Sunday, November 18, 2012

साहेब




रुद्राक्षाची माळ धरलेला ’तो’ हात उगारलेल्या बोटासकट वर झाला की मुंबई सारखं आंतराष्ट्रिय शहर दोन दिवस बंद व्हायचं. साधारण ८-९ वर्षांचा असेन, तेव्हा त्या घटानेचाचा अर्थ समजण्या इतका मोठही नव्हतो, पण मला इतपत स्वच्छ आठवतय की बाबरी पतन झाल्यावरती त्याबाबत जेव्हा सगळे खुसरपुसर करत बोलायचे, किंवा सोयीस्कर मौन घ्यायचे, तेव्हा शिवाजी पार्कवरती फक्त एकच आवाज जाहीरपणे घुमला होता "होय! आम्हीच पाडली बाबरी!". त्यामागचे तत्कालिन राजकिय, सामाजिक, धार्मिक संदर्भ व निवडणूकांतले फायदे तोटे यांच्या निकषांसकट असे जाहिर बोलणे देखिल फार जड होते. पण हेच जाहिरपणे सांगणारा दुसरा कोणी हरीचा लाल निघाला नाही हे देखिल तितकेच खरे.

खोटं कशाला बोला? ’राजकारण’ म्हणजे काय ह्याची बर्‍यापैकि जाणीव होईपर्यंत मी बाळासाहेब ठाकरे यांचा "भक्त" होतो, लहानपणी "सामना" या नावाखालती असलेले "बाळ ठाकरे" हे नाव, त्या भोवतीचं वलय, लोकांना मंत्रमुग्ध करुन टाकणारी भाषणाची शैली हे सगळं माझ्याकरता अप्रुप होतं. पण मग वाढत्या वयानुसार शिंग फुटली शेकडो गोष्टि नव्याने पाहिल्या, वाचल्या, ऐकल्या, समजून घेतल्या तशी राजकिय जाणीवांची व गरजांची क्षितीजं थोडी रुंदावली. आपोआप मी "भक्त" कॅटेगरीतून ’चाहता’ कॅटेगरीत आलो. त्यांची एखादि गोष्ट नाही पटली तर नाहि पटली हे सकारण सांगायचो. पण कॅटेगरी बदलली तरी त्यांच्याबद्दलचा आदर मात्र तोच होता, मी मनापासून चाहता नक्कीच होतो. माणूस दिलखुलास होता. आपली ताकद काय व कशात आहे ह्याची जाणीव असलेला नेता होता. ताकद असल्याने आपसूक एक बेदरकारपणा येतो तो देखिल भरपूर होता. बोलायला लागले कि भाषणं अनेकदा सभ्यपणाची पातळी ओलांडायचं. (त्यातून वाजपेयी - अडवाणी ऐकणार्‍यांना ते बोलणं अब्रह्मण्यम होतं. कदाचित संयुक्त महाराष्ट्रानंतरच्या पिढ्यांना अत्रे फारसे किंवा अजिबातच ऐकायला मिळाले नाहीत म्हणून असेल, पण कधी कधी मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्र या भाषेनी दचकायला कधी पासून लागला?) पण अत्रे म्हणाले होते तसंच बाळासाहेबांनी "आयुष्यात सगळं केलं, फक्त ढोंग केलं नाही", (अर्थात राजकारणात याला अपवाद ठेवावा लागतोच.) जे काही आहे ते तोंडावरती. जे बोललो त्याची सगळी जबाबदारी घेऊन. "मला तसं बोलायचं नव्हतं" हे वाक्य नंतरची सारवासारव करावी लागते तेव्हा अनेकजण वापरतात, बाळासाहेबांवरती ही वेळ आल्याचं मला आठवत नाही.


एकच पक्ष, एकच नेता, एकच ठिकाण, एकच दिवस आणि थोडि थोडकी नव्हे तर तब्बल सलग साडेचार दशकं ... लाखो लोकं त्याच ओढीने लाखांच्या संख्येने जमत, जगात दुसरं उदाहरण असेल तर दाखवावं. तुम्ही अनेकांना थोडावेळ, कींवा थोड्यांना बराचवेळ मुर्ख बनवू शकता पण अनेकांना नेहमीच मुर्ख बनवू शकत नाही. त्या माणसात असं काहितरी नक्किच होतं की सामान्य माणूस रस्त्यावरती उतरायचा. त्या सामान्य माणसात पोट भरलेला पांढरपेशा उच्च मध्यम वर्गिय किंवा एकंदरच मध्यमवर्गिय किती हा प्रश्न अलाहिदा, तसा तर तो कुठल्याच पक्षाच्या पाठी नसतो. मुश्किलीने एखादि सभा गाजली तर ठीक होतं पण ४५-४६ वर्ष तुम्ही दारु प्यायला देऊन, पैसे वाटून लाखोंची गर्दि नाहि खेचू शकत हे कुणीही मान्य करेल. साहेबांवरती लोकांच अफाट प्रेम होतं. त्यांना हिंदुहृदयसम्राट वगैरे म्हंटलं की काही सो कॉल्ड उच्च शिक्षित आणि ओपन माइंडेड लोकं कुत्सित हसतात, पण ९३ च्या दंगलीत मुंबई २ दिवसात कुणी शांत केली? ६ दिवस मार खाणारा हिंदू नंतरच्या २ दिवसात कसा उसळला होता? शिवसेना भवनात झालेल्या मिटींग मध्ये "तुम्ही हातात बांगड्या भरल्यात का?" ह्या साहेबांच्या एकाच प्रश्नाचा तो परीणाम होता हे नाकारु शकत नाही हे देखिल तितकच खरं. आजही शिवसैनिक रस्त्यावरती तलवारी घेऊन उभे राहिले आणि आम्हांला सुरक्षित वाटलं, आमच्या घरची माणसं आता नीट घरी येतील याची खात्री पटली हे सांगणारी अनेक माणसं भेटतील. परवा १३ नोव्हेंबरला देखिल "बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक आहे" हे ऐकून वडापाव विकणार्‍यापासून ते बड्या धेंडांपर्यंत मातोश्रीवरती रीघ लागली. परत सांगतो दोघांची कारणं वेगळी असतीलही पण त्यामागे "ताकद" होती, मग ती प्रेमाची असेल कींवा राजकिय असेल.

अनेक जण विचारतीलही की काय केलं त्यांनी, की इतका पाठींबा देता? तर याचा अर्थ एकच त्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवीतले त्यांचे काम माहित नसावे, किंवा संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यावरती देखिल मराठी माणसाचे गुदमरलेपण ’मार्मिक’ च्या माध्यमातून कसं बाहेर आणलं. त्या मार्मिकच्या फटकार्‍यांनी अनेक जण विव्हळले होते हे त्यांच्या लक्षात नसेल. आज "मराठी" हा मुद्दा घेऊन आज दुसरे देखिल उभे राहिले आहेत पण अजूनही मराठी माणसाला मुंबईत कुणी हक्क दिला, त्याची अस्मिता कोणी जागृत केली? ह्या प्रश्नाचं उत्तर एकच "बाळ ठाकरे". दुसरी गोष्ट - प्रबोधनकारांचा वारसा असेलही पण सेनेत जात बघितली गेली नाही. बाकिच्या पक्षात विशिष्ट जातीचा मुख्यमंत्री बसावा व त्याबदल्यात दुसर्‍या जातीचा उपमुख्यमंत्री बसवून मांडवली करावी, असं शिवसेनेत कधी दिसलं नाही. मुळात शिवसेना - भाजपा सत्तेत आली ती बाळासाहेबांच्या झंझावाती प्रचारामुळे. ९० सालच्या मंडल आयोगाला विरोध करुनही ९५ साली ते निवडून आले ह्यावरुन काय ते समजावं. सत्तेत न रहाता रीमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवणे फार कमी लोकांना जमते, त्याची सुरुवातही बाळासाहेबांनीच केली म्हणा ना. म्हणजे मुख्यमंत्रीपदापेक्षा शिवसेनाप्रमुखपद मोठं होतं (अर्थात ही चांगली गोष्ट नाही हे माझेही मत आहे पण ती घडून गेलेली गोष्ट आहे जे आज नाकारता येत नाही.), हे बाळासाहेबच करु जाणे. मग ह्याला कोणी हुकूमशाही म्हणेल, कुणी झुंडशाही म्हणेल, कोणी आंधळा अनुययही म्हणेल, कुणाला तो पक्ष फक्त गुंडांचाही वाटतो, पण संपूर्ण मुंबई बंद करुन दाखवायची ताकद शिवसेनेत तेव्हढी होती हे देखिल तितकेच खरे. बरं ज्यांना विरोध व्हायचा त्या विरोधकांना ठाकरी भाषेचे सपकारे बसून देखिल विरोधक कधी दात-ओठ खाऊ बाळासाहेबांवरती तुटून पडले नाहीत उलट राजकारणाबाहेर सगळ्यांशीच त्यांचे संबध चांगलेच राहिले. पवार आणि मी बीअर प्यायला बसतो हे भर सभेत सांगणारे बाळासाहेबच.

शिवसेनेची कार्यपद्धती सगळ्यांहुन वेगळी होती. लहान लहान शाखांतून त्यांनी पक्षाची केलेल्या बांधणीने पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचवले. अनेक चेहरे नसलेल्या लोकांना त्यांनी नगरसेवक, आमदार, खासदार बनवले. कदाचित लोकांची नस त्यांनी ओळखली होती. घरात उदंड लेकरं असली की वेळ पडल्यास बाहेर घराची पडती बाजू सावरायला त्यात एखादं वांड पोरगं असावं म्हणतात. बाळासाहेबांची "शिवसेना" तशी होती. बाळासाहेबांची शिवसेना अश्या करता कारण साहेब स्वत: सगळं बघत होते तोवर आलबेल होतं. नंतर वयोमानाने किंवा इतर कारणांनी शिवसेनेच्या रोजच्या कामातून त्यांनी लक्ष कमी केलं त्यानंतर शिवसेनेतुन अनेक जण अनेक कारणांनी बाहेर पडले, कुठली कारणं कोण बाहेर पडलं ते इथे लिहित बसण्याचे प्रयोजन व वेळ नाही. खुद्द बाळासाहेबांना अखेर "या चिमण्यांनो परत फिरा रेऽ" म्हणावं लागलं होतं. पण बाहेर पडलेल्या लोकांतही भाषणांत साहेबांवरती पलटवार करण्याची धमक नव्हती. त्यामागे नवीन ’ठाकरी’ टोला येण्याची "भीती" तर होतीच पण बाळासाहेबांना उलट उत्तर देणं हे एकूण महाराष्ट्राच्याच कल्पनेबाहेरचं होतं. मात्र इथे एक कडवट गोष्ट मांडावी लागते आहे की सध्याच्या शिवसेनेचा ’दरारा’ संपलाय, कारण तो असता तर मुळातच CSTची दंगल करण्याची कुणाची छाती झालीच नसती. कींवा आपल्या शेवटच्या दसरा मेळाव्यातील भाषणात साहेबांनाही "म्हातारी उडता नयेची तिजला..." चालीवरती आर्जवे करत "उद्धव - आदित्यला सांभाळा" हे सांगण्याची वेळ आली नसती. आयुष्यभर केवळ आदेश देणार्‍या साहेबांचे, ते काहितरी मागणारं चित्र न बघवणारं होतं इतकं शेवटी मी नमुद करु इच्छितो.


आज तरी दूर दूरपर्यंत बाळासाहेब ठाकरेंच्या इतका भक्कम नेता दिसत नाही. २०१४च्या निवडणूकांचे निकाल काय असतील ते माहीत नाही पण २०१४ च्या निकालांवरती १७ नोव्हेंबर २०१२ चा ठसा असणार आहे हे नक्की.

उद्याच्या महाराष्ट्रात बाळ ठाकरे नाहीत ही एकंदरच अस्वस्थ करणारी बाब आहे. ती राजकिय पातळीवरची जितकी आहे तितकी वैयक्तिक पातळीवरची देखिल आहे. आणि ही माझीच नाही तर करोडो मराठी माणसांची भावना आहे. आजकाल कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे गल्लीबोळातून भाऊ, भाई, दादा वगैरे उगवत आहेत. अधून मधून एखाद्या नावामागे साहेब देखिल लावले जाते, पण कुठलही नाव न घेता केवळ "साहेब" म्हंटलं की एकच नाव डोळ्यापुढे यायचं आणि येईल.

