Showing posts with label माझ्या कविता. Show all posts
Showing posts with label माझ्या कविता. Show all posts

Wednesday, January 7, 2015

वाण्याची गोष्ट

आयुष्यात प्रथमच लहान मुलांसाठी काहीतरी लिहीलंय. कविता सुचताना मजा वाटली, पण एकंदर कठिण काम होतं. लहान लहान ८-१० शब्दांचीच कडवी करा, त्यातच यमक बसवा. बोजड शब्द नकोत. त्यात गोष्ट असायला हवी. मोठ्यांच्या दृष्टिने कविता कितीही निरर्थक असली तरी लहान मुलांना मजा वाटून ते त्यांच्या डोळ्यांसमोर उभं रहायला हवं. हे इतकं सांभाळताना मुख्य गोष्ट मात्र पूर्ण बोंबलली, ती म्हणजे लहान मुलांसाठी असल्याने जास्तीत जास्त ५-७ कडव्यांत कविता संपायला हवी होती. माझी एक मैत्रिण म्हणाली "कविता मजेदार आहे, पण लहान मुलांसाठी तू जवळपास "खंड-काव्य" लिहीलं आहेस!" :-D :-D .....  तसं तिच्या म्हणण्यातलं तथ्य मान्य करायला हवं कारण मुलांना एका जागी इतका वेळ बसवत नाही. मात्र तरीसुद्धा ही कविता इतरांना वाचायला द्याविशी वाटली. लहान मुलांच्या एखाद्या कार्यक्रमात कवितेतून गोष्ट म्हणून मात्र ही सादर करता येईल १० मिनीटांची काव्य - नाटुकली टाईप काहीतरी निघू शकेल यातून. :-p

===========

हिरवे नावाचे,
कोरडे गाव,
गावात होता,
पाण्याला भाव.

गावात होता,
हुशार वाणी,
धान्या बरोबर,
विके पाणी.

जमवली त्याने,
भरपुर नाणी,
मुलगी त्याची,
सुंदर शहाणी.

मुलीचं म्हणे,
करीन लग्न,
सुखी संसारात,
होईल मग्न.

पण .....

बबलू टबलू,
गाव-गुंड,
ताडमाड उंच,
चाल थंड.

बबलू बारीक,
टबलू लठ्ठ,
डोक्याने पण,
दोघे मठ्ठ.

बबलू टबलू,
दाणगट फार,
करती चोरी,
देती मार.

बबलू टबलू,
घरात आले,
वाण्याचे सगळे,
पैसे नेले,

वाण्याला लागली,
खूप मोठी चिंता,
मुलीचे लग्न,
कसे होईल आता?

कोण पैसे,
परत आणेल?
बबलू टबलूला,
फटके हाणेल?

गावातला पिंट्या,
कवि - गायक,
लोकांना वाटे,
त्रासदायक.

कविता करी,
फार टुकार,
लोक म्हणती,
बेकार बेकार.

आवाज त्याचा,
खूप भसाडा,
काचा फुटती,
जाऊन तडा.

वाण्याला सुचली,
मोठी युक्ति,
गुंडांपासून,
मिळेल मुक्ति.

पिंटूला बोलावुन,
केला प्लॅन,
पिंटू बसला,
लावून ध्यान.

वाणी गेला,
बबलूकडे,
पैज लावली,
सोन्याचे कडे.

पैज होती,
भलतीच धीट,
पिंटूच्या कविता,
ऐकायच्या नीट.

बबलू गेला,
पिंटूसमोर,
कवितेला म्हणे,
देईन वन्समोअर.

कविता ऐकुन,
मोजुन पाच,
बबलू झाला वेडा,
करु लागला नाच.

टबलूला ह्याचा,
आला राग,
हिरवे गावात,
भागमभाग.

पिंटुची त्याने,
पकडली मान,
पिंटुने घेतली,
मोठी तान.

टबलूचे फुटले,
दोन्ही कान,
कानात बोटे,
सोडली मान.

बबलू टबलू,
दोघे मिळुन,
गावाबाहेर,
गेले पळुन.

