Saturday, December 25, 2010

"नाताळाचे" माथी हाणू काठी ?






काल रात्री सांता घरी आला होता ..... पोतड्यातुन गिफ्ट काढून देत होता .... म्हणालो असली फालतु गिफ्ट्स नकोत ...... महिनाभर पुरतील इतके कांदे, भेंडी आणि टॉमेटो दे!! ...... आयला, मागणी ऐकुन झिट येऊन पडला ..... त्याच्या अगडबंब देहाला शुध्दिवर आणायला घराततल्या ६ कांद्यांपैकि २ कांदे त्याच्या नाकाला लावावे लागले!!! दुसरं काहितरी माग म्हणाला - म्हणालो "बरं मग निदान राहुल गांधीला थोडि अक्कल दे!" ..... या मागणीमुळे परत त्याच्या नाकाल उरलेले ४ कांदे लावावे लागले. ..... सांता बहुदा रीटायर होतोय  ..... इतक्या महागाईत पिचलेल्या लोकांना "मेरी ख्रिसमस आणि "हॅप्पी" न्य़ू इयर!!!" कसं म्हणायचं? हे त्याला समजत नाहिये.

Thursday, December 23, 2010

गारवा

काल पूनवेचा चांद,
तुझ्या डोळ्यात वाचला,
अंगभर मोरापिसा परि,
गारवा नाचला. - १


थवा चांदण्यांचा तिथे,
दूर नभात साचला,
सूर तुझ्या मनातला,
माझ्या मनात पोचला - २

- सौरभ वैशंपायन.

Wednesday, December 8, 2010

दबंग

समाधी भोवतीची तटबंदि व प्रवेशद्वार.


इंदोरला जायचे नक्कि झाले तेव्हाच ठरवले होते कि काहिही करुन रावेरखेडि येथील थोरल्या बाजीरावांच्या समाधीचे दर्शन घेऊन यायचे.  सध्या वीज निर्मितीसाठी नर्मदेवर अजून एक धरण बांधणार आहेत, त्यामुळे नदि काठच्या मोठ्या प्रदेशा बरोबर ही समाधी देखिल पाण्याखाली जायची भीती आहे. समाधी पाण्याखाली जाण्याआधी एकदा दर्शन घ्यायचेच होते. कुठुनतरी सुरुवात करायची म्हणून गुगल मॅप वरुन रावेरखेडिला शोधले. इंदोरपासून साधारण ७५-७८ किमी वरती आहे इतपतच माहीती मिळाली. पुढे काही दिवसात Bajirao.org हि साईट मिळाली त्या साईट वरुन श्री श्रीपाद कुलकर्णी यांचा नंबर मिळाला. इंदोरला पोहचूनच त्यांच्याशी बोलायचे नक्कि केले.

इंदोर मधले पहीले ३ दिवस तर इंदोर, माहेश्वर फिरण्यात गेले. या मधल्या दिवसात श्री. श्रीपाद कुलकर्णी यांच्याशी फोनवर बोलणॆ झाले. त्यांनी तिथे जाण्याचे २ मार्ग सांगितले १) इंदोर – बडवाह – सनावत- बेडिया – रावेरखेडि किंवा २) सनावत मार्गे खरगोणला जाणारी बस मिळाल्यास ती थेट बेडियापर्यंत पोहोचवते. बेडियाला पोहचले कि रावेरखेडिपर्यंतचा रस्ता १२ किमीचा आहे. बेडियावरुन पुढे त्रास होऊ नये म्हणुन  त्यांनी तिथल्या २ जणांचे मोबाईल नंबर देखिल दिले. “बेडियाला पोहोचलात कि यांपैकि कोणालाही फोन करा पुढची व्यवस्था ते करतील!” असे सांगुन श्रीपादजींनी काम बरेच सोपे केले. त्यांनी दिलेल्या नंबर वरती फोन केले, तिथे चेतन रावशिंदे या मुला बरोबर बोलणे झाले. “अजी आप बस यहॉं आ जाईये, कुछ चिंता मत किजिये. समाधीके दर्शन करवाने का जिम्मा मेरा!” चेतनच्या आवाजातील उत्साह जाणवत होता.

दुसर्‍या दिवशी आत्या व आत्येबहिणींना सगळे रस्ते सगळे ऑप्शन दोन – दोन वेळा नीट विचारुन घेतले. इंदोरला भवरकुऑ इथुन या बसेस मिळतात ५० रुपयात सनावतपर्यंत सोडतात. या प्रायव्हेट असतात पण यात ढिगाने स्थानिक प्रायव्हेट गाडिवाले असल्याने त्यांच्यात बरीच चढाओढ असते, म्हणजे पुढल्या प्रवाश्यांना आधी आपल्या बस मध्ये घेण्याकरता ओव्हरटेकचे प्रकार भरपूर असतात. आणि एकंदरच संपूर्ण प्रवासात खरच सरकारी बसेस फारच कमी दिसल्या.

बस मध्ये बसलो, दहा मिनीटांनी खात्री करुन घ्यायला शेजारच्या माणासाला विचारले “ये बस सनावत तक जाती है ना?” त्याने मानेनीच होकार भरला. मग त्याला काय वाटले माहीत नाही त्याने विचारले “कहॉ जाना है आपको?” म्हणालो “जी, पहले बेडिया और बाद में वहॉ से रावेरखेडी।“ बेडियापर्यंत ठिक होतं रावेरखेडिचं नाव ऐकुन त्याला आश्चर्य वाटलं. “रावेरखेडि? वहॉ क्यो जाना है आपको? बहुत छोटा गॉव है। बस भी ८ किलोमीटर दूर से गुजर जाती है।“ तसं उत्तरलो “वहॉ बाजीराव पेशवा कि समाधी है! उसे देखने जा रहॉ हुं।“ हि माहीती त्यासाठी बहुदा नविन होती. तो शेजारच्या त्याच्या बरोबरच्या माणसाशी बोलु लागला. मग माझ्याकडे वळुन म्हणाला – “आप कहॉ से आये हो?” मुंबईवरुन आल्याचे सांगताच “अरे? वहॉ बैठके यहॉं पे समाधी है ये आपको कैसे पता चला?” असा प्रश्न त्याला पडला. “जी वो पढा था एक किताब में!” इतकच बोलुन मी परत हातातल्या पुस्तकात तोंड खुपसलं.

तसे रस्ते चांगले होते. मध्ये एक घाट देखिल लागला. आजूबाजूला दुरवर ४-५ डोंगर होते. मागच्या सीटवरती एक छोटि मुलगी आश्चर्याने ओरडली – “हाऽऽऽ मॉ वो देखो कितनाऽऽ बडाऽ पहाड है, ना?” सह्याद्रिची सगळ्या ऋतुतली रौद्र मात्र तितकिच लोभस रुपं बघितली असल्याने मला त्या पहाडात फारसं काही वाटलं नाहि, पण त्या मुलीचे वय आणि एकंदरच त्यांच्या आजूबाजूचा सपाट प्रदेश बघता तिला तो विशेष वाटला होता. पण त्या मुलीच्या त्या वाक्याने हातातल्या पुस्तकातुन लक्ष उडाले, डोक्यात सह्याद्रिचे विचार घोळु लागले. नेपोलियनच्या रशिया स्वारीत नेपोलियनला परास्त केले ते जनरल विंटरने. रशियातील हाडं गोठवणार्‍या थंडिने त्याचे लाखो सैनिक न लढताच नुसते काकडुन मेले होते. तीच अवस्था जनरल सह्याद्रिने मुघल – आइलशाही सैन्याची केली होती. शहाजीराजांनी स्वातंत्र्याचे ३ प्रयत्न केले ते सह्याद्रिच्याच जोरावर. म्हणुन तर तिसरा प्रयत्न फसल्यावर त्यांना बंगरुळात - महाराष्ट्रापासून व पर्यायाने सह्याद्रिपासून दूर ठेवले. पण शहाजीराजे पट्टिचे राजकारणी होते, त्यांनी बंगरुळात तर आपले बळ वाढवलेच पण आपल्या मुलाला मात्र सह्याद्रित वाढवायची दूरदृष्टि त्यांनी दाखवली. या एका निर्णयाने पुढचा इतिहासच बदलला.

