Monday, November 5, 2007

आम्हि चित्पावन!




अग्रतश्चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनू:।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि।


ज्याच्या जिव्हेच्या अग्रावर वेद नेहमी वास करुन असतात, जो धनुष्यबाणाने सज्ज आहे, आणि त्याच मुळे जो शाप(वाणी) आणि शर(बाण)यांचा योग्य उपयोग करु शकतो, अर्थात म्हणूनच हा ब्राह्मण देखील आहे आणि क्षत्रिय देखिल आहे. हे वर्णन आहे भृगुराज परशुरामांचे. त्याच शापादपि-शरादपि परशुरामांचे अनुयायी म्हणजेच "चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण"
चित्पावनांना भाग्याची साथ मिळाली आणि "बाळाजी विश्वनाथ भट" यांच्या रुपाने त्यांचा भाग्योदय झाला. मात्र त्या आधी चित्पावन होते कुठे? हा प्रश्न समस्त चित्पावनांना भेडसावत असेल. मात्र चित्पावनांचा पहीला उल्लेख हा परशुरामांशी निगडित आहे. याचाच अर्थ त्यांनीच चित्पावनांना कोकण किनार्‍यावर वस्तीस आणले. परशुरामाचा काळ जर शोधला तर आपल्याला त्याच्या समकालीन असणार्‍या त्या १४ गोत्रांच्या पुर्वजांचा निश्चित काळ समजु शकेल. मलबारात मंगळूरपासुन कन्याकुमारीपर्यंत परशुराम शक चालतो, ह्या शकाचे पहीले वर्ष कलिवर्ष १९२७ मध्ये सुरु झाले म्हणजे कलिवर्ष ५०१५ मध्ये परशुराम शकाला प्रारंभ होऊन ३०८८ वर्षे झाली आहेत. तात्पर्य ही गणिते बरोबर असल्यास चितपावनांचे १४ मुळपुरुष कीमान ३००० वर्ष मागे कोकणात वसतिस आले. त्यावेळी हा भाग ’नागलोक’ म्हणुन ओळखला जात असे. आता आपण चित्पावन या शब्दाची व्युत्पत्ती बघुया, बहुतांशी चितेतुन जिवंत केलेले अथवा झालेले ते चिता-पावन = चित्पावन, असा अर्थ लावला जातो. मात्र याची निर्मिती व्याकरण दृष्ट्या बघितली तर मुळ शब्द "चित्यपावन" असा असुन त्याचा अपभ्रंश चित्तपावन किंवा चित्पावन असा होतो. चिति संबधी आहे ते चित्य, आता चिति म्हणजे काय? ते कळण्यासाठी यांचा धंदा काय ते बघावे लागेल. हे ब्राह्मण अग्निचयन करीत, व त्यात पाच चिति असत. वावभर जमिन नांगरुन विटांनी वेगवेगळ्या आकाराचे यज्ञकुंड तयार करुन त्यात आहुती देणे हा त्यांचा संस्कार होता. त्याच अग्निस चित्यग्नि किंवा चित्य असे म्हणत, या अग्नि चयनाने जे पावन झाले आहेत ते चित्यपावन = चित्तपावन = चित्पावन. याच बरोबर क्षिती म्हणजे जमीन यात क्षि हा धातु आहे त्याचा अर्थ वसती करणे याचा पावन या शब्दाबरोबर समास होऊन क्षितीपावन हा शब्द होऊन त्याचा अपभ्रंश चितीपावन = चित्पावन असा झाला असण्याची देखिल शक्यता आहे. आता परशुरामासंबधी विचार करावा - रामाच्या आधीचा अवतार परशुराम आणि चित्पावनांचा गुरु-देव-मार्गदर्शक परशुराम एकच का? की परशुराम ही पदवी असुन "शंकराचार्य" या पदवीप्रमाणे ती दिली जाते? कारण मानवाचे सर्वसाधारण आयुष्य १०० वर्षे असु शकेल त्यावेळचे राहणीमान बघता फारफारतर १२५ वर्षे, मग एकच परशुराम किमान २००० वर्षांच्या अंतराने महाभारतात किंवा कोकणात कसा असेल? मात्र दंतकथा परशुरामाला चिरंजीव मानतात, त्यामुळे वरील प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत, मात्र चित्पावनांना परशुराम किंवा पर्शुराम नावाच्या व्यक्तीने कोकणात वसाहतिस आणले हे नक्की. हे १४ जण त्याचे शिष्य असण्याची शक्यता आहे किंवा त्याने त्याच्या निर्माण केलेल्या अथवा हस्तगत केलेल्या भुमीत प्रजा वाढावी म्हणुन आणलेले हे ब्राह्मण असावेत, याशिवाय त्यांची वंशवाढ व्हावी म्हणुन परशुरामानेच १४ उपवर मुली शोधल्या असाव्यात आणि त्यांची कुळे ही अंबेजोगाई भागातिल असावी, कारण चित्पावनांची मुळ कुलदेवता अंबेजोगाई आहे या १४ स्त्रीयांची देवता तिच असल्याने पुढे तिच कुलदेवता झाली, नंतरच्या काळात महालक्ष्मी, वज्राई या देवता आल्या. या शिवाय कोकण अथवा हरीयाणा, उत्तरांचल या भागातील अनेक क्षत्रिय कुले परशुरामाला आपला त्राता - कुलदैवत देखिल मानतात. कदाचित उत्तरेतुनच परशुरामाने या चौदा ब्रह्मणांना आणले असावे, असे मानायला बराच वाव आहे. हे कोणी बाहेरुन समुद्रात भरकटुन कोकणकिनार्‍याला लागलेले प्रवासी निश्चितच नव्हेत. चित्पावानांच्या या उल्लेखानंतर मात्र चित्पावनांचा उल्लेख पुढे क्वाचितच आढळतो.

शिलाहार कालीन ताम्रपटात अथवा शिलालेखात "घैसास" हे चित्पावनी आडनाव आले आहे. त्याचा "घळीसास" असा अपभ्रंश देखिल मिळतो. या नंतर कशेळीतील कुलकर्ण्याचे दफ्तरात जामिनकीच्या कागदावर काही साक्षी आहेत, हा कागद शके १५२०/२२ च्या दरम्यानचा आहे. त्यात भानजी गणपुला, सिवाभट रानडीया, गणो विठ्ठल पराणजप्या, गाव खडीकर व ढवळे ही नावे दिसतात. हे पाच जण फणशे आणि सेजवळकर या दोन कर्‍हाड्यांना २१५२/- रुपयांना जामिन राहिले होते. याचाच अर्थ या घटनेतील ३ चित्पावन हे सुस्थितित आणि समाजात मान असलेले होते.

या पेक्षा जुना उल्लेख चिपळूणच्या कुलकर्ण्याचा आहे, यावरुन गावातले ’कुलकर्णीपद’ हे चित्पावन सांभाळत होते. हे चित्पावन काळे नामक असून नरसीपंत काळे यांच्यापासून १४७० च्या सुमारास सुरु झालेली वंशावळ विनजी नरसी(१५००), पर्शराम विनजी(१५३०), काळो पर्शराम ते अंतो काळो(१५८०) इथपर्यंत मिळते. याचाच अर्थ शके १४७० किंवा त्या अगोदर पासूनच नरसीपंत काळे यांनी चिपळूणचे कुलकरणपद सांभाळले होते.

याच बरोबर पावस येथे जोश्यांच्या कागदपत्रात शक १५४० मधील कौलनाम्यात म्हंटले आहे - "पावसच्या जोश्य़ांचे जोसपण कदीम मिरास आहे." म्हणजे ते किमान २५०-३०० वर्षांपूर्वीचे असावे. याच जोश्यांच्या कागदपत्रात १५५० मधील खरेदीपत्रावर काही चित्पावनी नावे आहेत - विश्वनाथ भट, दादभट देसाई, बामनभट देसाई, बाल सोवनी सराफ, हरीभट अभैकर(अभ्यंकर), गणेसभट महाजनी. म्हणजे १५५० मध्ये गावातील सराफ, महाजन, देसाई हे चित्पावन होते. १५५६ मधील ह्याच जोश्यांच्या एका कागदावर खालील सह्या आहेत - हरभट अभैकर(अभ्यंकर), कानभट फडका, माद जोशी. म्हणजे १५५६ मध्ये चित्पावन गावच्या खोताचे काम करत असत, कारण हा कागद ’हजरमजालसीचा’ आहे.

राजापूर जवळ मीठगव्हाणे येथील त्या मीठगव्हाणाचे देसाईपण चित्पावनांकडे आहे. हा कागद १५५२ मधील आहे. दंडाराजपूरी व श्रीवर्धन येथील’भटांच्या’ घराण्यातील देशमुखी अशीच पुरातन आहे. ती त्यांना १४०० च्या आसपास मिळाली असावी, असे पेशव्यांच्या नंतरच्या पत्रव्यवहारातून दीसुन येतो. तात्पर्य चित्पावन अगदीच ’धुमकेतु’ प्रमाणे प्रकट झाले अशातला भाग नक्कीच नाही. शिवछत्रपतींच्या हाताखाली देखिल ’केळकर’ नामक बांधकामातील तज्ञाचा उल्लेख मिळतो. शिवाय ’मोकाशी’ नामक एका मनसबदाराची नोंद मिळते. त्यांच्या वकील आणि दफ्तरी कामात देखिल काही चित्पावनी नावे आहेत. सिंधुदुर्गाचे भूमीपूजन ’अभ्यंकर’ नामक गुरुजींनी केल्याचा उल्लेख आहे. याच बरोबर दिवे-आगार येथिल ’बापट’ यांना जंजिर्‍याच्या सिद्दिने मनसब दिल्याचे समजते. आजही त्यांचे वंशज आजही स्वत:ची वाडी आणि वाडा सांभाळत उत्तम संसार करत आहेत. म्हणजेच नेहमीच्या पंचा-पळी-पात्राच्या बरोबर चित्पावनांनी साधारण शके १२०० नंतर शिलाहार राजाच्या शेवटच्या काळात कुलकरण, जोसपण, खोती, महाजनकी, देशमुखी, सराफी व देसपांडेपण सांभाळत होते. योग्य संधी मिळताच त्यांनी त्याचे सोने केले.

भृगुराज परशुरामानंतर थेट ’बाळाजी विश्वनाथ’ व विषेशत: "बाजीरावाने" दाखवलेला ’शरादपी’ पराक्रम चित्पावनांना ’उंची’ वर घेऊन गेला. प्रचंड बुध्दिमत्ता, शौर्य, नियोजन व राजकीय महत्वाकांक्षा एकत्र आली तर एक समाज अत्यल्प काळात काय घडवू शकतो हेच यातुन दिसते. मात्र प्राचिन इतिहास काळात शिलाहार, राष्ट्रकुट, चालुक्य यांच्या काळात चित्पावन होते कुठे? तर याच उत्तर आहे की कोकणात कोणत्याही भारतीय राजाने आपली राजधानी वसवली नव्हती. त्याला कोकणचा उंच सखल भूभाग कारणीभूत होता. सलग अखंड भूमी कोकणात फारच थोडी आहे. सह्याद्रीच्या रांगांनी कोकणचा बराचसा भूभाग आपल्या अंगाखांद्यावर धरुन ठेवलाय. जो राजधानी, शेती, व्यापार, बाजारपेठ या गोष्टींसाठी अयोग्य समजला जात असे. मात्र शिवछत्रपतींनी कोकणचे महत्व समजुन घेउन रायगडची निवड केली आणि एका पिढीच्या अंतराने चित्पावनांचा उदय झाला. या वरुनच संधी मिळताच मी म्हणेन तीच नियती या निश्चयाने चित्पावनांनी राजकारणात प्रवेश केला.

इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते, शिवछत्रपतींच्या स्वराज्य उभारणीच्या काळात देशस्थ ब्राह्मणांनी त्यांना फार मोलाची मदत केली. यादव काळापासुनच त्यांनी दबदबा राखलेला दिसतो. म्हणुनच शिवकालात ज्या चित्पावनांचा उल्लेख मिळतो ते सुभेदार, तंत्रज्ञ, खोत, कुलकर्णी, देसाई असे आढळतात. मात्र दरबारी ऊठबस करणार्‍यात चित्पावन दिसत नाहीत. या शिवाय नाशिक पैठण येथील ब्रह्मवृंदात देखील चित्पावनांचा उल्लेख क्वचितच आढळतो. बाळाजी विश्वनाथापूर्वी वैद्यविलास, छंदोरत्नावली, कविकौस्तुभ इत्यादि ग्रंथ रचणार्‍या चंपावतीच्या(चौल)रघुनाथ मनोहर नामक चित्पावनाचा उल्लेख मिळतो,हा रघुनाथ मनोहर शिवरायांच्या काळातला आहे. या खेरीज श्री शिवछत्रपतींनी त्यांचा जो दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पध्दतीने केला होता त्याची हकिकत छ. राजाराम महाराजांना जिंजीवरुन परत आल्यावर सगळी घटना त्यांना सांगण्याच्या निमित्ताने ’शिवराज्याभिषेक कल्पतरु’ हा ग्रंथ लिहिणार्‍या दक्षिण रत्नागिरीतील कुडाडाळेश्वर येथील "गोविंद बर्वेंचा" उल्लेख देखिल मिळतो. हा ग्रंथ राज्याभिषेकानंतर २५ वर्षांनी लिहीलेला आहे मात्र गोविंद बर्वे हा राज्यभिषेक करवणार्‍या निश्चलपुरींच्या परीचयाचा आहे असे समजते. मात्र शिवछत्रपतीं नंतर एका पिढीच्या अंतराने चित्पावनांनी जी झेप घेतली त्याची निर्विवाद नोंद उभ्या जगाला घ्यावीच लागली.