बाळासाहेबांसारखा माणूस गेल्यावरती राहुन राहुन दासबोधातला मृत्युनिरुपणाचा समास आठवतो -
"मृत्य न म्हणे हा भूपती । मृत्य न म्हणे हा चक्रवती ।
मृत्य न म्हणे हा करामती । कैवाड जाणे ॥ ११॥
मृत्य न म्हणे हा हयपती । मृत्य न म्हणे गजपती ।
मृत्य न म्हणे नरपती । विख्यात राजा ॥ १२॥
मृत्य न म्हणे वरिष्ठ जनीं । मृत्य न म्हणे राजकारणी ।
मृत्य न म्हणे वेतनी । वेतनधर्ता ॥१३॥

कारण आज हे पुन्हा लोकांना सांगावं लागतय असा माणूस गेलाय!

 - सौरभ वैशंपायन.

Wednesday, October 24, 2012

दंतकथेची दातखिळ





सामान्य माणसासाठी तो एक दंतकथा होता. कर्करोगासारख्या असाध्य रोगाशी अनेक वर्ष तो झगडला नव्हे जिंकला. वरुन ७ वेळा टूर दि फ्रान्ससारखी जगातली सर्वात कठीण सायकलिंगची स्पर्धा जिंकून जगात अशक्य काहीच नाही हे त्याने दाखववून दिले होते. हे सगळं अमानवी पातळीवरचं होतं. कर्करोगाने खचल्या लाखो जीवांचे तो प्रेरणास्थान होता. पण २००५ पासून त्याच्यावर जे आरोप होत होते त्याचा सोक्षमोक्ष अखेर गेल्या महिन्यात लागला. अर्थात त्याच्या चाचण्या आधीही झाल्या होत्या व गेल्या जूनमध्ये ज्या चाचण्या झाल्या त्यांच्या आधारावरती अमेरीकन डोपिंग संघटनेने लान्स आर्मस्ट्रॉंगवरती आरोप सिध्द केले व त्यामुळे आंतरराष्ट्रिय सायकलिंग संघटनेने त्याची टूर-द-फ्रान्सची सातही पदके काढून घेतली आणि त्यावर आजन्म बंदी देखिल घातली आहे.

एखादं व्यक्तीमत्व किती चढ-उतारातून जाऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे लान्स आर्म स्ट्रॉन्ग. ज्यांनी त्याचे "It's not about bike, It's about journey back to life"  हे पुस्तक वाचलं असेल त्यांना त्याचा पूर्वेतिहास माहित असेलच. आईचे २ डिव्होर्स, लहानपणापासूनच जन्मदात्या पित्याशी असलेले तणावपूर्ण संबध, त्याचे शाळा-कॉलेज मधले गरीबीतले दिवस, कॉलेजच्या दिवसात आयुष्यात येत जाणारी स्थिरता, पहिल्या २nd hand गाडिने लावलेली रेस, सायकलिंगमधला प्रवेश, सायकलिंगच पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून निवडणे, स्थानिक, राष्ट्रिय पातळीवरच्या व नंतर आंतरराष्ट्रिय स्पर्धा जिंकणॆ हा प्रवास वाचताना आपण थक्क होतो. सायकलिंग मधल्या काही तांत्रिक बाबी देखिल त्याने त्यात मांडल्या त्यासाठी घ्यावी लागणारी शारीरिक, मानसिक व बौध्दिक तयारी किती वरच्या पातळीवरची असते त्याची चुणूक त्याने पुस्तकातून दाखवली होती. त्याआधी फक्त जो जिता वो सिकंदर मध्ये यावर थोडं बघायला मिळालं होतं. त्याचं पुस्तक हे सायकलिंगच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातील खेळाडूला प्रेरणादायक होतं.

पण ते पुस्तक त्याने ज्या कारणासाठी लिहिला ते कारण म्हणजे त्याला या सगळ्या प्रवासा दरम्यान झालेला कर्करोग, व त्यातून त्याने - त्याच्या आईने - सहकार्‍यांनी - प्रेयसीने केलेला मानसिक - शारीरिक - भावनिक संघर्ष. त्याच्या आईशी असणारे त्याचे भावनिक नाते त्याने फार सुंदर शब्दबध्द केले आहे. तो संघर्ष वाचताना लान्सबद्दलचा आदर प्रत्येक पानातून वाढत जातो. लान्स कधी तुमचा आदर्श बनला हे तुम्हांला समजतही नाही. या पुस्तकानंतर त्याने अजून २ पुस्तकंही लिहिली, त्याची लोकप्रियता इतकी अफाट होती की त्यावरती आरोप झाले त्या नंतरही लोकांनी लान्सवरतीच विश्वास ठेवला. लान्सही अर्थात सांगत राहिला मी निर्दोष आहे. गेल्या महिन्यापर्यंत माझा व माझ्यासारख्या अनेकांचा ठाम विश्वास होता की लान्स अशी रडेगिरी करणार नाही, अगदी इथपर्यंतही मत होतं कि त्याच्या चाचण्यात काही वावगं निघालं तर कॅन्सरवरती उपचारासाठी जी औषधे घेतली जातात त्यातून अजाणतेपणी ते शरीरात आलं असेल, लान्स आपणहून हे करणार नाही. पण वाइट हे होतं कि लान्स आर्मस्ट्रॉंगचे पायही मातीचेच निघाले.खासकरुन जेव्हा त्याच्या सहकार्‍यांनी पुढे येऊन सांगितलं कि लान्स स्वत:हि हे करायचा व स्पर्धेत त्याच्या पुरक खेळ करता यावा म्हणून आम्हांलाहीत्यात सहभागी करुन घ्यायचा. या कामात त्याला त्याची पत्नीच मदत करत होती. हे सगळं ऐकून माझ्यासारख्या कित्येकांच्या आदर्शाला तडा गेला. लान्स इतकाच त्यांचा रागही आला - "हे सगळं आधी सांगायला काय झालं होतं? तेव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म??"

यश सगळ्यांनाच पचवता येतं असं नाही. फार ताकद असावी लागते त्यासाठी. एकदाका यश डोक्यात गेलं व फक्त यशाची तेव्हढी चटक लागली कि काय होतं? यश मिळवण्यासाठी माणूस कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतो हे लान्सच्या उदाहरणावरुन समजतं. अर्थात लान्स हा काही जगातला पहिला खेळाडू नाहिये जो डोपिंग टेस्टमुळे सर्वस्व गमावून बसला आहे ना शेवटचा असेल. मात्र आता कुणावर आदर्शवत विश्वास टाकायचा कि नाही हे लोकांना ठरवावं लागणार आहे. इतके आरोप होत असताना लान्सने गप्प रहाणे पसंत केले. ना "विश्वामित्री पवित्रा" घेतला ना "नरो वा कुंजरो वा पवित्रा." तो फक्त गप्प होता, कदाचित त्याला कळलं होतं कि आता तेलहिं गेलय आणि तूपही. या दंतकथेची बसलेली दातखिळ बरेच काही सांगुन गेली.

 - सौरभ वैशंपायन.

Saturday, October 6, 2012

अक्लेश केशव मंजरी तिलकम् - अनुवाद

"अक्लेश केशव मंजरी तिलकम् - अष्टपदी" म्हणून जयदेव या ओरिसामधील कवीची एक काव्य रचना आहे. राधा हे काल्पनिक पात्र कृष्ण चरीत्रात आणण्याची कल्पना जयदेवांची समजली जाते. त्यांनी श्रीकृष्ण - राधेवरती गीत-गोविंद हे अध्यात्मिक आणि तरीही शृंगार रसाने परीपूर्ण असे काव्य रचले. माझ्या एका मित्राने - अंबरीश फडणवीस याने त्यातली अष्टपदी मला मराठीत पद्य अनुवाद करायला दिली. या काव्यात राधा किंवा गोपी म्हणा श्रीकृष्णा बरोबर आदल्या रात्री केलेल्या रतीक्रिडेबाबत आपल्या सखीला सांगते आहे अशी कल्पना आहे. मी अर्थात शब्दश: अनुवाद केला नाहीये, एखाद दुसरी गोष्ट जाग सोडूनही गेली आहे. शिवाय अष्टपदी मधली सातच पदे मी घेतली आहेत कारण आठव्या पदात तुका म्हणे - नामा म्हणे तसं जयदेवांनी स्वत:चेही "म्हणे" घातले आहे आणि स्वत:ला लक्ष्मीचा भक्त संबोधुन हे काव्य सगळीकडे सुख शांती पसरवो असेही म्हंटले आहे.

अनेकांच्या दृष्टिने हि कविता अब्रह्मण्यम्‌ होऊ शकते. पण ह्याचा अर्थ शृंगाराला आपली संस्कृती किती रसिकतेने घेत असे हे देखिल समजण्याचा उत्तम मार्ग आहे. श्री आदि शंकराचार्यांनी देखिल शिव-पार्वतीच्या प्रणयलीलांचे वर्णन केले आहे. पार्वती - लक्ष्मी यांचे तर केसापासून ते नखापर्यंत "आपादमस्तक" म्हणतात तसे अत्यंत शृंगार पूर्ण वर्णन श्लोकांत केल्याचे आपल्याला दिसते, पण त्यात कुठलीही वासना नसून केवळ स्तुती आहे. ह्या गोष्टि लक्षात घेतल्या तर मग खजुराहोतील कामुक शिल्पेही सुजाणपणे व रसिकतेने बघता येतील आणि इतिहासाचार्य राजवाड्यांचे भारतीय विवाह संस्थेचा इतिहास वाचतानाही बिचकायला होणार नाही. कवीश्रेष्ठ कालिदासाने मेघदूतात तर ठिकठीकाणी अशी चुरचुरीत किंवा चटका लावणारी विरहाची किनार असलेल्या शृंगाराची पेरणी केली आहे.

भारतीय अध्यात्माला व्यक्त व्हायला कुठेही बंधने नाहियेत मग तो जयदेव - आदी शंकराचार्यांनी मांडलेला शृंगार असेल किंवा भर ’रणांगणात’ सांगितलेली गीता असेल.

तर इतकि प्रस्तावना अशा करीता कि मी कुठल्या पार्श्वभूमीवरती हि कविता करतो आहे हे तुम्हांला समजायला हवं. तरीही हे कुणाला अश्लिलतेने भरलेले वाटल्यास एकच सांगणे - मुळ काव्यासमोर माझा पद्यानुवाद फारच "पांचट" आहे.
=========================




शांत सभोवती रात्र सजणी, दूर सजले एकाकी उपवन,
अंधाराची लेवून कांती, हसतो कामूक श्यामल मोहन,
लपाछुपीचा खेळ चालला, चंचल त्या प्रणयाच्या रात्री,
मिठीत अचानक खेचून घेता, अनाम वादळ उठले गात्री ॥१॥

कामातुर स्पर्षाने त्याच्या, रोम-रोम उठले होऊन पुलकित,
कुरवाळित सांगे नकोस लाजू, नकोस होऊ उगा भयचकित,
प्रणयी गुंजरव करु लागले, मिठीस त्याच्या  घेई लपेटून,
मृदु शब्दांनी तया सुखविता, वस्त्र कटीचे गेले निसटून ॥२॥


अन्निजवले मजला त्याने, मऊ तृणांच्या शय्येवरती,
उरोज उन्नत तये चुंबिले, विसावला क्षण त्यांच्यावरती,
निरवसनी देहावर अवघ्या, सख्याचे प्रणयी हात फिरती,
उचलुन अधोमुख सल्लज चेहरा, करी दंतक्षत अधरावरती ॥३॥

प्रणयक्रिडेने म्लान होऊनी, मिटे पापणी होऊन हर्षित,
चिंब जाहले शरीर स्वेदे, तनु दोघांची होई कंपित,
मदन शरांनी दोघे जखमी, मिलन सुखाची झाली घाई,
देह बिलगता नसे विलगता, निशा धुंद मग सरकत जाई ॥४॥

सित्कारातुन प्रणय वेदना, केली जाहीर, जणू कपोत घुमतो,
प्रणयचतुर प्रियकर माझा, मला रिझविण्या अश्रांत श्रमतो,
केसांमधली कुसुमे चुरली, बटा पसरल्या धरणीवरती,
प्रणयाराधनेत येई आर्तता, नखे उमटली वक्षांवरती ॥५॥

रुणझुणणारे चुकार पैंजण, नाद तयांचा वाढत गेला,
मीलनसुखासी सेवित असता, कटिवरली तुटे मेखला,
अंबाड्यासी देता हिसका, मुक्त जाहले केस बांधले,
जवळ घेऊनी दिली घेतली न आठवी कितीक चुंबने ॥६॥

मृदु शय्येवर निवांत निजले, ओठ बिचारे होत कुसुंबी,
संभोगाचा शीण हराया, शरीर पहुडले पृथुल नितंबी,
अर्धे मिटले नयन तयाचे, नील कमलदल जणू उमलले,
नवी चेतना फुलली तेव्हा, मदनमोहना पुनश्च भुलले. ॥७॥

 - सौरभ वैशंपायन.

