Sunday, June 17, 2012

पांढर्‍यावरचे काळे...

मनुष्य आपल्या कर्माने मोठा होतो. अनेकदा त्याचे कार्य हे इतके मोठे असते कि कालपटावरचा त्याचा विस्तार हा मती गुंग करणारा असतो. अशी मती गुंग करणारे कार्य दिसले कि कालांतराने आपसूक त्या भोवती नवनवीन काव्यपिसारे फुलतात, ते चूकहि नसते, मात्र याच कवी कल्पना ह्या इतिहास म्हणून घेतल्या कि गोची होते. मग त्यांना "चमत्कार" येऊन चिकटतात. आणि आपण त्या व्यक्तीला कधी देव्हार्‍याबाहेर येऊच देत नाहि. "देव" या संकल्पनेबाहेर आपण त्यांना बघत नाहि, बघू शकत नाहि. त्यांना "अवतार" ठरवल्याने मग त्यांनी केले ते अवतार कार्य म्हणूनच. त्यावर फालतू प्रश्न विचारायचे नाहित. देवच तो, त्याने काहिहि केले तरी कारण विचारायचे नाहि, कारण नियतीचा संकेत होता. ह्याने आपण समाजाची विचारशक्ती कुंठित करतो. त्यांच्या चांगल्या वाईटाला देवत्वा खाली माफ करुन टाकतो. वास्तविक देवत्वाखाली आपण आपली विचारशक्ती तर झाकतोच पण त्या व्यक्तीच्या कार्याला आपल्या नकळत कमीपणा आणतो असे माझे वैयक्तिक मत आहे. म्हणजे "देव" म्हणून त्याच्या चरणाचेहि तीर्थ घेऊ, पण ते कार्य जर ’देव’ करतोय म्हंटलं कि त्याच्यासाठी सहज साध्य असते पण तेच ’माणूस’ समजून घेतले तर त्याकाळि ते कार्य कसे केले असेल? ह्याचे आश्वर्य वाटून आपले आदर्श जास्त बळकट करता येतात हे कोणीच लक्षात घेत नाहि.

फेसबुकवरती एका ग्रुपवरील चर्चेत मुद्दा श्रीरामावरती चर्चा होत होती एक गट वर म्हणालो तसा "तीर्थ" संप्रदायातील होता तर दुसरा  रामाने चुका कश्या केल्या ह्यांचा घडाघडा पाढा वाचणारा होता. म्हणजे "श्रध्दा" व "बुध्दिवाद" या दोन पांढर्‍यावरील काळ्या शब्दांमध्ये श्रीरामांची ओढाताण सुरु होती. मी काहि मते मांडली त्यावर मुख्यत: श्रध्दावानांनी माझ्यावर हल्ला चढवला (सुदैवाने अहिंसक हल्ला होता, म्हणजे गांधीजींच्या "चामड्याच्या" चपला जितक्या अहिंसक होत्या तितकाच!).


यातला बुध्दिवाद्यांचा प्रश्न मला पटला - "जर दैवी संकेतानुसार जसं ठरलं होतं तसंच कैकयी - मंथरा वागल्या असतील तर त्यांना का दोष द्यावा?"  यावर मग श्रध्दावानांची सहाजिक गोची झाली. मग लोकांना दाखवण्यासाठी देवाने केलेला खेळ वगैरे  - "वत्सा अजाण आणि बाळबोध आहेस अजून!" धाटणीची नेहमीची उत्तरं सुरु झाली. माझ्या विचारानुसार कैकयी ही सामान्य स्त्री खचित नव्हती. मी चुकत नसेन तर जी २ वचने आपण कैकयीने दशरथाला मागितली असे म्हणतो ती वचने तीने भर रणांगणावरती दशरथांचा जीव वाचवून मिळवली होती व नंतर कधीतरी मागेन असे म्हणून पुढे रामचा राज्याभिषेक करायचे जाहिर केले तेव्हा मागितली. याचा अर्थ कैकयी एक लढवय्या स्त्री होती. पुढची गोष्ट दशरथाला शाप होता कि पुत्र वियोगाने तुलाहि मृत्यु येईल. मग पुत्र वियोग २ प्रकारे - एक तर रामाचा मृत्यु किंवा रामाचे दिर्घकाळ दूर रहाणे. शाप वगैरे कथा सत्य मानली तर उलट रामाला दूर पाठवून तीने रामाचा जीवच वाचवला ना? दशरथ व राम असे २ जीव जाण्याऐवजी एकच जीव गेला.



