Tuesday, March 15, 2011

एका जंगलाची गोष्ट.





त्या उंच डोंगरमाथ्याभोवती पावसाळ्यात खूप काळे ढग जमा व्हायचे. यात्रेला यात्रेकरुंची झुंबड उडावी तसेच. आणि एकदा का पाऊस लागला कि किमान २-३ दिवस सतत बरसत रहायचा. अविश्रांत. वीजांचा जोर तर इतका वाढायचा कि तिच्याकडेच झेप घेत आहेत कि काय अशी वाटणारी  उंच शेंड्याची चार –दोन वेडि झाडे ती हमखास आडवी करायची. पण पावसाच्या आवाजात त्यांचे गेलेले बळी कुणालाच समजायचे नाहीत.  बाजूची झाडे सुध्दा अंग चोरुन उभी राहिल्यागत असायची. त्यांच्या पानांवरुनही अहोरात्र पाणी खाली ठिबकत रहायचं, मग डोंगरमाथ्यावरचं ते मातकट पाणी शेकडो ओढ्यांतून हजार दिशांना पांगायचं. पण बहुतेक ओढे डोंगराच्या पश्चिमेलाच जायचे, एखादाच वाट चुकला ओढा खुळ्यासारखा उगीच इकडची – तिकडची वाट धरायचा. सुरुवातीला वेगवेगळे धावणारे ओढे एका खोलगट ठिकाणी शहाण्यासारखे शिस्तीत एक व्हायचे आणि पश्चिमेच्या त्या रौद्र-रम्य कड्यावरुन मग तो एकसंध जलप्रपात घोंघों करत खालच्या दरीत उतरायचा. त्याच्या काही धारा टप्पे घेत उतरायच्या काही धारा मात्र सरळ दरीच्या खोल खोल अंधारात उडि घ्यायच्या. पण त्या खालपर्यंत पोहोचायच्या कि मध्येच त्यांचेही तुषार हवेत विखरायचे ते माहित नाही. कारण ती दरी होतीच तशी. शेकडो किंवा कदाचित हजारो वर्ष अस्पर्ष असलेली. तीचा बहुदा थांगच नसावा. थेट पाताळाचा रस्ता इथुनच सुरु होत असावा. प्रकाश सुध्दा तिच्या तळाला स्पर्ष करत नव्हता. इतकि खोल.


याच डोंगरा भोवती चारही बाजूंना नजर जाईल तिथवर पसरलेलं जंगल होतं. बारा मास हिरवंगार असायचं. आणि पावसाळा सुरु झाला कि गडद हिरवा रंग पसरायचा. इतका गडद कि कधी कधी गच्च झाडि काळपटपणाकडे झुकायची. डोंगरावर मन भरेतो कोसळल्यावर मग उरलेलं पाणी शिंपत ढग या जंगलावरुन पुढे सरकायचे. मग झाडांच्या खोडांवर सुध्दा शेवाळं चढायचं. मातीवर उतरलेल्या पहिल्या पावसाचा गंध जंगलभर पसरायचा. सगळं गार गार व्हायचं, बरचसं दमट सुध्दा. पावसाचा थेंब बसल्यावर काही झाडावरच्या शेंगा रागवल्याप्रमाणे तडकायच्या आणि त्यातल्या बीया चौफेर उडायच्या, बर्‍याचश्या त्याच झाडाखाली तर काहि आसपासच्या वीतभर झर्‍यांत पडून दुर वहात जायच्या. त्या वहाणार्‍या झर्‍यांतुन लहान मोठे अनेक जातींचे बेडुक रात्रंदिवस डराव डराव करत रहायचे. दिवसा जंगल शांत होतं असं वाटावं इतका आवाज रात्री वाढत असे. कुठलाही ऋतु असो, रातकिडे अहोरात्र किर्र किर्र करायचे. मग रातव्यांनाही जोर चढायचा. जंगलाच्या वेगवेगळ्या टोकांतून रातवे सलग ओरडत रहायचे.


