Thursday, June 9, 2016

श्री. म. माटे हे नाव महाराष्ट्राला नवीन खचित नाही. अस्पृष्यता निवारण चळवळ, साहित्य निर्मिती अश्या २ आघाड्यांवरती त्यांनी बरेच काम केले होते. १९४३ सालच्या महाराष्ट्र साहीत्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. त्यांच्या लेखनाचे २ खंड २००७ मध्ये देशमुख प्रकाशनाने प्रकाशित केले. त्यापैकी दुसर्‍या खंडात त्यांनी "अस्पृष्टांचा प्रश्न" असा एक दिर्घ प्रबंध लिहिला आहे. प्रचंड अभ्यास व स्वानुभवावरुन लिहिलेला हा प्रबंध असून पूर्वापार चालत आलेल्या बिनडोक रुढी परंपरांनी भारताचे कसे नुकसान केले ह्यावर त्यांनी अनेक स्मृतींमधले दाखले देऊन, अनेक बखरींमधले उतारे देऊन दाखवून दिले आहे. हा प्रबंध वाचताना मला महाराष्ट्रात अस्पृष्यांच्या परीस्थितीबाबत थोडेसे वाचायला मिळाले. अस्पृष्यांना गावगाड्य़ात अनेक हक्क असत असं ते म्हणतात. बिदरच्या बादशहाने एका महार घराण्याला एका गावची बावन्न हक्कांची हक्कदारी दिली असे ते नोंदवतात. ते ५२ हक्क कुठले हे शोधायची गरज आहे. महार - मांग ह्यांच्या हक्कांची नोंद पैठणच्या ब्रह्मवृंदांकडे जी निर्बंधपुस्तके असतात त्यात दिली होती. महार - मांग यांच्यातील हक्कांबाबतच्या तंट्यात पैठणच्या ब्रह्मवृंदाने त्याच निर्बंध पुस्तकांचा आधार घेउण तो तंटा सोडवला होता (म.इ.सा खंड २० लेखांक १७४) हे ससंदर्भ ते नमुद करतात.

पूर्वीच्याकाळी एखाद्या आरोपीला दिव्य करावे लागत असे. त्यात महाराच्या मताला बरीच किंमत असे. शाहु रोजनिशी नुसार शके १६६५ मधल्या फुरसुंगीच्या पाटिलकी बद्दल तंटा ऊभा राहीला. कामठे-बोराडे आणि गायकवाड ह्यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप झाले. कृष्णावेण्णा संगमस्थळी गोतसभा भरली. वादि-प्रतिवादी व येसनाक महार संगमाच्या पात्रात शिरले. दिव्य पार पाडताना येसनाकाने कामठ्यांना उजव्या हाताने बाहेर काढले व गायकवाडांना डाव्या हाताने. कामठ्यांना निम्मी पाटीलकी व वडिलकीचा मान मिळाला. गोतसभेने येसनाकाचा निकाल मान्य केला. इतकेच नव्हे तर खामगावात शिवेच्या हद्दिच्या वादात निळनाक महाराने आपला मान घेतला व तो जिथवर चालत गेला ती हद्द गावकर्‍यांनी मान्य केली (रा खं ६ पृष्ठ १११) ह्याचा अर्थ पिढ्यानपिढ्या जपून ठेवलेल्या माहीतीच्या आधारावर गावाची शिवारे ठरविण्याचा मान महारांना होता. बेलसर येथे नाव्ही व गरुड समाजात रहायच्या जागेच्या वाटणीवरुन झालेला कज्जा असाच महाराच्या डोईवरती देवीचा अंगारा व पांढरीचा भेंडा देऊन "नावियांची जागा पुरातन असेल तिथवर चालत जावे" असे ठरले व केलेला निवाडा मान्य केला.

१७६० मध्ये कर्ज निवारण्यासाठी पेशव्यांनी काही काळ कर्जपट्टी बसवली. त्याची वसूली महारांकडूनही होऊ लागली. नाणे मावळातील महारांनी एकत्र येऊन अर्ज केला की "आमच्याकडून अशी पट्टी आजवर घेतली गेली नाही सबब ह्यापुढेही घेतली जाऊ नये असा पेशजीचा करार आहे" पेशव्यांनी तात्काळ त्यांना सुट दिली. काही उध्वस्त झालेली गावे वसवताना गावकरी व बलुतेदारांबरोबर महारांना देखिल त्यात कायम केले. त्यासाठी शंभर रुपये कर्ज व पाच खंडी धान्य सरकारातून दिल्याची नोंद थोरले माधवराव रोजनीशीत आहे. (पृ ३५). जमिनीची पहाणी करुन सरकारने आकारलेल्या करातून महारांना दरशेकडा रुपये ५ ची सुट दिल्याची नोंद तसेच मौजे कळंबी प्रांत मिरज येथील एका गाववरतीच जप्ती आणली पुढे चौकशी अंती तो गाव राजनाक वल्लद काळनाक महाराकडे पूर्वीपासून असून तो हुजुर चाकरी करतो हे समजतच गावचा मोकासा व महसून त्याकडे परत केला आणि गाव जप्तीतून मोकळी केली (थो. मा. रो. भा १ पृष्ठ ३१० नोंद क्रमांक ३४०). पाली गावच्या भोयी महारास सरकारचा अधिकारी म्हणून कुलकर्णी, खोतपाटीलांसारखाच गावठाण माफ केल्याचे नानासाहेबाच्या रोजनीशीतील उल्लेखात कळते (रो भा पृ २०३). पंढरपुरात राडिचा खेळ होत ती जागा खणून तयार करायचा मान महारांचा असे. एका वर्षी बडवे तो खणू लागताच तंटा ऊभा राहीला व सवाई माधवराव रोजनीशी भाग ३ पृष्ठ २८५ नुसार निकाल महारांच्या बाजूने देऊन बडव्यांना सख्त ताकिद केली. १७८९ मध्ये कात्रज गावानजिक महार, चांभार व मांग समाजाची वस्ती होती ती. काही कारणाने मोडावी लागली. लगोलग हुजुरातीतून २५१ रुपये आणि ३०० वासे नवीन घरे बांधण्यासाठी दिल्याचे सवाई माधवराव रोजनिशी ३-२८६ नुसार स्पष्ट होते.