 - सौरभ वैशंपायन

Wednesday, December 17, 2014

आशा

ऑक्टोबर २०१० मध्ये मी अफगाणिस्थान वरती "दुर्दम्य" म्हणून अगदिच छोटा लेख लिहीला होता. एक अफगाण मुलगा "कब्रस्तानात" ऊभा राहुन पतंग उडवण्याची "मजा" घेतोय असा तो फोटो होता. त्या फोटोचा परीणाम माझ्यावरती अजूनही असेल असं वाटलं नव्हतं. २ दिवसांपूर्वी तेच चित्र जसंच्या तसं आठवलं आणि पुढील कविता सुचत गेली.
=================


दूर जाती रक्तरेषा
ओसाडलेल्या तप्त देशा,
चालत्या कलेवरांच्या
डोळ्यात उमटे मौन भाषा ||१||

आक्रोशुनि निस्तब्ध झाल्या
खुणा थडग्यांच्या अशा,
डोळ्यातुनी अश्रु हरवले
हरवल्या रस्त्यांच्या दिशा ||२||

पाऊस आगीचा का पडावा?
का पडावी पदरी निराशा?
का भीतीने गोठुन जावी
क्षितिजावरी हसरी उषा? ||३||

बुलबुलाने बेभान गावे,
विसरुनी अडकल्या हिंस्र पाशा,
पतंगाने उंच जावे,
सोबतीला घेऊन आशा ||४||

- सौरभ वैशंपायन

Sunday, December 14, 2014

।।प्रतिभा।।


कोण अशी तू? कुठे निघालीस?
इथे कशी तू? चांदणवेळी?
चिंब कशी तू? दवात न्हालिस?
कुंतल ओले रुळती भाळी - १

अंधाराचे वसन लपेटुन
आलिस कोठुन उत्तररात्री?
प्रलय-निर्मिति, शांति - भ्रांति
घेऊन भिडलिस येऊन गात्री - २

अंधाराच्या वसनावरती
जरतारी चांदण नक्षी,
उडुगणांच्या आधाराने
भरारणारा प्रवास पक्षी - ३

थांब जराशी, निसटुन जाशी,
घेउन चुंबन दुरावशी का?
शकुंतला तू? की उर्वशी?
की यक्ष विरहिणी अभिसारिका? - ४

आवाज कसला मंजुळ मंजुळ?
पैंजण तर तू ल्याले नव्हते,
गुंगी कसली? शुद्ध हरपली
पण मधुरसांचे प्याले नव्हते - ५

कुशी बदलता डावी जराशी,
कर्णफुले तुझी खुपली अंगी
काय टोचले? पापणी उचलता
तु निजलेली मम वामांगी - ६

घेऊन जवळी तुज, मिटले डोळे,
पूर्व क्षितिजावर केशर आभा
जे घडले ते स्वप्नी राहीले
कागदावरती उरली "प्रतिभा" - ७

 - सौरभ वैशंपायन.

Monday, October 13, 2014

।।मुक्ति।।


अज्ञाताच्या वाटेवरती,
जीव खाऊनी मी पळतो,
कोSहम्? कोSहम्? प्रश्न सदोदित,
रात्रंदिन मजला छळतो - १

किती जन्माचे फेरे गेले?
देह मज मिळतो-जळतो,
किती पुण्य गाठीला आहे?
की पापाने आत्मा मळतो? - २

धाप लागता क्षणिक थांबुन,
अदमास घ्यावया मी वळतो,
दूर तिथे कुणी ऊभा सावळा,
अन् मुक्तिचा मतलब कळतो - ३

- सौरभ वैशंपायन

Monday, September 1, 2014

पावनखिंड




आषाढाची रात्र वादळी,
चाले मनात थैमान,
करकर करकर लवती झाडे,
जणू प्रमत्त सैतान - १

पन्हाळ्यात त्या चाले लगबग,
उडली का लग्नाची धांदल?
स्वतंत्रतेचे लग्न "शिवाशी",
वरातीमधुनी सहाशे बांदल - २

अंधाराच्या घोंगडीवरती,
वीजा रेखती लखलख नक्षी,
रात्र विषारी जहरी काळी,
डोह कालिया यमुना वक्षी - ३