रात्रभर भिजून गारठलेली माकडं सकाळ झाली कि अंग झटकायची. ढगाळ आकाशात सूर्याचा पत्ता नसायचाच. पण प्रकाश पाहिला कि ती आपोआप हुशार व्हायची. त्यांच्या आडदांड म्होरक्या सर्वात आधी त्याच्या हद्दितल्या सर्वात उंच झाडावर चढून छाती फुगवुन हुप्पऽऽ हुप्पऽऽ हुप्पऽऽ असा आवाज द्यायचा. काहि क्षणात जंगलातल्या विविध भागातून दूरुन तसेच काहीसे आवाज यायचे. हा सीमा ठरवण्याचा रोजचा दिनक्रम, एखाद्या दिवशी जंगलातल्या एखाद्या भागातून असा आवाज आला नाही तर पुढच्या दोन दिवसातच शेजारच्या हद्दितला एखादा मस्तवाल लांब सुळ्यांचा नर वानर सहा – आठ दांगट साथीदारांसककट दबकत अदमास घेत त्या हद्दित शिरायचा आणि मग त्या हद्दिमधील  निर्नायक टोळिवर वारंवार हल्ले करुन त्यांना जेरीस आणायचा. लहान पिल्लं चावे घेऊन मरायला सोडली जायची. पिल्लं मेली कि आपोआप माद्या या नव्या नायकाला स्वीकारयच्या. मग पुन्हा नव्याने हद्द मांडली जायची. अधिक माद्या, अधिक फळे, नव्या नायकाची नवी प्रजा. हे चक्र पिढ्या दर पिढ्या असंच सुरु असायचं.


बिचकण्यासारखं यात काही नव्हतं निदान जंगलातले नियम असेच असतात. क्रूर, चूकिला सहसा माफी न देणारे. पण त्यालाही चौकट होती. एकदा मोठी शिकार केली कि वाघ सुध्दा चार दिवस कुणाच्या वाटेला उगीच जात नसे. हो त्या निबिड  दरीत ५-६ वाघरु देखिल होती. बरेचसे बिबटे होते. सीमांवरुन यांच्यातही संघर्ष व्हायचाच. पण एरवी शिकारीच्या घटना सोडल्या तर जंगल शांतच म्हणावं लागेल. अर्थात वाघ शिकार करताना आवाज फारसा होतच नसे. शेवटच्या काही क्षणांमध्ये जी झटापट होई तितकिच, पण एकदा का हरणाचं – सांभराचं नरड मजबुत जबड्यात आलं कि सगळं आपसूक शांत होत असे. हां आता एखाद्या मोराने किंवा भेकराने मात्र वाघाची चाहुल लागल्याची हुल उठवली कि बघता बघता समोरचं कुरण मोकळं व्हायचं. काटकुळ्या पण मजबुत पायांनी लांब लांब उड्या टाकत बघता बघता ती हरणं जंगलात गायब होत. मर रागा रागाने वाघ शेपटिचा काळा गोंडा आपटत बसायचा. क्वचित संतापुन डरकाळिही फोडायचा. झाडावरचं एखादं कमनशिबी माकड बेसावध असेल तर दचकुन बिचार खाली भेलकांडायचं, कि मग त्याला वाघाने दबोचलाच समजा. पण असं फार म्हणजे फारच क्वचित व्हायचं. 


शिकार कराताना आवाज व्हायचा तो शिकारी कुत्र्यांमुळे. म्हणजे आवाज त्यांचा नसे … त्यांच्या शिकारीचा असे. दहा-बारा जणांचे टोळके घेरुन सावज लोळवत आणि त्याला जिवंत फाडायला सुरुवात करत. जीव जाईतो ते बिचारं कोकलायचं. आधी रानटि कुत्री डोळ्यांवरच हल्ला करत कि आंधळि शिकार हतबल होऊन खालीच बसकण मारायची आणि मग त्याच्या देहाचे लचके तोडून कुत्री पोट तट्ट होईपर्यंत खायची. पण हे सगळं स्वत:साठी नसायचं बरं, हि कुत्री मग एखाद्या उंचवट्या आड लपलेल्या गुहे समोर जायची व ते खाल्लेलं तिथे ओकायची कि दोन वीत  उंचीची नुकतीच मांस खायला लागलेली पिल्लं त्यावर तुटुन पडायची बघता बघता ते संपायचं आणि पिलांची पोटं टम्म झालेली असायची.


