Thursday, March 31, 2011

खुन्नस



जिंकलोऽऽऽ


शेजारच्या घरात कोणीतरी तंबाखू भाजावी आणि त्याच्या वासाने खवखव होऊन ठसका लागावा तशी अवस्था काल "नेहरा आत - अश्विन बाहेर" हा बातमीने समस्त भारतीयांची झाली. इंग्लंड विरुध्दची शेवट्ची ओव्हर आठवली आणि लोकांच्या अंगावर जवळपास बाभळिचा काटा उभा राहीला. सेमी फायनलमध्ये ते सुध्दा पाकिस्तान विरुध्द? लोकांनी स्वप्नातसुध्दा नेहराला पाणी द्यायलाही ग्राउंडमध्ये बोलवलं नसतं, इथे आपले संघाचे प्रयोगशील चालक मालक धोनी ते प्रत्यक्षात करत होते. फेसबुक वरती जवळपास प्रत्येक स्टेटसवरती त्या उद्रेकाचा महापूर वाहिलेला बघितला असता तर नेहराच्या तोंडाला फेस आला असता. एकतर पाकिस्तान विरुध्दची मॅच म्हणजे युध्द असतं. (बहुदा हे जगातलं पहिलं असं युध्द असेल कि दोन्हि देशांचे पंतप्रधान एकमेकांच्या शेजारी बसून ते बघत होते, च्यायला पण या हाय प्रोफाईल लोकांचा मोठा प्रॉब्लेम हा असतो कि कितीही मनात आलं तरी ऑन द स्पॉट नाचता येत नाही!). आणि अश्या युध्दात नेहरा नामक तोफ वापरायचा विचार फारच घातक वाटायला लागला.

पण सचिन - सेहवाग खेळायला उतरले आणि सगळ्यांनी एकूणच धीराने घ्यायचं ठरवलं. पहीली दीड ओव्हर पाकिस्तानी बॉलिंग बरीही पडली पण नंतर मारकुटे मास्तरगैर हजर रहिलेल्या पोराची जशी हजेरी घेतात तशी सेहवागने उमर गुलची हजेरी घ्यायला सुरुवात केली. एकाच ओव्हरमध्ये त्याने ५ फोर मारुन उमर गुलची बत्तीच गुल करुन टाकली. बिचार्‍याची "उमर" झाल्यागत त्याच्या बॉलिंगची लाईन - लेन्थ बिघडवून टाकली. त्यांचा मुख्य बॉलरच असा जाहीर वाळत घातल्यावर भारतीय पाठिराख्यात जो काही स्वाभाविक उत्साह पसरला त्याला तोड नव्हती. त्यातुन शोएब अख्तर खेळत नव्हता. ड्रेसिंग रुम मध्ये आफ्रिदिच्या नावानं नखं कुरतडत बसला होता. सगळ्यांची अपेक्षा होती कि याही वेळी सचिन – शोएब सामना बघायला मिळेल. पण शोएबला २००३ सारखं थोतरवण्याचा सुयोग सचिनच्या कुंडलीत नव्हता.


युनिसने सोडलेला सचिनचा कॅच
काल सचिनचं भाग्य भरपुर जोरावर होतं. म्हणजे पाकिस्तानी फिल्डर्सच भोंडला खेळल्यागत जे “एक झेल सोडू बाई दोन झेल सोडू … दोन झेल सोडू बाई तीन झेल सोडू” चाललं होतं ते बघता मला आफ्रिदिची काळजी वाटत होती. हार्ट अ‍ॅटॅक किंवा आत्महत्या या गोष्टि विमा पॉलिसी कव्हर करत नाही त्यामुळे  इथे खुद्द सचिनला १ LBW, १ स्टंपिंग आणि ४ जीवदानं कॅचवरती मिळाल्यावर आफ्रिदिची अशी काळजी वाटणं सहाजिक होतं. अखेर स्वत: मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही ह्या वाक्‌प्रचारानुसार शेवटी सचिनचा कॅच त्यानेच घेतला. सचिन ८५ वरती आउट झाला तेव्हा स्टेडियम मध्येच नव्हे तर भारतभर क्षणभर स्मशानशांतता पसरली आणि मग आफ्रिदिला शिव्या देत लोकांनी ती भंग केली. आज सचिन १००वे शतक पूर्ण करणार  तेही पाकिस्तान विरुध्द, असं वाटत असतानाच हे घडल्याने कदाचित अनेक टिव्ही बंदही झाले असावेत.

