पूर्वार्धात आपण बघितलं की १६७० नंतर दक्षीणेतील राजकारण किती अस्थिर झाले होते व पठाणां विरुद्ध पूर्ण दख्खनमध्ये नाराजी पसरली होती. दक्षीणेचे राजकारण दक्षीणेतील सत्तांकडेच राहील हा शिवछत्रपतींचा दृष्टिकोन होता. थोडक्यात १६७६च्या सुरुवातीस एकंदर दक्षीण भारताच्या राजकारणात पुढील स्थिती आली होती -
१) खवासखान मारला जाऊन आदिलशाहीत पठाणांचे वर्चस्व वाढले होते.
२) बहलोलखानाच्या पक्षातील शेरखान लोदिच्या महत्वकांक्षेमुळे दख्खन मधील हिंदू राजे व कुत्बशहा संकटात होता.
३) व्यंकोजीराजांच्याकडे तंजावर आले होते.
४) कुत्बशाहीत मादण्णा - अक्कण्णांचा उदय झाला होता.
५) मुघल सरदार बहादूरखानला बहलोलने युद्धात हरवल्याने त्याने दख्खनमधील बहलोलच्या सर्व शत्रूंना एकत्र केले होते.
६) मुघलांकडून दिलेरखान पठाणाने विजापूरच्या बहलोलखान पठाणाशी संधान बांधले व धूर्तपणाने पठाणांचे अस्तित्व दख्खनमध्ये टिकवून ठेवले होते.
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती महाराजांनी दक्षीणेत उतरायचे का ठरवले? ह्याचा विचार करुया. सर्वप्रथम दक्षीणेत उतरायचा विचार नक्की कुणाचा? महाराजांचा की व्यंकोजीराजांशी बिनसल्याने महाराजांकडे आलेल्या रघुनाथपंत हणमंतेंचा? कारण रघुनाथपंतांचे वडील नारो त्रिमल हणमंते हे शहाजीराजांकडे मुजुमदारी कारभारावरती होते. त्यांचे दोन्ही पुत्र रघुनाथपंत व जनार्दनपंत हे तिथेच वाढले. शहाजीराजांच्या मृत्यूनंतर हे कुटुंब व्यंकोजीराजांच्या पदरी होते. व्यंकोजीराजे जिंजीत असताना, १६७५ मध्ये व्यंकोजींशी बिनसल्याने रघुनाथपंत कुटुंबासह महाराजांकडे आले. येताना ते बहुदा कुत्बशाहीत मादण्णांना भेटून आले व तिथले राजकारण घेऊन महाराजांच्या मनावरती ते बिंबबले असे शिवोत्तरकालिन बखरकार म्हणतात. मात्र ह्या मोहिमेची संकल्पना महाराजांचीच होती हे तीन गोष्टिंवरुन स्पष्ट होते एक म्हणजे खुद्द सभासद म्हणतो - "तुंगभद्रा देशापासून कावेरीपर्यंत कर्नाटक साधावे हा हेत मनी धरीला, त्यास लष्कर पाठवून साधावे तरी दिवसागतीवर पडते म्हणून खुद्द राजियांनी आपण जावे असे केले."
दुसरा उल्लेख महाराजांनी मालोजी घोरपडेंना भागानगरहुनच लिहिलेल्या पत्राचा करावा लागेल. दोन पिढ्या जपलेलं वैर विसरून दक्षीणेतील लोकांना एकत्र आणण्यासाठी महाराज त्यात म्हणतात - ".... आपल्या जातीच्या मराठीया लोकांचे बरे करावे हे आपणास उचित आहे ऐसे मनावरी आणून तुमचा आमचा वडिलापासून दावा वाढत आला तो आम्ही मनातून काढून नि:कपट होऊन, तुम्ही मराठे लोक, कामाचे, तुमचे बरे करावे ऐसे मनी धरुन हजरत कुतुबशहासी बहुता रीती बोलून तुम्हास हजरत कुतुबशहाचा फर्मान घेऊन पाठवला आहे ... तुम्ही कदाचित ऐसा विचार कराल की, आदिलशहाचे आपण दो पिढीचे वजीर आणि आता विजापूरकडून कुतुबशाहित राजेयांचे बोले कैसे जावे? तरी जे समयी खवासखान धरीला, विजापुरचा कोट पठाणे घेतला ... तेच समयी पादशाही बुडाली.... ऐशिया्स दक्षिणचे पादशाहिस पठाण जाला. हे गोष्ट बरी नव्हे. पठाण बळावला म्हणजे एका उपरी एक कुली दक्षिणियांची घरे बुडविल, कोणास तगो देणार नाही. ऐसे आम्ही समजोन हजरत कुतुबशहा पातशहा यांसी
पहिलेपासून रुजुवात राखली होती. त्यावरुन सांप्रत हजरत कुतुबशहाने मेहेरबानी करुन ’हुजुर भेटीस येणे’ म्हणून दस्तखत मुबारक व दस्त पंजीयानसी फर्मान सादर केला."
तिसरी गोष्ट म्हणजे महाराजांनी तंजावर येथे व्यंकोजीराजांना लिहिलेले पत्र. ११ नोव्हेंबर १६७५ रोजी सातारा स्वराज्यात दाखल झाले. काही दिवसांनी महाराज सातार्यास आले व गंभीर रीत्या आजारी पडले. ते इतके आजारी होते कि त्यांच्या मृत्युच्या वावड्या देखिल उठल्या. मुंबईकर इंग्रजांनी तर संभाजीराजांनीच विष प्रयोग केल्याची घाणेरडी शंका आपल्या सुरतेकडे पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली. सुदैवाने महिना भरात महाराज दुखण्यातून सावरले. दक्षीणेतील राजकारणावरती महाराजांचे बारीक लक्ष होते महाराजांनी व्यंकोजीराजांना पत्र लिहिले - "येकोजीबाबा तुम्ही महाराज म्हणवितोस हिमत बांध आम्ही तरी येक वेडे बहलोलखानासी वर जादर झगडा लाविला आहे.सारी जमेती याची आम्हावर गुंतली आहे. ...... चंदीपलीकडे तीन लक्षांचा मुलूक बहलोलखानासी आहे ऐसियास जरी आम्ही तुम्हाला ऐसी अकल ल्याहावी की चंदीमध्ये खवासखानाचा भाऊ महमद नासीरखान आहे तो तुम्ही मिलोन पठानाची विलायेत घ्यावी तरी नासीरखान वेडे आहेत त्याच्याने पुढे राजकारणाची बुनयाद चालवत नाही. याकारणे तुम्हाला हुजुर करुन लिहितो की बहलोलखाने विजापूरातून तुम्हाला लिहिले असेल की सेरखान तुम्ही मिलोन खिबा कबज सेरखानचे हवाला करणे तरी येकोजीबाबा तुम्हि पैकियावरी न पहाणे जरी बहलोलखानचा तिकडे सेरखान आहे तो लस्करीयास दोन होन देई तरी आपण तीन होन द्यावेत आणि लस्कर हशम जमेती करावी ..... ऐसे करुन आपणाकडे जमेत करुन बलकट होणे बहलोलखानचा कागद तरी चंदी घ्यावी म्हणौन आले असतील त्या मिसे सेरखानास बोलावून आनून ते तुम्हि मिलुन चंदी घ्यावी अहमद नासीरखानास मारुन गर्देस मेलवावा आणि सेरखान सहजेच आपण होऊन तेथे कमजोर असेल तो भेटीस म्हणुन बोलावून आणून तेथेच जबे करावा. त्याची जमेत काही असली तर त्यावरही हला करावा म्हणजे चंदी आपणास आली. वालगुडपुराभवता मुळूक आहे तो ही आपणास चालोन आला तरी सदरहूप्रमाणे वर्तणूक केली तरी येणेप्रमाणे फते होतच आहे. म्हणजे येकोजीबाबा तुम्हाऐसा कर्नाटकामध्ये जोरावर कोण्ही नाही... मथुरेचा (मदुरेचा) राजा आपले चदावर (तंजावर) खाऊन सुखी असोन आपला सेरीख (मित्र) व्हावा आणि आपण तरतूद तलास करुन येरुळचा (वेल्लोर) कोट व रायेलाचे (विजयनगरचे) तख्त हाताखाली घालावे. पुढे तैसेच घाटावरी चढोन श्रीरंगपटकरांसी आपलेयामध्ये सरीख करोन आपणही श्वार संगीनाथ मेलवून बेंगरूलाचा दवेदार थोरला कोट बहलोलखानाचे लेकापासून रगडून घ्यावा." हे पत्र महाराजांनी साधारण जानेवारी १६७६ मध्ये लिहिले होते म्हणजे दक्षीणेत मोहिम काढायच्या किमान ११ महिने आधी.
