Saturday, August 22, 2009

दधिची


पुराणात दधिची ऋषींची गोष्ट आहे. शेकडो वर्षे तप केल्याने अभेद्य झालेल्या आपल्या अस्थी त्यांनी इंद्राला अर्पण केल्या. त्या अस्थिपंजरातुनच देवांच्या राजाने आपले वज्र बनवले, व असुरांवर जय मिळवला. कालचक्र अविरत फिरत असते. आधी घडलेल्या घटना नवे संदर्भ घेऊन पुन्हा घडतात. "भारतरत्न डॉ. अवुल पकिर जैनुलबद्दिन अब्दुल कलाम" यांच्या रुपाने दधिची पुन: अवतरले. आपल्या प्रखर बुध्दिला पणाला लावुन या आधुनिक ऋषीने "अग्नि" नामक एक अमोघ अस्त्र भारताच्या चरणी अर्पण केले.

जो स्वप्नेच बघु शकत नाहि त्याला ती पूर्ण करण्याचा ध्यास तरी कसा असेल? मात्र प्रक्षेपक(अंतराळ) व क्षेपणास्त्र(संरक्षण) या दोन्हि बाबतीत भारताला स्वयंपूर्ण करायचे स्वप्न डॉ. विक्रम साराभाईंनी बघितले होते, कलामांनी त्या स्वप्नात स्वत:ला गुंतवुन घेतले. मुळात त्यांना पायलट व्हायचे होते पण एका क्रमांकाने त्यांचे स्वप्न मोडले......कदाचित नशिबाने त्यांच्या आयुष्यात वेगळेच लिहुन ठेवले होते. प्रथम DRDO व नंतर ISRO मध्ये त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले. भारताचा पहिला indigenous Satellite Launch Vehicle (SLV-III) उपग्रह कलामांच्याच नेतृत्वाखाली सिध्द झाला, Integrated Guided Missile Development Programme (IGMDP) चे प्रमुख तेच पृथ्वी - अग्नि अशी क्षेपणास्त्रे हि कलामांच्या कष्टाची फळे आहेत. अर्थात यात आपल्या सहकार्‍यांचा वाटा अहे हे कलाम अतिशय नम्रपणे सांगतात. प्रत्येक गोष्टित ते "आम्हि" केले असे शब्द वापरतात. उगीच त्यांचे सहकारी त्यांना ऋषी संबोधत नाहित.

११ मे व १३ मे १९९८ रोजी पोखरणमधील वाळु २४ वर्षांनी पुन्हा उधळली गेली, त्या अणूस्फोटांमागचे कष्ट श्री चिदंबरम आणि कलामांचेच तर होते. अर्थात कलामांसारख्या द्रष्ट्याला शांतता अभिप्रेत आहे पण शांतता सबलांची असावी हि इच्छा. महासत्तांनी देखिल भारता विरुध्द हालचाल करताना दहावेळा विचार केला पाहिजे अशी ताकद ते राष्ट्राला देऊ इच्छितात. चीन कडे intermediate-range ballistic missile (IRBM) क्षेपणास्त्रे असताना भारताने गप्प रहाणे केवळ मुर्खपणाचे ठरेल. पाकसाठी "पृथ्वी" पुरेसे आहे पण चीन कडुन मदत घेऊन पाकने पृथ्वीला उत्तर म्हणून "घोरी" व "हफ्त" हि क्षेपणास्त्रे बनवली शिवाय चीनने त्यांना M-11 हि ३०० किमी मारा करणारी क्षेपणास्त्रे पुरवली आहेत.याला पुरुन उरायचे असेल तर अग्नि हेच चोख उत्तर आहे. म्हणुनच या सगळ्याच्या विचार करता भारताचा "अग्नि - १" ते "अग्नि - ४" म्हणजे Short Range Ballistic Missile ते Intercontinental Ballistic Missile इथपर्यंतचा प्रवास कसा झाला हे जेव्हा इतिहास नमुद करेल तेव्हा त्यात अब्दुल कलामांचे नाव या चारहि रेंजच्या अग्नि समोर असेल.