त्याच इतिहासातील एका अद्वितीय योध्याची समाधी बघायला मी उत्सुक झालो होतो. आजूबाजूला बघताना सारखे वाटत होते कि  ऋषीमुनींप्रमाणे हजारो वर्ष ध्यानस्थ बसलेल्या या डोंगरांनी भीमाथडिच्या घोड्यांची बेगुमान उधळलेली हजारभरांची तुकडि व त्या तुकडिच्या सर्वात पुढे मुर्तीमंत पौरुष राऊंच्या रुपाने दौडत असताना नक्किच बघितलं असेल. केवळ “पेशवा पंडीत” म्हणताच  भारतभरातली उन्मत्त सिंहासनं डळमळायला लागायची, इतकि जरब राऊंकडे होती पर्यायाने मराठ्यांकडे होती. पानिपताचा इतिहास खर्‍या अर्थी चालू होतो १७०७ मध्ये, औरंगजेबाच्या मृत्युपासूनच. बाळाजी विश्वनाथांच्या रुपाने दिल्लीच्या राजकारणात मराठ्यांचा शिरकाव झाला होताच, पण मराठ्यांकडे दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी आली ती राऊंच्या काळात. श्रीमंत, पेशवा, राऊ, पंडित, शामतपन्हा अशी बिरुदं ते उगीच मिरवत नसत.

साधारण पाऊणे दोन तासांनी बस एके ठिकाणी थांबली तसा कंडक्टर किंवा जो पैसे गोळा करत होता तो सनावत सनावत म्हणुन कोकलू लागला, विचारांची तंद्रिं  भंगली तसा मी चटकन खाली उतरलो. तो एका ६ सीटर रिक्षाकडे बोट दाखवुन म्हणाला – “इसमें बैठ जाओ, यह आपको सनावत छोडेगी, पैसा मत देना, अपनीही है।“ माझ्या बरोबरची माणसे देखिल त्याच रिक्षा मध्ये होती आणि बरोबर कुटुंब होते. सगळि रिक्षा त्या कुटुंबाने भरली लहान मुले असल्याने ६ सीटर मध्ये आम्हि एकुण ९ जण कोंबलो गेलो, फारसा त्रास जाणवला नाही आता तो खरच झाला नाही कि ट्रेकिंगच्या सवयीमुळे अश्या कोंबाकोंबीची सवय झालीये हे समजलं नाही. थोडक्यात बस बडवाह इथे थांबली होती व नेहमीच्या बांधल्या गेलेल्या एका रिक्षावाल्याला त्यांनी आमचे बोचके सनावतला टाकायची जबाबदारी दिली होती हे लक्षात आले. आता बडवाहवरुन सनावतकडे प्रवास सुरु झाला. अर्धातास प्रवास करुन रीक्षा सनावतला थांबली. तिथे चौकशी करुन आता बेडियासाठी गाडि घ्यायची होती.

सगळिकडे प्रायव्हेट बसेसचीच चलती होती. इथे एका मिनी बसमध्ये बसायला जागा मिळाली १३ रुपयात त्याने बेडियाला सोडले. सनावत बेडिया अंतर १७ किमी आहे. सकाळि साधारण पाउणे अकराला इंदोरवरुन निघालो होतो घड्याळात बघितले तर एक चाळिस होत होते. साधारण तीन तास लागले होते. श्रीपादजींनी दिलेल्या नंबरवरती फोन करत होतो पण फोनच लागत नव्हता. म्हणुन परत श्रीपादजींना फोन लावला तसा त्यांनी मला डॉ सोनींच्या दवाखान्याचा पत्ता दिला व म्हणाले तिथे कोणालाही विचारा, छोटे गाव आहे. कोणीही सांगेल. तिथे पोहोचलात कि चेतनसाठी विचारा. अर्थात पुढल्या दहा मिनीटात या प्रकारेच माझी तिथे चेतनशी भेट झाली. कॉफि झाल्यावर आम्ही बाईकवरुन रावेरखेडिकडे निघालो.

चेतन रावशिंदे, साधारण २७-२८ वर्षांचा मुलगा. जवळच एका शाळेत इतिहास विषय शिकवतो. स्वत: अभाविपचा कार्यकर्ता आहे. मी मुंबईवरुन असा चौकशी करत इथे आलो हे बघुन त्यालाच जास्त आनंद झाला होता. असं कोणी सहसा येत नाही, २७-२८ एप्रिलला पुण्यतीथीच्या २ दिवसांत अगदि मुंबई – पुण्यापासून माणसांचा ओघ असतो पण समाधीला अजुन प्रकाशात आणायची गरज आहे, वगैरे सांगत होता. रावेरखेडि कडे जाणार्‍या रस्त्यातला पहीला मुख्य रोडचा ४ किमीचा पट्टा संपला आणि उजवीकडचा कच्चा रस्ता सुरु झाल्यावर मग समाधीकडे का कोणी येत नाही हे समजले. समाधीपर्यंतचा पुढचा साधारण ६-७ किमीचा रस्ता खराब म्हणजे इतका खराब होता कि बाईकच्या गचक्यांनी कंबरेला त्रास होऊ लागला. सगळा कच्चा रस्ता, त्यातुन नोव्हेंबर मध्ये बराच पाऊस झाल्याने अजुन खड्डे पडले होते. एकदा तर पडता पडता वाचलो. सगळ्या प्रवासात प्रचंड धुळ उडत होती बहुदा २०० ग्रॅम माती पचवली असावी.
रस्त्याच्या दोन्हि बाजुंना शेते होती. चेतन सांगत होता कि इथे कापूस, गहू आणि मीरची होते. भारतातील क्रमांक दोनचे मीरची उत्पादन बडवाह जिल्ह्यामध्ये होते.  सध्या गहु लावणे सुरु झाले आहे. उन्हाळ्यापर्यंत गहूच पिकवला जाईल मग मधले दोन महीने सगळिकडे सामसूम असते. तरी नर्मदामैय्याचे पाणी आहे म्हणून इथे शेती छान पिकते. या संभाषणा दरम्यान अखेर गाडि गचके खात रावेर गावात पोहोचली. साधारण १०० उंबर्‍यांचे गाव असावे. उजवीकडच्या टेकडिवर एक मंदिर दिसत होते. तर डावीकडे एक भग्न तरी मोठे प्रवेशद्वार होते.गाडि तिथुन अजुन २०० मीटर पुढे आली आणि ज्याकरता हा प्रवास केला होता त्या समाधीचे प्रवेशद्वार समोर दिसत होते.