आता श्रीरामाच्या मुख्य कार्याकडे बघू - "रावणवध".  रावणाला हरवणं हि म्हणाल तर नविन, जगावेगळी वा अशक्य गोष्ट अजिबात नव्हती. सहस्रार्जुनाने, वालीने इतकेच कशाला? तर स्त्री राज्यातील स्त्रीयांच्या सैन्यानेहि रावणाला हरवले होते. पण आधी दंडकारण्यात येऊन मोठं सैन्य उभं करणं, ते लंकेपर्यंत घेऊन जाणं आणि रावणासारख्या बलाढ्य राजाला हरवल्यानंतर (मग तो वध असेल किंवा कैद असेल) ते राज्य योग्य हातात देणं. व रावणाचे पाठिराखे परत डोकं वर काढणार नाहि अशी व्यवस्था लावुन आर्यवर्त पुन: निष्कंटक करणं हे मोठं काम होतं. इथे रामरायाने केलेली राजकारणे, राबवलेली धोरणे फार विचार करण्यासारखी आहेत. श्रीराम हा पट्टिचा राजकारणी होता. केवळ मर्यादा पुरुषोत्तम - मर्यादा पुरुषोत्तम करुन आपण श्रीरामाचा "चॉकलेट हिरो" बनवून टाकला आहे. ती आवरणं झटकली कि श्रीरामाच्या कार्याचे विचारहि करु शकणार नाहि इतके विराट स्वरुप आपल्या समोर येते मती गुंग करुन टाकते. आणि हि आवरणं झटाकायला ना श्रध्दा सोडायची गरज आहे ना बुध्दिवादाच्या नावाखाली उभे आडवे छेद देत जाण्याची. फक्त त्या विराट रुपाचे दर्शन झाल्याने मती गुंग झाली कि त्याला "चमत्कार" म्हणून लेबल चिकटवले जाऊ नये आणि मुळ रामकथेत किंवा प्रक्षेप म्हणून मागुन आलेल्या कथांचा चोथा करुन रामाने हिच चूक केली होती तीच चूक केली होती हे हातोडिचे घाव घालून मोकळे व्हावे तसे आरोप करुन मोकळे होऊ नये.

अजून एक, रामायण वाचता - बघताना बिभिषण म्हणजे "बुळ्या", मिळमिळित" असं चित्र उभं रहातं तर तसं नाहिये. बिभीषण उत्तम लढवैय्या होता. रामाच्या सेतुचे लंकेच्या बाजूने रक्षण करण्याची जबाबदारी बिभीषणाने पार पाडली होती. रामाने दक्षिण आर्यवर्तातील रावणाचा हस्तक्षेप मोडून काढायला बिभीषणाला कसे वापरले याचं मला फार कौतुक वाटतं. बिभीषणाची राजकारणाची महत्वकांक्षा रामरायाने अचूक हेरली म्हणजे त्याचे - सुग्रीवाचे हेरखाते किती उत्तम असेल? वरुन ह्याच्याशी मैत्री ठेवली तर दंडकारण्याच्या खालच्या भागात परत शांतता नांदेल ह्याचीहि हमी मिळवली. श्रीराम - श्रीकृष्णांमधली समानता म्हणजे दुसर्‍यांचे राज्य त्यांनी हिसकावून घेतले नाहि. त्या - त्या ठिकाणच्या/वंशजांच्या हाती तो कारभार सोपवला. यात दातृत्व व राजकारण यांचा उत्तम संगम दिसून येतो. त्या महामानवांकडून शिकायच्या त्या या गोष्टि.

पण त्यांच्या महान कार्यांना थेट देवपण दिलं कि ते करतील ते सगळं बरोबर होत जातं. त्या काळि त्यांनी जे निर्णय घेतले ते एक माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून हे मान्य केलं तर उलट त्यांनी केलेली सत्कार्ये हि हजार पटींनी मोठी होतात. मानव असून इतके अवाढव्य काम कसे केले याचे आदर्श अजून बळकट करता येतात आणि आपण ’आत्ता २०१२ मध्ये ज्यांना "चूका" म्हणतो त्यावर "मानवाने" केलेली चूक व समाजाची त्यावेळची मानसिकता व पालनकर्ता - समाजाचा सर्वात वरच्या फळितला घटक म्हणून श्रीरामांना सीतेचा करावा लागलेला त्याग यांचा सरळ संबध लावता येतो.(मुळात उत्तर रामायण हा ’प्रक्षेप’ आहे हे माझे वैयक्तिक मत आहे. मुळ रामायणात श्रीराम परत आल्यावर "त्यांच्या अनेक पिढ्यांनी पुढे सुखाने राज्य केले" इथे रामायण संपवले आहे.) 

