Monday, February 4, 2013

स्पंदने


भर थंडित त्याच्या अस्ताव्यस्त पहुडल्या उघड्या, काळ्या, थंडगार पडलेल्या अंगावरती मी हात टेकवला, खरंतर मलाच तेव्हा आधाराची गरज होती. त्याच्या थंड पडलेल्या देहातली धुगधुगीही अजूनही जाणवत होती. त्याच्या राकट कणखर देहातल्या नसां हाताला जाणवत होत्या. त्यात कधीकाळी गरम लाव्हाच वाहिला होता. त्याचे श्वासही सुरु होते. मी दूरवरती नजर फिरवली. उन्हं चढायला नुकतीच सुरुवात झाली होती. मी देखिल दूरुन त्याला भेटण्यासाठी बराच वेळ चालून आल्याने माझ्या अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्याच. मी आल्याचा त्याला आनंद झाला होता की नव्हता मला कळत नव्हतं. बहुदा त्याला त्याचं सुखं दुखं काहीच नसावं. त्याची सध्याची एकंदर अवस्था गीतेच्या स्थितप्रज्ञाची झालीये. कधीकाळी ज्यांच्या बापजाद्यांना त्याने सर्वतोपरी मदत केली होती आज त्यांचे वंशज त्याकडे फार अनोळखीपणे बघतात. ओळख दाखवणारे अर्थात माझ्यासारखे हजारो रोज त्याला भेटायला येतातही, काही त्याच्या जुन्या आठवणी जागतात. पण त्याला भेटायला येणारे अर्धाधिक तर उलट त्याला नवीन जखमाच देऊन जातात. अश्या अनोळखी माणसांमुळे असेल कदाचित विरक्ती हाच त्याचा स्वभाव बनला आहे. त्याच्या सध्याच्या अवस्थेकडे बघून कधीकधी फार गलबलून येतं. त्याचं डोकं मांडिवरती घेऊन त्याला प्रेमाने थोपटता आलं असतं तर किती बरं झालं असतं असंही वाटून जातं. त्याची अवस्था मात्र समाधी लागल्यागत असलेल्या संन्याश्यासारखी क्वचित स्वत:त गुंगलेल्या निष्पाप मुलासारखी. कधी कधी काही ओळखीचे आवाज आले की चेहर्‍यावरती ओळखीचे हसू येतं, वळून बघतो देखिल, पण तितक्यापुरतच. इतरवेळी गुडूप अंधारात स्वत:ला हरवून टाकतो. त्या अंधारात त्याला बघणारं कोणी नसतं. मग डोळे मिटून उसासे टाकत शांत झोपला कि रोज रात्री त्याला स्वप्न पडतात. त्याचे जूने वैभवाचे दिवस त्याला दिसतात त्याच्या डोईवरती चढवलेली मोठी पागोटी, अंगावर खास त्याच्यासाठीच घडवलेले दागिने ..... अचानक त्याला वास्तवाची जाणीव येते तो दचकून जागा होतो, परत परत विस्कटलेली पागोटी, तुटलेले दागिने बघतो त्यालाही मग भरुन येतं. त्याच्या डोळ्यांच्या कडांनाही पाणी साठतं, छाताडावरती वाट्टेल ते घाव सहन करणार्‍या त्याला, ते अश्रू घरंगळताना कोणीतरी पाहील ह्याची तितकी भीती वाटत रहाते. त्याच्या सुदैवाने त्याचवेळी आकाशात वीजा कडाडून पाठोपाठ धो धो पाऊस सुरु होतो त्याचे अश्रू आणि पाऊस यातला फरक फार कुणाला समजत नाही. ज्यांना समजतो ते त्याच्या जवळ जातात. त्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच्या विशाल, पिळदार देहापुढे सगळेच हात चिमुकले वाटतात. पण तरीही मी त्याला बिलगतो, त्याच्या निधड्या छातीवरती डोकं ठेवतो. नीट कान देऊन ऐकलं तर त्याच्या हृदयाची लयबद्ध स्पंदने देखिल ऐकू येत रहातात - शिवाजी ... शिवाजी ... शिवाजी ... शिवाजी.

 - सौरभ वैशंपायन.

Tuesday, January 29, 2013

दुर्ग भांडार




सहा - सात महिन्यांपूर्वी माझ्या ओळखीच्या व्यक्तीच्या अल्बममध्ये मी दुर्ग भांडारचे फोटो बघितले होते. त्यादिवशीपासून दुर्ग भांडारला जायची संधी शोधत होतो. माझ्या ओळखीचे जे काही २-३ ट्रेकिंग ग्रुप आहेत त्यातल्या सगळ्यांची डोकी या प्लानवरुन खाऊन झाली होती. अखेर परवा २६ जानेवारीच्या मुहुर्तावरती पोदार कॉलेजच्या ग्रुप बरोबर जायची संधी मिळाली.

दुर्ग भांडार हा नाशिक जवळील ब्रह्मगिरीच्या डोंगराचाच एक भाग आहे. दररोज शेकडो व शनिवार - रविवारी हजारो लोकं ब्रह्मगिरी व जटा मंदिरात दर्शनासाठी येतात पण फारच कमी लोकांना पुढे एखादा दुर्ग आहे ह्याची कल्पना असते. माझ्या आजवरच्या अविस्मरणिय ट्रेक्सपैकी दुर्ग भांडार पहिल्या पाचांत ठेवायला हरकत नाही. जटामंदिरवरुनच पुढे अक्षरश: १५-२० मिनिटांच्या अंतरावरती हा दुर्ग सह्याद्रिच्या काळ्याकभिन्न कातळात "खोदून" काढलेला आहे. अर्थात जटामंदिर ते गड मधली वाट ही रेताड, भुसभुशीत, ढिसाळ, वगैरे शब्दांना आपल्यात सामावणारी व जेमतेम ’एक पाय नाचू रे गोविंदा’ करत पार करावी लागत असल्याने त्या दिशेला कोणी फिरकत नाही. चूक झाली तर डाव्या बाजूला २०-२५ फुटांचा अतिशय तीव्र उतार व मग थेट दरी आहे. ज्यांना ट्रेकची फार सवय नाही त्यांच्यासाठी कींवा आयुष्यातल्या पहिल्याच ट्रेकसाठी हा गड नक्किच नाही.


मी वर म्हणालो तसा कातळात "खोदून" काढलेला हा माझ्या पाहण्यातला पहिलाच गड आहे. मुळात तिथे गडाची मुख्य डोंगराहुन वेगळी अशी बांधणी दिसतच नसल्याने गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्या शिवाय खात्रीच होत नाही की इथे कुठलाही दुर्ग असेल. जवळ गेल्यावर ५-६० फुटांवरुनही प्रथमदर्शनी त्याचे प्रवेशद्वार हे सुरुवातीला पाण्याचे खोदलेले टाकेच असावे असे वाटते. कारण या वाटेच्या आधीच्या ट्प्यावर खरंच एक पाण्याचे टाके आहे. वापरात नसल्याने पाणी अस्वच्छ आहे. मात्र एकदा का त्या चिंचोळ्या वाटेपाशी पोहोचलो की मती गुंग करणारे, अफाट मेहनत व सुरक्षिततेच्या दृष्टिने जबर शक्कल लढवलेले बांधकाम ..... नपेक्षा "खोदकाम" दिसते. उजव्या हाताच्या भिंतीत इतर गडांप्रमाणेच शिवकालिन असणारे हनुमानाचे शिल्प दिसते. आणि मग थोड्या सरळसोट उतरणार्‍या साधारण फुटभर उंचीच्या ५०-५५ पायर्‍या एखाद्या गुढ भुयारात उतराव्यात तश्या खाली घेऊन जातात. एका वेळि एकच माणूस जाऊ शकेल इतपतच जागा. हा कातळ पहारींनी, छिन्नी-हातोड्याने तब्बल ६० फूट तरी सरळसोट खोदला आहे. वरती बघितलं की आकाशाची भगभगीत पट्टी तेव्हढी दिसत रहाते. 

खाली पोहोचलो की अजुन एक अनपेक्षित गोष्ट आपली वाट बघत असते. ते म्हणजे गडाचे केवळ दोन - अडिच फुटि उंचीचे व फक्त तीन फुट लांबीचे पहिले प्रवेशद्वार. गडात शिरणार्‍या माणसाला आधी इथेच गुडघे टेकावे लागतात. लहान मुलाप्रमाणे रांगतच तिथून बाहेर पडावे लागते. हे तंत्र इतके जबरदस्त आहे की आतल्या बाजूला एक - दोन पहारेकरी जरी तलवार घेऊन बसले तरी ह्या गडाचे अगदी आरामात रक्षण करु शकतात. दरवाज्यातून प्रवेश करताना आधी डोके आत घालावे लागते दोन्ही हात जमीनीवरती टेकले असतात, गुडघे टेकल्याने कुठल्याही दिशेला सरकायचा वेग उरला नसतो आणि त्यातून चिंचोळी जागा. आत शिरु पाहणार्‍याचे डोके धडापासून विनासायास वेगळे होण्याची संपूर्ण खात्री.

हा पहिला रांगता प्रवेश झाला की उजवीकडे वळायचं,  दुसरी गंमत वाट बघत असते - दोन्ही बाजूला दरी आणि मध्ये जेमतेम ८-१० फुटाचा कातळ ज्यावरुन चालत दुसर्‍या टोकाला जायचं असतं. भणाण वारा असला तर दरीत फेकले जाण्याचे शक्यता असतेच. सुदैवाने वारा नव्हता पण इथे दुसरा त्रास वानरांचा होतो. आम्ही आत प्रवेश करताच उजव्या हाताच्या एका शिळेवरती अतिशय स्वस्थ चित्ताने तो बसला होता. यांना माणसांची इतकी सवय झाली आहे की अगदि एकट्या वानरालाही हाकलवून लावायचे प्रयत्न जवळपास निष्फळ असतात. फार फार तर आपल्यावरती उपकार केल्यागत फुटभर जागा बदलतात. हा टप्पा पार करुन पलिकडच्या कातळकड्याकडे पोहोचलं की डाव्या हाताला पुन्हा नवीन "लोटांगण" असतच. गडाचे दुसरे प्रवेशद्वारही अगदी तसेच. शिवाय यातुन आत गेलं की आधीच्या प्रवेशद्वारासारखं थेट वरपर्यंत पायर्‍या दिसत नाहित जवळपास ९० अंशात वळत जाणार्‍या फुटभर उंचीच्या पायर्‍या आहेत.

वरती कुठलंलही इमारतीचं बांधकाम दिसत नाही, कींवा तसे कुठलेही पुरावे दिसत नाहित. सरळ नाकासमोर चालत गेलं की उजव्या बाजूला थोडं खाली पाण्याची दोन टाकी खोदली आहेत. पैकी एक टाकं त्यातल्या त्यात स्वच्छ आहे असं मानता येतं, दुसरं टाकं मात्र हिरवट पाण्याने भरलेलं आहे. तिथुनच पुढे दोन मिनिटांवरती कातळ फोडून तयार केलेला बुरुज आहे. वास्तविक बुरुजापेक्षाही तो एखादा सज्जा असल्यागत फोडून काढला आहे तोफा अथवा बंदूंकांचा मारा करायला कुठलीही सोय, जंग्या नहियेत. मला पाणी वाहून जायलाही काही व्यवस्था दिसली नाही, पण ती असावी अन्यथा पावसाळ्याच्या दिवसात इथे छातीभर पाणी साठेल. या बुरुजात उतरताना काळजी घ्यावी लागते डाव्या बाजूला दरी आहे, अजिबात चूक न करता इथून बुरुजात उतरावं लागतं. बुरुजात उतरलं की खाली त्र्यंबकेश्वर दिसतं. अजून उजवीकडे बघितलं की खाली गंगाद्वारकडे जाणारा रस्ता व समोर ब्रह्मगिरीचा डोंगर दिसतो. परत संपूर्ण मागे वळलं व बुरुजात जिथून उतरलं तिथे जाऊन उभं राहीलं की समोर थोडंस डाव्या हाताला हरीहर गड व बसगड दिसतो. बास संपला गड. या गडात पहाण्यासारखं म्हणाल तर जवळपास काही नाही पण अनुभवण्यासारखं खूप काही आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे व आधीच्या प्रवेशद्वाराजवळ जे मारुतीचे शिल्प कोरलेले दिसते त्यावरुन हा शिवकालीन गड असावा. जो नावाप्रमाणेच खजिना अथवा परचक्र आल्यास महत्वाच्या व्यक्तींना लपायला देखिल वापरता येऊ शकेल असा असावा, मात्र परत सांगतो वरती कुणाला रहता येईल, अन्न, दारुगोळा, खजिना साठवता येईल असं काही बांधकाम अथवा अवशेष दिसत नाहीत. त्यामूळे हा नक्कि कधी व का बांधला हे समजायला काही मार्ग नाहिये. मी आजवर वाचलेल्या इतिहासातही याचा उल्लेख मला मिळालेला नाही.

बुरुजातच फतकल मांडून आम्ही पोटपूजा सुरु केली. तासभर आराम - गप्पा झाल्यावरती परत निघालो. तोच रस्ता, तीच लोटांगणं मग त्या लोटांगणासहित फेसबुकच्या प्रोफाईलला डकवता येईल असा फोटो काढण्याची प्रत्येकाची धडपड सुरु झाली. आम्हा ६ जणांचा ग्रुप थोडा मागे पडला. आम्ही कातळकड्याच्या ८ फुटी चिंचोळ्या पट्टिवरती आलो आणि  समोरुन ५-७ वानरांचं टोळकं उभं राहीलं, डाव्या दरीतून  अजून दोघं वर आली, मागे वळलो तर एक जण आधीच येऊन उभा होता. त्यांनी फार हुशारीने जागा निवडली होती. पुढे - मागे माकडं डावी-उजवीकडे दरी. धीट तर इतके होते कि घाबरवायला पाण्याची रिकामी बाटली वाजवली तर ३ लहान पिल्लं पुढे येऊन तीच बाटली धरायचा प्रयत्न करु लागली. एक जण पुढे झाला व त्याने सरळ एका मुलीच्या ट्रॅकपॅन्टचा कोपरा चिमटीत पकडला. आता कुठलीही आक्रस्ताळी हालचाल जीवावरती बेतू शकत होती किंवा त्यांचा हल्ला ओढावून घ्यायला कारणीभूत ठरु शकत होती. गपगुमान एकमेकांची बॅग पकडून झुकझुक गाडि बनवली. त्यांच्याशी नजर न मिळवता मधला ५० फुटांचा पट्टा शब्दश: जीव मुठीत धरुन पार केला. त्यांच्या सरावल्या नजरांनाही आमच्या हातात खाण्यासारखं काही दिसलं नाही त्यामू्ळे त्यांनीही मग काही आडकाठी केली नाही. हे दिव्य पार करुन पुन्हा त्याच ढेकळांच्या घसरड्या वाटेवरुन तोल सावरत अखेर जटा मंदिर गाठलं. दुर्ग भांडारचा ट्रेक पूर्ण झाला होता. सगळे  जण या अनुभवाने "cloud 9" वरती पोहोचले होते.

परत येताना डोक्यात एकच विचार आला - ताजमहाल किंवा राजस्थानातले सुंदर राजवाडे बांधणे हे अर्थात फार मोठे व कलेच्या दृष्टिने अजोड आहे. मात्र त्याचवेळी सह्याद्रिच्या कातळकड्यातून अशी सर्वथा अजिंक्य वाटावी अशी जागा कोरुन काढणं जास्त कठीण आहे. त्या दोन्ही दरवाज्यांत घालावी लागणारी लोटांगणं हि त्या कारागिरांना, मजूरांना व ज्याच्या डोक्यात ही कल्पना आली त्यालाच घातली असं मी अजूनही समजतोय. थोडक्यात किमान एकदा घ्यावा असा हा अनुभव आहे. 

 - सौरभ वैशंपायन.

Friday, January 25, 2013

सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)





पूर्वार्धात आपण बघितलं की १६७० नंतर दक्षीणेतील राजकारण किती अस्थिर झाले होते व पठाणां विरुद्ध पूर्ण दख्खनमध्ये नाराजी पसरली होती. दक्षीणेचे राजकारण दक्षीणेतील सत्तांकडेच राहील हा शिवछत्रपतींचा दृष्टिकोन होता. थोडक्यात १६७६च्या सुरुवातीस एकंदर दक्षीण भारताच्या राजकारणात पुढील स्थिती आली होती -
१) खवासखान मारला जाऊन आदिलशाहीत पठाणांचे वर्चस्व वाढले होते.
२) बहलोलखानाच्या पक्षातील शेरखान लोदिच्या महत्वकांक्षेमुळे दख्खन मधील हिंदू राजे व कुत्बशहा संकटात होता.
३) व्यंकोजीराजांच्याकडे तंजावर आले होते.
४) कुत्बशाहीत मादण्णा - अक्कण्णांचा उदय झाला होता.
५) मुघल सरदार बहादूरखानला बहलोलने युद्धात हरवल्याने त्याने दख्खनमधील बहलोलच्या सर्व शत्रूंना एकत्र केले होते.
६) मुघलांकडून दिलेरखान पठाणाने विजापूरच्या बहलोलखान पठाणाशी संधान बांधले व धूर्तपणाने पठाणांचे अस्तित्व दख्खनमध्ये टिकवून ठेवले होते.

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती महाराजांनी दक्षीणेत उतरायचे का ठरवले? ह्याचा विचार करुया. सर्वप्रथम दक्षीणेत उतरायचा विचार नक्की कुणाचा? महाराजांचा की व्यंकोजीराजांशी बिनसल्याने महाराजांकडे आलेल्या रघुनाथपंत हणमंतेंचा? कारण रघुनाथपंतांचे वडील नारो त्रिमल हणमंते हे शहाजीराजांकडे मुजुमदारी कारभारावरती होते. त्यांचे दोन्ही पुत्र रघुनाथपंत व जनार्दनपंत हे तिथेच वाढले. शहाजीराजांच्या मृत्यूनंतर हे कुटुंब व्यंकोजीराजांच्या पदरी होते. व्यंकोजीराजे जिंजीत असताना, १६७५ मध्ये व्यंकोजींशी बिनसल्याने रघुनाथपंत कुटुंबासह महाराजांकडे आले. येताना ते बहुदा कुत्बशाहीत मादण्णांना भेटून आले व तिथले राजकारण घेऊन महाराजांच्या मनावरती ते बिंबबले असे शिवोत्तरकालिन  बखरकार म्हणतात. मात्र ह्या मोहिमेची संकल्पना महाराजांचीच होती हे तीन गोष्टिंवरुन स्पष्ट होते एक म्हणजे खुद्द सभासद म्हणतो - "तुंगभद्रा देशापासून कावेरीपर्यंत कर्नाटक साधावे हा हेत मनी धरीला, त्यास लष्कर पाठवून साधावे तरी दिवसागतीवर पडते म्हणून खुद्द राजियांनी आपण जावे असे केले."