भोवतालचे गेट उघडुन आत गेलो. उजव्या हाताला थोर पिंपळ होता. त्या खाली हनुमान ठाण मांडुन बसला होता. अजुन २-३ शेंदुर लावलेले देव होते. पिंपळापलीकडे तीव्र उतार होता व उताराच्या शेवटि नर्मदेचे संथ आणि उथळ पात्र वाहत होते. समाधीच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलुप होते. सेकंदभर बिचकायला झाले. इतक्यात चेतन म्हणाला – “ये रखवालदार भी कहॉ गया?” असं म्हणत परत माघारी चालत गेटपाशी गेला. एक दोन हाकात तो राखणदार कुठुन तो आला. कुलुप उघडले तसे देवळाच्या किंवा त्याहीपेक्षा रायगड – राजगडाच्या महाद्वाराच्या चिरेबंदि उंबरठ्याला भक्तीने स्पर्ष करतो तितक्याच भक्तीने त्या उंबरठ्याला वाकुन हात लावुन मग उंबरठा ओलांडला. उजव्या हाताला शिवपिंडि च्या आकाराशी साम्य असलेली दगडि समाधी होती. तिच्या मधोमध एक खोल कोनडा होता. चेतन चपला काढुन वर गेला आणि त्या कोनड्यात डोकं घालुन जोरात “जय होऽऽ पेशवा बाजीराऽव, …. छत्रपती शिवाजी महाराज कीऽऽऽ“  असं म्हणाला, आपसूक माझ्याहि तोंडुन “जऽय” बाहेर पडलचं. बुट उतरवुन मागोमाग मी समाधीच्या पायर्‍या चढुन वर गेलो. आत संगमरवरी शिवपिंडि होती. त्या शिवपिंडि खालीच राऊंच्या अस्थिरक्षेला ठेवलं आहे असं मानतात. नासिरजंगला रणांगणात यथेच्छ पिटुन काढल्यानंतर मुंगीपैठण इथे मराठे व निजाम यांच्यात तह झाला. तिथुन राऊ मुक्कामासाठी रावेरखेडिला आले. व एप्रिल महिन्याच्या रखरखित उन्हाने घात केला. उष्माघाताने त्यांना ताप चढला व अल्प आजारात त्यांचे निधन झाले. त्यांच्या आठवणीत ग्वाल्हेरच्या शिंदे स्वारींनी ही समाधी बांधली.

समाधीपुढे डोके टेकवुन दोन क्षण नतमस्तक झालो. अचाट साहसे करणारा योध्दा इथे कायमचा निजला होता. नजर वळेल तिथे लगबगीने मुजरे झडावेत व भारतभर ज्यांचे सत्कार सोहळे घडावेत असा दरारा असलेल्या पराक्रमी योध्याच्या समाधीवर येणारी बिलामत बघुन मन बेचैन झालं. सरकार काहीच करत नाहीये असं नाहि, पाणी चढणार तिथुन खाली एक जुजबी उतरती संरक्षक भिंत बांधली आहे. पण त्याने फारसा फरक पडणार नाही, पाणी किमान तीनफुट वरती येणार. सरकारी पातळीवर हळु हळु जाग येते आहे, काही राजकिय वजन असलेले नेते आपापल्या परीने प्रयत्न करत आहे पण त्याला पुरेसा वेग नाहीये. जर एखादि मजबुत संरक्षक भिंत बांधली तर समाधीला वाचवता येऊ शकेल. दुसरा पर्याय असा असू शकतो कि समाधी अजुन थोडि वरती हलवावी किंवा तिसरा पर्याय – ही समाधी आहे तशीच राहु द्यावी, पण नविन समाधी लोकांना सहज दर्शन घेता येईल व इतिहासाला उजाळा मिळेल अशी बांधावी.

समाधीच्या आजुबाजुचे फोटो घेत होतो. समाधी भोवतीच्या तटबंदिवरती जायला २ जीने आहेत. वरती फिरत आमच्यात बर्‍याच गोष्टि चालल्या होत्या. नर्मदेच्या पात्राकडे बोट दाखवुन चेतन म्हणाला उन्हाळ्यात केवळ गुडघाभर पाणी उरतं. नर्मदेच्या उगमापासून ते गुजरातपर्यंत केवळ १-२ अशी ठिकाणं आहेत जिथे नर्मदा इतक्या सहज ओलांडली जाऊ शकते. त्यापैकि रावेर हे गाव. उत्तर – दक्षिण प्रवास/व्यापार/स्वार्‍या करणार्‍यांना इथे नर्मदा सहज ओलांडता येत असे. म्हणूनच बाजीरावांच्या आज्ञेवारुन इथे चुंगीनाका उभारला. चुंगीनाका म्हणजे कर गोळा करण्याचे ठिकाण. नदिचे असे उतार हातात असणं सामरिक व आर्थिक दृष्ट्या सहाजिक महत्वाचं होतं.
समाधीच्या आधी जे पडकं पण मोठं प्रवेशद्वार  होतं तो हाच चुंगी नाका. पावसाळ्यात पाणी बरच येत असेल ना? या प्रश्नावर त्याने समोरच्या क्षितीजावर झाडांची दाट रांग होती, त्याकडे बोट दाखवत म्हणाला – खरंतर  ती झाडं म्हणजे नर्मदेचा समोरचा किनारा. सध्या पाणी उतरुन मध्ये मध्ये वाळूची बेटं तयार झाली आहेत. उजवीकडे दूर त्या मंदिराचा ठिपका दिसतोय? पस्तीस चाळिस वर्षांपूर्वी महापुर आला होता तर त्या मंदिरात पाणी शिरलं होतं. आणि त्यावेळि या समाधीमध्येही पाणी घुसलं होतं म्हणतात.


पुन्हा आमच्या इतर गप्पा सुरु झाल्या, माझ्या टि-शर्ट वरची शिवछत्रपतींची राजमुद्रा त्याला दाखवत म्हणालो – “यह शिवाजी महाराज कि राजमुद्रा है।“ व ती वाचून त्याला त्याचा अर्थ सांगितला. “मुद्रा भद्राय राजते।“ याचा अर्थ ऐकुन  म्हणाला – “आजकल के नेता तो यह मुद्रा पढने के भी लायक नही है शायद।“ खाली उतरता उतरता त्याला विचारले “आप रावशिंदे, मतलब मराठी।“ तसा हसला व म्हणाला - “जी वैसे तो सिर्फ सरनेम मराठी बाकि है, होलकर – शिंदे के साथ कभी दादा – परदादा आये थे …. बस बाद में यही के हो गये। मेरे दादाजी भी इस्कूल टिचर थे, पासही के गॉवमें पढाते थे। कुछ मराठी के शब्द पता है लेकिन सब समझमें नहीं आती, यहां पुणेसे आये लोगोंके साथ श्रीपादजी मराठी में बोलतें है तो थोडि बहुत मराठी सुनने मिलती है, वरना यहॉ कि प्रमुख भाषा निमाडि है।“