श्रीराम हा भारताचा - हिंदु धर्माचा प्राण आहेत ह्यात अजिबात शंका नाहि. श्रीरामा सारखा आदर्श राजा/माणूस हजार वर्षातून एकदा होत असावा. मी हे सुध्दा सांगतोय कि मला स्वत:ला रामनाम आवडते. घरात लहानपणापासून रामनाम ऐकत मोठा झालोय. आणि इथे श्रध्दा इतकि प्रभावी आहे कि हजारो वर्ष त्या रामनामावरती आशा-श्रध्दा-भक्ती-भावना-वाणी एकवटून त्याची कोटिच्या कोटि आवर्तने होऊन खरोखर त्याला मानसिक आधाराचे किंवा अजून स्पष्टपणे सांगायचे तर कवचाचेच रुप आले आहे. माझाहि रामनावार संपूर्ण विश्वास आहे. संकटांवर मात करण्याची अफाट स्फुर्ती रामनाम देते ते त्यावर गेली हजारो वर्षे भक्ती व वाणीचे जे "संस्कार" होत आहेत त्यामुळे. भक्ताने देवाला मोठं केलं, देवाने भक्ताला सांभाळलं. भक्त आणि त्याचे श्रध्दास्थान एकमेकांना आधार देतात - मोठे होतात हे दाखवण्यासाठी याहुन सुंदर व गोड उदाहरण नाहि. :-)


श्रध्दा आणि बुध्दिवाद या दिसायला विरुध्द असल्या तरी पुरक गोष्टि आहे. श्रध्दा हि डोळसच असावी. आणि बुध्दिवादाला देखिल श्रध्देचे अधिष्ठान असावे. "सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे।" श्रध्दा आणि बुध्दिवाद सहज एकत्र नांदू शकतात सर्वात मोठे उदाहरण - शिवछत्रपती आणि स्वामी विवेकानंद. कुठल्याहि गोष्टिवरती मग अगदि ती चांगलीहि का असेना सहज विश्वास ठेवला कि बुध्दिवादाला टोचणी लागते आणि अडचणीत आणणारे प्रश्न विचारले कि श्रध्दावानांना त्रास होतो. मुळात आपले अध्यात्म हे प्रश्नांमुळेच निर्माण झाले आहे. "स्वकियांशी कसा लढू?" या प्रश्नाने गीता निर्माण झाली. हल्ली प्रश्न विचारला कि श्रध्दावान म्हणवणारे तुटुन पडतात. मुळात श्रध्दा हि ’संयमानेच’ दृढ होत जाते. समोरच्याच्या एका वाक्यावरुन तलवारी परजायला सुरुवात केली धर्म हे वैचारीक डबकं होतं. त्याचं तालिबानीकरण होतं. सुदैवाने हिंदु धर्मात विचारावर कधीच बंधनं नव्हती इथे चार्वाक सुध्दा "हिंदूच" म्हणवले जातात. जगात दुसरा असा कुठलाहि धर्म नसेल कि ज्यात एकमेकांच्या विरोधी जाणारी शेकडो मते असूनहि तो भक्कमपणे उभा आहे. भक्कम तंबू उभा करायचा असेल तर चार वेगवेगळ्या दिशांना जाणार्‍याच दोर्‍या असाव्या लागतात. तंबू माझ्या एकट्य़ामूळे उभा आहे असं तो मधला खांब नाहि म्हणू शकत ना विरुध्द दिशेने जाणार्‍या दोर्‍याहि.

श्रध्दा ठेवताना प्रश्न विचारु नका हे मला पटत नाहि. विवेकानंदांसारखा अध्यात्मिक अधिकारी पुरुष एखाद्या "गुरु" करताना तुमचे समाधान होईतो अखंड प्रश्न विचारा असाच सल्ला देतो. हा खरा बुध्दिवाद आणि या बुध्दिवादाची पुढची पायरी श्रध्दा आहे. असा बुध्दिवाद आणि अशी श्रध्दा असेल तर राष्ट्र प्रगती पथावर जाईल. अन्यथा दुसर्‍याला "हे शरीर नाशिवंत आहे बालका, सोने नाणे यांचा मोह नको!" म्हणत स्वत:चे मोठे श्रीमंती आश्रम उभारणारे, "खास" भक्तांसाठी हवेतून साखळ्या काढणारे किंवा ’संभोगातून समाधीकडे’ नेणारे भोंदू देशाला विनाशाच्या गर्केत नेतील.


मी लिहिलय ते पटणं अथवा न पटणं हे ज्याच्या त्याच्यावर सोपवलं आहे.

मी स्वत:ला बुध्दिवादि समजतो. तर्काला न पटणार्‍या धार्मिक कर्ममकांडांची ची उत्तरे मिळाली नाहि तर मी बेचैन होतो. दुर्दैवाने "श्रध्दा" रुढी यांच्या नावाखाली मोठ्यांकडून ’असंच असतं’ हे कधीच न पटणारं उत्तर मी अनेकदा ऐकलं. आणि त्यातून माझा बुध्दिवाद अजून वाढत गेला. कदाचित माझ्याही काही अजून उत्तर न मिळालेल्या श्रध्दा - अंधश्रध्दा माझ्या नकळत मी जोपासत असेन, त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न चालू आहेच.