दुसरा उल्लेख महाराजांनी मालोजी घोरपडेंना भागानगरहुनच लिहिलेल्या पत्राचा करावा लागेल. दोन पिढ्या जपलेलं वैर विसरून दक्षीणेतील लोकांना एकत्र आणण्यासाठी महाराज त्यात म्हणतात - ".... आपल्या जातीच्या मराठीया लोकांचे बरे करावे हे आपणास उचित आहे ऐसे मनावरी आणून तुमचा आमचा वडिलापासून दावा वाढत आला तो आम्ही मनातून काढून नि:कपट होऊन, तुम्ही मराठे लोक, कामाचे, तुमचे बरे करावे ऐसे मनी धरुन हजरत कुतुबशहासी बहुता रीती बोलून तुम्हास हजरत कुतुबशहाचा फर्मान घेऊन पाठवला आहे ... तुम्ही कदाचित ऐसा विचार कराल की, आदिलशहाचे आपण दो पिढीचे वजीर आणि आता विजापूरकडून कुतुबशाहित राजेयांचे बोले कैसे जावे? तरी जे समयी खवासखान धरीला, विजापुरचा कोट पठाणे घेतला ... तेच समयी पादशाही बुडाली.... ऐशिया्स दक्षिणचे पादशाहिस पठाण जाला. हे गोष्ट बरी नव्हे. पठाण बळावला म्हणजे एका उपरी एक कुली दक्षिणियांची घरे बुडविल, कोणास तगो देणार नाही. ऐसे आम्ही समजोन हजरत कुतुबशहा पातशहा यांसी पहिलेपासून रुजुवात राखली होती. त्यावरुन सांप्रत हजरत कुतुबशहाने मेहेरबानी करुन ’हुजुर भेटीस येणे’ म्हणून दस्तखत मुबारक व दस्त पंजीयानसी फर्मान सादर केला."

तिसरी गोष्ट म्हणजे महाराजांनी तंजावर येथे व्यंकोजीराजांना लिहिलेले पत्र. ११ नोव्हेंबर १६७५ रोजी सातारा स्वराज्यात दाखल झाले. काही दिवसांनी महाराज सातार्‍यास आले व गंभीर रीत्या आजारी पडले. ते इतके आजारी होते कि त्यांच्या मृत्युच्या वावड्या देखिल उठल्या. मुंबईकर इंग्रजांनी तर संभाजीराजांनीच विष प्रयोग केल्याची घाणेरडी शंका आपल्या सुरतेकडे पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली. सुदैवाने महिना भरात महाराज दुखण्यातून सावरले. दक्षीणेतील राजकारणावरती महाराजांचे बारीक लक्ष होते महाराजांनी व्यंकोजीराजांना पत्र लिहिले - "येकोजीबाबा तुम्ही महाराज म्हणवितोस हिमत बांध आम्ही तरी येक वेडे बहलोलखानासी वर जादर झगडा लाविला आहे.सारी जमेती याची आम्हावर गुंतली आहे. ...... चंदीपलीकडे तीन लक्षांचा मुलूक बहलोलखानासी आहे ऐसियास जरी आम्ही तुम्हाला ऐसी अकल ल्याहावी की चंदीमध्ये खवासखानाचा भाऊ महमद नासीरखान आहे तो तुम्ही मिलोन पठानाची विलायेत घ्यावी तरी नासीरखान वेडे आहेत त्याच्याने पुढे राजकारणाची बुनयाद चालवत नाही. याकारणे तुम्हाला हुजुर करुन लिहितो की बहलोलखाने विजापूरातून तुम्हाला लिहिले असेल की सेरखान तुम्ही मिलोन खिबा कबज सेरखानचे हवाला करणे तरी येकोजीबाबा तुम्हि पैकियावरी न पहाणे जरी बहलोलखानचा तिकडे सेरखान आहे तो लस्करीयास दोन होन देई तरी आपण तीन होन द्यावेत आणि लस्कर हशम जमेती करावी ..... ऐसे करुन आपणाकडे जमेत करुन बलकट होणे बहलोलखानचा कागद तरी चंदी घ्यावी म्हणौन आले असतील त्या मिसे सेरखानास बोलावून आनून ते तुम्हि मिलुन चंदी घ्यावी अहमद नासीरखानास मारुन गर्देस मेलवावा आणि सेरखान सहजेच आपण होऊन तेथे कमजोर असेल तो भेटीस म्हणुन बोलावून आणून तेथेच जबे करावा. त्याची जमेत काही असली तर त्यावरही हला करावा म्हणजे चंदी आपणास आली. वालगुडपुराभवता मुळूक आहे तो ही आपणास चालोन आला तरी सदरहूप्रमाणे वर्तणूक केली तरी येणेप्रमाणे फते होतच आहे. म्हणजे येकोजीबाबा तुम्हाऐसा कर्नाटकामध्ये जोरावर कोण्ही नाही... मथुरेचा (मदुरेचा) राजा आपले चदावर (तंजावर) खाऊन सुखी असोन आपला सेरीख (मित्र) व्हावा आणि आपण तरतूद तलास करुन येरुळचा (वेल्लोर) कोट व रायेलाचे (विजयनगरचे) तख्त हाताखाली घालावे. पुढे तैसेच घाटावरी चढोन श्रीरंगपटकरांसी आपलेयामध्ये सरीख करोन आपणही श्वार संगीनाथ मेलवून बेंगरूलाचा दवेदार थोरला कोट बहलोलखानाचे लेकापासून रगडून घ्यावा." हे पत्र महाराजांनी साधारण जानेवारी १६७६ मध्ये लिहिले होते म्हणजे दक्षीणेत मोहिम काढायच्या किमान ११ महिने आधी.

आता महाराजांचे त्या मागचे हेतू काय होते ते बघू. १) दख्खनमध्या अनागोंदिचा फायदा घेऊन व दुर्बळ झालेल्या आदिलशाहीच्या राज्यातून, इतर दक्षीणी राज्यांतून शक्य तितका मुलुख हस्तगत करून स्वराज्याच्या सीमा वाढवणे.  २) राज्याभिषेकाच्या वेळी झालेला खर्च चौथाई, खंडणी याशिवाय मिळालेल्या नव्या मुलुखाच्या उत्पन्नातून भरुन काढणे व पुढे मिळणारे उत्पन्न वापरुन स्वराज्याची भरभराट करणे  ३) मुघलांचे मोठे आक्रमण झाले व वेळ पडलीच तर माघार घ्यायला नवीन भूमी निर्माण करणे.  ४) कोकण प्रमाणेच दक्षीण समुद्र किनारा ताब्यात आल्यास भारताच्याच व्यापारी नाड्या स्वत:च्या हातात आणणे. हे महत्वाचे हेतू म्हणता येतील. आणि हे चारहि हेतू तेव्हा सफल झालेच पण दुसरा व तिसरा मुद्दा हा राजाराम महाराजांच्या काळात जेव्हा ते रायगड - प्रतापगडवरुन निसटून खाली जिंजीला गेले तेव्हा साध्य झाले. कारण दुसरा मुद्दा म्हणजे या मुलुखातून जो पैसा उभा रहात होता त्याच्या जोरावरती महाराष्ट्रातील संग्रामाचा खर्च मराठे बर्‍याच प्रमाणात भागवत होते. आणि जिंजीपर्यंत घेतलेली ’माघार’ ही सामरिक दृष्ट्या मराठ्यांना फायद्याची होती कारण - दिल्ली ते पुणे हे जवळपास बाराशे किमीचं अंतर, पुणे ते जिंजी पुन्हा हजार एक कीमीचे अंतर म्हणजे शत्रूला त्याच्या राजधानी अथवा बलस्थानापासून २ हजार किमी दूर खेचून त्याला दुर्बळ बनवायचे व त्याची रसद मधल्या मधे मारुन त्याला जेरीला आणायचे उद्योग मराठ्यांनी राजाराम - ताराराणींच्या काळात केल्याचे दिसून येतील.

थोडक्यात ही मोहिम यशस्वी ठरल्यास "पांचो उंगलियां घी मे।" म्हणतात तसं काहीसं होणार होतं.  एकंदर रागरंग बघून दूरदृष्टिने महाराजांनी व्यंकोजीराजांना जागे करण्याचा प्रयत्न केला. परंतू ते आपल्या तंजावरची हद्दितच सुखी होते. महाराज वास्तविक नुकतेच आजारातून उठत असल्याने ही मोहिम लगेच अंगावरती घेणे शक्य नव्हते. त्यामुळे परीपूर्ण विचारांतीच हालचाल करावी लागणार होती. आता त्यांनी कुत्बशहाला पुढे करुन त्याच्या आडून नेतृत्व करता येते का हे चाचपायला सुरुवात केली. त्यात त्यांना रघुनाथपंतांची व मादण्णांची साथ मिळणार होतीच. बरोबरच एक सार्वभौम राजा आहोत ह्याची प्रचिती देखिल त्यांना जगाला द्यायची होती ती या मोहिमेने कशी देता येईल याचाही विचार स्वराज्याच्या दृष्टिने होणे गरजेचे होते. जर हे सगळे मनासारखे जुळले तर मुघली सत्तेचा पाया दख्खनमधुन कायमचा उखडून टाकता येईल हे प्रमेय महाराजांनी मनोमन मांडले होते.

जुलै १६७६ मध्ये कुत्बशहाने आदिलशाही व महाराज यांच्यात तह घडवून आणला. मुघलांचा शिरकाव टाळाता यावा म्हणून महाराजांनीही याला लगेच होकार दिला. तहानुसार महाराजांकडे कोल्हापुरच्या पुढचा कृष्णगिरीपर्यंतचा मुलुख रहावा व त्या बदल्यात महाराजांनी ३ लक्ष रुपये पेशकश व दरसाल १ लक्ष खंडणी द्यावी असे ठरले. याच दरम्यान पूर्वार्धात सांगितले तसे ऑगस्टमध्ये नळदुर्गाजवळ बहलोल - बहादुरखान एकमेकांना भिडले. व त्यात बहादूरखानाला पराभव पत्करावा लागला. बहलोलखानाचा ओढ दिलेरखान पठाणाकडे असल्याने त्याने महाराजांशी केलेल्या तहाला महत्व दिले नसावे कारण सप्टेंबरमध्ये बेळगाव - बंकापूर जवळील भाग घेण्यासाठी मराठे गेल्यावरती आदिलशाहीकडून तो प्रदेश देण्याची टाळाटाळ झाली. महाराजांनी तो प्रदेश लुटून रायगडि प्रयाण केले. वरुन त्यांनी आता बहादूरखानाशी तह करुन बहलोल विरोधात ४-५ हजारांची कुमकही रवाना केली. अर्थातच पुढे बहलोलने साखरेत घोळवलेली बोलणी केल्यावरती बहादूरखानाने माघार घेतली. हीच अनुकुल वेळ आहे हे जाणून आता महाराजांनी थेट कुत्बशहाला भेटता येईल का हे चाचपायला सुरुवात केली व त्या दृष्टिने कुत्बशाहीतले आपले वकिल प्रल्हाद निराजी यांना हाताशी धरुन कुत्बशहाचे अधिकृत निमंत्रण मिळवण्याची खटपट सुरु झाली. अनेकदा राजकारणात हि निमंत्रणे आपणहून पदरात पाडून घ्यावी लागतात. एकदा का दख्खनमध्ये असा चंचूप्रवेश केला की मग अर्धा डाव जिंकल्यात जमा होता.

कुत्बशहा पहिले साशंक होता - "जैसा अफझलखान बुडविला की शास्ताखान बुडविला, दिल्लीस जाऊन आलमगिर पातशहास पराक्रम दाखविला ऐसा एखादा अनर्थ जाहल्यास काय करावे? भेट मात्र राजियाची न घेऊ, जे मागतिल ते देऊ." यावरुन महाराजांनी केलेल्या अद्भुत कृत्यांनी भारतभर त्यांच्याविषयी किती दरारा पसरला होता हे दिसून येते. मात्र प्रल्हाद निराजीनी आपली बाजू लावून धरली. महाराजांनी किती धूर्त, गोड बोलणारे व वेळ पडल्यास बनेल होणारे चाणाक्ष वकिल नेमले होते हे अफझलखान भेट काय किंवा ही भागानगरची भेट काय यावरुन दिसून येते. प्रल्हाद नीराजींनीही सगळ्या आणा-भाका घेऊन हे निमंत्रण पदरात पाडून घेतले. त्यांनी मादण्णांचा विश्वासही तितकाच संपादन केला. त्याचा परीणाम म्हणून - "हजरत कुतुबशहाने मेहेरबानी करुन ’हुजुर भेटीस येणे’ म्हणून दस्तखत मुबारक व दस्त पंजीयानसी फर्मान सादर केला."

आता दख्खनमध्ये जायचे तर स्वराज्याची व्यवस्था लावणे गरजेचे होते. आधी मुघलांची आघाडी शांत ठेवणे गरजेचे असल्याने निराजीपंतांना मोठ्या नजराण्यासह बहादूरखानाकडे रवाना केले. व एक वर्षांसाठी शांतता राहिल असा तह केला. बहलोलशी लढण्यात महाराजांनी मदत केल्याने व आधीच्या घटनांमध्ये महाराजांनी त्याला बेजार केल्याने तो देखिल या नजराण्यांनी खुष झाला. उलट मराठ्यांची कटकट होणार नाही यातच त्याला समाधान होते. रायगडच्या उत्तरेकडील भाग त्यांनी मोरोपंत पेशव्यांकडे सोपवला, पोर्तुगिज व हबश्यांसमोर अनाजीपंत आणि विजापूरच्या सीमेवरती दत्ताजीपंतांना ठेवले. खुद्द रायगडाची जबाबदारी राहुजी सोमनाथांकडे दिली. युवराज शंभूराजांना बहुदा घरात सुरु झालेल्या सुप्त संघर्षापासून जाणूनबूजून दूर ठेवण्यासाठी शृंगारपुर सुभ्याची जबाबदारी दिली. बहुदा नोव्हेंबरच्या सुरुवातीसच शंभूराजे शृंगारपुरी गेले असावेत.

या मोहिमेसाठी महाराजांनी बहुदा डिसेंबरच्या मध्यावरती किंवा बहुदा अखेरीसच रायगड सोडला असावा. एरवी दसर्‍याच्या मुहुर्तावरती मराठे नवीन मोहीमा घेत. मात्र पावसाळा संपून स्वराज्याची घडी लावणे, इतरत्र कुठलाही संघर्ष निर्माण होऊन दुसरी आघाडी उघडावी लागु नये म्हणून आदिलशहा, मुघल यांबरोबर नवे तह - करार करणे यातच सप्टेंबर उजाडल्याचे आधी आपण बघितलेच आहे.  मोहीमेसाठी महाराजांनी खजिना, भरपूर घोडदळ, प्रचंड पायदळ घेतले. कारकून घेतले. कर्नाटकचे माहीतगार लोकं घेतले. सभासदाने तब्बल पंचवीस हजार घोडदळ असल्याचे म्हंटले आहे. तर इंग्रज तीच संख्या २० हजारांचे घोडदळ व ४० हजारांचे पायदळ घेतले असे म्हणतात. थोडक्यात महाराजांसोबत ५० हजारांचे सैन्य नक्कीच होते. पहिल्यांदाच इतकं मोठं मराठी सैन्य मोहीमेवरती जात होतं. याशिवाय दिर्घकालिन मोहीम असल्याने रसद करायला हजारोंनी बैल, वरकड कामे करणारे बाजारबुणगे, शेकड्याने कुशल कारागिर वगैरे सोबत असावेत. रघुनाथपंत व जनार्दनपंत हणमंते सोबत होतेच. शिवाय पायदळाचे सरानौबत येसाजी कंक, बाजी सर्जेराव जेधे, सोनाजी दौलतबंदक, बाबाजी ढमढेरे, आनंदराव, मानाजी मोरे, सूर्याजी मालुसरे, धनाजी जाधव, सेखोजी गायकवाड अशी तोलामोलाची माणसे होती. कारकूनी अधिकार्‍यांमध्ये बाळाजी आवाजी चिटणीस, मुन्शी नीलप्रभू, शामजी नाईक पुंडे हे होते. खुद्द सरसेनापती हंबीरराव मोहीते हे दुसर्‍या मार्गाने गोवळकोंड्याला येणार होते.

या मोहीमेवरती महाराजांनी ठरवून वरकड खर्च केला होता. सैनिकांचे पोषाख, निशाणे वगैरे हा सार्वभौम राजाच्या सैन्यासारखा केला होता. नवी शस्त्रे, दारुगोळा, चिलखते, शिरस्त्राणे उत्तमोत्तम प्रतीची होती. दोन घोडेस्वारांत तीन घोडे ठेवले होते. अर्थात हा भपका मुद्दामहुन केला असला तरी सर्व सैन्य शिस्तबद्धच होते. इतर चैनीच्या वस्तू, स्त्रीयांना अजिबात प्रवेश नव्हता. महाराजांनी सैन्याला कडक हूकूम केले होते - "एक काडी रयतेची तसनस न व्हावी.’ आवश्यक त्या वस्तू खरेदी कराव्यात, लूट कदापि करु नये. उल्लंघन झाल्यास शिरच्छेदच होणार होता. खुद्द महाराजांचा  व मुख्य ४-६ अधिकार्‍यांचे तंबू साधे जाड कापडाचे होते. तर नेहमीच्या कारभारासाठी म्हणून असलेला मोठा तंबू देखिल जाड्याभरड्या कापडाचाच होता. त्यामुळे अर्थात इतरांचे तंबू भपकेबाज असण्याची शक्यताच नव्हती.