विचाराने इतके आक्रामक असलेले कलाम मनाने मात्र तितकेच हळवे आहेत. म्हणुनच चेन्नई मधील एका इस्पितळातील अपंग मुलांना पाहुन त्यांना वाईट वाटले ती लहान मुले जड कुबड्यांचा संसार ओढताना बघुन त्यांच्या पोटात गलबलले. म्हणुनच कुबड्यांसाठी मजबुत पण अतिशय हलक्या धातुंचा वापर करावा असा विचार त्यांनी केला व या भेटिने मुले "खेळु" लागली. याखेरीज बायपास चा प्रश्न खुप खर्चिक होता. परदेशी स्टेन्स खुप महाग असल्याने गरीब-गरजु लोकांना हि शस्त्रक्रिया करुन घेणेआर्थिक दृष्ट्या कठिण होते मात्र डॉ. कलाम व डॉ. सोम राजु या दोघांनी नवा आणि स्वस्त इतकेच नव्हे तर परदेशी स्टेन्स पेक्षा प्रगत असा देशी स्टेन्स बनवुन हृदयरोग्यांना दिलासा दिला.

काळाने डॉ. कलामांच्या पदरात त्यांच्या योगतेचे माप पूरेपुर ओतले. सर्व भारतीयांच्या सुदैवाने ते राष्ट्रपती बनले. त्यांनी तरुण रक्ताला २०२० चे स्वप्न दाखवले. आज आम्हि तरुण मुले ते स्वप्न घेऊन जगतोय. तामिळनाडुच्या किनार्‍यावरील एका बोटकामगाराचा मुलगा ते राष्ट्रपतीपद हा प्रवास सोपा खचित नव्हता. अनंत ध्येयासक्ती असलेली माणसे काय करु शकतात याचे चालते बोलते उदाहरणच आंम्हाला २०२० चे स्वप्न देत आहे यापेक्षा भाग्याची गोष्ट ती काय?

इतके मान - सन्मान मिळुन त्यांचे पाय कधी जमिनीवरुन सुटले नाहित. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनांनंतर इतका दूरचा विचार करणारा राष्ट्रपती भारताला मिळाला. कलाम पूर्णत: शाकाहारी आहेत. पुस्तकं, वीणा, शास्त्रीय संगीताच्या कॅसेट व विज्ञान इतकिच माझी मालमत्ता आहे असे ते गंमतीने म्हणतात. पण त्यात अतिशयोक्ती नाहि. ३४४ खोल्यांच्या राष्ट्रपती भवनात हा माणूस २ सुटकेस भरुन गेला व परत येताना २ सुटकेस घेऊन बाहेर आला. आपले नातेवाईक चार दिवस राष्ट्रपती भवनात आले तेव्हा त्यांचा खर्च हा स्वत:ला मिळाणार्‍या पगारातुन केला सरकारी खात्यात नव्हे. ब्रह्मचारी असल्याने कुठलेहि सांसारीक मोह नाहि त्यामुळे खरोखरच ते ऋषी आहेत!


- सौरभ वैशंपायन.

4 comments:

Anonymous said...

Nice One..
Dream The Change.. Be The Change..

Seema Tillu said...

manus jasa asayla hava tasech Dr. Abdul Kalam aahet.sadhi rahani aani uccha vicharsarni ase tyanche vagne aani rahane aahe. vimantalavar zadti ghetli mhanun tyanee kaslahi traga kela naahee, ulat tyana sarva sahakarya dile. shahrukh sarkhya lokannee tyanchyapasun he shikle pahije.

Unknown said...

Short but Sweet

shankar shenai said...

Dear Saurabh, Many must have written by now about the great soul Dr Kalam. The spark in your writing shows that you are not far away from these great people. It is a pleasure to read what you write. Wish you write more and more. May God bless you all and always.