Thursday, December 7, 2017

मुक्ती

फ्रान्झ लिस्त्झ या प्रसिद्ध पियानो वादकाचे छान उद्गार आहेत - "sorrowful & great is the artist's destiny!" म्हणजे "दुःखी आणि महान असणं हेच कलाकाराचे प्राक्तन असते". जगातल्या बहुतेक सर्व मोठ्या कलाकृती या दुःखातून तयार झालेल्या आहेत अथवा त्यांचा विषय शोकांतिका हाच आहे. पण तरीही एखाद्या कलाकृतीचा जन्म कसा होतो हे कुणीच सांगू शकत नाही. मग ती लहान असो वा महान असो. कलाकृती म्हणजे गणित नाही की दरवेळी २+२=४ हेच उत्तर येईल. उलट प्रत्येक कलाकृती ही दरवेळी वेगळी असते, नवीन असते. मग तो गायलेला सूर असू दे अथवा एखादे चित्र. जसं वाहत्या पाण्यात उभं राहिल्यावर परत त्याच पाण्याला स्पर्श करता येत येत नाही तसेच तो कलाकार "तीच" कलाकृती परत कधीच निर्माण करू शकत नाही. रियाझाने, सरावाने तो कदाचित "तशीच" कलाकृती  बनवू शकेल पण "तीच" नाही. कुठलीही कलाकृती एकदाच जन्म घेते सूर असो, शब्द असो किंवा चित्र असो. एखाद्या चित्रातला ब्रशचा अमुक एखादा फटकारा किंवा रेष फारच सुरेख आली आहे असं म्हणता येत नाही. चित्र हे पूर्ण  बघावे लागते. सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे समोर उभे राहिलेले चित्र असते. 

माझ्या ओळखीची लोकं अनेकदा मला विचारतात हे सगळं लिहायला तुला कसं सुचतं? पण माझ्याकडे याचं उत्तर नसतं आणि माझ्या माहितीप्रमाणे जगात काही अनुत्तरीत प्रश्न आहेत त्यापैकी हा एक प्रश्न. मुळात ती कला कलाकार निर्माण करतो कि कुठल्यातरी एका अनाम क्षणी एखादी अनाम शक्ती ती कलाकृती घडवून आणते? हा देखील शतकानुशतके वादाचा मुद्दा राहिला आहे. अनेकदा वर्षानुवर्षे अथक काम केल्यावर देखील जे मनात आहे ते कलेच्या रूपाने प्रकट होत नाही. तेच कधीतरी एखाद्या क्षणी नकळत घडून जातं. महिनोनमहिने आसपास देखील न फिरकणारे शब्द अचानक वादळ आल्यागत चहूबाजूंनी वेढतात. किती लिहू आणि किती नको असं होऊन जातं. अनेकदा आपण हे का लिहितोय हेच माहीत नसतं. फार आतून आतून वेडीवाकडी वळणं घेत धुराच्या वलयांसारखं तरंगत आलेलं काहीतरी कागदावर उतरवायची घाई झालेली असते. लिहून झाल्यावर ते आपण स्वतः तरी परत कधी वाचणार आहोत का हे देखील माहीत नसतं. त्याक्षणी फक्त लिहायची अनिवार इच्छा असते. काहींच्या नशिबी जिवंत असताना त्या कलाकृतीचं कौतुक किंवा यश पाहणं देखील नसतं. जगात अशा अनेक महान कलाकृती होऊन गेल्या आहेत. त्या महान कलाकृतींमधील शब्द देखील "अजरामर" बनतात, एखाद्या वज्रलेपासारखे. शतकानुशतके लोकं ते शब्द पुनः  पुनः उच्चारात राहातात. त्याक्षणी तो कलाकार आणि ती कला पुन्हा जिवंत होते - नवी होते.

सुरांचं मात्र तसं नसतं सूर निराकार असतात, ते दाखवता येत नाहीत ते फक्त अनुभवता येतात. सूर हा अनुभवाचा भाग झाला. सुरावरती बोट ठेवून "हा" सूर सुरेख झाला असं नाही सांगता येत. काही महान लोकांकडे सूर बघण्याची देखील ताकद असते, गाता गाता जो सूर लावलाय तो समोर साकार होऊन उभा राहिलेला असतो पण तो सूर ते दुसऱ्यांना नाही दाखवू शकत कारण सूर बघण्याची ती शक्ती इतरांत नसते, एक विचित्र तगमग होते, अशावेळी स्वतःच "सुभान अल्लाह!! क्या सूर है?" म्हणून संजीवन समाधी घेतल्यागत ऐन रंगात आलेली मैफिल थांबवून त्या कलाकाराच्या मनात त्याच्या एकट्याची मैफल सुरु होते. तो खरा मुक्तीचा क्षण असतो.