आता महाराजांचे त्या मागचे हेतू काय होते ते बघू. १) दख्खनमध्या अनागोंदिचा फायदा घेऊन व दुर्बळ झालेल्या आदिलशाहीच्या राज्यातून, इतर दक्षीणी राज्यांतून शक्य तितका मुलुख हस्तगत करून स्वराज्याच्या सीमा वाढवणे. २) राज्याभिषेकाच्या वेळी झालेला खर्च चौथाई, खंडणी याशिवाय मिळालेल्या नव्या मुलुखाच्या उत्पन्नातून भरुन काढणे व पुढे मिळणारे उत्पन्न वापरुन स्वराज्याची भरभराट करणे ३) मुघलांचे मोठे आक्रमण झाले व वेळ पडलीच तर माघार घ्यायला नवीन भूमी निर्माण करणे. ४) कोकण प्रमाणेच दक्षीण समुद्र किनारा ताब्यात आल्यास भारताच्याच व्यापारी नाड्या स्वत:च्या हातात आणणे. हे महत्वाचे हेतू म्हणता येतील. आणि हे चारहि हेतू तेव्हा सफल झालेच पण दुसरा व तिसरा मुद्दा हा राजाराम महाराजांच्या काळात जेव्हा ते रायगड - प्रतापगडवरुन निसटून खाली जिंजीला गेले तेव्हा साध्य झाले. कारण दुसरा मुद्दा म्हणजे या मुलुखातून जो पैसा उभा रहात होता त्याच्या जोरावरती महाराष्ट्रातील संग्रामाचा खर्च मराठे बर्याच प्रमाणात भागवत होते. आणि जिंजीपर्यंत घेतलेली ’माघार’ ही सामरिक दृष्ट्या मराठ्यांना फायद्याची होती कारण - दिल्ली ते पुणे हे जवळपास बाराशे किमीचं अंतर, पुणे ते जिंजी पुन्हा हजार एक कीमीचे अंतर म्हणजे शत्रूला त्याच्या राजधानी अथवा बलस्थानापासून २ हजार किमी दूर खेचून त्याला दुर्बळ बनवायचे व त्याची रसद मधल्या मधे मारुन त्याला जेरीला आणायचे उद्योग मराठ्यांनी राजाराम - ताराराणींच्या काळात केल्याचे दिसून येतील.
थोडक्यात ही मोहिम यशस्वी ठरल्यास "पांचो उंगलियां घी मे।" म्हणतात तसं काहीसं होणार होतं. एकंदर रागरंग बघून दूरदृष्टिने महाराजांनी व्यंकोजीराजांना जागे करण्याचा प्रयत्न केला. परंतू ते आपल्या तंजावरची हद्दितच सुखी होते. महाराज वास्तविक नुकतेच आजारातून उठत असल्याने ही मोहिम लगेच अंगावरती घेणे शक्य नव्हते. त्यामुळे परीपूर्ण विचारांतीच हालचाल करावी लागणार होती. आता त्यांनी कुत्बशहाला पुढे करुन त्याच्या आडून नेतृत्व करता येते का हे चाचपायला सुरुवात केली. त्यात त्यांना रघुनाथपंतांची व मादण्णांची साथ मिळणार होतीच. बरोबरच एक सार्वभौम राजा आहोत ह्याची प्रचिती देखिल त्यांना जगाला द्यायची होती ती या मोहिमेने कशी देता येईल याचाही विचार स्वराज्याच्या दृष्टिने होणे गरजेचे होते. जर हे सगळे मनासारखे जुळले तर मुघली सत्तेचा पाया दख्खनमधुन कायमचा उखडून टाकता येईल हे प्रमेय महाराजांनी मनोमन मांडले होते.
जुलै १६७६ मध्ये कुत्बशहाने आदिलशाही व महाराज यांच्यात तह घडवून आणला. मुघलांचा शिरकाव टाळाता यावा म्हणून महाराजांनीही याला लगेच होकार दिला. तहानुसार महाराजांकडे कोल्हापुरच्या पुढचा कृष्णगिरीपर्यंतचा मुलुख रहावा व त्या बदल्यात महाराजांनी ३ लक्ष रुपये पेशकश व दरसाल १ लक्ष खंडणी द्यावी असे ठरले. याच दरम्यान पूर्वार्धात सांगितले तसे ऑगस्टमध्ये नळदुर्गाजवळ बहलोल - बहादुरखान एकमेकांना भिडले. व त्यात बहादूरखानाला पराभव पत्करावा लागला. बहलोलखानाचा ओढ दिलेरखान पठाणाकडे असल्याने त्याने महाराजांशी केलेल्या तहाला महत्व दिले नसावे कारण सप्टेंबरमध्ये बेळगाव - बंकापूर जवळील भाग घेण्यासाठी मराठे गेल्यावरती आदिलशाहीकडून तो प्रदेश देण्याची टाळाटाळ झाली. महाराजांनी तो प्रदेश लुटून रायगडि प्रयाण केले. वरुन त्यांनी आता बहादूरखानाशी तह करुन बहलोल विरोधात ४-५ हजारांची कुमकही रवाना केली. अर्थातच पुढे बहलोलने साखरेत घोळवलेली बोलणी केल्यावरती बहादूरखानाने माघार घेतली. हीच अनुकुल वेळ आहे हे जाणून आता महाराजांनी थेट कुत्बशहाला भेटता येईल का हे चाचपायला सुरुवात केली व त्या दृष्टिने कुत्बशाहीतले आपले वकिल प्रल्हाद निराजी यांना हाताशी धरुन कुत्बशहाचे अधिकृत निमंत्रण मिळवण्याची खटपट सुरु झाली. अनेकदा राजकारणात हि निमंत्रणे आपणहून पदरात पाडून घ्यावी लागतात. एकदा का दख्खनमध्ये असा चंचूप्रवेश केला की मग अर्धा डाव जिंकल्यात जमा होता.
कुत्बशहा पहिले साशंक होता - "जैसा अफझलखान बुडविला की शास्ताखान बुडविला, दिल्लीस जाऊन आलमगिर पातशहास पराक्रम दाखविला ऐसा एखादा अनर्थ जाहल्यास काय करावे? भेट मात्र राजियाची न घेऊ, जे मागतिल ते देऊ." यावरुन महाराजांनी केलेल्या अद्भुत कृत्यांनी भारतभर त्यांच्याविषयी किती दरारा पसरला होता हे दिसून येते. मात्र प्रल्हाद निराजीनी आपली बाजू लावून धरली. महाराजांनी किती धूर्त, गोड बोलणारे व वेळ पडल्यास बनेल होणारे चाणाक्ष वकिल नेमले होते हे अफझलखान भेट काय किंवा ही भागानगरची भेट काय यावरुन दिसून येते. प्रल्हाद नीराजींनीही सगळ्या आणा-भाका घेऊन हे निमंत्रण पदरात पाडून घेतले. त्यांनी मादण्णांचा विश्वासही तितकाच संपादन केला. त्याचा परीणाम म्हणून - "हजरत कुतुबशहाने मेहेरबानी करुन ’हुजुर भेटीस येणे’ म्हणून दस्तखत मुबारक व दस्त पंजीयानसी फर्मान सादर केला."
आता दख्खनमध्ये जायचे तर स्वराज्याची व्यवस्था लावणे गरजेचे होते. आधी मुघलांची आघाडी शांत ठेवणे गरजेचे असल्याने निराजीपंतांना मोठ्या नजराण्यासह बहादूरखानाकडे रवाना केले. व एक वर्षांसाठी शांतता राहिल असा तह केला. बहलोलशी लढण्यात महाराजांनी मदत केल्याने व आधीच्या घटनांमध्ये महाराजांनी त्याला बेजार केल्याने तो देखिल या नजराण्यांनी खुष झाला. उलट मराठ्यांची कटकट होणार नाही यातच त्याला समाधान होते. रायगडच्या उत्तरेकडील भाग त्यांनी मोरोपंत पेशव्यांकडे सोपवला, पोर्तुगिज व हबश्यांसमोर अनाजीपंत आणि विजापूरच्या सीमेवरती दत्ताजीपंतांना ठेवले. खुद्द रायगडाची जबाबदारी राहुजी सोमनाथांकडे दिली. युवराज शंभूराजांना बहुदा घरात सुरु झालेल्या सुप्त संघर्षापासून जाणूनबूजून दूर ठेवण्यासाठी शृंगारपुर सुभ्याची जबाबदारी दिली. बहुदा नोव्हेंबरच्या सुरुवातीसच शंभूराजे शृंगारपुरी गेले असावेत.