कंसाचे पहारे बसले,
अडकुन पडला देवकीनंदन,
कालियांनीच भरले डोह,
कसे करावे यमुना लंघन? - ४

उडी घेतली डोहामध्ये,
कालियाचे करण्या मर्दन,
ओढुन तोडुन जहरी विळखे,
निसटुन जाई कृष्ण प्रतर्दन - ५

क्षण क्षण जवळी येता मृत्यु,
अपुला परका कुणी बघेना,
राजा अमुचा जगावेगळा,
शिवरायाचा पाय निघेना - ६

मरो लाख पण हवा जगाया,
लाखांचा पोशिंदा नेता,
उडवा तितुक्या तीनदा तोफा,
खेळण्यावरी तुम्ही पोचता - ७

धरुन ओंजळ ज्योति भवती,
नाव सोडली दर्यावरती,
फुंकर घाली तो वडवानल,
त्यात समुद्रा उधाण भरती - ८

आल्या आल्या लाटा आल्या,
उठली आरोळी दीन! दीन!!
हर महादेव! प्रत्युत्तर आले,
कंठामधुनी शेकडा तीन - ९

खिंडीतुन त्या रुद्र उतरला,
पाठीमागे तीनशे भैरव,
करु अभिषेक रिपू रक्ताचा,
या मातीला देउ गौरव - १०

मृत्युही सरकुन व्हावा मागे,
अशी फिरे तलवार,
खिंडीला त्या रोखुन धरले,
प्रहर उलटले चार - ११

जखमांनी तो देह विव्हळता,
महाभारत पुन्हा घडले आजी,
व्यूहचक्रातील कौरव जौहर,
सौभद्र पुन: अवतरला बाजी - १२

झाली इशारत उडल्या तोफा,
राजा माझा आहे सुखरुप,
सार्थक झाले आयुष्याचे,
जगण्याचे ना उरले अप्रुप - १३

श्वास अडकला कंठामध्ये,
थांबले हृदयाचे स्पंदन,
लांघुन गेले जीवन रेषा,
ना तुटले मातीचे बंधन - १४

क्षण क्षण करीता सरली शतके,
खिंड जाहली इथेच पावन,
साक्ष अजुनी देते येथील,
खळखळणारे निर्झर जीवन - १५

- सौरभ वैशंपायन

Tuesday, June 17, 2014

वर्षाऋतु


सीताहरण झाल्यावर तिचा शोध घेता घेता श्रीराम - लक्ष्मण माल्यवान पर्वतावर पोहोचले. याच दरम्यान वर्षाऋतु सुरु झाला. आद्य कवि वाल्मीकिंना देखिल रामाच्या मुखातुन वर्षाऋतुचे कौतुक लक्ष्मणाला ऐकवण्याचा मोह आवरला नाही. वर्षाऋतुचे तोंड भरुन कौतुक करताना देखिल रामाला सीतेचा विरह जाणवतो आहे.

===============

जणू आसन्नप्रसवा गर्भधारिणी,
मार्ग क्रमती मंदगामिनी,
धारण करुनी गर्भि जलाशय
तनु अलंकारली सौदामिनी ।।१।।

नभ उतरले गिरिशिखरावर,
पाय-या जणू या सौमित्रा,
चढुन जावे क्षणिक झरझर
बलाकमाला द्यावी मित्रा ।।२।।

भरुन ओंजळ घ्यावी ज्याची,
गंध केतकी असा चिंब अन्
माखुन घ्यावा गंध मातीचा,
घमघमुन जावे कुटीर अंगण ।।३।।

लगडुन आले थेंब बिलोरी,
झुकुन गेला तो जांभुळ बघ,
मागला निसटला झाडावरुनी,
रंग तयाचे किती मोज बघ ।।४।।

केकारव करती मोर आम्रवनी,
उडती चक्रवाक अन् बगळे,
हिरव्या गार तृण शालीवर,
इंद्रगोपांची लाल ठिगळे ।।५।।