Tuesday, August 14, 2012

जिन्हे नाज़ है हिंद पर ....





११ ऑगस्ट २०१२ च्या दिवशी मुंबई, आझाद मैदानात जे काही झाले ते बघून कुणाही सामान्य पण विचारी माणसाचा संताप झाल्या शिवाय रहाणार नाही. आसाममध्ये, आजवरच्या केंद्र आणि तिथल्या राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे आणि मतांसाठी मुद्दामहुन दुर्लक्ष केल्याने बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अश्या प्रश्नांनी स्थानिकांत जो सहाजिक असंतोष धुमसायला सुरुवात होते त्या कारणाने त्याचा भडका गेल्या महिन्यात उडाला ७३ लोकं मरुन, ३ लाख ’स्थानिक’ लोक बेघर होऊन जरा वातावरण कुठे नुकतेच निवळायला लागले आहे.  दुसरीकडे जून महिन्यापासून शांतीदूत बौध्दाची लेकरे रहात असलेल्या म्यानमारमध्येही घुसखोर मुस्लिमांची ससेहोलपट होऊ लागली. म्यानमार सरकारने त्यांना नागरीक म्हणून मान्यता द्यायला ठामपणे नकार दिल्याने त्यात अजून संघर्षाची भर पडली आहे. ह्या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवरती मुंबईत त्याचा निषेध करायला रझा अकादमीने ’इस्लाम खतरें में’ ची बांग दिली. आणि एक पूर्व नियोजित दंगल घडवली गेली. गंमत म्हणजे यात मोठ्या संखेने जखमी होणारे पोलिसच होते. आजवर कुठल्याही घटनेत पोलिसांचे असे "खेळणे" बनवले नव्हते. मुंबईत घडलेल्या घटनेचे ठळक मुद्दे बघितले तर पुढील गोष्टी दिसतात -
 १) या दंग्यात चक्क पोलिसांनाच मारहाण झाली. "४६" पोलिसांसह ५४ जण जखमी. जखमींत ४ महिला कॉन्स्टेबल्सचा समावेश.
२) पोलिसांच्या गाड्या फोडल्या - उलथवल्या, दंग्यांसाठी खास बनवलेली १  "वज्र" गाडी पेटवली. ३ न्यूज चॅनल्सच्या गाड्या जाळल्या. ३३ बेस्ट बसेस फोडल्या.
३) पोलिसांची ३ शस्त्रे (सर्व्हिस रीव्हॉल्वर्स की रायफल्स ते नीट माहित नाही) व काही काडतुसे लंपास झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. पैकी काही काडतूसे "मुंब्र्यात" मिळाल्याची बातमी ’पुढारी’ मध्ये वाचायला मिळाली.
४) महिला पोलिस कॉन्स्टेबलचाच विनयभंग केल्याची तक्रार ’अज्ञात’ दंगेखोरांविरुध्द दाखल केलीये.
५) दंगेखोर "अमर जवान" स्मृतीस्तंभाची नासधूस करतानाची स्पष्ट छायाचित्रे यत्र - तत्र - सर्वत्र दिसत आहेत.


सगळं वाचून काही सरळ साधे प्रश्न पडतात -
१) "रझा अकादमीचा" एकंदर ’इतिहास’ बघता भर रमजान मध्ये, आधीच येणार्‍या गणेशोत्सवाचा आणि स्वातंत्र्यदिनाच्या सुरक्षा व्यवस्थेचा ताण पोलिसांवरती असताना स्वातंत्र्यदिनाच्या ३ दिवस आधी अशी सभा घेण्याची परवानगी का देण्यात आली?
 २) बरेली येथील मौलाना अब्दुल कादिर यांचे प्रक्षोभक भाषण सुरू झाले तेव्हा दक्षिण मुंबई प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त कृष्णप्रकाश व्यासपीठावर होते. मौलानांच्या प्रक्षोभक भाषणानंतरच हिंसाचाराला सुरुवात झाली, असेही चौकशीत स्पष्ट झाले असले तरी या मौलवीवर पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई का केलेली नाही?
३)  दंगलखोरांकडे दगद, हातोडे, रॉकेल, पेट्रोल कोठून आले?
४) दंगलखोरांना पकडून आणणाऱ्या पोलिसांनाही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून का दम दिला जात होता, हे अनाकलनीय असल्याचे या वेळी हजर असलेल्या एका पोलिसाने चौकशीत सांगितले. एका उपायुक्ताने दंगलखोराला रंगेहाथ पकडले तरी त्याला सोडून देण्यास सांगण्यात आले. विशेष म्हणजे अशा वेळी दंगलखोरांवर पाण्याचा माराही करण्यात आलेला नाही, असेही दिसून येत असल्याचे एका पोलिसाने सांगितले. पोलिसांवर कोणाचा दबाव होता, हे कळू शकलेले नाही. मात्र याची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाकडून अजूनही का करण्यात आलेली नाही?
५) मावळ मध्ये पाण्यासाठी - चार्‍यासाठी आंदोलन करणार्‍या निशस्त्र शेतकर्‍यांवरती गोळिबार करुन ३ बळी घेणारे, किंवा अंबडमध्ये वारकर्‍यांना शांत करायला गोळिबार करुन २ वारकर्‍यांचा बळि घेणारे पोलिस दल काय करत होते?
६) शिवसेना - मनसे सारख्या राजकिय किंवा इतर कुठल्याही सामाजिक संस्थांकडून वगैरें बंदचे नुकसान भरुन मागणार्‍या न्यायालय - सरकार कालच्या नुकसानाबाबत 'रझा अकादमी' वरती काय कारवाई करणार???

 हे अतिशय प्राथमिक पातळीवरचे प्रश्न आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती खरा प्रश्न एकच - "आपण परत फाळणीकडे वाटचाल करत आहोत का?" खरंतर अश्या नाजूक प्रश्नांकडे धार्मिक चष्म्यातून पहाणे योग्य नाही. पण जगभर जे चालू आहे ते बघता व देशात त्याच्या उमटणार्‍या प्रतिक्रिया बघता आपसूक धार्मिक भिंती उभ्या रहातात. विशेषत: राष्ट्रापेक्षा धर्माला कुणी महत्व देतं तेव्हा. आणि त्याही पुढे मतांसाठी त्यांचीच तळी उचलणार्‍यांचे वागणे बघून नाईलाजाने मलाही माझ्या धर्मावरती अडून रहाणे भाग आहे असे वाटायला लागते. डेन्मार्कमध्ये पैगंबरांचे व्यंगचित्र काढले - पेटव मुंबई, म्यानमारमध्ये मुस्लिमांची ससेहोलपट केली जाळा मुंबई, घुसखोर बांग्लादेशींना धोपटले तर मारा पुण्यातील आसामी आणि मणीपुरी विद्यार्थ्यांना - करा मुंबईत दंगे. काय चाललय? याची टोटलच लागत नाही कधी कधी.

ह्या दंगेखोरांवरती अखेर स्वसंरक्षणार्थ नाईलाजाने पोलिसांनी गोळीबार केला त्यात २ दंगेखोर ठार झाले, त्याचे फोटो फेसबुकवरती "शहिद" म्हणून टाकून काही मुस्लिम तरूण अजून माथी भडकवत आहेत. मी ती लिंक मुद्दाम शेअर केली आहे, अनेकांनी स्वत: त्याखालचे संभाषण वाचले तर सुन्न व्हायला होईल. विचार केला की डोकं भणभणतं. हे किती भयानक आहे? कळत नाही, हे तरूण मुद्दाम करतात कि ते खरेच भरकटले आहेत? आणि काही बोलण्याच्या पलीकडचे आहेत हे संभाषणावरुन समजतं.

 विशेष कौतुक करायचे असेल तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मानवाधिकार, कम्युनिस्ट वगैरे पिलावळीचे करावे लागेल. या घटनेबाबत एक चकार शब्द नाही गेल्या ३-४ दिवसात. आसाममध्ये बांग्लादेशी घुसखोरांमुळे ३ लाख स्थानिक लोकं बेघर झाले, कत्तली - बलात्कार करुन हाकलले गेलेले कश्मीरी पंडित गेली ४ दशके परत काश्मीरमध्ये जाण्याची वाट बघत आहेत या प्रश्नांवरती हे मुग गिळून गप्प. काही विचारलं कि "शांतता पाळा", "अफवांवरती विश्वास ठेवू नका", "कठोर कारवाई करु" इतकिच पोपटपंची. क्रिया शून्य. पण तेच फक्त ’गोध्रा’ म्हणा .... यांव रे यांव... काय कळ उठते बघा. राष्ट्रीय विनोदवीर दिग्विजयसिंह, शबाना आझमी, जावेद अख्तर, तिस्ताबाई, जितेंद्र आव्हाड वगैरे कुठे गायब झालेत ह्या घटनेनंतर ते कळतच नाहीये. आश्चर्य म्हणजे दंगेखोरांनी मिडियाला यथेच्छ थोबडवून सुध्दा मिडीया त्याच रात्री थंड झालाय. नंतर केवळ ठळक बातम्यांत १ सेक्शन नाईलाज म्हणून दिला जातोय. मला आठवतंय राज ठाकरेंचं आंदोलन झालं तर २ दिवस वीट येईपर्यंत तेच तेच दाखवलं होतं. अण्णांच्या आंदोलनामुळे तर सगळी चॅनेल "अण्णा चॅनेल" बनली होती. अरे हो आठवलं - सध्या रामदेव बाबांनी उपोषण सुरु केलय. लोकांचाही भरघोस पाठींबा मिळत आहे. म्हणून त्यांच्या अटकेसाठी बर्‍याच बसेस सरकारला मिळाल्या आहेत, एका स्टेडियमचे अस्थायी कारावासात रुपांतर केले आहे, हजारोंची सुरक्षादले दिल्लीच्या चौका चौकात उभी केली आहेत. भाजपाने पाठींबा दिल्यावरती प्रत्येक न्यूज चॅनल एकच बातमी दाखवत आहेत - "रामदेवके मंच पे भगवा रंग." इतकं बरोब्बर जमवणार्‍या सरकार व मिडियाचं मला राहुन राहुन कौतुक वाटतं. आणि त्याहुनही "विस्मरणशक्ती" दांडगी असलेल्या जनतेचही.