या मोहिमेसाठी महाराजांनी बहुदा डिसेंबरच्या मध्यावरती किंवा बहुदा अखेरीसच रायगड सोडला असावा. एरवी दसर्याच्या मुहुर्तावरती मराठे नवीन मोहीमा घेत. मात्र पावसाळा संपून स्वराज्याची घडी लावणे, इतरत्र कुठलाही संघर्ष निर्माण होऊन दुसरी आघाडी उघडावी लागु नये म्हणून आदिलशहा, मुघल यांबरोबर नवे तह - करार करणे यातच सप्टेंबर उजाडल्याचे आधी आपण बघितलेच आहे. मोहीमेसाठी महाराजांनी खजिना, भरपूर घोडदळ, प्रचंड पायदळ घेतले. कारकून घेतले. कर्नाटकचे माहीतगार लोकं घेतले. सभासदाने तब्बल पंचवीस हजार घोडदळ असल्याचे म्हंटले आहे. तर इंग्रज तीच संख्या २० हजारांचे घोडदळ व ४० हजारांचे पायदळ घेतले असे म्हणतात. थोडक्यात महाराजांसोबत ५० हजारांचे सैन्य नक्कीच होते. पहिल्यांदाच इतकं मोठं मराठी सैन्य मोहीमेवरती जात होतं. याशिवाय दिर्घकालिन मोहीम असल्याने रसद करायला हजारोंनी बैल, वरकड कामे करणारे बाजारबुणगे, शेकड्याने कुशल कारागिर वगैरे सोबत असावेत. रघुनाथपंत व जनार्दनपंत हणमंते सोबत होतेच. शिवाय पायदळाचे सरानौबत येसाजी कंक, बाजी सर्जेराव जेधे, सोनाजी दौलतबंदक, बाबाजी ढमढेरे, आनंदराव, मानाजी मोरे, सूर्याजी मालुसरे, धनाजी जाधव, सेखोजी गायकवाड अशी तोलामोलाची माणसे होती. कारकूनी अधिकार्यांमध्ये बाळाजी आवाजी चिटणीस, मुन्शी नीलप्रभू, शामजी नाईक पुंडे हे होते. खुद्द सरसेनापती हंबीरराव मोहीते हे दुसर्या मार्गाने गोवळकोंड्याला येणार होते.
या मोहीमेवरती महाराजांनी ठरवून वरकड खर्च केला होता. सैनिकांचे पोषाख, निशाणे वगैरे हा सार्वभौम राजाच्या सैन्यासारखा केला होता. नवी शस्त्रे, दारुगोळा, चिलखते, शिरस्त्राणे उत्तमोत्तम प्रतीची होती. दोन घोडेस्वारांत तीन घोडे ठेवले होते. अर्थात हा भपका मुद्दामहुन केला असला तरी सर्व सैन्य शिस्तबद्धच होते. इतर चैनीच्या वस्तू, स्त्रीयांना अजिबात प्रवेश नव्हता. महाराजांनी सैन्याला कडक हूकूम केले होते - "एक काडी रयतेची तसनस न व्हावी.’ आवश्यक त्या वस्तू खरेदी कराव्यात, लूट कदापि करु नये. उल्लंघन झाल्यास शिरच्छेदच होणार होता. खुद्द महाराजांचा व मुख्य ४-६ अधिकार्यांचे तंबू साधे जाड कापडाचे होते. तर नेहमीच्या कारभारासाठी म्हणून असलेला मोठा तंबू देखिल जाड्याभरड्या कापडाचाच होता. त्यामुळे अर्थात इतरांचे तंबू भपकेबाज असण्याची शक्यताच नव्हती.
आपली हालचाल शक्य तितकी महाराज गुप्त ठेवत होते. महाराजांनी दोन तुकड्या करुन दुसरी तुकडी हंबीरारांवांसोबत दिली जी तोरगळप्रांतातून तुंगभद्रेच्या किनार्याने कुत्बशाहीत शिरणार होती. याच तुकडीत बाजी सर्जेराव जेधे व त्यांचा तरणाताठा मुलगा नागोजी जेधे होता. ह्या तुकडिला बहलोलखानचा सरदार हुसेनखान मियाण आडवा आला. येलगेंदलाजवळ मोठी धुमश्चक्री उडली. मराठ्यांनी हुसेनखानच्या सैन्याला पार चेचून टाकले. त्याचे सैन्य माघार घेऊ लागले. खुद्द हुसेनखानचा हत्ती रणांगणातून पळून जाऊ लागला. नागोजी जेध्याने हे बघितले. व दौडत जाऊन स्वत:चा घोडा मध्ये घातला. हत्तीची सोंडच कापली. हत्ती घाबरुन उलटा फिरला व परत रणांगणाकडे जाऊ लागला. हुसेनखान संतापला त्याने एक तीर नागोजीच्या दिशेने सोडला. तो थेट नागोजीच्या कपाळात घुसला. हुसेनखानला देखिल मराठ्यांनी पकडले. नागोजीच्या मस्तकात घुसलेला तीर बाहेर काढताच नागोजीही तडफडत मृत्युमुखी पडला. त्याची पत्नी गोदूबाई हे वृत्त समजताच कारीस सती गेली. या घटनेनंतर बहुदा बाजी जेधे आधी रायगडला गेले व तेथून कारीला गेले असावेत. नंतर महाराजांसोबत पुन्हा दख्खनमध्ये आले असावेत. ह्या घट्नेनंतर महाराज स्वत: कारी गावांत गेले व नागोजीम्च्या आईचे सांत्वन केले. त्यांना प्रतिवर्षी एक शेर सोने खर्चासाठी देण्याची व्यवस्था लावली. जेधे शकावली म्हणते पौषात हुसेनखानचा पाडाव झाला. यावरुन ही घटना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीत घडली असावी. म्हणूनच वरती मी महाराज डिसेंबरच्या शेवटी रायगडवरुन निघाले असण्याची शक्यता नोंदवली आहे.
महाराजांनीया मोहीमेवरती निघण्या आधी पाटगावास मौनीबुआंचे दर्शन घेतले. आशिर्वाद मिळावा म्हणून महाराज बराचवे थांबले. मौनीबुआ अर्थात कधी काही बोलत नसत. बर्याच वेळाने त्यांनी खडीसाखर दिली व महाराजांसोबत उभे असलेल्या मोरोपंतांच्या हातातील चंपक फुलांचा तुरा महाराजांच्या डोईवर ठेवला. महाराज नेहमीच सर्व धर्म-पंथांच्या संत-सत्पुरुषांचा आदर करीत मात्र त्यांनी भलत्या ठिकाणी नाक खूपसले तर ते त्यांना सूनवायला देखिल मागे-पुढे बघत नसत. मौनीबाबांच्या प्रमाणेच महाराज चिंचवडकर देवांनाही फार आदर देत. मात्र महाराज सातारा भागात असताना निमसड भागात त्यांना जेजूरीचे कान्हा कोळी व सूर्याजी घडसी येऊन भेटले. त्यांनी चिंचवडकर देवांविरुद्ध महाराजांकडे तक्रार केली. जेजुरीला गुरवांचा तंटा सुरू होता. देवांनी त्यात हस्तक्षेप करुन परस्पर निर्णय देऊन दोघांचे हात तोडले व त्यांना कोंडाण्यावरती कैदेत टाकले होते. ही तक्रार ऐकून महाराज संतापले. त्यांनी टाकोटाक देवांना तिरकस पत्रं लिहिले - "तुमची बिरदे आम्हांस द्या व आमची बिरदी तुम्ही घ्या!" दुसरे पत्र कोंडाण्याच्या गडकर्यास लिहिले - "तू चाकर आमचा की देवांचा?" कैद्यांची सुटका करुन या प्रकरणावरती स्वारीहून आल्यावरती निर्णय द्यायचे वचन महाराजांनी दिले.
