Tuesday, June 26, 2007

कृष्णशिष्टाई

अखेर कृष्णशिष्टाई असफ़ल झाली. पांडवांनी मगितलेली पाच गावे दुर्योधनाने नाकारली होती. "सुईच्या अग्रावर मावेल इतकी भूमी सुद्धा पांडवांना मिळणार नाही!" अशी दर्पोक्ती दुर्योधनाने श्रीकृष्णासमोर केली होती. कृष्ण द्रष्टा होता. श्रीकृष्णाला मनापासुन युध्द नको होते त्याला दोन कारणे होती - एक म्हंटजे एकमेकांशी भांडून स्वकीयांच्या रक्तानं मात्रूभुमी लाल होणं त्याला मान्य नव्हतं आणि दुसरं म्हणजे पांडवांची घडी अजुन धड बसली नव्हती. पांडवांचा खजिना, सैन्य आणि अनुभव या तीन गोष्टी कौरवांच्या बाजुपेक्षा जवळपास निम्म्या होत्या. शिवाय युध्द झालच तर पितामह भिष्म, आचार्य द्रोण, कृपाचार्य यांच्या सारखे धुरंधर वीर हस्तिनापूरच्या सिंहासनाला वाचवायला धावणार होते, त्यातच भर म्हणुन यादवांचा शत्रु आणि कंसाचा सासरा असलेल्या जरासंधाची राजकिय हत्या श्रीकृष्ण-युधिष्ठीर-भीम-अर्जुन यांनी केल्यामुळे जरासंधाच्या पक्षातले राजे यादव-पांडव युतीवर डुख धरुन होते, युध्द झालच तर ते सर्व साधनांनिशी ते हस्तिनापुरच्या सैन्यात सामिल झाले असते. अर्थात पांडवांसाठी हे धोक्याचं होत. म्हणुनच युध्द टाळण्यासाठी श्रीकृष्ण - "युध्दाने दोन्ही बाजुंच नुकसान होईल. आपलीच माणसं नाहक मारली जातील, कुरु वंशातील दोन जण समोरा-समोर आले तर हस्तिनापूरच्या सिंहासनाचीच ताकद खच्ची होईल, आणि याचा फ़ायदा आजुबाजुला असलेली राज्ये घेतील." या सर्व गोष्टी आग्रही स्वरात मांडत होता. शिवाय मोठ्या मुश्किलीने यादवांचा उत्तरेच्या राजकारणात जरासंधाच्या हत्येमुळे वाढलेल्या प्रभावाला कदाचित युध्दामुळे शह बसला असता. यादवांचे उत्तरेतिल हितसंबध जपण आणि आधीच आयुष्यभर अनेक कारणांनी पांडवांनी जी दु:ख भोगली होती ती दु:ख त्यांच्या पुढच्या पिढ्यांना भोगावी लागु नयेत असं कृष्णाला वाटणं सहाजिक होतं. त्यासाठी नियतीचं हे विनाशाच्या उतरणीवरचं धावतं चाक थांबवायचा श्रीकृष्ण आटोकाट प्रयत्न करत होता. पण दुर्यो्धनाचा हेका कायम होता आणि पुत्र प्रेमापोटी धृतराष्ट्राची बुध्दी सुध्दा आंधळी झाली होती.
श्रीकृष्णानं खेदानं एक मोठा सुस्कारा सोडला.सभेतल्या प्रत्येकाला विशेषत: पितामह भिष्मांना तो सुस्कारा सगळं काही सांगुन गेला. भिष्म आपल्या प्रतिज्ञेने बांधिल होते. कोणत्याही परिस्थितीत हस्तिनापूरच्या सिंहासनाला सांभाळणे त्यांना भाग होते. त्यांनी स्वत:शीच कळत-नकळत नकारार्थी मान हलवुन, श्रीकृष्णाच्या विचारमग्न चेहर्यावरची नजर हटवुन डावीकडच्या जमिनीवर खिळवली. सभेत एक विचीत्र ताण पसरला. खरंतर हे युध्द भिष्मासारख्या जाणत्यांना नकोय हे त्यावेळी कृष्णाला जाणवल. फ़क्त दुर्योधन, दु:शासन आणि शकुनी यांच्या हट्टामुळे हे सगळ घडतय हे न कळयला तो दुधखुळा नव्हता. कर्णानं मैत्रीखातर आणि पांडवांवरील रागखातर या त्रयीला पाठींबा दिला होता.
श्रीकृष्णाची सावध नजर सभेवरुन फ़िरत होती.तो प्रत्येकाचं मन ओळखण्याचा प्रयत्न करत होता.त्याची फ़िरती नजर विकर्णावर थांबली. किमान विकर्ण काहीतरी बोलेल? द्रौपदी-वस्त्रहरणाच्यावेळी एकटा विकर्ण झाल्या प्रकाराच्या विरुध्द उभा ठाकला होता. पण विकर्ण स्वत: कुठेतरी शुन्यात नजर लावुन बसला होता. विकर्ण एकवेळ दुर्योधनाच्या विरुध्द जाईल पण हस्तिनापूरच्या नाही हे कृष्णाला समजलं.