देश शांत रहावा. धार्मिक - जातिय दंगली होऊ नयेत हे प्रत्येकाला वाटतं. इथे काही नागडि सत्य मांडणे गरजेचे आहे, काही प्रॅक्टिकल प्रश्न अतिशय शांत डोक्याने स्वत:ला व इतरांना विचारणे गरजेचे आहे. सर्वप्रथम "अखंड हिंदुस्थानची" स्वप्ने पहाणार्‍यांना एक सांगू इच्छितो स्वप्न कितीही हवेहवेसे, भव्य व सुखावणारे असले तरी शक्य नाहिये. निदान पुढची २ - ३ शतके नक्कीच नाही. त्यामागची राजकिय, आंतरराष्ट्रिय,  सामाजिक, धार्मिक, भौगोलिक, भावनिक, आर्थिक, ऐतिहासिक, वर्तमान कारणे व भविष्यातील याच पातळ्यांवरील सर्व शक्यता लक्षात घेतल्याच पाहिजेत. मला तेजोभंग आणि त्याहुनहि या स्वप्न रंजनात असलेल्यांचा रसभंग वगैरे करण्यात स्वारस्य नाही. मी द्रष्टा देखिल नाही. पण मुळात हे नजिकच्या काळात घडणे अजिबात शक्य नाहीये हे समजायला द्रष्टा असण्याही गरज मला वाटत नाही. नपेक्षा गरमी दाखवलीच तर वरील सर्व कारणे व शक्यता बघता राष्ट्राच्या नशिबी अजून संकटेच लिहीली जातील. मग यावरती उपाय काय? सर्वप्रथम सेक्युलरिझमच्या नावाखाली फालतू लाड करणारे सरकार जनक्षोभ निर्माण करुन हटवणे, ते फालतू लाड कुठल्याही दबावाला बळी न पडता हळू हळू बंद करणे,  मुस्लिम मुलांत मदरश्यांपेक्षा शालेय शिक्षणाचा प्रसार कसा करता येईल याचा बंदोबस्त करणे. आणि महत्वाचं म्हणजे सावरकरांच्या "हींदूंचे सैनिकीकरण, सैन्याचे हींदूकरण!" या नीतीचा अवलंब करणे. भोसला मिलिटरी शांळांप्रमाणे राज्या राज्यातून अजून अनेक शाळा उघडणे. ही महत्वाची पाऊले ठरु शकतात.

जे काही आजूबाजूला घडतय ते फार चिंताजनक आहे, परदेशांतील, परप्रांतातील प्रश्न मुंबईत दंगे करुन सुटणार नाहीयेत हे समजण्याची कींवा समजून घेण्याची इच्छाच समाजात नाहीये. त्याशिवाय आजूबाजूला होणारे बॉम्बस्फोट, भारतभर व मुख्यत्वे बिहार, आसाम, मुंबई, भागातला बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्न हा राष्ट्रिय सुरक्षेचा प्रश्न आहे. मुस्लिमांना हे समजावलं पाहीजे कि याकडे धार्मिक प्रश्न म्हणून बघता येणार नाही. तर सरळ सरळ "राष्ट्रीय" प्रश्न म्हणूनच बघावे लागेल. त्यातूनही कुणाला हा धार्मिक प्रश्न वाटतच असेल तर मग त्यांनी सध्या सिरीयात आपल्याच "मुस्लिम" जनतेची "मुस्लिम" पंतप्रधान करत असलेली कत्तल कुठल्या निकषांवर तपासणार? इराक -इराण मध्ये जो विस्तवही जात नाही त्याचे काय? आपल्याच निरपराध "मुस्लिम" जनतेवरती रासायनिक अस्त्रे वापरणारे सद्दाम फासावर लटकले हे उत्तमच नाही का?  सद्दाम - खोमेनी यांपैकी नेमके बरोबर होते? आणि त्यांच्यातील सच्चे व पाक मुसलमान कोण? पाकिस्तानात भारतातून गेलेल्यांना ’मुजाहीर’ का समजतात यांचीही उत्तरे द्यावीत. आणि यांचीही उत्तरे नसतील तर निदान एका प्रश्नाचे उत्तर नक्की द्यावे - "जिन्हे नाज़ है हिंद पर वो कहॉं है?"

Sunday, June 17, 2012

पांढर्‍यावरचे काळे...

मनुष्य आपल्या कर्माने मोठा होतो. अनेकदा त्याचे कार्य हे इतके मोठे असते कि कालपटावरचा त्याचा विस्तार हा मती गुंग करणारा असतो. अशी मती गुंग करणारे कार्य दिसले कि कालांतराने आपसूक त्या भोवती नवनवीन काव्यपिसारे फुलतात, ते चूकहि नसते, मात्र याच कवी कल्पना ह्या इतिहास म्हणून घेतल्या कि गोची होते. मग त्यांना "चमत्कार" येऊन चिकटतात. आणि आपण त्या व्यक्तीला कधी देव्हार्‍याबाहेर येऊच देत नाहि. "देव" या संकल्पनेबाहेर आपण त्यांना बघत नाहि, बघू शकत नाहि. त्यांना "अवतार" ठरवल्याने मग त्यांनी केले ते अवतार कार्य म्हणूनच. त्यावर फालतू प्रश्न विचारायचे नाहित. देवच तो, त्याने काहिहि केले तरी कारण विचारायचे नाहि, कारण नियतीचा संकेत होता. ह्याने आपण समाजाची विचारशक्ती कुंठित करतो. त्यांच्या चांगल्या वाईटाला देवत्वा खाली माफ करुन टाकतो. वास्तविक देवत्वाखाली आपण आपली विचारशक्ती तर झाकतोच पण त्या व्यक्तीच्या कार्याला आपल्या नकळत कमीपणा आणतो असे माझे वैयक्तिक मत आहे. म्हणजे "देव" म्हणून त्याच्या चरणाचेहि तीर्थ घेऊ, पण ते कार्य जर ’देव’ करतोय म्हंटलं कि त्याच्यासाठी सहज साध्य असते पण तेच ’माणूस’ समजून घेतले तर त्याकाळि ते कार्य कसे केले असेल? ह्याचे आश्वर्य वाटून आपले आदर्श जास्त बळकट करता येतात हे कोणीच लक्षात घेत नाहि.

फेसबुकवरती एका ग्रुपवरील चर्चेत मुद्दा श्रीरामावरती चर्चा होत होती एक गट वर म्हणालो तसा "तीर्थ" संप्रदायातील होता तर दुसरा  रामाने चुका कश्या केल्या ह्यांचा घडाघडा पाढा वाचणारा होता. म्हणजे "श्रध्दा" व "बुध्दिवाद" या दोन पांढर्‍यावरील काळ्या शब्दांमध्ये श्रीरामांची ओढाताण सुरु होती. मी काहि मते मांडली त्यावर मुख्यत: श्रध्दावानांनी माझ्यावर हल्ला चढवला (सुदैवाने अहिंसक हल्ला होता, म्हणजे गांधीजींच्या "चामड्याच्या" चपला जितक्या अहिंसक होत्या तितकाच!).


यातला बुध्दिवाद्यांचा प्रश्न मला पटला - "जर दैवी संकेतानुसार जसं ठरलं होतं तसंच कैकयी - मंथरा वागल्या असतील तर त्यांना का दोष द्यावा?"  यावर मग श्रध्दावानांची सहाजिक गोची झाली. मग लोकांना दाखवण्यासाठी देवाने केलेला खेळ वगैरे  - "वत्सा अजाण आणि बाळबोध आहेस अजून!" धाटणीची नेहमीची उत्तरं सुरु झाली. माझ्या विचारानुसार कैकयी ही सामान्य स्त्री खचित नव्हती. मी चुकत नसेन तर जी २ वचने आपण कैकयीने दशरथाला मागितली असे म्हणतो ती वचने तीने भर रणांगणावरती दशरथांचा जीव वाचवून मिळवली होती व नंतर कधीतरी मागेन असे म्हणून पुढे रामचा राज्याभिषेक करायचे जाहिर केले तेव्हा मागितली. याचा अर्थ कैकयी एक लढवय्या स्त्री होती. पुढची गोष्ट दशरथाला शाप होता कि पुत्र वियोगाने तुलाहि मृत्यु येईल. मग पुत्र वियोग २ प्रकारे - एक तर रामाचा मृत्यु किंवा रामाचे दिर्घकाळ दूर रहाणे. शाप वगैरे कथा सत्य मानली तर उलट रामाला दूर पाठवून तीने रामाचा जीवच वाचवला ना? दशरथ व राम असे २ जीव जाण्याऐवजी एकच जीव गेला.



आता श्रीरामाच्या मुख्य कार्याकडे बघू - "रावणवध".  रावणाला हरवणं हि म्हणाल तर नविन, जगावेगळी वा अशक्य गोष्ट अजिबात नव्हती. सहस्रार्जुनाने, वालीने इतकेच कशाला? तर स्त्री राज्यातील स्त्रीयांच्या सैन्यानेहि रावणाला हरवले होते. पण आधी दंडकारण्यात येऊन मोठं सैन्य उभं करणं, ते लंकेपर्यंत घेऊन जाणं आणि रावणासारख्या बलाढ्य राजाला हरवल्यानंतर (मग तो वध असेल किंवा कैद असेल) ते राज्य योग्य हातात देणं. व रावणाचे पाठिराखे परत डोकं वर काढणार नाहि अशी व्यवस्था लावुन आर्यवर्त पुन: निष्कंटक करणं हे मोठं काम होतं. इथे रामरायाने केलेली राजकारणे, राबवलेली धोरणे फार विचार करण्यासारखी आहेत. श्रीराम हा पट्टिचा राजकारणी होता. केवळ मर्यादा पुरुषोत्तम - मर्यादा पुरुषोत्तम करुन आपण श्रीरामाचा "चॉकलेट हिरो" बनवून टाकला आहे. ती आवरणं झटकली कि श्रीरामाच्या कार्याचे विचारहि करु शकणार नाहि इतके विराट स्वरुप आपल्या समोर येते मती गुंग करुन टाकते. आणि हि आवरणं झटाकायला ना श्रध्दा सोडायची गरज आहे ना बुध्दिवादाच्या नावाखाली उभे आडवे छेद देत जाण्याची. फक्त त्या विराट रुपाचे दर्शन झाल्याने मती गुंग झाली कि त्याला "चमत्कार" म्हणून लेबल चिकटवले जाऊ नये आणि मुळ रामकथेत किंवा प्रक्षेप म्हणून मागुन आलेल्या कथांचा चोथा करुन रामाने हिच चूक केली होती तीच चूक केली होती हे हातोडिचे घाव घालून मोकळे व्हावे तसे आरोप करुन मोकळे होऊ नये.

अजून एक, रामायण वाचता - बघताना बिभिषण म्हणजे "बुळ्या", मिळमिळित" असं चित्र उभं रहातं तर तसं नाहिये. बिभीषण उत्तम लढवैय्या होता. रामाच्या सेतुचे लंकेच्या बाजूने रक्षण करण्याची जबाबदारी बिभीषणाने पार पाडली होती. रामाने दक्षिण आर्यवर्तातील रावणाचा हस्तक्षेप मोडून काढायला बिभीषणाला कसे वापरले याचं मला फार कौतुक वाटतं. बिभीषणाची राजकारणाची महत्वकांक्षा रामरायाने अचूक हेरली म्हणजे त्याचे - सुग्रीवाचे हेरखाते किती उत्तम असेल? वरुन ह्याच्याशी मैत्री ठेवली तर दंडकारण्याच्या खालच्या भागात परत शांतता नांदेल ह्याचीहि हमी मिळवली. श्रीराम - श्रीकृष्णांमधली समानता म्हणजे दुसर्‍यांचे राज्य त्यांनी हिसकावून घेतले नाहि. त्या - त्या ठिकाणच्या/वंशजांच्या हाती तो कारभार सोपवला. यात दातृत्व व राजकारण यांचा उत्तम संगम दिसून येतो. त्या महामानवांकडून शिकायच्या त्या या गोष्टि.

पण त्यांच्या महान कार्यांना थेट देवपण दिलं कि ते करतील ते सगळं बरोबर होत जातं. त्या काळि त्यांनी जे निर्णय घेतले ते एक माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून हे मान्य केलं तर उलट त्यांनी केलेली सत्कार्ये हि हजार पटींनी मोठी होतात. मानव असून इतके अवाढव्य काम कसे केले याचे आदर्श अजून बळकट करता येतात आणि आपण ’आत्ता २०१२ मध्ये ज्यांना "चूका" म्हणतो त्यावर "मानवाने" केलेली चूक व समाजाची त्यावेळची मानसिकता व पालनकर्ता - समाजाचा सर्वात वरच्या फळितला घटक म्हणून श्रीरामांना सीतेचा करावा लागलेला त्याग यांचा सरळ संबध लावता येतो.(मुळात उत्तर रामायण हा ’प्रक्षेप’ आहे हे माझे वैयक्तिक मत आहे. मुळ रामायणात श्रीराम परत आल्यावर "त्यांच्या अनेक पिढ्यांनी पुढे सुखाने राज्य केले" इथे रामायण संपवले आहे.) 