महाराज बहुदा गोदातीराने मराठवाड्यातून नांदेड बोधन मार्गाने सिकंदराबाद व तेथून भागानगरकडे गेले असावेत. एका सनदपत्रात ’महाराज राजश्री थोरले कैलासवासी स्वामी भागानगर्प्रांते स्वारीस आले होते, ते समयी मौजे कंदकुडती परगणे बोधन सरकार नांदेड हा गाव समग्र ब्राह्मणास अग्रहार करुन दिला’ अशी नोंद आहे. महाराजांनी कुत्बशाहिच्या हद्दित प्रवेश केला. महाराजांचे सैन्य शिस्त पाळून येत असलेले बघून कुत्बशहावरती त्याचा परीणाम झाला असावा. त्याने स्वत: महाराजांच्या स्वागतार्थ काही गावे सामोरा येण्याची तयारी तो करु लागला. हे समजताच महाराजांनी निरोप पाठवला ’आपण वडील भाऊ, मी धाकुटा, आपण पुढे न यावे’ बादशहा अधिकच संतुष्ट झाला. त्याने अक्कणा व मादण्णांना पुढे धाडले. त्यांनी मोठ्या सन्मानाने महाराजांना शहरात नेले. दिनांक होता - ४ मार्च १६७७. सभासद म्हणतो - "राजियांनी आपले लष्करास कुल्जरी सामान केला होता. सूमुहुर्त पाहून पातशाहाचे भेटीस भागानगरमध्ये चालिले. पातशहाने नगर शृंगारिले. चौफेरी बिंदीस कुंकुम केशराचे सडे, रंगमाळा घातल्या, गुढिया, तोरणे, पताका, निशाणे नगरात लावली. नगर नागरीक लोक कोट्यान कोटी राजा पहावयास उभे राहिले. नारींनी मंगळ आर्त्या अगणित उजळून राजियास वंदिले. सोने - रुपियाची फुले राजियावरती उधळली. राजियांनी लोकांस खैरात द्रव्य वस्त्रे अगणित दिली आणि सर्व सैन्यासहित दादमहालात पावले..... तेथून पातशहास खालते उतरु नका आपणच खासा येतो असा निरोप पाठविला." मात्र इथे महाराजांनी आपणही सार्वभौम राजे आहोत हे दाखवून द्यायचे ठरविले. वास्तविक कुतुबशाहीचा रिवाज होता की शिरभोई धरावी, तसलिम करावी - म्हणजे पातशहाला लवुन कुर्निसात करावा व मुजरा करावा. मात्र महाराजांनी म्हंटले - ’आम्ही आपणावरी छत्र धरीले असे. त्यामुळे शिरभोई धरणे व तसलिम करणे हे माफ व्हावे.’ कुत्बशहाने ते मान्य केले. महाराजांना समोरे जाऊन त्याने महाराजांना थेट आलिंगन दिले. व महाराजांचा हात धरून त्यांना आपल्याच शेजारी बसविले. दोघेही एकासनिच बैसले. अनेकदा डोकेफोड करुन देखिल जे साधता येत नाही ते अश्या कृतींनी साधता येते. दस्तुर खुद्द कुत्बशहाच त्यांना आलिंगन देऊन एकासनी बसवतो आहे ह्याचा अर्थ महाराजांच्या राज्याला - सिंहासनाला त्याची मान्यता आहे हा उघड संदेश सगळ्यांना मिळाला.
महाराजांबरोबर जनार्दन पंत, प्रल्हादपंत, सोनाजी नाईक बंकी व बाबाजी ढमढेरे हे पाचजण होते. शिवाय अक्कण्णा व मादण्णा होतेच. महाराज व पातशहा एक प्रहर संवाद करत होते. कुत्बशहा व जाळीआड असलेल्या त्याच्या स्त्रीया, इतर मंत्री दस्तुर खुद्द महाराजांच्या तोंडून त्यांच्याच अतुलनिय पराक्रमाच्या कथा ऐकून अचंबित झाले. भेटी अखेर पात्शहाने महाराजांना उंची वस्त्रे, अलंकार, घोडे, हत्ती दिले व त्यांचा सत्कार केला. महाराजांना निरोप द्यायला पातशहा स्वत: महालाखाली आला. पातशहाचे चांगले मत बनले - ’राजा प्रामाणिक, आपल्यास रक्षिले, क्रिया जतन केली." दुसर्या दिवशी महाराजांना मादण्णांनी आपल्या घरी मेजवानीचे निमंत्रण दिले. महाराजांनेही ते स्वीकारले. शिष्टाईच्यावेळी हस्तीनापुरात फक्त विदुराकडे श्रीकृष्णाने भोजनाचे निमंत्रण स्वीकारले होते अगदी तसेच. मादण्णांच्या आईने स्वत: महाराजांसाठी अन्न शिजवले व वाढले.
कुतुबशहाने मादण्णास बोलावून ’राजियास काय पाहिजे ते देऊन संतुष्ट करुन निरोप द्यावा’ असे सांगितले. पुन्हा एक सुमुहुर्त पाहून कुत्बशहा व महाराजांची भेट घडवून आणली गेली. तह ठरला. कुत्बशहाने मादण्णांना सर्व अधिकार दिले. "आपली पादशाही जितकि वाढवू ये तितकी वाढवणे, पठाणाची नेस्तनाबूद करणे, दक्षीणची पातशाही आम्हा दक्षणियांचे हाती राहे ते करावे." या सुत्रावरुन उभय पक्षात करार झाला. -
१) स्वारी खर्चासाठी कुत्बशहाने दरमहा ३ हजार होन अथवा ४ लक्ष ५० हजार रुपये महाराजांना द्यावेत. २) कर्नाटक स्वारीत मदत म्हणून मिर्झा मुह्हमद अमीन याने एक हजार घोडदळ व ३ हजार पायदळाची मदत करावी. ३) पाश्चात्य तोपचींसह कुत्बशाहीचा नावाजलेला तोफखाना दारुगोळ्यासह महाराजांना मिळावा व त्याबदल्यात आदिलशहाने बळकावलेला कुत्बशाहीचा प्रदेश भूभाग शहाजीराजांचे जहागिरी वगळून जिंकलेल्या भागाचा एक हिस्सा कुत्बशहाला देण्यात येईल अशी मुख्य कलमे होती. खेरीज मुघलांचे आक्रमण आले तर परस्परांना मदत करावी. एकमेकांचे वकील एकमेकांच्या दरबारी रहातील. तसेच कुत्बशहाने दरवर्षी एक लाख होनांची खंडणी महाराजांना द्यावी असेही तहात ठरले. महाराज भागानगरात सुमारे दिड महिना मुक्कामास होते. तिथूनही त्यांनी आदिलशाहीतील घोरपडेंसारख्या मोठ्या सरदारांना आपल्या किंवा कुतुबशाहीच्या बाजूने ओढण्याचे प्रयत्न केले. त्याचा फारसा उपयोग झाला नसला तरी महाराजांचा राजकिय प्रभाव अर्थात विस्तारला होता. एप्रिल १६७७ मध्ये महाराजांनी भागानगर सोडले ते भरपूर द्रव्य, दाणा, व अधिकची कूमक घेऊनच. दक्षिण दिशा विजयश्रीची माळ घेऊन त्यांची वाटच बघत होती.
महाराजांनी कृष्णा ओलांडून निवृत्तीसंगम आणि पुढे श्रीशैलम् याठिकाणी त्यांनी तीर्थस्नान केले. या ठिकाणी स्नान करुन ते श्र्र्मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला गेले. तिथे त्यांछ्या अंगात देवीचा संचार झाला असे बखरकार म्हणतात. आजूबाजूचे अध्यात्मिक वातावरण, जिजाऊसाहेब गेल्यावरती त्यांच्या आयुष्यात तयार झालेली पोकळी, घरात सुरुवात झालेला सुप्त गृहकलह ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना विरक्तीचे विचार आले असावेत. इतका विरक्तपणा आला की मल्लिकार्जुनाच्या पुजेत बिल्वदलांऐवजी स्वत:चे शीरकमल वहावे असं त्यांना वाटून गेलं. त्याचे वेळी त्यांच्या अंगात भवानीची संचार झाला "तुज ये गोष्टि मोक्ष नाही. हे कर्म करु नको, पुढे कर्तव्यही उदंड तुज हाते करणे आहे." महाराजांनी स्वत:ला सावरले. कदाचित याच दरम्यान महाराजांनी काही अध्यात्मिक पदेही रचली होती. त्यातले एक तंजावरच्या महालातील दफ्तरात सापडले ते पुढीलप्रमाणे -
नासिवंत सुखासाटी। अंतरला जगजेठी॥
नाहि नाहि याते गोडी । लक्ष चौर्यौशीच्या जोडी॥
मणुष जन्म गेल्यावारे। काय करशिला बारे॥
शिवराजे सांगे जना। म्या तो सोडिली वासना॥
महाराज साधारण ९ दिवस श्रीशैलम मुक्कामी होते. मल्लिकार्जुनाच्या उत्तरेला महाराजांनी जे गोपुर बांधून घेतले त्याला आज शिवाजीगोपुरम असे ओळखले जाते. तिथेच महाराजांची शिल्पाकृती देखिल आहे. तिथुन महाराज ४ मे १६७७ रोजी तिरुपतीच्या दर्शनाला गेले. महाराजांनी प्रतिवर्षी ४२० होन श्रींच्या अभिषेक, पुजा व नंदादिपासाथी देण्याचे थरविले व एका वर्षाचे द्रव्य त्यांनी तत्काळ दिले सुद्धा. तिरुपतीहुन मद्रासजवळ पेड्डापोलम् इथे महाराज पोहोचले. महाराजांनी महादोजी पंतलुंना इंग्रजांच्या भेटिवरती पाठवले आणि काहि रत्ने व विषावरील उतारासाठी औषधे पाठवण्यास सांगितले. इंग्रजांनीही या वस्तू तातडिने रवाना केल्या. वरुन या वस्तूंची किंमत न आकारता त्यांनी त्या भेटिदाखल महाराजांना दिल्या. शिवाय ४ वार कापड व चंदनाची ४ पात्रे देखिल भेट म्हणून पाठवली.