मग तिकिटाच्या रांगेत सरकत रहावं तसे आपले एक एक जण परतु लागले. यावेळि रियाझ वहाबचा दिवस होता पठ्यानं ५ विकेट घेऊन भारतीय संघाला टेकिला आणलं. विशेषत: युवराजला त्याने जे रीटर्न तिकिट काढून दिलं तो स्विंग बॉलिंगचा उत्तम नमुना होता. म्हणजे जवळपास युवराजला काही समजायच्या आत पाकिस्तानी फिल्डर्स एकमेकांना मिठ्या मारुन परत आपापल्या जागी फिल्डिंगला देखिल गेले होते. इथे खर्‍या अर्थाने भारतीय बॅटिंग “ऑक्सिजनवर” आली. सचिन खेळत असताना आपण २८० करणार असे वाटत होते ते २०८ तरी करा रेऽऽ अश्या अवस्थेला आले. अखेर परत रैना बरसे रीमझीम रीमझीम कामाला आला. बघता बघता पॉवरप्ले मध्ये ४३ रन्स निघाले आणि २६० चा ठिक ठाक स्कोअर उभा राहिला. तरी शाश्वती वाटत नव्हती.


आता सगळि मदार नेहरा आणि देव या दोघांवर होती. कारण सध्या झहीरखान वगळता बाकिचे ’धन्यवाद’ बॉलिंग करत आहेत. पण आश्चर्य असं कि नेहराने पहिल्या ४ ओव्हर चक्क ३.४० च्या इकोनॉमी रेटने टाकून, शिष्योत्तम अरूणीने बांधाच्या मध्ये झोपुन पाणी अडवलं होतं, तसच पाकिस्तानच्या बॅटिंगला थोपवुन धरले. बाकि पहिला नारळ गेल्या ३ मॅच प्रमाणे झहिरनेच वाढवला. मग मुनाफ, युवराज, हरभजन, नेहरा सगळ्यांनी आपापल्या परीने त्याला हातभार लावला. पण कालच्या मॅच मधल्या सर्वात बेस्ट विकेट्स म्हणजे – उमर अकमलची भज्जीने घेतलेली विकेट आणि मुनाफने लेग कटर टाकून अब्दुल रज्जाकचा उठवलेला बाजार. दोन्हि विकेट्समध्ये त्यांचे ऑफ स्टंप भेलकांडले. असद शफिकची युवराजने घेतलेली विकेट म्हणजे जवळपास “सूड” होता. बहाबने युवराजच्य मिडल स्टंपला लक्ष केले युवराजने असद्च्या.


खरंतर अकमलला भज्जीने सरळ जाणार्‍या संथ बॉलवरती चकवले, क्षणभर हरभजनने ’दुसरा’ वापरला कि काय? असंच वाटलं पण तो दुसरा नव्हता. सध्या एकुणच त्याची बॉलिंग चढावावरच्या दमल्या खेचरासारखी होतेय. त्याचा दुसराही तितकासा चालला नाही, तो “दुसरा” दुसराच कोणीतरी टाकतोय इतका निष्प्रभ झालाय. पण फायनल मध्ये मुरलीधरन नावाच्या श्रीलंकन अस्त्राला प्रत्युत्तर म्हणून हरभजन पुन्हा उपयोगात येईल अशी अपेक्षा. कालच्या मॅचने भज्जीला त्याचा सूर गवसला आहे असं वाटतय.