असा मुक्तीचा क्षण कधी ना कधी येतोच. त्यावेळी अंगातला "मी" पणाचा अंगरखा किनाऱ्यावर सोडून त्या क्षणात डुबकी मारता यायला हवी! बस!

  - सौरभ वैशंपायन

Sunday, July 16, 2017

इतिहासाचे मुडदे

आजकाल आपल्या संपूर्ण समाजाचीच मानसिकता इतकी खालावली आहे की प्रत्येक बाबतीत जात आणि धर्म हमखास बघितले जातात, मग ती गोष्टी चांगली असो वा वाईट. यात लोकशाहीचा तथाकथित स्तंभ देखिल मागे नाही. "दलित महीलेवर बलात्कार!", "दलित तरुणाची हत्या!" या जातीय भाषेत ठळक बातम्या देणारे तितकेच जबाबदार आहेत. त्या गुन्ह्यामागचे कारण स्पष्ट होण्याआधी बळी गेलेल्या दुर्दैवी जीवांना जात चिकटवली की अनेक सामाजिक आणि राजकिय गोष्टी साध्य होतात. या सगळ्यातून तयार झालेल्या समाजाचे फार काही वेगळे नाही. चित्रपटातील काल्पनिक पात्रांच्या जाती वरुनही भांडायचे लोकांनी बाकी ठेवलेले नाही तिथे खरच घडून गेलेल्या इतिहासाबाबत विचारायलाच नको. हा लेख लिहायला घेतला त्याचे कारण इतिहास नक्की काय आहे ह्याचे यथार्थ ज्ञान नसणे, संदर्भ न घेताच लिहून मोकळे होणे हे प्रकार आजकाल वाढले आहेत.  १६ जुलै २०१७ च्या  "लोकसत्तामध्येच" श्री पद्माकर कांबळे यांचा "’विजयस्तंभा’मागील इतिहास" हा इतिहासाचा अपलाप करणारा लेख छापून आलेला आहे. अर्धवट माहीतीच्या आधारे एखादा लेख लिहील्यास तो कसा फसू शकतो ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा लेख होय. त्या लेखाचा ससंदर्भ आणि तार्किक समाचार नक्कीच घेतला जाईल मात्र त्या लेखाच्या मागची प्रेरणा म्हणजे लोकसत्ता मधील दिनांक ९ जुलै २०१७ रोजी मधु कांबळे यांनी दिलेली "पेशवाईच्या पराभवाचा सरकारी जल्लोष" ही बातमी आहे.आधी थोडक्यात त्याची झाडाझडती घ्यावी लागेल.

मुळात भीमा - कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ रोजी ज्याला भीमा कोरेगावची लढाई म्हणतात आणि ५०० महारांनी २५ हजार पेशव्यांना हरवले वगैरे सांगितले जाते ती कशी झाली ह्याबाबत संदर्भ न वाचल्याने न घडलेला इतिहास सांगितला जातो. त्यातून पेशव्यांवर वाट्टेल ते आरोप केले तरी कुणाला फारशी पडलेली नसते हे लक्षात घेता पेशवे हे सोपे लक्ष झाले आहेत. पण समकालिन संदर्भ वेगळंच सांगतात. दुसर्‍या बाजीरावांना पकडायला दिड महिन्याहून अधिक काळ ब्रिटिश जंगजंग पछाडत होते पण त्यांना बाजीराव दृष्टिसही पडले नाहीत. गंमत म्हणजे पुण्यातून बाजीराव निघाले ते ४०० मैलांचा मोठा गोल फिरुन पुन्हा पुण्याकडेच आले. बाजीराव चाकण भागात आले आहेत ही बातमी मिळताच इंग्रजांची पाचावरती धारण बसली. ब्रिटिश कागदपत्रे आणि मराठी कागदपत्रे विशेषत: त्र्यंबकजी डेंगळेंची पत्रे वाचली की कोरेगावच्या लढाईत मराठ्यांच्या अंदाजे तीन हजार सैनिकांनी (ज्यात मुख्यत: अरब सैनिक होते) ब्रिटिशांची कशी ससेहोलपट केली हे स्वच्छ दिसतं.