पेड्डापोलमच्या मुक्कामातच बहुदा महाराजांनी जिंजी स्वारीचा बेत आखला असावा. पूर्वार्धात सांगितल्याप्रमाणे पठाणी पक्षाच्या शेरखान लोदिचा प्रभाव वाढलेला बघून खवासखानाचा भाऊ नासीर मुहम्मदने किल्ला पठाणांच्या ताब्यात जाण्यापेक्षा आपणच तो कुत्बशहाला देऊया असा विचार केला व मादण्णांकडे दूत पाठवला. मात्र विजापुरकरांचा किल्ला असा उघडपणे ताब्यात घेऊन मुघल - विजापूरकरांच्या डोळ्यात येणे त्यावेळि मादण्णांना योग्य वाटले नाही. मात्र किल्लाही जाऊ द्यायचा नव्हता म्हणून मग त्यांनी हुशारीने त्याच दूताला शिवाजी महाराजांची भेट घ्यायला सांगितले. त्यानुसार तो दूत महाराजांना पेड्डापोलम् इथे येऊन भेटला. महाराजांनी देखिल ५० हजार होन व १ लाखाच्या मुलुखाची लालुच नासीर मुहम्मदाला दिली. आणि अपेक्षेप्रमाणे मासा गळाला लागला. थोडिशी लुटूपुटुची लढाई करुन २० मे रोजी त्याने किल्ला महाराजांना दिला देखिल वरुन ठरल्याप्रमाणे महाराजांनी देखिल आपला शब्द पाळला. ५० हजार होन व लाखाचा मुलुख देऊन महाराजांनी दक्षिणेत एक बलाढ्य किल्ला आपलासा केला. ह्याच जिंजी वरुन सुमारे नऊ वर्षे राजाराम महाराजांनी मुघलांना तोंड दिले हे लक्षात घेतल्यावरती महाराजांची दूरदृष्टि लक्षात येते.
जिंजीच्या दुर्गाची भक्कम व्यवस्था महाराजांनी लावली. रायाजी नलगे यांना किल्याची हवालदारी, तिमाजी केशवांना सबनिशी आणि रुद्राजी साळवी यांना इमारतींच्या कामावरती नेमले. व महाराज लगोलग २५ मे च्या सुमारास वेल्लोरच्या दिशेने निघाले. वेल्लोरचा भुईकोट किल्ला दख्खन मधला फार ताकदिचा किल्ला होता. सभासदाने लिहुन ठेवले आहे - "तो कोट म्हणजे पृथ्वीवर दुसरा गड असा नाही. कोटात जीत पानियाचा खंदक. पाणियास अंत नाही असे. उदकात दहा हजार सुसरी. कोटाच्या फाजियावरुन दोन गाडिया जोडून जावे ऐशी मजबुदी. पडकोट तरी चार फेरीयावरी फेरे ये जातीचा कोट." इ.स. १५६६ च्या सुमारास विजयनगर साम्राज्याचा अधिकारी असलेल्या चिन्नबोमी नायकाने हा भुईकोट उभारला होता. वेल्लोरची मजबुती बघुन भुईकोटाच्या पूर्वेला असलेल्या टेकड्या ताब्यात घेऊन त्यावरती मराठ्यांनी तटबंदी बांधली त्यांनाच महाराजांनी साजरा-गोजरा अशी नावे दिली. काहींच्या मते हे गड आधीच बांधले होते. याच ठिकाणहुन कुत्बशहाच्या तोफखान्याच्या मदतीने वेल्लोरच्या भुईकोटावरती हल्ला करायचा महाराजांचा मानस असावा. मात्र त्याच सुमारास कुत्बशहाने महाराजांसोबत दिलेला तोफखाना परत मागवून घेतला होता. कदाचित महाराजांनी जिंजीचा किल्ला कुत्बशहाला न दिल्याने नाराज होऊन त्याने ही मदत थांबवली असावी. कींवा दुसरे कारण असेही असू शकते की या सुमारास मुघल-आदीलशहा व कुत्बशहां यांच्यातला संघर्ष पुन्हा सुरु झाला होता त्याच कारणाने कुत्बशहाने आपला तोफखाना परत मागवला असावा. कारण काहिही असेल मात्र याच कारणाने आता हा किल्ला जिंकणे जास्त कठिण व वेळखाऊ होऊ शकते हे लक्षात घेऊन त्याला दिर्घकाळ वेढा देऊन बसण्याची गरज महाराजांनी ओळखली. या वेढ्याचे काम त्यांन बहुदा नरहरी रुद्र यांकडे सोपवले व ते शेरखान लोदिचा बंदोबस्त करायच्या मागे लागले.
त्यांनी लोदिच्या अंमला खालचा मैदानी प्रदेश जिंकायला सुरुवात केली. अधेमध्ये जे गड होते त्यांवरतई शेरखान लोदीची माणसे होती. मात्र ते गड सांभाळण्याचे सोडून मराठ्यांना इतर प्रतिकार करायला किल्यांच्या बाहेर पडलेच नाहीत. महाराजांनी आजूबाजूच्या शहरांतील धनाढ्य सावकार व्यापार्यांना २ लाख होनांचे कर्ज देखिल मागवले होते पण ते घाबरुन जंगलात परागंदा झाले. मद्रास, पुलकित भागातुन ५ हजार होनांची व्यवस्था झाली. मराठ्यांनी इंग्रजांची टिमेरी येथील वखार लुटून अजून २ हजार होनांचा माल लुटला. वेल्लोरच्या मुक्कामात आजुबाजुच्या संस्थानिकांनी महाराजांकडे आपापले वकील पाठवले. फ्रेंचांनी देखिल आपला वकिल पाठवला. फ्रेंचांनी शेरखान लोदिला वालदूरचा किल्ला जिंकून दिला होता. महाराजांनी त्याबाबत नाराजी दाखवून आता त्याच्या विरोधात मदत मागितली. मात्र फ्रेंच याकरीता तयार झाले नाहीत. मात्र प्रत्यक्ष युद्धाखेरीज काही मदत लागली तर ती करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आता शेरखानला एकटा पाडल्यावरती त्याची शिकार करणे सोपे झाले. तो आपल्या सासर्याकडे तिरुवाडिच्या किल्यात आश्रयासाठी गेला होता. त्याचे ३ हजार घोडदळ व ४ हजार पायदळ त्याच्या बरोबर होते. मात्र तो स्वत: कसलेला लढवैय्या नव्हता. त्याच्या मुत्सद्यांना त्या सैन्याचा फाजिल आत्मविश्वास होता. वरुन विजापूर्वरुन मदत येईल अशी वेडि आशा त्यांना होती. पण महाराज तडकाफडकि तिरुवाडिजवळ येऊन ठाकले. जवळिल काहि सैन्याला त्यांनी मराठ्यांवरती पिटाळले. मात्र मराठ्यांनी स्वस्थता धारण केली. गोंधळून जाऊन आपले काहितरी चुकले आहे असे वाटून शेरखानने सैन्य उलटे बोलावले. सैन्य माघारी वळाले आहे याचा अंदाज येताच मराठी सैन्याची फळी वेगाने त्यांवरती चालून गेली. मग काय? त्यांच्या पळापळिला धरबंधच उरला नाही. स्वत: शेरखान लोदी अकलनायकाच्या अरण्यात शिरला. मागे प्रतिकारासाठी त्याने ५०० पठाण ठेवले होते. मात्र २-३ तासांतच तो प्रतिकार मोडून मराठे त्याच्या मागावर गेले. काहि हत्ती - उंट व आपले घोडदळ घेऊन शेरखान भुवनगिरीकडे निसटला. मराठ्यांनी निकराचा पाठलाग करुन त्याचे २७० घोडे, २० उंट, शेकड्यानी बैल, अनेक तंबू, काही नगारे पकडले. महाराज यावेळी तेवनापट्टम जवळ होते कारण तिरुवाडिचा किल्ला शेरखानच्या सासर्याने झुंजता ठेवल्याने त्याकडेही लक्ष देणे भाग होते. महाराजांची दुसरी तुकडी शेरखानवरी चालून गेली तिने २०० घोडे व ४ हत्ती पकडून आणले. आता शेरखान आपल्या १००-१२५ स्वारांनिशी भुवनगिरीपट्टणमच्या किल्यात निसटून गेला. आता शेरखानचे खरे नाही हे बघताच वालदूर, तेगनापट्टण वगैरे किल्यातून पठाणी सैन्य शरण आले अथवा सरळ सरळ पळून गेले. जुलैच्या १६७७ च्या पहिल्या आठवड्यात महाराजांच्या उपस्थितीतच मराठी सैन्याने भुवनगिरीपट्टन वरती जोरदार हल्ला चढवला. अखेर शेरखान लोदिने गुडघे टेकले. त्याने किल्ला तर ताब्यात दिलाच वरुन २० हजार होनांची खंडणी द्याचे कबूल केले. त्यावेळी पैसे नसल्याने त्याने आपल्या मुलाला ओलिस ठेवले. महाराजांनी शेरखानची सन्मानपुर्वक भेट घेतली. तह झाल्यावर एखाद्या सामान्य स्वाराप्रमाणे तो केवळ २० घोडेस्वारांनीशी अरीयलूरच्या झंगलात निघून गेला. तब्बल सहा महिन्यांनी त्याने आपल्या हिंदू मित्रांकडून पैसा गोळा करुन ती खंडणी भरली व आपल्या मुलाची सूटका केली. मग शेरखान आपल्या मुलासह आश्रयासाठी मदुरेच्या नायकाकडे निघून गेला. बहलोलखानाचा दख्खनमधला सर्वात मोठा साथीदार महाराजांनी असा कायमचा गपगार करुन टाकला.