पण या सगळ्यात मिस्बाह – उल – हकचे कौतुक करावे लागेल. खरंतर त्याने मधल्या ४-५ ओव्हर शब्दश: नेट प्रॅक्टिस केली. आणि मग अंगात आल्यागत खेळायला सुरुवात केली, इतकि कि ड्रिंन्क्स ब्रेकमध्ये जावेद मियॉदादच्या पाया पडून आलाय कि काय असं वाटू लागलं. शेवटी मात्र त्याने कॉन्फिडन्सची हद्द ओलांडली असंच म्हणावं लागेल. ४९ व्या ओव्हरमध्ये तर स्ट्राइक जाऊ नये म्हणुन बॅटिंग पॉवरप्ले सारखी संधी असून सरळ सरळ मिळणार्‍या ३-४ रन्स देखिल घेतल्या नाहित. मात्र आता उशीर झाला होता. आधी संथ खेळून काढलेल्या ४ ओव्हर इथे भारी पडल्या. अखेर मोठा फटका मारायच्या नादात लॉंन्ग ऑन वरील कोहलीच्या हातात त्याने कॅच नाही तर भारताचा विजय अलगद सोपवला. मित्राचं घर सगळ्यांनी बोंबलून बोंबलून डोक्यावर घेतलं.


बूम बूम बाळा ’चड्डित’ रहात जा!
मग काय झालं हे बघायला त्याच्या घरी थांबलच कोण??? सगळे थेट शिवाजी पार्क. पाकिस्तानवरचा विजय साजरा करायला जगात याहुन उत्तम दुसरं ठिकाण असूच शकत नाही. इथल्या हवेत सुध्दा क्रिकेट वहाते, उगीच "सचिन" तयार होत नाहीत इथे, शिवाजी पार्कच्या मातीतच दम आहे. पाकिस्तान विरुध्दचं युध्द जिंकलो. आता वेळ आहे लंका दहनाची. लंकेचा “दशानन” पॅव्हेलियन मध्ये धाडून जिंकणं निश्चित सोपं नाही पण जिथे ऑसीज – पाकिस्तान यांना गुंडाळु शकतो तिथे लंकेला हरवण्याची ताकद आपला संघ निश्चित राखून आहे. पण प्रत्येकाची कालची रीअ‍ॅक्शन सांगाविशी वाटते – “आता वर्ल्डकप जिंकायचाय तो फक्त तेंडल्यासाठी, नाहितर पाकिस्तानला हरवले तिथेच आपण फायनल जिंकलो असंच समजतो!”



 - सौरभ वैशंपायन.

4 comments:

Unknown said...

“आता वर्ल्डकप जिंकायचाय तो पक्त तेंडल्यासाठी, नाहितर पाकिस्तानला हरवले तिथेच आपण फायनल जिंकलो असंच समजतो!”

+1

jabaradast lihale aahes mitraa.. aavadesh!!!

साधक said...

तंबाखू, तिकिटाची रांग या उपमा अप्रतीम आहेत. मस्त लेख मजा आली वाचायला

mynac said...

सौरभ,
संपूर्ण मॅच काल बघितल्या नंतर सुद्धा,आता ईथे थांबू,आता ईथे करत करत संपूर्ण पोस्ट,तू वाचायला भाग पाडलस,इतकं प्रभावी लिहिलसं.मस्त. शॉ..ल्लिड.खूप आवडलं.

Sagar Kokne said...

अरे आपले पंतप्रधान सोनियाजींना विचारल्याशिवाय कसे नाचतील ?
बाकी लेख तर झक्कासच आहे...
लेख लिहायला हात शिवशिवतात रे...पण अभ्यासाचे दिवस आहेत
चूक दुरुस्ती- नेहराची शेवटची ओवर आफ्रिकेविरुद्ध होती.