रपती - शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे.


Sunday, January 9, 2011

युध्दाकडून युध्दाकडे



१० जानेवारी १७६० .... महाराष्ट्रात मकरसंक्रांतीचा सण मोठ्या आनंदानं साजरा केला जात होता. तिळगुळ वाटले जात होते, गुळाच्या पोळ्यांच्या पंक्ती उठत होत्या. त्याचवेळि तिथे उत्तरेत, दिल्ली वाचवताना कामी आलेला दत्ताजी बहाद्दराचा बिन मुंडक्याचा मुडदा, बुराडि घाटावर यमुनेच्या वाळवंटात भडाग्नि घेत होता. जव्हेरगंजाच्या पाठीवर सोन्या-चांदिच्या अंबारीत मिरवणार्‍या "शिंदे स्वारीच्या" नशिबी साधा मंत्राग्नी सुध्दा नसावा ह्याहुन दुर्दैव ते काय???

वाट्टेल त्या किंमतीवर दिल्ली शत्रुच्या ताब्यात पडू देणार नाही ह्या चिरडिने, स्वकियांनीच निमंत्रणांच्या अक्षता धाडुन बोलावलेल्या अब्दालीच्या परचक्राची पहीली लाट शिंद्यांच्या लष्कराने आपल्या छातीवर झेलली होती. अफगाणिस्थान आणि  महाराष्ट्र दिल्लीसाठी समोरासमोर उभे ठाकले होते.

राष्ट्रावर अघोरी संकट आलं होतं, युध्दातील पहिली आहुती पडली होती. इतिहासपुरुषाची पाऊले पानिपताकडे पडायला सुरुवात झाली होती. इतिहासाचा प्रवास युध्दाकडून युध्दाकडे सुरु झाला होता.

 - सौरभ वैशंपायन

Thursday, November 26, 2009

तर्पण




सूर्यग्रहणाआधी जसे सूर्याला त्याचे वेध लागतात तसेच वेध गेल्या दोन दिवसांपासून सामान्य मुंबईकरांपासून ते मिडियापर्यंत सगळ्यांना लागले होते. निमित्त होते २६/११ च्या वर्षपूर्तीचे. मी ठरवलं होतं यावर नाहि लिहायचं. कारण हर तर्‍हेने हा विषय गेली वर्षभर चर्चिला गेला आहे. पण मनातली अस्वस्थता अखेर आता इथे कागदावर बाहेर पडतेच आहे. का?? माहित नाहि! पण त्या घटनेशी प्रत्येक मुंबईकराचं नात जडलय. आणि हे नातं म्हणजे नुसते भावनांचे बळे बळे काढलेले कढ नव्हेत किंवा कुणाला दाखवण्यासाठी छाती पिटुन काढलेले हेलहि नव्हेत. २६/११ ला आतुन हादरलेला मुंबईकर आत्ताशी कुठे सावरतोय. दबकत बिचकत ट्रेन मध्ये चढताना, सीएसटि, ताज इथे उभं राहताना परत परत ती खपली निघतेय. मुंबई स्पीरीट - वर्क स्पीरीट नावाच्या कुबड्यांवर मुंबई उभी राहते आहे. आणि अशीच अनंतकाल त्या कुबड्यांवर उभी राहिल. “मजबुरी का नाम मुंबई स्पीरीट!” काहिंना हे पटेल तर कोणाला अजीर्ण होईल, पण हि वस्तुस्थिती आहे. पण मजबुरी म्हणुन का होईना त्याच वर्क स्पीरीटसाठी मोठ्या मनानं टाळ्या वाजवाव्यात म्हणून नाहि नाहि म्हणताना लिहितोय.

आज सकाळी जाग आली तीच सकाळच्या टि व्ही वरील बातम्यांनी. त्यातली पत्रकार अखंड बडबडत होती मध्येच ती म्हणाली बरोबर एका वर्षापूर्वी याच ताजवर अनपेक्षीत दहशतवादि हल्ला झाला. डोक्यात सणकच गेली. अनपेक्षीत??? RAW आणि सरकारी यंत्रणांना धडधडित संदेश मिळाला होता मुंबईवर समुद्रमार्गे हल्ला होऊ शकतो. आणि म्हणे अनपेक्षीत हल्ला. खरी प्रश्नांची सुरुवात इथुन होते. त्या संदेशाचं काय केलत?? हा प्रश्न स्ट्रायकर सारख्या दुसर्‍या प्रश्नावर आदळतो आणि बघता बघता हजारो प्रश्न डोक्यात विखुरतात.

या ठिकाणी हल्ला कसा झाला? कोणी केला? सरकार किती छान झोपलं होत? याची चर्चा करण्यात हशील नाहि. ते सगळ्यांना माहित आहे. कौतुकाची गोष्टि अशी आहेत कि आमचं साहित्यच काम करत नव्हतं. आमच्या पोलिसांकडे असलेल्या बंदुकिंनी आपण शेवटची गोळी कधी ओकलो होतो हे आठवायचा प्रयत्न केला तर तीला आठवेच ना!!! आणि आमची “बुलेटप्रुफ जॅकेट्स?” बेसिकली ती फक्त जॅकेट्स होती कारण त्यात बुलेट थांबल्याच नाहित. किंवा असतील असतील जॅकेट बुलेटप्रुफच असतील पण कसाब आणि कंपनीच्या गोळ्यांमध्येच डिफेक्ट असेल. कुठल्या कंपनीच्या गोळ्या वापरता तेहि विचारा त्याला चौकशीत.

करकरेंनी सारखी मदत मागुन देखिल कामा हॉस्पिटलकडे मदत का पाठवली नाहि?? कि पोलिस दलाचा शिरस्ता आहे कि सहकार्‍यांनी मदत मागितली तर शपथेवर ती मिळु द्यायची नाहि?? कारण दोन महिन्यांपूर्वी गडचिरोलित जे १६ पोलिस शहिद झाले त्यांनी सुध्दा लवकरात लवकर हॅलिकॉप्टरची मदत पाठवा असे वायरलेस वरुन सांगितले होते, मदत येते आहे हे ते किमान चार तास “ऐकत” होते. केवळ दारुगोळा संपला म्हणुन नक्षलवाद्यांनी त्या बहाद्दरांना कुत्र्याच्या मौतीने मारले. याउलट आमच्या माननिय नेत्यांना निवडणूकिच्या प्रचाराला कशी भराभर हॅलिकॉप्टर्स मिळतात हे बहुदा E=mc² पेक्षा कठिण समिकरण आहे. पुढचे प्रश्न कामटेंना कामा हॉस्पिटलपाशी कोणी जायला सांगितले? आमचे तीन मोठ्या पदावरील अधिकारी एकाच गाडित का बसले? अलम दुनियेला आग लागली तरी प्रोटोकॉल मध्ये न बसणारी गोष्ट करायची नाहि असे स्पष्ट आदेश त्यांना ट्रेनिंगमध्ये असताना हि चूक त्यांच्याकडुन का घडली? ते जबर जखमी आहेत हे कळल्यावर सुध्दा अर्धातास त्यांच्याकडे कोणीच का फिरकले नाहि? कंट्रोलरुमला करकरेंनी किमान ६ - ७ संदेश पाठवुन देखिल “करकरे कुठे होते हे मला माहित नव्हते!” असे राकेश मारीया कसे म्हणू शकतात? करकरेंचं सो कॉल्ड बुलेटप्रुफजॅकेट कसं गायब झाल? हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत त्यांच्याच स्ट्रेचरवर होतं म्हणे. मज पामराच्या डोक्यापलिकडचे प्रश्न आहेत.