बाळाजी विश्वनाथाच्या इतिहासापासून आपण चित्पावनांची नोंद घेऊया. महादजी विसाजी देशमुख हा बाळाजीचा पणजोबा व भट घराण्याचा ज्ञात पुरुष. त्यास नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी २ मुले. शिवाजीस ३ पुत्र कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी. विश्वनाथ हा बाळाजीचा पिता. बाळाजीला ४ भाऊ होते. कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी. घराणं देशमुखीचं असल्याने बाळजीनानास मोडीवाचन, हिशेब, संध्या-रुद्रादी कर्मे यांच शिक्षण मिळालं. वयाच्या १०-१२व्या वर्षी बर्वे घराण्यातील ’राधाबाई’ हिच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. इ.स. १६८९ च्या सुमारास म्हणाजे शंभूछत्रपतींच्या हत्येनंतर सिद्दीने उचल खाल्ली त्यामुळे त्याला श्रीवर्धन सोडावे लागले. त्यातच भट घराणे आंग्र्यांना सामिल आहेत या संशयाने सिद्दिने भट घराण्याचा छळ चालु केला. त्यांच्या "जानोजी" नावाच्या भावास सिद्दीने पोत्यात घालुन समुद्रात बुडवल्याची कथा आहे. त्याच किंवा तशाच कारणास्तव पिढीजात देशमुखी सोडून "बाळाजी भट" हे "भानु" कुटुंबा बरोबर सातार्यास आले. सिद्दीच्या हशमांनी पाठलाग सुरु केल्या वर मुरुड येथील "वैशंपायन" कुटुंबाकडे त्यांनी काही आठवडे आश्रय घेतला. पुढे याची आठवण ठेवुन एका "वैशंपायन" गुरुजींना त्यांनी आपले कुलोपाध्याय केले. शिवाय एक वैशंपायन १२०० स्वारांचे सरदार होऊन मध्यप्रदेशात ’सागर’ प्रांतात गेले असा उल्लेख मिळतो. बाळाजी बरोबर असलेल्या "भानु" कुटुंबात ३ भाउ होते. "हरी महादेव, बाळाजी महादेव आणि रामजी महादेव." त्या पैकी "बाळाजी महादेव" हा "नाना फडणवीस" याचा आजा. भट-फडणवी्स-वैशंपायनांचे संबध हे ३ पिढ्या जुने होते. पुढे १७१९ मध्ये दिल्लीस गेलेल्या सैनिकांची मुघलांशी लढाई झाली त्यात "बाळाजी महादेव भानु" कामी आले. म्हणजे पेशव्याच्या खुनाचा प्रयत्न होणार हे कळल्यावर बाळाजी विश्वनाथाचा जीव वाचवायला बाळाजी महादेव त्याच्या पालखित बसला आणि कटवाल्यांकडुन मारला गेला. स्वामीनिष्ठेची हि पराकाष्ठाच होती.

बाळाजी विश्वनाथ याने रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे कोठीवर कारकून म्हणून काम केले. त्यांची हुशारी धनाजी जाधव यांच्या नजरेस आली. धनाजीरावांनी आपले दिवाण म्हणुन आपल्या सेवेस घेतले. याचवेळी ते त्या भागाचे महसूल अधिकारी झाले. दिल्लीचा पातशहा "अबु मुझफ़्फ़र मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर गाझी" स्वत: अवघ्या सामर्थ्यासह महाराष्ट्रावर कोसळला होता. महाराष्ट्राचा छत्रपती त्याने हाल-हाल करुन मारला होता. अशाच अस्मानि-सुल्तानी संकटाला स्वराज्य पडेल ती किंमत देऊन तोंड देत होतं. संताजी-धनाजी, नेमाजी-खंडेराव हे गनिमी काव्याचे डाव टाकत मोठ्या मजला मारीत होते. बाळाजी विश्वनाथ फार जवळुन सगळ अनुभवत होता. १७०५ च्या दरम्यान त्याने देखिल आपली समशेर गाजवली आणि बहुतेक ती जस्तच परजली असावी कारण १६९९-१७०२ मध्ये बाळाजीला पुण्याची सुभेदारी मिळाली होती, आता त्याच बाळाजीला १७०५ च्या गुजरात स्वारीच्या दरम्यान दौलताबाद येथील सुभेदारी देखिल मिळाली. या सुभेदारीच्या काळातील बाळाजीची एक मुद्रा उपलब्ध आहे - "श्री उमाकान्त पदाभोजा भजनाप्रमुन्नते: बाळाजी विश्वनाथस्य मुद्रा विजयहेतराम।"

छ. राजारामांच्या अकाली निधनानंतर ’खेळणा’ उर्फ ’विशाळगडावर’ त्यांच्या ’शिवाजी’ या पुत्रास बसवले. ४ वर्षांचा मुलगा मराठ्यांचा छत्रपती झाला. पुढे ५-६ वर्षे मराठी सत्ता औरंग्याशी झुंजत होती. सातारा, परळी, सिंहगड, पन्हाळगड, विशाळगड असे किल्ले फितुरीने औरंगजेबाकडे आले. विशाळगडासाठी तर त्याने त्या काळी २ लाख रुपये मोजल्याचा पुरावा आहे. तर पन्हाळ्यासाठी त्याने ५० हजार रु. मोजले. १७०४ मध्ये त्याने राजगड व तोरणा घेतला. १७०२ मध्ये सिंहगडाच्या लढ्याच्यावेळी केवळ सामर्थ्य तोकडे पडले म्हणुन प्रदीर्घ लढ्यानंतर तडजोडीची बोलणी करायला मोगलांच्या छावणीत "बाळू पंडीत" म्हणजेच बाळाजी गेला होता. मात्र तत्पूर्वी किल्ला लढवत असताना "दारुगोळा कामी भासतोय, तरी त्वरा करा!" असे दारुगोळा पाठविण्या संबधीचे पत्र त्याने "अंबाजीपंत पुरंदरे" यांना लिहीलेले आढळते.

औरंगजेबाच्या मृत्युपश्चात शाहु महाराजांची सुटका झाली. या वेळी बाळाजीने शाहूंचा पक्ष घेतला. अर्थातच स्वराज्याच्या २ गाद्या तयार झाल्या. ताराराणींच्या पक्षातले अनेक जण बाळाजीने केवळ स्वत:च्या शब्दावर शाहू महाराजांच्या पक्षात आणले. राज्यकारभार चालवताना तुटलेली माणसे त्यांनी परत जोडली. जर शाहुंचा पाठिंबा लाभला तर आंग्रे सिद्दीशी सहज झुंजु शकतील हे आंग्र्यांना बाळाजीनेच पटवुन त्यांना शाहुंच्या पक्षात आणले. त्यांनी सय्यदबंधू बरोबर तह घडवुन आणला, मग त्यांच्याच सहाय्याने दिल्लीच्या फर्रुखसियर बादशहाला पदच्युत करुन रफिउद्दौरजात याला गादिवर बसवले. याच तहानुसार बाळाजींनी शाहुच्या पत्नींची सुटका करवुन घेतली. मात्र त्यावेळी २ गाद्यांमध्ये जीवघेणा संघर्ष उडु नये म्हणुन बाळजीने केलेली राजकारणे भल्याभल्यांच्या मतीला गुंग करणारी आहेत. आणि हे केवळ त्याने शब्द सामर्थ्यावर घडवुन आणले होते हे महत्वाचे. १७०७ पासुन पुढे १७२० पर्यंत म्हणजे मृत्युपर्यंत बाळाजीने छत्रपती शाहू महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली. छत्रपती शाहू महाराजांनीच बाळाजीला "पेशवेपद" दिले, अर्थात तो त्या योग्यतेचा होताच, आणि ते पद त्याने सहजगत्या पेलले. इथूनच ’चित्पावनांचा’ भाग्योदय झाला.

बाळाजींच्या मृत्युनंतर "पेशवेपदासाठी" दरबारी लोकांत अहमिका लागली, त्यांत बाजीरावास परंपरागत पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणु लागले. त्याला २ कारणे होती - १)यादवकालीन राजकारणा पासुन ते ताराराणी पर्यंत राजकारणावर देशस्थांचा पगडा होता ते वर्चस्व पुन: प्रस्थापित व्हावे असे देशस्थांना वाटणे स्वाभाविक होते. २)थोरले बाजीराव फटकळ होते, एक घाव दोन तुकडे हाच त्यांचा स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्यांना समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार हे लक्षात येताच शाहु महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले. मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजींनी त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहु महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यांस दिली.
बाजीराव शिपाईगडी होते. उण्यापुर्‍या ४० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्यांच्या कोवळ्या खांद्यावर आली.

बाजीरावांची मुद्रा -

॥श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान,
बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान ॥


त्यांच्या मृत्युपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्यांनी २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा(डिसेंबर,१७२३), धर(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद(१७३१) उदयपुर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(मे,१७,१७३९) या आणि अशाच ३६ मोठ्ठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया ते जिंकले आहेत. थोडक्यात त्यांचा "सक्सेस रेट" "१००%" आहे. वेगवान हालचाल हेच त्यांचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरुन प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्यांची रणनीती आपण "मैदानी लढाई" लढुन जिंकु शकतो हे मराठी सैन्याला जाणवुन द्यायला कारणीभुत झाली. बर्नाड मोन्ट्गोमेरी(Bernard Law Montgomery) या ब्रिटीश ’फिल्ड्मार्शल’ ने बाजीरावांची स्तुती पुढील प्रमाणे केली आहे - "The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility". मॉन्टिगोमेरीने अख्खं पान लिहिलय यावर. बाजीराव युध्द कधीच हरले नाहित कारण रणभूमी आपल्याला अनूकुल झाल्या खेरिज ते लढाई खेळतच नसत. शहाजीराजे - छत्रपती शिवरायांच्या इतिहासातुन रणभूमी कशी अनुकुल करायची याचे पाठच त्यांनी गिरवले असावेत. बर्‍याचदा आपल्याला अनुकुल ठिकाणी शत्रु यावा म्हणुन २-२ कोस माघार घेण्याचे नाटक करायचे व शत्रु एकदा टप्प्यात आला कि बडवुन काढायचे. अनेकदा रखरखीत भागात मुद्दामहुन पाणी मारुन हिरवेगार पट्टे मराठे तयार करत दमलेल्या शत्रुला तो हिरवा पट्टा बघुन अतिशय आनंद होई, एकदा तंबु ठोकुन सैनिक जरा ढिले पडले कि कुठुन तरी मराठ्यांची हजारभराची तुकडि भुतासारखी प्रकट होई आणि चौदावे रत्न दाखवुन गायब. जवळच्या तलावात विष कालवलेले असे, घोडे, हत्ती, बरेच सैनिक पाणी पिऊन मरत तरि किंवा असह्य पोटदुखीने अनेक दिवसांकरता जायबंदि होत. उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहील्या बाजीरावानीच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्‍याच्या राजगादी इतकेच महत्व पुण्याला मिळवुन दिले. शनिवारवाड्या बद्दल एक दंतकथा सांगितली जाते - बाजीरावांनी त्या ठीकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्यांना त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट कील्लाच बांधुन घेतला हाच तो शनिवारवाडा. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालुन येणारे ’शिकारीकुत्रे’ खरच स्वराज्याला घाबरु लागले.

दिल्लीचा वजिर "मोहम्मद खान बंगेश" छत्रसाल बुंदेल्यावर चालुन आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकालेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपुर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवुन त्याने हेरां मार्फत बाजीरावांना एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधिशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजेंद्रमोक्षाचा" हवाला देउन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालुन गेले. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाहि. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावांच्या झंजावाता पुढे मोगल हैराण झाले. खुद्द गढीत बंदीस्त वजिरानेच "बम्मन होने के बावजुद क्या समशेर चलाता है?" अशी स्तुति केली.

या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तिस लाखाचे उत्पन्न असलेला मुलुख बाजीरावांस नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्नींपैकी एकीची मुलगी "मस्तानि" बाजिरावांस दिली, जेणेकरुन बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळतिल. या शिवाय बाजीरावांस "काशीबाई" ही प्रथम पत्नी होतीच. काशीबाई पासुन बाजीरावांस रामचंद्र उर्फ रघुनाथराव, जनार्दन व बाळाजी उर्फ नाना असे ३, तर मस्तानी कडुन समशेरबहद्दर उर्फ कृष्णराव असे एकुण ४ पुत्र होते. कर्मठ ब्राह्मणांनी बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावांचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधुन घेतला.

चिमाजी अप्पा हा बाजीरावांचा धाकटा भाऊ. याने देखिल कोकण घाट आणि कीनार्‍यावर मराठीसत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावांना शोभेल असाच त्यांचा हा धाकटा भाउ होता. बाजीरावांनी दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगिजांना त्यांची जागा दाखवुन दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगिजांकडुन ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकुन घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला किर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेउन गेली. त्याची जाणिव ठेवुन चिमाजीने वसई जवळच "वज्रेश्वरी" देवीचे सुंदर मंदिर बांधले.

बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासुन रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडुन गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकुन मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडुन, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुध्द शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. थोरले बाजीराव हे ६ फुट होते, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्यांचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबुस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीहि मोहीत व्हाव असा मोहक चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तीमत्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्यांना तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरीत. स्वत:ची कामे, शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकरा शिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख अगदी त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाल होतं. थोरले बाजीराव हे जगातील एक अपराजित सेनापती होते.

थोरले बाजीराव शिस्तीचे फार कडक होते. दिल्ली स्वारीत हेरांनी चूकिची बातमी आणल्यामूळे मराठ्यांचे हज्जारोंचे सैन्य शत्रुच्या सापळ्यात अडकता अडकता वाचले होते, म्हणुन त्यांनी हेरांना देहांत प्रायश्चित्त दिले होते. आंजनवेल उर्फ गोपाळगड (दाभोळ जवळ) इथल्या परीसरावर हबश्यांनी जोरदार हल्ला केला. गडावर १२०० ची शिबंदि होती. त्यांवर शिंदे नावाचे सरदार किल्लेदार होते. हबश्यांच्या हल्ल्याला प्रतिकार केला नाहि व माघार घेतली. हे राउंना समजताच त्यांनी टाकोटाक जबरदस्त कठोर शब्दांत पत्र धाडले - "बाराशे माणूस असतां प्रतिकार केला नाहित... अचंबा वाटल्याशिवाय राहिला नाहि...... रांडा असता तर निदान कामास तरी आला असता।"

बाजीराव उत्तरेत मोहिमेवर होते, त्यांनी स्थानिकांकडुन यमुनेचे उतार जाणून त्यांचा दक्षिणकाठ आपल्या काबुत आणला. व मल्हाररावांना यमुनेच्या पलिकडिल गावांतुन चौथाई वसुल करायला सांगितले. परतीच्या वाटेवर मल्हाररावांची चंदावर(सैन्याची पिछाडि) सादातखानच्या मोगली सैन्याने मारुन काढली मराठ्यांचे जुजबी नुकसान झाले. पण त्या सैन्याने दिल्लीत बादशहाला खबर पाठवली - "आम्हि पंडतला चंबळपार पिटाळले आहे, गुजरात व माळव्याची सुभेदारी देणार असाल तर त्याची सद्दिच संपवु!" बादशहा सिंहासनावरुन तीनताड उडलाच. बादशहाने सादातखानाला शृंगारलेला हत्ती पाठवला व मराठ्यांच्या वकिलाला अपमानित करुन त्यांनी हाकलुन दिले. वकिल राऊंच्या छावणीत आला व सगळि गोष्ट सांगितली. राऊंचा भडका उडला चिमाजी अप्पांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात- "बोटभर करुन हातभर सांगण्याची मुघलांची जुनीच रित! यावर उपाय दोन, खासा जाऊन सादातखानच बुडवावा अथवा दिल्लीस जाळुन काढावे .... दुसरा उपाय योग्य वाटला.". दुसर्‍याच दिवशी बंगेशच्या सैन्यापासून २८मैलांवरील कुराबंदि येथुन ५५ हजार मराठे गेले तरी सादात व बंगेशला पत्ताच नाहि. राऊ दिल्लीच्या बाहेर येऊन उभे राहिले. तिथे भरलेल्या जत्रेत काही लोकांच्या कानाखाली आवाज काढुन (पत्रात याला झांबडा-झांबड केली असे म्हंटले आहे) त्यांना निरोपासकट दिल्लीत पाठवले - अमुक एक चौथाई द्या, नाहितर दिल्ली जाळुन काढेन. दरबारात फुट पडली एक गट म्हणाला पंडतच काय कोणीहि असला तरी ब्याद घालवा, दुसरा गट यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. चालुन आलेले सैन्य मराठ्यांनी फुंकरीत उडवुन लावले. तसा बादशहा गरगरला, आणि दिल्लीतुन बाहेर गेला. असा रुद्रावतार धारण केल्यावर कोण सरळ वागणार नाहि??

पर्शिअन कागदपत्रे एक कथा सांगतात. उत्तरेच्या स्वारीत राऊ उदयपुरला गेले तेव्हा उदतपुरच्या राजाने - राण्याने मोठे व्यासपिठ उभे केले. व जाहिर सभा बोलावुन बाजीरावांचा सत्कार करायचे ठरवले. मोठ्या मैदानावर अनेक पायर्‍यांचे व्यासपिठ बनवले - सजवले. राणा पुढे झाले व थोरल्या बाजीरावांचा हात धरुन ते त्यांना सर्वोच्च स्थानी घेऊन गेले. तिथे दोन सुवर्ण सिंहासने आजुबाजुला ठेवली होती. मग एका सिंहासनाजवळ राणा स्वत: उभे राहिले व दुसर्‍या सिंहासनाकडे हात दाखवत राऊंना म्हणाले "पंडतजी विराजिये!" राऊंनी एकदा राण्याकडे पाहिले, एकदा तमाम गर्दिवर नजर फिरवली आणि पुढच्याक्षणी त्या सिंहासनासमोर पाय ठेवायला जो चांदिचा चौरंग असतो त्यावर बैठक मारली, सगळे चमकले... राणा पुढे होत बाजीरावाच्या खांद्या धरत म्हणाले "यह आप क्या कर रहे हो पंडतजी? यहॉं उपर विराजिये!" तसा बाजीराव हसत उत्तरले "राणाजी यह सिंहासन राणा प्रतापसिंहजी का है। उसपर मंडित कैसे हो सकतॉं हुं??... और मै तो सिर्फ छत्रपतीका पेशवा हूं, अगर यहां कोई बैठ सकता है तो हमारे छत्रपती, मेरी जगहा यहि है ।" हे ऐकताच जनतेत राणाप्रताप व बाजीरावांच्या नावाचा जयजयकार सुरु झाला. त्या सभेला जयपुरचे व इतर राज्यांच्या राण्यांचे काहि मंत्री देखिल निमंत्रित होते. हि घटना सहाजिक संपूर्ण मारवाड - राजपुतन्यात मध्ये पसरली. पुढे जयपुरच्या राण्याने देखिल बाजीरावांना निमंत्रण दिले, त्यांनीहि सभा बोलावली व बाजीरावांना तसेच सिहांसनावर बसायला सांगोतले, बाजीरावांनी क्षणाचा विलंब न लावता सिंहासनावर बैठक घेतली. राण्यासकट सगळे गांगरले..... अर्थात सभा लवकर बरखास्त झाली. राऊ परत आपल्या डेर्‍यात आल्यावर त्यांच्या खाजगी चिटनीसांनी सदाशिव बल्लाळ कुंटे यांनी विचारणा केलीत "श्रीमंऽतऽऽ क्षमा असावी परंतु उदयपुरास तसे, येथे असे? प्रयोजन समजले नाहि?" तसे बाजीराव कडाडले - "पंत हे तुमच्या लक्षात यायला हवे, उदयपुरच्या स्वातंत्र्यासाठी रानांत फिरणारे राजे त्या सिंहासनावर बसले.... पण हे काय सिंहासन आहे? हेच सिंहासन टिकावे म्हणून आपल्या लेकी मुघल जनान्यात देणार्‍यांच्या सिंहासनाशी हिच वर्तणूक योग्य!"

राऊ संतापले कि त्यांच्या समोर जायला भले भले चळचळ कापत. पण आपल्या सैन्यावर राऊंचे तितकेच प्रेम होते. स्वारीत ते वेळप्रसंगी अगदि साध्या सैनिकांबरोबर मिसळुन खाणे - पिणे करत. त्यामुळे सैनिकांमध्ये ते अतिशय प्रिय होते.  राऊंनी होळकर, शिंदे, गाकवाड, पवार, भोसले यांसारख्यांचे गुण हेरुन त्यांना इंदुर, ग्वाल्हेर,बडोदा,धार,नागपुर अश्या शहरांच्या जबाबदार्‍या टाकुन मराठ्यांची खुंटि बळकट केली. शिवरायांत देखिल हेच गुणग्राहकत्व आणि असेच नेतृत्वगुण आढळतात.... अशीच माणसे फार मोठि होतात. त्याकाळी थोरल्या बाजीरावांच्या तोडिचा एक सेनापती उभ्या भारतात नव्हता. आदराने उत्तरेत त्यांना पंडत (पंडित) म्हणत. बंगेशला - मुघलांच्या वजीराला दोन साध्या राजपुत कारकुनांनी तोंडावर सांगितले होते - कि "भारतात एकच सुरमा आहे पंडत(पंडित)! तुम्हि पंडतला हरवायचा विचारहि करु नका, तो केवळ अजिंक्य आहे!"


बाजीरावाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यास शाहु महाराजांनी पेशवाईची वस्त्रे दिली. नानासाहेबाने पुण्याला खर्‍या अर्थाने शहराचे रुप दिले. सदशिव पेठ, नाना पेठ, शुक्रवार पेठ आणि पर्वती हे नानासाहेबाच्या आज्ञेवरुन बांधेले गेले. शिवाय मुठेवर "लाकडी पुल" त्यानेच बांधुन घेतला. पुण्याला शुद्ध पाण्याचा पुरवठा होत रहावा म्हणुन यानेच "कात्रज" वसवले.
नानासाहेबाने खर्‍या अर्थाने मराठे शाहीचा अटकेपार गेलेला सुवर्णकाळ बघितला त्याच बरोबर मराठ्यांना पानिपतचा प्राणांतिक फटका याच्याच करकीर्दीत बसला. व्यवस्थापनाच्या दृष्टिने मात्र नानासाहेबाने आपले काम चोख बजावले. रघुनाथरावाने वयाच्या २३व्या वर्षीच अटकेवर भगवा फडकवला. राघोबाचा राघो-भरारी झाला. याच काळातिल ४ मे १७५८ रोजी राघोबादादांचे नानासाहेबांना लिहीलेले एक पत्र मराठ्यांमधील चेतलेल्या आत्मविश्वासाचे बोलके उदाहरण आहे - "आपण लाहोर, मुल्तान, काश्मीर आणि अटकेच्या आसपासचे सुभे आपल्या अंमलाखाली आणले आहेत, आणि जे न आलेले प्रदेश आहेत ते लवकरच आपल्या राज्यात समाविष्ट करु. अहमदशहा अब्दालीचा पुत्र तैमु्र सुल्तान आणि जहानखान यांना आपल्या सैन्याने पराजित केले आहे. त्यांना आपण अक्षरश: नागवले आहे. आपले विस्कळीत सैन्य घेउन ते एव्हाना पेशावरपर्यंत पोहोचले असतिल. आम्ही आपले राज्य कंदहारपर्यंत वाढवण्याचे निश्चित केले आहे."
बाजीरावापासुन राघोबांपर्यंतच्या या सगळ्या विजयांमुळे मराठी साम्राज्य उत्तरेत सिंधु नदी आणि कश्मीरपर्यंत, पुर्वेला ओरिसापर्यंत, दक्षीण-पश्विमेला गोव्यापर्यंत आणि दक्षीणेला म्हैसुरपर्यंत पसरले. निजामाला तर मराठ्यांनी मिळेल तिथे पिटुन काढले. सदाशिवराव भाऊ ने हैदराबादच्या निजामाला सळो की पळो करुन सोडले. दिल्लीचे सिंहासन मरठ्यांनी आपल्या टाचेखाली आणले. शिवछत्रपतींची "थोरली मसलत" म्हणजेच दिल्लीवरचा हक्क बाजीराव पेशव्यांनीच प्रस्थापित केला. इथे एक गोष्ट सांगाविशी वाटते - मराठी घोडे ज्या मार्गाने अटकेवर चालुन गेले आज बरोबर त्याच्या अलीकडचा भाग "हिंदुस्थान" आहे. बाकीचा "पाकीस्तान", एखाद्या घटनेचे खुप दुरवर कसे पडसाद उमटतात याचे हे मुर्तीमंत उदाहरण आहे. याच घटनेवर वीर सावरकरांसारख्या प्रतिभावान कवीने तर "अटकेवर जरीपटका म्हणुन २६० ओळींचा पोवाडाच लिहून काढला". तो संपूर्ण पोवाडाच वीरश्रीने भरला आहे, सगळा पोवाडा इथे देता येत नसला तरी त्याच पोवाड्यातील काही मोजकी पदे देण्याचा मोह अनावर होतो आहे -

ऐका ऐका हिंदुमात्र हो! वार्ता विजयाच्या आल्या,
उभ्या सात शतकांचा उगवे सुड जिंकिले जेत्याला॥१॥

जो जो मागे आला आसुर शक्तीच्या की भरावरी,
भारतीय यज्ञाश्व नाचला त्याच्या त्याच्या उरावरी॥४३॥

कुठे आज ते शक? वा बर्बर? बाल्हीकही? वा हूण कुठे?
भारतीय जठरग्नीत जळुनी भस्म जाहले द्रुत ते ते॥४४॥

परी आज ते शल्य उपटले आज तोडीला ध्वज तो रे,
आज जिंकीलि तीही लढाई, आजि महंमद-मद उतरे॥६४॥

हिंदूवीरांचा कीं श्रीशे असे यशस्वी हट केला,
आज हिंदवी जरिपटका की पुन्हा पोचला अटकेला॥८०॥

पठाण मोंगल तुर्क इराणी-दाढी तितुकी सामोरी,
पुर्तुगिज वलंदाज फिरंगी टोपी तितुकी पाठिवरी॥१३१॥

परी तितुक्यांहीसहित मराठा-वीर झुंज करी,
एक्या ह्स्ते उपटित दाढी टोपी उडवी दुज्या करी॥१३२॥

पालखेडसी निजाम पिटला अल्ली पिटिला बंगाली,
अर्काटासी नबाब पिटला, पिटिला सिद्दी जली स्थली॥१६४॥

बादशहाच्या बादशाहिची जाळुनि दाढी दिल्लीवरी,
होता की नव्हतासा केला निजाम पिटुनी भोपळी॥१८०॥

जयजयकारे भरा अंबरा करा महोत्सव घरोघरी,
मांगलिका कीं हिंदुमात्र हो वार्ता आतांची आली॥२२०॥

आज सात शतकाने विजयी मिरवित सोनेरी तोडा,
पिई सिंधुचे पाणि पुनरपी हिंदु सैनिकांचा घोडा॥२५२॥


मात्र राघोबादादाची पाठ फिरताच रोहीलखंडातील नजिब, अहमदशहा अब्दालीशी चुंबाचुंबी करु लागला. राघोबाने डिवचलेला अब्दाली संधीची वाटच बघत होता. दिल्ली आपल्या ताब्यात रहावी म्हणुन त्याने मोर्चा बांधणी चालु केली. १७ ऑक्टोबर १७५९ रोजी त्याने दिल्लीच्या दिशेने कुच केले. अगदि २७ नोव्हेंबरपर्यंत तो सरहिंदपर्यंत आला. १० जानेवारी १७६० रोजी दिल्लीजवळिल लढाईत दत्ताजी शिंदे कामी आले.