ब्रिटिश आणि मराठी कागदपत्रे वाचल्यावर समोर चित्र ऊभं रहातं ते असं - ब्रिगेडिअर जनरल स्मिथला चकवा देऊन बाजीराव चाकणपर्यंत आल्याची बातमी कर्नल बरला मिळाली. बाजीराव परत पुण्यात शिरले तर कठीण होईल हे कर्नल बर ने ओळखलं. ब्रिगेडिअर जनरल स्मिथ कुठे आहे ह्याबाबत मात्र त्याला कल्पना नव्हती. मात्र बाजीरावांना पुण्याच्या बाहेरच थांबवावे ह्या हेतूने त्याने शिरुर येथून स्थानिक पायदळाची पलटण बोलावली. या बॉम्बे नेटिव्ह इन्फन्ट्रीपैकी दुसरी बटालियन, दोन तोफा आणि अडिचशे घोडेस्वार घेऊन ३१ डिसेंबरच्या रात्री कॅप्टन स्टॉटन निघाला. रात्रभर चाल करुन दमलेल्या अवस्थेत सकाळी दहा वाजता तो कोरेगांव जवळील एका टेकडीवर पोहोचला. त्याला वरुन अंदाजे २० हजार घोडदळ आणि ८ हजार पायदळ अशी सेना घेऊन सज्ज असलेले मराठे दिसले. रात्रभर चालून ब्रिटि्शांचे सैनिक दमले होते, लढाईला तोंड लागले तेव्हा उन्ह चढायला सुरुवात झाली, नदिवरती मराठ्यांचे नियंत्रण असल्याने पाणी देखिल मिळेना. अखेर त्याने  त्याच्या ८३४ लोकांसकट कोरेगांवच्या तटबंदित आश्रय घ्यायचा ठरवले, गावात शिरताना मराठ्यांनी देखिल त्याला बघितले आणि नदि पार करुन ते तीन बाजूंनी ब्रिटिशांवरती चालून गेले. ह्या मराठी सैन्याची संख्या साधारण अडीच -तीन हजार होती ज्यात मुख्यत: अरबांच्या कवायती फौजा होत्या. बाकी सैन्य नदिच्या पार अगदी आरामात तळ देऊन राहीले. यावेळी छावणीमध्ये खुद्द सातारकर छत्रपती होते. छत्रपती आणि पेशवे नदि पलिकडच्या टेकडीवरुन ही लढाई बघत होते. छत्रपतींनी भर उन्हात सुद्धा अब्दागीर घेतली नव्हती कारण इंग्रजांनी त्या दिशेने तोफ चालवायची शक्यता होती. मराठ्यांचा हा हल्ला इतका जबरदस्त होता की ब्रिटिश सेनेला सावरायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे सुरुवातीचा गोळीबार वगळता ही लढाई मुख्यत: तलवारींनी झाली. इंग्रजांच्या २ तोफांपैकी १ तोफ मराठ्यांनी बंद पाडली, तोफेच्या आजूबाजूचे २४ लोक ठार केले. त्या तोफेवरचा ब्रिटिश अधिकारी चिशील्म हा ठार झाला, त्याचे डोके कापून ते मराठ्यांच्या छावणीत पाठवले. लेफ्टनंट पॅटिन्सन हा सहा फूट सात इंचाचा राक्षसी ताकदिचा अधिकारी मराठ्यांच्या गोळीने जबर जखमी झाला मात्र मराठे प्रबळ होत आहेत हे बघून त्याने सोबत  काही माणसे घेऊन पुन्हा हल्ला केला आणि ती तोफ पुन्हा मिळवली. मात्र त्याला दुसरी गोळी लागून तो ठार झाला.नंतर त्याचे बिनमुंडक्याचे धड ब्रिटिशांना मिळाले. असिस्टंट सर्जन वुइंगेट, लेफ्टनंट स्वानस्टन आणि लेफ्टनंट कोनेलन देखिल जबर जखमी झाले नाईलाजाने ब्रिटिशांनी कोरेगावच्या आतल्या भागात २ धर्मशाळांमध्ये आश्रय घेतला. पैकी संध्याकाळी मराठ्यांनी देवळा जवळची एक धर्मशाळा जिंकून घेतली. तिथे काही जखमी ब्रिटिश अधिकारी होते त्यापैकी वुइंगेटला मराठ्यांनी ठार केले. इतर अधिकारी मारले गेले असते मात्र लेफ्टनंट जोन्स आणि असिस्टंट सर्जन विलीने जीवावर उदार होऊन धर्मशाळेत घुसलेल्या मराठ्यांवरती हल्ला केला व त्या अधिकार्‍यांना वाचवले. . कोरेगावांत एक गढी देखिल होती इंग्रजांचे तिथे लक्ष नाही हे बघून मराठ्यांनी ती गढी ताब्यात घेऊन तिथला शेवटचा भक्कम आधार हिसकावून घेतला. रात्रीपर्यंत ह्या चकमकी कोरेगावात होत राहील्या. मराठ्यांनी देखिल २ तोफा आणल्या होत्या दिवसभर त्यांचा मारा सुरु होता. रात्री नऊ वाजता अचानक हा तोफांचा भडीमार थांबवला गेला आणि मराठे निघून गेले. ब्रिटिशांचे तब्बल अडिचशे लोक मारले गेले. त्यात तोफखान्यावरील २० इंग्रजांपैकी ११ जण ठार झाले. "गॅझेटिअर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सीनुसार" ब्रिटिशांचे २७५ लोक मारले गेले अथवा जबर जखमी झाले तर मराठ्यांचे ५००-  ६०० लोक मारले गेले ज्यात मुख्यत: आधी चालून गेलेल्या अरबांचा भरणा होता.