या सर्व हल्ल्यात सर्वात महत्वाची बाब “नरीमन हाऊस” ज्या गोष्टिकडे सगळ्यांच सर्वात जास्त दुर्लक्ष झालं ते ठिकाण. इथे इस्त्रायली किंवा ज्यू लोकं राहतात, हे २७ तारखेपर्यंत आजुबाजुच्या इमारतीमधील लोकांनाहि महित नव्हते ते ठिकाण अतिरेक्यांनी किती अचूक टिपले हे पाहता ताज-सीएसटी-ट्रायडंट हे खरंतर फक्त “स्क्रीन सेव्हर” असावेत आणि मेन डेस्क्टॉप वेगळाच असावा हे समजतं. कॅफे लिओपोल्ड देखिल केवळ गोरी चमडि मारायची आणि मुंबई परदेशींसाठी असुरक्षित आहे हे जगाला दाखवायचं त्याने भारताच्या आर्थिक राजधानीला “डॉलर्स” मध्ये फटका बसला पाहिजे यासाठी निवडलं. बाकि ताज- ट्रायडेंट हे उच्चभ्रू तर सीएसटी आम जनतेला सैरभैर करण्यासाठी वापरलं. नरीमन हाऊस एकदा उडवलं कि आपोआप इस्त्राइल – भारत यांच्यात कटुता निर्माण होणारच हे ते ओळखुन होते. आतातर हेडली प्रकरणामुळे ज्यूंची भारतातील वसतीगृहे वा धर्मस्थळे हि “मोसादच्या” कारवायांची ठिकाणे असु शकतात हे ठरवुन त्यांवर निशाणा साधुन ते इस्त्राइलला धमकवण्याची नवी पध्दत सुरु करत आहेत.

बाकि काहिहि म्हणा, या अतिरेक्यांना आपण एखादे “मॅनेजमेंट” कॉलेज काढुन दिले पाहिजे. ज्या मास्टर माईंड ने हा कट रचला त्याला केवळ यासाठी धन्यवाद दिले पाहिजेत कि “बाबा आमच्या व्यवस्थेत किती भगदाडे आहेत हे दाखवलस हे उपकारच होय!” या घटनेनी गल्लीपासुन ते दिल्लीपर्यंत भल्याभल्यांच्या बुडाखालच्या खुर्च्या हिसकावुन घेतल्या. लोकांनी सगळं ऑपरेशन संपल्यावर पुढचे काहि दिवस “we want CEO not CM!” असे फलक झळकावले. लाखो रुपयांच्या मेणबत्या जाळल्या, ढिगाने गुलाबांची निर्माल्ये झाली, हे सगळं बेगडि होतं असं मी मुळीच म्हणणार नाहि उलट ती त्यावेळची स्वाभाविक प्रतिक्रियाच होती आणि ती बरोबरहि होती. पण आपला ताणून झोप काढायचा दिवस दर पाच वर्षांनी एकदा येतो. आपला CEO कोण व्हावा हे आम्हि तेव्हा ठरवत नाहि. मग ५२% झालेल्या मतदानावर आपापसात “मांडवली” करुन ते सत्तेवर बसतात. त्यांना सरकार स्थापन करायला पंधरवडा लागतो याची लाजहि वाटत नाहि. याला कारण आपणच आहोत.

आता प्रत्येकाने आपापली जबाबदारी मान्य करायची वेळ आलीये. अन्यथा शहिद झालेले १६ पोलिस आणि १ उमदा NSG कमांडो यांच बलिदान केवळ फुकट गेलं असच म्हणावं लागेल. त्यावेळि अथवा त्यानंतर समाजाने काय चुका केल्या हे बघितले पाहिजे. सोपे उदाहरण – नरीमन हाऊस! काय घडतय हे दुसर्‍यांच्या खांद्यावरुन वाकुन वाकुन बघायची सवय त्यादिवशीहि आपण जाहिर केली. तिथे नरीमन हाऊस मध्ये जे काहि सुरु होते तो तमाशा खचित नव्हता, पण गर्दि करायचा काय तो उत्साह? वा?? पोलिसांची कामं हि अशी वाढतात. एखाद्या अतिरेक्याने खिडकितुन एखादि फैर खाली चालवली असती तर गोळ्यांनी ८-१० आणि पळापळित - चेंगराचेंगरीत ८० जण मेले असते. तीच गोष्ट मिडियाची, सबसे तेज च्या नावा खाली कुठली बातमी? कशी द्यायची? काय दाखवायचं? किती दाखवायचं? याचं भानच TRP च्या घाणेरड्या स्पर्धेत मिडियाला राहिलं नव्हतं किंवा रहात नाहि हि १०१% सत्य गोष्ट आहे. कदाचित काहि पोलिस आणि एका NSG कमांडोच्या रक्ताचे डाग मिडियावर कायमचे लागले आहेत भले ते कितीहि नाकारोत. कराचित बसलेले आका जे संदेश देत होते त्यावरुन ते धडधडित समोर आलय.

या सगळ्यात अतिशय कौतुक करावं आणि पाठ थोपटावी असे काम मुंबई अग्निशमन दलाने केले. पोलिस – NSG इतकेच त्यांचे कौतुक करायला हवे जे तितकेसे झाले नाहिये. समोर केवळ मृत्यु तांडव करत असताना कुठल्याहि सुरक्षा साधनांशिवाय ताज आणि ट्रायडेंटला भिडायच हि कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. आणि त्या लोकांनी सलग ७२ तास ते काम यशस्वीपणे करुन दाखवलय. नेहमीप्रमाणेच जीवापेक्षा कर्तव्याला पुढे ठेवणार्‍या त्या हिरोंची मुंबई कायमची आभारी राहिल.

एका वर्षात सुरक्षेत ज्या सुधारण्या घड्ल्या त्या स्वागतार्ह आहेतच पण त्या पुरेश्या नाहित हेहि खरयं. सीएसटि सारख्या प्रचंड गर्दिच्या ठिकाणी अजुन सुरक्षा ढिलीच आहे. आणि असं किती स्टेशन्सवर सुविधा कश्या पुरवणार हा नविन प्रश्न आहेच. कितीहि उपाय केले तरी तोकडेच ठरतील हे सत्य आहे. नव्याने फोर्स वन हि यंत्रणा स्थापन केलेली असली तरी त्याचा उपयोग व्हायला हवा आणि त्याचा ताण दुसर्‍यावर पडता कामा नये. हे सगळं यासाठी म्हणतोय कि काल पेपर मध्ये बातमी होती कि एका वर्षात जरुरिच्या शस्त्रांची खरेदि सरकारने केलीच नाहिये. फोर्स वनला AK -47 कमी पडु नयेत म्हणुन क्विक रीसपॉन्स टिम च्या “कॉम्बॅट व्हॅन” वरील AK -47 काढुन घेतल्या आहेत. मग जमेल तेव्हा शस्त्रे खरेदि केल्यावर ह्या रायफल्स परत केल्या जातील. सगळा आनंदि आनंद आहे. म्हणजे न होवो पण उद्या परत असा हल्ला झालाच तर NSG टिम येईतो कॉम्बॅट टिम काय गाडि साईडला लावुन भजन करणार??? आणि कसली क्विक रीस्पॉन्स टिम?? करकरेंनी मदत मागितल्यावर क्विक रीस्पॉन्स मिळालाच नाहि. हि टिम भलत्याच बिल्डिंगच्या छतावर मुक्काम ठोकुन होती कारण त्यांना वरिष्ठांकडुन आदेश मिळाले नव्हते. उद्या फोर्स वनचा असा बोर्‍या न वाजला म्हणजे मिळवलं.

याखेरीज साध्या साध्या बाबतीत जागरुकता येणे गरजेचे आहे. ट्रेन मध्ये ८ – १० स्टेशन नंतर एखादि बॅग हलली नसेल, व ठेवणारी व्यक्ती कोण हे समजत नसेल तर ती कोणाची आहे हा एक प्रश्न विचारायचा त्रास आपण घ्यायला हवा. पर्यटनाच्या नावाखाली अनेक महत्वाच्या वास्तुंचे फोटो कोणीहि काढतो. महत्वाच्या ठिकाणी फोटो काढण्यास सरकारने बंदि करावी. सरकारी कार्यालयांचे फोटो कोणी घेत असेल अथवा महत्वाच्या वास्तुंच्या पार्श्वभूमीवर कोणी स्वत:चे फोटो काढुन घेत असेल तर पोलिस व सामान्य जनता यांनी त्यांना हटकायला हवे. गुगल मॅप कितीहि प्रगत झाले तरी प्रत्यक्ष इमारतींचे फोटो काढल्या शिवाय अतिरेकि कुठलिहि योजना बनवत नाहित. म्हणून शक्य तिथे या गोष्टि राबवल्या पाहिजेत. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्कालि व्यवस्थापनांचे गट मुंबई अथवा महत्वाच्या शहरांतील प्रत्येक उपनगरांत तयार करवेत. त्यांचा पहिला संपर्क स्थानिक पोलिस ठाण्यांशी होईल अशी व्यवस्था करावी. याने दहशतवादि हल्ला असो वा पाऊस-भूकंप यांसारखे नैसर्गिक संकट याचा फायदा होईलच.