आपली हालचाल शक्य तितकी महाराज गुप्त ठेवत होते. महाराजांनी दोन तुकड्या करुन दुसरी तुकडी हंबीरारांवांसोबत दिली जी तोरगळप्रांतातून तुंगभद्रेच्या किनार्‍याने कुत्बशाहीत शिरणार होती. याच तुकडीत बाजी सर्जेराव जेधे व त्यांचा तरणाताठा मुलगा नागोजी जेधे होता. ह्या तुकडिला बहलोलखानचा सरदार हुसेनखान मियाण आडवा आला. येलगेंदलाजवळ मोठी धुमश्चक्री उडली. मराठ्यांनी हुसेनखानच्या सैन्याला पार चेचून टाकले. त्याचे सैन्य माघार घेऊ लागले. खुद्द हुसेनखानचा हत्ती रणांगणातून पळून जाऊ लागला. नागोजी जेध्याने हे बघितले. व दौडत जाऊन स्वत:चा घोडा मध्ये घातला. हत्तीची सोंडच कापली. हत्ती घाबरुन उलटा फिरला व परत रणांगणाकडे जाऊ लागला. हुसेनखान संतापला त्याने एक तीर नागोजीच्या दिशेने सोडला. तो थेट नागोजीच्या कपाळात घुसला. हुसेनखानला देखिल मराठ्यांनी पकडले. नागोजीच्या मस्तकात घुसलेला तीर बाहेर काढताच नागोजीही तडफडत मृत्युमुखी पडला. त्याची पत्नी गोदूबाई हे वृत्त समजताच कारीस सती गेली. या घटनेनंतर बहुदा बाजी जेधे आधी रायगडला गेले व तेथून कारीला गेले असावेत. नंतर महाराजांसोबत पुन्हा दख्खनमध्ये आले असावेत. ह्या घट्नेनंतर महाराज स्वत: कारी गावांत गेले व नागोजीम्च्या आईचे सांत्वन केले. त्यांना प्रतिवर्षी एक शेर सोने खर्चासाठी देण्याची व्यवस्था लावली. जेधे शकावली म्हणते पौषात हुसेनखानचा पाडाव झाला. यावरुन ही घटना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीत घडली असावी. म्हणूनच वरती मी महाराज डिसेंबरच्या शेवटी रायगडवरुन निघाले असण्याची शक्यता नोंदवली आहे.

महाराजांनीया मोहीमेवरती निघण्या आधी पाटगावास मौनीबुआंचे दर्शन घेतले. आशिर्वाद मिळावा म्हणून महाराज बराचवे थांबले. मौनीबुआ अर्थात कधी काही बोलत नसत. बर्‍याच वेळाने त्यांनी खडीसाखर दिली व महाराजांसोबत उभे असलेल्या मोरोपंतांच्या हातातील चंपक फुलांचा तुरा महाराजांच्या डोईवर ठेवला. महाराज नेहमीच सर्व धर्म-पंथांच्या संत-सत्पुरुषांचा आदर करीत मात्र त्यांनी भलत्या ठिकाणी नाक खूपसले तर ते त्यांना सूनवायला देखिल मागे-पुढे बघत नसत. मौनीबाबांच्या प्रमाणेच महाराज चिंचवडकर देवांनाही फार आदर देत. मात्र महाराज सातारा भागात असताना निमसड भागात त्यांना जेजूरीचे कान्हा कोळी व सूर्याजी घडसी येऊन भेटले. त्यांनी चिंचवडकर देवांविरुद्ध महाराजांकडे तक्रार केली. जेजुरीला गुरवांचा तंटा सुरू होता. देवांनी त्यात हस्तक्षेप करुन परस्पर निर्णय देऊन दोघांचे हात तोडले व त्यांना कोंडाण्यावरती कैदेत टाकले होते. ही तक्रार ऐकून महाराज संतापले. त्यांनी टाकोटाक देवांना तिरकस पत्रं लिहिले - "तुमची बिरदे आम्हांस द्या व आमची बिरदी तुम्ही घ्या!" दुसरे पत्र कोंडाण्याच्या गडकर्‍यास लिहिले - "तू चाकर आमचा की देवांचा?" कैद्यांची सुटका करुन या प्रकरणावरती स्वारीहून आल्यावरती निर्णय द्यायचे वचन महाराजांनी दिले.

महाराज बहुदा गोदातीराने मराठवाड्यातून नांदेड बोधन मार्गाने सिकंदराबाद व तेथून भागानगरकडे गेले असावेत. एका सनदपत्रात ’महाराज राजश्री थोरले कैलासवासी स्वामी भागानगर्प्रांते स्वारीस आले होते, ते समयी मौजे कंदकुडती परगणे बोधन सरकार नांदेड हा गाव समग्र ब्राह्मणास अग्रहार करुन दिला’ अशी नोंद आहे. महाराजांनी कुत्बशाहिच्या हद्दित प्रवेश केला. महाराजांचे सैन्य शिस्त पाळून येत असलेले बघून कुत्बशहावरती त्याचा परीणाम झाला असावा. त्याने स्वत: महाराजांच्या स्वागतार्थ काही गावे सामोरा येण्याची तयारी तो करु लागला. हे समजताच महाराजांनी निरोप पाठवला ’आपण वडील भाऊ, मी धाकुटा, आपण पुढे न यावे’ बादशहा अधिकच संतुष्ट झाला. त्याने अक्कणा व मादण्णांना पुढे धाडले. त्यांनी मोठ्या सन्मानाने महाराजांना शहरात नेले. दिनांक होता - ४ मार्च १६७७. सभासद म्हणतो - "राजियांनी आपले लष्करास कुल्जरी सामान केला होता. सूमुहुर्त पाहून पातशाहाचे भेटीस भागानगरमध्ये चालिले. पातशहाने नगर शृंगारिले. चौफेरी बिंदीस कुंकुम केशराचे सडे, रंगमाळा घातल्या, गुढिया, तोरणे, पताका, निशाणे नगरात लावली. नगर नागरीक लोक कोट्यान कोटी राजा पहावयास उभे राहिले. नारींनी मंगळ आर्त्या अगणित उजळून राजियास वंदिले. सोने - रुपियाची फुले राजियावरती उधळली. राजियांनी लोकांस खैरात द्रव्य वस्त्रे अगणित दिली आणि सर्व सैन्यासहित दादमहालात पावले..... तेथून पातशहास खालते उतरु नका आपणच खासा येतो असा निरोप पाठविला." मात्र इथे महाराजांनी आपणही सार्वभौम राजे आहोत हे दाखवून द्यायचे ठरविले. वास्तविक कुतुबशाहीचा रिवाज होता की शिरभोई धरावी, तसलिम करावी - म्हणजे पातशहाला लवुन कुर्निसात करावा व मुजरा करावा. मात्र महाराजांनी म्हंटले - ’आम्ही आपणावरी छत्र धरीले असे. त्यामुळे शिरभोई धरणे व तसलिम करणे हे माफ व्हावे.’ कुत्बशहाने ते मान्य केले. महाराजांना समोरे जाऊन त्याने महाराजांना थेट आलिंगन दिले. व महाराजांचा हात धरून त्यांना आपल्याच शेजारी बसविले. दोघेही एकासनिच बैसले. अनेकदा डोकेफोड करुन देखिल जे साधता येत नाही ते अश्या कृतींनी साधता येते. दस्तुर खुद्द कुत्बशहाच त्यांना आलिंगन देऊन एकासनी बसवतो आहे ह्याचा अर्थ महाराजांच्या राज्याला - सिंहासनाला त्याची मान्यता आहे हा उघड संदेश सगळ्यांना मिळाला.

महाराजांबरोबर जनार्दन पंत, प्रल्हादपंत, सोनाजी नाईक बंकी व बाबाजी ढमढेरे हे पाचजण होते. शिवाय अक्कण्णा व मादण्णा होतेच. महाराज व पातशहा एक प्रहर संवाद करत होते. कुत्बशहा व जाळीआड असलेल्या त्याच्या स्त्रीया, इतर मंत्री दस्तुर खुद्द महाराजांच्या तोंडून त्यांच्याच अतुलनिय पराक्रमाच्या कथा ऐकून अचंबित झाले. भेटी अखेर पात्शहाने महाराजांना उंची वस्त्रे, अलंकार, घोडे, हत्ती दिले व त्यांचा सत्कार केला. महाराजांना निरोप द्यायला पातशहा स्वत: महालाखाली आला. पातशहाचे चांगले मत बनले - ’राजा प्रामाणिक, आपल्यास रक्षिले, क्रिया जतन केली." दुसर्‍या दिवशी महाराजांना मादण्णांनी आपल्या घरी मेजवानीचे निमंत्रण दिले. महाराजांनेही ते स्वीकारले. शिष्टाईच्यावेळी हस्तीनापुरात फक्त विदुराकडे श्रीकृष्णाने भोजनाचे निमंत्रण स्वीकारले होते अगदी तसेच. मादण्णांच्या आईने स्वत: महाराजांसाठी अन्न शिजवले व वाढले.

कुतुबशहाने मादण्णास बोलावून ’राजियास काय पाहिजे ते देऊन संतुष्ट करुन निरोप द्यावा’ असे सांगितले. पुन्हा एक सुमुहुर्त पाहून कुत्बशहा व महाराजांची भेट घडवून आणली गेली.  तह ठरला. कुत्बशहाने मादण्णांना सर्व अधिकार दिले. "आपली पादशाही जितकि वाढवू ये तितकी वाढवणे, पठाणाची नेस्तनाबूद करणे, दक्षीणची पातशाही आम्हा दक्षणियांचे हाती राहे ते करावे." या सुत्रावरुन उभय पक्षात करार झाला. -
१) स्वारी खर्चासाठी कुत्बशहाने दरमहा ३ हजार होन अथवा ४ लक्ष ५० हजार रुपये महाराजांना द्यावेत. २) कर्नाटक स्वारीत मदत म्हणून मिर्झा मुह्हमद अमीन याने एक हजार घोडदळ व ३ हजार पायदळाची मदत करावी. ३) पाश्चात्य तोपचींसह कुत्बशाहीचा नावाजलेला तोफखाना दारुगोळ्यासह महाराजांना मिळावा व त्याबदल्यात आदिलशहाने बळकावलेला कुत्बशाहीचा प्रदेश भूभाग शहाजीराजांचे जहागिरी वगळून जिंकलेल्या भागाचा एक हिस्सा कुत्बशहाला देण्यात येईल अशी मुख्य कलमे होती. खेरीज मुघलांचे आक्रमण आले तर परस्परांना मदत करावी. एकमेकांचे वकील एकमेकांच्या दरबारी रहातील. तसेच कुत्बशहाने दरवर्षी एक लाख होनांची खंडणी महाराजांना द्यावी असेही तहात ठरले. महाराज भागानगरात सुमारे दिड महिना मुक्कामास होते. तिथूनही त्यांनी आदिलशाहीतील घोरपडेंसारख्या मोठ्या सरदारांना आपल्या किंवा कुतुबशाहीच्या बाजूने ओढण्याचे प्रयत्न केले. त्याचा फारसा उपयोग झाला नसला तरी महाराजांचा राजकिय प्रभाव अर्थात विस्तारला होता. एप्रिल १६७७ मध्ये महाराजांनी भागानगर सोडले ते भरपूर द्रव्य, दाणा, व अधिकची कूमक घेऊनच. दक्षिण दिशा विजयश्रीची माळ घेऊन त्यांची वाटच बघत होती.


महाराजांनी कृष्णा ओलांडून निवृत्तीसंगम आणि पुढे श्रीशैलम्‌ याठिकाणी त्यांनी तीर्थस्नान केले. या ठिकाणी स्नान करुन ते श्र्र्मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला गेले. तिथे त्यांछ्या अंगात देवीचा संचार झाला असे बखरकार म्हणतात. आजूबाजूचे अध्यात्मिक वातावरण, जिजाऊसाहेब गेल्यावरती त्यांच्या आयुष्यात तयार झालेली पोकळी, घरात सुरुवात झालेला सुप्त गृहकलह ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना विरक्तीचे विचार आले असावेत. इतका विरक्तपणा आला की मल्लिकार्जुनाच्या पुजेत बिल्वदलांऐवजी स्वत:चे शीरकमल वहावे असं त्यांना वाटून गेलं. त्याचे वेळी त्यांच्या अंगात भवानीची संचार झाला "तुज ये गोष्टि मोक्ष नाही. हे कर्म करु नको, पुढे कर्तव्यही उदंड तुज हाते करणे आहे." महाराजांनी स्वत:ला सावरले. कदाचित याच दरम्यान महाराजांनी काही अध्यात्मिक पदेही रचली होती. त्यातले एक तंजावरच्या महालातील दफ्तरात सापडले ते पुढीलप्रमाणे -
नासिवंत सुखासाटी। अंतरला जगजेठी॥
नाहि नाहि याते गोडी । लक्ष चौर्‍यौशीच्या जोडी॥
मणुष जन्म गेल्यावारे। काय करशिला बारे॥
शिवराजे सांगे जना। म्या तो सोडिली वासना॥

महाराज साधारण ९ दिवस श्रीशैलम मुक्कामी होते. मल्लिकार्जुनाच्या उत्तरेला महाराजांनी जे गोपुर बांधून घेतले त्याला आज शिवाजीगोपुरम‍ असे ओळखले जाते. तिथेच महाराजांची शिल्पाकृती देखिल आहे. तिथुन महाराज ४ मे १६७७ रोजी तिरुपतीच्या दर्शनाला गेले. महाराजांनी प्रतिवर्षी ४२० होन श्रींच्या अभिषेक, पुजा व नंदादिपासाथी देण्याचे थरविले व एका वर्षाचे द्रव्य त्यांनी तत्काळ दिले सुद्धा. तिरुपतीहुन मद्रासजवळ पेड्डापोलम् इथे महाराज पोहोचले. महाराजांनी महादोजी पंतलुंना इंग्रजांच्या भेटिवरती पाठवले आणि काहि रत्ने व विषावरील उतारासाठी औषधे पाठवण्यास सांगितले. इंग्रजांनीही या वस्तू तातडिने रवाना केल्या. वरुन या वस्तूंची किंमत न आकारता त्यांनी त्या भेटिदाखल महाराजांना दिल्या. शिवाय ४ वार कापड व चंदनाची ४ पात्रे देखिल भेट म्हणून पाठवली.

पेड्डापोलमच्या मुक्कामातच बहुदा महाराजांनी जिंजी स्वारीचा बेत आखला असावा. पूर्वार्धात सांगितल्याप्रमाणे पठाणी पक्षाच्या शेरखान लोदिचा प्रभाव वाढलेला बघून खवासखानाचा भाऊ नासीर मुहम्मदने किल्ला पठाणांच्या ताब्यात जाण्यापेक्षा आपणच तो कुत्बशहाला देऊया असा विचार केला व मादण्णांकडे दूत पाठवला. मात्र विजापुरकरांचा किल्ला असा उघडपणे ताब्यात घेऊन मुघल - विजापूरकरांच्या डोळ्यात येणे त्यावेळि मादण्णांना योग्य वाटले नाही. मात्र किल्लाही जाऊ द्यायचा नव्हता म्हणून मग त्यांनी हुशारीने त्याच दूताला शिवाजी महाराजांची भेट घ्यायला सांगितले. त्यानुसार तो दूत महाराजांना पेड्डापोलम्‌ इथे येऊन भेटला. महाराजांनी देखिल ५० हजार होन व १ लाखाच्या मुलुखाची लालुच नासीर मुहम्मदाला दिली. आणि अपेक्षेप्रमाणे मासा गळाला लागला. थोडिशी लुटूपुटुची लढाई करुन २० मे रोजी त्याने किल्ला महाराजांना दिला देखिल वरुन ठरल्याप्रमाणे महाराजांनी देखिल आपला शब्द पाळला. ५० हजार होन व लाखाचा मुलुख देऊन महाराजांनी दक्षिणेत एक बलाढ्य किल्ला आपलासा केला. ह्याच जिंजी वरुन सुमारे नऊ वर्षे राजाराम महाराजांनी मुघलांना तोंड दिले हे लक्षात घेतल्यावरती महाराजांची दूरदृष्टि लक्षात येते.

जिंजीच्या दुर्गाची भक्कम व्यवस्था महाराजांनी लावली. रायाजी नलगे यांना किल्याची हवालदारी, तिमाजी केशवांना सबनिशी आणि रुद्राजी साळवी यांना इमारतींच्या कामावरती नेमले. व महाराज लगोलग २५ मे च्या सुमारास वेल्लोरच्या दिशेने निघाले. वेल्लोरचा भुईकोट किल्ला दख्खन मधला फार ताकदिचा किल्ला होता. सभासदाने लिहुन ठेवले आहे - "तो कोट म्हणजे पृथ्वीवर दुसरा गड असा नाही. कोटात जीत पानियाचा खंदक. पाणियास अंत नाही असे. उदकात दहा हजार सुसरी. कोटाच्या फाजियावरुन दोन गाडिया जोडून जावे ऐशी मजबुदी. पडकोट तरी चार फेरीयावरी फेरे ये जातीचा कोट."  इ.स. १५६६ च्या सुमारास विजयनगर साम्राज्याचा अधिकारी असलेल्या चिन्नबोमी नायकाने हा भुईकोट उभारला होता. वेल्लोरची मजबुती बघुन भुईकोटाच्या पूर्वेला असलेल्या टेकड्या ताब्यात घेऊन त्यावरती मराठ्यांनी तटबंदी बांधली त्यांनाच महाराजांनी साजरा-गोजरा अशी नावे दिली. काहींच्या मते हे गड आधीच बांधले होते. याच ठिकाणहुन कुत्बशहाच्या तोफखान्याच्या मदतीने वेल्लोरच्या भुईकोटावरती हल्ला करायचा महाराजांचा मानस असावा. मात्र त्याच सुमारास कुत्बशहाने महाराजांसोबत दिलेला तोफखाना परत मागवून घेतला होता. कदाचित महाराजांनी जिंजीचा किल्ला कुत्बशहाला न दिल्याने नाराज होऊन त्याने ही मदत थांबवली असावी. कींवा दुसरे कारण असेही असू शकते की या सुमारास मुघल-आदीलशहा व कुत्बशहां यांच्यातला संघर्ष पुन्हा सुरु झाला होता त्याच कारणाने कुत्बशहाने आपला तोफखाना परत मागवला असावा. कारण काहिही असेल मात्र याच कारणाने आता हा किल्ला जिंकणे जास्त कठिण व वेळखाऊ होऊ शकते हे लक्षात घेऊन त्याला दिर्घकाळ वेढा देऊन बसण्याची गरज महाराजांनी ओळखली. या वेढ्याचे काम त्यांन बहुदा नरहरी रुद्र यांकडे सोपवले व ते शेरखान लोदिचा बंदोबस्त करायच्या मागे लागले.