जंगल फार फार सुरेख होतं. वड, पिंपळ, जांभुळ,मोह, देवदार, अर्जुन, ऐन, साग, पळस, बाभळि, आंबा असे भरभक्कम वृक्ष होते. उन्हाळ्यात पळस आणि गुलमोहोर फुलला कि जंगलाचा तो भाग वणवा लागल्यागत दिसे. शाल्मलीच्या शेंड्यांवरुन पांढरट म्हातार्‍या भिरभिरत दूर कुठेतरी प्रवसाला निघायच्या. यावेळि ओढ्यांतलं पाणी आटायचं मग जंगलातल्या आतल्या भागात जिथे वर्षभर पुरेल इतकं पाणी साठलेलं असायचं त्या निसर्ग निर्मित पाणवठ्यांवर सगळ्यांची हजेरी लागायची. पण इथे रुबाब चालायचा तो मस्तवाल गव्यांचा. त्यांच्या येण्याजाण्याने जंगलात चारही दिशांना पायवाटा बनायच्या. पिलांना मध्ये ठेवुन १२-१५ जणांच वजनदार टोळकं शेपट्या उडवत निघालं कि वाघही आडवा येत नसे. मग तळ्याशी येऊन खालचे पांढरे पाय तितके पाण्यात बुडवुन ते मन भरेतो पाणी पीत. मात्र दोघे जण कान हलवत, ओली नाकं सगळ्या दिशांना वळवत दुसर्‍या  प्राण्यांची चाहुल घेत. मग बाकिचे मागे सरत व ते पुढे होऊन पाणी पित. समोरच्या  काठाला कधीतरी एक खुळचट रानडुक्कर उगीच ओली माती उकरत बसायचं.


त्या पाणवठ्याच्या काठी मग अनेकांची खुरे आणि पंजे उठत. उन्हाळ्यात अस्वलांच्या खुणा भरपुर. जांभळाच्या झाडावर चढून पोटभर गोड जांभळ खाल्ली कि आपसूक तहान लागायची, त्यातून उन्हाचा तडाखा वाढला कि अंगावरच्या काळ्या केसांनी अस्वलांची लाहि – लाहि होई मग अर्थात ते दिवस बुडताना पाण्याकडे वळत. कधी कधी जंगलाच्याही अंगवळणी नसलेली गोष्ट घडे, चक्क अस्वल आणि वाघ समोरा समोर येत. तहानेनी बेचैन झालेला वाघ झपाट्याने पाण्याकडे येताना अधु दृष्टि असलेल्या अस्वलाच्या नाकासमोर यायचा. अंह! अस्वलाला कमी समजु नका, बिचकलेलं अस्वल जीवघेणं ठरुही शकतं, दोहोंपैकि एकाने दिशा बदलली तर ठिक, नाहितर वाघाची तहान जिंकते कि अस्वलाचं वेडेपण ते परीस्थितीच ठरवे. अस्वलाला इथले आदिवासी खूप घाबरतात. हो आहेत कि इथे अनेक पिढ्या रहाणारे आदिवासी आहेत.