२६/११ जी जखम खूप खोल आहे, नाहि भरणार इतक्यात. भरुहि देऊ नका! असे अपमान धगधगत ठेवायचे असतात. विज्ञान, अध्यात्म, तत्वज्ञान आणि इतिहास हे सगळे एका नियमा बाबत एकमत दर्शवतात – चक्र नेहमी पूर्ण फिरतं. कदाचित हे चक्राच अर्धच आवर्तन असेल, पण गेल्या वर्षभरात खुद्द पाकिस्तानात लाहोर, पेशावर, कराची, इस्लामाबाद इथे जे स्फोट होत आहेत त्यावरुन चक्र त्याचं आवर्तन पुर्ण करायच्या दिशेने जातय. उरल्या आवर्तनात अजुन काय समोर येणार ते नियतीलाच ठाऊक. पण अशी वर्षश्राध्द आणि तर्पण परत न करायला लागोत हिच इच्छा!

- सौरभ वैशंपायन.

Thursday, June 11, 2009

इतिहास

सेंट हेलेनातील तुरुंगातुन नेपोलियन ने आपल्या मुलाला जे पत्र लिहिले त्यात तो म्हणतो – “इतिहासासारखा गुरु नाहि, आयुष्याचे तत्वज्ञान ज्याला म्हणतात ते इतिहासाच्या मननानेच तयार होते!” स्वत: इतिहास घडवणार्‍या माणसाचे हे अनुभवी शब्द आहेत. इतिहास हि काळाची पाऊले आहेत, काळ स्वत: पुढे जाताना हि पाऊले मागे ठेवुन जातो. काळ स्थितप्रज्ञ असला तरी त्याची पाऊले कुठल्या दिशेने पडतील हे समजायला त्याच्या आधीच्या पाऊलांची दिशा बघणे क्रमप्राप्त असते. आणि वेळ पडल्यास राष्ट्र निर्मितीसाठी ती पाऊले बदलण्याची ताकद अंगी बाणावी लागते. इतिहासात काय घडले ह्याचा बारीक अभ्यास केला तर भविष्यात इतिहास घडवता येतो – वाक्य विचित्र वाटेल पण खरे आहे. हिटलर ने सिध्द करुनहि दाखवले. सत्तेत आल्यावर त्याने दरवेळी अश्या कृती केल्या ज्याने जर्मन राष्ट्राच्या अस्मितेला चेतवले जाईल. मग ते व्हर्साय कराराच्या जाहिर चिंध्या करणे असो, किंवा फ्रान्सची शरणागती त्याच गाडिच्या डब्यात घेणे असो. ज्या घटनांनी जर्मनीच्या मानहानीचा इतिहास रचला त्याच घटनांना त्याने उलटे फिरवले. मात्र हाच हिटलर रशियावर हल्ला करताना इतिहासातील काहि गोष्टि नजरेआड करता झाला आणि जर्मनी पराभवाच्या गर्केत फेकला गेला.“

काय करायचे?” या पेक्षा “काय करायचे नाहि?” हे इतिहासापासुन शिकावे. इतिहास बदलणे शक्य नसते वेळप्रसंगी निदान शब्द बदलावेत. इतिहास शिकवतानाच राष्ट्रीय अस्मितेला हात घातला जाईल असा शिकवावा. आपापल्या देशाचा नागडा स्वार्थ कसा साधावा व प्रसंगी दुसर्‍याला नागवुन आपले भले कसे करावे याची उदाहरणे जगाच्या इतिहासात पानोपानी मिळतील. दुसर्‍या महायुध्दाआधी ब्रिटिशांनी जगाचे मातेरे केले आणि नंतर अमेरीकेने. या जगातला असा एकहि भाग नाहि जिथे या दोन उपद्रवी देशांनी अशांतता निर्माण केली नाहिये. स्वत:च्या पोळिवर तुप ओढताना या दोघांनी कसल्याहि नीती नियमांची तमा बाळागली नाहि. किती रक्तपात होतो याची फिकिर केली नाहि. यांनी शस्त्राच्या बळावर आपल्याला हवा तसा इतिहास लिहिला. हवे तसे निष्कर्ष काढले. पण म्हणून काळ त्यांना माफ करेलच असे नाहि. आज दहशतवाद अमेरीकेला उध्वस्त करायला उस्तुक आहे आणि हे अमेरीकेच्या कर्माचेच फल आहे. पण इथे भारताचे बरोबर उलटे झालेय, दरवेळी पडती बाजु घेतल्याने भारतासमोर दहशतवादाचा प्रश्न उभा आहे.

प्रत्येक भूमीचा एक स्वभाव असतो. जसा मध्यपुर्वेच्या भूमीला कायम रक्ताची तहान आहे तशीच भारताची भूमी हि मुळातच शांतताप्रिय भूमी आहे. गेल्या अडिच हजार वर्षात भारताने कोणावरहि आक्रमण केले नाहिये, मात्र भारतावर अव्याहत आक्रमणे झाली. जगात भल्याभल्या संस्कृती आणि साम्राज्ये उदयास आली अणि धुळीला मिळाली, मात्र भारत सगळी आक्रमणे पचवुन आजहि उभा आहे, नाहि म्हणायला काहि कधी भरुन न येणार्‍या काहि जखमा झाल्याहि पण वैदिक संस्कृती मात्र नामशेष झाली नाहि. असे असताना डॉ. आंबेडकरांसारखा विद्वान जेव्हा “हिंदुंचा इतिहास हा पराभवांचा इतिहास आहे!” असे विधान करतो तेव्हा राग येण्यापेक्षा त्रागा होतो. मुळात इतिहास शिकवण्यातच चुक होतेय. जग पालथे घालणारा सिकंदर भारताचे अंगणहि पार करु शकला नाहि, हुण, शक यांच्या टोळधाडि जगभर उच्छाद मांडत असताना भारत त्यांना पुरुन उरला हे का सांगत नाहि? एकछत्री साम्राज्याचे स्वप्न देणार्‍या आर्य चाणक्यांचा इतिहास का शिकवत नाहि? मुघलांचा इतिहास २ धड्यांत विभागुन दिला जातो मात्र शिवछत्रपती, राणाप्रताप एकेका परीच्छेदात संपतात याचे आश्चर्य वाटते. संभाजीराजे आणि थोरल्या बाजीरावांचा २ ओळिंपेक्षा जास्त उल्लेखहि मिळत नाहि. पण दुसर्‍या बाजीरावाच्या पानभर चुका दाखवल्या जातात. १८५७ ला शिपाईगर्दि ठरवले जाते. टिळक मंडालेयात हवापालटाला काय गेले होते आणि वेळ जावा म्हणून गीतारहस्य लिहिला जवळपास अश्या पध्दतीचा इतिहास शिकवला जातो. सगळे क्रांतिकारक एकमेकांच्या कोपरांना ढुश्या देत बिचारे एकाच धड्यात कोंबले असतात. बाकि इतिहास १९२० पासुन सुरु होतो. आणि व्हाया १९४२+ गोलमेज परीषद, लाल किल्यावर संपतो. सगळं कसं मिळमीळीत. बचावात्मक मानसिकता तयार करायची सवयच लागलीये. जरा म्हणून आक्रामकता नाहि. तीच तीच पाठ्यपुस्तके, तीच जरुरीच्या मार्कांपुरती बघायची दृष्टि. तसेहि इ.भू.ना. मध्ये ५० मिळाले कि आम्हि धन्य. खर्‍या अर्थाने उद्याचे नागरीक घडवणार्‍या या तीन विषयांबाबतच कमालीची अनास्था. सन आणि तहांची कलमे लिहिली कि मार्क्स मिळतात. बाकि वासुदेव बळवंत फडके कोण? सुभाषबाबुंनी काय अग्निदिव्य केले? याच्याशी काहिहि सोयरसुतक नसते. शिवरायांना रायगडावर जन्माला घालणारी आणि शिवनेरीवर राज्याभिषेक करवणारी विद्वान मंडळी कमी नाहित. हि आमची इतिहासाबद्दलची आस्था. चित्रपट बनवले तरी त्यात असोका कलिंगच्या राजकुमारीबरोबर नाचतो, आणि अकबराला जोधा शिवाय काहि दिसत नाहि.