त्यांनी लोदिच्या अंमला खालचा मैदानी प्रदेश जिंकायला सुरुवात केली. अधेमध्ये जे गड होते त्यांवरतई शेरखान लोदीची माणसे होती. मात्र ते गड सांभाळण्याचे सोडून मराठ्यांना इतर प्रतिकार करायला किल्यांच्या बाहेर पडलेच नाहीत. महाराजांनी आजूबाजूच्या शहरांतील धनाढ्य सावकार व्यापार्‍यांना २ लाख होनांचे कर्ज देखिल मागवले होते पण ते घाबरुन जंगलात परागंदा झाले. मद्रास, पुलकित भागातुन ५ हजार होनांची व्यवस्था झाली. मराठ्यांनी इंग्रजांची टिमेरी येथील वखार लुटून अजून २ हजार होनांचा माल लुटला. वेल्लोरच्या मुक्कामात आजुबाजुच्या संस्थानिकांनी महाराजांकडे आपापले वकील पाठवले. फ्रेंचांनी देखिल आपला वकिल पाठवला. फ्रेंचांनी शेरखान लोदिला वालदूरचा किल्ला जिंकून दिला होता. महाराजांनी त्याबाबत नाराजी दाखवून आता त्याच्या विरोधात मदत मागितली. मात्र फ्रेंच याकरीता तयार झाले नाहीत. मात्र प्रत्यक्ष युद्धाखेरीज काही मदत लागली तर ती करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आता शेरखानला एकटा पाडल्यावरती त्याची शिकार करणे सोपे झाले. तो आपल्या सासर्‍याकडे तिरुवाडिच्या किल्यात आश्रयासाठी गेला होता. त्याचे ३ हजार घोडदळ व ४ हजार पायदळ त्याच्या बरोबर होते. मात्र तो स्वत: कसलेला लढवैय्या नव्हता. त्याच्या मुत्सद्यांना त्या सैन्याचा फाजिल आत्मविश्वास होता. वरुन विजापूर्वरुन मदत येईल अशी वेडि आशा त्यांना होती. पण महाराज तडकाफडकि तिरुवाडिजवळ येऊन ठाकले. जवळिल काहि सैन्याला त्यांनी मराठ्यांवरती पिटाळले. मात्र मराठ्यांनी स्वस्थता धारण केली. गोंधळून जाऊन आपले काहितरी चुकले आहे असे वाटून शेरखानने सैन्य उलटे बोलावले. सैन्य माघारी वळाले आहे याचा अंदाज येताच मराठी सैन्याची फळी वेगाने त्यांवरती चालून गेली. मग काय? त्यांच्या पळापळिला धरबंधच उरला नाही. स्वत: शेरखान लोदी अकलनायकाच्या अरण्यात शिरला. मागे प्रतिकारासाठी त्याने ५०० पठाण ठेवले होते. मात्र २-३ तासांतच तो प्रतिकार मोडून मराठे त्याच्या मागावर गेले. काहि हत्ती - उंट व आपले घोडदळ घेऊन शेरखान भुवनगिरीकडे निसटला. मराठ्यांनी निकराचा पाठलाग करुन त्याचे २७० घोडे, २० उंट, शेकड्यानी बैल, अनेक तंबू, काही नगारे पकडले. महाराज यावेळी तेवनापट्टम जवळ होते कारण तिरुवाडिचा किल्ला शेरखानच्या सासर्‍याने झुंजता ठेवल्याने त्याकडेही लक्ष देणे भाग होते. महाराजांची दुसरी तुकडी शेरखानवरी चालून गेली तिने २०० घोडे व ४ हत्ती पकडून आणले. आता शेरखान आपल्या १००-१२५ स्वारांनिशी भुवनगिरीपट्टणमच्या किल्यात निसटून गेला. आता शेरखानचे खरे नाही हे बघताच वालदूर, तेगनापट्टण वगैरे किल्यातून पठाणी सैन्य शरण आले अथवा सरळ सरळ पळून गेले. जुलैच्या १६७७ च्या पहिल्या आठवड्यात महाराजांच्या उपस्थितीतच मराठी सैन्याने भुवनगिरीपट्टन वरती जोरदार हल्ला चढवला. अखेर शेरखान लोदिने गुडघे टेकले. त्याने किल्ला तर ताब्यात दिलाच वरुन २० हजार होनांची खंडणी द्याचे कबूल केले. त्यावेळी पैसे नसल्याने त्याने आपल्या मुलाला ओलिस ठेवले. महाराजांनी शेरखानची सन्मानपुर्वक भेट घेतली. तह झाल्यावर एखाद्या सामान्य स्वाराप्रमाणे तो केवळ २० घोडेस्वारांनीशी अरीयलूरच्या झंगलात निघून गेला. तब्बल सहा महिन्यांनी त्याने आपल्या हिंदू मित्रांकडून पैसा गोळा करुन ती खंडणी भरली व आपल्या मुलाची सूटका केली. मग शेरखान आपल्या मुलासह आश्रयासाठी मदुरेच्या नायकाकडे निघून गेला. बहलोलखानाचा दख्खनमधला सर्वात मोठा साथीदार महाराजांनी असा कायमचा गपगार करुन टाकला.

महाराज आता व्यंकोजीराजांकडे वळले. वास्तविक कर्नाटकात आल्यापासून महाराजांनी त्यांना अनेक खलिते पाठवून भेटण्याची इच्छा प्रकट केली होती. मात्र व्यंकोजीराजांनी टाळाटाळ केली. आता कायमचा सोक्षमोक्ष लावण्याच्या विचाराने महाराज स्वत: तंजावरच्या दिशेने निघाले. त्यांनी तिरुमळ्ळपाडि जवळील कोल्लिडमच्या पात्राजवळ छावणी केली. व व्यंकोजींना निरोप पाठवला "राजश्री गोविंदभट गोसावी, राजश्री काकाजीपंत, राजश्री निळोबा नाईक व रंगोबा नाईक व तिमाजी यक्षियारराऊ असे भले लोक आम्हांपासी पाठवणे." नाईलाजाने व्यंकोजीराजांनी त्यांना पाठवले. महाराजांनी इतके वर्ष सामंजस्य दाखवल्याने व्यंकोजीराजांनी जी वडिलोपार्जित जहागिरी व संप्पत्ती उपभोगली होती त्याबाबत ’बहुत रीती घरोबियाचा व्यवहार सांगुन’  आपला हक्क असलेला अर्धा वाटा द्यावा अशी मागणी शिवरायांनी केली. मात्र अनेक दिवस व्यंकोजींनी त्यावर प्रतिक्रियाच दिली नाही.मात्र मुत्सद्दि फारच मागे लागले तेव्हा ’आम्ही वडिलाचे दर्शनाला येतो’ असा निरोप त्यांनी महाराजांना पाठवला. महाराज आनंदले. अभयाची खात्री देऊन त्यांना निमंत्रण धाडले.

२ हजार स्वारांसकट ते निघाले. सोबत काकाजीपंत पेशवे, जगन्नथपंतलु, शिवाजीपंतलु कोन्हेर, महदेव मुजुमदार हे होते. खेरीज शहाजीराजांच्या नाटकशाळेचे २ पुत्र प्रतापजीराजे व भिवजीराजे हे देखिल होते. महाराजांचे अजून एक सावत्रबंधू संताजीराजे हे महाराजांना कदाचित आधीच येऊन मिळाले होते. त्यांना महाराजांनी हजार स्वारांची सरदारकी दिली. स्वत:चे वडिलपण विसरुन महाराज स्वत: त्यांना तिरुपन्नृती गावापर्यंत सामोरे गेले. तेथिल पुष्पवनेष्वरच्या मंदिरात दोघा बंधुंची भेट झाली. व तेथुन मोठ्या सन्मानामे महाराजांनी त्यांना तिरुमळ्ळपाडिच्या छावणीवरती नेले. येथे व्यंकोजीराजे ८ दिवस मुक्काम करुन होते. त्यांछ्यात अनेक बैठकी झाल्या महाराजांचे म्हणणे होते - "तुम्ही आम्ही प्रत्यक्ष बंधु. आज तेरा वर्षे जाली, महाराजांनी कैलासवास केला. सर्व दौलतीचा अनुभव घेतलात. वडिलांचे संपादिल्या अर्थाचे उभयतांही विभागी. तुम्हीच आम्हांस काहिच न कळविता आपले विचारानी वहिवाट केली. तुमची संपादिली दौलतीत आम्ही विभाग मागतो असा अर्थ नाही.तुम्हास ईश्वरने सामर्थ्य द्यावे, नवीन संपादावे, परंतु वडिलांचे जोडीचे अर्थास आमए विचाराशिवाय करणे चालणे तुम्हास विहीत नाही. काय दौलत आहे त्याचे कागदपत्र समजावावे. तुम्ही आम्ही समजोन चालू. तुम्हांस जड पडेल तिथे आम्ही मदत देऊ. जोणेविशी मनात खतरा ठेवू नये." मात्र व्यंकोजी काहि बधत नव्हते. त्यांना विजापूरकरांची बांधिलकि सोडवत नव्हती. व या दुसरा अर्थ स्वराज्य विस्ताराला आपल्याच माणसाचा विरोध असा होता. वरुन महाराजांच्या हक्काच्या वाट्यावरती इतकी वर्षे उअपभोग घेऊन त्यापुढेही त्याच वाट्याच्या मदतीने स्वराज्याला अपाय होऊ शकत होता. महाराजांनी दूरदर्शीपणाने हे ताळायचे ठरवले होते. पण बोलण्यातून गुंता काही सुटत नव्हता. महाराज चिडून भर बैठकीतून उठून गेले.

२३ जुलैच्या रात्री बहुदा महाराजांच्या कोपाच्या भीतीने कदाचित जगन्नाथपंतांच्या सल्यावरुन वुंकोजीराजे कोल्लिडम नदी ओलांडून गुपचूप तंजावरकडे निसटले. महाराजांना फार वाईट वाटले. मागे राहिलेल्यांपैकि एकट्या जगन्नाथ पंतांना अटक केली व बाकिच्यांना सन्मानाने परत पाठवले. पण फार दु:खाने महाराज उद्गारले - "काय निमित्त पळाले? आम्ही त्यास धरीत होतो की काय? ... उगेच उठून पळोन गेले. अती धाकटे ते धाकटे. बुद्धिही धाकटेपणायोग्य केली." तरीही महाराजांनी अखेरचा निरोप पाठवून बघितला. मात्र व्यंकोजीराजांनी संघर्षाचा पवित्रा घेतला. मग मात्र महाराजांनी  आपले सैन्य व्यंकोजींच्या हद्दित घुसवले. त्यांनी जनदेवगड, चिदंबरम, वृद्धाचलम वगैरे भाग जिंकला.

याच दरम्यान रघुनाथपंत हणमंते रायगडवरुन ४०० घोडेस्वारांसह महाराजांना भेटायला आले. महाराजांनी सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले. दुसर्‍या दिवशी त्यांना महाराजांनी मदुरेच्या संस्थानिकांकडे पाठवले. त्यांनी ६ लक्ष होनांचा तह करुन पैकि दिड लक्ष होन ताबडतोब भरायला सांगितले. याच मुक्कामात दोन फ्रेंच वकिल महाराजांना येऊन भेटले. व पांदेचेरीबाबत त्यांनी अभय मागितले. महाराजांनी तिथल्या नेमल्या हवालदाराला तश्या सूचना देणारे फर्मान पाठवले. तिरुमळ्ळवाडीवरुन महाराज २४ जुलैला वलिगंडापुअरम येथे आले. इथला भुईकोट जिंकून तो यशवंतराव शहाजी कदम ह्याच्या ताब्यात दिला. ३० जुलैला उटळूराचा कोट मराठ्यांनी जिंकला. २ ऑगस्ट रोजी एलवनसूरच्या किल्ला मराठ्यांनी जिंकला. तुंदुमगुर्तीच्या मुक्कामात तेवेनापट्टमचे डच महाराजांना भेटायला आले. त्यांनी महाराजांना रेशीम कापड, चंदन, गुलाबपाणी, मालदिवी नारळ, लवंगा, तलवारीची पाती महाराजांना भेट दिली. या कालापर्यंत महाराजांनी विजापूरकरांचा पाईनघाटाचा सर्व मुलुख व व्यंकोजीराजांच्या ताब्यातील कावेरीच्यावरचा जहागिरीचा मुलुख  जिंकला. जवळपास दहा हजार चौरस मैलांचा सुपिक प्रदेश स्वराज्याला जोडला. कर्नाटाकात खोलवर मराठी भाला घुसला. महाराजांनी अगदि श्रीरंगपट्टणही लुटले. पुढले दोन महिने या सर्व प्रदेशाची महाराजांनी जातीने व्यवस्था लावली. खजिना वाडःअवला. डच, फ्रेंच, इंग्रजांची राजकिय व भौगोलिक नाकाबंदि केली. मराठ्यांच्या परवानगीवाचून त्यांना आता त्या प्रदेशातून कुठल्याही कारणाने प्रवास करता येणार नव्हता. निरुपयोगी असलेल्या गढ्या व किल्ले महाराजांनीच पाडले व तिथला दारुगोळा, तोफा जिंजीस पाठवल्या. जिंजीवरती महाराजांनी खूप मेहनत घेऊन गड झुंझता केला. जिंजीचे महत्व सांगताना सभासद लिहितो - "चंदि म्हणजे जैसे विजापूर, भागानगर, तैसाच तख्ताचा जागा. येथे राजियांनी रहावे परंतु इकडेही राज्य उदंड!" मात्र पुढे राजाराममहाराजांनी नऊ वर्षे याच जिंजीच्या आश्रयाने काढली हे बघता महाराजांचे द्रष्ट्रेपण सहज दिसून येते.

२२ सप्टेंबर रोजी महाराजांनी तोफांचे गाडे तयार करणार्‍या व सुरुंग लावूण दगडी भिंती उडवणार्‍या कुशल लोकांची मागणी केली. पण याने शिवाजीचे हात बळकट होतील, शिवाय कुत्बशहा, मुघल यांचे वैर पत्करावे लागेल हे ओळखून इंग्रजांनी आमच्याकडे अशी माणसेच नाहित असे सांगुन हात झटकले. मात्र महाराजांनी जातीने लक्ष घालून जिंजीच्या किल्याची मजबुती करुन घेतली. रघुनाथपंत हणमंते यांना चंदिचा साहेबसुभा सांभाळण्याची जबाबदारी सोपवली. एक लाख होन बक्षीस दिले. व तात्पुरती फौज असावी म्हणून सरनौबत हंबीरराव मोहीते व संताजी भोसले यांचे सैन्य जिंजीस ठेवले.

दुसरीकडे मुघल - विजापूरकर - कुत्बशहा यांच्यात कलगीतुरा रंगु लागला होता. त्याचे झाले असे की बहादूरखानाने पठाणीपक्षासमोर नमते घेतले हे त्याला आवडले नाही. बादशहाची नाराजी दूर व्हावी म्हणून बहादूरखानाने १४ मे १६७७ रोजी नळदुर्ग, आणि ७ जुलै १६७७ रोजी गुलबर्ग्याचा किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतले पण औरंगजेब चिडण्याचे दुसरे कारण कुत्बशहा-मराठे यांच्या मैत्रीकडे बहादूरखानाने केले दुर्लक्ष. त्यासाठी कुत्बशहाला धडा शिकवावा आणि शिवाजीला आपल्या मुलुखातून जाऊ दिले म्हणून त्यांच्याकदून १ कोटी खंडणी आणि तब्बल दहा हजार घोडे मिळवावेत असा आदेश त्याने बहादूरखानाला दिला. मग बहादूरखानाने आगाऊपणे कुत्बशहाला २ कोट खंडणी व २० हजार घोडे मागितले. कुत्बशहाने केवळ ५ लाखांची खंडणी देण्याची तयारी दाखवली. युध्द होणार अशी चिन्हे दिसू लागली. हा तोच कालखंड जेव्हा जिंजीच्या किल्याला महाराजांनी जिंकले होते व त्यानंतर कुत्बशहाने आपले ५ हजारांचे सैन्य व तोफखाना परत मागवून घेतला होता. त्याला हेच कारण असू शकते. बहादूरखानाने विजापूरशी म्हणजेच बहलोलखान पठाणाशी संधान बांधले. मुघलांना पुढली ८ वर्ष खंडणी देऊ नये मात्र त्या बदल्यात मुघलांसोबत कुत्बशहावरती चालून जावे व त्यानंतर शिवाजीवरती चालून जावे असा करार उभयपक्षी झाला म्हणजे चक्र आता पूर्ण फिरुन जैसे थे राजकिय परीस्थीतीवरती आले होते. मात्र मळखेड येथे १५ सप्टेंबर १६७७ रोजी कुत्बशहाने या संयुक्त फौजेचा पराभव केला. या पराभवाचे कारण बहादूरखानाचे आधीचे पठाणी पक्षाबाबतचे कटू मत आणि दक्षीणी मुसलमानांबाबतचा ओढा हे होते.

सगळ्या घटना महाराज सावधपणे बघत होते. आता महाराष्ट्रात परतायला हवे हे त्यांनी ताडले. आपल्या हालचालींचा सुगावा लागू न देता महाराज ऑक्टोबर १६७७ च्या शेवटी रायगडकडे निघाले. महाराजांची पाठ फिरताच इतके दिवस दबून राहिलेल्या व्यंकोजींनी उसळी घेतली. कितीही नाही म्हंटले तरी महाराजांनी त्यांचा मुलुख जिंकला होता. तो परत मिळवण्यासाठी त्यांनी ४ हजार स्वार व ६ हजार पायदळ घेऊन हंबीरराव व संताजी भोसले यांच्या ६ हजार स्वार व ६ हजार पायदळावरती हल्ला करण्यासाठी निघाले. मात्र दोन्ही सैन्य काही दिवस एकमेकांच्या समोर तळ देऊन युद्ध होत नव्हते. मात्र १६ नोव्हेंबर १६७७ मध्ये तोंड लागले. महाराजांच्या सैन्याला माघार घ्यावी लागली. मात्र या माघारीची बोच हंबीररावांना लागली. त्याच रात्री त्यांनी अनेक दिशांनी व्यंकोजीराजांच्या छावणीवरती हल्ला करुन ३ सेनापती कैद केले, हजारभर घोडे, शेकडो तंबू हस्तगत केले. व्यंकोजींचे सैन्य पळून गेले. या लढाईचे वृत्त महाराजांना समजले तेव्हा ते परतीच्या वातेवरती तोरगळ प्रांती होते. त्यांनी एक समजावणीचे पण खरडपट्टी देखिल काढणारे पत्र व्यंकोजीराजांना पाठवले. पण त्याने व्यंकोजीराजांना शहाणपण आले नाही. मग मात्र महाराजांनी त्यांचा मुलुख जिंकायचे आदेश आपल्या सैन्याला दिला. अर्णी, बंगरुळ, कोल्हार, शिराळकोट असे व्यंकोजींचे मुलुख महाराजांनी जिंकले. अखेर व्यंकोजींच्या पत्नी दीपाबाईसाहेब यांनी व्यंकोजीराजांची समजूत घातली व रघुनाथपंतांना मध्यस्थ बनवून महाराजांशी तह करायला लावला. कोल्हार प्रांत महाराजांना दिला. महाराजांनीही मग जिंकलेले बंगरुळ, होस्कोट वगैरे प्रांत व पाच लाख उत्पन्नाचे तीन महाल दीपाबाईसाहेबांना अतीव आदरपूर्वक चोळीबांगडीसाठी दिले. व सात लाख होनांचा प्रदेश व्यंकोजीराजांना दूधभातासाठी दिला.