मराठ्यांनी ब्रिटिशांची इतकी ससेहोलपट केली मात्र रात्री ९ च्या आसपास तोफा बंद करुन निघून का गेले हे एक कोडे आहे असे डॉ. आंबेडकरांनीही आपल्या एका लेखात नमूद केले आहे. इंग्रजांनी पेशवा घाबरून पळाला अशी फुशारकी मारली, पण दक्षिणेचा मार्ग मोकळा होण्यासाठी मराठ्यांनी इंग्रजांना दिवसभर कोरेगावात अडकवले होते. गोखल्यांच्या कैफियतीत बाजीराव पेशवे बापू गोखल्यांना म्हणतात, “आज लढाई करून मार्ग काढावा”. ‘ही आज्ञा घेऊन समस्त सरदार मंडली सहवर्तमान पलटणावर चालोन घेतले’ असं स्पष्ट नमूद आहे. मराठे निघून गेल्यावर दिवसभर तहानेने हैराण झालेल्या ब्रिटिशांच्या उरलेल्या सैन्याने पाणी पिण्यासाठी नदिकडे धाव घेतली. मधल्या काळात ब्रिगेडिअर जनरल स्मिथच्या सैन्याला ओझरच्या घाटात डेंगळ्यांच्या रामोशी लोकांच्या पथकाने लहान लहान हल्ले करुन हैराण केले. ब्रिटिश सैन्याचा विजय झाला असता तर ब्रिटिश त्याच दिवशी बाजीरावांच्या मागावर निघाले असते निदान बाजीरावांना अडथळा आणण्यासाठी पुण्याच्या दिशेने गेला असता मात्र कॅप्टन स्टॉटन दुसर्‍या दिवशी रात्री उशीरा पुण्याकडे न जाता पुन्हा शिरुर कडे गेला. इतके असूनही ब्रिटिश धडधडीत खोटं लिहीतात की आम्ही जिंकलो. आणि केवळ पेशव्यांचा पराभव झाला या लोणकढी थापेवरती अनेकजण आनंदित होतात. हा कोणी एका जातीचा विजय किंवा पराभव म्हणून घेत असेल तर देव त्याचे भले करो. हा सरळ सरळ ब्रिटिश आणि स्थानिक सत्ता म्हणजे मराठे यांच्यातला बखेडा होता. त्यातून सातारकर छत्रपती छावणीत असल्याने तर सरळ सरळ हा छत्रपतींचा विजय किंवा पराभव ठरतो. भारताचे दुर्दैवच हे आहे की स्थानिक लोकं परदेशी आक्रमकांना मदत करतात मग तो सिकंदराला मदत करणारा राजा अंभी असो, पनिपतावरती अब्दालीला मदत करणारा शुजा असो, प्लासीच्या लढाईत मीर जाफर असो किंवा १८५७ मध्ये ब्रिटिशांना मदत करणारे शिख असोत. अंतर्गत धार्मिक - जातीय - सामाजिक संघर्षात आपण आपापसातच लढून अर्धमेले होतो आणि आक्रामक आपला जम बसवतात. कोरेगावची लढाई ही माझ्या दृष्टिने अशीच एक लढाई. आणि गंमत म्हणजे मराठ्यांनी ही लढाई जिंकून सुद्धा विजयस्तंभ उभारला ब्रिटिशांनी. आणि मराठी सत्ता ही केवळ पेशवाई होती आणि त्यातून पेशवे म्हणजे समस्त ब्राह्मण समाज असे मनात धरुन ब्रिटिशांचा विजय हाच आपला विजय समजण्यात मोठी चूक होते आहे हे वरती ससंदर्भ नमूद केले आहेच.


आपल्या लेखात श्री पद्माकर कांबळे यांनी अजून दोन अत्यंत विनोदी आरोप केले आहेत पहीला आरोप -  "कान्होजी आंग्रेचे आरमार दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांच्या मदतीने समुद्रात बुडविले होते." इतिहासाचा अभ्यास नसल्याचा सर्वात मोठा पुरावा. ही आंग्रें संबधित घटना फेब्रुवारी १७५६मध्येच नानासाहेब पेशव्यांच्या काळात घडून गेली होती म्हणजे पद्माकर कांबळेंचा तब्बल ६२ वर्षांचा हिशोब चूकला आहे. दुसरा विनोदी आरोप "पेशव्यांच्या काळात महारांना प्रवेश बंदी केली गेली. त्यांना पेशव्यांच्या सैन्यात प्रवेश मिळेना. अशा वेळी काही महार तरुण ब्रिटिशांच्या ‘बॉम्बे नेटिव्ह इन्फन्ट्री’मध्ये दाखल झाले." यावर मी अगोदरच ९ जून २०१६ रोजी एक अख्खा लेख लिहीलेला आहे तो "या इथे" सविस्तर वाचता येईल. मात्र एक झलक म्हणून ३ परिच्छेद इथे देतो-