आमच्या राजधानीत आजहि घोरी, बाबर, अकबर, हुमायुन, औरंगजेब यांच्या नावाचे रस्ते आहेत, मुंबईच्या संग्रहालयाच्या पाटिवर “छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय” या शेजारी कंसात - “जुने प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय” असे लिहिले जाते. गेट वे ऑफ इंडियाच्या सुशोभिकरच्या नावाखाली करोडो रुपये खर्च होतात पण युनियन जॅक आपल्या बगलेत मारुन शेवटचा ब्रिटिश याच वास्तुमधुन बाहेर पडला असे शिल्प सोडा साधी पाटिहि लावली जात नाहि. शिवरायांचा पुतळा समुद्रात उभा करायला काहि शे करोड रुपये जाहिर करतात पण एकेकाळी महाराजांच्या काळजाचे तुकडे असलेले बेलाग किल्ले मोडकळिस आले आहेत हे सोयीस्करपणे सरकार व जनता विसरते. भारताला स्वातंत्र्य “बिना खड्ग बिना ढाल” मिळाले हे धातांत असत्य सांगताना कोणाची जीभ जराहि अडखळत नाहि. आमचे जवान युध्द जिंकतात आणि नेते त्यांना त्यांच्या सहकार्‍यांच्या रक्तरेषेवरुन परत बोलावुन, "झाले गेले विसरुन जाऊ" अशी चाल न बदलणारी शांततेची रटाळ गाणी गातात. मग आत्मिक समाधानासाठी आम्हि “इस्त्राएल असं नाहि करत!” म्हणुन त्यांच्यासाठी चार टाळ्या वाजवतो आणि शांत होतो. कारण आमचा शालेय इतिहास हा अहिंसा शिकवतो एका कानफटात मारल्यावर दुसरा गाल पुढे करायला सांगतो. निदान आपल्या देशाने जसे वागावे असे वाटते तसे दुसरा देश वागतोय हे दिसल्यावर अशी सहाजिक भावना त्यापाठी असते. मग यातुनच स्वकियांचेच कसे चुकले हेहि सांगणारी कोडगी मनोवृत्ती तयार होते. "अकबर महान सम्राट था, शिवाजी तो लुटेरा था।" अशी गरळ उत्तरेतली तरुण मंडळी इंटरनेटवर ओकताना सापडतात. या वृत्तीला समाजवादि, कम्युनिस्ट किंवा मानवतावादि वृत्ती असेहि समानार्थी शब्द आहेत. ते चुकिचा इतिहास अजुन रंगवुन सांगतात. हे चक्र अव्याहत चालुच राहते. बरं शिकवा पानिपताचा पराभव कोण नको म्हणतोय? पण हेहि सांगा कि हे राष्ट्रावरच संकट एकट्या मराठ्यांनी आपल्या छातीवर घेतलं. अब्दालीला असा फ्टाकारला कि परत दिल्लीत फिरकला नाहि. डंकर्कच्या पळपुटेपणाला यशस्वी माघार म्हणावताना त्यांना लाज वाटत नसेल तर राष्ट्र वाचवताना रणात मरुन पराभव झाल्याची खंत आपण का बाळगावी? पण चर्चेत सर्व गमावुन यशाला गालबोट लावणारे, पराभवाची धुंदि तरी बाळगतील हे शक्य नाहि.


आम्हि आमचा इतिहास लिहित नाहि, मग कोणी ग्रॅंट डफ मराठ्यांचा आद्य इतिहासकार म्हणवला जातो, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराला इंग्रज उठाव-जिहाद म्हणतात आम्हिहि तेच मानतो, जगभरातील नकाशे “POK” पाकिस्तानचा भाग दाखवतात आम्हि आक्षेपच घेत नाहि. तिबेट गिळुन चीन सिक्कीमकडे वळतोय आम्हि निद्रिस्त. स्वत:लाच एकदा विचारा पुर्वेकडील सातहि राज्यांची नावे एका फटक्यात मला सांगता येतात? त्यांची राजधानी कोणती ते मला माहितीये? त्यांचा इतिहास मला माहितीये? त्यांना मी “ए चीनी” अशी हाक मारतो आणि आमच्याशी जोडलेली नाळ हिसडामारुन तोडतो. याच गोष्टितुन इतिहास घडतो, विघटनवादि वृत्ती येते मग ते आपल्याकडे बोट दाखवुन “यु इंडियन” अशी हाक मारतात. काळ अश्या चुकांना माफ करत नाहि.

इतिहासात काय नाहि? देव देश, धर्म, भाषा, विज्ञान, कला, भूगोल या सगळ्याला इतिहासाने वेढले आहे. हाच इतिहास जपा, मनन करा, राबवा अन्यथा कोणी जेम्स लेन येऊन तो विकृत करेल आणि आम्हि एकमेकांची नरडि धरु. परत ये रे माझ्या मागल्या… आम्हि भांडु आणि पुस्तकात परकियांच्या कौतुकाचे पोवाडे गायले जातील.

अजुन काय लिहिणे सुज्ञ असा.

लेखनसीमा।


- सौरभ वैशंपायन.

Saturday, April 11, 2009

वदले छत्रपती...

शिवछत्रपतींसारखा द्रष्टा राजा हजार वर्षांतुन एकदा होतो. शिवछत्रपतींना आपण एक कुशल योध्दा व अतिकुशल राजकारणी म्हणुन ओळखतो पण त्याच बरोबर छत्रपती शिवराय हे कुशल संघटक व जनतेची पोटच्या पोरा प्रमाणे काळजी घेणारे त्यांचा प्रतिपाल करणारे जाणते राजे होते. इतिहासार्य वि. का राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा अतिशय बारीक अभ्यास केला आहे. त्यांनी "मराठ्यांच्या इतिहासाची साधने" हा अनेक खंडांचा ग्रंथच लिहुन काढला आहे. त्यातील एक पत्र इथे देतो आहे. यात महाराजांनी आपल्या अधिकार्‍यांना व सैनिकांना जनतेला त्रास होणार नाहि यासाठी कसे वागावे व घोडे - सैनिक यांची काळजी कशी घ्यावी हे अतिशय स्पष्टपणे लिहिले आहे. महाराज किती दुरवरचा विचार करत हे या आज्ञापत्रावरुन दिसुन येते.