श्रीराम हा भारताचा - हिंदु धर्माचा प्राण आहेत ह्यात अजिबात शंका नाहि. श्रीरामा सारखा आदर्श राजा/माणूस हजार वर्षातून एकदा होत असावा. मी हे सुध्दा सांगतोय कि मला स्वत:ला रामनाम आवडते. घरात लहानपणापासून रामनाम ऐकत मोठा झालोय. आणि इथे श्रध्दा इतकि प्रभावी आहे कि हजारो वर्ष त्या रामनामावरती आशा-श्रध्दा-भक्ती-भावना-वाणी एकवटून त्याची कोटिच्या कोटि आवर्तने होऊन खरोखर त्याला मानसिक आधाराचे किंवा अजून स्पष्टपणे सांगायचे तर कवचाचेच रुप आले आहे. माझाहि रामनावार संपूर्ण विश्वास आहे. संकटांवर मात करण्याची अफाट स्फुर्ती रामनाम देते ते त्यावर गेली हजारो वर्षे भक्ती व वाणीचे जे "संस्कार" होत आहेत त्यामुळे. भक्ताने देवाला मोठं केलं, देवाने भक्ताला सांभाळलं. भक्त आणि त्याचे श्रध्दास्थान एकमेकांना आधार देतात - मोठे होतात हे दाखवण्यासाठी याहुन सुंदर व गोड उदाहरण नाहि. :-)


श्रध्दा आणि बुध्दिवाद या दिसायला विरुध्द असल्या तरी पुरक गोष्टि आहे. श्रध्दा हि डोळसच असावी. आणि बुध्दिवादाला देखिल श्रध्देचे अधिष्ठान असावे. "सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे।" श्रध्दा आणि बुध्दिवाद सहज एकत्र नांदू शकतात सर्वात मोठे उदाहरण - शिवछत्रपती आणि स्वामी विवेकानंद. कुठल्याहि गोष्टिवरती मग अगदि ती चांगलीहि का असेना सहज विश्वास ठेवला कि बुध्दिवादाला टोचणी लागते आणि अडचणीत आणणारे प्रश्न विचारले कि श्रध्दावानांना त्रास होतो. मुळात आपले अध्यात्म हे प्रश्नांमुळेच निर्माण झाले आहे. "स्वकियांशी कसा लढू?" या प्रश्नाने गीता निर्माण झाली. हल्ली प्रश्न विचारला कि श्रध्दावान म्हणवणारे तुटुन पडतात. मुळात श्रध्दा हि ’संयमानेच’ दृढ होत जाते. समोरच्याच्या एका वाक्यावरुन तलवारी परजायला सुरुवात केली धर्म हे वैचारीक डबकं होतं. त्याचं तालिबानीकरण होतं. सुदैवाने हिंदु धर्मात विचारावर कधीच बंधनं नव्हती इथे चार्वाक सुध्दा "हिंदूच" म्हणवले जातात. जगात दुसरा असा कुठलाहि धर्म नसेल कि ज्यात एकमेकांच्या विरोधी जाणारी शेकडो मते असूनहि तो भक्कमपणे उभा आहे. भक्कम तंबू उभा करायचा असेल तर चार वेगवेगळ्या दिशांना जाणार्‍याच दोर्‍या असाव्या लागतात. तंबू माझ्या एकट्य़ामूळे उभा आहे असं तो मधला खांब नाहि म्हणू शकत ना विरुध्द दिशेने जाणार्‍या दोर्‍याहि.

श्रध्दा ठेवताना प्रश्न विचारु नका हे मला पटत नाहि. विवेकानंदांसारखा अध्यात्मिक अधिकारी पुरुष एखाद्या "गुरु" करताना तुमचे समाधान होईतो अखंड प्रश्न विचारा असाच सल्ला देतो. हा खरा बुध्दिवाद आणि या बुध्दिवादाची पुढची पायरी श्रध्दा आहे. असा बुध्दिवाद आणि अशी श्रध्दा असेल तर राष्ट्र प्रगती पथावर जाईल. अन्यथा दुसर्‍याला "हे शरीर नाशिवंत आहे बालका, सोने नाणे यांचा मोह नको!" म्हणत स्वत:चे मोठे श्रीमंती आश्रम उभारणारे, "खास" भक्तांसाठी हवेतून साखळ्या काढणारे किंवा ’संभोगातून समाधीकडे’ नेणारे भोंदू देशाला विनाशाच्या गर्केत नेतील.


मी लिहिलय ते पटणं अथवा न पटणं हे ज्याच्या त्याच्यावर सोपवलं आहे.

मी स्वत:ला बुध्दिवादि समजतो. तर्काला न पटणार्‍या धार्मिक कर्ममकांडांची ची उत्तरे मिळाली नाहि तर मी बेचैन होतो. दुर्दैवाने "श्रध्दा" रुढी यांच्या नावाखाली मोठ्यांकडून ’असंच असतं’ हे कधीच न पटणारं उत्तर मी अनेकदा ऐकलं. आणि त्यातून माझा बुध्दिवाद अजून वाढत गेला. कदाचित माझ्याही काही अजून उत्तर न मिळालेल्या श्रध्दा - अंधश्रध्दा माझ्या नकळत मी जोपासत असेन, त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न चालू आहेच.

लोकं देवाला शब्दश: "घाबरतात". उठसुठ देवाला घाबरणे मला कधीच पटले नाहि. देवाला तुम्हि "माऊली" म्हणता तर घाबरता का? किडुक मिडुक कारणां वरुन देवाचा कोप होतो??? हे लॉजिक मला पटत नाहि. हां आता तुम्हि कोणाचे तळपटाच करायला जात असाल तर देवाने शिक्षा केली नाहि तरच आश्चर्य आहे.

उपवासाच्या दिवशी चालणार नाहित म्हणून औषधे न घेणारी लोकं पाहिली आहेत मी. माझ्या समजण्याच्या पलिकडची गोष्ट आहे हि. अरे मरायला टेकल्यावर कसले उपास? आणि औषधे नाकारायचा अट्टाहास का? देव नाहि सांगत माझ्यासाठी शरीराला त्रास दे म्हणून. अध्यात्माच्या नावाखाली अनेक अनाकलनिय गोष्टि बेमालूम दडपल्या जातात. ते बघून त्रास होतो. अजून एक देवाला नेवैद्य दाखवताना त्याची चव घेतली गेली तरी मला चुकिचे वाटत नाहि. घरात लहान मुलांना भूक लागली असते आणि केवळ पुजा होऊन देवाला नेवैद्य दाखवायचा बाकि आहे म्हणून त्या इवल्याश्या जीवाला थांबवुन ठेवले जाते, हे मला कधीच पटाले नाहि. मला विचाराल तर खुशाल त्या मुलाला जेवू घालावे. मुलत: नेवैद्य हा उपचार फक्त अन्न ग्रहण करण्यापुर्वी देवाची आठवण व चांगली मनस्थिती तयार व्हावी यासाठी असतो.

उदाहरणा दाखल ही माझी वैयक्तीक मते आहेत. अनेकांना ती पटत नाहित. पटवून घ्यावीत हा अट्टाहास नाहि पण ती चूक आहेत असे कोणाला वाटात असेल तर "का?" या प्रश्नाचं सविस्तर आणि पटणारं उत्तर हवय. यालाच मी बुध्दिवाद समजतो.

संयम नसला कि ना बुध्दिवाद कामाला येतो ना श्रध्दा. अन्यथा उरतात ते केवळ "बुध्दिवाद" व "श्रध्दा" असे दोन पाढर्‍यावरचे काळे शब्द!


 - सौरभ वैशंपायन.

Wednesday, June 13, 2012

अतोस्मी लोके वेदे च प्रथित: पुरुषोत्तम:




पुलं जाऊन आज १२ वर्ष झाली. पण मुळात पुलं आपल्यात नाहीयेत हेच खरं वाटत नाही. कारण एकही दिवस असा जात नाही जेव्हा पुलंची किमान एकदा आठवण होत नाही. आणि कुठल्याही चांगल्या वाईट कारणाने पुलंची आठवण होतेच. त्यातून सध्या एकीकडे "अपूर्वाई" वाचणं सुरु आहे. शिवाय त्यांच्या वेगवेगळ्या MP3 ऐकणं असतच अधुन मधून. रोजचं आयुष्य असं पुलंकीत असणं यासारखं सुख नाही.



हा माणूस काहिही लिहू शकायचा. कुठल्याही विषयात, कुठल्याही लेव्हलपर्यंत विनोदी शब्दचित्रापासून ते चटका लावून जाणार्‍या प्रसंगाचे शब्दचित्र सहज उभं करायची ताकद त्यांच्या लेखणीत होती. आणि मुळात वाचणार्‍या व्यक्तीला ते पटायचं. हे फारच कमी लोकांना जमतं. व्यक्ती आणि वल्ली, असा मी असामी, गणगोत, म्हैस यातली खरी आणि काल्पनीक पात्रे वाचताना आपण यांना ’ओळखतो’ ही भावना तयार होते.


महाराष्ट्राला विनोद, उपहास, कोपरखळ्या नवीन नाहीत. पण पुलंच्या विनोदांची आणि एकंदरच विचारांची घडण आणि उंची वेगळी होती. पुलंनी विनोदाने कधी कुणाला ’घायाळ’ केले नाही. सोनाराने कान टोचावेत तसे त्यांचे विनोद असत. आणिबाणी जाहीर झाली तेव्हा शिवाजीपार्कवरील सभेत देखिल त्यांचा तोल सुटला नाही. त्या भाषणात तक्षकाची गोष्ट सांगताना - "...आणि ऋषींनी "तक्षकाय स्वाहा:" म्हंटले पण तक्षकाची आहुती यज्ञात पडेना, कारण तो इंद्राच्या सिंहासनापाठी लपला होता, म्हणून ऋषींनी ’इंद्राय तक्षकाय स्वाहा: अशी आहुती दिली त्या बरोबर ’इंदिराचं’ सिंहासन डळमळू लागलं" असं म्हणून वरुन "लक्ष द्या ... मी "इंद्राच" सिंहासन म्हंटलय बरं का!!" हेही ठेवून दिलं होतं. हे असले शालजोडितले भल्याभल्यांना सरळ करायची ताकद राखून होते. म्हणूनच कदाचित पुलं एकटेच "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व" ठरले.



पुलंच्या साधनेचं बारा वर्षांच एक तप झालय. पूर्वी म्हणे देवाची कठोर साधना केली की अनेक तपांनंतर तो प्रसन्न होत असे. इथे उलटं आहे. "पुरुषोत्तम" केव्हाच प्रसन्न झालाय. त्यांनी इतकं देऊन ठेवलंय - इतकं देऊन ठेवलय की आपल्या इवल्याश्या हातात ते मावत नाही.

अनंत हस्ते पुरुषोत्तमाने देता किती घेशील दो करांने?

 - सौरभ वैशंपायन.

Tuesday, March 27, 2012

उत्तर

गर्भरेशमी वस्त्र त्यावरी,
काठ जरीचे सळसळते,
वेळ एकटि अबोल साजण
चुकार कंकण हळहळते ॥१॥

अबोल साजण अबोल हसता
हुरहुरते पाऊल वळते
मी सांगावे तू ऐकावे
शब्दाविण खूण कळते ॥२॥

अता उरावे अता सरावे
दिव्यातले अत्तर जळते,
मिणमिण मिटते ज्योत लाजरी
 एक क्षण नजर मिळते ॥३॥

हळूच यावे मिठीत घ्यावे,
स्पर्शास बावळे मन चळते
असा दुरावा कसा उरावा?
मिठीतलेही अंतर छळते ॥४॥

रातराणीचा गंध मनावर
तनावरती दव गळते
फुले अवेळिच पारीजात का?
प्रश्नाविण उत्तर मिळते.॥५॥

- सौरभ वैशंपायन.