"जमिनीची पहाणी करुन सरकारने आकारलेल्या करातून महारांना दरशेकडा रुपये ५ ची सुट दिल्याची नोंद तसेच मौजे कळंबी प्रांत मिरज येथील एका गाववरतीच जप्ती आणली पुढे चौकशी अंती तो गाव राजनाक वल्लद काळनाक महाराकडे पूर्वीपासून असून तो हुजुर चाकरी करतो हे समजतच गावचा मोकासा व महसूल त्याकडे परत केला आणि गाव जप्तीतून मोकळी केली (थो. मा. रो. भा १ पृष्ठ ३१० नोंद क्रमांक ३४०). पाली गावच्या भोयी महारास सरकारचा अधिकारी म्हणून कुलकर्णी, खोतपाटीलांसारखाच गावठाण माफ केल्याचे नानासाहेबाच्या रोजनीशीतील उल्लेखात कळते (रो भा पृ २०३). पंढरपुरात राडिचा खेळ होत ती जागा खणून तयार करायचा मान महारांचा असे. एका वर्षी बडवे तो खणू लागताच तंटा ऊभा राहीला व सवाई माधवराव रोजनीशी भाग ३ पृष्ठ २८५ नुसार निकाल महारांच्या बाजूने देऊन बडव्यांना सख्त ताकिद केली. १७८९ मध्ये कात्रज गावानजिक महार, चांभार व मांग समाजाची वस्ती होती ती. काही कारणाने मोडावी लागली. लगोलग हुजुरातीतून २५१ रुपये आणि ३०० वासे नवीन घरे बांधण्यासाठी दिल्याचे सवाई माधवराव रोजनिशी ३-२८६ नुसार स्पष्ट होते."

"हुजुरपागेत बिगार म्हणूनही काम असे. आरमारात चांभांरांची नेमणूक होत असे. पुणे, राहुरी, खेड, संगमनेर, जुन्नर, पारनेर, नेवासे, कर्डे, बेलापूर, गांडापूर ह्या ठिकाणी ३१३ महार, ५४ मांग, ५२ चांभार हुजुरकामी असल्याचा उल्लेख नानासाहेबांच्या रोजनीशीत आहे. तसेच हुजुरपागेत २७७ महार राबते म्हणून होते. राणोजी भोसल्यांकडे यांच्या पागेत असेच महार होते. लढाईत जखमी माणसाला परत पिछाडिवरती आणायचे काम महार करत. (सवा माध रो भा १-४३) इ.स. १७७८ मध्ये तळेगावाहुन लष्करातील जखमी लोकांना पुण्यास हलविण्यासाठी महारांचेच पथक होते (सवा माध रो भा २ पृ ४३). वसईच्या मोहीमेत अतिशय उत्तम पोहोणारे "पेटेकरी" हे महार - मांग होते. त्यावेळी महत्वाची माणसे, पत्रे वगैरे पाण्यातून एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहोचविण्याचे जोखमीचे काम ह्याच बहाद्दरांनी केले (पे.द. ३-२०९). देहू, बांबुर्डी, भिमथडी, नागेवाडी-सातारा, भांबुर्डे अश्या अनेक ठिकाणची पाटिलकी देखिल महारांकडे होती. जंजिरा मोहिमेत सिद्दी सातच्या बाजूने कोंडनाक महार लढत होता अशी नोंद ब्र.स्वा चरीत्रात आहे. त्याची नावासकट नोंद घेतली आहे म्हणजे कोंडनाक सिद्दीकडील महत्वाचा माणूस असणार. याखेरीज पेशवे सनदा १७- ३०४ नुसार महारांचे "हुलस्वारांचे पथक" असे.बहुदा शत्रुला हुल देऊन दुसरीकडे लक्ष वळविण्याचे काम हे पथक करीत असावे असे नावावरुन दिसते."