पुन्हा समाधीला नमस्कार करुन बुट चढवले. आणि परतीची सुरुवात केली. मध्ये चुंगीनाक्यापाशी थांबलो. या गेटला देखिल कुलुप होते. पुरातत्व खात्याचे बोर्ड लागले होते हे बघुन जरा बरे वाटले जेणेकरुन त्यावर पुढे अधिक्रमण होणार नाही अशी अपेक्षा नक्कि बाळगता येईल. एकेकाळि लाखो रुपयांचा कर गोळा केलेली वास्तू अशी पडिक झालेली बघुन पुन्हा इतिहासाविषयी अनास्था असलेल्या
.
समाजाची किव वाटली. मागे वळलो तर समोरच्या टेकडि वरचे मंदिर दाखवत चेतन म्हणाला – “वह मंदिर राऊजी गुजर जाने के बाद उनकि याद में काशीबाईसाहेब ने बनवाया था।“
आमचा परतीचा प्रवास जरा सुसह्य वाटला. यावेळि चेतनने कि थोडा वेगळा रस्ता घेतला होता बहुदा. कारण पहिल्यापेक्षा खड्डे किंचित कमी होते. चेतन भरभरुन बोलत होता. सरकारवरती अखंड तोंडसुख घेत होता. – “इस जगह अगर किसी बादशहा का गुंबद होता तो सरकार खुद उसपर पैसा खर्च करती, मेले लगतें यहॉ पर। इस देश में शिवाजी राजा, राणा प्रताप या पेशवा पंडित होना शायद गुनाह है। भूल जाते है लोग …. अकबर महान कहलवाता है, कुतुबशहा और औरंगजेबकी कब्रपे लोग फुलोंकि चादर चढवाते है, और यहॉ एक फुल रखने कोई आता नहीं …. हमारी तरफसे इस समाधी को प्रकाश में लाने के लिये और बचाने केलिये कोशिश कर तो रहें है। लेकिन लोगों का साथ चाहिये …. बोलना तो चाहता नही लेकिन पेशवा बाजीराव ने जिनको बडा सरदार बनवाया उनके वंशज आज अपने नाम अंग्रेजो जैसे रखतें है, सालभर परदेश में होते है, वे भूल गये अपने पुर्खोंको। इंदौर यहॉ से सिर्फ ७५ किमी दूर है लेकिन शायद पिछले कई सालों मे होलकर परीवारसे इस समाधी के दर्शन के लिये कोई भी नही आया होगा।“ त्याच्या आत काय जळत होतं ते सगळं माझ्यापर्यंत पोहोचत होतं.

परत बेडियाला आल्यावर त्याने त्याच्या घरी नेले. “आपके भोजनका प्रबंध हो चूका है। हाथ धो लिजिये, थोडा फ्रेश हो जाईए।“ दहा मिनीटातच गरम जेवण आले. त्याला बरोबर जेवायला बसण्याचा आग्रह करताच म्हणाला – “आप आनेसे दस मिनट पहले ही खाना हो चूका था, बिना संकोच के आप शुरु किजिये.” जेवताना घरातल्यांबद्दल माहिती सांगत होता. एक भाऊ CA करतो आहे. चेतन अजुन पुढे शिकायचं म्हणतोय शिवाय अजून चांगली नोकरी शोधतोय. मुंबईला येणं होतं का या प्रश्नावर हसला “जी एक बार बच गये, वापस कब आना होगा पता नही।“ माझ्या चेहर्‍यावरचे प्रश्न चिन्ह बघुन म्हणाला  वो “रेल भर्ती के एक्झाम मे महाराष्ट्राके बाहरवालें लोगोंको पीटा था ना? उसी परीक्षा के लिये आया था. मामा के साथ दुसरेही दिन भाग आया।“ आयला हे ऐकुन हातातला घासच थांबला. मग जरा सावरुन म्हणालो “यह देखो मुंबई मे जो मेहनत करेगा वो कमायेगा …. कुछ राजनिती खेलनेवाले ये चीजे करतें है, राज ठाकरें के बारें मे कहोगे तो उनका कहना पोलटिकल थ्रेट के बारें मे था। तुमने कभी बंगाली या गुजरातींयो को मुंबईमें पीटते हुए सुना है? नही ना? क्योकि वो लोग पॉलिटिक्समे ज्यादा गडबड नही करते। और महाराष्ट्रा मे ही क्यो? किसी भी प्रांतके स्थानिय लोगोंको नौकरी एवं शिक्षा में उस राज्यमें पहला चान्स मिलना चाहिये।“ त्यालाही ते पटलं.

जेवण झाल्यावर त्याला  विचारलं “चेतनजी, पेट्रोलका कितना खर्चा हुआ प्लीज बताइये!” तसा माझा हात खाली दाबत – “आप मेहमान है, भुल जाईये!” त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला कि बाबा दुसर्‍या कुठल्या पर्यायाने हे केलं असतं तर खर्च करावाच लागला असता मग तुला का देऊ नये? पण ऐकेच ना. “अगर ३-४ लोग होते और बडि गाडी करनी पडती तो जरुर ले लेता, लेकिन आप इतनी दुर से समाधी के दर्शन के लिये आये बहुत अच्छा लगा, पैसे देने कि जिद से अच्छा है के हो सके तो अप्रैल में पुण्यतीथी के दिन जरुर आने कि कोशिश किजिए! बडा समारोह होता है।“

त्याला व डॉ सोनींना भेटुन मी परत सनावतचा रस्ता धरला. एक इच्छा पूर्ण झाली होती, पण २८ एप्रिलला परत रावेरखेडिला यावं या नव्या इच्छेला मनात रुजवुन ती गेली होती. सुर्य कलतीकडे झुकला होता माझा प्रवास इंदोरच्या दिशेने सुरु झाला होता, का ते माहित नाही पण थोरल्या बाजीरावांच्या विषयी विचार करताना मनात सारखं दबंगचं टायटल सॉग आपसूक वाजत होतं –

दबंग!

“मन बलवान, लागे चट्टान, रहे मैदान में आगे ….
जो जुंझार हो तैय्यार, वहि सरदारसा लागे ….
धार को काटे रे, चीर धरे सन्नाटे रे, जब वीर भरे हुंकारे ….. दबंग दबंग दबंग

जब बात आन पे आवे रे
वो बाण करज पे खावे रे
जो सब के प्राण बचावे रे ….  है वो ही दबंग

वो शूरवीर कहलावे रे
सर काल बने मंडरावे रे
 दुष्मन को मार गिरावे रे …. है वो ही दबंग

धार को काटे रे, चीर धरे सन्नाटे रे, जब वीर भरे हुंकारे ….. दबंग दबंग दबंग.


 - सौरभ वैशंपायन.

Sunday, October 24, 2010

दुर्दम्य


http://www.foreignpolicy.com/articles/2009/12/30/afghanistan_2009_a_year_in_photos?page=0,43


काल अगाणिस्तानविषयी थोडे सर्फिंग करत असताना या लिंक वरती पोचलो आणि पुढला जवळपास पाउणतास वेड्यासारखे यातले फोटो बघत होतो. २००९ साली अफगाणिस्तानात वेगवेगळ्या फोटोग्राफर्सनी काढलेले फोटो आहेत. ४९ फोटोतुन अफगाणिस्तानचा वर्षभराचा प्रवास यात दाखवला आहे. प्रत्येक फोटोमध्ये एक गोष्ट आहे.

वरच्या फोटोपाशी आलो आणि अफगाणिस्तानातील सत्य परीस्थिती समजली. इतकं खरं चित्र क्वचित बघायला मिळतं. अफगाणिस्तानाच्या राजकिय, भौगिलिक, लष्करी इतिहासाविषयी आजवर खूप काही लिहीले गेले आहे. पण अफगाणिस्तानमधील सामान्य माणसांविषयी किती लिहीले आहे हा प्रश्न उरतोच. लिहीले असले तरी ते काल्पनिक, कादंबरी स्वरुपात लिहीले आहे. शौझिया, परवाना ही काही प्रातिनिधिक उदाहरणे देताही येतील. पण ते शब्दचित्र, जिवंत चित्र नव्हे. दुर्बल राष्ट्र बलाढ्य देशांची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समरांगणे कशी बनतात? ह्याचा नियतीने घालुन दिलेला पाठ म्हणजे अफगाणिस्तान. कुसुमाग्रज म्हणाले होते - "धर्माचा ध्वज जेव्हा अडाण्यांच्या हाती जातो, तेव्हा त्या ध्वजावरुन गळणारे रक्त त्याच धर्माचे असते!" आधी रशिया, मग तालिबान आणि आता अमेरीका ..... गेली चाळिस वर्ष अफगाणिस्तानात पाऊस पडतो तो बॉम्बचा, पिक येतं ते सुरुंगांचं आणि अफूचं, आणि हवा वाहते ती रासायनिक धूराची. हे कधी संपणार ह्याचं उत्तर अजूनही दृष्टिपथात नाहीये. म्हणून याचं तात्पुरतं उत्तर इथल्या माणसांनी शोधलय - आहे तो क्षण आनंदात जगा.