पण पराभवाचा सल व्यंकोजींना लागून राहिला. त्यांनी विरक्ती स्वीकारली. हे कळताच महाराजांनी त्यांना उत्साह देणारे पत्र पाठवले. "आम्ही तुम्हास वडील मस्तकी असता चिंता कोणे गोष्टीची आहे? ..... तुम्ही त्या प्रांते पुरुषार्थ करून संतोषरुप असलिया आम्हास समाधान व श्लाघ्य आहे की, कनिष्ठ बंधू ऐसे पुरुषार्थी आहेती .... पुरुषार्थ व किर्ती अर्जणे ... वैराग्य उत्तरवयी कराल तेवढे थोडे. आज उद्योग करुन आम्हासही तमासे दाखविणे."

इथे एक खूप महत्वाची गोष्ट सांगाविशी वाटते आहे - जिंजीवरुन परत येताना तिरुवन्नमलाई या ठिकाणी आले. तेथिल अरुणाचलेश्वर शिवमंदिर व समोत्तिरपेरुमल देवालय ही दोन्हीहि मंदिरे भ्रष्ट करुन तिथे मशिदी उभारल्या होत्या. महाराजांनी त्या मशिदी पाडून पुन्हा त्या ठिकाणी शिवलिंगांची पुन: प्राणप्रतिष्ठा केली. त्या मंदिरांच्या मंडपासमोर महाराजांनी एक गोपूर बांधले. तसेच या मंदिराच्या पिछाडिवर असलेल्या टेकडीवरती दर त्रिपुरी पौर्णिमेला तुपाचा भव्य नंदादीप लावण्याची प्रथा अनेकवर्षे बंद पडली होती ती सुरु केल्याचेही सांगितले जाते. ती आजही कायम आहे.

तिथुन महाराज म्हैसूरच्या पुर्व भागात आले. त्यांच्या भयाने अनेक विजापूरी सरदार त्या भागातले किल्ले सोडून पळून गेल्याचे इंग्रजांनी नमूद केले आहे. छोट्या-मोठ्या पुंडाव्यांचा बिमोड करत कोल्हार, बाळापुर, कोप्पळ मार्गाने नोव्हेंबर १७६६ च्या पहिल्या पंधरवड्यात गदग प्रांतात आले. दक्षीणेतील अस्थिर परीस्थीती बघून कर्नाटक प्रांतापासून पन्हाळ्यापर्यंतच्या मुलुखावरती नियंत्रण आणण्याचा त्यांनी प्रयत्न सुरु केला. मात्र त्या भागात पठाणांचे प्राबल्य होते, खूप सैन्य नसल्याने प्रदेशाची सामरिक बाजू भक्कम करता आली नसली तरी आपले लष्करी डाक कर्नाटकात येत-जात राहिल याची सोय नक्कीच केली.

महाराजांना परतीच्या प्रवासात एकाच ठिकाणी कडवा प्रतिकार झाला. बेलवडी या ठिकाणी. तिथल्या गढीवरती दादाजी रघूनाथाने हल्ला केला. मात्र बेलवाडिच्या ठाणेदाराने कडवा प्रतिकार केला. तब्बल २ महिने त्याने हि गढी लढवली. तो मारला गेल्यावरती त्याच्या पत्नीने सावित्रीबाई किंवा मलवाई देसाई हिने त्यानंतरही एक महिना हा लढा सुरु ठेवला. अगदि मराठ्यांचे अनेक बैल पळवून नेले. अखेर मराठ्यांच्या रेट्यापुढे नाईलाजाने तिला शरण यावे लागले. मात्र ती आपल्या मुलाच्या रक्षणासाठी हे करत होती हे लक्षात आल्यावरती तिला महाराजांनी अभय देऊन आदरपूर्वक गढीचा ताबा परत तिलाच दिला.

महाराज तोरगळ प्रांतात असताना दक्षीणेच्या राजकारणाने मोठी कूस बदलली. औरंगजेबाने बहादूरखानाकडून कुत्बशहाचा व शिवाजीचा ब्म्दोबस्त हो नाहीये हे जाणून त्याला परत बोलावले व सगळी सूत्रे दिलेरखान पठाणाकडे दिली. त्याने बहलोलखानाशी हातमिळवणी केली. कुत्बशहाने मग त्याला काटशह देत विजापुर दरबारातील दिलेरखानाच्या विरोधातील लोकांना फितवले. सिद्दी मसाऊद त्यातील एक मोठे नाव होते. सतत युध्दरत राहून बहलोलखानाचा पक्ष दुर्बळ झाला होता. कुत्बशहाचा पाठिंबा असलेल्या सिद्दी मसाऊदला जिंकणे सोपे नाहि हे त्याने जाणले. आपला वकिल त्याने भागानगरला पाठवला. झालेल्या तहात असे ठरले की बहलोलखान आपली पठाणी फौज बरखास्त करेल व त्या बदल्यात सिद्दी मसाऊद त्याला सहा लक्ष होण देईल. शिवाय विजापूरचा किल्ला देखिल सिद्दी मसाऊदच्या ताब्यात देण्यात येईल असे ठरले. करार नक्की झाला. मुघलांकडून देखिल दिलेरखानाने या तहाला मान्यता दिली. मात्र त्याने सर्वांनी मिळून शिवाजीशी लढावे असे कलम घुसवले. या घटनां दरम्यान मोरोपंत नाशिक व इतर मुघली मुलखावरती चालून गेल्याने दिलेरखान बहुदा पेडगावला परतला. तिथून जव्हारला मोरोपंतांना अडवायला धावून गेला. पण मोरोपंत आधीच मोठी लुट घेऊन निसटले होते.

करारानुसार विजापूर घेण्यासाठी सिद्दी मसाऊदने हालचाली सूरु केल्या. पण हिरापूर येथे बहलोलखान पठाणाने २३ डिसेंबर १६७७ मध्ये अखेरचा श्वास घेतला. लगोलग बहलोलचा हस्तक जमशिदखान पठाण याने विजापूरवरती आपला जम बसवला. व मसाऊदला निरोप पाठवला की सहा लक्ष होन मिळाले तरच कुठलाही प्रतिकार न करता विजापूरचा किल्ला ताब्यात देईन. सिद्दी मसाउदकडे इतका पैसा नव्हता, कुत्बशहाने जमशिदखानावरती अविश्वास दाखवून पैश्यांची मदत करण्यास नकार दिला. लढाई करणे परवडणारे नव्हते. मसाऊद गुपचूप बसला. इकडे विजापूरात पगार हवाय म्हणून पठाण जमशिदखानाचा जीव खाऊ लागले. तो सहा लक्ष होनांवरती विसंबून होता. विचित्र कोंडि महाराजांनी हेरली. जमशिदखानाने आता महाराजांशी बोलणे सुरु केले. महाराजांनी स्वत: सहा लक्ष होन देण्याचे कबूल केले व ते त्वरीत विजापूरकडे निघाले. हि बातमी समजताच सिद्दी मसाऊदच्या पोटात खड्डा पडला. त्यानेही विजापुरकडे धाव घेतली. पण लढून विजापुर काबीज होणार नाहि हे त्याने ओळखले. मग त्याने एक कपटनीती वापरायची ठरवली. त्याने स्वत:च्या मृत्यूची हूल उठवली. व आपल्या हाता खालचे ४ हजार सैनिक जमशिद खानाकडे नोकरीची मागणी करण्यासाठी पाठवले. आमचा नेता मेला, आम्हाला रोजीरोटी द्या म्हणून ते जमशिदखान पठाणाकडे गेले. आता जमशिदखान महाराज सहा लक्ष होन देणार या भरवश्यावरती होता. त्याने हे नवे सैन्य देखिल विजापूरात दाखल करुन घेतले. मात्र दोन दिवसांत योग्य संधी हेरुन त्यांनी जमशिदखानाला अटक केली. विजापुरचे दरवाजे सिद्दी मसाऊदला उघडे झाले. जिवंत मसाऊद विजापुरात शिरला. हि बातमी कळताच आता पुढे जाण्यात हशील नाही हे ओळखून महाराज पन्हाळ्यावरती परतले. विजापूर जिंकून दक्षीणेत दुपटिने प्रबळ होण्याची नामी संधी मात्र गेली.

यानंतरच्या राजकारणात व घरच्या कलहात महाराज इतके अडकले की त्यानंतर कर्नाटक भागात त्यांना जातीने पुन्हा जाता आले नाही. व पुढे ३ वर्षातच त्यांचे निर्वाण झाले. मात्र महाराजांच्या या दक्षीण दिग्विजयाने महाराजांनी स्वराज्याहून दुप्पट मोठा व सुपिक प्रदेश सव्वावर्षात आपल्या ताब्यात आणला. मुघलांचे आक्रमण झाल्यास "बफर" तयार करुन घेतले. दख्खनमधले पठाणांचे वर्चस्व जवळपास मोडीत काढले. एक सार्वभौम राजा म्हणून कुत्बशहाकडून मान्यता मिळवून घेतली. वरुन सुरुवातीच्या आपल्या स्वारीचा खर्च त्यांनी मोठ्या हुशारीने तहाआडून कुत्बशहाकडूनच वसूल केला. पश्चिम किनारपट्टिप्रमाणेच पूर्व किनारपट्टिचा बराच भाग प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष आपल्या ताब्यात आणला. अर्थात तिथून येणार्‍या मालावरती मराठ्यांना कर मिळत असे. शिवाय आता पश्चिम किनारपट्टिप्रमाणेच पूर्व किनारपट्टिवरती जे जातीवंत अरबी घोडे उतरत त्यांना स्वत:च्या ताब्यात आणून कुत्बशहा - विजापूरची घोड्यांची रसद नियंत्रणात आणली. त्या भागात इंग्रजांना शरण आणून आपल्या परवानगी शिवाय कुठलीही व्यापारी हालचाल करायला बंदि आणली.

महाराजांच्या सर्वात दिर्घ व सर्वात यशस्वी मोहिमेला आपण आजवर जवळपास दुर्लक्षित केले. महाराजांच्या इतर मोहिमा व त्यांचा राज्याभिषेक या घटनाच इतक्या रोमहर्षक आहेत त्यामुळेही असेल कदाचित पण दुर्लक्ष झाले हे खरे. तीच चूक निस्तरायचा हा त्रोटक प्रयत्न.

- सौरभ वैशंपायन.

======
संदर्भ,
१) शककर्ते शिवराय - श्री विजयराव देशमुख
२) महाराजांच्या मुलुखात - श्री विजयराव देशमुख
३) राजा शिवछत्रपती - श्री बाबासाहेब पुरंदरे
४) जनसेवा समिती, विलेपार्ले यांच्या दक्षीण दिग्विजयावरील अभ्यासवर्गातील श्री पांडूरंग बलकवडे, श्री चंद्र शेखर नेने व श्री महेश तेंडुलकर यांची व्याख्याने.
५) http://www.marathaempire.in 



Friday, December 21, 2012

सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (पूर्वार्ध)



"या युगी पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा, मर्‍हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही."  ही ओळ ज्याक्षणी वाचतो त्याक्षणी आपण ’बेसावध’ होतो. बेसावध याकरता होतो की ’याचसाठी होता केला अट्टाहास’ या ओळी प्रमाणे आपण इतिहासाच्या पुस्तकाचे ते पान वाचून धन्य होतो, आणि इतिहासाच्या वाचनात लगेच एकप्रकारची शिथिलता येते. वास्तविक शिवछत्रपतींना राज्यभिषेक झाला तिथून एक सार्वभौम राजा उदयाला आला आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या आयुष्यातली सर्वात दिर्घ आणि सर्वात यशस्वी मोहीम पार पाडली हेच विसरुन जातो. ती मोहीम म्हणजे शिवछत्रपतींचा "दक्षीण दिग्विजय."

श्रीशिवछत्रपती हे आपल्या समोर अनेक रुपात येतात. पण त्यांचे सर्वात महत्वाचे रूप म्हणजे ते भारताच्या मध्ययुगिन इतिहासातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक होते. राजकिय पटलावरची एखादी संधी हेरायचे किंवा नसल्यास ती निर्माण करायचे आणि मग ते योजनाच अशी आखायचे की ज्याने शत्रू भांबावून जात असे व त्याला हालचाल करायला संधीच मिळत नसे, हे आयुष्यभर शेकडो घटनांद्वारे शिवाजी महाराजांनी दाखवून दिले. राज्याभिषेकानंतर तत्कालिन राजकिय परिस्थिती बघून त्यांनी दक्षीणेची मोहीम आखली व यशस्वी करुन दाखवली.

वास्तविक मराठ्यांचा व दक्षीणेचा संबध हा मूळात शहाजीराजांपासून सुरु होतो. शहाजीराजांनी निजामशाही आडून स्वातंत्र्याचा केलेला प्रयत्न  अल्पजीवी ठरला. ऑक्टोबर १६३६ मध्ये मुघल - आदिलशाहीच्या संयुक्त फौजे समोर शहाजीराजांना माहुली इथे शरणागती पत्करावी लागली. पण नुसती शरणागती पत्करुन फायदा नव्हता. नंतर काय हा प्रश्न होताच - मुघल कि आदिलशाही? या प्रश्नाचा विचार करताना त्यांनी शहाणाजोगेपणाने तुलनेने कमकुवत आदिलशाही निवडली. पण आदिलशहा देखिल दुधखुळा नव्हता. त्याने शहाजीराजांना महाराष्ट्रात राहु दिले नाही. त्याऐवजी त्यांना बंगरुळमध्ये जहागिरी दिली. शहाजीराजांना महाराष्ट्रात दिलेल्या जहागिरीत पुणे होतंच. याशिवाय सुपे, बारामती, चाकण, शिरवळ बहुदा १६३९ तर इंदापूर १६४६ च्या आसपास मिळाली असावी. पुढे जहागिरी बरोबर या भागांची मोकासदारीही मिळाली. इथे जहागिरी व मोकासदारी यातला फरक समजावून घेऊ जहागिरीत फक्त तो भाग त्याला उत्पन्न - खर्चासाठी मिळे पण त्याला त्यावर सरकारी दृष्ट्या स्वामीत्व नसे. तिथली शासकिय व्यवस्था सरकारच बघत असे. मात्र मोकासदारीत सरकार अधिकचे अधिकार देत असे. इनाम चालवणे अथवा रद्द करणे, गावे वसवणे, शेती उत्पादनासाठी प्रयत्न करणे वगैरे अधिकार व जबाबदार्‍या दोन्ही त्यावरती येत असत.

शहाजीराजांनी १६३७ मध्ये जिजाऊसाहेब व शिवबाला पुण्यास पाठवले बरोबर व्यवस्था लावण्याची जबाबदारी दादुजी कोंडदेव - मलठणकरांकडे सोपवली. बाल शिवबांच्या नावे कर्यात मावळ्यातली मोकासदारी केली जेणेकरुन कुठलेही बदल करायचे अधिकार प्रत्यक्षपणे त्यांनी जिजाउसाहेब - शिवबांकडे दिले. १६४० मध्ये शिवरायांचे सईबाईंशी लग्न झाले तेव्हा शहाजीराजे कर्नाटकस्वारीत गुंतले होते. या व या आधीच्या कर्नाटक स्वारीमध्ये अफझलखानाने देखिल रणदुल्लाखानच्या हाताखाली बराच पराक्रम गाजवला. श्रीरंगपट्टण, कर्णपुरम्‌, मदुरा, कांची, बेदनुर येथील मांडलिकांवरती अफझलखानाने जरब बसवली होती. थोडक्यात एकाच भागात शहाजीराजे व अफझलखान आपली मर्दुमकि गाजवत होते. अफझलखानाची व इतरांची शहाजीराजांच्या विरोधात असलेली इर्ष्या अधिक वाढवायला शहाजीराजांचा कर्नाटकातील वाढता प्रभाव हा प्रत्यक्षपणे कारणीभूत होताच. पूर्वी "कर्नाटक" म्हणजे जवळपास संपूर्ण दक्षीण भारतच समजला जाई. १६४१ मध्ये शहाजीराजांनी जिजाऊसाहेब व शिवबाला बंगरुळा्स बोलावून घेतले. त्यानंतर साधारण सव्वावर्ष ते बंगरुळास होते. याच दरम्यान शहाजीराजांनी शिवबाचे दुसरे लग्न सोयराबाईंशी करुन दिले.