माल्यवान गेला मदात झिंगुन,
सृजनास लागते काय आणखि?
धरणीच्या तापल्या श्वासासारखि
जळत असेल जानकी, हाय! मम सखि ।।७।।

- सौरभ वैशंपायन

Monday, June 9, 2014

बाहुली

सुखदेव - भगतसिंगांबाबत एक छान "दंतकथा" सांगितली जाते की, त्यांनी काहि कुटुंबांना रावीच्या महापुरात उड्या घालून वाचवले होते. एका कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवल्यावरती त्यातली एक लहान मुलगी खूप रडून गोंधळ घालू लागली सारखी पाण्याच्या दिशेने धावू लागली. काही केल्या ती गप्प होईन ना. मग भगतसिंगांना समजले की ज्या घरातून त्यांना वाचवले तिथे त्या छोटिची बाहुली राहिली आहे. तिचं रडणं न बघवून त्या दोघांनी पुन्हा पुराच्या पाण्यात उडि मारली आणि ती बाहुली आणून दिली. चिखलाने बरबटलेली बाहुली बघून देखिल ती मुलगी हसली व चिखलाने माखलेली ती बाहुली तीने घट्ट कवटाळली. ते बघून सुखदेव - भगतसिंगांना क्षणभर वाटून गेलं की एका निर्जीव बाहुलीसाठी इतका जीव टाकते आणि आपण आपल्या मातृभूमीसाठी काहितरी केलं पाहिजे. ही दंतकथा आहे हे माहित असून त्यावर कविता कराविशी वाटली.
= = = = = = = = = = = = = = = = = = = =

ध्रोंकार करत मग अशी निघाली रावी,
तोफेतून बारुद जशी फुटावी,
ओढ तीज अनिवार वाहिला ऊत,
जलौघात शिरले दोन मायचे पूत ॥१॥

सरसरत अंतर कापत पाणी गहिरे,
लोटित पाणी मागे, चुकवित भवरे,
दो तीरावरती जन अचिंबित होत,
जलौघात शिरले दोन मायचे पूत ॥२॥

वादळवार्‍या समोर जणू चिमुकले घरटे,
तसे उधाण पाण्यामधले गाठले घर ते,
जणू तुफानाशी लढू लागली ज्योत,
जलौघात शिरले दोन मायचे पूत ॥३॥

दिसली कोपर्‍यात बाहुली निवांत निजलेली,
चिखलात माखली पाण्यात चिंब भिजलेली,
घेऊन प्राण सानुलीचा परतले दूत,
जलौघात शिरले दोन मायचे पूत ॥४॥

धावली चिमुकली पाहताच बाहुली,
कवटाळली उराशी जणू ही तिची माऊली,
का रे मम देशासाठी जीव असा न होत?
तत्क्षणी शहारुन आले मायचे पूत॥५॥

 - सौरभ वैशंपायन

Friday, March 7, 2014

आधार

एका सैनिकाच्या नववधूच्या बाबतीत लिहायचा प्रयत्न आहे. लग्न झाले त्याच उत्तररात्री तो तिला सोडून सीमेवर गेला आहे, त्यालाही अनेक महिने उलटून गेले आहेत अश्या पार्श्वभूमीवरची ही कविता आहे. call of duty शी संबधित कल्पना अनेकांनी कवी - लेखकांनी मांडल्या आहेत. शेक्सपिअरने क्रेसिडा - ट्रॉयलस ची कथा अशीच मांडली आहे, तरीही ही नावं अनोळखी वाटली तर "दिल चाहता है" मधला प्रिटी - अमीरचा ऑपराचा सीन आठवा ..... तीच क्रेसिडा - ट्रॉयलस ची गोष्ट. आपल्याकडे सावरकरांनी देखिल "कमला" काव्यात पहिल्या रात्री आपल्या नववधुला सोडून पानिपतावरती जाणारा मुकुंद रंगवला आहे. "बॉर्डर" चित्रपटातील सुनिल शेट्टीने रंगवलेल्या कॅप्टन भैरव सिंगना आठवा, ती तर १९७१ ची सत्य घटना आहे. तसाच काहिसा प्रयत्न :-)