कब्रस्तानात उभं राहुन पतंग उडवण्याची "मजा" घेणे हा केवळ नाईलाज नाहीये, परीस्थितीने शिकवलेला धडा आहे. गेली चार दशकं संपूर्ण देशच कब्रस्तान बनला असताना माणूस आनंदि कसा राहू शकतो? या प्रश्नाचं उत्तर "जावे त्याच्या वंशा" याच शब्दात द्यावं लागेल. कदाचित हरवण्यासारखं काही उरलच नसल्याने याहुन वाईट काही असूच शकत नाही, जे काही वाईट व्हायचय ते होऊन गेलय या भावनेतुन कदाचित आजची अफगाणी माणसे जगत असतील. आनंद ही मानसिक अवस्था आहे. आणि एखाद्याने आनंदी रहायच ठरवलंच तर तो कुठेही आनंदी राहु शकतो ह्याचं हे चित्र आहे.

अफगाणच्या रखखित मातीतून आज अफू तरारुन उभा रहातो आहे, उद्या रसरशीत नाजूक फुलं देखिल उमलतील या दुर्दम्य आशेवर जगणार्‍या सामान्य अफगाणी माणसाला सलाम!

- सौरभ वैशंपायन.

Tuesday, September 21, 2010

बुध्द !



जगलो काल पावतो, जणू अनिरुध्द मी,
जोर ना चाले कुणाचा, ना कुणाशी बध्द मी.
बांधिल मी माझ्या मनाला, अंतरातील युध्द मी,
संगराच्या मध्यभागी, शांत निजला बुध्द मी ॥१॥



वज्र अस्थिपंजराचे, दान देण्या सिध्द मी
तोडती लचके गिधाडे, ना तरीहि क्रुध्द मी,
सोहळे ना सोवळ्याचे, निष्कलंक शुध्द मी,
संगराच्या मध्यभागी, शांत निजला बुध्द मी ॥२॥

- सौरभ वैशंपायन.

Wednesday, September 1, 2010

ए मुहोब्बत तेरी अंजाम पे रोना आया.....




ए मुहोब्बत तेरी अंजाम पे रोना आया


बेगम अख्तरांचा आवाज म्हणजे एखाद्या धारदार कट्यारी सारखा होता. त्यांची फारशी गाणी मी ऐकली नाहियेत पण जी काहि बोटावर मोजण्याइतकि ऐकली त्यातले "ए मुहोब्बत तेरी अंजाम पे रोना आया..." हे मला सर्वात आवडलेले गाणे आहे.

बेगम अख्तरांचा एक किस्सा मध्ये मला श्री अंबरीश मिश्र यांच्या "शुभ्र काही जीवघेणे" या अप्रतिम पुस्तकात वाचायला मिळाला होता. बहुदा लाहो्रच्या एका मैफिलीत त्यांनी २-३ बंदिशी सादर केल्या. मग एका बंदिशीला त्यांनी एक तान घेतली त्यांच्या गळ्यातुन तो वरचा स्वर इतका जबरदस्त आला कि त्यांनी तिथल्या तिथे गाणे थांबवले व म्हणाल्या - "सुभान अल्लाह क्या चीज है!" आणि मग पुढे त्या गायल्याच नाहित.

कलाकाराला आयुष्याच्या कुठल्या वळणावर कलेचा खरा परीसस्पर्श होईल कोणी सांगु शकत नाहि. बर्‍याचदा तो स्पर्श आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातहि होतो. बहुदा त्याक्षणी बेगम अख्तरांना तो झाला होता. त्याक्षणी त्यांना तो स्वर दिसला होता, त्यांनी त्या स्वराला स्पर्श केला होता.

- सौरभ वैशंपायन.

Tuesday, August 3, 2010

सलाम !

मध्ये काही दिवसांपूर्वी एका अजाण पामराने "कशाला ट्रेकला जायचं? घरात स्वस्थ बसायचं सोडुन नस्ती पायपीट!" अशी मुक्ताफळं उधळली, या क्षुल्लक जीवांना आजकाल दुर्लक्षीत करायला शिकलोय मी. पण आत कुठेतरी अस्वस्थता उरतेच त्यांना गदागदा हलवुन सांगावसं वाटतं - खरच एकदा ट्रेकिंगचा अनुभव घ्या. आपण आपल्या व्यापांत इतके अडकलो असतो कि हे अनुभव सोडा त्याबद्दल आपण विचारच करत नाही. किंवा केला तरि "आपल्याला बुआ झेपणारं नाहि" असाच करतो. मला आठवतय माझ्या आयुष्यात मी "शिवशंभो युवा हा्यकर्ससोबत" पहिल्यांदा रॉकक्लायबिंगच्या एका दिवसाच्या कॅम्पला गेलो होतो. कदाचित पाचवीत असेन. अनेक वर्ष न वापरलेली दगडाची खाण होती कर्जतमधली. माझ्याहुनही २ वर्षांने लहान असलेला सुमित नावाचा एक मुलगा सर्वात पहिल्यांदा त्या ५५ - ६० फुटि पॅचला भिडला होता. कारण तो इतका लहान असुन त्याच्या भावाबरोबर हे सगळं करत असे. लोकांची भीती जावी म्हणुन सुमितलाच पाठवायचे ठरले असावे. साधारण २५-२७ फुट गेला असेल नसेल थोडं उजव्या बाजुला होण्यासाठी त्याने वर कमांड दिली - "बिलेऽऽ लुऽजऽ" साधारण अश्यावेळी फुटभर बिले लुज करुन वर येणार्‍याला जरा सुटा करतात. वरच्याकडुन काय चूक झाली ते माहित नाही पण ३०-४० फुटाचा बिले सर्रकन त्याकडुन सटकला आणि कोणाला काही कळायच्या आधी सुमित तिथुन दाण्णकन खालच्या दगडांवर येउन आदळला. मग धावाधाव झाली मिनिटभर सुमितला धड श्वासही घेता येत नव्हता. सगळे हादरले होते खास करुन माझ्यासारखे नवखे होते ते तर लटलट करायला लागले. "च्यायला? असं असेल तर आपण इथुनच मागे!" हा विचार आला पण पुढे त्याच्याच मोठ्या भावाने, अमितदादाने ते करुन दाखवलं.

