Thursday, November 14, 2013

सिंहासन चोविशी



आपल्याकडे सम्राट विक्रमादित्यावरती "सिंहासन बत्तीशी" म्हणून ३२ गोष्टिंचा एक संग्रह आहे. प्रत्येक रात्री सिंहासनावरची एक एक दिव्य पुतळी जिवंत होऊन ते सिंहासन शोधुन काढणार्‍या राजा भोजाला सम्राट विक्रमादित्याच्या एकेका सद्गुगुणाबाबत सांगत असते व शेवटि म्हणते "हे राज‍न, हा गुण तुझ्यात असला तरच तु ह्या दिव्य सिंहासनावरती बैस!" आणि मग राजा भोज मोठ्या मनाने अश्या ३२ रात्री जागुन त्या गोष्टि ऐकतो व अखेर नम्रपणे त्या सिंहासनावरती बसायला नकार देतो. उद्या आपल्या चालत्या बोलत्या विक्रमादित्याचा संपूर्ण कारकिर्दितला शेवटचा सामना आहे. अर्थात त्याचे वेगळे असे सिंहासन कधी नव्हते, पण मागे सचिन वरीलच एका लेखात म्हणालो होतो तसं "सिंहासनासाठी सम्राट नसतो सम्राटांसाठी सिंहासनं असतं, आणि ते नसलं तर सम्राट जिथे बसतो ती जागा आपसूक सिंहासन होते!" उद्याची कसोटी संपेल तेव्हा आम्ही विक्रमादित्याच्या २४ वर्षांच्या गोष्टि येणार्‍या पिढ्यांना सांगू आणि विचारु - "मनापासून सांग, तू खरच "सचिन" होऊ शकतोस का?"

१५ नोव्हेंबर १९८९, कराची ते १४ नोव्हेंबर २०१३ वानखेडे .... २४ वर्ष. क्रिकेटच्या किमान ४ पिढ्या बदलल्या. सचिन पहिल्यांदा खेळायला उतरला तेव्हा जन्मही न झालेल्या किंवा रांगणार्‍या अनेकां बरोबर सचिन आज खेळतो आहे. मात्र तसंच सचिनचा जन्म झाला त्याचवेळि काही सचिन द्वेष्ट्यांचा सुद्धा जन्म झाला असावा, कारण तशी काही माणसं मी आजूबाजूला बघितली आहेत. सचिन निवृत्त कधी होणार? सचिनचा इतका उदो उदो का? हे प्रश्न अशा महानुभवांना नेहमी पडत. पैकी त्यांची पहिली इच्छा उद्या पूर्ण होते आहे. पण सचिनचा उदो उदो का? हे समजण्यासाठी २४ वर्ष बघावी लागतील. मी त्याच्या अशक्य विक्रमांबाबत बोलतच नाहीये. त्याच्या गेल्या २४ वर्षातील खेळ व सामाजिक जीवनाबाबत बोलतोय.

एक खेळाडू म्हणून जेव्हा आपण त्याची कारकिर्द तपासतो. तेव्हा इतकी शारिरीक, मानसिक, भावनिक तंदुरुस्ती त्याने कुठुन मिळवली व जपली? ह्याचं कौतुक मिश्रित आश्चर्य वाटत रहातं. कुठलाही मैदानी खेळ खेळणार्‍या खेळाडूची कारकिर्द हि शारिरीक तंदुरुस्तीवरती अवलंबून असते हे सहाजिक आहे. आजवर अनेक वेगवेगळे खेळ व खेळाडू बघितले पण इतकी मोठि कारकिर्द माझ्या बघण्यात नाही. क्रिकेटमध्ये नाहीच नाही. १५-१६ वर्ष खेळणारे अनेक दिग्गज आहेतही पण शरिर थकू लागलं, सांधे कुरकुरु लागले की ते "सन्माननिय" निवृत्ती घेतात जे फार सहाजिक व बरोबरही आहे. पण "सचिन संपला" अशी १२-१२-१२ रोजी जगबुडि होणार इतकिच धादांत असत्य आवई ३-४ वेळा उठली होती हे सगळ्यांना आठवत असेल. त्याची पाठदुखी, त्याचा शस्त्रक्रिया झालेला टेनिस एल्बो, त्याचे पोतडिभर nervous 90's वगैरे, जवळपास ६-८ महिने तो संघा बाहेरही होता. पण तो परत आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं.