बंगरुळात शहाजीराजे एखाद्या सार्वभौम राजासारखे रहात. बाल शिवबा ते सगळं अनुभवत होता. त्यासगळ्याचा परीणाम नक्किच बाल शिवबावरती झाला असणार. शिवाय येताना जिजाऊसाहेब - शहाजीराजे - दादुजींची मंत्रणा झालीच असणार. एका स्वतंत्र्य राज्याची कल्पनाच शहाजीराजांनी कल्पून शिवरायांना इथे पाठवले. त्यांच्या बरोबर स्वतंत्र ध्वज, पेशवा, सरनौबत, डबीर, मुजुमदार असे अधिकारी नेमुन दिलेले होते. शिवराय इथे स्वराज्याचे प्रयत्न करत असतानाच शहाजीराजे आपल्या हाताखाली संभाजीराजांना घेऊन तिथे बंगरुळ व कर्नाटकात आपला जम बसवत होते. राक्षसतागडिच्या लढ्यात विजयनगर साम्राज्याचा शेवट झाला असला तरी काही हिंदु सरदार त्यातून वाचून तुंगभद्रेच्या दक्षीणेस आपापली छोटि राज्ये सांभाळत होते. त्यात पेनुकोंडा, म्हैसूर, बेदनूर, जिंजी, मदुरा, बसवापट्टण, चित्रदुर्ग वगैरेंचा समावेश होता. मात्र हे अंतर्गत यादवीत बुडले होते. शहाजीराजांनी कर्नाटकात आधी काही केले असेल तर यांचा पुंडावा मोडून काढला मात्र यांचे राज्य टिकवून ठेवले. विजापूरला यांचा घास घेऊ दिला नाही. या सगळ्यांना आपल्या प्रभावाखाली आणले. अर्थातच हे लहान लहान राजे शहाजीराजांच्या तंत्राने वागू लागले. ज्याला आपण पॉकेट्स तयार करणे म्हणून तशी ह्या हिंदू राजांची पॉकेट्स मोठ्या धोरणीपणाने शहाजीराजांनी तयार करुन ठेवली.

मात्र रणदुल्लाखानाच्या मृत्युनंतर विजापुर दरबारात शहाजीराजांना भक्कम पाठींबा राहिला नाही. त्यांच्या विरुद्ध कट शिजू लागले. १६४८ च्या कर्नाटक स्वारीत त्याची परीणीती शहाजीराजांना अटक करण्यात झाली. त्याचे झाले असे की पेनुकोंडाचा राजा श्रीरंगराज हा फार महत्वाकांक्षी होता. विजयनगरचे लयाला गेलेले साम्राज्य पुन्हा स्वत:च्या अधिकाराखाली उभे करण्याचे स्वप्न तो बघत होता. त्याचीच सुरुवात म्हणून त्याने जिंजी, तंजावर आणि मदुरा या संस्थानिकांवरती आक्रमण केले. मदुरेच्या त्रिमलनायकाने कुत्बशहाला मदतीला बोलावले. कुत्बशहाचे सैन्य मीर जुमल्याच्या अधिपत्याखाली पेनुकोंड्यात शिरले. श्रीरंगराज आपल्या मांडलिक राजाकडे आश्रयासाठी पळून गेला. मात्र मदुरेच्या त्रिमलनायकाने पायावरती धोंडा पाडून घेतला होता. पेनुकोंड्याच्या नंतर कुत्बशहाने जिंजीवरतीही चाल केली. कुत्बशहाचा पवित्रा लक्षात घेऊन तंजावरच्या वेंकटनायकाने कुत्बशाहीशी तह केला. त्रिमलनायक एकाकी पडला. आता त्याने विजापूरशी संधान बांधले. वजीर मुस्तफाखान स्वत: कर्नाटकात खाली उतरला पण उलट त्याने कुत्बशहाशी हातमिळवणी करुन राक्षसतागडीप्रमाणे सगळे काफिर संपवले पाहिजेत ह्याच उद्देशाने ते पुढे सरकू लागले. तेव्हा शहाजीराजांनी अंतस्थपणे त्रिमलनायकाला धीर दिला व स्वत:चे वजन वापरुन या संस्थानिकांना अभय दिले. अर्थातच त्रिमलनायका बरोबर कावेरीपट्टणचा जगदेव, म्हैसूरचा चामराज वोडियार, बेदनूरचा वीरभद्र हे शहाजीराजांना वश झाले. अप्रत्यक्षपणे शहाजीराजांनी कर्नाटक हस्तगत केले होते. मुस्तफाखानास हे सहन झाले नाही. त्यांनी शहाजीराजांना जिंजीच्या वेढ्यात सामिल व्हावे अशी आज्ञा दिली. शहाजीराजांनी ’माझे सैन्य थकले आहे, माझ्याकडे धान्य देखिल नाही, मी या कारणाने बंगरुळास परत जात आहे मग तुम्ही परवानगी द्या अथवा नका देऊ!’ याच शब्दात तो आदेश कोलून लावला. मात्र शहाजीराजांना थेट हात लावण्याची एकाचीही बिशाद नव्हती. म्हणूनच आधी शहाजीराजांशी मैत्रीचे नाटक करुन त्यांचा विश्वास संपादन करुन शहाजीराजांना २५ जुलै १६४७च्या पहाटे बेसावध असताना जिंजी नजिक अटक केली. हि बातमी बंगरुळास संभाजीराजे व राजगडावरती शिवाजीराजांना समजले. स्वराज्यावरील पहिले संकट आले तेच दख्खनच्या राजकारणाची पार्श्वभूमी घेऊन. अर्थात या संकटाला शिवरायांनी पुरंदरवरती व संभाजीराजांनी बंगरुळात मोठ्या धीराने व अक्कलहुशारीने तोंड दिले व शहाजीराजांची सुटका झाली. अर्थात त्याबदल्यात संभाजीराजांना कंदर्पी व बंगरुळ तर महाराजांना कोंडाणा आदिलशाहीस द्यावा लागला होता.

या लेखाच्या दृष्टिने कर्नाटकच्या राजकारणासंबधी पुढची महत्वाची गोष्ट अशी होती की,  हिंदुस्थानच्या राजकारणात आपले बळ वाढवायला १६५३ नंतर औरंगजेबाने ज्या हालचाली केल्या त्यातली एक गोष्ट म्हणजे त्याने गोवळकोंड्याचा वजीर मीर जुम्ल्याला फोडून आपल्याकडे घेतले व त्याच्या मदतीने कुत्बशाही गिळायचा प्रयत्न सुरु केला. त्याने थेट गोवळकोंड्यालाच वेढा दिला. मात्र शहाजहानने आपल्या मुलाला आवर घालण्यासाठी तो वेढा उठवण्याचे फर्मान सोडले. औरंगजेबाने नाईलाजाने ते फर्मान मान्य केले पण त्याने कुत्बशाही आपल्या पंखाखाली घेण्यासाठी कुत्बशहाकडून युद्धखर्च तर घेतलाच पण कुत्बशहाला त्याची मुलगी जबरदस्तीने आपला मुलगा सुलतान मुहम्मद याला देण्यास भाग पाडले. इतकं करुन औरंगजेब थांबला नाही. १६५६ मध्ये इब्राहिम आदिलशहाचा मृत्यू झाला आणि अली आदिलशहा गादीवरती आला. हा अनौरस असल्याने गादिवरती बसवू नये असा विचार करणारा एक गट होता. औरंगजेबाला अशी संधी हवीच होती ह्या गटाची तळी उचलून त्याने आता विजापूरवरतीच हल्ला चढवला. विजापूरकरांची पळापळ सुरु झाली. दिल्लीपर्यंत पत्रे जाऊ लागली, मोठी युद्धे होत होतीच. याच लढायां दरम्यान अफझलखानाला एक संधी मिळाली होती ज्यात त्याने औरंगजेबाला जवळपास कैद केले होते. परंतु औरंगजेबाने विजापूरच्या वजीराशी पत्र व्यवहार केला व मला काही झाले तर दिल्लीवरुन फौजा येऊन विजापूरची धूळधाण करतील अशी गर्भित धमकी दिली. ज्यामुळे त्याने अफझलखानाला न कळवताच औरंगजेबाला निसटून जाऊ दिले होते. औरंगजेबाने एप्रिल १६५७ मध्ये बिदरचा किल्ला जिंकला, ३१ जुलै १६५७ रोजी कल्याणी जिंकली. याच अनागोंदिचा फायदा करुन घेऊन महाराजांनी त्यावेळी मोठ्या चलाखीने आपण विजापूरच्या जिंकलेल्या प्रदेशाला औरंगजेबाची मान्यता मिळवून घेतली होती. २३ एप्रिल १६५७ रोजी औरंगजेबाने पाठविलेल्या पत्रात तो लिहितो - "..... सांप्रत जे किल्ले व मुलुख तुमचे हाती होते ते पेशजीप्रमाणे होऊन तुमचे मनोगतान्वये बंदर दाभोळ व त्याखालील मुलुखाचा महसुल तुम्हास दिला असे!" यानंतर मोजून एका आठवड्याने ३० एप्रिल १६५७ या दिवशी महाराजांनी जुन्नर हे मुघली ठाणेच लुटले. पाठोपाठ मीनाजी भोसले व काशीपंतांनी श्रीगोंदे व नगरपर्यंत धडक मारली.

औरंगजेब प्रचंड चिडला त्याने स्वराज्याच्या सीमेवरील सरदारांना स्वराज्यात घूसून मुलुख बेचिराख करण्याची आज्ञा दिली. पण तोवर पावसाळा लागला होता. हे सर्व सरदार मुघली पद्धतीने हातावरती हात धरुन बसून राहिले. पुढले तब्बल चार महिने सगळीकडे शांतताच राहिली. महाराजांनी औरंगजेबाशी हातमिळवणी करुन एक मुलुख पदरात पाडून घेतला आणि वरुन औरंगजेबालाच दोन आघाड्या उघडायला लावून अप्रत्यक्षपणे आदिलशाहीच वाचवली. मुघली आक्रमणांनी अर्धमेल्या आदिलशाहीला खेळवत रहाणे महाराजांच्या फायद्याचे होते. दख्खनमध्ये प्रभावी होण्याकरता महाराजांना जशी अवस्था हवी होती ती त्यांनी निर्माण केली होती. शिवाय १६४९ पासून महाराजांना नगरचा भाग पाहीजे होता तो त्यांनी मिळवला, मुघलांवरती त्यांच्याच भागात घूसून हल्ला केल्याने मुघलांनाच बचावात्मक व्हायला त्यांनी भाग पाडले. दरम्यान तह होऊन विजापूर - दिल्लीत युध्दविराम झाला. 

यापुढे आपली उडी थेट १६७० च्या नंतर घडलेल्या घटनांवरती जाणार आहे. एकाचवेळी दक्षीणेत किती वेगवेगळ्या घटना घडत होत्या. राजकारणाचे पट मांडले जात होते मोडले जात होते ते बघूया. याच्या पहिल्याच २-३ वर्षात महत्वाचे सत्तापालट झाले. कुत्बशाही - आदिलशाही आतून ढवळून निघाल्या. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आदिलशाही, कुत्बशाही यांच्यात नेहमी दक्षीणी मुसलमान व पठाण यांच्यात कधी सुप्त तर कधी उघड संघर्ष होत असे. दख्खन मधल्या राजकारणाला ह्या संघर्षाची वेगळी किनार आहे. अश्या संघर्षांमुळे बघता बघता एखाद्या राजकारणाला क्षणात वेगळे वळण लागत असे.

२४ नोव्हेंबर १६७२ रोजी अली आदिलशहाचा मृत्यु झाला. अली आदिलशहाच्या मृत्युनंतर सिकंदर आदिलशहा ह्या चार वर्षांच्या पोराला सत्तेवरती बसवून सर्व सुत्रे खवासखानने आपल्या हाती घेतली. जुन्या वजीराला - अब्दुल मुहम्मदला व मुजफ्फरखानाला त्याने दूर सारले. परीणामी हा संघर्ष अधिक धारदार झाला. या अस्थिरतेचा फायदा शिवरायांनी घ्यायचे ठरवले. त्यांनी विजापूरात असलेला आपला वकील बाबाजी नाईक पुंडे याला परत बोलावून घेतले. हे विजापूर विरुद्ध आघाडि उघडणार असल्याचे संकेत होते.

याच वेळी कुत्बशाहीत अब्दुल्ला कुत्बशाहानंतर अबुल हसन उर्फ तानाशाहा हा २१ एप्रिल १६७२ रोजी सत्तेवरती आला होता. कुत्बशाहीतही दिवाण मुझाफरखान व सरखेल आणि खान-इ-खानान मुसाखान यांच्यात १६७३पासून रस्सीखेच सुरु झाली. कुत्बशहाने सुरुवातीला ह्याकडे दुर्लक्ष केले. वास्तविक दोघेही त्याची डोकेदुखीच बनले होते. यापैकी एखाद्या बाजू घेऊन असलेली परीस्थिती अजून चिघळवण्याची त्याला हौस नव्हती. वरतुन मुघली आक्रमणांचा धोकाही दिसायला लागला होताच. मात्र मुझाफरखानाने कुत्बशहाला भरीस पाडून मुसाखानला कैद करवलेच. तो कैद होताच मुझाफरखान स्वैर झाला. अखेरीस कुत्बशहाने त्यालाही हाकलून लावले व सगळा कारभार मे १६७५ मध्ये मादण्णांकडे दिला वरुन मादण्णांना त्याने "सूर्यप्रकाशराव" असा किताब दिला. मादण्णा व त्यांचा भाऊ अक्कण्णा ह्यांनी कुत्बशाहीला सावरले. ह्यांची मुळ नावे - अकरस भानजी व माधो भानजी अशी होती. भानजी म्हणेजे भानुपंत हे वडील. आडनाव पिंगळी. घराणे देशस्थ, ऋग्वेदी, अश्वालायन शाखा, भारद्वाज गोत्री त्रिप्रवर होते. मुळ गाव वारंगळजवळील हनमकोंड. १६६० मध्ये नोकरीकरता गोवळकोंड्याला आले. १६७२ मश्ये मुझाफरखानाचे मुख्य पेशकार झाले. दोन्ही बंधू अत्यंत बुद्धिमान, कर्तव्यनिष्ठ, कर्तबगार व धार्मिक होते. संस्कृत, फारसी, कानडी, दख्खनी हिंदि व थोडि बहुत मराठीही अवगत होती.

याच सुमारास स्वराज्यात राज्याभिषेकाच्याही हालचाली महाराजांनी सूरु केल्या होत्या. आणि एक बातमी येऊन कोसळली - प्रतापराव गुजरांनी सारासार विचार न करता रागाच्या भरात सहा अंगरक्षकांसहीत बहलोलखान पठाणाच्या सैन्यावरती हल्ला केला त्यात ते कामी आले. महाराजांना अपार दु:ख झाले. त्यांनी आनंदरावांना आज्ञा केली प्रतापरावांच्या जागी तुम्ही कामगिरी पार पाडा. मराठी सैन्य चिडले होतेच आनंदरावांनी कानडी मुलुख झोडपायला सुरुवात केली. यावेळि दिलेरखान व बहलोलखान आनंदरावांवरती संयुक्तपणे चालून गेले. पण मराठ्यांनी रोज ४५ कोसांची दौड करुन यांच्या संयुक्त फौजांना फार मागे टाकले. ते बहलोलच्या जहागिरीत शिरले. बंकापूर, पेंच, संपगाव वगैरे लूटून ३००० बैलांवरती हि लुट लादून आनंदराव मागे फिरला. बंकापूर जवळ बहलोलच्या सैन्याने खिज्रखानच्या नेतृत्वाखाली मराठ्यांवरती हल्ला केला. प्रतापरावांच्या मृत्यूने चिडलेल्या मराठ्यांनी या सैन्याचा धुव्वा उडवला. वरुन ५०० घोडे व २ हत्ती जिंकून रायगडकडे गेले.

दिनांक ६ जून १६७४, जेष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६, श्री शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. दख्खनमध्ये एक नवीन सत्तेचे प्रकटिकरण झाले. आजवरची शत्रूंनी बनवलेली बंडखोर, लुटारु अशी खोटी ओळख धुडकावून एक सार्वभौम सिंहासन स्थापन झाले. या घटनेला फार मोठा अर्थ होता. याचे फार दूरागामी परीणाम एकंदरच देशाच्या भविष्यावरती होणार होते व ते झालेही. आता यापुढे एक अभिषिक्त राजा म्हणून महाराजांच्या प्रत्येक कार्याकडे जग बघणार होते. संकटे व जबाबदार्‍या वाढल्या होत्या.

यानंतरची एक घटना दक्षीणेतील राजकारणसाठी महत्वाची आहे ती अशी की राज्याभिषेकात अडचण नको म्हणून १६७४ पासूनच महाराजांनी मुघल सरदार बहादूरखान याच्याशी तहाची बोलणी लावली होती. अखेरीस मुघलांकडून जिंकलेले सतरा किल्ले व मुलुख मी परत करतो त्या बदल्यात बहुदा साल्हेर - मुल्हेर (किंवा सातारा - मावळ याबाबत जरा गोंधळ आहे.) महाराजांकडे रहावेत याबाबत करार हे बोलणे होते. राज्याभिषेक यथासांग पार पाडल्यावरती इतर राजकारणांतून किंचित फुरसत मिळताच, राज्याभिषेकानंतर जवळपास वर्षाने म्हणजे जून १६७५ मध्ये अखेर तो करार झाला. संभाजीराजांचे मुघलांचे पंच हजारी सरदार असल्याचे कलम रद्द करण्यात आले. यावरती महाराजांनी बहादूरखानाच्या सह्या घेतल्या. ह्याचे वृत्त बहादूरखानाने औरंगजेबाला कळवले. खरेतर आधी महाराजांनी ह्या कराराला नकार कळावला होता व पुरंदर वरतून बहादूरखानाच्या वकिलांना हाकलून दिले होते. म्हणून बहादूरखानाने चिडून कल्याण नजिक जाळपोळ केली होती. यामुळेच वर्षभराने करार मान्य झाल्यावरती औरंगजेबहि खूष झाला. वायव्य सीमेवरती तो लढाईत गुंतला असतानाही त्याने बहदूरखानाला पंच हजारी सरदारावरुन सप्त हजारी सरदार म्हणून बढती दिली. एक हत्ती पाठवला. हा बहादूरखान म्हणजे "बहादूरखान कोकलताश" - हा औरंगजेबाचा दूधभाऊ होता व अतिशय विश्वासातला माणूस होता. बहादूरखानाने बहादूरगडावरती मोठा आनंदोत्सव केला. मेजवानी दिली. ३० हत्ती - ५०० घोडे, २००० वस्त्रे, तलवारी असे सगळे वाटले. मात्र जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात जेव्हा हे गड त्याने मागितले महाराजांनी स्पष्टपणे त्याला कोलून लावले. आदिलशाही मुलुखावरती शांतपणे स्वारी करता यावी व वेळ मिळावा म्हणून महाराजांनी हे केले होते. अर्थात इतका जाहिर पाणउतारा झाल्याने बहादूरखानचा तीळपापड झाला. औरंगजेबही चिडला. त्यांनी विजापूरकरांशी संधान बांधले. महाराजांचा सूड घ्यायला बहादूरखान टपून बसला.