अखेर लटपटत का होईना मी ती वेळ मारुन नेली. नंतर अमितदादाने विचारलं "कसं वाटलं?" म्हणालो - "वार्षिक परिक्षा झाल्यागत वाटतय!" पण मग भीडच चेपली त्याचं वेड लागलं. त्या हर्नेस, डिसेंडर्स, कॅराबिनर्स विशिष्ट प्रकारच्या आणि विशिष्ट कारणांसाठीच वापरल्या जाणार्‍या गाठी, बिले प्लेट हे सगळं आवडायला लागलं. रोपची गुंडाळी करुन काळजीपूर्वक ठेवणे, तंबु उभारणे, कोणाला अपघात झाल्यावर वेळेचं गांभिर्य समजुन जबाबदारी घेऊन धावपळ करण्यात वेगळीच नशा वाटायला लागली. घरी खाण्यातले माज दाखवणारा मी भुक लागल्यावर ३ टॉमेटो पोटात ढकलुन गपगुमान झोपायला शिकलो. ग्रुपमधल्या लहान मुलांची किंवा बरोबरच्या स्त्रीयांची काळजी घेणं वेळप्रसंगी आपल्याला त्रास घेऊन त्यांना रिलॅक्स करणं शिकलो.

नाही म्हणता म्हणता ८०० फुटांच्या ड्युक्सनोजचं रॅपलिंग केलं. त्या कॅंपला खुऽऽऽऽऽऽप शिकायला मिळालं. सगळ्यांची जेवणं झाल्यावर ५ मोठी पातेली घासुन हात कसे भरुन येतात तेही समजलं. त्या कॅंपमध्ये सिनिअर्सनी खरोखर आमचं रॅगिंग करावं तसं काम करुन घेतलं तेव्हा रागही आला पण ती माणसं त्यातुनच गेली होती...... इतरवेळी विकासकाका किंवा अमितदादा, संतोषदादा हे सुध्दा मागेपुढे न बघता हिच कामं करताना आधी व नंतर आम्हि बघितली होती. इथे कोणी राजा नसतो सगळे सारखे असतात. तुम्हि जितकी जबाबदारी घ्याल व ती पार पाडाल तितका अनुभव व आदर दोन्ही मिळतात आणि शपथेवर सांगतोय दैनंदिन जगात ह्याचा कुठेना कुठे फायदा होतोच.

ट्रेकिंगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेकडो स्वभावांची माणसं तुमच्या आयुष्यात येतात. सुरुवतीला विक्षिप्त किंवा डोक्यात जाणारी माणसं प्रत्यक्षात प्रचंड हुशार व मदत करणारी असतात तर सुरुवातीला प्रेमळ वाटणारी माणसं काम समोर आलं की कटकट करताना मी बघितली आहेत. अश्यावेळी ती वेळ कशी सांभाळायची "human resource Management" कसं करायचं कोण कुठलं काम चांगलं करतो किंवा करु शकेल? लोकांवर वेळप्रसंगी जरब कशी ठेवायची किंवा कुठल्या प्रसंगाने ताण निर्माण झाला तर तो कसा कमी करायचा हे सगळं सगळं तुम्हांला शिकता येतं.

ह्या गोष्टि कुठल्याही मॅनेजमेंट स्कुल मध्ये कदाचित हज्जारो रुपये देऊनही मिळणार नाहीत त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यात आयुष्य आहे. या ट्रेक्स मध्ये अनेक जणांशी चांगली नाती जुळली. रात्री २ वाजता देखिल "SOS" चा मेसेज केल्यावर लगोलग दारात उभी राहुन पडेल ते काम करणारे जीवलग भेटले. ग्रुप मधल्या ग्रुप मध्ये अनेकांच्या आयुष्याचे साथीदार गवसले. आज त्यांची मुलं काका - मामा म्हणत "हे काय? हे असंच का? हे तसंच का? इथे आता वाघोबा येनाल?? शिवाजी महालाज इतुन आले होते??? हायला? त्यांना माझ्यासालखं लागलं नाहि तेव्हा?" असे भाबडे प्रश्न अंगावर घेताना आपण सुध्दा कधीतरी इथेच होतो आणि आपल्याजागी अमितदादा - संतोषदादा होता हे समजतं. कधी कधी उरं भरुन येतं.

पूर्ण फिरलेलं ते सुंदर चक्र बघताना समोरचा हिरवाकंच डोंगर फिकट होत जातो...... पण तो डोळ्यातल्या पाण्यामुळे कि धुक्यामुळे हे बर्‍याचदा समजत नाही.

आणि हे इतकं सगळं भरभरुन देणार्‍या भटकंतीला मी "सलाम" करण्याखेरीज काहीच करु शकत नाही! .... फार फार तर अजुन दोन पावलं त्या ठिकाणी आणून उभी करु शकतो जिथुन मी चालायला सुरुवात केली होती.

- सौरभ वैशंपायन.

Monday, August 2, 2010

पाऊस फुल्ल!

रात्री बेरात्री जोरदार पाऊस सुरु होतो, त्याच्याच आवाजाने जाग येते. मग कोसळणार्‍या सरींचा आवाज बराचवेळ झोपु देत नाही. अश्यावेळि कुशी बदलत बराच वेळ निघुन जातो ..... बाहेर पावसाचा जोर कमी होतो मग झाडावरुन, छतावरुन एकाच जागी टपटपणार्‍या थेंबांचा एका ठराविक लयीतला आवाज तेव्हढा ऐकु येत रहातो .... कुणा रुणझुण रुणझुण चालणार्‍या नाजुक पावलांगत... मग परत पेंग येऊ लागलेलीच असताना अचानक दोन - चार शब्द सुचतात, परत झोप उडते पुढचे शब्द शोधायला मन दहा दिशांना पळतं .... बर्‍याच वेळाने कदाचित चारच ओळि तयार होतात पण त्यातही मजा वाटते. चटकन बाजुचा मोबाईल उचलायचा आणि ड्राफ्ट्स मध्ये त्या चार ओळि रोमन मराठित टाईप करायच्या. पण अश्या ओळि मग हरवुन जाऊ नयेत म्हणून त्या अश्या एकत्र करायचा प्रयत्न .... उडणार्‍या कागदांवरील पेपरवेट सारखा. यापुढे २ महीने सुचतील तश्या पावसावरच्या ओळी इथे देत जाईन. हळुहळु पावसाळ्यावरिल ओळिंची मैफिल जमेल आणि मोसमातील शेवटची सर बरसून गेल्यावर "पाऊसफुल्ल" चा बोर्ड लागेल .... पुढल्या पावसाळ्यापर्यंत!

- सौरभ वैशंपायन.

=================

पाऊस तिथे बाहेर,
पाऊस माझ्या अंगणात,
चिंब ओली तू,
उभी माझ्या मनात.

=================

गुढ गाऽऽर धुके,
डोंगरावर ढगांची झुल,
हातात तुझा नाजूक हात,
त्यात अशी ही रानभूल !

=================

बाहेर रीमझीम पाऊस,
आत मोहरलेली गात्र,
जळणारा अत्तरदिवा,
सुगंधु लागलेली रात्र.

=================

हेवा वाटतो थेंबांचा,
सुदैव त्यांच्या भाली,
नभातुन निसटलेले,
उतरले तुझ्या गाली.

=================

Friday, July 30, 2010

म्हणूनच एकदा .....

नाही आवडत मला .....
मी तुझ्या समोर असताना, तू त्याची वाट पहाणं,
त्याच्या येण्याकडे तुझे डोळे लागले असतात,
सगळं लक्ष खिडकितुन बाहेर.... त्याच्याकडे,
तो ही आधी मग तुला बराच झुलवतो,
आणि एका क्षणी अचानक येऊन उभा ठाकतो,

नाही आवडत मला .....
तो आलेला पाहिला कि तुझं धावत बाहेर जाणं,
मग तो सुध्दा तुला फार आवेगानी मिठीत घेतो,
नाही आवडत मला चारचौघात तुझ्या शरीराशी त्यानं असं झोंबलेलं,
तुला मात्र कसलीच तमा नसते,
त्याला पाहीलस कि तुला तुझं भानच रहात नाहि.