-----------------------------------------------------

मशरुल अनाम राजश्री जुमलेदारानी व हवालदारानीं व कारकुनानी दिमत पायगो मुक्काम मौजे हलवर्ण ता। चिपळूण मामले दाभोळ प्रति राजरी शिवाजी राजे सु ॥ अर्बा. सबैन अ अलफ. कसबे चिपळुणीं साहेबीं लष्कराची विले केली आणि याउपरी घाटावरी कटक जावें ऐसा मान नाहि. म्हणून एव्हां छावणीस रवाना केलें. ऐसीयास, चिपळुणी कटाकाचा मुक्काम होता ताकरींता दाभोळाच्या सुबेयांत पावसाकाळ्याकारणें पागेस सामा व दाणा व वरकड केला होता तो कितेक खर्च होऊन गेला. व चिपळुणा आसपास विलातीत लष्कराची तसवीस व गवताची व वरकड हरएक बाब लागली. त्याकरीतां हाल काहि उरला नाही. ऐसे असतां वैशाखाचे वीस दिवस, उनाळा, हेही पागेस अधिक. बैठ पडली. परंतु जरुर जाले त्या करितां कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे.त्यास, तुम्हि मनास ऐसा दाणाअ, रातीब, गवत मागाल, असेंल तोवरी धुंदी करुन चाराल, नाहींसे जालें म्हणजे मग काहीं मग पडत्या पावसांत मिळाणार नाहीं, उपास पडतील, घोडी मरायास लागतील. म्हणजे घोडीं तुम्हीच मारीली ऐसें होईल व विलातीस तसवीस देऊं लागाल. ऐशास, लोक जातील, कोण्ही कुबभ्याचेथील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटें, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करूं लागलेत म्हणजे जी कुणबीं घर धरुन जीवमात्र घेऊन राहिले आहेत तेहि जाऊं लागतील. कितेकौपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल कीं मोंगल मुलकांत आले त्याहूनहि अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल तेव्हां रयतीई ब घोडियांची सारी बदनामी तुम्हांवर येईल! हे तुम्ही बरे जाणून, सिपाही हो अगर पावखलक हो, बहुत यादी धरुन वर्तणूक करणें. कोण्ही पागेस अगर मुलकांत गांवोगांव राहिले असाल त्याणीं रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाहीं. आपल्या राहिला जागाहून बाहीर पाय घालाया गरज नाहीं. साहेबीं खाजानांतून वाटणिया पदरीं घातलिया आहेती. ज्याला जे पाहिजे, दाणा हो अगर गुरेंढोरें वागवीत असांल त्यांस गवत हो, अगर फाटें, बाजीपाले व वरकड विकावया येईल तें रास घ्यावे, बाजारास जावे, रास विकत आणावें. कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाहीं. व पागेस सामा केला आहे तो पावसाळा पुरला पाहिजे. ऐसे तजविजीनें साणा रातीब कारकून देत जातील तेणेंप्रमाणे घेत जाणें, कीं उपास न पडतां रोजबरोज खायाला सांपडे आणि होत होत घोडीं तवाना होत ऐसे करणें. नसतीच कारकुनासी धसपस कराया, अगर अमकेंच द्या तमकेंच द्या ऐसे म्हणाया, धुंदी करुन खासदारकोठींत, कोठांरात शिरुन लुटाया गरज नाही व हालीं उन्हाळ्याला आहे तैसें खलक पागेचे आहेत, खण धरुन राहिले असतील व राहतील, कोण्ही आगट्या करितील, कोणी भलतेच जागा चुल्ही, रंधनाळा करितील, कोण्ही तंबाकूला आगी घेतील, गवत पडिले आहे ऐसे मनास ना आणिता म्हणजे अविस्राच एखादा दगा होईल. एका खणास आगी लागली म्हणजे सारे गवत व लहाळ्या आहेत तितक्या एकेएक जळों जातील. तेव्हां मह काही कुणबियांच्या गर्दना मारल्या अगर कारकुनांस ताकीस करावी तैसी केली तर्ही कांही खण कराया एक लाकुड मिळणार नाहीं, एक खण होणार नाहीं. हे तो अवघियाला कळतें. या कारणें, बरी ताकीद करुन, खासेखासे असाल ते हमेषा फिरत जाऊन, रंधनें करिता, आगाट्या जाळिता, अगर रात्रीस दिवा घरांत असेल, अविस्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. खण, गवत वांचेल ते करणें. म्हणजे पावसाळा घोडीं वाचली. नाही तर मग, घोडीं बांधावी न लगेत, खायास घालावे नलगे, पागाच बुडाली!!! तुम्ही निसु=ऊर जालेत!!! ऐसे होईल. याकारणें तपशिलें तुम्हांस लिहिले असें. जितके खासे खासे जुमलेवार, हवालदार, कारकून आहा तितके हा रोखा तपशिलें ऐकणें, आण हुशार राहाणें वरचेवरी, रोजाचारोज, खबर घेऊन, ताकीद करून, येणेंप्रमाणें वर्तणूक करितां ज्यापासून अंतर पडेल, ज्याचा गुन्हा होईल, बदनामी ज्यावर येईल, त्यास, माराठियाची तो उज्जत वाचणार नाहीं, मग रोजगार कैसा? खळक समजों जास्ती केल्यावेगळ सोडणार नाही. हे बरे म्हणून वर्तणूक करणें. छ १२ सफर.


(मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड ८ – वि. का राजवाडे)

-----------------------------------------------------


मशरूल – लोकमान्य, अनाम – लोक, जुमलेदार – सरकारी अधिकारी, हवालदार – तालुक्याचा अधिकारी, दिमत – पदरचे, तैनात. पायगो – खाजगी उत्पन्नाचा प्रांत, मामले – परगणा, प्रदेश. अर्बा – चार, सबैन – सत्तर, अलफ – हजार, कटक – सैन्य, पागा – घोडदळ, अजार – उपद्रव, विले – व्यवस्था, सामा – साठा, रातीब – रोजची सामग्री, धुंदी - हल्ला, तसवीस – उपद्रव, पावखलक – पायदळ, यादी धरून – आठवण ठेवून, रास घ्यावे – पैसे देऊन घ्यावे, ज्याजती - जबरदस्ती, कलागती – भांडण, खलक – सैनिक, रंधनाळा – स्वयंपाकाचे मोठे चुलाणे, अविस्राच – अचानक, खण – तंबू, तजविज – तयारी. लहळे – गंजी भारे, अंतर पडेल – दुर्लक्ष केले जाईल, निसूर – निश्चिंत, छ १२ – तारीख बारा. सफर – मुस्लीम कालगणनेचा दुसरा महिना.

Saturday, November 29, 2008

पण लक्षात कोण घेतो……?

२६ नोव्हेंबर २००८, रात्रीचे ९ वाजुन ४० मिनिटे ....मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पासुन मृत्युचे चालु झालेले तांडव आत्ताशी कुठे शमतोय. अजुन ताज धुमसतेच आहे. दहशतवाद हा ऑक्टोबर १९४७ पासुनच भारताच्या पाचवीला पुजलाय. १९४७ च्या काश्मीर हल्ल्यापासुन परवाच्या घटनेपर्यंतचा प्रवास कसा झाला हा फार मोठ्ठा प्रश्न आहे. त्यावर शेकडो पुस्तके आणि हज्जारो लेख लिहुनहि झाले आहेत – होतील. पण किमान १६ अतिरेकि समुद्र मार्गाने मुंबई सारख्या भारताच्या अति महत्वाच्या आणि आर्थिक राजधानी म्हणावल्या जाणार्‍या शहरात उतरुन भारताच्या पोलिस-लष्कर-NSG यांसारख्या भक्कम यंत्रणांशी थोडि थोडकि नव्हे तर ४८ तासांपेक्षा जास्त झुंज घेतात. आपल्याकडिल अत्याधुनिक हत्यारे वापरुन १५३ व्यक्तींचा जीव घेतात. १४ पोलिस आणि ३ NSG चे जवान शहिद होतात. नागरीकांची तर गणनाच नाहि. पण हे किती दिवस २? ४? १०? नंतर सगळं विसरणार. मग परत एखादा बॉम्बस्फोट होईतो आम्हि झोपणार. हे चक्र असच सुरु राहणार. कदाचित या जगाच्या अंतापर्यंत(किंवा पाकिस्तानच्या). मुळात नागरीकांमध्येच जाणीव नाहि. वर्क स्पीरीट च्या नावाखाली मुंबईला सलाम ठोकले जातात. मग एखाद्या दिवशी सगळी मुंबई मिनिटभरासाठी स्तब्ध होऊन श्रध्दांजलीचा कार्यक्रम होतो. बाऽऽऽऽस झालं काम. दहशतवादाला धर्म नसतो वगैरे तत्वज्ञान ओकले जाते.

काल पंतप्रधान गरीऽऽऽब चेहरा घेऊन सगळ्याचा “कडक” शब्दात निषेध नोंदवत होते. क्षणभर वाटुन गेले हे आवाहन दहशतवाद्यांना दाखवले तर दया येऊन ते परतीची वाट धरतील इतका बापडा चेहरा आणि त्याहुन खालचा स्वर लावुन आमचे पंतप्रधान “प्रत्युत्तराची” भाषा करत होते. आमचे राष्ट्रपती-पंतप्रधान स्वत:च्याच ऑपरेशन केलेल्या पायांवर उभे राहतात हिच मोठी गोष्ट आहे असे सारखे वाटते. मी लिहिलेलं हे सगळं खुप आक्रस्ताळेपणाने किंवा अपमानकारक वाटेल पण हा आजच्या तरुण पिढीचा संताप आहे. जे भ्रष्टाचारी नेते मेले पाहिजेत ते ठणठणीत आणि जे जवान-किसान जगायला हवेत ते असे मरत आहेत.