याचवेळि दक्षीणेत एप्रिल १६७४ मध्ये मदुरेच्या नायकाने तंजावर वरती हल्ला करुन तिथला संस्थानिक विजयराघवाला ठार केले व तंजावर बळकावले. विजयराघवाच्या नातवाने या विरोधात विजापूरकरांकडे मदत मागितली. त्यावेळचा वजीर खवासखान होता त्याने शहाजीराजांचे पुत्र व शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजी उर्फ एकोजीराजे यांना विजयराघवाच्या नातवस तंजावरच्या गादिवरती पुन्हा बसवायाची कामगिरी सोपवली. विजापूरकरांचे सरदार म्हणून तब्बल वर्षभर व्यंकोजीराजे जिंजीला होते. १६७५ चे पूर्ण वर्ष त्यांनी संधी शोधण्यात घालवले. अखेर १६७६ मध्ये मदुरेचा नायक व त्याचा दूधभाऊ आपापसात झगडून दुर्बळ झालेत हे हेरुन व्यंकोजींनी तंजावर वरती हल्ला केला व ते जिंकले. विजापूर मध्ये याचवेळि दक्षीणी मुसलमान व पठाण यांचा संघर्ष टिपेला पोचल्याने व्यंकोजींकडे लक्ष द्यायला कुणालाच फुरसत नव्हती. संधीचा फायदा व्यंकोजींनी घेतला. खवासखानाला अटक झाल्याची बातमी मिळाल्यानंतर त्यांनी विजयराघवाच्या नातवास गादिवरती न बसवता त्यांनीच ती बळकावली व ५ मार्च १६७६ मध्ये स्वत:चा अभिषेक करवून महाराजा हे बिरुदहि लावून घेतले.

विजापूर दरबारातील दक्षीणी मुसलमान व पठाण यांचे वितुष्ट विकोपाला गेल्याचे वर नमूद केलेच आहे. वजीर खवासखान दक्षीणी लोकांचे नेतृत्व करत होता तर अब्दुल करीम बहलोलखान हा पठाणांचे. महाराजांनी कोकण जिंकल्याने विजापूरकरांची पिछेहाट झाली होतीच. शिवाय खवासखान नाकर्ता आहे ही बोंब बहलोलखानाचा पक्ष करु लागला होता. त्यावेळी खवासखानाचा विश्वासू दिनायत पंडीत याने सल्ला दिला की औरंगजेबा बरोबर हातमिळवणी करा व शिवाजीचा काटा काढा. मुलुखही मिळेल व पठाणांचे वर्चस्व नाहिसे करता येईल. खवासखानाला हा सल्ला पटला. त्याने बहादूरखानाशी हातमिळवणी केली. १९ ऑक्टोबर १६७५ रोजी पंढरपूरला दोघांची भेटही झाली. इतकेच नव्हे तर खवासखानाने आपली मुलगी बहादूरखानाचा मुलगा नुस्रखान याला देऊन एक नातेही जोडून घेतले. अर्थात खवासखानचे विजापूर दरबारातील वजन याने वाढले. बहलोलखान चरफडत बसला. त्याने खवासखानाशी जुळवून घेण्याचे नाटक केले. एकदा तर त्याला मेजवानीचे निमंत्रण दिले. सगळे आलबेल घडायला लागले की माणूस बेसावध होतो. खवासखान बेसावध झाला. १० नोव्हेंबर १६७५ या दिवशी मेजवानीचे निमंत्रण देऊन वाड्यात आलेल्या खवासखानाला बहादूरखानाच्या खिजरखान पन्नी या सरदाराने अटक केली व बहादूरखानाने त्याची रवानगी बंकापूरच्या किल्यात केली.

बहलोलखान पठाणाने आदिलशाही अशी बळकावली. अली आदिलशहा जेमतेम ७ वर्षांचा होता व केवळ बाहुले होता. खवासखान काय किंवा बहादूरखान काय त्याच्या स्थितीत फरक पडत नव्हताच. आता खवासखानाचा पक्ष लंगडा पडला. यावेळि जिंजीचा सुभेदार खवासखानाचा भाऊ नासीर मुहम्मद हा होता. त्याच्या हाताखाली पांदेचेरीपर्यंतचा मुलुख होता. तर शेरखान लोदि हा बहलोलच्या पक्षातला सरदार वालिगंडापुराम्‌मध्ये प्रमुख सरदार होता. दुसरीकडे बेळगावचा किल्लेदार शेख मीनहान हा खवासखानच्या गटांतला होता. या घटनेचा बदला घेण्यासाठी त्याने खिजरखान पन्नीला मेजवानीला बोलावले आणि त्याला भोसकून ठार केले. शंभर पठाणहि त्याने कापुन काढले. बहलोलखानाला हे कळताच तो संतापला व त्याने बंकापूरच्या हवालदाराला खवासखानचा जीव घ्यायची आज्ञा केली. १८ जानेवारी १६७६ रोजी खवासखानचा मुडदा पाडून तो विजापूरला पाठवण्यात आला. खवासखान ठार होताच त्याची प्रतिक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी उठू लागली. शेरखान व नासीर मुहम्मद एकमेकांशी भांडू लागले. मात्र खवासखान मारला गेल्याने नासीर मुहम्मद एकाकी पडला. शेरखान आता बलिष्ठ झाला. तो फ्रेंचाशी मैत्रे करुन जिंजीच नव्हे तर सर्व हिंदू संस्थाने व अगदि गोवळाकोंडाही जिंकायची महत्वाकांक्षा बाळगायला लागला. इथे खवासखानच्या मृत्यूची बातमी ऐकून बहादूरखान चिडला, कितीही झालं तरी तो त्याचा व्याही होता, शिवाय आदिलशाहीचा वजीर कच्छपी लावून मराठ्यांना चिरडण्याच्या त्याच्या दूरच्या हेतूला फार मोठा धक्का पोहोचला होता. त्याने औरंगजेबाला हे वृत्त कळवताच औरंगजेबाने आज्ञा केली की विजापूर बळकावणार्‍या बहलोलखानास कैद करावी किंवा मारुन टाकावे. यासाठी त्याने दिलेरखान पठाणाला बहादूरखानाच्या मदतीला पाठवले. ह्या शिवाय दख्खनच्या राजकारणाची व प्रदेशाशी खडान्‌खडा माहित असलेली एक व्यक्ती पाठवली - महंमद कुलीखान!

यापुढे जे वाचणार आहोत ते बघता राजकारणाला वारंगना का म्हंटले आहे ते समजते. दिलेरखानाची कूमक येताच बहादूरखानाने विजापूर विरुद्ध मोहिम उघडली. ३१ मे रोजी त्याने भीमा ओलांडली व आदिलशाही मुलुखात घुसला. त्यांना आदिलशाहितील शेख मीनहाज व शेख महंमद जुनैद येऊन मिळाले. १३ जून १६७६ रोजी मुघल - विजापूर युद्ध सुरु झाले. बहलोलखान कसलेला नेता होता. नुकसान दोहो बाजूंचे झाले पण बहलोलखानने मुघली सैन्याचे लचके तोडले. इतके कि बहादूरखान - दिलेरखानला माघार घ्यावी लागली व कसेबसे नदीपार झाले. या गडबडित मुघलांच्या जाळ्यात तब्बल ११ वर्ष अडकलेला एक मासा निसटला - मुहंमद कुलीखान या युद्धादरम्यान निसटले व थेट रायगडला आले. महाराजांनी लगोलग १९ जून १६७६ रोजी त्यांचे पुन्हा हिंदु धर्मात स्वागत केले. आता ते परत नेताजी पालकर झाले. दिलेरखानाला हा फार मोठा झटका होता. तसेच औंगजेबाच्या आज्ञेने झालेल्या या सक्तीच्या धर्मांतराला चपराक देऊन महाराजांनी थेट औरंगजेबाला ठेंगा दाखवला होता. महाराजांचा हा निर्णय फार क्रांतिकारक होता.

ऑगस्टमध्ये बहादूरखानाने नळदुर्गाला वेढा दिला परंतू तो देखिल बहलोलखानाने उधळून लावला. कुत्बशहाने यावेळी बहलोलखानाला मदत केली. मात्र पुढे मुघलांशी अधिक वैर नको म्हणून ते सैन्य घेऊन मादण्णा परत निघून गेले. हळू हळू विजापूरचे बडे दख्खनी सरदार कुत्बशहाकडे जाऊ लागले. बहादूरखानाने मोठ्या चलाखीने कुत्बशहाला आपल्याकडे खेचले. सिद्दी मसाऊद, सर्जाखान सारखे आदिलशाहीतून कुत्बशाहित गेलेले मातबर सरदारहि आपल्या घोळात घेतले. पठाणां विरुद्ध त्याने दक्षीणेतील हर एकाला उठवायला सुरुवात केली. इतकेच कश्याला ज्यांचा सूड उगवण्यासाठी त्याने खवासखानशी नाते जोडण्यापर्यंत राजकारण केले त्याच छत्रपती शिवरायांची त्याने मदत मागवली. महाराजांनाही बहलोलचा गाशा गुंडाळायचा होता शिवाय कोकणात जिंकलेला प्रदेश निर्वेध करायचा होता. महाराजांनीही चार हजारांची फौज दिली पाठवून. आता बहादूरखानाकडे अफाट फौज जमली. मात्र हे बघून मुघल सैन्यातले पठाण अस्वस्थ झाले, कारण विजापूर एका पठाणाच्या ताब्यात आले होते. विशेषत: दिलेरखान पठाण. त्याने बहलोलखानाशी आतून संधान बांधले व त्याला सल्ला दिला ’तूर्तास लढाई टाळ, बहादूरखानाशी तह कर, पुढे हे सैन्य पांगेल तेव्हा बहादूरखानाला इथून हाकलवून देता येईल!’ बहलोलने तो सल्ला ऐकून बहादूरखानाला निरोप पाठवला. मी आपल्या शब्दा बाहेर नाही. मी औरंगजेबाचा चाकर आहे. हवे तरे मी भेट घ्यायला तयार आहे. या एका निरोपाने सगळा नूर बदलला. बहादूरखान बेसावध झाला. वरुन दिलेरनेही त्यावरती मुघली पठाणांचा दबाव टाकला. बहादूरखानाने तह केला. त्याने दक्षीणी मुसलमानांना गोड शब्दांत वाटेला लावले. मात्र त्यांची नाराजी कमी करण्यासाठी सर्जाखानच्या हाताखाली सैन्य देऊन विजापूरचा मुलुख हस्तगत करण्याचीहि कामगिरी त्यावर सोपवली. दक्षीणी फौजा मुघलांपासून तोडण्यात दिलेर यशस्वी झाला.

या सगळ्या गुंतागुंतीच्या राजकारणात बहादूरखानची मुत्सद्देगिरी शेवटच्या क्षणी कमी पडल्याने पठाण दख्खनच्या राजकारणातून कायमचे निपटून काढण्याची संधी गेली. मात्र या निमित्ताने दक्षीण्यांची एक फळी उभी रहायला सुरुवात झाली. पठाणांविरुद्ध एक चिड दख्खन मध्ये पसरली. दिलेरखानही पठाण असल्याने त्यालाहि कुणाची साथ मिळेना. या सर्व अस्थिर वातावरणात एकाच गोष्टिची कमी होती एका म्होरक्याची जो दक्षीणेतील राज्यकर्त्यांना एकत्र आणून एक भक्कम फळी निर्माण करेल. ती पोकळी भरण्याची ताकद  त्यावेळी एका व्यक्तीकडेच होती - श्री शिवछत्रपतींकडे.
(क्रमश:)

 - सौरभ वैशंपायन

Sunday, November 18, 2012

साहेब




रुद्राक्षाची माळ धरलेला ’तो’ हात उगारलेल्या बोटासकट वर झाला की मुंबई सारखं आंतराष्ट्रिय शहर दोन दिवस बंद व्हायचं. साधारण ८-९ वर्षांचा असेन, तेव्हा त्या घटानेचाचा अर्थ समजण्या इतका मोठही नव्हतो, पण मला इतपत स्वच्छ आठवतय की बाबरी पतन झाल्यावरती त्याबाबत जेव्हा सगळे खुसरपुसर करत बोलायचे, किंवा सोयीस्कर मौन घ्यायचे, तेव्हा शिवाजी पार्कवरती फक्त एकच आवाज जाहीरपणे घुमला होता "होय! आम्हीच पाडली बाबरी!". त्यामागचे तत्कालिन राजकिय, सामाजिक, धार्मिक संदर्भ व निवडणूकांतले फायदे तोटे यांच्या निकषांसकट असे जाहिर बोलणे देखिल फार जड होते. पण हेच जाहिरपणे सांगणारा दुसरा कोणी हरीचा लाल निघाला नाही हे देखिल तितकेच खरे.

खोटं कशाला बोला? ’राजकारण’ म्हणजे काय ह्याची बर्‍यापैकि जाणीव होईपर्यंत मी बाळासाहेब ठाकरे यांचा "भक्त" होतो, लहानपणी "सामना" या नावाखालती असलेले "बाळ ठाकरे" हे नाव, त्या भोवतीचं वलय, लोकांना मंत्रमुग्ध करुन टाकणारी भाषणाची शैली हे सगळं माझ्याकरता अप्रुप होतं. पण मग वाढत्या वयानुसार शिंग फुटली शेकडो गोष्टि नव्याने पाहिल्या, वाचल्या, ऐकल्या, समजून घेतल्या तशी राजकिय जाणीवांची व गरजांची क्षितीजं थोडी रुंदावली. आपोआप मी "भक्त" कॅटेगरीतून ’चाहता’ कॅटेगरीत आलो. त्यांची एखादि गोष्ट नाही पटली तर नाहि पटली हे सकारण सांगायचो. पण कॅटेगरी बदलली तरी त्यांच्याबद्दलचा आदर मात्र तोच होता, मी मनापासून चाहता नक्कीच होतो. माणूस दिलखुलास होता. आपली ताकद काय व कशात आहे ह्याची जाणीव असलेला नेता होता. ताकद असल्याने आपसूक एक बेदरकारपणा येतो तो देखिल भरपूर होता. बोलायला लागले कि भाषणं अनेकदा सभ्यपणाची पातळी ओलांडायचं. (त्यातून वाजपेयी - अडवाणी ऐकणार्‍यांना ते बोलणं अब्रह्मण्यम होतं. कदाचित संयुक्त महाराष्ट्रानंतरच्या पिढ्यांना अत्रे फारसे किंवा अजिबातच ऐकायला मिळाले नाहीत म्हणून असेल, पण कधी कधी मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्र या भाषेनी दचकायला कधी पासून लागला?) पण अत्रे म्हणाले होते तसंच बाळासाहेबांनी "आयुष्यात सगळं केलं, फक्त ढोंग केलं नाही", (अर्थात राजकारणात याला अपवाद ठेवावा लागतोच.) जे काही आहे ते तोंडावरती. जे बोललो त्याची सगळी जबाबदारी घेऊन. "मला तसं बोलायचं नव्हतं" हे वाक्य नंतरची सारवासारव करावी लागते तेव्हा अनेकजण वापरतात, बाळासाहेबांवरती ही वेळ आल्याचं मला आठवत नाही.


एकच पक्ष, एकच नेता, एकच ठिकाण, एकच दिवस आणि थोडि थोडकी नव्हे तर तब्बल सलग साडेचार दशकं ... लाखो लोकं त्याच ओढीने लाखांच्या संख्येने जमत, जगात दुसरं उदाहरण असेल तर दाखवावं. तुम्ही अनेकांना थोडावेळ, कींवा थोड्यांना बराचवेळ मुर्ख बनवू शकता पण अनेकांना नेहमीच मुर्ख बनवू शकत नाही. त्या माणसात असं काहितरी नक्किच होतं की सामान्य माणूस रस्त्यावरती उतरायचा. त्या सामान्य माणसात पोट भरलेला पांढरपेशा उच्च मध्यम वर्गिय किंवा एकंदरच मध्यमवर्गिय किती हा प्रश्न अलाहिदा, तसा तर तो कुठल्याच पक्षाच्या पाठी नसतो. मुश्किलीने एखादि सभा गाजली तर ठीक होतं पण ४५-४६ वर्ष तुम्ही दारु प्यायला देऊन, पैसे वाटून लाखोंची गर्दि नाहि खेचू शकत हे कुणीही मान्य करेल. साहेबांवरती लोकांच अफाट प्रेम होतं. त्यांना हिंदुहृदयसम्राट वगैरे म्हंटलं की काही सो कॉल्ड उच्च शिक्षित आणि ओपन माइंडेड लोकं कुत्सित हसतात, पण ९३ च्या दंगलीत मुंबई २ दिवसात कुणी शांत केली? ६ दिवस मार खाणारा हिंदू नंतरच्या २ दिवसात कसा उसळला होता? शिवसेना भवनात झालेल्या मिटींग मध्ये "तुम्ही हातात बांगड्या भरल्यात का?" ह्या साहेबांच्या एकाच प्रश्नाचा तो परीणाम होता हे नाकारु शकत नाही हे देखिल तितकच खरं. आजही शिवसैनिक रस्त्यावरती तलवारी घेऊन उभे राहिले आणि आम्हांला सुरक्षित वाटलं, आमच्या घरची माणसं आता नीट घरी येतील याची खात्री पटली हे सांगणारी अनेक माणसं भेटतील. परवा १३ नोव्हेंबरला देखिल "बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक आहे" हे ऐकून वडापाव विकणार्‍यापासून ते बड्या धेंडांपर्यंत मातोश्रीवरती रीघ लागली. परत सांगतो दोघांची कारणं वेगळी असतीलही पण त्यामागे "ताकद" होती, मग ती प्रेमाची असेल कींवा राजकिय असेल.