अब्दालीचा बंदोबस्त करण्यासाठी सदाशिवरावभाऊ (चिमाजी अप्पांचा पुत्र) शिंदे, होळकर, गायकवाड, मेहेंदळे असे तोलामोलाचे सरदार घेउन दिल्लीवर चालुन गेला. २ ऑगस्टला भाऊ दिल्लीत पोहोचले. डावावर प्रतिडाव टाकले जात होते. १६ ऑक्टोबर १७६० ला मराठ्यांनी कुंजपुरा जिंकले व दत्ताजींचा बदला अब्दुस्समखान व कुतुबशहाचा शिरच्छेद करुन घेतला. पण भाऊला त्या भागाची फारशी माहीती नव्हती, उत्तरेतिल त्याची पहीलीच मोहीम होती. या उलट अब्दालीच्या दिल्लीवर आधीच ४ स्वार्‍या झाल्या होत्या. सुरुवातिला छोट्या-छोट्या चकमकीत मराठी सैन्याने हिसका दाखवला असला तरी अनुभवी अब्दालीच्या सैन्याने १४ जानेवारी १७६१ रोजी मुख्य लढाईला तोंड फ़ोडले. या पानिपतच्या तिसर्‍या लढाईत दोहो बाजुचे मोठे नुकसान झाले.


यात मराठ्यांचा मोठा पराभव झाला. १,००,००० पेक्षा जास्त मराठी सैन्य व बाजारबुणगे कापले गेले. १८ वर्षांचा कोवळा विश्वासराव लढाईत मारला गेला. सदशिवरावभाऊ देखिल कामी आला. दोघांची प्रेते अफगाणी सैनिकांच्या हाती लागली. कोवळ्या विश्वासरावाचे प्रेत बघुन तर अब्दाली चाटच पडला अब्दालीच्या सैन्यालाही इतका उमदा पुरुष मेल्यानंतरही आपल्या सोबत अफगाणात न्यावा असे वाटले. ब्रिटिश पत्रे देखिल विश्वासरावाला "Most handsom among marathas" असे म्हणतात. असे म्हणतात की पानिपतच्या लढाई नंतर पुणे भागातील एकही घर असे नव्हते की ज्या घरातला पुरुष कामी आला नव्हता पेशवाईची पत्रे याचा उल्लेख घरोघरी बांगड्या फुटल्या असे करतात. नानासाहेबाला जे पत्र आले त्यात लिहीले होते "दोन ही्रे हरवले, काही मोती हरवले आणि मोहोरा कीती हरवल्या याला गणानाच नाही." मराठ्यांचा पराभव झाला खरा पण मराठ्यांनी अब्दालीला देखिल असा फटकावला की त्या नंतर दिल्लीकडे परत तो कधीच फिरकला नाही. उलट नंतर त्याने मराठ्यांनाच दिल्लीचे रक्षक अशी मान्यता दिली. पुण्यास नानासाहेबास सांत्वनचे पत्र पाठवुन झाल्या युध्दा बाबत खेद व्यक्त केला. आजही तेथील माणसे जिंकलेल्या अब्दालीपेक्षा हरलेल्या मराठ्यांना मान देतात, भाऊने जेथुन लढाईची सुरुवात बघितली होती तिथे हरीयाणा सरकारने एक स्मृतीस्तंभ उभा केलाय. मात्र पानिपतचा पराभव मराठ्यांच्या सत्तेवरचा मर्मप्रहार ठरला. खरंतर या लढाईत ना मराठे जिंकले ना अब्दाली ... पानिपतावर जिंकला तो नजिब.

हि लढाई १८व्या शतकातली सर्वात मोठी लढाई होती. सगळ्या बाजू पूर्णत: प्रतिकुल असून मराठे राष्ट्ररक्षणार्थ पानिपतावर उभे राहिले, लढले - पडले. पण त्याने झाले असे कि पंजाबात शिखांच्या सत्तेचा उदय झाला. व त्यानंतर खैबरखिंडितुन परत कधीही भारतावर आक्रमण झाले नाही. पुढे महादजी शिंदे यांनी माधवराव आणि सवाई माधवरावांच्या काळात उत्तर मराठ्यांच्या अंमलात आणली. १७७२ मध्ये मराठे पुन्हा दिल्लीत आले व पुढे तीस वर्ष मराठ्यांचा उत्तरेतील जोर कायम होता. इतकेच कशाला १७८८ ते १८०३ या पंधरावर्षात दिल्लीच्या "लाल किल्यावर" मराठ्यांचा जरीपटका मोठ्या डौलाने फडकत होता हा सत्य इतिहास आहे.

आपल्या स्वकीयांच्या आणि मुलाच्या मृत्युची बातमी ऎकुन नानासाहेब खचले. त्यांनी त्याची हाय खाल्ली हेच दु:ख उराशी कवटाळुन हा महान पेशवा २३ जुन १७६१ रोजी वारला. त्यांच्या धाकट्या मुलाने माधवराव पेशवा १ला याने मात्र पुढच्या काही वर्षात दक्षीणेत मराठी सत्तेचा दरारा परत प्रस्थापित केला. माधवरावास २० जुलै, १७६१ रोजी पेशवाईची वस्त्रे मिळाली. सुरुवातीच्या काळातच त्यांनी - १७६२ उरळी, नोव्हेंबर १७६२ घोडनदी, ऑगस्ट १७६३ राक्षसभुवन या लढाया केल्या. निजामाला १७५९ ला उदगीरला सदाशीवरावभाऊने निजामाला हरवुन ८५ लाखाचा मुलुख हस्तगत केला होता. त्याचा सुड घेण्यासाठी मराठयांच्या नाजुक परीस्थितीचा फायदा घेत नळदुर्ग, अक्कलकोट या ठिकाणी निजामाने धुडगुस घालत होता. माधवरावांनी २० ऑगस्ट १७६१ रोजी मोहिम हाती घेतली. पण २९ डिसेंबर, सन १७६१ मध्ये राघोबादादांनी अनपेक्षीत तह केला. या नंतर पेशव्यांनी हैदरालीखान विरुध्द मोहिम उघडली, मात्र रघुनाथरावांनी निजामाशी हातमिळवणी करुन घरभेदीपणा केल्याने माधवरावांनी तात्पुरती शरणागती पत्करली. मात्र निजाम व राघोबादादा यांच्यात बेबनाव सुरु झाला निजामाने पुण्यावर हल्ले केले. या नंतर औरंगाबादवर मराठ्यांनी हल्ले केले. पुढे राक्षसभुवन येथे १० ऑगस्ट १७६३ च्या युध्दात पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला. निजामाकडुन उदगीरचे ६० लाख आणि नविन २२ लाख असा एकुण ८२ लाखांचा मुलुख मरठ्यांनी मिळवला. माधवरावाने हैद्राबादच्या निजामाला दाती तृण धरायला लावले. या नंतरच्या काळात माधवरावांनी कर्नाटकवर एकंदर ५ स्वार्‍या केल्या. या मोहिमांमुळे अगदी शहाजीराजांच्या वेळचा जहागिरीचा सर्व मुलुख परत मराठ्यांना मिळाला. या मोहिमांत माधवरावाचे शिस्त, चिकाटी, शौर्य, जरब हे गुण हे गुण उजळुन निघाले. १२ वर्षांत त्याने मराठी सत्तेचा गेलेला आत्मविश्वास परत मिळवुन दिला. मराठ्यांचा ब्रिटीश इतिहासकार ग्रॅंड डफ हा माधवराव पेशव्याची तुलना त्याचाच आजा पहीला बाजीराव याच्या बरोबर करतो. राघोबादादाने मात्र माधवरावाच्या पेशवा बनण्याला विरोध केला. राघोबादादाला पेशवेपद त्याच्याकडे पाहीजे होते. म्हणजे शाहुराजे - ताराराणी मधला जुना वादच परत या दोघात चालु झाला. शेवटी नाईलाजाने माधवरावांनी राघोबादादांना नजरकैदेत टाकले. पुढे आतड्याच्या क्षयाच्या आजाराने माधवरावांचे १७ नोव्हेंबर १७७२ रोजी थेउर येथे गणपती मंदीराच्या ओसरीतच निधन झाले. ग्रॅंड डफ म्हणातो - "पानिपतापेक्षाही माधवरावाचा मृत्यु हा पेशवाईसाठी दुस्वप्न ठरला." माधवराव गोरेपान, उंचपुरे, आणि थोराड शरीराचे होते, काळेभोर आणि पाणीदार डोळे, उग्र चेहेरा याच बरोबर मितभाषी असुन एरवी बोलताना रोखठोक आणि ठासुन बोलत. लेखन रेखिव होते. राज्याच्या कर्जफेडीसाठी स्वत:चे लाखो रुपये, जडजवाहिर दिले. बाजीरावाप्रमाणेच माधवरावांना देखिल चैन, आळस, लबाडि बिलकुल खपत नसे.

त्या नंतर डिसेंबर १७७२ मध्ये त्यांचा धाकटा भाऊ नारायणराव पेशवा झाला. मात्र राघोबादादांच्या गारद्यांनी त्यांचा खुन केला. १९७३ मध्ये राघोबादादाच पेशेवे झाले. नारायणरावांच्या मृत्युची चौकशी करुन न्यायमुर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी त्याचा ठपका राघोबादादांवर ठेवला, राघोबांनी निमुटपणे पेशवेपदावर नारायणरावाचा पुत्र माधवराव २रा म्हणजेच सवाई माधवराव यास गादीवर बसवले. १७९६ पर्यंत त्यांनी गादी चालवली.

सवाई माधवरावांच्या काळात मराठ्यांनी परत दिल्लीवर जरब बसवली खुद्द महादजी शिंदे दिल्लीत तळ ठोकुन राहिले, बादशहाने त्यांना वजीर म्हणुन नेमले तेव्हा अतिशय नम्रपणे महादजी शिंदे यांनी त्याला नकार देऊन ती वस्त्रे पुण्यास पाठवुन पेशव्यांना वजीर नेमले. दिल्लीच्या नाड्या पुन: पुण्याच्या हातात आल्या याचेच हे पुरावे होते. इथे नाना फडणिसांनी इंग्रजांची २-३ राजकिय व लष्करी आक्रमणे परतवुन लावली. यामुळे "जबतक नाना तबतक पुना" असे भारतभर म्हंटले जाऊ लागले. सवाई माधवरावांच्या आत्महत्ये नंतर पेशवेपदावर राघोबादादाचा पुत्र दुसरा बाजीराव आला, हाच तो पळपुटा बाजीराव. यशवंतराव होळकराला भिउन हा पुणे सोडुन पळाला आणि वाई येथील इंग्रजांच्या आश्रयाला गेला. इथुन प्रत्येक बाबतित इंग्रज मराठी सत्तेत ढवळाढवळ करु लागले. ३१ डिसेंबर १८०३ रोजी झालेल्या करारा नुसार बाजीरावाने इंग्रजांची तैनाती फ़ौज स्वीकारुन, त्या फौजेच्या खर्चासाठी मोठा मुलुख इंग्रजांच्या घशात घातला. १८०० साली नाना फडणवीस यांचा मृत्यु झाल्यावर पेशवाईतील उरले-सुरले शहाणपण संपले. १७९९ मध्ये टिपु सुलतान आणि १८०० साली नाना फडणवीस यांचा मृत्यु झाल्यावर इंग्रजांना पुणे हे सोपे आणि एकुलते एक लक्ष झाले. १८०३च्या तहा नंतर देखील बाजीराव आणि ब्रिटीश यांच्यात धुसफुस चालुच राहीली. शेवटी त्याची परीणीति ५ नोव्हेंबर १८१७ या दिवशी खडकी येथील लढाईत झाली. ईस्ट इंडिया कंपनीने लेफ्टनंट कर्नल बर(Burr) याच्या नेतृत्वाखाली दुसर्‍या बाजीरावाचा पराभव केला. १८१८ मध्ये अशीरगडजवळ धोलकोट येथे John Malcolm याच्या समोर मराठ्यांनी शरणागती दिली. काही इतिहासकार याची २ कारणे देतात १)२रा बाजीराव हा नजरकैदेतच वाढला असल्याने त्याला दरबारी कामकाज व राजकारण आणि युध्दातले छक्के-पंजे माहीत नव्हते, २)पेशव्यांच्याच हाताखाली मोठे झालेले सरदार आता पेशवाईलाच धाक दाखवत होते. अशी संकटे या आधीच्या कोणत्याच पेशव्यावर आली नव्हती. इंग्रजांनी त्याचे राज्य हिसकावुन त्यास वार्षिक ८ लक्ष रुपयांचे पेन्शन चालु केले, त्याची रवानगी कानपूरजवळ ब्रह्मवर्तास झाली. इंग्रजांनी रायगड देखिल ताब्यात घेतला, रायगडवर त्यांनी सगळी हिशेब आणि दरबारी कागदपत्रे जाळली व सगळ्या मुख्य इमारती जमिनदोस्त केल्या.