जंगलाचीच पोरं ती. पण त्यांच्यातही हैबत्या सोडल्यास बाकि कुणी आत खोल जंगलात एकटं जात नसे. हैबत्या मात्र सगळ्या जंगलाला ओळखत असे …. किंवा जंगल हैबत्याला ओळखत असावं. त्यावर वनदेवता प्रसन्न आहे असं त्याच्या पाड्यातल्या लोकांचा विश्वास होता. आवसेच्या रात्री सुध्दा हैबत्या बेधडक जंगलात जाई. आता आयुष्याची साठ – पासष्ठ वर्ष तिथे काढल्यावर त्यानं जंगल तळहातांवरच्य रेषांसारखं वाचलं नसतं तर नवल होतं. साठीचा म्हणून हिणवू नका, हैबत्या जंगलात शिरला कि काट्याकुट्यातून मनगटांसारख्या जाड वेलींच्या जंजाळातून वाट काढत तरातरा चालतो. तर हैबत्यावर वनदेवता प्रसन्न आहे …. यात थोडं खरही होतं आणि थोड खोटंही आणि अर्थात जंगालतल्या आतल्या पा्णवठ्या मधल्या जलपर्‍यांचे किस्से, माणसाला ओढणार्‍या अंधार्‍या दरीतल्या नरभक्षी वेलींचे किस्से हैबत्यानेच पाड्यावर हळूच सोडले होते. पण त्याने कोणाचे नुकसान झाले नाही. जंगलाच्या आतल्या भागात हैबत्या शिवाय मात्र कोणी जात नसे हे मात्र खरं.


हां एकदा फाकत्या मात्र हैबत्याशिवाय जंगलात गेला होता खरा. त्याला हैबत्याचा संशय होता. खरंखोट करायला एकदा कुणालाहि न सांगता तो जंगलात शक्य तितक्या आत अंधार्‍या दरीकडे शिरला होता. दोन दिवस तो परतला नाही. वाड्यातल्या एका शेंबड्या पोराने त्याला जंगलात जाताना बघितल्याचं सांगितलं तसं चार माणसं घेऊन हैबत्या आत शिरला. दोन दिवस शोधाशोध केल्यावर दरीच्या वाटेवरील एका ओढ्याकाठी फाकत्याच्या कंबरेचं नेसु फाटलेलं – रक्ताळलेलं मिळालं. बहुदा वाघाने ओढुन नेला असावा. हैबत्याने मान हलवली नक्किच कोजागीरीच्या आसपासचे दिवस होते. मिलनाला आसुसलेले वाघ यावेळि आक्रामक होतात. आसपास कोणी फिरकलेलं त्यांना आवडत नाही. नंतर मात्र हैबत्या वगळता कोणी जंगलात एकटा गेला नाही.


हैबत्याला वाघ बिबट्यांच्या बसण्याच्या जागाही अचूक माहित होत्या. तो तासनतास झाडावर चढून त्यांना बघत बसे. त्याला एक वाघिण पोटच्या लेकिप्रमाणे मनापासून आवडे, उन्हाची तीरीप तिच्या अंगावर पडली कि लव सोन्यासारखी लकाके. उन खात ती अनेकदा अंग चाटत ओढ्याच्या खालच्या अंगाला बसत असे. बहुदा तिलाही हैबत्याची सवय झाली असावी. हैबत्या आसपास असला तरी तीच दुर्लक्ष करी. फाकत्याच्या मृत्युची खबर लागली त्याच्या नंतरच्या महिन्यात हैबत्याला ती वाघिण परत दिसली. तीची चाल मंदावली होती, अंग जड झालेलं दिसत होतं. पुढच्या काही दिवसातच ती पिल्लं व्याणार हे हैबत्याने ओळखलं. दोन आठवड्यांनी हैबत्याला अंदाज आला, जंगलातल्या खूप आतल्या भागात ती निघून गेली असावी असा अंदाज लावुन तो तिच्या गुहेचा शोध करत पोहोचला. यावेळि मात्र हैबत्याची चाहुल लागताच तीने गुरगुरुन नापसंती दर्शवली. हैबत्यानेही त्रास दिला नाही. तीने बहुदा तीन किंवा चार पिलांना जन्म दिला होता. मासभर तीला त्रास द्यायचा नाही हे ठरवुन हैबत्या पाड्यावर परतला. 