श्रीकृष्णानं मनाशी काहीतरी ठरवलं. अलगद हाताने उत्तरीय ठीक करुन तो उभा राहीला. हात जोडुन त्याने सभेवरुन एक नजर फ़िरवली, आणि मग धृतराष्ट्रावर नजर खिळवली - "महाराज! आपण परत एकदा विचार करावा असं मला वाटतं! मी पांडवांकडुन आलो असलो तरी आपल्या दोहोंमधील स्नेह हा फ़ार जूना आहे!! घट्ट आहे! मी प्रत्येक क्षणी कुरुंच हीतच इच्छितो! कुरु कुलाची वैभवशाली परंपरा मला माहीत आहे, आणि ती जाणतो म्हणुनच आपल्याला पुन:श्च नम्र विनंती की पांडवांनी केलेली रास्त मागणी आपण स्विकारुन होणारा अनर्थ टाळावा!"
आता उत्तर देण्याची वेळ धृतराष्ट्राची होती. एक जबाबदार राजा असल्याने कृष्णाचा प्रत्येक शब्द त्याला पटत होता. पण पुत्रप्रेमाने त्याच्यामधील नीती-अनीती समजुन घेणरी भावना बोथट केली होती. सत्य परीस्थिती आणि सत्तेची हाव या दोहोत तो फसला होता. धृतराष्ट्र अडचणीत आला होता, काय प्रतिसाद द्यावा हे त्याला समजत नव्हतं. त्याची शांतता सर्व सभेवर एक टांगती तलवार बनली होती. दुर्योधन खरतर श्रीकृष्णाच्या चिकाटीवर संतापला होता. त्याला फ़क्त युध्द हवे होते, आणि हवा होता पांडवांचा विनाश. पांडवांना पाच गावे देणे म्हणजे शत्रुचेच हात बळकट करणे होय हे तो जाणुन होता. आणि कोणता शहाणा राजकारणी ही चुक करेल? तसे बघता राजकारणाच्या दृष्टीने दुर्योधन अगदी बरोबर होता. पण आधीचा इतिहास पांडवांच्या बाजुचा असल्याने दुर्योधनाचा हा निर्णय चुकीचाही होता.
दुर्योधनानं हळुच शकुनीमामाच्या गुढघ्याला निसटता पण जाणवेल असा स्पर्श केला. शकुनी काय ते समजला. उजव्या अनामिकेतील अंगठी डाव्या हाताने नीट करत तो संथ पण बेरकी आवाजात म्हणाला - "क्षमा असावी, मध्येच बोलतो आहे, पण हे यादवकुलभुषणा खरंतर मगाशीच निर्णय दुर्योधनानं स्पष्ट ऎकवला आहे. जर महाराजांना तो मान्य नसता तर त्यांनी मगाशीच तसं निर्देशित केलं असतं नाही का?" धृतराष्ट्राच्या उत्तराची अपेक्षा असलेला कृष्ण अश्या धुमकेतु सारख्या मध्येच उपटलेल्या शकुनीच्या त्या वाक्याने क्षणभर चमकला. पण श्रीकृष्ण असले शब्दांचे खेळ लहानपणापासुन खेळत होता. त्याने सुध्दा भर सभेत शकुनीला सुनावले - "हे गांधार नरेश तसे बघता माझ्या शेवटच्या निवेदनावर महाराजांनी मौन धरलयं, मग त्याचा अर्थ मी मला हवा तसा लावावा का? राजकारणात मौन कधी धरावं हे महाराजांना नक्की माहित असेल! तेव्हा त्यांनीच ते स्पष्ट करावं असं मी पुन: सांगतो!" अंगावर आलेल्या शकुनीला श्रीकृष्णाने परस्पर शिंगावर घेतलं होतं. शकुनी ही व्यक्ती श्रीकृष्णाला कधीच आवडली नव्हती. पण आता शकुनीला इतका अहेर खुप होता.
आलेली वेळ आता टाळणं आता ध्रुतराष्ट्राला शक्य नव्हतं. ध्रुतराष्ट्राने बोलायला सुरुवात केली "वासुदेवा, तुझं म्हणणं मला कळतयं, पण सद्य परीस्थितीत युध्द अटळ दिसतंय. पांडवांनी हस्तिनापूरच्या सिंहासनाला आव्हान दिलय आणि एक क्षत्रिय आणि एक कर्तव्यदक्ष राजा म्हणुन पांडवांच हे आव्हान मी स्विकारायच ठरवलय! तरी पांडवांना जाउन तु समजवावेस कि त्यांनी आपला हट्ट् सोडुन कुरुंच्या सैन्याला बिनशर्त शरण यावे. त्यांना कुठलीही हानी होणार नाही. मात्र राज्याचे तुकडे होणार नाहीत! कुरुकुलाचा इतिहास तु जाणतोसच, कुठल्याही कुरु वंशीयाने आपल्या राज्याला हानीकारक वर्तन केल्याचा दाखला तुला दिसणार नाही! मी परत सांगतो राज्याची वाटणी होणे केवळ अशक्य आहे! तुला तुझं उत्तर मिळालय असं मी समजतो, आणि यापेक्षा स्पष्ट बोलण्याजोगे काही उरलयं असं मला वाटत नाही!"