इंग्रजांचा काळा कालखंड भारतावर सुरु झाला. बाजीरावास अनेक लग्नांनंतर देखिल मुल झाले नव्हते, शेवटी वेणगांव(कर्जत-रायगड) येथील माधवराव भट जे बाजीरावाच्या सांगण्यावरुन ब्रह्मवर्तास स्थायिक झाले होते त्यांच्या "गोविंद" नावाच्या मुलाला दत्तक घेतले. त्याचेच नाव धोंडोपंत ठेवले, हेच ते स्वातंत्र्यसेनानी "नानासाहेब पेशवे" या शिवाय बाजीरावाने २ मुले दत्तक घेतली होती - गंगाधर उर्फ बाळासाहेब आणि सदाशिव उर्फ दादासाहेब. २रा बाजीराव २८ जानेवारी १८५१ मध्ये वारला, मात्र ११ डिसेंबर १८३९ च्या त्याच्या मृत्युपत्रा प्रमाणे इंग्रजांनी नानासाहेबास उत्तराधिकारी म्हणुन मान्यता दिली तरी पदव्या आणि पेन्शन देण्यास नकार दिला. नानासाहेबच नव्हे तर भारतातील बर्‍याच संस्थानांना इंग्रजांनी तनखा नाकारला, काहांची तर संस्थानेच वारसाहक्का वरुन किंवा दत्तकविधानावरुन खालसा करावयास घेतली.

सगळीकडे असंतोष पसरत चालला होता. १८३० पासुनच भारतीय उद्योगांची इंग्रज सरकार जाणुन बुजुन गळचेपी करत होते. माल निर्यातीवर जबर कर लादला, आणि इंग्लंडमधुन येणारा माल आयात अत्यल्प बसविल्याने स्वस्तात विकायला काढला. भारतीय उद्योगांचे तीनतेरा वाजले. १८३०-३१ सालचा विनिमय दर होता १५ भारतिय रु. = १ स्टर्लिंग पौंड. यावरुन भारतीय धंदे का बुडित गेले याचे सुस्पष्ट कारण समजते. आर्थिक आघाडी अशी पिछाडली होती तर भारतीय सैनिकाचे पगार देखिल इंग्रज सैनिकांपेक्षा कित्येक पटींनी कमीच होते, त्यांना बढती अशी कधी मिळतच नसे. यातच भर म्हणुन सामाजिक स्थित्यांतरे घडत होती कायद्याने हिंदुंच्या धार्मिक रिवाजात आड्काठी करण्यात आली, समुद्रयात्रेला हिंदु धर्माने धर्मबाह्य ठरवल्याने ही समुद्रयात्रेची अट शिपायांना जाचक ठरु लागली. मात्र या असंतोषाला वाढवण्याचे मुख्य कारण घडले - काडतुसांना लावलेली चरबी, ही गाय कींवा डुकराची असे. गाय हिंदुंना पवित्र आणि डुक्कर मुसलमानांना निषिध्द असल्याने सैनिकांमधे प्रचंड असंतोष पसरला होता. या सर्व थरातिल असंतुष्ट घटकांना नानासाहेब पेशव्यांनी एकत्र आणले. यात त्यांना केवळ पेन्शन मिळाले नाही म्हणुन संस्थानिकांनी भारतीय सैनिकांना चिथवुन हे बंड घडवुन आणले किंवा मुसलमानांना आपली सत्ता परत पाहीजे होती म्हणुन त्यांनी हिंदुंना धाक घालुन हा "जिहाद" घडवला असे म्हणणार्‍यांनी १८५७ च्या आधीची नानासाहेबांनी - झाशीची राणी कींवा आसाम, जयपुर, चांदा, ग्वाल्हेर, रेवा, संबलपूर या आणि अश्या शेकडो राजे-राजवाड्यांना १८५४ पासुनच या युध्दाबाबत लिहीलेली पत्रे वाचावित. कींवा लष्करी छावणीत सैनिकांकडुन कमळावर आणि नागरीकांकडुन भाकर्‍यांवर हात ठेवुन घ्यायला लावलेली शपथ बघता यात नानासाहेबांनी कीती गुप्तता ठेवली होती हे लक्षात येतं. केवळ वार्षिक ८ लाखाच्या तनख्यासाठी लढणारे नाना नव्हते ना झाशीची राणी. २र्‍या बाजीरावाच्या मृत्युनंतर नानासाहेबांच्या आई नेपाळ येथे राहील्या, तेथे त्यांनी ८० गावे ’खरेदी’ केली या वरुन नानासाहेबांसाठी बाजीरावाने ७ पिढ्यापुरेल इतका पैसा सोडला होता हे समजते, त्यापुढे ८ लाखाचे पेन्शन ते काय?

१८५७च्या स्वातंत्र्यसमराची तयारी कीमान ३-४ वर्षे आधीच चालु होती आणि आम्हाला याची कुणकुण मंगल पांडे यांच्या फाशी नंतरच आली असे खुद्द ब्रिटीशांनीच कबुल केले. म्हणजे यात कीती सुसुत्रता होती हे समजेल. मात्र ३१ मे १८५७ ऎवजी १० मे १८५७ रोजीच ही आग भडकली. १८१८ पासुन ४० वर्षे वाट बघत असलेली शस्त्रे शमी वरुन काढली गेली. मंगल पांडे हा सैनिक या युध्दातिल पहीला हुतात्मा ठरला. सुरुवातीला भारतीयांना मोठे विजय मिळत गेले, झाशीची राणी, तात्या टोपे, कुंवरसिंह यांनी अतुल पराक्रम केला. सर्वांनी बहादुरशहा यांस आपला नेता बनवले व दिल्लीच्या तख्तावर बसवले. मात्र हा उठाव नंतर विस्कळीत झाला. दुर्दैवाने हे स्वातंत्र्यसमर इंग्रजांनी अतिशय निर्दयपणे चिरडुन टाकले. क्रांतिकारकांचे जथ्थेच्या जथ्थे फासावर जात होते, तोफेच्या तोंडी जात होते. झाशीच्या राणी सारखे धुरेचे वीर आणि वीरांगना धारातीर्थि पडल्या, या संपुर्ण उठावात पेशव्यांचे सेनापति असलेले आणि काल्पीचा कील्ला ज्यांनी सर केला ते तात्या टोपे पकडले गेले इंग्रजांनी त्यांना फासावर दिले, बहादुरशहा काळ्यापाण्याच्या शिक्षेवर पाठवण्यात आले. सगळीकडे परत अंधार पसरला. नानासाहेब कानपूर येथुन निसटुन नेपाळ येथे गेले. पुढे नानासाहेब शेवट्पर्यंत भुमीगत राहुन परत सगळ्याची जुळवाजुळव करत होते याचे अनेक पुरावे आज प्रकाशात आले आहे. मात्र त्यात फारसे यश आले नाही. नानासाहेबांचे स्वातंत्र्यसमरा नंतरचे वास्तव्य नेपाळात कुठे होते ते परत भारतात येऊन गेले का? या बाबत इतिहास मुक आहे. मात्र नानासाहेब पेशवे अखेरपर्यंत अपराजित ठरले. इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी जंग जंग पछाडले पण त्याचा काही एक फायदा झाला नाही. या युध्दात नानासाहेबांचे बंधु बाबासाहेब आणि पुतणे रावसाहेब त्यांच्या मदतीस होते, त्याच बरोबर ग्वाल्हेरचे सरदार आपटे, ग्वाल्हेरचे प्रधान रावराजे दिनकरराव राजवाडे यांनी मदत केली. अगदी नानासाहेबांना सटकता यावे म्हणुन तात्या टोप्यांचे सहकारी "श्री भागवत" यांनी स्वत:ला नानासाहेब भासवुन अटक करवुन घेतले आणि फासावर गेले. परत जुळवाजुळव करताना एखादा प्रांत आपल्या ताब्यात असावा म्हणुन नानांनी त्रयस्थाकडुन वर्‍हाडात जागा घेण्याचा प्रतत्न देखिल केला. पुढे १८८० मध्ये अण्णासाहेब पटवर्धनांनी असाच प्रयत्न केला होता. या सगळ्या उल्लेखांच्या मागचा उल्लेख १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामात व नंतर चित्पावनांचा सहभाग लक्षात यावा.

फारच निष्ठूरपणे १८५७चे स्वतंत्र्यसमर चिरडल्यावर इंग्रजांना वाटले की चला "वणवा" विझला. पण "वासुदेव बळवंत फडके" नावाचा अंगार धगधगु लागला. १८७६ मध्ये काही रामोशींना हाताशी घेउन त्यांनी आपले क्रांतिकार्य सुरु केले. फडक्यांना पकडुन देणार्‍यासाठी सरकारने बक्षीसे जाहीर केली, याला प्रत्युत्तर म्हणुन या "आद्यक्रांतिकारकाने" इंग्रज अधिकार्‍यांच्याच डोक्यावर दुपटिने बक्षीस लावल्यावर मात्र ब्रिटिश हादरले. दुर्दैवाने २७ जुलै १८७९ रोजी मेजर डॅनिअल याने देवरनावडगी येथे एका देवळात झोपलेल्या या नरकेसरीस अटक केले. त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावुन ’एडन’ येथिल कारागृहात पाठवले. तिथेही ते तुरुंगातुन निसटले, पण तेथुनही ते निसटले मात्र अनोळखि मुलुख, भाषा अनोळखी ते लगेच पकडले गेले. १७ फेब्रुवारी १८८३ रोजी तुरुंगातच त्यांचे निधन झाले.

१८५७ च्या झळीने ब्रिटीश सावध झाले होते. दाबुन ठेवलेला राग अश्या भयानक स्वरुपात बाहेर येतो हे समजल्यावर मिस्टर ह्युम यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना केली, आणि भारतियांचा लोकशाही पध्दतीत प्रवेश झाला. इथे देखिल राजकारणात चित्पावन तडफेने पुढे आले. अर्थात पहीले नाव "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक." बृहस्पतिनेही शिष्यत्व पत्करावं अशी अनेक नररत्ने चित्पावनांत जन्माला आली, त्या सगळ्यांचे हे मुकुटमणी ठरावेत इतकी प्रचंड आणि अलौकिक बुध्दिमत्ता टिळकांपाशी होती. यांनी केसरी वृत्तपत्राची स्थापना करुन त्याचे संपादकपद सांभाळले, पत्रकारीतेने काय घडवले जाऊ शकते हे त्यांनी दाखवुन दिले. ’उजाडले पण सुर्य कुठे?, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे विचारुन सरकारला वारंवार धारेवर धरुन ताळ्यावर आणले. यांचा जनमानसावर इतका प्रभाव होता कि टिळकांना सहा वर्षांची शिक्षा झाली तेव्हा भारतातील पहीला संप मुंबईत घडुन आला. टिळकांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली, ब्रह्मदेशात रंगुनच्या उत्तरेस मंडालेयात त्यांची रवानगि झाली. वास्तविक काळेपाणी म्हंटले की भले-भले गळपटतात. मात्र टिळक काय किंवा सावरकर काय हि अजब ताकदिची माणसे होती. टिळकांना इथेच "गीतारहस्य" उलगडले, सावरकरांना "कमला" इथेच सुचले. काळपुरुष कराकरा दात वाजवत समोर उभा असताना त्याला ’अनादि मी, अनंत मी!’ म्हणायची ताकद-चिकाटि-देशभक्ती यांच्यात होती, हे चित्पावनांसाठी अभिमानास्पदच आहे.

