
सूर्यग्रहणाआधी जसे सूर्याला त्याचे वेध लागतात तसेच वेध गेल्या दोन दिवसांपासून सामान्य मुंबईकरांपासून ते मिडियापर्यंत सगळ्यांना लागले होते. निमित्त होते २६/११ च्या वर्षपूर्तीचे. मी ठरवलं होतं यावर नाहि लिहायचं. कारण हर तर्हेने हा विषय गेली वर्षभर चर्चिला गेला आहे. पण मनातली अस्वस्थता अखेर आता इथे कागदावर बाहेर पडतेच आहे. का?? माहित नाहि! पण त्या घटनेशी प्रत्येक मुंबईकराचं नात जडलय. आणि हे नातं म्हणजे नुसते भावनांचे बळे बळे काढलेले कढ नव्हेत किंवा कुणाला दाखवण्यासाठी छाती पिटुन काढलेले हेलहि नव्हेत. २६/११ ला आतुन हादरलेला मुंबईकर आत्ताशी कुठे सावरतोय. दबकत बिचकत ट्रेन मध्ये चढताना, सीएसटि, ताज इथे उभं राहताना परत परत ती खपली निघतेय. मुंबई स्पीरीट - वर्क स्पीरीट नावाच्या कुबड्यांवर मुंबई उभी राहते आहे. आणि अशीच अनंतकाल त्या कुबड्यांवर उभी राहिल. “मजबुरी का नाम मुंबई स्पीरीट!” काहिंना हे पटेल तर कोणाला अजीर्ण होईल, पण हि वस्तुस्थिती आहे. पण मजबुरी म्हणुन का होईना त्याच वर्क स्पीरीटसाठी मोठ्या मनानं टाळ्या वाजवाव्यात म्हणून नाहि नाहि म्हणताना लिहितोय.
आज सकाळी जाग आली तीच सकाळच्या टि व्ही वरील बातम्यांनी. त्यातली पत्रकार अखंड बडबडत होती मध्येच ती म्हणाली बरोबर एका वर्षापूर्वी याच ताजवर अनपेक्षीत दहशतवादि हल्ला झाला. डोक्यात सणकच गेली. अनपेक्षीत??? RAW आणि सरकारी यंत्रणांना धडधडित संदेश मिळाला होता मुंबईवर समुद्रमार्गे हल्ला होऊ शकतो. आणि म्हणे अनपेक्षीत हल्ला. खरी प्रश्नांची सुरुवात इथुन होते. त्या संदेशाचं काय केलत?? हा प्रश्न स्ट्रायकर सारख्या दुसर्या प्रश्नावर आदळतो आणि बघता बघता हजारो प्रश्न डोक्यात विखुरतात.
या ठिकाणी हल्ला कसा झाला? कोणी केला? सरकार किती छान झोपलं होत? याची चर्चा करण्यात हशील नाहि. ते सगळ्यांना माहित आहे. कौतुकाची गोष्टि अशी आहेत कि आमचं साहित्यच काम करत नव्हतं. आमच्या पोलिसांकडे असलेल्या बंदुकिंनी आपण शेवटची गोळी कधी ओकलो होतो हे आठवायचा प्रयत्न केला तर तीला आठवेच ना!!! आणि आमची “बुलेटप्रुफ जॅकेट्स?” बेसिकली ती फक्त जॅकेट्स होती कारण त्यात बुलेट थांबल्याच नाहित. किंवा असतील असतील जॅकेट बुलेटप्रुफच असतील पण कसाब आणि कंपनीच्या गोळ्यांमध्येच डिफेक्ट असेल. कुठल्या कंपनीच्या गोळ्या वापरता तेहि विचारा त्याला चौकशीत.