=============================

जाणवे प्रिया मज पाठी,
स्पर्ष भिंतीचा गार,
उष्ण श्वास ओठांशी
अन्‌ देहामध्ये अंगार ॥१॥

ही रात्र लक्ष तार्‍यांची
तो चंद्र वाहतो भार
तु दिले स्पर्ष सुगंधी
वाहती केशसांभार ॥२॥

रात्रीच्या त्रियाम प्रहरी,
पोचलास अलगद पार
उदास किणकीण ताल
अन्‌ शुष्क उशाशी हार ॥३॥

प्रिया तुजविण नाही,
दुजा जीवा आधार,
विरहले हात हातातून
त्या ऋतु जाहले चार ॥४॥

- सौरभ वैशंपायन.

Saturday, October 6, 2012

अक्लेश केशव मंजरी तिलकम् - अनुवाद

"अक्लेश केशव मंजरी तिलकम् - अष्टपदी" म्हणून जयदेव या ओरिसामधील कवीची एक काव्य रचना आहे. राधा हे काल्पनिक पात्र कृष्ण चरीत्रात आणण्याची कल्पना जयदेवांची समजली जाते. त्यांनी श्रीकृष्ण - राधेवरती गीत-गोविंद हे अध्यात्मिक आणि तरीही शृंगार रसाने परीपूर्ण असे काव्य रचले. माझ्या एका मित्राने - अंबरीश फडणवीस याने त्यातली अष्टपदी मला मराठीत पद्य अनुवाद करायला दिली. या काव्यात राधा किंवा गोपी म्हणा श्रीकृष्णा बरोबर आदल्या रात्री केलेल्या रतीक्रिडेबाबत आपल्या सखीला सांगते आहे अशी कल्पना आहे. मी अर्थात शब्दश: अनुवाद केला नाहीये, एखाद दुसरी गोष्ट जाग सोडूनही गेली आहे. शिवाय अष्टपदी मधली सातच पदे मी घेतली आहेत कारण आठव्या पदात तुका म्हणे - नामा म्हणे तसं जयदेवांनी स्वत:चेही "म्हणे" घातले आहे आणि स्वत:ला लक्ष्मीचा भक्त संबोधुन हे काव्य सगळीकडे सुख शांती पसरवो असेही म्हंटले आहे.

अनेकांच्या दृष्टिने हि कविता अब्रह्मण्यम्‌ होऊ शकते. पण ह्याचा अर्थ शृंगाराला आपली संस्कृती किती रसिकतेने घेत असे हे देखिल समजण्याचा उत्तम मार्ग आहे. श्री आदि शंकराचार्यांनी देखिल शिव-पार्वतीच्या प्रणयलीलांचे वर्णन केले आहे. पार्वती - लक्ष्मी यांचे तर केसापासून ते नखापर्यंत "आपादमस्तक" म्हणतात तसे अत्यंत शृंगार पूर्ण वर्णन श्लोकांत केल्याचे आपल्याला दिसते, पण त्यात कुठलीही वासना नसून केवळ स्तुती आहे. ह्या गोष्टि लक्षात घेतल्या तर मग खजुराहोतील कामुक शिल्पेही सुजाणपणे व रसिकतेने बघता येतील आणि इतिहासाचार्य राजवाड्यांचे भारतीय विवाह संस्थेचा इतिहास वाचतानाही बिचकायला होणार नाही. कवीश्रेष्ठ कालिदासाने मेघदूतात तर ठिकठीकाणी अशी चुरचुरीत किंवा चटका लावणारी विरहाची किनार असलेल्या शृंगाराची पेरणी केली आहे.

भारतीय अध्यात्माला व्यक्त व्हायला कुठेही बंधने नाहियेत मग तो जयदेव - आदी शंकराचार्यांनी मांडलेला शृंगार असेल किंवा भर ’रणांगणात’ सांगितलेली गीता असेल.