थोडा विचार केल्यावर लक्षात येइल की, इंग्रजांना ज्यांचा खरोखर "त्रास" व्हायचा त्यांनाच ते काळ्यापाण्यावर पाठवायचे, मग ते टिळक असोत, सावरकर बंधु असोत किंवा अगदि सुभाषबाबु असोत. लोकमान्य टिळक जेव्हा मंडालेहुन परत आले तेव्हा त्यांचे वर्णन कोणीतरी असं केलय - "तेथील हवामान प्रकृतिस न मानवल्याने ते फारच अशक्त जाणवत होते, चेहर्‍यावर थकवा स्पष्ट दिसत होता, गालफड बसल्याने भारदस्त मिश्या चेहर्‍याहून अंमळ मोठ्याच भासत होत्या!" लोकमान्यांचे तेथे आजाराने तब्येतिचे बरेच नुकसान झाले होते. वीर सावरकरांना देखिल ५० वर्ष काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती, पण दुसर्‍या महायुद्धामुळे आधीच इंग्रजांची भारतातील सद्दी संपली होती, इंग्रजांनी दिलेल्या शिक्षेनुसार ज्या दिवशी सावरकर सुटणार होते त्याच दिवशी पुण्यात तात्यांचा जंगी सत्कार करण्यात आला होता, तात्या सावरकर "मृत्यंजय" ठरले होते. अहिंसा-अहिंसा करत "आगाखान पॅलेस" मध्ये "कैद" भोगणार्‍यांना काय जातय उपवास करायला आणि चरखे चालवायला?? असो, त्याकाळी कुठे पुण्यात काहीही घटना घडली कि त्यास टिळक आणि कंपनी जबाबदार आहेत याची पुर्ण कल्पना इंग्रजांना असायची पण ते "पुराव्यानिशी शाबित" नाही करु शकायचे. बर काहीबाही करुन आरोप लावावेत तर भर कोर्टात "स्वराज्याच्या जन्मसिध्द हक्काची" गर्जना व्हायची, म्हणजे परत सरकारचीच लक्तरे. त्यामुळे इंग्रज "लाल पगडीला" फारच वचकुन राहु लागले. ह्या माणसाचे डोके कधी-कुठे चालेल याचा नेम नव्हता - इंग्रजांनी भारतीयांना संपुर्णपणे निशस्त्र करण्यासाठी फतवा काढला की "कोणीही कोणतेही विनापरवाना शस्त्र किंवा अगदी लाठी देखिल जवळ बाळगु नये." लोकांना आपल्या सुरक्षीततेची काळजी वाटु लागली, सल्ल्यासाठी ते टिळकांकडे गेले त्यांनी विचार करुन सांगितले - "शस्त्र नाही? लाठी देखिल नाही? बर खाण्याच्या कोणत्या गोष्टीवर नाहीना आलिये बंदि? मग "उस" बाळागत जा! लाठीचे काम देखिल होइल, कायदा देखिल नाही अडवु शकणार!" याला म्हणतात "वकिली" सल्ला. चित्पावनांबद्दल तर इंग्रजात इतकी दहशत बसली होती की "चित्पावन" म्हणजे काहितरी भयंकरच, अतिशय घातकी माणसे असे इंग्रज चित्पावनांचे वर्णन करत. कारण त्यांना माहीत होते कि सहसा आपल्या खिशाला हात न लागु देणारी ही माणसे, देशासाठी मात्र गळ्याला फास लावुन घेउ शकतात. एकाच घरातील ३ बंधुंनी बलीदान करायची परंपरा "चापेकरांनी" चालु केली व चापेकरांच्या बलीदानाने प्रभावित होऊन तीच परंपरा "मारता मारता मरेतो झुंजेन" या निश्चयाने सावरकर बंधुंनी चालु ठेवली. विश्वनाथ वैशंपायन उर्फ बच्चन हे भगतसिंगाचे महत्वाचे सहकारी होते. जॅक्सन वधाच्या केसमध्ये सुध्दा "मित्रमेळा" अथवा "अभिनव भारत" या संघटनेशी संबधित क्रांतिकारक - वि.दा.सावरकर, अनंत कान्हेरे, त्र्यंबक मराठे, गोपाळ पाटणकर, सोमण, केळकरशास्त्री, वामन जोशी, वैद्य, कर्वे, दांडेकर, गोरे, भट, केतकर, बाळ, वर्तक असेच होते. जॅक्सन खटल्याची सुरुवातच ’एक सोडुन सर्व ब्राह्मण असलेले आरोपि’ अशीच आहे. १८ ऑक्टोबर १९०६ रोजी शाहू छत्रपतींनी स्टॅन्ले एजरली यांना पत्र लिहुन ’नाशिक, कोल्हापुर बेळगाव व पुणे जिल्ह्यातिल ब्राह्मणांच्या दृष्टिकोनाची परीणिती भयानक हिंसक कृत्यात होईल,’ असा धोक्याचा इशारा दिला होता. ब्राह्मणेतर कटवाला आढळला तर त्याचे नाविन्य फार होते! असे शेरेहि काहिंनी मारले आहेत. या घटनांमुळे इंग्रजांच्या पायाखालची जमिन सरकली. १८५७ मध्ये नानासाहेब पेशवे व त्यांचे बंधु, मग वासुदेव बळवंत फडके, मागोमाग चापेकर बंधु हि अशी मारुतीची शेपुट वाढतच होती आणि इंग्रजांच्या लंकेला ती जाळत सुटली होती. एक वेळ वहाबी मुस्लिम परवडले पण हे पुणेरी चित्पावन नकोत. आणि या सगळ्यांचे प्रेरणा स्त्रोत "टिळक".

आधीच ब्राह्मण, त्यात पुणेकर,
त्यातहि कोकणस्थासी धरा।
यांनी गोरा ठार मारीला
कोणाला तरी कैद करा॥


असे एक पद इंग्रजांच्या तोंडि घालुन मित्रमेळ्यात एक पद गाजले होते.

इंग्रजांनी या पुणेरी चित्पावनांचा धसका घेतला होता. १८८२ मधील मुंबईचे गव्हर्नर रीचर्ड टेंपल "men & events of my times in India" या आपल्या ग्रंथात लिहितो - "ते आपल्याकडुन नवनविन विषय शिकतील, ते आत्मसात करतील आणि तरीहि स्वत:ची वैयक्तिकता टिकवतील. सार्वजनिक सभा नावाचा हा गट दांभिक असेलहि पण निश्चित्पणे अभिनव आहे." बामफिल्ड फुल्लर हे पूर्व बंगालचे ल्व्फ्टनंटा गव्हर्नर होते "Studies in Indian life & sentiments" या पुस्तकात ते म्हणतात - "एका शतकापूर्वी आपण मराठा मंडळिंच्या चलनवलनाचे चैतन्य होतो हे विसरु शकत नसलेले पश्चिम किनारपट्टिवरील ब्राह्मणच या शत्रुत्वाचे खरे पुरोहित आहेत." रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी "The aweaking of India" मध्ये लिहिले आहे "आपण याची आठवण ठेवली पाहिजे कि, मराठि ब्राह्मणांमध्ये त्यांच्या सत्तेचा विनाश होऊन शतकहि उलटले नसल्याची तीव्र भावना अद्यापहि वसत आहे. त्यांनी जिंकलेल्या लढाया आद्याप त्यांच्या स्मरणात ताज्या आहेत आणि प्रत्येक डोंगरावरुन वाकुल्या दाखवणारे त्यांचे किल्ले या आठवणी हिरव्यागार ठेवत आहेत. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवाद हा अन्य कोणत्याहि गटापेक्षा अधिक व्यक्तिगत आणि अधिक कडवट आहे." मराठ्यांचे साम्राज्य तर ’चित्पावन साम्राज्य होते असे नमुद करुन व्हॅलेंटाइन चिरोलनी ’Indian unrest' मध्ये चित्पावनांबद्दल म्हणतात - "नवीन परीस्थितीशी जुळवुन घेण्यात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पाश्चात्य शिक्षणाचा फायदा करुन घेण्यात ते तत्पर आहेत. नाना फडणवीसांच्या काळाप्रमाणे आजहि दक्षिणेतील प्रत्येक सरकारी कचेरीत चित्पावनांनीच गर्दि केली आहे. ते न्यायासनांवर बसतात, वकिल मंडळित त्यांचेच वर्चस्व, शाळांत शिक्षक तेच, एतद्देशीय पत्रसृष्टिवर नियंत्रण ठेवतात. पश्चिम भारतातील आधुनिक नाटक आणि साहित्य त्याचप्रमाणे राजकारणात तळपणारी नावे त्यांनीच पुरवली आहेत." टिळकांच्या लोकमान्यतेचा प्रत्यय १९०८ च्या खटल्यात पुरेपुर आला. "राजद्रोहि" तो "लोकमान्य" आणि "राजमान्य" तो "लोकद्रोहि" असा समज तेव्हा रुढ झाला. आणि "राजद्रोह्यांमध्ये" बहुसंख्य अर्थातच चित्पावनच होते.

संपुर्ण चित्पावनांची परंपरा बघितल्यास "लोकमान्य, असंतोषाचे जनक, आद्यक्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर, हिंदुह्र्दयसम्राट" अशी बिरुदे वागवणार्‍यांची नावे मिळतील, त्याच बरोबर "महर्षी, न्यायमूर्ती, शिक्षणमहर्षी, आचार्य, भारताचार्य, इतिहासाचार्य" अशी समाजिक आब राखणारी नावे देखिल मिळतील. चित्पावनांनी खरोखर चहुबाजुंनी शरादपी-शापादपी करुन दाखवली आहे. अगदी राजकारण-समाजकारण-साहित्य यात एकहाती चळवळ चालवणारे वीर सावरकर हे तर याचे सर्वोत्तम उदाहरण ठरावेत. अगदि फाळणीला त्यांनी कडाडुन केलेला विरोध किंवा अस्पृश्यमुक्ती चळवळ आणि वेळोवेळी शस्त्र सामर्थ्याचा केलेला गौरव हा समस्त जनांना माहीत आहेच.

चित्पावनांमध्ये साहित्य व कलेची सेवा करणारे जितके जण झाले तितके इतर कोणात क्वचितच झाले असतील. अगदी महत्वाचे उदाहरण द्यायचे झालेच तर अगदि कविता करणार्‍य़ा केशवसुत, सावरकर, विंदा पासुन ते अगदी आत्ताच्या संदिप खरे पर्यंत. आणि तिला चाल लावुन तिचे गाण्यात रुपांतर करणार्‍य़ा किंवा ते गाणर्‍य़ा पं पाध्येबुआ(सुधीर फडक्यांचे गुरु), सुधीर फडके, प्रभाकर जोग, राम मरठ्यांपासुन आत्तच्या श्रीधर फडके आणि ह्रषिकेश रानडे पर्यंत जंत्रीच मिळते. रंगभूमी आणि चित्रपटाचेही तेच. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक फाळक्यांपासुन ते अगदि आत्ताच्या अश्विन चितळे(श्वास)पर्यंत चित्रपटांशी निगडित व्यक्ती आपल्याला बर्‍य़ाच मिळतील. रंगभूमीचे म्हणाल तर विष्णुदास भावें पासुन ते नाट्यक्षेत्रात विश्वविक्रम करणार्‍य़ा प्रशांत दामले पर्यंत अनेक गुणी कलाकार आपल्याला मिळतील. लेखकांमध्ये तर अर्थात वीर सावरकर अग्रणी आहेत १०,००० पानांपेक्षा जास्त लिखाण त्यांनी मराठीत केलयं. पण त्याच बरोबर खुप सुंदर कथा-कादंबर्‍य़ा लिहिणारे चित्पावनात बरेच झालेत, इतिहासाचार्य राजवाड्यांचा मान देखिल खुप मोठा आहे, गंगाधर गाडगीळ, य.दि. फडके, वि.ग. कानिटकर असे नावाजलेले अभ्यासु लेखक आहेत, आणि कथा-कादंबर्‍य़ाच का? अगदी ज्ञानाने ओसांडुन वाहत असलेले ज्ञानकोश लिहीणारे यशवंत दाते, वासुदेव आपटे, श्रीधर केतकर, चि.ग. कर्वे असे अजुन ८-१० कोब्रा अगदी सहज निघतील. आणि ज्ञानकोशाच्याही पुढे जाउन "जगातला पहिला भक्तीकोश" करणारे विद्यावाचस्पती श्री शंकर वासुदेव अभ्यंकर देखिल चित्पावनच. पत्रकारीतेच म्हणाल तर अर्थात "लोकमान्य टिळक" हे नाव अग्रणी आहे. बरोबरच द्वारकानाथ लेले, अरविंद गोखले, कुमार केतकर, श्रीकांत परांजपे, मिलींद गाडगीळ,वैजयंती आपटे, राहि भिडे ही नावे सुद्धा घ्यावी लागतील. आचार्य अत्रेंसारख्या पहाडि व पं नेहरुंना देखिल न जुमानणार्‍या व्यक्तीला बोलबोल म्हणता धोबीपछाड घालणारे देखिल पु. भा. भावेच. शुभ-अशुभ मुहुर्त बघायला जे पंचाग लागते ते करणारे देखिल दाते, सोमण, केतकर, शं. बां दिक्षीत, म.दा.भट असेच आहेत.