करकरेंनी सारखी मदत मागुन देखिल कामा हॉस्पिटलकडे मदत का पाठवली नाहि?? कि पोलिस दलाचा शिरस्ता आहे कि सहकार्यांनी मदत मागितली तर शपथेवर ती मिळु द्यायची नाहि?? कारण दोन महिन्यांपूर्वी गडचिरोलित जे १६ पोलिस शहिद झाले त्यांनी सुध्दा लवकरात लवकर हॅलिकॉप्टरची मदत पाठवा असे वायरलेस वरुन सांगितले होते, मदत येते आहे हे ते किमान चार तास “ऐकत” होते. केवळ दारुगोळा संपला म्हणुन नक्षलवाद्यांनी त्या बहाद्दरांना कुत्र्याच्या मौतीने मारले. याउलट आमच्या माननिय नेत्यांना निवडणूकिच्या प्रचाराला कशी भराभर हॅलिकॉप्टर्स मिळतात हे बहुदा E=mc² पेक्षा कठिण समिकरण आहे. पुढचे प्रश्न कामटेंना कामा हॉस्पिटलपाशी कोणी जायला सांगितले? आमचे तीन मोठ्या पदावरील अधिकारी एकाच गाडित का बसले? अलम दुनियेला आग लागली तरी प्रोटोकॉल मध्ये न बसणारी गोष्ट करायची नाहि असे स्पष्ट आदेश त्यांना ट्रेनिंगमध्ये असताना हि चूक त्यांच्याकडुन का घडली? ते जबर जखमी आहेत हे कळल्यावर सुध्दा अर्धातास त्यांच्याकडे कोणीच का फिरकले नाहि? कंट्रोलरुमला करकरेंनी किमान ६ - ७ संदेश पाठवुन देखिल “करकरे कुठे होते हे मला माहित नव्हते!” असे राकेश मारीया कसे म्हणू शकतात? करकरेंचं सो कॉल्ड बुलेटप्रुफजॅकेट कसं गायब झाल? हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत त्यांच्याच स्ट्रेचरवर होतं म्हणे. मज पामराच्या डोक्यापलिकडचे प्रश्न आहेत.
या सर्व हल्ल्यात सर्वात महत्वाची बाब “नरीमन हाऊस” ज्या गोष्टिकडे सगळ्यांच सर्वात जास्त दुर्लक्ष झालं ते ठिकाण. इथे इस्त्रायली किंवा ज्यू लोकं राहतात, हे २७ तारखेपर्यंत आजुबाजुच्या इमारतीमधील लोकांनाहि महित नव्हते ते ठिकाण अतिरेक्यांनी किती अचूक टिपले हे पाहता ताज-सीएसटी-ट्रायडंट हे खरंतर फक्त “स्क्रीन सेव्हर” असावेत आणि मेन डेस्क्टॉप वेगळाच असावा हे समजतं. कॅफे लिओपोल्ड देखिल केवळ गोरी चमडि मारायची आणि मुंबई परदेशींसाठी असुरक्षित आहे हे जगाला दाखवायचं त्याने भारताच्या आर्थिक राजधानीला “डॉलर्स” मध्ये फटका बसला पाहिजे यासाठी निवडलं. बाकि ताज- ट्रायडेंट हे उच्चभ्रू तर सीएसटी आम जनतेला सैरभैर करण्यासाठी वापरलं. नरीमन हाऊस एकदा उडवलं कि आपोआप इस्त्राइल – भारत यांच्यात कटुता निर्माण होणारच हे ते ओळखुन होते. आतातर हेडली प्रकरणामुळे ज्यूंची भारतातील वसतीगृहे वा धर्मस्थळे हि “मोसादच्या” कारवायांची ठिकाणे असु शकतात हे ठरवुन त्यांवर निशाणा साधुन ते इस्त्राइलला धमकवण्याची नवी पध्दत सुरु करत आहेत.