महाराज आता व्यंकोजीराजांकडे वळले. वास्तविक कर्नाटकात आल्यापासून महाराजांनी त्यांना अनेक खलिते पाठवून भेटण्याची इच्छा प्रकट केली होती. मात्र व्यंकोजीराजांनी टाळाटाळ केली. आता कायमचा सोक्षमोक्ष लावण्याच्या विचाराने महाराज स्वत: तंजावरच्या दिशेने निघाले. त्यांनी तिरुमळ्ळपाडि जवळील कोल्लिडमच्या पात्राजवळ छावणी केली. व व्यंकोजींना निरोप पाठवला "राजश्री गोविंदभट गोसावी, राजश्री काकाजीपंत, राजश्री निळोबा नाईक व रंगोबा नाईक व तिमाजी यक्षियारराऊ असे भले लोक आम्हांपासी पाठवणे." नाईलाजाने व्यंकोजीराजांनी त्यांना पाठवले. महाराजांनी इतके वर्ष सामंजस्य दाखवल्याने व्यंकोजीराजांनी जी वडिलोपार्जित जहागिरी व संप्पत्ती उपभोगली होती त्याबाबत ’बहुत रीती घरोबियाचा व्यवहार सांगुन’ आपला हक्क असलेला अर्धा वाटा द्यावा अशी मागणी शिवरायांनी केली. मात्र अनेक दिवस व्यंकोजींनी त्यावर प्रतिक्रियाच दिली नाही.मात्र मुत्सद्दि फारच मागे लागले तेव्हा ’आम्ही वडिलाचे दर्शनाला येतो’ असा निरोप त्यांनी महाराजांना पाठवला. महाराज आनंदले. अभयाची खात्री देऊन त्यांना निमंत्रण धाडले.
२ हजार स्वारांसकट ते निघाले. सोबत काकाजीपंत पेशवे, जगन्नथपंतलु, शिवाजीपंतलु कोन्हेर, महदेव मुजुमदार हे होते. खेरीज शहाजीराजांच्या नाटकशाळेचे २ पुत्र प्रतापजीराजे व भिवजीराजे हे देखिल होते. महाराजांचे अजून एक सावत्रबंधू संताजीराजे हे महाराजांना कदाचित आधीच येऊन मिळाले होते. त्यांना महाराजांनी हजार स्वारांची सरदारकी दिली. स्वत:चे वडिलपण विसरुन महाराज स्वत: त्यांना तिरुपन्नृती गावापर्यंत सामोरे गेले. तेथिल पुष्पवनेष्वरच्या मंदिरात दोघा बंधुंची भेट झाली. व तेथुन मोठ्या सन्मानामे महाराजांनी त्यांना तिरुमळ्ळपाडिच्या छावणीवरती नेले. येथे व्यंकोजीराजे ८ दिवस मुक्काम करुन होते. त्यांछ्यात अनेक बैठकी झाल्या महाराजांचे म्हणणे होते - "तुम्ही आम्ही प्रत्यक्ष बंधु. आज तेरा वर्षे जाली, महाराजांनी कैलासवास केला. सर्व दौलतीचा अनुभव घेतलात. वडिलांचे संपादिल्या अर्थाचे उभयतांही विभागी. तुम्हीच आम्हांस काहिच न कळविता आपले विचारानी वहिवाट केली. तुमची संपादिली दौलतीत आम्ही विभाग मागतो असा अर्थ नाही.तुम्हास ईश्वरने सामर्थ्य द्यावे, नवीन संपादावे, परंतु वडिलांचे जोडीचे अर्थास आमए विचाराशिवाय करणे चालणे तुम्हास विहीत नाही. काय दौलत आहे त्याचे कागदपत्र समजावावे. तुम्ही आम्ही समजोन चालू. तुम्हांस जड पडेल तिथे आम्ही मदत देऊ. जोणेविशी मनात खतरा ठेवू नये." मात्र व्यंकोजी काहि बधत नव्हते. त्यांना विजापूरकरांची बांधिलकि सोडवत नव्हती. व या दुसरा अर्थ स्वराज्य विस्ताराला आपल्याच माणसाचा विरोध असा होता. वरुन महाराजांच्या हक्काच्या वाट्यावरती इतकी वर्षे उअपभोग घेऊन त्यापुढेही त्याच वाट्याच्या मदतीने स्वराज्याला अपाय होऊ शकत होता. महाराजांनी दूरदर्शीपणाने हे ताळायचे ठरवले होते. पण बोलण्यातून गुंता काही सुटत नव्हता. महाराज चिडून भर बैठकीतून उठून गेले.
२३ जुलैच्या रात्री बहुदा महाराजांच्या कोपाच्या भीतीने कदाचित जगन्नाथपंतांच्या सल्यावरुन वुंकोजीराजे कोल्लिडम नदी ओलांडून गुपचूप तंजावरकडे निसटले. महाराजांना फार वाईट वाटले. मागे राहिलेल्यांपैकि एकट्या जगन्नाथ पंतांना अटक केली व बाकिच्यांना सन्मानाने परत पाठवले. पण फार दु:खाने महाराज उद्गारले - "काय निमित्त पळाले? आम्ही त्यास धरीत होतो की काय? ... उगेच उठून पळोन गेले. अती धाकटे ते धाकटे. बुद्धिही धाकटेपणायोग्य केली." तरीही महाराजांनी अखेरचा निरोप पाठवून बघितला. मात्र व्यंकोजीराजांनी संघर्षाचा पवित्रा घेतला. मग मात्र महाराजांनी आपले सैन्य व्यंकोजींच्या हद्दित घुसवले. त्यांनी जनदेवगड, चिदंबरम, वृद्धाचलम वगैरे भाग जिंकला.
याच दरम्यान रघुनाथपंत हणमंते रायगडवरुन ४०० घोडेस्वारांसह महाराजांना भेटायला आले. महाराजांनी सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले. दुसर्या दिवशी त्यांना महाराजांनी मदुरेच्या संस्थानिकांकडे पाठवले. त्यांनी ६ लक्ष होनांचा तह करुन पैकि दिड लक्ष होन ताबडतोब भरायला सांगितले. याच मुक्कामात दोन फ्रेंच वकिल महाराजांना येऊन भेटले. व पांदेचेरीबाबत त्यांनी अभय मागितले. महाराजांनी तिथल्या नेमल्या हवालदाराला तश्या सूचना देणारे फर्मान पाठवले. तिरुमळ्ळवाडीवरुन महाराज २४ जुलैला वलिगंडापुअरम येथे आले. इथला भुईकोट जिंकून तो यशवंतराव शहाजी कदम ह्याच्या ताब्यात दिला. ३० जुलैला उटळूराचा कोट मराठ्यांनी जिंकला. २ ऑगस्ट रोजी एलवनसूरच्या किल्ला मराठ्यांनी जिंकला. तुंदुमगुर्तीच्या मुक्कामात तेवेनापट्टमचे डच महाराजांना भेटायला आले. त्यांनी महाराजांना रेशीम कापड, चंदन, गुलाबपाणी, मालदिवी नारळ, लवंगा, तलवारीची पाती महाराजांना भेट दिली. या कालापर्यंत महाराजांनी विजापूरकरांचा पाईनघाटाचा सर्व मुलुख व व्यंकोजीराजांच्या ताब्यातील कावेरीच्यावरचा जहागिरीचा मुलुख जिंकला. जवळपास दहा हजार चौरस मैलांचा सुपिक प्रदेश स्वराज्याला जोडला. कर्नाटाकात खोलवर मराठी भाला घुसला. महाराजांनी अगदि श्रीरंगपट्टणही लुटले. पुढले दोन महिने या सर्व प्रदेशाची महाराजांनी जातीने व्यवस्था लावली. खजिना वाडःअवला. डच, फ्रेंच, इंग्रजांची राजकिय व भौगोलिक नाकाबंदि केली. मराठ्यांच्या परवानगीवाचून त्यांना आता त्या प्रदेशातून कुठल्याही कारणाने प्रवास करता येणार नव्हता. निरुपयोगी असलेल्या गढ्या व किल्ले महाराजांनीच पाडले व तिथला दारुगोळा, तोफा जिंजीस पाठवल्या. जिंजीवरती महाराजांनी खूप मेहनत घेऊन गड झुंझता केला. जिंजीचे महत्व सांगताना सभासद लिहितो - "चंदि म्हणजे जैसे विजापूर, भागानगर, तैसाच तख्ताचा जागा. येथे राजियांनी रहावे परंतु इकडेही राज्य उदंड!" मात्र पुढे राजाराममहाराजांनी नऊ वर्षे याच जिंजीच्या आश्रयाने काढली हे बघता महाराजांचे द्रष्ट्रेपण सहज दिसून येते.