मग तु मनमोकळं हसायला सुरवात करतेस.
अश्यावेळि मला त्याचा राग येतो हे त्याला माहीती आहे,
त्याने त्याला अजुनच चेव येतो,
मला वाकुल्या दाखवत तो तुला अलगद कवेत घेतो.

म्हणूनच.... म्हणूनच एकदा,
त्याच्याच समोर तु मला किती आवडतेस हे सांगायचय एकदा,
म्हणूनच तू सोबत असताना "त्याच्या" येण्याची वाट मी बघिन,
म्हणूनच तू सोबत असताना "पाऊस" येण्याची वाट मी बघिन !!!

- सौरभ वैशंपायन.

Friday, July 9, 2010

पावसाळा

ऋतु पावसाळा, अशी सांजवेळ,
वीजांचा-सरींचा हा चालेल खेळ,
तुला आठवुनि अशी चिंब ओली,
बरसल्या सरींची कशी ओळ झाली.

Saturday, March 20, 2010

सप्तपदि

"तीची" कविता लिहिण्याचा प्रयत्न आहे.

___



स्तब्ध – लुब्ध दिन रात, थेंब थेंब पावसात,
चाहूल नव्या इंद्रधनुची, चिंब खुळ्या आकाशात – १


तू हि नवा मी हि नवी, अर्थ नवेला स्पर्शात,
तुझ्या आठवणींचा सडा, रोज राती अंगणात – २


मऊ सागराचा काठ, माझी सप्तपदि त्यात,
लाटा अंतरीच्या माझ्या, उमटल्या अथांगात – ३

-सौरभ वैशंपायन.

Wednesday, February 24, 2010

किमयागार


सचिनने कसोटित सलग चौथे शतक झळकवल्यावर मागच्या पोस्ट मध्ये मी म्हणालो होतो कि "सचिनद्वेष्ट्यांनी सचिनच्या नावाने बोटे मोडणे थांबवा कारण सचिन सगळ्याच्या पलीकडे गेलाय! उगीच तुमचे ब्लडप्रेशर वाढवुन घेऊ नका. सचिन इतकं क्रिकेट खेळलाय इतकं क्रिकेट खेळलाय कि उद्या एखाद्या सामन्यात लंच नंतर नॉन स्ट्रायकर एंड ला उभं राहुन दात कोरत कोरत एखाद - दुसरी ढेकर दिली तर तीहि त्याच्या रेकॉर्डवर येईल!" सचिन ते इतकं मनावर घेईलसं वाटलं नव्हतं. आज सचिन जे काहि खेळलाय ते आधी कोणी पाहिलं नव्हतं नंतर कोणी पाहिल याची शक्यता जवळपास नाहिये. आमच्या पिढीचं भाग्य आहे कि आम्हि सचिनला "लाईव्ह" खेळताना पाहतोय! दुपारि मॅच सुरु झाली तेव्हाच बाबांना म्हणालो - "तेंडल्या आज सेंच्युरी करणार!" आणि झालेहि तसेच, फरक फक्त इतकाच होता कि ती डबल सेंच्युरि होती. हा दुपटिचा फरक सुखावणारा होता.

"तो आला... त्याने पाहिले... त्याने जिंकले!" याहुन कमी किंवा जास्त सचिनच्या आजच्या द्विशतकि खेळीचे वर्णन करता येणेच शक्य नाहिये. आजवर सचिनला ज्यांनी खेळताना बघितले असेल.... सचिनच्या प्रत्येक फटक्यावर ज्यांचा जीव वरखाली होतो त्यांना माझे म्हणणे पटेल - "सचिनने सईद अन्वरचा १९४* चा रेकॉर्ड मोडल्याच्या आनंदाचा भर ओसरल्यावर २०० होईतो श्वास अडकल्यागत झाले होते. आतुन सचिन २००....सचिन २००" इतकच ऐकु येत होतं." युसुफ पठाण व धोनी सुध्दा आज पिसाळल्यागत खेळत होते, शेवटच्या दिड ओव्हर मध्ये धोनीने अशक्य फटकेबाजी चालू केली पण आज कोणालाहि धोनीच्या सिक्स बघायच्या नव्हत्या आज त्याने ६ बॉल मध्ये ६ सिक्स मारल्या असत्या तरि त्याचे कौतुक नव्हते. आज पाहिजे होते फक्त तेंडल्याचे द्विशतक. गेली अनेक वर्ष तमाम सचिनप्रेमींची एकच खंत होती अजुन.... या बादशहाच्या खजिन्यात ODI मधले द्विशतक नाहिये. आज सचिन द्विशतक करु शकला नसता तर लाखो अतृप्त आत्म्यांच्या पिंडाला कावळा शिवला नसता. आज साऊथ आफ्रिकन खेळाडुंना वेड लागायचं बाकि होतं, सेहवाग आऊट झाल्यावर भारताची पडझड होणार असं वाटत असतानाच सचिन मधला "सच्चिन" जागा झाला व त्याने कार्तिक, पठाण आणि धोनी बरोबर साऊथ आफ्रिकेला पार झोपवले. त्सुनामी किंवा चक्रिवादळानंतर एखाद्या प्रदेशाची जी हालत होते तीच अवस्था आफ्रिकन संघाची झाली आहे, भारत सरकारने त्या बद्दल त्यांना तात्काळ नुकसान भरपाई दिली तरि कोणीहि विरोध करणार नाहि. शिवाय सगळ्यांनी BCCI ला जाहिर आवाहन केले पाहिजे कि साऊथ आफ्रिकन खेळाडुंना विमनस्क आणि बधीर अवस्थेतुन बाहेर काढायला जगातले उत्तमोत्तम मानसोपचार तज्ञ त्यांनी बोलावुन घ्यावेत. कारण आत्ता त्यांची चाचपडणारी बॅटिंग बघताना जाणवतय कि ते आजच "शिमगा" साजरा करणार. इच्छा हिच आहे कि त्यांना १५० मध्ये गुंडाळुन आपण सचिनला मोठ्ठि भेट दली पाहिजे.



क्रिकेट हा भारतीयांचा धर्म आहे आणि सचिन हा देव! सचिन पीचवर असतो तेव्हा त्याच्या प्रत्येक फटक्यावर १०० करोड हृदये आंदोलने घेत असतात. तो नव्व्याणव वर असताना तेहतीस कोटि देव पाण्यात ठेवलेले असतात, लाखो ओंजळी त्याच्याकरता "दुआ" मागत असतात. त्याचे प्रत्येक शतक - बॉम्बस्फोटाने जखमी झालेल्या, महागाईने पिचलेल्या, भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या आमच्या मनावर तात्पुरती का होईना फुंकर घालते. आणि त्याबदल्यात आम्हि त्याला फक्त "थॅंक्स" देऊ शकतो.

सचिन आता शतकांच्या शतकापासून केवळ ६ शतके दूर आहे. आणि आता तो दिवसहि दूर नाहिये हे गेल्या महिना भरातील त्याच्या खेळावरुन दिसतय. आता माझ्यासारख्या अजुन काहि अतृप्त आत्म्यांची एकच इच्छा आहे - २०११ चा वर्ल्डकप सचिनच्यासकट भारताने जिंकावा.

- सौरभ वैशंपायन.

Tuesday, February 23, 2010

चांदणे

कपाळी चांदव्याची कोर,
डोळि शिंपिले चांदणे,
चांदण्याचे डोळे भोर,
कसे वागावे शहाणे? - १


नाहि फिकिर जगाची,
धुंदित आपुल्या रहाणे,
अजुन किती दिन असे
नशिबी दुरुन पहाणे? - २

- सौरभ वैशंपायन.