तर इतकि प्रस्तावना अशा करीता कि मी कुठल्या पार्श्वभूमीवरती हि कविता करतो आहे हे तुम्हांला समजायला हवं. तरीही हे कुणाला अश्लिलतेने भरलेले वाटल्यास एकच सांगणे - मुळ काव्यासमोर माझा पद्यानुवाद फारच "पांचट" आहे.
=========================




शांत सभोवती रात्र सजणी, दूर सजले एकाकी उपवन,
अंधाराची लेवून कांती, हसतो कामूक श्यामल मोहन,
लपाछुपीचा खेळ चालला, चंचल त्या प्रणयाच्या रात्री,
मिठीत अचानक खेचून घेता, अनाम वादळ उठले गात्री ॥१॥

कामातुर स्पर्षाने त्याच्या, रोम-रोम उठले होऊन पुलकित,
कुरवाळित सांगे नकोस लाजू, नकोस होऊ उगा भयचकित,
प्रणयी गुंजरव करु लागले, मिठीस त्याच्या  घेई लपेटून,
मृदु शब्दांनी तया सुखविता, वस्त्र कटीचे गेले निसटून ॥२॥


अन्निजवले मजला त्याने, मऊ तृणांच्या शय्येवरती,
उरोज उन्नत तये चुंबिले, विसावला क्षण त्यांच्यावरती,
निरवसनी देहावर अवघ्या, सख्याचे प्रणयी हात फिरती,
उचलुन अधोमुख सल्लज चेहरा, करी दंतक्षत अधरावरती ॥३॥

प्रणयक्रिडेने म्लान होऊनी, मिटे पापणी होऊन हर्षित,
चिंब जाहले शरीर स्वेदे, तनु दोघांची होई कंपित,
मदन शरांनी दोघे जखमी, मिलन सुखाची झाली घाई,
देह बिलगता नसे विलगता, निशा धुंद मग सरकत जाई ॥४॥

सित्कारातुन प्रणय वेदना, केली जाहीर, जणू कपोत घुमतो,
प्रणयचतुर प्रियकर माझा, मला रिझविण्या अश्रांत श्रमतो,
केसांमधली कुसुमे चुरली, बटा पसरल्या धरणीवरती,
प्रणयाराधनेत येई आर्तता, नखे उमटली वक्षांवरती ॥५॥

रुणझुणणारे चुकार पैंजण, नाद तयांचा वाढत गेला,
मीलनसुखासी सेवित असता, कटिवरली तुटे मेखला,
अंबाड्यासी देता हिसका, मुक्त जाहले केस बांधले,
जवळ घेऊनी दिली घेतली न आठवी कितीक चुंबने ॥६॥

मृदु शय्येवर निवांत निजले, ओठ बिचारे होत कुसुंबी,
संभोगाचा शीण हराया, शरीर पहुडले पृथुल नितंबी,
अर्धे मिटले नयन तयाचे, नील कमलदल जणू उमलले,
नवी चेतना फुलली तेव्हा, मदनमोहना पुनश्च भुलले. ॥७॥

 - सौरभ वैशंपायन.

Tuesday, March 27, 2012

उत्तर

गर्भरेशमी वस्त्र त्यावरी,
काठ जरीचे सळसळते,
वेळ एकटि अबोल साजण
चुकार कंकण हळहळते ॥१॥

अबोल साजण अबोल हसता
हुरहुरते पाऊल वळते
मी सांगावे तू ऐकावे
शब्दाविण खूण कळते ॥२॥

अता उरावे अता सरावे
दिव्यातले अत्तर जळते,
मिणमिण मिटते ज्योत लाजरी
 एक क्षण नजर मिळते ॥३॥

हळूच यावे मिठीत घ्यावे,
स्पर्शास बावळे मन चळते
असा दुरावा कसा उरावा?
मिठीतलेही अंतर छळते ॥४॥

रातराणीचा गंध मनावर
तनावरती दव गळते
फुले अवेळिच पारीजात का?
प्रश्नाविण उत्तर मिळते.॥५॥

- सौरभ वैशंपायन.

Wednesday, April 27, 2011

पुन्हा .....