बाकि काहिहि म्हणा, या अतिरेक्यांना आपण एखादे “मॅनेजमेंट” कॉलेज काढुन दिले पाहिजे. ज्या मास्टर माईंड ने हा कट रचला त्याला केवळ यासाठी धन्यवाद दिले पाहिजेत कि “बाबा आमच्या व्यवस्थेत किती भगदाडे आहेत हे दाखवलस हे उपकारच होय!” या घटनेनी गल्लीपासुन ते दिल्लीपर्यंत भल्याभल्यांच्या बुडाखालच्या खुर्च्या हिसकावुन घेतल्या. लोकांनी सगळं ऑपरेशन संपल्यावर पुढचे काहि दिवस “we want CEO not CM!” असे फलक झळकावले. लाखो रुपयांच्या मेणबत्या जाळल्या, ढिगाने गुलाबांची निर्माल्ये झाली, हे सगळं बेगडि होतं असं मी मुळीच म्हणणार नाहि उलट ती त्यावेळची स्वाभाविक प्रतिक्रियाच होती आणि ती बरोबरहि होती. पण आपला ताणून झोप काढायचा दिवस दर पाच वर्षांनी एकदा येतो. आपला CEO कोण व्हावा हे आम्हि तेव्हा ठरवत नाहि. मग ५२% झालेल्या मतदानावर आपापसात “मांडवली” करुन ते सत्तेवर बसतात. त्यांना सरकार स्थापन करायला पंधरवडा लागतो याची लाजहि वाटत नाहि. याला कारण आपणच आहोत.
आता प्रत्येकाने आपापली जबाबदारी मान्य करायची वेळ आलीये. अन्यथा शहिद झालेले १६ पोलिस आणि १ उमदा NSG कमांडो यांच बलिदान केवळ फुकट गेलं असच म्हणावं लागेल. त्यावेळि अथवा त्यानंतर समाजाने काय चुका केल्या हे बघितले पाहिजे. सोपे उदाहरण – नरीमन हाऊस! काय घडतय हे दुसर्यांच्या खांद्यावरुन वाकुन वाकुन बघायची सवय त्यादिवशीहि आपण जाहिर केली. तिथे नरीमन हाऊस मध्ये जे काहि सुरु होते तो तमाशा खचित नव्हता, पण गर्दि करायचा काय तो उत्साह? वा?? पोलिसांची कामं हि अशी वाढतात. एखाद्या अतिरेक्याने खिडकितुन एखादि फैर खाली चालवली असती तर गोळ्यांनी ८-१० आणि पळापळित - चेंगराचेंगरीत ८० जण मेले असते. तीच गोष्ट मिडियाची, सबसे तेज च्या नावा खाली कुठली बातमी? कशी द्यायची? काय दाखवायचं? किती दाखवायचं? याचं भानच TRP च्या घाणेरड्या स्पर्धेत मिडियाला राहिलं नव्हतं किंवा रहात नाहि हि १०१% सत्य गोष्ट आहे. कदाचित काहि पोलिस आणि एका NSG कमांडोच्या रक्ताचे डाग मिडियावर कायमचे लागले आहेत भले ते कितीहि नाकारोत. कराचित बसलेले आका जे संदेश देत होते त्यावरुन ते धडधडित समोर आलय.
या सगळ्यात अतिशय कौतुक करावं आणि पाठ थोपटावी असे काम मुंबई अग्निशमन दलाने केले. पोलिस – NSG इतकेच त्यांचे कौतुक करायला हवे जे तितकेसे झाले नाहिये. समोर केवळ मृत्यु तांडव करत असताना कुठल्याहि सुरक्षा साधनांशिवाय ताज आणि ट्रायडेंटला भिडायच हि कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. आणि त्या लोकांनी सलग ७२ तास ते काम यशस्वीपणे करुन दाखवलय. नेहमीप्रमाणेच जीवापेक्षा कर्तव्याला पुढे ठेवणार्या त्या हिरोंची मुंबई कायमची आभारी राहिल.