मूळात ४८ तास झुंज घेऊ शकतील इतका दारुगोळा घेऊन हे यमदुत आत येतात कसे हा प्रश्न विचारल्यावर अजुनच नविन माहिती हाताशी लागते – ते सगळे किमान ३ महिने मुंबईत होते. दक्षीण मुंबईची खडा न खडा माहिती जमा करुन ते परत पाकिस्तानात गेले तिथे सगळी तयारी करुन कराची-गुजरात-मुंबई असा प्रवास करुन त्यांनी हा आकांत घडवला. खोलवर विचार केल्यास हे सगळे चक्र एकमेकांत खुप गुंतले आहे. पाकिस्तानासारखे असंतुलित व नेहमी हुकुमशहांच्या आणि मुल्ला-मौलवींच्या प्रभावाखाली राहिलेले राष्ट्र असताना त्याचा भारतावर परीणाम होणारच. अफगाणिस्थानात अल कायदा पुन्हा बळकट होतोय, गेले काहि दिवस इराण अमेरीकेशी अरेरावीने बोलतोय, ओसामा-अयातुल्लाची तत्वज्ञाने तिथल्या मदरश्यांतुन तरुणांच्या टाळक्यात ठसवली जात आहेत इतकि कि इंजिनिअर असलेले तरुण अल्लाहसाठी जिहाद करायला फिदायीन हल्ले करत आहेत. म्हणुनच अमेरीका-ब्रिटन-इस्राइल या ३ नावांनंतर “भारत” हा देश चौथ्या क्रमांकावर आहे हे विसरुन चालणार नाहि. त्यातुन चीन सारखे राष्ट्र भारता विरुध्द इथल्या शक्तींना छुपी मदत करते हे काहि नविन नाहि. दहशतवाद कीती पसरलाय हा विचार केला तरी हा देश कसा चालतोय याचे कौतुक करावे लागेल… वर काश्मीर, पंजाबात खलीस्तानवादी, नेपाळ सीमेपासुन विदर्भापर्यंत पसरलेले माओवादि, आसाम मधले फुटीरतावादि, सिक्किम-अरुणाचलप्रदेशावरची चीनची वखवखलेली नजर, भारताच्या कुशीतला कृतघ्न बांग्लादेश, खाली उत्तर श्रीलंकेत लिट्टे, त्यातुन वेगळा द्रविड देश असावा अशी मागणी करणारी माणारे या देशात आहेत याची जाणीव बहुदा लोकांना नाहिये. हे कमी की काय अंदमान-निकोबार मध्ये बांग्लादेशी घुसखोरी करत आहेत. भारत - श्रीलंकेच्या बरोबर खाली अमेरीका-ब्रिटनचा संयुक्त नाविक तळ “दिएगो गार्सिआ” आहेच. आणि हे सगळे काहि संत नव्हेत. आंतराष्ट्रिय राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो. आपल्या देशाचा नागडा स्वार्थ इतकीच प्रत्येकाची खरी बाजु असते.

आपण जागतीक पातळीवर युनो अथवा सार्क सारख्या आंतराष्ट्रिय व्यासपिठांची “शक्तीपिठे” कधीच केली नाहित. मात्र पाक काश्मीर मध्ये भारत जवळपास “कयामत ढा रहा है!” हेच चित्र निर्माण करत फिरत होता-आहे. याचा परीणाम भारताला नक्किच भोगावा लागला होता. आता परत अमेरीकेचा नवनिर्वाचित अध्यक्ष ओबामा परत तेच त्रिपक्षीय वाटाघाटिचे गाणे गाऊ लागलाय. भारताने कुठल्याहि परीस्थीतीत फक्त द्वि-पक्षीय वाटाघाटीचा हट्ट सोडुन चालणार नाहि. खरतर काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असुन आज दुसर्‍या देशा बरोबर सीमा आखाव्या लागत आहेत. हे घोंगडं पं. नेहरुनी भिजवुन ठेवलय. “डोमेलच्या पुढे जाऊ नका! कारण त्यापुढे भारताशी इमान नसलेली कट्टर माणसे आहेत!” हि मेजर सेन यांना दिलेली सुचना भारताला आज महाग पडतेय. तेव्हा भारताला काश्मीर घेणे सहज शक्य होते तेव्हा काहि कारणांनी तो घेतला नाहि त्याचा फार मोठा इतिहास आहे. जागे अभावी इथे सगळा देता येत नसला तरी थोडक्यात सांगायचे तर फारुख अब्दुल्लाचा बाप शेर-ए-कश्मीर उर्फ शेख अब्दुल्ल याला स्वतंत्र कश्मीर हवा होता त्यासाठी त्याने पाकिस्तानच्या गळ्यात गळे घातले होते मात्र पाकिस्तान आपल्याला फसवत आहे हे कळल्यावर हाच शेख दिल्लीत पळत आला, नेहरुंनी त्याला मदत केली पण अशी त्रांगड निर्माण करणारी मदत जी आज भारताला त्रास देणारी ठरलीये. बर पुढे याच शेख अब्दुल्लाचे नेहरु-गांधी घराण्याने किती गालगुच्चे घेतले हे जगाला माहित आहे. त्याचा मुलगा फारुख अब्दुल्ला हा अजुनहि स्वतंत्र काश्मीरचा फुत्कार मधुन-मधुन टाकत असतोच आणि इतके करुन हाच फारुख अब्दुल्ला, राज ठाकरें विरुध्द शिवाजी पार्क वरील समाजवादि पार्टिच्या मेळाव्यात एकोप्याच्या गप्पा मारतो. बहुदा असे विनोद भारताखेरीज कुठे घडत असतील असे मला वाटत नाहि. आज ठरवले तरी युध्द आणि जगाची नाराजी ओढावुन ती निभावुन नेण्याची आर्थिक-सामाजिक-राजकिय-सामरीक ताकद भारतात येत नाहि तोवर संपुर्ण काश्मीर भारताला जिंकता येणार नाहि ये उघडे-वाघडे सत्य आहे. कारण यात पाक-भारतच नव्हे तर चीन व अमेरीकेचे हितसंबध गुंतले आहेत हे सांगणे न लगे. शाक्सगम, मानसरोवर च्या पलीकडिल भाग चीनचे साम-दाम-दंड-भेद वापरुन ६२ पासुन थोडा-थोडा करत बळकावलाय.

पाकचे असे तर या बाजुला चीन पाकिस्तानला अग्वादा बंदर बांधण्यात मदत करतय. श्रीलंकेला लिट्टे विरुध्द लढायला चीन हत्यारे पुरवतय. त्यामुळे श्रीलंका चीनची मांडलिक बनलि तर भारतालाच त्याचा त्रास होणार आहे. आणि आमचे करुणानिधी तमिळींना न्याय मिळावा म्हणुन लिट्टेची मदत करायला भारत सरकारला भाग पाडायचे उद्योग करत आहेत. लिट्टे काहि सत्संग भरवणारी धर्मदाय संस्था निश्चित नाहिये. आपला एक पंतप्रधान याच लिट्टेने ग्रासला होता. आपला शेजारी म्यानमार तिथे हुकुमशाहिच आहे, मादाम स्यु कि अजुन किती वर्ष तुरुंगात घालवणार आहेत? या प्रश्ना बरोबरच म्यानामारला चीन मदत करतोय हे जास्त धोकादायक आहे कारण अरुणाचलप्रदेशची शेकडो किलोमीटरची सीमारेषा म्यानामारला लागली आहे. भारतीय पंतप्रधान चीनच्या पारंपारीक प्रतिस्पर्धी असलेल्या जपानला भेट देऊन आल्यावर चीनची अस्वस्थता बघण्यासारखी होती. चीन भारताला सगळीकडुन घेरतय. या ड्रॅगनचा विळाखा आत्ताच खिळखिळा केला पाहिजे.

प्रत्येक जण झाल्याप्रकाराचा राजकिय लाभ उठवणार. विरोधी पक्ष सरकार-सुरक्षा यंत्रणा झोप काढत होतं का? हा प्रश्न विचारणार. सरकार म्हणणार येणारा डोक्यावर पट्टि बांधुन थोडिच येतो कि मी आतंकवादि आहे म्हणुन? आम्हि आता अमुक एक दल आणी समिती स्थापन करु. अश्या समित्या स्थापन होणार चौकशी होणार सरकार बदलले कि आपला स्वार्थ साधणारे निष्कर्ष काढायला लावणार किंवा नविन समिती बसवणार मग “तारीख पे तारीख” पडत राहणार १३ वर्षे खटले चालणार अर्धे आरोपि म्हातारे होऊन मरणार, काहि तुरुंगात जास्त सुरक्षीत राहणार, मसुद अझर सारखे सुदैवी आणि लंबी पहुच असलेले अतिरेकि एखाद्या विमान अपहरणानंतर सुटुन पाकिस्तानात जाणार मग “जैश-ए-मुहम्मद” सारखे आत्मघातकि जिहादि पथक स्थापन करणार, अफझल गुरु तुरुंगात मानव अधिकारवाल्यांच्या उपकारावर एकेक दिवस पुढे ढकलत राहणार. मात्र अफझल गुरु जिवंत कसा या अस्वस्थतेने संसदेवरील हल्ला आपल्यावर झेलणार्यांचा नातेवाईक त्यांची मरणोत्तर शौर्य पदके परत करतोय याची दखल कोण घेणार? लाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽज वाटायला हवी त्याची, शौर्य पदके परत केली जातात – कोणासाठी एका आतंकवाद्यासाठी????? आणि सरकार अफझलला लटकवण्या ऐवजी निलाजरेपणाने आतंकवाद्यांच्या मुलांना आर्थिक मदत देत फिरतय. वाऽऽऽऽऽऽऽऽऽ. प्रत्येक नागरीकाला याची लाज वाटायला हवी. येत्या निवडणुकीत अश्या सरकारला त्यांची “जागा” दाखवायला हवी. हा प्रकार म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा झाला.