दुर्योधन-शकुनी-कर्ण आणि दु:शासन यांचा चेहरा खुलला होता. आता त्यांच्या मनासारखं होणार हे नक्की झालं होत. युध्द झालं तर पांडवांचा विनाश नक्की होता आणि पांडव शरण आले तर आमरण कारावास. म्हणजे पांडवांच अस्तित्व दोन्ही बाजूंनीं धोक्यात आलं होतं. आता कुठलीही आर्जव करणं कृष्णाला जमणारं नव्हतं. आणि ते योग्यही झाल नसतं. त्याचा अर्थ पांड्व युध्दाला घाबरतात असा निघाला असता. श्रीकृष्णाला ते मान्य नव्हतं. शेवटचे काही शब्द म्हणुन कृष्णानं बोलायला सुरुवात केली - "अखेर जे होऊ नये, म्हणुन तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेनं आलो होतो. तेच दुर्दैवाने घडलयं. ठीक आहे, म्हंटजे युध्द निश्चित आहे तर!?! महाराज माफ़ करा, पण तुमच्या एका सकारात्मक निर्णयाने घडणारा इतिहास बदलला असता. आणि पुढच्या पिढ्यांना तुमचा आदर्श मिळला असता, की एका कर्तव्यनिष्ठ राजानं सबलांची शांतता कायम ठेवली आणि फ़ार मोठा रक्तपात टाळला. पण आलेल्या वेळेपुढे आपण काहीच करु शकत नाही हेच खरं!" इतकावेळ गप्प बसलेल्या दु:शासनाला रहावलं नाही, तो आगाउपणे कृष्णाला म्हणाला -"हे यदुवीरा दुतानं फ़क्त निरोप देण्या-घेण्याच काम करावं, त्यातच दुताचा सन्मान असतो. तु कुरुंच्या सिंहासनावर बसलेल्या राजाला नीती शिकवू नये हेच योग्य नव्हे का?" दु:शासनानं आपणहुन मधमाश्यांच्या पोळ्यात हात घातला होता. इतका वेळ नम्रता धारण केलेल्या श्रीकृष्णाच्या कपाळावर एक किंचीत आठी उमटली, श्रीकृष्ण गप्प बसणं शक्यच नव्हतं त्यानं धृतराष्ट्रावरची नजर जराही ढळु न देता, एखाद्या दुर्लक्षित माणसाप्रमाणे दु:शासनाकडे न बघताच त्याचा समाचार घेतला - "मला दूत समजण्याची चुक करु नये, मी पांडवांचा प्रतिनीधी म्हणुन इथं आलोय. आणि कुरुंच्या प्रतिनीधीशी चर्चा करायला आलोय. आणि जो प्रतिनीधी ही नाही किंवा ज्याला युवराज्याभिषेकाचा मुकुटही प्राप्त झाला नाहीये त्याने स्वत:चे आधिकार ओळखले तर जास्त योग्य नव्हे का?" या वाक्यावर संपूर्ण सभा स्तब्ध झाली. धृतराष्ट्राला आपल्या मुलाचा अपमान झालेला आवडला नाही. पण दु:शासनानेच निखार्‍यावर स्वत:हुन पाय ठेवल्याने त्याचे काही चालत नव्हते. दुर्योधन मात्र श्रीकृष्णाला अटक करण्याच्या गोष्टी करु लागला तेव्हा मात्र नाईलाजाने श्रीकृष्णाने त्याचे ’विश्वरुपदर्शन’ दाखवले - "दुर्योधना, सध्या मी तुमच्या ताब्यात नसुन तुम्ही माझ्या ताब्यत आहत. माझ्या हजारो अंगरक्षकांनी हस्तिनापुराचा कबजा केव्हाच केला आहे, ही आगळीक करण्याचा विचारही करु नकोस. शिवाय नगराबाहेर माझी यादवसेना उभी केली आहे." या वाक्यासरशी सगळ्यांच्या पायाखालची जमिनच निसटली. श्रीकृष्णाला आता कोणी काहीही बोलले तर युध्दाची सुरुवात इथुनच होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. सगळ्यांना शांत करुन ध्रुतराष्ट्राने कृष्णाला मानाची वस्त्रे दिली, निरोपाचे विडे देउन ती सभा विसर्जित जाल्याचं त्यानं जाहिर केलं.

नियती गालात हसत होती, तीनं अजुन एक हलका धक्का कालचक्राला दिला होता.
ते फ़िरु लागले होते.



- © सौरभ वैशंपायन(मुंबई).

3 comments:

कोहम said...

chaan lihilay....avadala....ajun pudhe lihinar aahes ka? vachayala avadel

Sneha said...

pls pudhe lihina ajun

Unknown said...

kadak mitra.....