Saturday, March 17, 2012

बॅटमॅन फॉरएव्हर




आता नुसतं "सचिन तेंडुलकर" हे नाव डोक्यात जरी आलं, तरी ओठांचे कोपरे बाउंड्रिलाईनकडे चेंडू धावावा तसे कानांच्या दिशेने आपसूक धावतात. सचिनचं ज्या गोष्टिशी नाव जोडलं जात (अर्थात चांगल्या अर्थी) त्यातही जादू होत असावी - सगळ्यांना आठवत असेल सचिन याआधी "MRF" च्या ब्रॅन्डनेमची बॅट वापरत असे. त्यावेळी आमच्यात देखिल आपापल्या बॅटला तसाच MRF चा स्टिकर लावायचं खूळ आलं होतं. अर्थात तेव्हा हे समजायचं वय नव्हतं कि बॅटला नुसता स्टिकर लावला कि तेंडुलकर नाही बनता येत, पण या अज्ञानात सुख असल्याने असेल कदाचित, ती MRF ची बॅट हातात घेतली, कि टिम मधला एखाद्या फद्या देखिल सहज १५ - २० रन्स करुन जात असे.

सचिनला किती नामाभिधानं द्यावीत? किती बिरुदं लावावीत? त्याला मास्टर ब्लास्टर म्हंटलं, विक्रमांचा महामेरु म्हणून झालं, शतकांचा अनभि्षिक्त सम्राट जाहीर केलं आणि ते खरही होतं .... सिंहासनासाठी सम्राट नसतो - सम्राटांसाठी सिंहासन असतं. आणि ते तसं नसलं तर सम्राट जिथे बसतो ती जागा आपसूक सिंहासन बनते. सचिनने काही वेगळे केले नाही. पूर्वी अश्वमेध करु पाहणार्‍या बलशाली राजाला चतुरंग सेना घेऊन पृथ्वी पादाक्रांत करत जावी लागायची, आणि इथे या पठ्ठ्यानं फक्तं २२ यार्डच्या त्या पट्टिवरच इतकि दौड केली इतकि दौड केली कि सगळं जग त्या २२ यार्डात सामावलं. आणि बरोबरही आहे, वामनाने सुध्दा तीन पाऊलातच तीन्हि लोकं पादाक्रांत केले होतेच कि ..... सचिन तसाही उंचीने आणि आता कर्तृत्वाने "वामनच" आहे. फरक एकच त्या वामनाने बळी राजाला पाताळात धाडलं, हा बॅट्समनचे "बळि" घेणार्‍यांना प्रेक्षकांत धाडतो.

म्हणाल तर भारतात इतर अनेक खेळाडुही मोठे होते - आहेत, द वॉल असलेला द्रविड होता, पण त्याची बॅटिंग हि अतिसुंदर नववधूप्रमाणे होती. लाजत मुरकत आपलं आरस्पानी सौंदर्य दाखवायची, उगीच आंगचटिला येणार्‍या मवाली चेंडुंशी अंतर राखण्याचा खानदानीपणाही तिच्यात होता. द्रविड भारतीय संघाचा तारणहार नक्किच होता पण द्रविडची "भीती" कधीच वाटली नाही, आणि समजा तो पाच दिवस पीचवर उभा राहून दोन्हि संघांच्या चारही इनिंग एकटाच  खेळून गेला असता तरीही ती वाटली नसती. त्या उलट सेहवाग - दहा वर्षांच्या एखाद्या वांड मुलाला हातात चार फुटी वजनदार दांडके देऊन "हं, ही माळ्यावरची गादी! धोपटून साफ कर बरं!" हे सांगितल्यावर तो ज्या उत्साहाने ते काम करेल त्याच उत्साहाने सेहवाग पीचवरती वावरतो. सेहवाग कुठलाही प्रकार खेळला तरी T-20 चा शोध त्यानेच लावल्यासारखा खेळतो (उदा - वेस्ट इंडिज विरुध्द ODI मध्ये केलेले २१९). पण "सचिन" हा "सचिन" आहे त्याची बॅटिंग ही एखाद्या प्रचंड पडद्यावर सादर होणार्‍या रोमन युध्दकथेवरच्या चित्रपटासारखी असते आणि त्याचे फटके हे अक्षय्य भातातल्या अस्त्रांसारखे असतात. कधी कधी ICC ला सांगावसं वाटतं कि बाबांनो क्रिकेट  ग्राउंडला "स्टेडियम" का म्हणता?? म्हणण्यापेक्षा "रिंग" म्हणा (तसंच बॉक्सिंगच्या "चौरस" बाउटला "रिंग" का म्हणतात हे सुध्दा कोडंच आहे), म्हणजे जेव्हा जेव्हा सचिन खेळायला येईल तेव्हा दरवेळि नव्याने "लॉर्ड ऑफ द रिंग्ज" बघता येईल. कारण कुठल्याही ’गोलात’ उतरला तरी लॉर्ड तोच असतो.

सचिन आज २२ वर्ष खेळतोय, अजून किती खेळेल माहीत नाही (पुढल्या वर्ल्डकपची टिम "सचिन" हे नाव सोडुन बदलली असेल तरी मला आश्चर्य वाटणार नाही .... कधी कधी तर वाटतं विराट कोहलीला सुध्दा सचिनच्या हस्ते लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळेल तेव्हाही सचिन क्रिकेट खेळतच असेल). एखाद्या आयुर्वेदिक औषधाचं लिटरभर पाणी उकळून - उकळून त्याचा अर्धाकप काढा करावा तसं सचिन क्रिकेट खेळला आहे. म्हणूनच सचिन हा क्रिकेटचा परीपाक आहे. वर्ल्डकपच्या साखळि सामन्यात सचिन आऊट झाल्यावर साऊथ आफ्रिकेविरुध्द उरलेल्या आठ जणांनी केलेली हाराकिरी पाहून, पोलिओ डोस सारखं सचिनच्या अंगठ्याच २ - २ थेंब तीर्थ त्या प्रत्येकाला पाजावसं वाटलं होतं .... म्हणजे अशी पांगळी झालेली किंवा ऐनवेळि पक्षाघाताचा झटका आल्यागत कोसळलेली बॅटिंग निदान उभी तरी राहिली असती.

 सचिन आजवर इतका खेळला, वन डे मध्ये अठरा हजारहून अधिक धावा कुटल्या, टेस्ट मध्ये पंधरा हजार धावांपेक्षा जास्त केल्या. इतकि किर्ती, मान मरातब, पैसा मेहनतीने कमावले. कधी कधी विचार येतो कि सचिनलाच काय वाटत असेल? कारण त्याच्या प्रत्येक धावेसरशी त्याचा स्वत:चाच आधीचा रेकॉर्ड मोडला जातोय. त्याच्या मागे असलेला पॉन्टिंग जवळपास ४ हजार रन्सनी मागे आहे. आणि इतकं असून पॉन्टिंगचा उद्दामपणाचा अंशही सचिनच्या वागण्यात दिसत नाहि. सचिन फक्त पीच वरती असला कि मुजोर होतो ते सुध्दा फक्त बॅटनेच. सचिन मैदानात डोक्यावर बर्फ ठेवुन वावरताना दिसतो. तो कितीही चिडला तरी त्याच्या हातून गैरवर्तन होत नाही. वर्ल्डकपच्याच विंडिज विरुध्दच्या मॅच मध्ये देखिल अंपायरने नाबाद दिल्यावरही स्वत: खिलाडु वृत्ती दाखवुन, हा शांतपणे पॅव्हिलिअन मध्ये परतला. आज सारखीच तो जेव्हा मोठी खेळि करतो आणि त्यानंतर भारत हरत असेल तर त्याला किती मानसिक त्रास होत असेल?? गेले वर्षभर त्याचे शतक झाले नव्हते तर भल्या भल्यांनी त्याला निवृत्तीचा सल्ला दिला होता. त्यात द्रविडच्या निवृत्तीने तर मिडियाने अजून बोंबाबोंब करायला सुरुवात केली होती. पण जो २ दशकांहुन अधिक वर्ष क्रिकेट खेळतो आहे त्याला त्याच्यात क्रिकेट बाकि आहे कि नाहि हे समजणार नाहि का? बरं आता झालं महाशतक तर म्हणे ऑस्ट्रेलियात काय धाड भरली होती त्याला? बांगलादेश काय टिम आहे का? ... लगोलग बांगलादेशाने "विश्वविजेत्या संघाला" उत्तर दिलंय. "आम्हांला लिंबू-टिंबू समजू नका!" आता बोला, बाकि कोणी केले का मग बांगलादेश विरुध्द शतक?

असो, नेहमीच किरकिर करायला जन्म घेतलेल्यांना खास सल्ला - सचिन इतका पुढे निघून गेलाय कि त्याला स्पर्ष करणं जवळपास अशक्य आहे. तरी एक गोष्ट सांगू इच्छितो कि समजा उद्या क्रिकेटमध्ये एखादा नविनच चमत्कार जन्माला आला आणि त्याने रोज सकाळि उठुन एक सेंच्युरी जरी केली ना, तरी तो "सचिन" नाही हो बनू शकणार. खरच "सचिन" होणं खूप कर्मकठिण आहे. फार फार पूर्वी "ब्रह्मर्षी" होणं जितकं कठिण होतं ना कदाचित तितकच.

सगळ्यांनी सचिनला नावे ठेवली. काही कर्मदरीद्रि लोकांनी शब्दश: नावे ठेवली, आणि आमच्या सारख्या लोकांनी दर शतकानंतर ’घालिन लोटांगण’ म्हणत त्याला नावे बहाल केली पुढेही करत राहुच ..... पण सध्यातरी मला फक्त एकच नाव सुचतंय "द बॅटमॅन".... "बॅटमॅन फॉरएव्हर".

- सौरभ वैशंपायन.

Wednesday, March 14, 2012

Ra.hul

"भिंत" म्हंटल्यावर पहिल्यांदा आठवते ती चीनची भिंत, मग चांगदेव वाघावर बसून भेटायला येत आहेत हे ऐकून ज्ञानोबा माऊलींनी म्हणे ते ज्या भिंतीवरती बसले होते ती भिंतच त्यांच्या दिशेने चालवली होती ती भिंत, आणि जर्मनीचेच नसून जवळपास जगाचे दोन भाग करणारी आणि मग ८९ मध्ये धुळिस मिळालेली "बर्लिन वॉल". अनेक शतकांतून अश्या जग बदलणार्‍या भिंती निर्माण होत असतात. परवाच "धावणारी भिंत" क्रिकेट मधून निवृत्त झाली आणि आणखि एक चमत्कार पुढल्या पिढ्यांसाठी पुस्तकांत नोंद करण्यापुरता उरला.

पानिपतातून कसं जानू भिंताड्या ३ दिवस तग धरुन सदाशिवराव भाऊंच्या पत्नीला वाचवत  ग्वाल्हेरला निसटला? तसंच, ग्राउंडवरती आपल्या टिमने पराभवाकडे रांगायला सुरुवात केली कि आपला राहुल भिंताड्या उभा रहायचा, चक्क २-३ दिवस उभा रहायचा. अ‍ॅडलेड घ्या, कलकत्ता आठवा. किंवा नॉन - स्ट्रायकर एन्ड वर सेहवाग ते श्रीशांत असे १० जण बदलले तरी हा आपला स्ट्राईकवरती गौतम बुध्दाच्या शांततेने उभा राहिला होता ते आठवा. हे म्हणजे आपल्याच अनिलभाईने पाकिस्तानचा बाजार एकहाती उठवला होता त्याला वरताण झालं. एकदिवसीय क्रिकेटमध्येहि दहा हजारहुन अधिक धावा करुन त्याने केवळ तो केवळ कसोटि क्रिकेटमधला खेळाडू नव्हता हे आरामात सिध्द केलं.