Titan कप वगळता कॅप्टनशीप तितकी त्याला कधीच मानवली नाही. काही काळ मॅच फिक्सिंगचे काळे ढगही संपूर्ण भारतीय क्रिकेटवरती पसरले होते, अनेक जुने जाणते त्यात फसले, त्यांचे हात व चेहरे काळे पडले पण सचिन निष्कलंकच राहीला. मॅच फिक्सिंगनंतर बरीच जुनी खोडं उपटून फेकली गेली. फांद्या सपासप कापल्यावर नवी पालवी फुटावी तसाच काहिकाळ डळमळलेला भारतीय संघ नवा आकार घेऊ लागला. सौरव गांगुलीने त्याला आकार दिला. आजचा धोनीच्या हाता खालच्या संघापाठी कुठेतरी गांगुलीचे कष्ट आहेत. त्याच वेळी एक बाजू सचिनने लावून धरली होती हे देखिल तितकच खरं. तेव्हाही अगदि काल-परवासारखा सचिन शिवाय उरलेला संघ कुठला? हाच प्रश्न होता.

आजकाल T-20 चा जमाना आहे. सगळं झटपट. त्यात चूक किती बरोबर किती हा भाग निराळा. पण चार मॅच मध्ये दिसलेला चेहरा पाचव्या मॅचपासून पुढे दिसेल की नाही याची शाश्वती नसते. शारीरीक, मानसिक क्षमतेचा कस लावणारं कसोटि क्रिकेट मागे पडलंय. फक्त दंडाच्या जोरावरती पोतडिभर रन्स खेचणार्‍यांना कसोटि मध्ये लागणारी कसोटि कितपत झेपेल हा प्रश्न उरत असताना दुसर्‍या बाजूला चक्क २ तपं टिकून २००वी कसोटी खेळणारा ४० वर्षांचा हा खेळाडू बघितला की आपोआप सलाम केला जातो. एकदिवसीय खेळात सर्वात वेगवान शतक आणि कसोटि मधल्या ३०० धावा हे दोन मुख्य अपवाद वगळता क्रिकेट मधला व अर्थात फलंदाजी मधला जवळपास प्रत्येक विक्रम आज सचिनच्या नावावर आहे. इथवर पोहोचायला सचिनने अफाऽऽऽट मेहनत घेतली आहे.

इतकं असून सचिनला एकदाही बेताल वागताना बघितलं नाही. ना मैदानात ना मैदाना बाहेर. प्रसिद्धिचं इतकं मोठं वलय असताना सचिनने डोक्यात हवा जाऊन गैरवर्तन कधीच केलं नाही, म्हणून सचिन मोठा. आपल्या वलयाची व त्या वलयाची आपल्या चाहत्यांवर असलेल्या छापाची सचिनला जाणिव आहे व म्हणून इतर सर्व जण दारूच्या ब्रॅन्डच्या "make it large" म्हणत जाहिराती करत असताना सचिनने ती गोष्ट कधी केली नाही. म्हणूनच सचिन आपसूक larger than life झाला. त्याने कधी भारतीय संघातल्या अथवा विरुद्ध संघातल्या खेळाडूबाबत जाहिरपणे वाईट मतप्रदर्शन केलं नाही. मिडिया व "जाणकार" म्हणावणार्‍यांकडून जेव्हा जेव्हा बोचरी टिका झाली तेव्हाही सचिनची बॅटच बोलली.शिवाय सचिन वेगवेगळ्या कार्यक्रमात अथवा मुलाखतींमध्ये बोलला तेव्हा शब्द न शब्द त्याने जपून वापरला. एक उदाहरण द्यायचं झालंच तर अर्चना विजया या T V anchor वा मॉडेलचं देता येईल. तिने स्वत:च्या ब्लॉगवरती लिहिलेली गोष्ट - एका मुलाखती नंतर सचिनने सहज मला विचारलं "“How do you maintain your physique?” वरती हीच कन्यका सांगते - "दहातले नऊ जण "फिजिक" ऐवजी "फिगर" हा शब्द वापरतात ज्याला एक ’ओशटपणा’ असतो. पण सचिन बोलतानाही शब्दांची निवड कित्ती अचूक करतो. व त्याच मुळे आज तो इतक्या उंचीवर का आहे ते समजतं."