२२ सप्टेंबर रोजी महाराजांनी तोफांचे गाडे तयार करणार्या व सुरुंग लावूण दगडी भिंती उडवणार्या कुशल लोकांची मागणी केली. पण याने शिवाजीचे हात बळकट होतील, शिवाय कुत्बशहा, मुघल यांचे वैर पत्करावे लागेल हे ओळखून इंग्रजांनी आमच्याकडे अशी माणसेच नाहित असे सांगुन हात झटकले. मात्र महाराजांनी जातीने लक्ष घालून जिंजीच्या किल्याची मजबुती करुन घेतली. रघुनाथपंत हणमंते यांना चंदिचा साहेबसुभा सांभाळण्याची जबाबदारी सोपवली. एक लाख होन बक्षीस दिले. व तात्पुरती फौज असावी म्हणून सरनौबत हंबीरराव मोहीते व संताजी भोसले यांचे सैन्य जिंजीस ठेवले.
दुसरीकडे मुघल - विजापूरकर - कुत्बशहा यांच्यात कलगीतुरा रंगु लागला होता. त्याचे झाले असे की बहादूरखानाने पठाणीपक्षासमोर नमते घेतले हे त्याला आवडले नाही. बादशहाची नाराजी दूर व्हावी म्हणून बहादूरखानाने १४ मे १६७७ रोजी नळदुर्ग, आणि ७ जुलै १६७७ रोजी गुलबर्ग्याचा किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतले पण औरंगजेब चिडण्याचे दुसरे कारण कुत्बशहा-मराठे यांच्या मैत्रीकडे बहादूरखानाने केले दुर्लक्ष. त्यासाठी कुत्बशहाला धडा शिकवावा आणि शिवाजीला आपल्या मुलुखातून जाऊ दिले म्हणून त्यांच्याकदून १ कोटी खंडणी आणि तब्बल दहा हजार घोडे मिळवावेत असा आदेश त्याने बहादूरखानाला दिला. मग बहादूरखानाने आगाऊपणे कुत्बशहाला २ कोट खंडणी व २० हजार घोडे मागितले. कुत्बशहाने केवळ ५ लाखांची खंडणी देण्याची तयारी दाखवली. युध्द होणार अशी चिन्हे दिसू लागली. हा तोच कालखंड जेव्हा जिंजीच्या किल्याला महाराजांनी जिंकले होते व त्यानंतर कुत्बशहाने आपले ५ हजारांचे सैन्य व तोफखाना परत मागवून घेतला होता. त्याला हेच कारण असू शकते. बहादूरखानाने विजापूरशी म्हणजेच बहलोलखान पठाणाशी संधान बांधले. मुघलांना पुढली ८ वर्ष खंडणी देऊ नये मात्र त्या बदल्यात मुघलांसोबत कुत्बशहावरती चालून जावे व त्यानंतर शिवाजीवरती चालून जावे असा करार उभयपक्षी झाला म्हणजे चक्र आता पूर्ण फिरुन जैसे थे राजकिय परीस्थीतीवरती आले होते. मात्र मळखेड येथे १५ सप्टेंबर १६७७ रोजी कुत्बशहाने या संयुक्त फौजेचा पराभव केला. या पराभवाचे कारण बहादूरखानाचे आधीचे पठाणी पक्षाबाबतचे कटू मत आणि दक्षीणी मुसलमानांबाबतचा ओढा हे होते.
सगळ्या घटना महाराज सावधपणे बघत होते. आता महाराष्ट्रात परतायला हवे हे त्यांनी ताडले. आपल्या हालचालींचा सुगावा लागू न देता महाराज ऑक्टोबर १६७७ च्या शेवटी रायगडकडे निघाले. महाराजांची पाठ फिरताच इतके दिवस दबून राहिलेल्या व्यंकोजींनी उसळी घेतली. कितीही नाही म्हंटले तरी महाराजांनी त्यांचा मुलुख जिंकला होता. तो परत मिळवण्यासाठी त्यांनी ४ हजार स्वार व ६ हजार पायदळ घेऊन हंबीरराव व संताजी भोसले यांच्या ६ हजार स्वार व ६ हजार पायदळावरती हल्ला करण्यासाठी निघाले. मात्र दोन्ही सैन्य काही दिवस एकमेकांच्या समोर तळ देऊन युद्ध होत नव्हते. मात्र १६ नोव्हेंबर १६७७ मध्ये तोंड लागले. महाराजांच्या सैन्याला माघार घ्यावी लागली. मात्र या माघारीची बोच हंबीररावांना लागली. त्याच रात्री त्यांनी अनेक दिशांनी व्यंकोजीराजांच्या छावणीवरती हल्ला करुन ३ सेनापती कैद केले, हजारभर घोडे, शेकडो तंबू हस्तगत केले. व्यंकोजींचे सैन्य पळून गेले. या लढाईचे वृत्त महाराजांना समजले तेव्हा ते परतीच्या वातेवरती तोरगळ प्रांती होते. त्यांनी एक समजावणीचे पण खरडपट्टी देखिल काढणारे पत्र व्यंकोजीराजांना पाठवले. पण त्याने व्यंकोजीराजांना शहाणपण आले नाही. मग मात्र महाराजांनी त्यांचा मुलुख जिंकायचे आदेश आपल्या सैन्याला दिला. अर्णी, बंगरुळ, कोल्हार, शिराळकोट असे व्यंकोजींचे मुलुख महाराजांनी जिंकले. अखेर व्यंकोजींच्या पत्नी दीपाबाईसाहेब यांनी व्यंकोजीराजांची समजूत घातली व रघुनाथपंतांना मध्यस्थ बनवून महाराजांशी तह करायला लावला. कोल्हार प्रांत महाराजांना दिला. महाराजांनीही मग जिंकलेले बंगरुळ, होस्कोट वगैरे प्रांत व पाच लाख उत्पन्नाचे तीन महाल दीपाबाईसाहेबांना अतीव आदरपूर्वक चोळीबांगडीसाठी दिले. व सात लाख होनांचा प्रदेश व्यंकोजीराजांना दूधभातासाठी दिला.
पण पराभवाचा सल व्यंकोजींना लागून राहिला. त्यांनी विरक्ती स्वीकारली. हे कळताच महाराजांनी त्यांना उत्साह देणारे पत्र पाठवले. "आम्ही तुम्हास वडील मस्तकी असता चिंता कोणे गोष्टीची आहे? ..... तुम्ही त्या प्रांते पुरुषार्थ करून संतोषरुप असलिया आम्हास समाधान व श्लाघ्य आहे की, कनिष्ठ बंधू ऐसे पुरुषार्थी आहेती .... पुरुषार्थ व किर्ती अर्जणे ... वैराग्य उत्तरवयी कराल तेवढे थोडे. आज उद्योग करुन आम्हासही तमासे दाखविणे."
इथे एक खूप महत्वाची गोष्ट सांगाविशी वाटते आहे - जिंजीवरुन परत येताना तिरुवन्नमलाई या ठिकाणी आले. तेथिल अरुणाचलेश्वर शिवमंदिर व समोत्तिरपेरुमल देवालय ही दोन्हीहि मंदिरे भ्रष्ट करुन तिथे मशिदी उभारल्या होत्या.
महाराजांनी त्या मशिदी पाडून पुन्हा त्या ठिकाणी शिवलिंगांची पुन: प्राणप्रतिष्ठा केली. त्या मंदिरांच्या मंडपासमोर महाराजांनी एक गोपूर बांधले. तसेच या मंदिराच्या पिछाडिवर असलेल्या टेकडीवरती दर त्रिपुरी पौर्णिमेला तुपाचा भव्य नंदादीप लावण्याची प्रथा अनेकवर्षे बंद पडली होती ती सुरु केल्याचेही सांगितले जाते. ती आजही कायम आहे.