चित्पावनांत संत-सत्पुरुष झाले नहित म्हणणार्‍य़ांनी - स्वामी स्वरुपानंद, मामा दांडेकर, दासगणु महाराज, केळकर महाराज, प्रल्हाद महाराज काळे, केवलानंद सरस्वती, पांडुरंगशस्त्री आठवले, नारायण दिक्षीत ते अगदी विनोबा भावे आणि शंकर अभ्यंकरांची नावे बघावित. संत बनण्यासाठी शारीरीक, मानसिक आणि वाचिक अहिंसा बाळगणे आवश्यक असते, पहिल्या दोन गोष्टी चित्पावन शक्यतो पाळतातही, मात्र ’तिरके’ बोलणे हा चित्पावनांचा स्वभावच आहे, पु.ल. म्हणतात तसे "भाषेला कशी पायात गिरकी घेउन चावयची सवयच झालेली" म्हणुन चित्पावनांत संत जरा कमी असावेत, मात्र अगदीच नाहीत असे नाही. संतां बरोबरच समाजसेवेत आणि समाजसेवेपेक्षाही समाजसुधारकांत लोकहीतवादी(गोपाळ हरी देशमुख), गोपाळ गणेश आगरकर, र. धों कर्वे, देहदान चळवळ चालवणारे सोहोनी, साने गुरुजी, वीर सावरकर अशे अनेक नावे येतील. अनेक I.A.S. आणि I.P.S. चित्पावन आहेत, सैनिकांत देखिल मोठ्या हुद्यावर अनेक चित्पावन आपली कामगिरी विनाकसुर पार पाडत आहेत. नावजलेले शास्त्रज्ञ - डॉक्टर - इंजिनीअर्स देखिल अनेक मिळतील, राहता राहीले खेळाडु व धंदेवाईक ते देखिल बरेच आहेत. प्रत्येक क्षेत्रात नाव कमावलेल्या सगळ्यांची नावे देत बसलो तर इथेच ७-८ पाने सहज भरतील. थोडक्यात १४ विद्या ६४ कला चित्पावनांनी आपापल्या परीने आत्मसात केल्या आहेत. भारतरत्न मिळवणारे महर्षी कर्वे, महोपाध्याय काणे आणि आचार्य विनोबा भावे असे चांगले ३-३ चित्पावन झालेत. शिवाय किमान ३०-३५ पद्म पुरस्कार विजेते देखिल मिळतील चित्पावनात. म्हणजे असे एखादेच क्षेत्र असेल ज्यात कदाचित चित्पावन नसावा.

चित्पावन ज्या क्षेत्रात जातात तिथे आपला महत्वपूर्ण ठसा उमटवतातच, याला कारण अंगभुत शिस्त. शिस्त हा चित्पावनच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. एखादि गोष्ट वापरुन झाली कि वेळच्या-वेळी आणि जागच्या-जागी गेलीच पाहीजे, म्हणजे अगदी अंधारतही हात घातला तरी वस्तु मिळते हा चित्पावनांच्या घरातला शिरस्ता. घरी पाहुणा आला कि बसण्याच्या जागेवरुन वर्तमानपत्रांची चळत, पुस्तकं, कपडे उचलुन गुधडलेली चादर नीट करुन मग - "हं बसा!" असं नाही म्हणाव लागत. घरातले प्रश्न चार भींतींबाहेर जाणार नाहीत इतपत आवाजातच बोलणं, वेळ-प्रसंग-माणुस पाहुनच एखादा विषय काढण किंवा थांबवण चित्पावनाला कळतं आणि वळत देखिल. चित्पावन चटकन दुसर्‍यावर विश्वास ठेवत नाहीत. अनोळखी माणासाशी चित्पावन स्वत:हुन बोलणार नाही किंवा बोललाच तर स्वत: बद्दल फारसे काही सांगणार नाही. प्रवासात आपण कोण? कुठचे? कुठे? कशा करीता जात आहोत? तिथे कोण राहतं? वगैरे निष्फळ - निरर्थक किंवा कदाचित महत्वाच्या गोष्टी चित्पावन सांगत नाही. आता काहीजण म्हणातिल यात काय आम्ही असेच करतो, पण जगात असे ढीगभर नमुने मिळतात, मात्र असा "चित्पावन नमुना" मिळणं कर्मकठिण आहे.

’ज्या भोकातुन मोठं मांजर जातं, त्या भोकातुन लहान मांजर जाणारच’ हे ज्ञान चित्पावनाला उपजत असल्याने एकाच गोष्टीसाठी तो फालतु खर्च करत नाही. मोबाइल मध्ये कॅमेरा-एफ.एम. ही कौतुक चित्पावनाला फारशी नसतात, बोलता आलं की चित्पावनाच मोबाइल बद्दलचं कौतुक संपत. दर ६-८ महिन्यात नविन मोबाइल चित्पावन घेणार नाही. त्यातुन कॅमेरा- एफ.एम.- ब्लु टुथ -टच स्क्रीन वगैरे असलेला महागडा मोबाइल घेतलाच तर कॅमेराची लेन्स टेबलवर ठेवुन तो गाडी-गाडी खेळणार नाही. घरी आल्यावर बुट काढताना दारातुनच मोबाइल पलंग-सोफ्यावर फेकणार नाही. थोडक्यात - गोष्टीचा योग्य आणि जास्तीत जास्त वापर ती वस्तु खराब न करता करतील. चित्पावन स्वत:ची वस्तु दुसर्‍याला देताना, समोरचा माणुस ती वस्तु "एकदाच पण शेवटचीच" वापरणार नाही, हा विश्वास येईपर्यंत देणार नाही. समोरच्याच्या हातुन कदाचित वस्तु खराब झालीच तर कारण समजुन घेउन, चुक असल्यास परत आपली वस्तु त्याला परत कधीहि देणार नाही. कोणाला कधीही वस्तु दिलीच तर चार शिस्तीच्या गोष्टी सांगुन मगच ती गोष्ट त्याच्या हातात देईल. ती वस्तु घेणारी व्यक्ती देखिल चित्पावनच असेल तर ती अजिबात रागावणार नाही. उदा. बिगर चित्पावन व्यक्तीला जर "पुस्तकाचे कोपरे खुणेसाठी दुमडु नकोस, पेनाने त्यावर नवचित्रकलेचे प्रात्यक्षीक करु नकोस, ३००-३५० पानांच्या जाड-जुड पुस्तकाच्या मुखपृष्ठाची आणि मलपृष्ठाची भरतभेट घडवुन आणु नकोस" असे सांगितले तर त्याला बर्‍याचदा राग येतो. आम्ही काय खाणार आहोत का पुस्तक? अशीहि प्रतिक्रिया येते. पण लोकांना ते कळत नाही म्हणुन चित्पावनाला ते सांगाव लागतं. पेन-पेन्सीलचा खरा उपयोग हा कान कोरण्यासाठी नसुन लिहीण्यासाठी असतो हे देखिल लोकांना सांगावं लागत त्यात चित्पावनाची तरी काय चुक?

चित्पावनांना ’कंजुस’ म्हणण्या अगोदर गावातील/समाजातिल मुलांना शिक्षण मिळावे म्हणुन स्वत: उपाशी राहणार्‍या किंवा लंकेची पार्वती होणार्‍या कर्वे जोडप्याचं उदाहरण घ्याव. किंवा स्वत:च घरदार सोडुन आदिवासींच दु:ख हलक करणार्‍या, वनवासी कल्याण संस्था अविरत चालु ठेवण्यासाठी येईल त्या अर्थिक संकटांना तोंड देत कार्य करणार्‍या फडक्यांच उदाहरण घ्या. चित्पावनांच्या औदर्याच्या जागा म्हणजे वेगवेगळी हॉस्पिटल्स, आश्रम, शाळा यांना शक्यतो प्रसिध्दि न करता लाखोंच्या देणग्या देणे. नैसिर्गिक आपत्तित संकटग्रस्तांना शारीरीक-आर्थिक मदत करुन धीर देण्यात अनेक चित्पावन आजही आघाडीवर आहेत. आणि बर्‍याचदा हि मदत वडिलोपार्जीत पैश्यातुन नसुन पै-पै करुन जमावलेल्या पैश्यातुन असते हे विशेष. याच शिवाय इतिहासाचर्य राजवाड्यांच मोठ उदाहरण आहे - त्यांनी आपल्या प्रचंड मेहनत आणि स्वत:चा पदरमोड करुन जमवलेल्या माहीतीवर कुठलाही कॉपीराइट ठेवलेला नाही. त्यांनी तसे केले असते तर ’राजवाडे प्राच्यविद्या संशोधन संस्था’ देखिल उभी राहीली असती. किंवा त्यांना आयुष्यभर पुरुन उरेल इतका पैसा सहज जमवता आला असता. मात्र हे कोणी न बघता आरोप करतं तेव्हा वाईट वाटत बरोबरच त्या व्यक्तीची किव देखिल येते.

सामाजिक चळवळीत देखिल चित्पावन नेहमीच पुढे राहीले आहेत. गणेशोत्सव आणि शिवजयंती ह्या दोन चळवळी चालु करणार्‍या टिळकांचे मोठे उदाहरण आपल्यासमोर आहे. भाषाबंदि, रोटीबंदि सारख्या बेड्यांनी जखडलेल्या समाजाला जागे करण्याचे काम सावरकरांनी रत्नागिरीत राहुन केले. जात्योच्छेदनाची चळवळ सावरकरांनी मोठ्या दणक्यात चालवली होती. शिवाय आगरकर, लोकहितवादिंनी केलेले समाजकार्य कौतुकास्पद आहे. राष्ट्रसेविका लक्ष्मीबाई केळकर हे देखिल स्त्रि-सबलिकरणाचे उत्तम उदाहरण आहे, ज्या काळात स्त्रिया सहसा बाहेर पडत नसत त्या काळात त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या मार्गदर्शना खाली "राष्ट्रसेविका मंच" स्थापन केला. आज १०,००० पेक्षा जास्त स्त्रिया या संस्थेचा डोलारा सांभाळत आहे.

इतके सगळे करुन चित्पावनांवर काही अल्पमती माणसे निराधार आरोप करत असतात उदा - १)पेशवाइमुळेच समाजात दरी आणि जातपात वाढली आणि २)चित्पावन हे भारतीय नसुन युरोपियन किंवा मध्य पुर्वेतील आहेत. याची उत्तरे अशी आहेत - १)पेशव्यांच्या आधी कोणीही ब्राह्मण शासनकर्ता महाराष्ट्रात झाला नव्हता. तो झाला तेव्हा सहाजिक त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा पंचनामा करायला लोक पुढे आले, आणि वाट्टेल ते आरोप लावु लागले. दुर्दैवाने जात-पात पेशव्यांच्या आधीपासुनच होती, फक्त पेशवे ब्राह्मण असल्याने या गोष्टीला जास्त खतपाणी घातले गेले. आणि २)चित्पावन भारता बाहेरुन आले हे सांगताना प्रत्येकजण त्यांचे नव-नवे मुळ ठिकाण सांगतो, ठाम मात्र कोणीच सांगत नाही. चित्पावन भारतात या अमुक वेळी आले असा एकही पुरावा आज अस्तित्वात नाही. स्कंद पुराणे ही "पुराणे" म्हणुनच बघावित आणि त्यांची बुध्दिनिष्ठपणे मीमांसा करावी. प्रेते कधीच जिवंत होत नाहीत. म्हणुनच ते चितेपासुन बनले नाहीत याचे उत्तर लेखाच्या सुरुवातीलाच दिले आहे. शिवाय युरोपियन किंवा मध्य पुर्वेतील जमातींचा इतिहास बघितला तर पुढील गोष्टी सुज्ञ्यांच्या लक्षात येतील - युरोपियन किंवा मध्य पुर्वेतील ज्यु किंवा पारशी सोडल्यास बाकी सगळे भारतावर आक्रांता म्हणुन आले होते. मग ते रोमन असोत, पोर्तुगिज असोत, ब्रिटीश असोत किंवा अरब/मुस्लिम असोत. आक्रमण करणारे कशाला भारतियांचा धर्म स्वीकारतील? त्यांचा संपुर्ण इतिहास आपल्याला ज्ञात आहेच, ते भारतात कधी आले हे देखिल आपल्याला माहीत आहे. शिवाय त्यांनी हिंदु धर्म मोठ्या प्रमाणावर स्वीकारल्याचे एकही उदाहरण इतिहासात नाही. ज्यु-पारशी भारतात कधी आले हे माहीत आहेच बरोबर त्यांनी आपला धर्म सोडला नाहीच किंवा जोर-जबरदस्ती करुन तो पसरवला देखिल नाही हे स्पष्ट आहेच, म्हणजे ते स्वधर्माचे कडवे अभिमानी आहेत. बरं जहाज फुटलेले प्रवासी म्हणावेत तर ते जर युरोपियन किंवा मध्य पुर्वेतील असतिल तर ते १०१% मांसाहारी असणार. मग कडक शाकाहारी ब्राह्मण का होतील? एक तर ते स्वत:ची संस्कृती सोडणार नाहित, आपली धार्मिक कर्मे ते करणारच. आणि संकटात असताना तर आपल्या देवाचाच धावा ते करणार, परशुरामाला कशाला ये! म्हणुन सांगतिल? धर्मांतर केलेच त्यांच्या समोर सारस्वत किंवा इतर अनेक विकल्प होते जे त्यांचे मूळ अन्न तसेच राखु शकले असते. कडकडित शाकाहारच का? संकटात तर माणुस मिळेल ते खातो, अगदी विश्वामित्रा प्रमाणे चांडाळा घरच्या कुत्र्याची तंगडी देखिल! म्हणुन हे सुत्र काही जमत नाहि. शिवाय वैदिक चालीरीती? इतक्या अचुक? जप-जाप्य-स्नान-संध्या-रुद्रादिक कर्मे? हे जर कोणा बाहेरच्याने आत्मसात केले असते तर किंमान एक तरी उल्लेख आला असता. त्यांना संस्कृत कोणी शिकवले? बर ते शिकवताना देखिल एक अशी मूळ भाषा असाविच लागते ज्यात दोघेही बोलु शकतील, एकमेकांचे बोलणे समजु शकतील! ते प्रथम परशुरामाशी किंवा जो कोणी उद्धारक असेल त्याच्याशी कोणत्या भाषेत बोलले असतिल? याची उत्तरे कोणाकडेच नाहीत. शिवाय संस्कृत काही सोपी भाषा नाही, आज वाचली कि उद्या येईल म्हणुन. घरात जर "पंडित" घडायचा असेल तर त्यासाठी अनेक पिढ्यांचे संस्कार लागतात, वैदिक परंपरा माहित असाव्या लागतात. कारण संस्कृत ही नुसती भाषा नसुन एक अखंड "संस्कृतीच" आहे. संस्कृत भाषेसाठी मॅक्स म्युलर चे उदाहरण देणार्‍यांनी मॅक्स म्युलर हा वेद कसे खोटे आहेत हे लोकांना सांगण्यासाठी संस्कृत शिकला होता हे समजुन घ्यावे, त्याने वेदांना मुर्ख ठरवले. इथे तर ते आचरणात आणायचे आहेत, दोहोत जमिन-अस्मानाचा फरक आहे. बाहेरुन आले असते तर किमान एक गोष्ट तरी त्यांच्या संस्कृतीशी मेळ खात असती. तात्पर्य चित्पावन संपूर्णत: भारतीय आहेत.