पुन्हा ती नव्याने आली समोरी, पुन्हा जागली जुनी अंतरे!
पुन्हा खेळ चाले नव्याने सुखाचा, जुन्या वेदनेला ना अंत रे ॥धृ॥


असे काय झाले? कळेना कुणाला, परी सांभाळली उरी खंत रे,
नवी पालवी ही जुन्या भावनेला? कि अखेरीस पुन्हा आकांत रे? ॥१॥


पडावा कवडसा तिच्या आठवांचा? पुन्हा न व्हावी दिक्‌ - भ्रांत रे!
अस्वस्थतेने मी असा वेढलेला जरी भासवितो वरी शांत रे. ॥२॥

 - सौरभ वैशंपायन.

Thursday, March 10, 2011

"तू"

भरतीच्या दर्याच्या गाजेसारखी, तू
पायीचे पैंजण-घुंगरु वाजे तशी, तू
लाजाळू बुझताना लाजे तशी, तू
वेलीवरती इवले फुल साजे तशी, तू

श्रावणाचा रंगलुब्ध इंद्रधनू, तू
पावसात चिंब स्तब्ध गौरतनु, तू
निळ्याशार डोहातले प्रतिबिंब, तू
निळ्यागर्द नभामधले चंद्रबिंब, तू

 - सौरभ वैशंपायन

Sunday, February 20, 2011

आंदण.

वर पौर्णिमेचा चंद्र,
कसा ओततो चांदणं,
तुझ्या गुलाबी ओठात,
डाळिंबी कोंदण. ॥१॥


माझ्या मनाचे हे खेळ?
कि खरेच वाजते पैंजण?
राधेसाठी जणू कान्हा,
तसा झुरतो साजण ॥२॥

नाजूक बोटांवर मेंदी,
जणू नक्षत्र गोंदण,
सये ओवाळला जीव,
दिलं आयुष्य आंदण. ॥३॥

 - सौरभ वैशंपायन.

Friday, January 7, 2011

अशी हिवाळि संध्या ....

संध्येचे केशरी रंग, अन्‌ दव माझ्या पायाखाली,
तिचे रेशमी स्पर्ष, लज्जा आरक्त गुलाबी गाली,
वादळे किती लपलेली, झुकल्या नजरे खाली,
अशी हिवाळि संध्या, तिचीया मिठीत निमाली.


- सौरभ वैशंपायन.

Tuesday, September 21, 2010

बुध्द !



जगलो काल पावतो, जणू अनिरुध्द मी,
जोर ना चाले कुणाचा, ना कुणाशी बध्द मी.
बांधिल मी माझ्या मनाला, अंतरातील युध्द मी,
संगराच्या मध्यभागी, शांत निजला बुध्द मी ॥१॥



वज्र अस्थिपंजराचे, दान देण्या सिध्द मी
तोडती लचके गिधाडे, ना तरीहि क्रुध्द मी,
सोहळे ना सोवळ्याचे, निष्कलंक शुध्द मी,
संगराच्या मध्यभागी, शांत निजला बुध्द मी ॥२॥

- सौरभ वैशंपायन.

Monday, August 2, 2010

पाऊस फुल्ल!

रात्री बेरात्री जोरदार पाऊस सुरु होतो, त्याच्याच आवाजाने जाग येते. मग कोसळणार्‍या सरींचा आवाज बराचवेळ झोपु देत नाही. अश्यावेळि कुशी बदलत बराच वेळ निघुन जातो ..... बाहेर पावसाचा जोर कमी होतो मग झाडावरुन, छतावरुन एकाच जागी टपटपणार्‍या थेंबांचा एका ठराविक लयीतला आवाज तेव्हढा ऐकु येत रहातो .... कुणा रुणझुण रुणझुण चालणार्‍या नाजुक पावलांगत... मग परत पेंग येऊ लागलेलीच असताना अचानक दोन - चार शब्द सुचतात, परत झोप उडते पुढचे शब्द शोधायला मन दहा दिशांना पळतं .... बर्‍याच वेळाने कदाचित चारच ओळि तयार होतात पण त्यातही मजा वाटते. चटकन बाजुचा मोबाईल उचलायचा आणि ड्राफ्ट्स मध्ये त्या चार ओळि रोमन मराठित टाईप करायच्या. पण अश्या ओळि मग हरवुन जाऊ नयेत म्हणून त्या अश्या एकत्र करायचा प्रयत्न .... उडणार्‍या कागदांवरील पेपरवेट सारखा. यापुढे २ महीने सुचतील तश्या पावसावरच्या ओळी इथे देत जाईन. हळुहळु पावसाळ्यावरिल ओळिंची मैफिल जमेल आणि मोसमातील शेवटची सर बरसून गेल्यावर "पाऊसफुल्ल" चा बोर्ड लागेल .... पुढल्या पावसाळ्यापर्यंत!