महिना दिड महिना सगळं सुरळित चाललेलं होतं पण एके दिवशी आक्रित घडलं. जंगला बाहेर एक जीप थांबली. त्यातुन ४ माणसं खाली उतरली. ती जंगलातल्या आतल्या भागात चालू लागली. इथे जंगलाच्या दुसर्‍या टोकाला हैबत्या बेचैन झाला. का कुणास ठाउक पण गेले चार दिवस त्याला आतुन अस्वस्थ वाटत होतं.  त्याचं मन सारखं अंधार्‍या दरीच्या दिशेने धावू लागलं. अखेर सकाळच्या पहिल्या किरणा सोबतच तो लगबगीने आत जंगलात निघाला. घामाघुम होऊन तो गुहेजवळ पोहोचला तेव्हा सूर्य पिवळट झाला होता. बराचवेळ वाट बघून त्याला ना वाघिण दिसली ना पिलांची हालचाल. अखेर मनाचा हिय्या करुन तो दबकत गुहेत डोकावला, गुहा रिकामी होती. त्याला परत कधी ती वाघिणही दिसली नाही किंवा तिच्या पिलांचे काय झाले ते सुध्दा समजले नाही.


पण जंगलाला सगळं माहीत होतं. ती जंगलाला अनोळखी असलेली माणसं जंगलात शिरल्यावर दोन दिवसांनी,  सूर्य कलतीकडे झुकला असताना, दरीतून दोन बंदूकिचे बार काढल्याचे आवाज घुमले. नुकतेच घरट्याकडे परतू लागलेले बगळे, वेडे राघू आणि अजून काहि पक्षी कलकलाट करत पुन्हा दुर उडाले. थोड्याच वेळात सगळं पुन्हा शांत झालं. मात्र दूरवर हुप्पे जोरजोरात बराचवेळ ओरडत होते. त्या वाघिणीची शिकार झाली होती. आणि दोन दिवस वाट बघूनही आपली आई नेहमीप्रमाणे दूध पाजायला  का आली नाही हे न समजल्याने भुकेने हैराण झालेले तीनही बच्चे बिचकत बिचकत गुहे बाहेर निघाले…. ते  बिबट्या- तरसांच्या तोंडि पडले होते.


त्या जंगला पासून खूप खूप दूर एका कुठल्याश्या शहरातल्या एका “AC” हॉल मध्ये “SAVE TIGER” वरती तज्ञांचे भाषण सुरु होते. आणि त्याच वेळि जंगलाला अनोळखी असलेली ती चार माणसे बंदूका खांद्यावर टाकून परत जंगलात शिरत होती. जंगलाला माणसाची दृष्ट लागली होती.


-   - सौरभ वैशंपायन.


13 comments:

Feelings.... said...

chhan jamlay lekh ! Shabd agdi netke vaprle ahet ! Jasachya tase dolya samor Jungle ubhe rahte !

गुरुनाथ said...

ग्रेव्ह झालो वाचुन मी, त्यातल्यात्यात आमच्या मेळघाटात बरे आहे, टायगर डेन्सीटी वाढती आहे म्हणतात, खरे खोटे देव अन वाघोबा जाणॆ

Yuvraj said...

Jim corbett chya shikar kathanchi aathavan zali .....

Anonymous said...

khup sunder varnan vatle janglache mastch lihile ahe, sunder!!!

Reshma Apte said...

mast mast :) kiti sundar varanan keleyas re :) gr8 gr8 liked this one also :)

BinaryBandya™ said...

chhan

saurabh V said...

Feelings, Guru & Yuvaraj -

Thank you!

saurabh V said...

@ Reshma,

Thank You dear!

@ Binary Bandya - :-) dhanyavaad sir! :-p

saurabh V said...

@ Anonymous - Thank You very much!

महेश सावंत said...

sundar varanan

Anonymous said...

शेवट फार करुण आहे. छान लिहिलं आहे. जंगलात उभे राहून सगळे समक्ष बघतो आहे, असे वाटत होते. तो हैबत्या तूच तर नाहीस ना?

Unknown said...

Jabra! Sahich!

Kaustubh Ponkshe said...

Wahhhhh