आज इतक्या उंचीवर पोचल्यावरही हा दरवर्षी रणजी सामने न चुकता खेळतो. खेळाडू म्हणून सचिनची चपळता का टिकून आहे ह्याचं गमक इथे आहे. चेंडूचा टप्पा बॅटच्या मध्यावर येतो आहे ना हे बघायला तो आजही ओल्या चेंडूने सराव करतो. उष्ण आणि आर्द्र (humid) ठिकाणी खेळावं लागणार असेल तर शरीरात पाण्याची कमी होऊ नये म्हणून केवळ पाणी पिण्यासाठी पहाटेचा गजर लावून उठणारा हा काटेकोर माणूस आहे. सचिन उगीच घडत नाहीत. त्यासाठी येतानाच काहि गोष्टि वरुन आणाव्या लागतात. शिवाय घरातलं वातावरण अपयशात पाठींबा देणारं हवं आणि यशात कान ओढणारं देखिल, तसंच संपूर्ण जीव ओतणारा आणि खेळ व खेळाडूलाच पैलू पाडणारा आचरेकर सरांसारखा अतिशय शिस्तबद्ध प्रशिक्षक लागतो. अन्यथा पावसाळ्यात  कुत्र्याच्या छत्र्या उगवतात तसे ’महान’ क्रिकेटपटू गल्लोगल्ली तयार झाले नसते का??? फक्त ५.६ फुटाचा असूनही सचिन इतरांपेक्षा दशांगुळं मोठा दिसतो तो असा.


"सचिन" होणं फार अवघड आहे. अख्खा देश आपल्याकडे बघतोय, प्रत्येक मॅच मध्ये त्यांना शतक हवय जे अशक्य आहे .... तरी त्या अपेक्षांच ओझं खांद्यावर घेणं फार फार धीराचं काम आहे. अनेक लोकांना वाटेल त्यात काय? त्या ओझ्या बरोबर करोडो रुपये कमावलेच कि त्याने? पण तो ज्या उंचीवरती आहे त्या उंचीवर बहुतकरुन माणसांचे पाय जमिनीवरुन सुटतात व अशी ओझी पेलवत नाहीत. पण हा आपला २४ वर्ष कृष्णासारखा लोकांच्या बोजड अपेक्षा व भारतीय संघाचा गोवर्धन करंगळीवर तोलून ऊभा होता. ह्या सामन्यानंतर त्या गोवर्धनाला आपापल्या बॅटचे टेकू देणारे गोप यापुढे सचिन शिवाय देखिल खूप यशस्वी ठरोत ही स्वाभाविक सदिच्छा आहेच. पण आपलं विश्वरुप दर्शन दाखवत पिचवरती "तो" बॉलर्सची रक्तहीन अहिंसक "कत्तल" करत असताना अख्या मैदानात जो "सच्चिन - सच्चिन" आवाज घुमत रहातो तो उद्याच्या कसोटी नंतर परत ऐकू येणार नाही. त्या "सच्चिन - सच्चिन" मध्ये महाभारत युद्धाच्या "पाज्चजन्यं ह्रषीकेशो देवदत्तं धनंजय:" पासून ते एखाद्या महाआरतीपर्यंत सगळं आपसूक सामावतं. कारण सचिन हा क्रिकेट रसिकांचा देव आहे. सचिन ज्या क्षणापर्यंत खेळेल तोवर क्रिकेट हा "धर्म" असेल, ज्या क्षणी तो पिच सोडेल त्याक्षणी क्रिकेट हा "खेळ" होईल! मग कदाचित या कसोटी नंतर जन्माला आलेली पोरं - टोरं थोडी मोठी होऊन जेव्हा हातात बॅट धरुन "चला क्रिकेट खेळू!" असं म्हणतील तेव्हा त्यांना आम्ही बघितलेल्या - अनुभवलेल्या या सिंहासन चोवीशी मधली एखादी गोष्ट सांगून म्हणू - "बाळा, सचिन जे खेळायचा ना त्याला क्रिकेट म्हणत!!!"

 - सौरभ वैशंपायन

5 comments:

Suhas Diwakar Zele said...

अप्रतिम.... निव्वळ अप्रतिम. ह्या क्षणी नेमकं काय वाटतंय कळत नाही, पण सचिनला त्या फिल्डवर बघणे किती सुखद वाटतं... चिअर्स टू गॉड :) :)

ॐकार केळकर said...

नेहमीप्रमाणे मस्त, छान! "प्रसिद्धिचं इतकं मोठं वलय असताना सचिनने डोक्यात हवा जाऊन गैरवर्तन कधीच केलं नाही, म्हणून सचिन मोठा." हे 100% सत्य!

shankar shenai said...

Excellent write up. Sachin is great and no doubt about that. For me you too are equally great a syou have written the article so beautifully. May God bless you all and always.

Deepak Parulekar said...


निव्वळ अप्रतिम लिहीलयंस भावा!! अगदी अगदी आमच्या मनातलं !

सौरभ said...

:) very nice :)