" एका पाटिलकीच्या प्रकरणात भांडण राजाराम महाराजांपर्यंत गेले. राजाराम महाराजांनी दावा सांगणार्‍या महारांनी वैराटगड जिंकून दाखवायचे "दिव्य" करावे आणि बागेवाडीची पाटिलकी मिळवावी असे ठरविले. महारांनी मोठ्ठा पराक्रम करुन वैराटगड स्वराज्याला परत मिळवून दिला व ती पाटिलकी मिळवली. खर्ड्याच्या लढाईत शिवनाक महाराचे पथक होते. हा तांसगावकडील कळंबी गावचा वतनदार. शिवनाकाचा तळ इतर ब्राह्मण आणि मराठा सरदारांच्या शेजारी पडला. लोकांत कुरकुर सुरु झाली. ती सवाई माधवरावांपर्यंत आली. त्यावेळी बैठकीत पाटणकर म्हणून वृद्ध सरदार होते. ते कडाडले - "ही तलवार बहदूरांची पंगत आहे येथे विटाळचांडाळ काही नाही!" श्रीमंतांनी तोच निकाल दिला. शिवनाकाचे पथक तिथेच सारख्याच मानाने राहीले. वसईच्या मोहीमेत तुकनाक महाराने मांडवीजवळील मोर्चे उत्तम रीतीने सांभाळले. त्याचा सन्मान करताना पेशव्यांनी कंठी-तोडे देऊन गौरव केला. जेष्ठ संशोधक श्री आबा चांदोरकरांनी पेशवे काळातील तब्बल ४४ महार पथकदारांची नावे प्रसिद्ध केली होती - १) आपनाक २) उमनाक ३) उपनाक ४) कालनाक ५) कासनाक ६) कुसनाक ७) केरनाक ८) खंडनाक ९) गोमनाक १०) गोंदनाक ११) चांगनाक १२) चिमणनाक १३) चिडनाक १४) जाननाक १५) झुकनाक १६) तुकनाक १७) दमेनाक १८) दसनाक १९) दादनाक २०) देवनाक २१) धावनाक २२) धूळनाक २३) धोंडनाक २४) नागनाक २५) पदनाक २६) पुजनाक २७) बदनाक २८) बाणनाक २९) माळनाक ३०) मायनाक ३१) मेघनाक ३२) येमनाक ३३)येसनाक ३४) रामनाक ३५) राजनाक ३६) राणनाक ३७) लाहालानाक ३८) वामनाक ३९) सटवानाक ४०) संभनाक ४१) सिवनाक ४२) सुकनाक ४३) सुबनाक ४४) सिदनाक" 

यावरुन पेशवाईत महार जातीतील हुन्नरी आणि कर्तृत्ववान लोकांना सैन्यात वाव होताच शिवाय गावची पाटिलकी देखिल मिळत असे हे ससंदर्भ सिद्ध होते. 


लेखातली तिसरी चूक महार रेजिमेंटच्या चिन्हाविषयी - "आजही ‘महार रेजिमेंट’च्या मानचिन्हावर कोरेगाव विजयस्तंभाच्या बरोबरीने दोन क्रॉस मशिनगन आणि मध्यभागी ‘एम. जी.  ही आद्याक्षरे दिसतात." असे पद्माकर कांबळे म्हणतात मात्र तो विजयस्तंभ नसून ऊभी कट्यार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात तो स्तंभ होता आता तो नाही. अजून एक छोटी तांत्रिक चूक म्हणजे त्या चिन्हात दिसतात त्यांना नुसत्या मशिन गन नाही तर विकर्स MG म्हणतात. आणि सरते शेवटी त्यांनी महार रेजिमेंटच्या शौर्याबाबत एक अख्खा परिच्छेद लिहीला आहे मात्र महार रेजिमेंटमध्ये केवळ महार सैनिकच असतात असा त्यांचा गैरसमज नसावा अशी किमान अपेक्षा मी बाळगतो. भारतीय सैन्यात जात धर्म मानत नाहीत. रेजिमेंट्सची नावे काहीही असली तरी त्यात भारतभरातील सर्व जातीधर्मांचे सैनिक असतात.

संदर्भ न वापरता गोष्टी लिहायला घेतल्या की असे आपले न घडलेले पराभव आणि शत्रुंचे न झालेले विजय आपल्या इतिहासात शिरतात. कुठलाही संदर्भ नसताना गळ्यात मडकी आणि कंबरेला खराटा अश्या फक्त "ऐकीव" आणि निरर्थक गोष्टी समाजात पसरतात त्यामुळे दोन जातींमधली दरी अजून रुंदावते. इतिहासाचा अभ्यास हा समाज सुधरवण्यासाठी असतो. गैरसमजांमुळे जातीअंताच्या गोष्टी ह्या केवळ सुविचार म्हणून राहतात. 

असे इतिहासाचे मुडदे पाडणारे संदर्भहीन लेख "लोकसत्ताच्या" मुख्य वर्तमानपत्रात छापले जातात याबद्दल "लोकसत्ताचे" कौतुक करावे तितके कमी आहे.