सरकार कुठलेहि असो आतंकवादा विरुध्द लढणारी एक यंत्रणा पाहिजे. कडक कायदे हवेत इतके कि आतंकवाद्यांनी मरणाची भीक मागितली पाहिजे. पण हे सगळे काहि आज म्हंटले आणि उद्या उभे राहिले इतके सोप्पे नाहिये . राजकिय स्वार्थ सोडुन सगळ्यांनी एक मुखाने कठोर कायदे निर्माण करुन ते राबवायला हवेत. याच बरोबर नागरी सुरक्षेची अंतर्गत सुविधा असली पाहिजे त्यासाठी डिजास्टर मॅनेजमेंट ची सुदृढ यंत्रणा देखिल दुसर्‍या बाजुला उभी केली पाहिजे. ती आधी़च केली असती तर गुजरात मधुन जी बोट बोट मालकाला ठार मारुन बळकावली आणि पुढे जे झालं ते कदाचीत झालं नसतं अथवा निदान आटोक्यात आणता आलं असतें. किंवा नरीमन हाऊस बाहेर जी फाजील बघ्यांची गर्दि जमुन पोलिसांचे काम उगीच वाढवत होती ती जमा झाली नसती. अमेरीका - युरोपिअन राष्ट्रे अथवा इस्राइल सारख्या काहि राष्ट्रांत किमान ३ वर्षांचे सैनिकी प्रशिक्षण दिले जाते. भारताला आर्थिक दृष्ट्या हे सध्या शक्य नसले तरी NCC सारखी शक्य तितकी आपत्कालीन मदत दले यासाठी शाळा पातळी पासुन ते जेष्ठ नागरीकांपर्यंत बनवली पाहिजेत. याचा उपयोग अश्या घटनांच्यावेळी होईलच पण नैसर्गिक आपत्तीत देखिल बरेच नुकसान टाळता येईल. आपला नविन शेजारी संशयास्पद हालचाल करत नाहिये ना? तो जास्तीत जास्त वेळ घरातच घालवत नाहिये ना? जास्त ओळख न वाढवता अलिप्त राहुन आपले व्यवहार करतोय का? असे प्रश्न देशाच्या सुरक्षेसाठी विचारणे गरजेच आहे. गाडित आजुबाजुला ठेवलेली एखादि बॅग सहा-आठ स्टेशन नंतर हलली नसेल तर ती कोणाची आहे? हा प्रश्न विचारला पाहिजे.

या अश्या यंत्रणां खेरीज समाजात अनेक बाबतीत आज जागरुकता येणे फार गरजेचे आहे. संजय दत्तवर AK ४७ जवळ बाळगल्याचा आरोप असताना त्याचे चित्रपट हिट होतातच कसे? चिंकारा मारुन सलमान खान सुटतो कसा? आणि सुटल्यावर त्यावर बहिष्कार टाकायचे सोडुन तो सुटल्याचा आनंद मनवलाच कसा जातो? सलमान-संजय म्हणजे काहि दैवी अवतार नव्हे, उलटे टांगुन बडवुन काढावे हि तो यांची लायकि. कधी कधी तर प्रश्न पडतो कि इथल्या लोकांची बौध्दिक पातळी इतकि खालावली आहे का?? संजय दत्तला मध्ये ९३ च्या सुनावणीसाठी कोर्टाने बोलावले तर दोन तरुणींना त्यांचे (अनावश्यक)मत विचारले तर म्हणे “तो किती चांगला दिसतो असं करेल असे नाहि वाटत!” तिच गोष्ट सलमान खान सुटुन आल्यावर त्याच्या बंगल्या समोर शेकड्यांनी जमलेले लोक फटाके फोडुन आनंद मनवताची दृष्ये केवळ उबग आणणारी होती. आणि हे तर काहिच नाहि, ज्यांचे एन्काउंटर करायला कधीकाळी पोलिस बंदुका सरसावुन धावत होते. आज त्यांच्या Z+ सिक्युरीटिसाठी सरकार खर्च करतं कारण ते निवडुन संसदेवर जातात. ते जातात कसे हा प्रश्नच आंम्हाला कधी पडत नाहि.?? फुलन देवी, अरुण गवळी, पप्पु कलानी हे निवडले जातातच कसे? त्यांना निवडणुकिला उभे राहुच कसे दिले जाते? इतका का कायदा गाढव आहे? समाजात या सगळ्या बद्दल जागृती निर्माण होत नाहि तोवर हे असंच घडत राहणार.

हे सगळं लिहिल तर आहे, पण हे लक्षात कोण घेतो………? परत ये रे माझ्या मागल्या नाहि झालं म्हणजे मिळवलं.


- सौरभ वैशंपायन.
(२८/११/२००८))

Saturday, January 12, 2008

राष्ट्राय स्वाहा: इदं न मम!!!!




भारतात अनेक अश्या व्यक्ती झाल्या कि ज्यांचे कर्तृत्व असामान्य आहे. त्या ज्या क्षेत्रात काम केले ते मैलाचा दगड ठरले. आजही त्या हजारो व्यक्तींना १०० करोड व्यक्ती आदर्श मानत आहेत आणि राहतील. थोडक्यात भारतभूचे सुपूत्र या सदरात ते येतात. मात्र भारतभूचे सुपूत्र होणे इतके सोपे आहे का? प्रचंड उलथापालथी नंतर भारताच्या सुपूत्रांपैकी ४ जण माझ्या डोळ्यांसमोर रात्रं-दिवस येत आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतर भारतात किंवा भारता बाहेर हजारो आदरणीय व्यक्ती झाल्या वा होतील पण या चौघांचे स्थान एकमेवाद्वितीय आहे.

या चौघांचाहि कालखंड भिन्न आहे. हे चौघही उत्तर-दक्षीण-पूर्व-पश्चीम अश्या भारताच्या ४ टोकांतुन जन्मले मात्र त्यांचा प्रभाव संपूर्ण भारतभर पसरला आहे. या पैकी एकाने तर भारताच्या सीमाहि ओलांडल्या आहेत. भारताचा इतिहास या चार व्यक्तींशिवाय कदापि पूर्ण होणार नाहि इतके अलौकीक-प्रचंड आणि विस्मयकारक काम त्यांनी करुन ठेवलय.

ही चौघाच डोळ्यासमोर का आली?? तर याचं पहिलं उत्तर "माहित नाहि!" असंच आहे. मात्र विचारांती थोडस तुटक आणि अंधुक उत्तर मिळत - "हे चौघही उत्तम विध्यार्थी होते, हे चौघही उत्तम गुरु होते, हे चौघही द्रष्टे होते आणि महत्वाचं म्हणजे ह्या चौघांकडे "चारीत्र्य" होते, शुचिता होती." या चार गुणांमुळेच आपले सुस्पष्ट ध्येय आणि अढळ निष्ठा त्या चौघांकडे होती. त्यांचा जन्म ही त्या काळची गरजच होती. आणि काळाची गरज म्हणण्यापेक्षाही जणु काळाने/नियतीने यांचा जन्म होणारच अशी मांडणी केली होती. एखाद्या महानाट्यात एका पात्राने रंगमंचावर प्रवेश करावा आणि बघता बघाता त्या संपूर्ण रंगमंचाचा ताबा घेउन लोकांना स्तिमीत कराव, तसे ते चौघे आले - त्यांनी पाहिलं - त्यांनी जिंकल. विष्णुच्या अवतार संकल्पनेवर कोणाचा विश्वास बसला नाहि तरी हे चार अवतारच असावेत असे यंच्या ’इतिहासाकडे’ बघुन पटत.