तिथुन महाराज म्हैसूरच्या पुर्व भागात आले. त्यांच्या भयाने अनेक विजापूरी सरदार त्या भागातले किल्ले सोडून पळून गेल्याचे इंग्रजांनी नमूद केले आहे. छोट्या-मोठ्या पुंडाव्यांचा बिमोड करत कोल्हार, बाळापुर, कोप्पळ मार्गाने नोव्हेंबर १७६६ च्या पहिल्या पंधरवड्यात गदग प्रांतात आले. दक्षीणेतील अस्थिर परीस्थीती बघून कर्नाटक प्रांतापासून पन्हाळ्यापर्यंतच्या मुलुखावरती नियंत्रण आणण्याचा त्यांनी प्रयत्न सुरु केला. मात्र त्या भागात पठाणांचे प्राबल्य होते, खूप सैन्य नसल्याने प्रदेशाची सामरिक बाजू भक्कम करता आली नसली तरी आपले लष्करी डाक कर्नाटकात येत-जात राहिल याची सोय नक्कीच केली.
महाराजांना परतीच्या प्रवासात एकाच ठिकाणी कडवा प्रतिकार झाला. बेलवडी या ठिकाणी. तिथल्या गढीवरती दादाजी रघूनाथाने हल्ला केला. मात्र बेलवाडिच्या ठाणेदाराने कडवा प्रतिकार केला. तब्बल २ महिने त्याने हि गढी लढवली. तो मारला गेल्यावरती त्याच्या पत्नीने सावित्रीबाई किंवा मलवाई देसाई हिने त्यानंतरही एक महिना हा लढा सुरु ठेवला. अगदि मराठ्यांचे अनेक बैल पळवून नेले. अखेर मराठ्यांच्या रेट्यापुढे नाईलाजाने तिला शरण यावे लागले. मात्र ती आपल्या मुलाच्या रक्षणासाठी हे करत होती हे लक्षात आल्यावरती तिला महाराजांनी अभय देऊन आदरपूर्वक गढीचा ताबा परत तिलाच दिला.
महाराज तोरगळ प्रांतात असताना दक्षीणेच्या राजकारणाने मोठी कूस बदलली. औरंगजेबाने बहादूरखानाकडून कुत्बशहाचा व शिवाजीचा ब्म्दोबस्त हो नाहीये हे जाणून त्याला परत बोलावले व सगळी सूत्रे दिलेरखान पठाणाकडे दिली. त्याने बहलोलखानाशी हातमिळवणी केली. कुत्बशहाने मग त्याला काटशह देत विजापुर दरबारातील दिलेरखानाच्या विरोधातील लोकांना फितवले. सिद्दी मसाऊद त्यातील एक मोठे नाव होते. सतत युध्दरत राहून बहलोलखानाचा पक्ष दुर्बळ झाला होता. कुत्बशहाचा पाठिंबा असलेल्या सिद्दी मसाऊदला जिंकणे सोपे नाहि हे त्याने जाणले. आपला वकिल त्याने भागानगरला पाठवला. झालेल्या तहात असे ठरले की बहलोलखान आपली पठाणी फौज बरखास्त करेल व त्या बदल्यात सिद्दी मसाऊद त्याला सहा लक्ष होण देईल. शिवाय विजापूरचा किल्ला देखिल सिद्दी मसाऊदच्या ताब्यात देण्यात येईल असे ठरले. करार नक्की झाला. मुघलांकडून देखिल दिलेरखानाने या तहाला मान्यता दिली. मात्र त्याने सर्वांनी मिळून शिवाजीशी लढावे असे कलम घुसवले. या घटनां दरम्यान मोरोपंत नाशिक व इतर मुघली मुलखावरती चालून गेल्याने दिलेरखान बहुदा पेडगावला परतला. तिथून जव्हारला मोरोपंतांना अडवायला धावून गेला. पण मोरोपंत आधीच मोठी लुट घेऊन निसटले होते.
करारानुसार विजापूर घेण्यासाठी सिद्दी मसाऊदने हालचाली सूरु केल्या. पण हिरापूर येथे बहलोलखान पठाणाने २३ डिसेंबर १६७७ मध्ये अखेरचा श्वास घेतला. लगोलग बहलोलचा हस्तक जमशिदखान पठाण याने विजापूरवरती आपला जम बसवला. व मसाऊदला निरोप पाठवला की सहा लक्ष होन मिळाले तरच कुठलाही प्रतिकार न करता विजापूरचा किल्ला ताब्यात देईन. सिद्दी मसाउदकडे इतका पैसा नव्हता, कुत्बशहाने जमशिदखानावरती अविश्वास दाखवून पैश्यांची मदत करण्यास नकार दिला. लढाई करणे परवडणारे नव्हते. मसाऊद गुपचूप बसला. इकडे विजापूरात पगार हवाय म्हणून पठाण जमशिदखानाचा जीव खाऊ लागले. तो सहा लक्ष होनांवरती विसंबून होता. विचित्र कोंडि महाराजांनी हेरली. जमशिदखानाने आता महाराजांशी बोलणे सुरु केले. महाराजांनी स्वत: सहा लक्ष होन देण्याचे कबूल केले व ते त्वरीत विजापूरकडे निघाले. हि बातमी समजताच सिद्दी मसाऊदच्या पोटात खड्डा पडला. त्यानेही विजापुरकडे धाव घेतली. पण लढून विजापुर काबीज होणार नाहि हे त्याने ओळखले. मग त्याने एक कपटनीती वापरायची ठरवली. त्याने स्वत:च्या मृत्यूची हूल उठवली. व आपल्या हाता खालचे ४ हजार सैनिक जमशिद खानाकडे नोकरीची मागणी करण्यासाठी पाठवले. आमचा नेता मेला, आम्हाला रोजीरोटी द्या म्हणून ते जमशिदखान पठाणाकडे गेले. आता जमशिदखान महाराज सहा लक्ष होन देणार या भरवश्यावरती होता. त्याने हे नवे सैन्य देखिल विजापूरात दाखल करुन घेतले. मात्र दोन दिवसांत योग्य संधी हेरुन त्यांनी जमशिदखानाला अटक केली. विजापुरचे दरवाजे सिद्दी मसाऊदला उघडे झाले. जिवंत मसाऊद विजापुरात शिरला. हि बातमी कळताच आता पुढे जाण्यात हशील नाही हे ओळखून महाराज पन्हाळ्यावरती परतले. विजापूर जिंकून दक्षीणेत दुपटिने प्रबळ होण्याची नामी संधी मात्र गेली.
यानंतरच्या राजकारणात व घरच्या कलहात महाराज इतके अडकले की त्यानंतर कर्नाटक भागात त्यांना जातीने पुन्हा जाता आले नाही. व पुढे ३ वर्षातच त्यांचे निर्वाण झाले. मात्र महाराजांच्या या दक्षीण दिग्विजयाने महाराजांनी स्वराज्याहून दुप्पट मोठा व सुपिक प्रदेश सव्वावर्षात आपल्या ताब्यात आणला. मुघलांचे आक्रमण झाल्यास "बफर" तयार करुन घेतले. दख्खनमधले पठाणांचे वर्चस्व जवळपास मोडीत काढले. एक सार्वभौम राजा म्हणून कुत्बशहाकडून मान्यता मिळवून घेतली. वरुन सुरुवातीच्या आपल्या स्वारीचा खर्च त्यांनी मोठ्या हुशारीने तहाआडून कुत्बशहाकडूनच वसूल केला. पश्चिम किनारपट्टिप्रमाणेच पूर्व किनारपट्टिचा बराच भाग प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष आपल्या ताब्यात आणला. अर्थात तिथून येणार्या मालावरती मराठ्यांना कर मिळत असे. शिवाय आता पश्चिम किनारपट्टिप्रमाणेच पूर्व किनारपट्टिवरती जे जातीवंत अरबी घोडे उतरत त्यांना स्वत:च्या ताब्यात आणून कुत्बशहा - विजापूरची घोड्यांची रसद नियंत्रणात आणली. त्या भागात इंग्रजांना शरण आणून आपल्या परवानगी शिवाय कुठलीही व्यापारी हालचाल करायला बंदि आणली.
महाराजांच्या सर्वात दिर्घ व सर्वात यशस्वी मोहिमेला आपण आजवर जवळपास दुर्लक्षित केले. महाराजांच्या इतर मोहिमा व त्यांचा राज्याभिषेक या घटनाच इतक्या रोमहर्षक आहेत त्यामुळेही असेल कदाचित पण दुर्लक्ष झाले हे खरे. तीच चूक निस्तरायचा हा त्रोटक प्रयत्न.
- सौरभ वैशंपायन.
======
संदर्भ,
१) शककर्ते शिवराय - श्री विजयराव देशमुख
२) महाराजांच्या मुलुखात - श्री विजयराव देशमुख
३) राजा शिवछत्रपती - श्री बाबासाहेब पुरंदरे
४) जनसेवा समिती, विलेपार्ले यांच्या दक्षीण दिग्विजयावरील अभ्यासवर्गातील श्री पांडूरंग बलकवडे, श्री चंद्र शेखर नेने व श्री महेश तेंडुलकर यांची व्याख्याने.
५) http://www.marathaempire.in