- सौरभ वैशंपायन.
===========
संदर्भ-
१) मराठी रियासत खंड ४ व  ८
२) मराठ्यांच्या लढायांचा इतिहास
३) दुसर्‍य़ा बाजीरावांची रोजनिशी
४) थोरले माधवराव पेशवे रोजनिशी
५) सवाई माधवराव पेशवे रोजनिशी
६) ब्रह्मेंद्रस्वामी चरीत्र
७) समग्र श्री. म. माटे
८) मराठे व इंग्रज
९) Bombay Gazetteer

Saturday, February 4, 2017

नायिकाभेद



बाई ठेवणे, अंगवस्त्र, नाटकशाळा, रक्षा, दासी, वेशस्त्रिया वगैरे उल्लेख आपण इतिहासात अनेकदा ऐकतो. त्याबाबत अर्थात खूप गैरसमज असतात. वास्तविक "चारीत्र्य" बघून मग "चरीत्र" ठरवण्याचा आपला "भारतीय" दृष्टीकोन इतिहासाचे फार मोठे नुकसान करतो असे माझे मत आहे. कारण एखादि व्यक्ती सामाजिक/धार्मिक/आर्थिक/राजकिय कारणांनी कितीही थोर असली तरी ज्याला आपण ठराविक मापदंड लावून तथाकथित "स्वच्छ" चारीत्र्य वगैरे म्हणतो त्यात ती व्यक्ती बसत नसेल तरी आपण बहुतेकवेळा त्या व्यक्तीवरती फुल्ली मारुन मोकळे होते. त्यातून ती व्यक्ती स्त्री असेल तर बघायलाच नको.

या लेखाच्या सुरुवातीला ज्या संज्ञा वापरल्या त्यांचा उल्लेख आल्यावरती आपल्या डोक्यात पहीला विचार येतो तो राजाने अथवा त्या पुरुषाने "शरीरसुखासाठी" केलेली सोय असा आणि इतकाच असतो. इतिहासाचा अभ्यास करताना माझ्यामते एकतर बंद दरवाज्याआड ती व्यक्ती काय करते? हा आपला प्रश्न असूच शकत नाही. तरीही ह्याबाबत बोलायचे झालेच तर सुरुवात राजवाडेंनी लिहीलेल्या "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" काय होता हे समजुन मग करावी लागेल. निसर्गातील इतर बहुसंख्य प्राण्यांप्रमाणेच मुक्त लैंगिक संबध ते एकपती/पत्नीत्व हा प्रवास मानवी समाजजीवनातील बदलत राहीलेला पैलू आहे. व यापुढेही तो बदलत रहाणार. ह्यावर अनेक धक्कादायक चर्चा व लेख होऊ शकतात.

रामायण - महाभारतात बहुपत्नीत्व/पतीत्व दिसून येतेच पण दासींचेही अर्थात अनेक उल्लेख आढळतात. विदुरचे मोठे उदाहरण आहेच. इतिहासाच्याबाबतीत आपण हे लक्षात घ्यायला हवं की ह्या तत्कालिन समाजमान्य परंपरा होत्या. महाभारत कालात उपस्त्रीयांना "वेशस्त्रिया" म्हणत. त्यांना राणीचा दर्जा नसे पण त्यांचा मान राजांच्या  विवाहित स्त्रियांच्या खालोखाल असे. नंतरच्या काळात यांनाच रक्षा/राख म्हंटले गेले. ह्या "वेश्या" नव्हेत त्या फक्त राजाशी एकनिष्ठ असत. व त्यांना मान असे. महाभारतातील उद्योगपर्वात अज्ञातवासांतुन प्रकट झाल्यावर तहाचे बोलणे करण्यासाठी आलेल्या संजयाकडे युधिष्ठिराने हस्तिनापुरातील वडिलधारे, बंधु यांचे कुशल विचारले त्यात तो बंधुंच्या अथवा राजपरीवारातील वेशस्त्रीयांबाबत क्षेमकुशल विचारतो असा श्लोक आहे -
अलंकृता वस्त्रवत्या: सुगन्धा अबीभत्सा: सिखिता भोगवत्य:।
लघु यासां दर्शनं वाक्‌ च लघ्वी वेशस्त्रिया: कुशलं तात पृच्छे:॥

(उद्योगपर्व अध्याय ३०) - अलंकार घातलेल्या, चांगली वस्त्रे नेसलेल्या व नानाप्रकारचे सुवास लावलेल्या, सुखामध्ये वाढलेल्या व मर्यादाशील असणार्‍या आणि सर्व प्रकारचे उपभोग मिळणार्‍या व ज्यांचे रुप व भाषण सुंदर आहे अश्या वेशस्त्रियांस माझ्यातर्फे कुशल विचारा!" याचा अर्थ त्या मर्यादाशील असून युधिष्ठिराच्या आदरास पात्र होत्या.