लोकं देवाला शब्दश: "घाबरतात". उठसुठ देवाला घाबरणे मला कधीच पटले नाहि. देवाला तुम्हि "माऊली" म्हणता तर घाबरता का? किडुक मिडुक कारणां वरुन देवाचा कोप होतो??? हे लॉजिक मला पटत नाहि. हां आता तुम्हि कोणाचे तळपटाच करायला जात असाल तर देवाने शिक्षा केली नाहि तरच आश्चर्य आहे.

उपवासाच्या दिवशी चालणार नाहित म्हणून औषधे न घेणारी लोकं पाहिली आहेत मी. माझ्या समजण्याच्या पलिकडची गोष्ट आहे हि. अरे मरायला टेकल्यावर कसले उपास? आणि औषधे नाकारायचा अट्टाहास का? देव नाहि सांगत माझ्यासाठी शरीराला त्रास दे म्हणून. अध्यात्माच्या नावाखाली अनेक अनाकलनिय गोष्टि बेमालूम दडपल्या जातात. ते बघून त्रास होतो. अजून एक देवाला नेवैद्य दाखवताना त्याची चव घेतली गेली तरी मला चुकिचे वाटत नाहि. घरात लहान मुलांना भूक लागली असते आणि केवळ पुजा होऊन देवाला नेवैद्य दाखवायचा बाकि आहे म्हणून त्या इवल्याश्या जीवाला थांबवुन ठेवले जाते, हे मला कधीच पटाले नाहि. मला विचाराल तर खुशाल त्या मुलाला जेवू घालावे. मुलत: नेवैद्य हा उपचार फक्त अन्न ग्रहण करण्यापुर्वी देवाची आठवण व चांगली मनस्थिती तयार व्हावी यासाठी असतो.

उदाहरणा दाखल ही माझी वैयक्तीक मते आहेत. अनेकांना ती पटत नाहित. पटवून घ्यावीत हा अट्टाहास नाहि पण ती चूक आहेत असे कोणाला वाटात असेल तर "का?" या प्रश्नाचं सविस्तर आणि पटणारं उत्तर हवय. यालाच मी बुध्दिवाद समजतो.

संयम नसला कि ना बुध्दिवाद कामाला येतो ना श्रध्दा. अन्यथा उरतात ते केवळ "बुध्दिवाद" व "श्रध्दा" असे दोन पाढर्‍यावरचे काळे शब्द!


 - सौरभ वैशंपायन.

4 comments:

अनघा said...

देवाला नुसते घाबरत नाहीत तर त्यास माणसासारखे समजून घाबरतात. म्हणजे मी हे केले तर देव माझे चांगले करेल, नाही केले तर शिक्षा करेल. देवाला लाच देवू करतात, नवस, उपवास पूजा, आणि कशाकशाची. जर देव या पद्धतीने विचार करत असेल तर त्यास देव कसे म्हणावे? देव म्हणजे एक शक्ती, या विश्वाचे, निसर्गाचे नियंत्रण करणारी. तुम्ही उपवास करून, नैवेद्य दाखवून, काही फरक पडतो असे नाही वाटत. पण आवडत असतील तर या गोष्टी कराव्यात, त्याचे फार अवडंबर न माजवता!

Abhishek said...

पॉईंट नोट किया जाये माय लॉर्ड! :)
छान लेख आहे!

Anonymous said...

तोच संयम कमवायला नैवेद्याआधी खात नाही किवा चव घेत नाही. प्रत्येक गोष्ट श्रद्धेवर चालते असे नाही वाटत का तुला? "प्रश्न विचारावेत" ही सुद्धा श्रद्धाच नाही का? कुठेतरी प्रश्न विचारायचे थांबवतो म्हणून तर जिवंत आहोत ना? कोणी जास्त प्रश्न विचारतो, कोणी जास्त खोलात जातो, तर कोणी शून्यातच आवरते घेतो. विचारिक खोली वेगवेगळी, पण नदी श्रद्धेच्या पत्रातूनच वाहते. किंबहुना पत्र आहे म्हणून वाहते.

saurabh V said...

@ anonymous -

barobar ahe paN neet vachalat tar samajel ki mee suddha shradhhelach motha manalay "बुध्दिवादाची पुढची पायरी श्रध्दा आहे" yacha artha shradhha hich jast mothi manali ahe. :-)

shraddha thevu naka asa kuthe mhaNAloy? ulat "कदाचित माझ्याही काही अजून उत्तर न मिळालेल्या श्रध्दा - अंधश्रध्दा माझ्या नकळत मी जोपासत असेन, त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न चालू आहेच." he manya kelay mee.