राहुल द्रविड हा नको इतक्या सद्‍गृहस्थ धाटणीतला होता. म्हणजे नॅटवेस्ट सीरीज फायनल मध्ये गांगुलीने शर्ट वगैरे फिरवला तसं राहुलला स्वप्नातहि शक्य नव्हतं कारण तो मुळात त्याचा पिंडच नव्हता. संझगिरी एकदा म्हणाले होते कि सौरवच्या जागी राहुल असता तर त्याने खिश्यातून झटकायला म्हणून रुमालहि काढला नसता. पण मुळात द्रविडचे अवतारकार्यच वेगळे होते. म्हणजे वनवासात गेलेल्या राम-सीता-लक्ष्मणाचे कौतुक होते, श्रीरामाच्या पादुका सांभाळलेल्या भरताचे कौतुक होते पण १४ वर्षे आपल्या पतीपासून दूर राहिलेल्या उर्मिलेबद्दल कोणालाच पडली नसते .... अनेकदा तसंच अक्षम्य दुर्लक्ष द्रविडबाबत झालं. पण तो तिथे नसता तर? हा विचार केला कि केवळ द्रविड होता म्हणून पराभव टळला अश्या पोतडिभर मॅचेस सहज काढता येतील. मात्र त्याने कधीच नाराजीचा जाहिर सूर काढला नाहि. तो फक्त खेळत राहिला. त्याला कोणी सचिन - लारा - जयसूर्याच्या पंक्तीला बसवले नाहि, त्याला "स्फोटक" वगैरे कधी कोणी म्हंटले नाहि. अगदि द्रविड आउट झाला म्हणून वैतागून कोणी टिव्ही बंद केल्याचेहि मला आठवत नाहिये. पण इतर कोणी असलं नसलं तरी द्रविड असला कि आशेचा तंतू आपसूक चिवट व्हायचा. मॅच जिंकू, किमान ड्रॉ करु इथवर तरी समाधान मनात आपोआप असायचं. (या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात राहुल खेळू शकला नसल्याचं कारण बहुदा ऑसीजनी वर्गणी काढून, एखाद्या ७२ घंटे मैं १००% इलाज करणार्‍या बंगालीबाबाला मूठ - करणी वगैरे करायला सांगितलं असावं अशी मला दाट शंका येतेय. नाहितर नेहमीचं ’गिर्‍हाइक’ द्रविड - लक्ष्मण सोडतील?? :-p)

सध्या तरी सचिनचे "महाशतक" हि एक प्रमुख "राष्ट्रिय चिंता" बनली आहे. वास्तविक सचिन ते शतकच काय नंतरहि अजून पाच - पंचवीस शतकं झळकावेल आता मुख्य प्रश्न असा आहे कि द्रविडची जागा कोण घेणार?? एखादि जाहिरात करण्याइतकं का ते सोपं आहे??? कारण राहुलची जागा घेणं म्हणजे फक्त भरमसाठ रन्स करणं नसतं. टिमला गरज असेल तेव्हा नांगर टाकून उभं रहाणं, समोरचा खेळाडू मागहुन येऊन १०० करतो तेव्हाहि आपण ६०-७० वरती शांतपणे खेळत रहायचं, समोर असलेल्या बॅट्समनशी "प्रतिस्पर्धी" म्हणून न खेळता "पार्टनर" म्हणून खेळत रहायचं, अनेकदा नको असलेल्या भूमिका संघासाठी यशस्वीपणे पार पाडणे म्हणजे राहुलची जागा घेणे असा अर्थ होतो. ऐनवेळि विकेटकिपर सारखी प्रचंड कठीण भूमिका पार पाडायची ताकद आताच्या संघात कोणाकडे आहे? राहुलने ती देखिल बजावली. कारण राहुल द्रविडची भूमिका हि भारतीय संघासाठी बहुतांशी द्रौपदि वस्त्रहरणाप्रसंगी श्रीकृष्णाची जी भूमिका होती तीच असायची.


राहुल भोवती प्रसिध्दीचं झगमग करणारं, डोळे दिपवणारं मोठं वलय असं दिसल नाहि. ना त्याच्या भोवती कुठले वाद कधी उभे राहिले. म्हणजे थोडक्यात बापडा क्रिकेटमधला उच्च मध्यमवर्गिय होता म्हणा ना. एखाद्या गोष्टिची - व्यक्तींची योग्य किंमत ती जागच्या जागी असली ना कि नसते, ती गोष्ट किंवा व्यक्ती गेल्यावरती जाणवणारी कमतरता घालमेल अजून वाढवते ..... राहुल तू विश्वास बाळग - आता जेव्हा जेव्हा भारताचा संघ पराभवाकडे रांगायला आणि मग दुडुदुडु धावायला सुरुवात करेल तेव्हा प्रत्येक घरातून हळहळता आवाज येईल "आता पीचवरती द्रविड हवा होता रे!"

 - सौरभ वैशंपायन

Tuesday, February 28, 2012

"The Artist" - घडाघडा बोलणारा ’शब्देविण संवादू’



वरचं चित्र बघुन अनेकांना RK studio च्या लोगोची किंवा सरळ सांगायचं तर "बरसात" च्या पोस्टरची थोडिशी आठवण होईलहि. परवाच उत्कृष्ट दिग्दर्शक आणि अभिनेत्यासह ५ "ऑस्कर" पटकावणर्‍या "द आर्टिस्ट" फिल्म मधला हा फोटो आहे. आणि ते मिळालं नसतं तरच नवल होतं. २०११-१२ साली चक्क "ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट" (मराठीत कृष्ण-धवल) चित्रपट काढायचा हे मोठं धाडस आहे. हां अर्थात १९९३ साली स्पीलबर्गने देखिल "ऑस्कर शिंडलर" या जर्मन बिझनेसमची दुसर्‍या महयुध्दातील सत्यकथा "शिंडलर्स लिस्ट" या चित्रपटात मांडली होती हा चित्रपट देखिल ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट होता आणि पठ्ठ्याने चक्क ७ अ‍ॅकेडमी अवॉर्ड मिळवुन "ऑस्कर शिंडलर्सच्या" लिस्ट मध्ये ७ "ऑस्कर" जमा देखिल करुन दाखवले. पण तो चित्रपट "मुक-चित्रपट" नव्हता. हा द आर्टिस्ट संपूर्ण मुक चित्रपट देखिल आहे. आणि ज्यांनी चार्ली चॅप्लीन किंवा त्या काळचे चित्रपटाचे दृष्य आणि मग संवादांची पाटि अश्या धाटणीचे चित्रपट बघितले असतील त्यांना हा चित्रपट कसा केलाय हे लगेच समजेल.  "मुक- चित्रपट" काढून ५ ऑस्कर खिशात घालण्यावरुन चित्रपट काय उंचीचा आहे हे आपसूक सिध्द झालंच आहे.

हि कथा आहे त्या काळाच्या एका अभिनेत्याची ज्याने मुक - चित्रपटांचा जमाना गाजवला आहे. तो प्रसिध्दिच्या शिखरावर आहे पण तरीहि सर्व सामान्यांशी तो सहजपणे वागतो. चित्रपटाची संपूर्ण कथा सांगत नाहि, परंतु अचानक भेटलेल्या गर्दितल्या एका सर्व सामान्य मुलीला तो तिच्या नृत्यातले कसब बघून आपल्या बरोबर काम करण्याची एक छोटि संधी देतो. त्याच दरम्यान चित्रपट "बोलायला" लागतो पण हा निर्मात्याच्या तोंडावर हसतो आणि हे काय चालणार? म्हणत चालता होतो. त्याच वेळि "ती" मुलगी इतर चित्रपटात लहान लहान रोल करत एक स्टार बनते तर दुसरीकडे आपला हेका सोडायला तयार नसलेला "तो" अगदि आपल्याकडचे सगळे पैसे घालून एक नवा "मुक चित्रपट" बनवतो आणि चित्रपट साफ कोसळुन तो कंगाल बनतो. पुढे शेवट व "ट्वीस्ट" अर्थात "सुखद" आहे. पण तो शेवट बघण्यात खरी मजा आहे. पैसा - नाव नसलं कि कसे सगळे पाठ फिरवतात व त्यानंतर स्वत:चा परिस्थितीशी न जुळवुन घेण्याचा हट्ट व त्याचवेळि काल पावतो जे आपल्याला मुजरे झाडत होते त्यांसाठी आपण "संपलो"  हि घुसमट "जुआन दुजारदाँ" याने जबरदस्त ताकदिने दाखवली आहे. इतकि कि आपली अस्वस्थतेने चुळबुळ सुरु होते. पण त्या घुसमटित ’अगतिकता आणि करारीपणा’ यांच्या एकमेकांवर कुरघोडि करणार्‍या अनेक छटा त्याने फार बोलक्या केल्या आहेत. त्याचा कुत्राहि फारच मिश्किल घेतला आहे. कुत्र्यालाहि एखादं अवॉर्ड द्यावं इतकं मजेदार काम त्याने केलय!

ह्याची स्टोरी लाईन आपल्याकडच्या "द डर्टि पिक्चर" बरोबर जुळते नव्हे जवळपास समांतरच जाते. अर्थात विषयाचा गाभा वेगवेगळा आहे. असो, तर शब्देविण असलेला हा संवादू कदाचित शब्दांसकट देखिल इतका प्रभावीपणे मांडता आला नसताअसं राहून राहून वाटतय. त्यात "जुआन दुजारदाँ" ची वाहवा आहेच पण काहि ठिकाणी दिग्दर्शक (मिशेल आझानाविसीअस) या कसलेल्या अभिनेत्याच्याहि वरणात झालाय. म्हणजे ३-४ प्रसंगात तर दिग्दर्शकच खरा हिरो ठरलाय इतके प्रभावी शॉट्स "मिशेल आझानाविसीअस" यांनी घेतले आहेत. त्यासाठी सलाम!!!

moral of the story - मुक्यानेच भरपूर काहि सांगणारा "द आर्टिस्ट" बघितलाच पाहिजे!

 - सौरभ वैशंपायन.

Saturday, February 25, 2012

My Father When I Was….......................

( I don't remember who was the author of this beautiful article. but i think it was noted from "Chicken soup" series.)


4 years old: My daddy can do anything.

5 years old : My daddy knows a whole lot.

6 years old : My daddy smarter than your dad.

8 years old : My daddy doesn’t know exactly everything.

10 years old : In the olden days when my dad grew up,things were sure different.

12 years old : Oh, Will, naturally, father doesn’t know anything about that. He is too old to remember his childhood.

14 years old : Don’t pay any attention to my father. He is so old fashioned!.

21 years old : Him? My lord, he’s hopelessly out of date.

25 years old : Dad knows a little bit about it but then he hould because he has been around so long.

30 years old : May be we should ask dad what he thinks. After all he’s had lot of experience.

35 years old : I ‘m not doing a single thing until I talk to dad.

40 years old : I wonder how dad would have handled it. He was so wise and had world of experience.

50 years old : I’d given anything if dad were here now, so I could talk this over with him. Too bad I didn’t appreciate how smart he was. I could have learned a lot from him.