चित्पावनांवर अजुन एक ठपका ठेवला जातो तो असा कि चित्पावनांना "आत्मस्तुती" आवडते. हा आरोप मात्र आम्ही आनंदाने मान्य करु. चित्पावनाला आपल्या बद्दल चांगले सांगायला नेहमी आवडते. जर आपल्या पुर्वजांच्या किंवा येणार्‍या पिढ्यांच्या नावाला धक्का पोहोचेल असे काहि केले नसेल तर ते व्यक्त करण्यात चित्पावनांना लाज वाटत नाही. आत्मस्तुती करणे मुर्खपणाचे आहे असे समर्थांनी लिहीले आहे हे मान्य असले तरी नोकरीसाठी interview देताना आयुष्यात हा मुर्खपणा प्रत्येकाला करायला लागतोच. शिवाय त्या आत्मस्तुतीत काहीहि ’खोटे’ नसुन उलट शाळेत शिकलेल्या ’अतिशयोक्ती’ अलंकाराचा योग्य वापर मात्र असु शकतो. आता हा आरोप चित्पावनांवर केल्याने जे पाप इतरांच्या पदरी पडले आहे ते धुवुन काढण्यासाठी त्यांनी भग्वतगीतेतील "विभूतीयोग" वाचुन काढावा. जेथे भर रणांगणात श्रीकृष्णाला देखिल आत्मस्तुती कराविशी वाटते तिथे आम्ही मर्त्य मानव कोण? असो, चित्पावन स्वत:ची स्तुती करतात तेव्हा ते सहसा दुसर्‍याशी विनाकारण "तुलना" करायच्या भानगडित पडत नाहित. मी काय चांगल केलं किंवा करतो इतकेच ते ठळकपणे दाखवुन देतात. ते दुसर्‍याला भाट बनुन माझी स्तुती करा, असं सांगत नाहि किंवा चला माझी स्तुती करायचा जाहिर कार्यक्रम आहे १०१/- ची पावती फाडा असे देखिल कोणाला सांगत नाहित, तरी इतर लोकांच्या पोटात का दुखतं ते कळत नाही. तरी चित्पावनांबद्दल चांगले बोलावे असे काही चित्पावनेतरांना किंवा अगदी परदेशी लोकांना देखिल वाटले आहे, ते उतारे इथे देत आहे. -

chitpavans in 'bombay gazetteer'
As a class Chitpavans are notable for their cleannes & for their neatness & taste in dress;their stingness,hardness & craftiness are also proverbial.Chitpavans are beyond doubt one of the ablest class in Western India.They were the mainstay of the Maratha power when the maratha power was as its highest.
in 1727 the nizam foundevery place filled with konkan brahmans;in 1817 Mr.Elphinstone found all leading brahmans in the poona Government connected with konkan.Under English they have lost much of the power which for the century they enjoyed.still their superior intellect, their eagerness for education & the high position they hold in government service enable them to maintain their superemacy in all marathi-speaking districts.beyond the limits of western india. their talents are admired & respected.

- by Dr. anghavi
(Maharashtra State Gazetteer, Maharashtra land & its people page 53-54)

-----------------------------

by grant duff.
a popular writer of history of Maratha.
he wrote book "History of the Maharattas" in 1927 in England.

he wrote:-
"Independant of two Maharatta division of Concanist & Deshist, there are in the Maharatta country eight classess of brahmins,who differs from each other in some of their usage, & present, to those accustomed to observe them, preceptible differences both of character & appearance."

*वरच्या वाक्यातील "Concanist" (कोकणस्थ)या शब्दासाठी डफने पुढील तळटीप दिली आहे.
"The Peshwas who attained sovereign authority in the Maharatta Nation, were of this class......They are termed Chitpawan. Of all the Brahmins with whome I am acquainted, the Concanists are the most sensible & intelligent."

-----------------------------

by 'Mr. Candy'
रघुनाथराव परांजप्यांच्या अभिनंदनार्थ भरलेल्या मुंबई विद्यापिठाच्या एका सभेत बोलताना माजी न्यायधिश आणि मुंबई विद्यापिठाचे उपकुलगुरु 'Mr. Candy' म्हणाले :-
"There never has been any question as to an Indian being perfectly equal to an Englishman in intellect.....Indeed i should say that a Konkan brahman in acuteness of intellect is superior to the average Englishman.

-----------------------------


पेशवाईचे टिकाकार श्री शेजवलकर देखिल राजवाडे किंवा चित्पावनांची स्तुती पुढील प्रमाणे करतात:-


वरील लेखातील महत्वाचा भाग पुढील प्रमाणे -
"या महाराष्ट्रातील चित्पावनद्वेषी जे लोक आहे त्यांच्यात जोवर एखादा राजवाडे, एखादा वासुदेव शस्त्री खरे, एखादा टिळक, एखादा आगरकर, फार काय एखादा दत्तोपंत आपटेही निर्माण होत नाही, तोवर त्यांनी कितीही दात चावले, कितीही निंदा केली, कितीही दोष दाखविले, किंवा कितीही बोटे मोडली तरी त्यामुळे चित्पावनांचे काहिही वाकडे होण्याचा संभव नाहि. कावळ्यांच्या शापांचा किंवा म्हातारीच्या हात चोळण्याचा जेव्हढा परिणाम होण्याचा संभव तेव्हढाच तसाच उपयोग अश्या वृथा जळफळाटांचा आहे. चित्पावनांचे खरे यश रावबहादुरे, प्रोफेसरे, किंवा मोटारवाले हवेल्यावाले किंवा बडे नोकरीवाले यांनी वाढवलेले नाही. त्यांची पैदास इतर जातीतही भरपुर आहे. चित्पावनांचे यश त्यांच्या त्यागाच्या पराकाष्ठेत, एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवण्याच्या चिकाटित, एकांतीक अढळ निष्ठेत, अविश्रांत उद्योगात, व सुखलालसेच्या विन्मुखतेत आहे. जोवर या गुणांची योग्यता जगात मोठी मानली जात आहे तोंवर त्यांचे यश चिरंजीव आहे."

-----------------------------

शेजवलकरांसारख्या विद्वानाच्या या चित्पावन स्तुतीमागे चित्पावनांकडुन समाजाला काय अपेक्षा आहेत ते आधी समजुन घेणे जास्त श्रेयस्कर ठरेल. चित्पावनांना या पुढेही समाजाला आणि राष्ट्राला आपले योगदान द्यावेच लागेल, राष्ट्राला स्वातंत्र्यपूर्वकाळात कान्हेरे, चापेकर बंधू सारख्या चित्पावनांनी तर स्वातंत्र्योत्तर काळात सेनेत शहीद कॅप्टन विनायक गोरे सारख्या कोवळ्या मुलांनी आपले सर्वोच्च योगदान देउन आपल्या मातृभूमीचे ऋण अंशत: फेडण्याचा प्रयत्न केले आहेत. पण या गोष्टीं बरोबरच एकमेकांचे पाय इतरांप्रमाणे चित्पावन देखिल ओढतात. ते प्रथम बंद केले पाहिजे. प्रत्येक चित्पावनाला भरपुर "Ego" असल्याने कोणीच मागे हटायला तयार होत नाहि. सगळे टिळक आणि आगरकरांचे वारस, "वाद" या एका गोष्टीत त्यांचा जास्त अनुयय करतात. समाजतिल वाईट गोष्टींना पराभूत करण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. समाज आज आपल्याकडे "आशा - असुया - मत्सर - मैत्री - स्पर्धा" या आणि अश्या अनेक चांगल्या-वाईट नजरांनी बघत आहेत. चित्पावनांनी इतर कसलाहि विचार न करता फक्त राष्ट्रोध्दारासाठीच पुढे सरसावले पाहिजे. जे या राष्ट्रकार्यात आपल्या बरोबर येतील त्यांच्या सकट, न येतील त्यांच्या शिवाय, आणि विरोध केला तर तो मोडुन हे कार्य पूर्ण करणेच क्रमप्राप्त आहे. आज आपल्या राष्ट्रावर अनेक संकटे घोंगावत आहेत, त्यांची वेळीच चाहुल घेउन बंदोबस्त करणे आपले आद्य कर्तव्य आहे. जात-पात जुनी भांडणे उकरुन काढायची ही वेळ नव्हे, उलट ती कधीच उकरुन काढुहि नये. आज समाजकार्य-साहित्य-कला-विज्ञान यांत परत चित्पावनांनी बाह्या सरसावुन पुढे यावे. आपल्या प्राणप्रिय मातृभूमीने भुक, अज्ञान, संकटे, अंधश्रध्दा, संशय यांचा नि:पात करुन एक सुखी, समृध्द, बलाढ्य, आणि स्वाभिमानी राष्ट्र होऊन या जगाला परत नवी दिशा दाखवावी आणि त्या सत्कार्यात चित्पावनांचा सिंहाचा वाटा असावा, हिच अपेक्षा. अजुन काय लिहीणे?

लेखनसीमा।


- © सौरभ वैशंपायन(मुंबई).
--------------------------------------------------------
संदर्भ :-
१)आम्ही चित्पावन - श्री म.श्री.दिक्षीत(संकलक-संपादक-लेखक)
२)धर्मक्षेत्रे - कुरुक्षेत्रे - श्री विश्वास दांडेकर.
३)पहीला बाजीराव - .
४)वैशंपायन कुलवृत्तांत.
५)इतिहास अभ्यासक आणि नाणेतज्ञ श्री अप्पा परब(मुंबई) यांची काही भाषणे लेखकाने ऐकली आहेत त्यातील चित्पावनांसंबधी घटना वा उल्लेख इथे वापरले आहेत. त्याच बरोबर दिवे-आगार येथील बापटांकडे लेखक राहिला आहे.
६)wikipedia या संकेतस्थळावरुन काहि माहिती घेतली आहे.
७)पानिपत १७६१ - श्री शेजवलकर.
८)पेशवे घराण्याचा इतिहास - प्रमोद ओक.
९)सावरकरांच्या कविता - वा.गो.मायदेव(संकलक)
१०)लोकमान्य ते महात्मा - डॉ. सदानंद मोरे.
११)मराठ्यांचा इतिहास भाग १ - अ.रा. कुलकर्णी.

E-Mail :- spayan25@gmail.com

Sunday, November 4, 2007

सुख म्हणजे नक्कि काय असतं?

प्रत्येकाची सुखाची अशी आपापली व्याख्या असते.
कोणाला कशात सुख मिळेल हे दुसर्याला नाही सांगता येत!
उंचावर उडणार्या फुलपाखरा मागे कधी लहान मुलांना धावताना बघितले आहे? तसेच आपण देखिल सुखाच्या मागे-मागे सैरभैर धावत असतो राहतो. पण बर्याचदा आपण शांत उभे राहीलो की तेच फुलपाखरु आपल्याच अंगाखांद्यावर आपणहुन येउन बसतं. सुखाचही असचं असतं का?

सुख-सुख म्हणजे नक्की काय?
आजीच्या गोष्टी? की वरणभातावर सढळ हाताने ओतलेलं तुप?
३०० रुपयांचा पिझ्झा? की ५ रुपयांचा वडापाव?
झकास आडव होऊन वाचलेलं पुस्तक? की एकाच बैठकीत संपवलेली मोठ्ठी कादंबरी?
रात्री उशीरा पर्यंत गप्पा मारुनही सकाळी ५ ला उठणे? की अगदी १० वाजताच अंथरुणात शिरुन सकाळी ९ वाजता आळस देत उठणं?
पाय तुटेपर्यंत केलेली पायपीट? की नदीकीनारी तासनतास बसणं?
संगीतातलं ओ की ठो कळत नसताना कधी पं.रवीशंकर कींवा कुमार गंधर्व तासनतास विनाकारणच ऎकले आहेत का कधी? नसेल तर ऎकुन बघा! कदाचित आपण शोधत असलेलं सुख त्यातच मिळेल.

- © सौरभ वैशंपायन(मुंबई).