वर म्हंटल्याप्रमाणे हे चौघ उत्तम विद्यर्थी होते, आणि ते ज्या गुरुकुलाचे अथवा गुरुचे शिष्य होते मुळात त्याच व्यक्ती असामान्य होत्या. आणि उलट त्या गुरुकुलाचे अथवा गुरुचे शिष्य बनण्यासाठी त्या ’शिष्यांची’ पात्रता असणं जास्त महत्वाचं होतं. या चार जणांच्या गुरुकुलाच्या अथवा गुरुच्या प्रभावाखाली-छत्राखाली कदाचित इतरही हजारो जण शिकले असतीलही, पण मग हेच चौघ का? हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. याचेच उत्तर म्हणजे सर्वोत्तम विद्यार्थी असणे हा गुण उपजतच त्यांच्यात होता. ते जे शिकले ते त्यांनी आचरणात आणलं त्याने इतरांचं भलं कसं होईल याचा विचार केला. त्यानी आपल्या गुरुंचे पांग फेडले.

पुढे ते स्वत: गुरु झाले आणि आपलं कार्य चालवणारी अनेक माणसे त्यांनी घडवली. या पैकी दोघांनी राजकारणात येणार्‍या पिढ्यांना पाठ घालुन दिले तर इतर दोघांनी समाजकारणात. आणि त्यांचा कालखंडही आलटुन पालटुन आहे. म्हणजे सर्वप्रथम राजकारण मग समाजकारण मग परत राजकारण आणि सरते शेवटी समाजकारण अशी कालानुरुप मार्गदर्शक तत्वे आणि क्रिया त्यांनी त्यांच्या क्षेत्रात घडवल्या. यापैकी पहिल्या दोघांचा कालखंड हा हजार वर्षांच्या अंतराने आलाय मग परत हजार वर्षे गेली आहेत आणि शेवतच्या दोघांत फक्त काहि शे वर्षांचे अंतर आहे. सगळं कसं अगदी ठरल्या सारखं घडत गेलय. इथे मी समाजकारण आणि धर्म हे एकमेकांत गुंतले असल्यानं संपुर्ण प्रक्रीयेलाच समाजकारण म्हंटलं आहे. त्यात "लोकांनी धारण केलेला आहे तो अथवा जो लोकांनी धारण करतो तो ’धर्म’" या व्याख्येचा वापर अपेक्षीत आहे. म्हणुन त्यातील दोघंजण हे धर्माचे पालन अथवा समाजकारणच करत होते असं म्हणता येईल. उरलेल्या दोघांनीही देव-देश-धर्म यांना दैनंदिन जीवनात अनन्यसाधारण महत्व दिल्याचं दिसतं.

आता "द्रष्टा" म्हणाजे काय ते या चारही जणांकडे बघुन समजतं. क्षणभंगुर सुखाच्या मागे धावणारा सामान्य माणुस हा शक्यतो मी-माझा या पलिकडे विचार करत नाहि. काळाची पाऊले त्याला ओळखता येत नाहित. उलट ती ओळखता येत नाहित म्हणुनच तो सामान्य ठरतो. मेंढरासारखे एकाच्या मागे दुसरा त्यामागे तिसरा असे करत आयुष्य घालवतो. मात्र समाजाच्या आखुन दिलेल्या चौकटितुन काहि माणसे बाहेर पडतात, त्यांना काळाची पाऊले ओळखता देखिल येतात. तशी ते आपली कृती ठरवतात ज्याने संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य उज्वल होते, त्यांनाच "द्रष्टा" म्हणता येईल. नुसता ’नेता’ होणेच कर्मकठीण आहे "द्रष्टा" होणे तर दुरच राहो. मात्र ही चार व्यक्तीमत्वे उपजतच द्रष्टेपण घेउन आली होती असे म्हंटल्यास वावगे ठरु नये.

आणि त्यांच्याकडे द्रष्टेपण होतं म्हणुनच ते समर्थ नेतृत्व करु शकले. शेकडो वर्षांनंतरचा विचार करुन त्यांनी आपली धोरणे आखली ती राबवली, कदाचित म्हणुनच तत्कालीन समाज अथवा त्या नंतरच्या पिढ्या तग धरुन राहु शकल्या. अन्यथा बाबिलोनियन, माया, पारसिक, रोमन, ग्रीक, इजिप्शीयन अश्या प्रचंड मोठ्या संस्कृतींच्या वा साम्राज्यांच्या यादित भारत किंवा हिंदु संस्कृतीचे नाव आले असते. या चौघांपैकी दक्षीणेतील द्रष्ट्याने तर उभ्या हिंदु धर्मावर हिमालया इतके कधीहि न फिटणारे उपकार करुन ठेवले आहेत. तर पश्चीमेकडील द्रष्टा तर ’हिंद्दुहृदयसम्राट’ बनला असे कार्य करुन गेलाय.

"चारीत्र्य" हे तर यांच महत्वाचं बलस्थान. माया-मदिरा-स्त्री यांच्या आहारी ते कधीच गेले नाहित. या चार जणांतील तिघे तर आजन्म ब्रह्मचारी राहिले तर चौथा संसारी असला तरी आपल्या संसाराला आपल्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त स्थान त्याने कधीच दिले नाहि. आणि अगदी शत्रुनेही "स्त्री-दाक्षीण्य" या गुणाबाबत त्यावरुन आपले सर्वस्व ओवाळुन टाकावे इतकी शुचिता त्याच्याकडे होती.

वरील पूर्ण लेखामधुन "ते" चौघे कोण हे सुज्ञांच्या लक्षात आलेही असेल. मात्र त्यांच्या कालखंडानुसार मी त्यांची नावे प्रकट करतो - "आर्य चाणक्य, आदि शंकराचार्य, छत्रपति शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद" वरील प्रत्येक गोष्ट त्यांच्या बाबत चपखल बसते.

तक्षशीला गुरुकुल असो, जिजाऊसाहेब असोत अथवा रामकृष्ण परमहंस असोत यांचे शिष्यत्व पत्करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. आणि नुसतं पेलुन फायदा नाहिये तर त्यावर आपल्या कार्याची प्रत्युंचा देखिल चढवता आली पाहिजे.

मुळात भारतभू हि पुण्यभूमी असल्याने असे सुपुत्र तिच्या पोती जन्माला आले. आणि ते केवळ भारतभुमीचे सदभाग्य नसुन या चौघांचेही सुदैव आहे असेच म्हणावे लागेल कारण राष्ट्रापेक्षा कोणीचि मोठा नसतो हीच त्यांची शिकवण आहे. तरीही त्यांचे स्थान ध्रुवाप्रमाणे अढळ आहे. ज्याला ’भारत’ समजुन घ्ययचा असेल त्याने या चौघांचे चरीत्र समजुन घेण्याचा प्रयत्न करावा. कारण ह्या चौघांच्या चरीत्राचा एल लक्षांश अर्थ जरी समजला आणि त्या समजलेल्या चरीत्राच्या शतांशा इतकाहि त्यांछा किमान एक गुण आपण आपल्यात उतरवु शकलो तरी ’भारत’ समजला असे म्हणायला हरकत नाहि. नुसते ’मेरा भारत महान!’ असे वर्षातुन दोनदा म्हणायच आणि मग आपल्या कृतीने आपल्या देशाला कमीपणा येईल असे वागायचे याला भारत समजला असे नाहि म्हणता येत.

चाणक्याचं द्रष्टेपण, शंकराचार्यांचे ज्ञान, शिवरायांची शुचिता आणि विवेकानंदांची निष्ठाच भारताला महासता बनवु शकते. यातले दोन जण "योद्धा संन्यासी" होते, एक "महागुरु" होता आणि एक जण "श्रीमंत योगी" होता. ’राजयोग आणि कर्मयोग’ यांच अजब मिश्रण त्यांच्या व्यक्तीमत्वात होतं. यांनी ठरवलं असतं तर जगातली सर्व सुखं त्यांच्या पायाशी सहज आली असती. मात्र यांनी ’सोन्याचे पलंग’ वापरल्याचं कोणी ऐकले नाहिये. त्यांनी कधी कोणाचे वाईट केले नाहि. मात्र आपल्या मातृभूमीवर होणारे अत्याचार थांबवुन तिला संपन्न करण्यासाठी शक्य ते उपाय योजल्यांच दिसतं थोडक्यात या चौघांना "आचरल्यास" भारत महासत्ता होणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे.एक दिवस भारताच्या महसत्तेचा तारा क्षीतीजावर पुन: उगवल्याशिवाय नाहि राहणार.


- सौरभ वैशंपायन.