Saturday, January 14, 2012

"गुरुदक्षिणा"

कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति,
तसे मराठे गिलिचे साचे कलित लढ़ले पनिपति॥


- १४ जानेवारी १७६१, राष्ट्रावरचं संकट मराठ्यांनी आपल्या छातीवर झेललं. मराठे गिलच्यांविरुध्द एकाकि झुंझले. अभिमन्यूप्रमाणे झुंझत झुंजत देह ठेवला. उभ्या भारतातून एक हरीचा लाल मराठयांबरोबर पाय रोवून पानिपतात उभा राहिला नाही. मराठ्यांनी पाय गाडून युध्द केलं. रक्त मांसाचा चिखल झाला. मराठ्यांचा भावी पेशवा मारला गेला. पुण्यातल्या प्रत्येक घरातला एक जण तरी पानिपतावर कापला गेला. "दो मोती गलत, दस-बीस अश्राफात,
रुपयों
की गिनती नही|"
पण माझ्या दृष्टीने पानिपतावरती झालेला पराभव हा खरा पराभव नाही. कारण १८व्या शतकाच्या शेवटि तब्बल १४ वर्ष लाल किल्यावरती "भगवा" फडकत होता हा इतिहास आहे. मराठ्यांनी दिल्लीची वजीरीच नव्हे जर सगळी दिल्लीच पुन्हा मांडिखाली दाबली हा खरा इतिहास आहे. महादजी शिंद्यांनी एकेका रजपुताला सुटा करुन करुन पिदवला हा खरा इतिहास आहे,  "गढ मै गढ चित्तोड गड बाकि सब गढियॉ।" म्हणून लैकिक मिळवलेला किल्ला जवळपास वर्षभर लढल्यावर आणि डोळे पांढरे व्हावेत इतका तिखट प्रतिकार झाल्यावर ’महान’ सम्राट अकबराला मिळाला होता ..... मराठ्यांनी बोल - बोल म्हणता तो १८ दिवसांत जिंकला होता हा खरा इतिहास आहे. नजिबाचा नातू "गुलाम कादिर" याने "अली गोहर" बादशहाला आंधळे केल्याबद्दल व बादशाहाच्या कुलातील स्त्रीयांना भर दरबारात नग्न केल्याची शिक्षा म्हणून मराठ्यांनी त्याला टाचेकडून मानेकडे जिवंत सोलून ठार मारला होता व नंतर दिल्लीच्या लाहोरी दरवाज्याजवळ ३ दिवस टांगून ठेवला होता हा खरा इतिहास आहे. पानिपताला जबाबदार असलेल्या नजीबाची कबर मराठ्यांनी सुरुंग लावून उडवून दिली हा खरा इतिहास आहे..
म्हणूनच म्हणतोय खरा पराभव पानिपतावर नव्हे तर इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात झालाय, पुस्तकांच्या पानांवरती झालाय. दुसर्‍या महायुध्दातील दोस्तांच्या डंकर्कच्या पळपुटेपणाला कौतुकाने माना डोलावून "यशस्वी माघार" म्हणणारे मात्र पानिपतावर देह ठेवून राष्ट्र वाचवणारे पराभूत झाले असं म्हणतात तेव्हा त्यांची किव येते.
आज अडिचशे वर्षानी त्याच्याकडे बघताना केवळ "पराभव" म्हणून न बघता "गुरुदक्षिणा" म्हणून बघा. मराठ्यांनी शिवछत्रपतींना दिलेली "गुरुदक्षिणा". राष्ट्रावरचं संकट आपल्या छातीवर घ्यायची संथा त्या महामानवाने मराठ्यांना दिली होती. त्या संथेची गुरुदक्षिणा म्हणजे "पानिपत".
 - सौरभ वैशंपायन.

Thursday, January 12, 2012

... प्रसंगी अखंडित वाचित जावे॥




माझं सर्वात आवडतं स्वप्न म्हणजे घराची एक भिंतभर एक छान सुटसुटित कपाट आहे आणि ते कपाट भरुन मराठी - हिंदि - इंग्रजी भाषेतील शेकडो विषयांवरची हजारो उत्तमोत्तम पुस्तकं आहेत. हाताशी भरपूर वेळ आणि गरमा गरम कडवट - कडक कॉफिचा वाफाळता कप आहे. मग उठुन सावकाश एक एक पुस्तक न्याहाळत पुढे सरकत एखादं सुंदरसं पुस्तक काढून निवांत वाचत बसलोय. सुऽऽख! अर्थात अजून तरी हे "स्वप्नच" आहे. भिंतभर कपाटहि नाहिये व तितकि पुस्तकही नाहियेत. पण खरच उत्तम पुस्तकं विकत घेणं हि माझ्यासाठी 'गुंतवणूकच' आहे. कधीतरी मॅजेस्टिक किंवा राजहंस प्रकाशनाच्या दुकानात चक्कर मारली, कि, हवी ती आणि हवी तितकि पुस्तकं घेण्यासाठी आपल्याकडे तेव्हढा तगडा बॅंक बॅलन्स सध्यातरी नसल्याचे अपरंपार दु:ख होते. खरंच, मागे एकदा माझ्या मावशीने म्हंटलं तसं पुस्तकांसाठी बॅंकेने कर्ज द्यायला सुरुवात केली पाहिजे, मी लग्गेच अर्ज करुन भरपूर कर्ज काढीन.
पहिल्या पावसानंतर मातीला जो बोलका घमघमाट सुटतो ना? तितकाच मला नव्याकोर्‍या पुस्तकाचा गंध आवडतो. नविन पुस्तक घरात आणलं कि पहिलं काम म्हणजे त्यावरती नाव, विकत घेतल्या दिवसाचा दिनांक टाकणे आणि त्याला प्लॅस्टिकचं कव्हर घालणं. उत्तमोत्तम पुस्तक वाचणं त्यांचा संग्रह करण्या इतकच त्यांना कव्हर्स घालणे हे सुध्दा माझं आवडिचं  काम आहे. म्हणजे आई आपल्या लहान मुलांना कपडे घालते ना? तितकच लडिवाळ काम आहे हे. आणि पुस्तक खराब होऊ नये म्हणून कव्हर घालणं जितकं महत्वाचं असतं ना? तितकच ते पारदर्शक असणं मला गरजेचं वाटतं, पुस्तकाला मुखपृष्ठ - मलपृष्ठ असतात त्यांची मांडणी हि देखिल एक सुंदर कला आहे. पुस्तकाला पारदर्शक कव्हर घातलं नाहि तर त्याची मांडणी करणार्‍या कलाकाराच्या कलेला हेटाळल्यागत - दुर्लक्षित केल्यागत होतं. अनेकदा मी दुसर्‍या कोणाची चांगली पुस्तकं वाचायला आणली असतील तर परत देताना त्याला कव्हर नसेल तर छान कव्हर घालून देतो [बघा... विचार करा,  कोण कोण उत्तम पुस्तकं वाचायला देताय मला? :-D ].

अर्धाधिक लोकं पुस्तक ज्याप्रकारे वापरतात ना? ते बघून डोकं फिरतं. मुख्यत: वाचून झालेली खूण म्हणून जी लोकं पुस्तकाचे कोपरे दुमडतात [काहि महामुर्ख लोकं चक्क "अर्ध" पान दुमडताना मी स्वत: बघितली आहेत .... मेंदूला कमी सुरकुत्या असण्याचे लक्षण आहे हे! x-( ]  ना? ती लोकं अत्यंत बेशिस्त वाटतात मला. मग भले इतर गोष्टित कितीहि हुशार व टापटिप असोत. मुक्या जनावरांना विनाकारण मारणारे आणि पुस्तकांचे कोपरे दुमडणारे एकाच रांगेतले आहेत माझ्यासाठी.  खरंतर २०० पानांपेक्षा जाड असलेल्या पुस्तकाला स्वत:चा बांधणीतल्या  दोरीचा बुकमार्क हवा अस  माझं वैयक्तिक मत आहे.  तरी पुस्तकं म्हंटली कि पुस्तकासाठी मग आपोआप बुकमार्क्स ओघाने आलेच. विकत घेतलेले, भेट म्हणून मिळालेले, घरीच बनवलेले असे बरेचसे बुकमार्क्स आहेत माझ्याकडे. स्टॅम्प जमविण्याबरोबरच बुकमार्क्स देखिल जमवतोय आजकाल.

आजी मला अजूनहि पुस्तकांचा  एक श्लोक नेहमी ऐकवते -

"जलात् रक्षेत्, तैलात रक्षेत्। रक्षेत शिथिलबंधनांत्।
मूर्ख हस्ते न दातव्यम्। एवं वदती पुस्तकम्।"

हा श्लोक ऐकतच मोठा झालो असेन किंवा घरातली इतर माणसे पुस्तके कशी वापरतात ते बघूनहि असेल, पण पुस्तकांना जपायला शिकलो. खरंतर कुठलेहि पुस्तक एका बाजूने दुमडले आणि वाचतोय हे मला आवडत नाहि, पण निदान १०० पानी पुस्तकांपर्यंत हे ठिकहि आहे त्याहुन जाड पुस्तक दुमडलं, किंवा त्याच्या मुखपृष्ठाची - मलपृष्ठाची ’भरतभेट’ घडवून आणली कि टाळकंच सरकतं माझं. डोळ्यांच्या काळजीसाठी  झोपुन वाचणे चूकच आहे, पण कधीतरी बाहेर छान पाउस पडत असतो हवेत मस्त  गारवा आला असतो अश्यावेळी उबदार पांघरूण घेऊन वाचत पडण्याचा स्वाभाविक मोह होतोही. कधीकधी अगदी शेवटची १०-१२ पानं उरली असतात डोळ्यांवर झोपहि असते पण पुस्तक सोडवत नसतं अश्यावेळि लोळत पुस्तक वाचलं जातं. तरीहि   २५०-३०० पानी पुस्तक असेल तर ते झोपून वाचणे टाळतोच. अश्याने त्याची शिलाई उसवते. ती खिळखिळी होतात आणि त्याची पाने ग्रीष्म ऋतुत झडल्यागत होऊन काहि दिवसांत पुस्तक "निष्पर्ण" होण्याची भीती असते.  मग उरलेल्या २ पुठ्यांनी हवा घेत बसावे लागते.

काहि लोकांना खात - खात वाचायची सवय असते. पुस्तक चांगलं असेल तर क्वचित मी सुध्दा ती चूक करतो, पण खाताना पुस्तक असलंच तर ते डाव्या गुडघ्याजवळ ठेवून वाचतो म्हणजे त्यावर काहि सांडायची भीती नसते. तसेच काहि पराकोटिच्या अभ्यासू लोकांना पुस्तकावरतीच "नोट्स" काढायची सवय असते. एकतर पुस्तकावर मला माझं किंवा कोणाचंहि नाव सोडून दुसरा ठिपकाहि आवडत नाहि आणि काहि विद्वान पेनाने चक्क त्या परीच्छेदाच्या वर - खाली आजूबाजूला गिचमिड गिचमिड करत काहितरी लिहुन ठेवतात किंवा फरा - फरा रेषा मारतात. विशेषत: वाचनालयातून आणलेल्या पुस्तकांवर हे अत्याचार हमखास झालेले दिसून येतील. दहावीला - बारावीला देखिल जिथे वर्गात पुस्तकावरती खूणा करुन ठेवा असं शिक्षक सांगत तिथेहि मी पेन्सीलने खूणा केल्या होत्या व खोटं वाटेल पण एक -दोन पुस्तकांवरच्या त्या खूणा परीक्षा झाल्यावरती मी इमाने - एतबारे रबराने खोडल्याचंहि मला आठवतय.

 पुस्तकाला - ग्रंथांना जवळच्या मित्रासारख प्रेमाने किंवा घरातल्या वृध्द माणसासारखं आदराने वागवलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. मुक्याने कितीतरी बोलत असतात ती आपल्याशी. लक्ष दिलं नाहीत तर बिचारी निमूट पडून रहातात. त्यांना वेळिच खायला घाला, एकदा तरी बाहेर फिरायला न्या अशी मुक्या पाळीव प्राण्यासाठी करावे लागते तसेही काही नसते. मात्र दोन - चार महिन्यातून एकदा धूळ झटकावी (आता पुस्तकं वापरात असतील तर ती देखिल बसत नाहि), वाळवी लागू नये म्हणून कपाटाच्या कोपर्‍यात चार डांबराच्या गोळ्या सरकवाव्यात इतपत केलं कि झालं. फार अपेक्षा नाहित.

मी काहि इतरांना ग्रंथपालाचा कोर्स करा असं म्हणत नाहिये, (त्यात पुस्तकांची काळजी कशी घ्यावी यावरच पुस्तकं असतात.) पण इतपत जपणूक केलीत तरी हेहि नसे थोडके. असो.... तर .... मी जेव्हा माझं नवीन घर बांधीन ना? तेव्हा एक मोठी भिंत भरुन कपाट तयार करुन घेईन आणि त्यात शेकडो विषयांवरच्या हजारो उत्तमोत्तम पुस्तकांचा संग्रह करीन.  मग एखाद्या दिवशी आराम खुर्चीतच "चचलो"  तरी पुलंच किंवा इतिहासाचं एखादं सुंदरसं पुस्तक माझ्या छातीवर  पालथं ठेवलेलं असेल. फक्त ते श्वासानी वर खाली होत नसेल इतकंच.

 
- सौरभ वैशंपायन