मुळात आपण हे समजुन घ्यायला हवं की अंगवस्त्रे, रक्षा ह्या केवळ आणि केवळ शरीरसुखासाठी नसत. पुर्वी मुलामुलींची लग्नं लहान वयातच होत. स्त्रीयांवर अनेक बंधने असत. त्यामुळे त्यांचे शिक्षण अल्प अथवा बिलकुल नसे. अश्यावेळी घरा बाहेर जात असलेला पुरुष व खास करुन तो रणांगण गाजवून आला असेल, बारा गावचं पाणी पिऊन आलेला व्यापारी असेल, स्वत: बहुश्रुत वा कलासक्त असेल तर अश्यांना आपल्या भावना आपली आवडनिवड त्याच पातळीवरती समजून घेणारं कोणीतरी लागे. आज मानसशास्त्र देखिल हे मान्य करतं की आपल्या भावना आपण भिन्नलिंगी व्यक्तीसमोर जरा जास्त चांगल्या व्यक्त करतो अथवा तशी सुप्त इच्छा कळत-नकळत असते. हे फार नैसर्गिक आहे. अश्यावेळी अश्या नाटकशाळा, अंगवस्त्र वगैरे त्यांची ही भावनिक - बौद्धिक गरज भागवत. त्या कलानिपुण असत, गायन, नृत्य, काव्य, चित्रकला वगैरे बाबतीत त्या हुशार असत. अनेकदा ह्याच स्त्रीया राजकारणाचे पट मांडत - उधळत. अर्थात मानसिक - बैद्धिक - शारिरीक पातळीवरती अशीच इच्छा स्त्रीयांच्या मनात येत असणे सहाजिक आहे पण पुरुषसत्ताक पद्धतीने स्त्रियांना त्यांच्या भावनांसकट दडपून टाकले.

चाणक्य तर अश्या स्त्रियांना आसरा द्यावा तसेच मुद्दाम अश्या स्त्रिया तयार कराव्या, अगदी विषकन्या सुद्धा. त्यांचा उपयोग हेर म्हणून करावा असेही म्हणतो. हे प्रकार त्याकाळी समाजमान्य होते, आज काही शे वर्षांनी त्याबाबत आपली मते बनवणे काहीच फायद्याचे नाही. त्यामुळे शहाजीराजे, संभाजीराजे, राजाराम, शाहुराजे, नानासाहेब पेशवे वगैरेंना नाटकशाळा होत्या ह्यात बिचकण्यासारखं काहीच नाहीये. तत्कालिन इतिहासात अजुन एक उल्लेख येतो तो म्हणजे "कुणबिणी". मध्ये ह्याला "जातीय" ठरवून बराच गदारोळ झाला होता. पण तो गदारोळ म्हणजे इतिहासाचे शून्य ज्ञान असल्याचे मोठे उदाहरण आहे. मुळात बाजारात विकत मिळणार्‍या "कुणबिणी" हा जातीय उल्लेख मुळीच नाही; "कुणबी" जातीशी त्याचा संबध नाही. ब्राह्मण कुणबिणी हव्यात अशी मागणी असलेले अथवा हलक्या जातीतील कुणबीण घरात काही महीने वावरली त्याबद्दल तत्कालिन समाजरुढीनुसार एका कुटुंबाला प्रायश्चित्त घ्यायला लावल्याचे उल्लेख आहेत. मुळात "कुणबिणी" हा उल्लेख घरातील पडेल ते काम करणार्‍या बायका म्हणून येतो. मेण्याबरोबर पाणी घेऊन वेगाने पळू शकतील अश्या काटक कुणबीणी हव्यात असे उल्लेख आढळतात. इतकेच कशाला खंडोजी माणकरास छत्रपती शाहु महाराजांचे "बटकीच्या पोरी दोन बहुत चांगल्या दहा अकरा वर्षांच्या निरोगी नाचावयालायक आणवणेविशी महाराजांची एकांताची फर्मास आहे" असे पत्र मिळाते. त्यावर खंडोजी माणकराने "कोंकणात अशा पोरी मिळत नाही!" असा जबाब पाठवला. नानासाहेबांनी देखिल शाहु महाराजांनी अशाच कुणबिणींची चौकशी केल्याबद्दलची पत्रे आहेत. माझ्या दृष्टिने ह्यात कुठेही जातीय, भावनिक वगैरे काहीच नाहीये. तो सगळा तत्कालिन मामला होता.

भारतीय कामसुत्रांत "नायिकाभेद" सांगितले आहेत. त्यावर अनेक ग्रंथ लिहीले गेले आहेत. अशा एकनिष्ठ अंगवस्त्रांपासून ते वेश्यांपर्यंत सर्वच स्त्रियांना वात्सायनाने कामसुत्रात तसेच इतरांनी राजतरंगिणी, शृंगारतिलक, श्रृंगारप्रकाश, अग्निपुराण, रसमंजीरी वगैरे ग्रंथात महत्वाचे स्थान दिल्याचे दिसते. ह्या नाजुक विषयाला धसमुसळीने हाताळण्याऐवजी थोडं तारतम्य ठेवून हाताळलं तर अनेक गणिते सोपी होतात.

 - सौरभ वैशंपायन