एका वर्षात सुरक्षेत ज्या सुधारण्या घड्ल्या त्या स्वागतार्ह आहेतच पण त्या पुरेश्या नाहित हेहि खरयं. सीएसटि सारख्या प्रचंड गर्दिच्या ठिकाणी अजुन सुरक्षा ढिलीच आहे. आणि असं किती स्टेशन्सवर सुविधा कश्या पुरवणार हा नविन प्रश्न आहेच. कितीहि उपाय केले तरी तोकडेच ठरतील हे सत्य आहे. नव्याने फोर्स वन हि यंत्रणा स्थापन केलेली असली तरी त्याचा उपयोग व्हायला हवा आणि त्याचा ताण दुसर्यावर पडता कामा नये. हे सगळं यासाठी म्हणतोय कि काल पेपर मध्ये बातमी होती कि एका वर्षात जरुरिच्या शस्त्रांची खरेदि सरकारने केलीच नाहिये. फोर्स वनला AK -47 कमी पडु नयेत म्हणुन क्विक रीसपॉन्स टिम च्या “कॉम्बॅट व्हॅन” वरील AK -47 काढुन घेतल्या आहेत. मग जमेल तेव्हा शस्त्रे खरेदि केल्यावर ह्या रायफल्स परत केल्या जातील. सगळा आनंदि आनंद आहे. म्हणजे न होवो पण उद्या परत असा हल्ला झालाच तर NSG टिम येईतो कॉम्बॅट टिम काय गाडि साईडला लावुन भजन करणार??? आणि कसली क्विक रीस्पॉन्स टिम?? करकरेंनी मदत मागितल्यावर क्विक रीस्पॉन्स मिळालाच नाहि. हि टिम भलत्याच बिल्डिंगच्या छतावर मुक्काम ठोकुन होती कारण त्यांना वरिष्ठांकडुन आदेश मिळाले नव्हते. उद्या फोर्स वनचा असा बोर्या न वाजला म्हणजे मिळवलं.
याखेरीज साध्या साध्या बाबतीत जागरुकता येणे गरजेचे आहे. ट्रेन मध्ये ८ – १० स्टेशन नंतर एखादि बॅग हलली नसेल, व ठेवणारी व्यक्ती कोण हे समजत नसेल तर ती कोणाची आहे हा एक प्रश्न विचारायचा त्रास आपण घ्यायला हवा. पर्यटनाच्या नावाखाली अनेक महत्वाच्या वास्तुंचे फोटो कोणीहि काढतो. महत्वाच्या ठिकाणी फोटो काढण्यास सरकारने बंदि करावी. सरकारी कार्यालयांचे फोटो कोणी घेत असेल अथवा महत्वाच्या वास्तुंच्या पार्श्वभूमीवर कोणी स्वत:चे फोटो काढुन घेत असेल तर पोलिस व सामान्य जनता यांनी त्यांना हटकायला हवे. गुगल मॅप कितीहि प्रगत झाले तरी प्रत्यक्ष इमारतींचे फोटो काढल्या शिवाय अतिरेकि कुठलिहि योजना बनवत नाहित. म्हणून शक्य तिथे या गोष्टि राबवल्या पाहिजेत. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्कालि व्यवस्थापनांचे गट मुंबई अथवा महत्वाच्या शहरांतील प्रत्येक उपनगरांत तयार करवेत. त्यांचा पहिला संपर्क स्थानिक पोलिस ठाण्यांशी होईल अशी व्यवस्था करावी. याने दहशतवादि हल्ला असो वा पाऊस-भूकंप यांसारखे नैसर्गिक संकट याचा फायदा होईलच.
२६/११ जी जखम खूप खोल आहे, नाहि भरणार इतक्यात. भरुहि देऊ नका! असे अपमान धगधगत ठेवायचे असतात. विज्ञान, अध्यात्म, तत्वज्ञान आणि इतिहास हे सगळे एका नियमा बाबत एकमत दर्शवतात – चक्र नेहमी पूर्ण फिरतं. कदाचित हे चक्राच अर्धच आवर्तन असेल, पण गेल्या वर्षभरात खुद्द पाकिस्तानात लाहोर, पेशावर, कराची, इस्लामाबाद इथे जे स्फोट होत आहेत त्यावरुन चक्र त्याचं आवर्तन पुर्ण करायच्या दिशेने जातय. उरल्या आवर्तनात अजुन काय समोर येणार ते नियतीलाच ठाऊक. पण अशी वर्षश्राध्द आणि तर्पण परत न करायला लागोत हिच इच्छा!
- सौरभ वैशंपायन.