Thursday, February 18, 2010

उट्टं !



१८ फेब्रुवारी २०१०, दक्षिण आफ्रिकेच्या बलाढ्य संघाला एक डाव आणि ५८ धावांनी नमवुन भारत कसोटि क्रिकेटमध्ये क्रमांक एकवर कायम राहिला. खरतर मागच्याच नागपुर कसोटित एका डावाचा पराभव पदरात पडल्यावर भारतीय संघाच्या मनोधैर्यावर परिणाम हॊणे स्वाभाविक होते. पण त्या सामन्यात "व्हेरी व्हेरी स्पेशल" लक्ष्मण आणि "द वॉल" राहुल द्रविड हे दोघेहि नव्हते. त्यामुळे पत्याच्या बंगल्यागत सगळे ढासळले होते. पण यावेळि लक्ष्मण संघात आला आणि नुरच बदलला. इडन गार्डन आणि लक्ष्मण हा फॉर्म्युलाच विनिंग फॉर्म्युला आहे. अर्थात त्याने निराशा केली नाहि. [:-)]

एकुण सामन्यात ७ शतके झळकली. इडन गार्डन फलंदाजांसाठी नंदनवनच ठरले. सेहवाग, सचिन, धोनी आणि लक्ष्मणने नेत्रदिपक खेळ केला. तर दक्षिण आफ्रिकेकडुन पीटरसनने एक तर हाशिम अमलाने दोन्हि डावांत शतके झळकावली. काहिहि म्हणा अमलाच्या हमल्यापुढे भारतीय गोलंदाज हतबल झाले होते विशेषत: जहिर जखमी झाल्यावर सगळा भर फिरकि गोलंदाजांवर पड्ला, हरभजनने ५ विकेट्स घेत तो सार्थहि ठरवला पण दक्षिण आफ्रिकेच्या शेपटाला हाताशी धरुन नाबद राहिलेल्या अमलाने भारताचा विजय बराच लांबवला. भारतीय संघात ऑस्ट्रेलिया प्रमाणे "killing instinct" नाहिये हे परत सिध्द झाले. सामना जिंकला हा भाग वेगळा, पण २०११ च्या विश्वचषकाचा विचार करुन भारतीय संघात आक्रामकता वाढिस लागणे गरजेचे आहे.

या सामन्यातील जमेची बाजु म्हणजे धोनीची सरस कॅप्टनशीप, जहिर - हरभजनची भेदक गोलंदाजी. भारताची चार शतके आणि द्रविडची न जाणवलेली कमतरता जी नागपुरला प्रकर्षाने जाणवली होती. सचिनबाबत म्या पामर काय बोलणार? सचिन महान आहे. सलग चार सामन्यात चार शतके?? आता सचिन द्वेष्ट्यांना एक गोष्ट सांगु इच्छितो - "सचिनच्या नावाने बोटे मोडणे थांबवा कारण सचिन सगळ्याच्या पलीकडे गेलाय! उगीच तुमचे ब्लडप्रेशर वाढवुन घेऊ नका. सचिन इतकं क्रिकेट खेळलाय इतकं क्रिकेट खेळलाय कि उद्या एखाद्या सामन्यात लंच नंतर नॉन स्ट्रायकर एंड ला उभं राहुन दात कोरत कोरत एखाद - दुसरी ढेकर दिली तर तीहि त्याच्या रेकॉर्डवर येईल!"

असो, इतका किबोर्ड बडवण्याचा उद्देश एकच - "मागच्या सामन्याचं उट्ट भारताने अखेर काढलच!"


- सौरभ वैशंपायन.

Friday, February 5, 2010

सावधान ... वणवा पेट घेत आहे.

इतिहासाची नव्या संदर्भांसकट पुनरावृत्ती होते हे ऐकले होते काहि मोजक्या घटनांत दिसले सुध्दा होते आज परत तेच दिसते आहे. हे वर्ष संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचे सुवर्ण मोहोत्सवी वर्ष आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरु होती तेव्हा "मुंबई - बेळगाव कारवार सहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" अशी घोषणा होती. अर्थात नेहरुंचा पर्यायाने कॉंग्रेसचा "मुंबई" महाराष्ट्राला द्यायला खुला विरोध होता. तगडे राजकारणी आणि मुजोर "धनानंद" महाराष्ट्राविरोधात उभे राहिले होते. महाराष्ट्राचा हा स्वभाव आहे कि तुम्हि जितका विरोध कराल जितके दडपाल तितका तो उसळतो. "केला जरी पोत बळेची खाले। ज्वाळा तरी ती वरती उफाळे॥" हिच महाराष्ट्राची आंगिक प्रवृत्ती आहे. दुर्दैवाने काहि अंशी सर्व ठिकाणी दिसतो तसा टोकाचा लाळघोटेपणा देखिल आहे - त्यावेळि यशवंतराव चव्हाण यांनी जाहिर विधान केले - "मला संयुक्त महाराष्ट्र आणि नेहरु यांच्यात निवड करायला सांगितली तर मी नेहरुंची निवड करीन, नेहरु हे महाराष्ट्रापेक्षा मोठे आहेत!" आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तोच लाळघोटे पणा नेहरुंच्या पतवंडासाठी करत आहेत. "राहुल-सोनियांसाठी कॉंग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन शिवसेना - मनसे चा समाचार घेतील!" हे त्यांचे कालचे बोल आहेत. पण चालायचेच हा लाळघोटेपणा केला नाहि तर बुडाखालची खुर्ची डुगडुगते हे सगळ्या कॉंग्रेसी जनांना माहित आहे.


आज राहुल गांधी मुंबई दौ‍र्‍यासाठी येत आहे. बाळासाहेबांनी त्याला काळे झेंडे दाखवायला सांगितले आहे. जर शिवसैनिक काळे झेंडे घेउन राहुलसमोर गेले तर कायदा सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह उभे राहिलच पण मुख्यमंत्री आणि सरकारची दिल्लीतील कॉंग्रेसच्या वर्तुळात नाचक्कि होईल. हे टाळायला ते शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांना अटक करत सुटले आहेत मगाशी अटक केलेल्यांची संख्या २३० सांगितली आहे. आता मजा येणार आहे, कारण जर तरीहि कोणी हरीचा लाल शेकडो शिवसैनिकांसकट काळे झेंडे फडकावत राहुलसमोर गेलाच तर नक्किच हमरीतुमरी होऊन वातावरण गरम होईल आणि मग पोलिसांचा लाठिचार्ज फार स्वाभाविक आहे ...... मग शिवसेना - मनसे, सरकार आणि अशोक चव्हाणांवर "महाराष्ट्रद्वेषी राहुलसाठी मराठी माणासावरच निंदाजनक हल्ले करतात, बघा बघा आणि हेच महाराष्ट्रावर राज्य करणार!" अशी बोंब मारायला मोकळे.


पण राडा झाला तर सामान्य माणूसच भरडला जाणार आहे.

सावधान ...... वणवा पेट घेत आहे.



- सौरभ वैशंपायन.

Thursday, January 28, 2010

बकुळ

खुणा पावलांच्या तुझ्या,
गेल्या जळाने भरुन,
भरलेल्या खुणांतुन,
आले नभ उतरुन - १


गंध शरीराचा तुझा,
आला नवा बहरुन
बहरल्या गंधातुन,
आला बकुळ फुलुन - २

- सौरभ वैशंपायन.