अनेक जण विचारतीलही की काय केलं त्यांनी, की इतका पाठींबा देता? तर याचा अर्थ एकच त्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवीतले त्यांचे काम माहित नसावे, किंवा संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यावरती देखिल मराठी माणसाचे गुदमरलेपण ’मार्मिक’ च्या माध्यमातून कसं बाहेर आणलं. त्या मार्मिकच्या फटकार्‍यांनी अनेक जण विव्हळले होते हे त्यांच्या लक्षात नसेल. आज "मराठी" हा मुद्दा घेऊन आज दुसरे देखिल उभे राहिले आहेत पण अजूनही मराठी माणसाला मुंबईत कुणी हक्क दिला, त्याची अस्मिता कोणी जागृत केली? ह्या प्रश्नाचं उत्तर एकच "बाळ ठाकरे". दुसरी गोष्ट - प्रबोधनकारांचा वारसा असेलही पण सेनेत जात बघितली गेली नाही. बाकिच्या पक्षात विशिष्ट जातीचा मुख्यमंत्री बसावा व त्याबदल्यात दुसर्‍या जातीचा उपमुख्यमंत्री बसवून मांडवली करावी, असं शिवसेनेत कधी दिसलं नाही. मुळात शिवसेना - भाजपा सत्तेत आली ती बाळासाहेबांच्या झंझावाती प्रचारामुळे. ९० सालच्या मंडल आयोगाला विरोध करुनही ९५ साली ते निवडून आले ह्यावरुन काय ते समजावं. सत्तेत न रहाता रीमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवणे फार कमी लोकांना जमते, त्याची सुरुवातही बाळासाहेबांनीच केली म्हणा ना. म्हणजे मुख्यमंत्रीपदापेक्षा शिवसेनाप्रमुखपद मोठं होतं (अर्थात ही चांगली गोष्ट नाही हे माझेही मत आहे पण ती घडून गेलेली गोष्ट आहे जे आज नाकारता येत नाही.), हे बाळासाहेबच करु जाणे. मग ह्याला कोणी हुकूमशाही म्हणेल, कुणी झुंडशाही म्हणेल, कोणी आंधळा अनुययही म्हणेल, कुणाला तो पक्ष फक्त गुंडांचाही वाटतो, पण संपूर्ण मुंबई बंद करुन दाखवायची ताकद शिवसेनेत तेव्हढी होती हे देखिल तितकेच खरे. बरं ज्यांना विरोध व्हायचा त्या विरोधकांना ठाकरी भाषेचे सपकारे बसून देखिल विरोधक कधी दात-ओठ खाऊ बाळासाहेबांवरती तुटून पडले नाहीत उलट राजकारणाबाहेर सगळ्यांशीच त्यांचे संबध चांगलेच राहिले. पवार आणि मी बीअर प्यायला बसतो हे भर सभेत सांगणारे बाळासाहेबच.

शिवसेनेची कार्यपद्धती सगळ्यांहुन वेगळी होती. लहान लहान शाखांतून त्यांनी पक्षाची केलेल्या बांधणीने पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचवले. अनेक चेहरे नसलेल्या लोकांना त्यांनी नगरसेवक, आमदार, खासदार बनवले. कदाचित लोकांची नस त्यांनी ओळखली होती. घरात उदंड लेकरं असली की वेळ पडल्यास बाहेर घराची पडती बाजू सावरायला त्यात एखादं वांड पोरगं असावं म्हणतात. बाळासाहेबांची "शिवसेना" तशी होती. बाळासाहेबांची शिवसेना अश्या करता कारण साहेब स्वत: सगळं बघत होते तोवर आलबेल होतं. नंतर वयोमानाने किंवा इतर कारणांनी शिवसेनेच्या रोजच्या कामातून त्यांनी लक्ष कमी केलं त्यानंतर शिवसेनेतुन अनेक जण अनेक कारणांनी बाहेर पडले, कुठली कारणं कोण बाहेर पडलं ते इथे लिहित बसण्याचे प्रयोजन व वेळ नाही. खुद्द बाळासाहेबांना अखेर "या चिमण्यांनो परत फिरा रेऽ" म्हणावं लागलं होतं. पण बाहेर पडलेल्या लोकांतही भाषणांत साहेबांवरती पलटवार करण्याची धमक नव्हती. त्यामागे नवीन ’ठाकरी’ टोला येण्याची "भीती" तर होतीच पण बाळासाहेबांना उलट उत्तर देणं हे एकूण महाराष्ट्राच्याच कल्पनेबाहेरचं होतं. मात्र इथे एक कडवट गोष्ट मांडावी लागते आहे की सध्याच्या शिवसेनेचा ’दरारा’ संपलाय, कारण तो असता तर मुळातच CSTची दंगल करण्याची कुणाची छाती झालीच नसती. कींवा आपल्या शेवटच्या दसरा मेळाव्यातील भाषणात साहेबांनाही "म्हातारी उडता नयेची तिजला..." चालीवरती आर्जवे करत "उद्धव - आदित्यला सांभाळा" हे सांगण्याची वेळ आली नसती. आयुष्यभर केवळ आदेश देणार्‍या साहेबांचे, ते काहितरी मागणारं चित्र न बघवणारं होतं इतकं शेवटी मी नमुद करु इच्छितो.


आज तरी दूर दूरपर्यंत बाळासाहेब ठाकरेंच्या इतका भक्कम नेता दिसत नाही. २०१४च्या निवडणूकांचे निकाल काय असतील ते माहीत नाही पण २०१४ च्या निकालांवरती १७ नोव्हेंबर २०१२ चा ठसा असणार आहे हे नक्की.

उद्याच्या महाराष्ट्रात बाळ ठाकरे नाहीत ही एकंदरच अस्वस्थ करणारी बाब आहे. ती राजकिय पातळीवरची जितकी आहे तितकी वैयक्तिक पातळीवरची देखिल आहे. आणि ही माझीच नाही तर करोडो मराठी माणसांची भावना आहे. आजकाल कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे गल्लीबोळातून भाऊ, भाई, दादा वगैरे उगवत आहेत. अधून मधून एखाद्या नावामागे साहेब देखिल लावले जाते, पण कुठलही नाव न घेता केवळ "साहेब" म्हंटलं की एकच नाव डोळ्यापुढे यायचं आणि येईल.

बाळासाहेबांसारखा माणूस गेल्यावरती राहुन राहुन दासबोधातला मृत्युनिरुपणाचा समास आठवतो -
"मृत्य न म्हणे हा भूपती । मृत्य न म्हणे हा चक्रवती ।
मृत्य न म्हणे हा करामती । कैवाड जाणे ॥ ११॥
मृत्य न म्हणे हा हयपती । मृत्य न म्हणे गजपती ।
मृत्य न म्हणे नरपती । विख्यात राजा ॥ १२॥
मृत्य न म्हणे वरिष्ठ जनीं । मृत्य न म्हणे राजकारणी ।
मृत्य न म्हणे वेतनी । वेतनधर्ता ॥१३॥

कारण आज हे पुन्हा लोकांना सांगावं लागतय असा माणूस गेलाय!

 - सौरभ वैशंपायन.

Wednesday, October 24, 2012

दंतकथेची दातखिळ





सामान्य माणसासाठी तो एक दंतकथा होता. कर्करोगासारख्या असाध्य रोगाशी अनेक वर्ष तो झगडला नव्हे जिंकला. वरुन ७ वेळा टूर दि फ्रान्ससारखी जगातली सर्वात कठीण सायकलिंगची स्पर्धा जिंकून जगात अशक्य काहीच नाही हे त्याने दाखववून दिले होते. हे सगळं अमानवी पातळीवरचं होतं. कर्करोगाने खचल्या लाखो जीवांचे तो प्रेरणास्थान होता. पण २००५ पासून त्याच्यावर जे आरोप होत होते त्याचा सोक्षमोक्ष अखेर गेल्या महिन्यात लागला. अर्थात त्याच्या चाचण्या आधीही झाल्या होत्या व गेल्या जूनमध्ये ज्या चाचण्या झाल्या त्यांच्या आधारावरती अमेरीकन डोपिंग संघटनेने लान्स आर्मस्ट्रॉंगवरती आरोप सिध्द केले व त्यामुळे आंतरराष्ट्रिय सायकलिंग संघटनेने त्याची टूर-द-फ्रान्सची सातही पदके काढून घेतली आणि त्यावर आजन्म बंदी देखिल घातली आहे.

एखादं व्यक्तीमत्व किती चढ-उतारातून जाऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे लान्स आर्म स्ट्रॉन्ग. ज्यांनी त्याचे "It's not about bike, It's about journey back to life"  हे पुस्तक वाचलं असेल त्यांना त्याचा पूर्वेतिहास माहित असेलच. आईचे २ डिव्होर्स, लहानपणापासूनच जन्मदात्या पित्याशी असलेले तणावपूर्ण संबध, त्याचे शाळा-कॉलेज मधले गरीबीतले दिवस, कॉलेजच्या दिवसात आयुष्यात येत जाणारी स्थिरता, पहिल्या २nd hand गाडिने लावलेली रेस, सायकलिंगमधला प्रवेश, सायकलिंगच पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून निवडणे, स्थानिक, राष्ट्रिय पातळीवरच्या व नंतर आंतरराष्ट्रिय स्पर्धा जिंकणॆ हा प्रवास वाचताना आपण थक्क होतो. सायकलिंग मधल्या काही तांत्रिक बाबी देखिल त्याने त्यात मांडल्या त्यासाठी घ्यावी लागणारी शारीरिक, मानसिक व बौध्दिक तयारी किती वरच्या पातळीवरची असते त्याची चुणूक त्याने पुस्तकातून दाखवली होती. त्याआधी फक्त जो जिता वो सिकंदर मध्ये यावर थोडं बघायला मिळालं होतं. त्याचं पुस्तक हे सायकलिंगच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातील खेळाडूला प्रेरणादायक होतं.

पण ते पुस्तक त्याने ज्या कारणासाठी लिहिला ते कारण म्हणजे त्याला या सगळ्या प्रवासा दरम्यान झालेला कर्करोग, व त्यातून त्याने - त्याच्या आईने - सहकार्‍यांनी - प्रेयसीने केलेला मानसिक - शारीरिक - भावनिक संघर्ष. त्याच्या आईशी असणारे त्याचे भावनिक नाते त्याने फार सुंदर शब्दबध्द केले आहे. तो संघर्ष वाचताना लान्सबद्दलचा आदर प्रत्येक पानातून वाढत जातो. लान्स कधी तुमचा आदर्श बनला हे तुम्हांला समजतही नाही. या पुस्तकानंतर त्याने अजून २ पुस्तकंही लिहिली, त्याची लोकप्रियता इतकी अफाट होती की त्यावरती आरोप झाले त्या नंतरही लोकांनी लान्सवरतीच विश्वास ठेवला. लान्सही अर्थात सांगत राहिला मी निर्दोष आहे. गेल्या महिन्यापर्यंत माझा व माझ्यासारख्या अनेकांचा ठाम विश्वास होता की लान्स अशी रडेगिरी करणार नाही, अगदी इथपर्यंतही मत होतं कि त्याच्या चाचण्यात काही वावगं निघालं तर कॅन्सरवरती उपचारासाठी जी औषधे घेतली जातात त्यातून अजाणतेपणी ते शरीरात आलं असेल, लान्स आपणहून हे करणार नाही. पण वाइट हे होतं कि लान्स आर्मस्ट्रॉंगचे पायही मातीचेच निघाले.खासकरुन जेव्हा त्याच्या सहकार्‍यांनी पुढे येऊन सांगितलं कि लान्स स्वत:हि हे करायचा व स्पर्धेत त्याच्या पुरक खेळ करता यावा म्हणून आम्हांलाहीत्यात सहभागी करुन घ्यायचा. या कामात त्याला त्याची पत्नीच मदत करत होती. हे सगळं ऐकून माझ्यासारख्या कित्येकांच्या आदर्शाला तडा गेला. लान्स इतकाच त्यांचा रागही आला - "हे सगळं आधी सांगायला काय झालं होतं? तेव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म??"

यश सगळ्यांनाच पचवता येतं असं नाही. फार ताकद असावी लागते त्यासाठी. एकदाका यश डोक्यात गेलं व फक्त यशाची तेव्हढी चटक लागली कि काय होतं? यश मिळवण्यासाठी माणूस कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतो हे लान्सच्या उदाहरणावरुन समजतं. अर्थात लान्स हा काही जगातला पहिला खेळाडू नाहिये जो डोपिंग टेस्टमुळे सर्वस्व गमावून बसला आहे ना शेवटचा असेल. मात्र आता कुणावर आदर्शवत विश्वास टाकायचा कि नाही हे लोकांना ठरवावं लागणार आहे. इतके आरोप होत असताना लान्सने गप्प रहाणे पसंत केले. ना "विश्वामित्री पवित्रा" घेतला ना "नरो वा कुंजरो वा पवित्रा." तो फक्त गप्प होता, कदाचित त्याला कळलं होतं कि आता तेलहिं गेलय आणि तूपही. या दंतकथेची बसलेली दातखिळ बरेच काही सांगुन गेली.

 - सौरभ वैशंपायन.

Saturday, October 6, 2012

अक्लेश केशव मंजरी तिलकम् - अनुवाद

"अक्लेश केशव मंजरी तिलकम् - अष्टपदी" म्हणून जयदेव या ओरिसामधील संतांची एक काव्य रचना आहे. राधा हे काल्पनिक पात्र कृष्ण चरीत्रात आणण्याची कल्पना जयदेवांची समजली जाते. त्यांनी श्रीकृष्ण - राधेवरती गीत-गोविंद हे अध्यात्मिक आणि तरीही शृंगार रसाने परीपूर्ण असे काव्य रचले. माझ्या एका मित्राने - अंबरीश फडणवीस याने त्यातली अष्टपदी मला मराठीत पद्य अनुवाद करायला दिली. या काव्यात राधा किंवा गोपी म्हणा श्रीकृष्णा बरोबर आदल्या रात्री केलेल्या रतीक्रिडेबाबत आपल्या सखीला सांगते आहे अशी कल्पना आहे. मी अर्थात शब्दश: अनुवाद केला नाहीये, एखाद दुसरी गोष्ट जाग सोडूनही गेली आहे. शिवाय अष्टपदी मधली सातच पदे मी घेतली आहेत कारण आठव्या पदात तुका म्हणे - नामा म्हणे तसं जयदेवांनी स्वत:चेही "म्हणे" घातले आहे आणि स्वत:ला लक्ष्मीचा भक्त संबोधुन हे काव्य सगळीकडे सुख शांती पसरवो असेही म्हंटले आहे.

अनेकांच्या दृष्टिने हि कविता अब्राह्मण्यम्‌ होऊ शकते. पण आपल्याकडे एक "संत" इतकं शृंगारीक काव्य करु शकतात ह्याचा अर्थ शृंगाराला आपली संस्कृती किती रसिकतेने घेत असे हे देखिल समजण्याचा उत्तम मार्ग आहे. श्री आदि शंकराचार्यांनी देखिल शिव-पार्वतीच्या प्रणयलीलांचे वर्णन केले आहे. पार्वती - लक्ष्मी यांचे तर केसापासून ते नखापर्यंत "आपादमस्तक" म्हणतात तसे अत्यंत शृंगार पूर्ण वर्णन श्लोकांत केल्याचे आपल्याला दिसते, पण त्यात कुठलीही वासना नसून केवळ स्तुती आहे. ह्या गोष्टि लक्षात घेतल्या तर मग खजुराहोतील कामुक शिल्पेही सुजाणपणे व रसिकतेने बघता येतील आणि इतिहासाचार्य राजवाड्यांचे भारतीय विवाह संस्थेचा इतिहास वाचतानाही बिचकायला होणार नाही. कवीश्रेष्ठ कालिदासाने मेघदूतात तर ठिकठीकाणी अशी चुरचुरीत किंवा चटका लावणारी विरहाची किनार असलेल्या शृंगाराची पेरणी केली आहे.

भारतीय अध्यात्माला व्यक्त व्हायला कुठेही बंधने नाहियेत मग तो जयदेव - आदी शंकराचार्यांनी मांडलेला शृंगार असेल किंवा भर ’रणांगणात’ सांगितलेली गीता असेल.

तर इतकि प्रस्तावना अशा करीता कि मी कुठल्या पार्श्वभूमीवरती हि कविता करतो आहे हे तुम्हांला समजायला हवं. तरीही हे कुणाला अश्लिलतेने भरलेले वाटल्यास एकच सांगणे - मुळ काव्यासमोर माझा पद्यानुवाद फारच "पांचट" आहे.
=========================




शांत सभोवती रात्र सजणी, दूर सजले एकाकी उपवन,
अंधाराची लेवून कांती, हसतो कामूक श्यामल मोहन,
लपाछुपीचा खेळ चालला, चंचल त्या प्रणयाच्या रात्री,
मिठीत अचानक खेचून घेता, अनाम वादळ उठले गात्री ॥१॥

कामातुर स्पर्षाने त्याच्या, रोम-रोम उठले होऊन पुलकित,
कुरवाळित सांगे नकोस लाजू, नकोस होऊ उगा भयचकित,
प्रणयी गुंजरव करु लागले, मिठीस त्याच्या  घेई लपेटून,
मृदु शब्दांनी तया सुखविता, वस्त्र कटीचे गेले निसटून ॥२॥


अन्निजवले मजला त्याने, मऊ तृणांच्या शय्येवरती,
उरोज उन्नत तये चुंबिले, विसावला क्षण त्यांच्यावरती,
निरवसनी देहावर अवघ्या, सख्याचे प्रणयी हात फिरती,
उचलुन अधोमुख सल्लज चेहरा, करी दंतक्षत अधरावरती ॥३॥

प्रणयक्रिडेने म्लान होऊनी, मिटे पापणी होऊन हर्षित,
चिंब जाहले शरीर स्वेदे, तनु दोघांची होई कंपित,
मदन शरांनी दोघे जखमी, मिलन सुखाची झाली घाई,
देह बिलगता नसे विलगता, निशा धुंद मग सरकत जाई ॥४॥

सित्कारातुन प्रणय वेदना, केली जाहीर, जणू कपोत घुमतो,
प्रणयचतुर प्रियकर माझा, मला रिझविण्या अश्रांत श्रमतो,
केसांमधली कुसुमे चुरली, बटा पसरल्या धरणीवरती,
प्रणयाराधनेत येई आर्तता, नखे उमटली वक्षांवरती ॥५॥

रुणझुणणारे चुकार पैंजण, नाद तयांचा वाढत गेला,
मीलनसुखासी सेवित असता, कटिवरली तुटे मेखला,
अंबाड्यासी देता हिसका, मुक्त जाहले केस बांधले,
जवळ घेऊनी दिली घेतली न आठवी कितीक चुंबने ॥६॥

मृदु शय्येवर निवांत निजले, ओठ बिचारे होत कुसुंबी,
संभोगाचा शीण हराया, शरीर पहुडले पृथुल नितंबी,
अर्धे मिटले नयन तयाचे, नील कमलदल जणू उमलले,
नवी चेतना फुलली तेव्हा, मदनमोहना पुनश्च भुलले. ॥७॥

 - सौरभ वैशंपायन.