- सौरभ वैशंपायन.

=================

पाऊस तिथे बाहेर,
पाऊस माझ्या अंगणात,
चिंब ओली तू,
उभी माझ्या मनात.

=================

गुढ गाऽऽर धुके,
डोंगरावर ढगांची झुल,
हातात तुझा नाजूक हात,
त्यात अशी ही रानभूल !

=================

बाहेर रीमझीम पाऊस,
आत मोहरलेली गात्र,
जळणारा अत्तरदिवा,
सुगंधु लागलेली रात्र.

=================

हेवा वाटतो थेंबांचा,
सुदैव त्यांच्या भाली,
नभातुन निसटलेले,
उतरले तुझ्या गाली.

=================

Friday, July 30, 2010

म्हणूनच एकदा .....

नाही आवडत मला .....
मी तुझ्या समोर असताना, तू त्याची वाट पहाणं,
त्याच्या येण्याकडे तुझे डोळे लागले असतात,
सगळं लक्ष खिडकितुन बाहेर.... त्याच्याकडे,
तो ही आधी मग तुला बराच झुलवतो,
आणि एका क्षणी अचानक येऊन उभा ठाकतो,

नाही आवडत मला .....
तो आलेला पाहिला कि तुझं धावत बाहेर जाणं,
मग तो सुध्दा तुला फार आवेगानी मिठीत घेतो,
नाही आवडत मला चारचौघात तुझ्या शरीराशी त्यानं असं झोंबलेलं,
तुला मात्र कसलीच तमा नसते,
त्याला पाहीलस कि तुला तुझं भानच रहात नाहि.

मग तु मनमोकळं हसायला सुरवात करतेस.
अश्यावेळि मला त्याचा राग येतो हे त्याला माहीती आहे,
त्याने त्याला अजुनच चेव येतो,
मला वाकुल्या दाखवत तो तुला अलगद कवेत घेतो.

म्हणूनच.... म्हणूनच एकदा,
त्याच्याच समोर तु मला किती आवडतेस हे सांगायचय एकदा,
म्हणूनच तू सोबत असताना "त्याच्या" येण्याची वाट मी बघिन,
म्हणूनच तू सोबत असताना "पाऊस" येण्याची वाट मी बघिन !!!

- सौरभ वैशंपायन.

Friday, July 9, 2010

पावसाळा

ऋतु पावसाळा, अशी सांजवेळ,
वीजांचा-सरींचा हा चालेल खेळ,
तुला आठवुनि अशी चिंब ओली,
बरसल्या सरींची कशी ओळ झाली.

Saturday, March 20, 2010

सप्तपदि

"तीची" कविता लिहिण्याचा प्रयत्न आहे.

___



स्तब्ध – लुब्ध दिन रात, थेंब थेंब पावसात,
चाहूल नव्या इंद्रधनुची, चिंब खुळ्या आकाशात – १


तू हि नवा मी हि नवी, अर्थ नवेला स्पर्शात,
तुझ्या आठवणींचा सडा, रोज राती अंगणात – २


मऊ सागराचा काठ, माझी सप्तपदि त्यात,
लाटा अंतरीच्या माझ्या, उमटल्या अथांगात – ३

-सौरभ वैशंपायन.

Tuesday, February 23, 2010

चांदणे

कपाळी चांदव्याची कोर,
डोळि शिंपिले चांदणे,
चांदण्याचे डोळे भोर,
कसे वागावे शहाणे? - १


नाहि फिकिर जगाची,
धुंदित आपुल्या रहाणे,
अजुन किती दिन असे
नशिबी दुरुन पहाणे? - २

- सौरभ वैशंपायन.