महारांकडे गावच्या रक्षणाचे काम असे. शके ९७३च्या सूडी मधील कानडी शिलालेखात तराळांचा उल्लेख आहे व हे गावाचे चोर - दरोडेखोरांपासून रक्षण करणारे तराळ मुख्यत: महार असत असे माटे म्हणतात. गावकीच्या भांडणाचे निकाल होत त्यात महार, मांग व चांभारांच्याही सह्या होत व निशाणी म्हणून महाराची काठी, मांगाची दोरी व चांभाराचा इंगा अश्या निशाण्या असत. असे महजर बरेच मिळतात. हुजुरपागेत बिगार म्हणूनही काम असे. आरमारात चांभांरांची नेमणूक होत असे. पुणे, राहुरी, खेड, संगमनेर, जुन्नर, पारनेर, नेवासे, कर्डे, बेलापूर, गांडापूर ह्या ठिकाणी ३१३ महार, ५४ मांग, ५२ चांभार हुजुरकामी असल्याचा उल्लेख नानासाहेबांच्या रोजनीशीत आहे. तसेच हुजुरपागेत २७७ महार राबते म्हणून होते. राणोजी भोसल्यांकडे यांच्या पागेत असेच महार होते. लढाईत जखमी माणसाला परत पिछाडिवरती आणायचे काम महार करत. (सवा माध रो भा १-४३) इ.स. १७७८ मध्ये तळेगावाहुन लष्करातील जखमी लोकांना पुण्यास हलविण्यासाठी महारांचेच पथक होते (सवा माध रो भा २ पृ ४३). वसईच्या मोहीमेत अतिशय उत्तम पोहोणारे "पेटेकरी" हे महार - मांग होते. त्यावेळी महत्वाची माणसे, पत्रे वगैरे पाण्यातून एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहोचविण्याचे जोखमीचे काम ह्याच बहाद्दरांनी केले (पे.द. ३-२०९). देहू, बांबुर्डी, भिमथडी, नागेवाडी-सातारा, भांबुर्डे अश्या अनेक ठिकाणची पाटिलकी देखिल महारांकडे होती. जंजिरा मोहिमेत सिद्दी सातच्या बाजूने कोंडनाक महार लढत होता अशी नोंद ब्र.स्वा चरीत्रात आहे. त्याची नावासकट नोंद घेतली आहे म्हणजे कोंडनाक सिद्दीकडील महत्वाचा माणूस असणार. याखेरीज पेशवे सनदा १७- ३०४ नुसार महारांचे "हुलस्वारांचे पथक" असे.बहुदा शत्रुला हुल देऊन दुसरीकडे लक्ष वळविण्याचे काम हे पथक करीत असावे असे नावावरुन दिसते.

तसेच एका पाटिलकीच्या प्रकरणात भांडण राजाराम महाराजांपर्यंत गेले. राजाराम महाराजांनी दावा सांगणाअर्‍या महारांनी वैराटगड जिंकून दाखवायचे "दिव्य" करावे आणि बागेवाडीची पाटिलकी मिळवावी असे ठरविले. महारांनी मोठ्ठा पराक्रम करुन वैराटगड स्वराज्याला परत मिळवून दिला व ती पाटिलकी मिळवली. माटे गुरुजींनी एक घटना दिली आहे परंतु संदर्भ दिला नाहीये - खर्ड्याच्या लढाईत शिवनाक महाराचे पथक होते. हा तांसगावकडील कळंबी गावचा वतनदार. शिवनाकाचा तळ इतर ब्राह्मण आणि मराठा सरदारांच्या शेजारी पडला. लोकांत कुरकुर सुरु झाली. ती सवाई माधवरावांपर्यंत आली. त्यावेळी बैठकीत पाटणकर म्हणून वृद्ध सरदार होते. ते कडाडले - "ही तलवार बहदूरांची पंगत आहे येथे विटाळचांडाळ काही नाही!" श्रीमंतांनी तोच निकाल दिला. शिवनाकाचे पथक तिथेच सारख्याच मानाने राहीले. वसईच्या मोहीमेत तुकनाक महाराने मांडवीजवळील मोर्चे उत्तम रीतीने सांभाळले. त्याचा सन्मान करताना पेशव्यांनी कंठी-तोडे देऊन गौरव केला. आबा चांदोरकरांनी पेशवे काळातील तब्बल ४४ महार पथकदारांची नावे प्रसिद्ध केली होती - १) आपनाक २) उमनाक ३) उपनाक ४) कालनाक ५) कासनाक ६) कुसनाक ७) केरनाक ८) खंडनाक ९) गोमनाक १०) गोंदनाक ११) चांगनाक १२) चिमणनाक १३) चिडनाक १४) जाननाक १५) झुकनाक १६) तुकनाक १७) दमेनाक १८) दसनाक १९) दादनाक २०) देवनाक २१) धावनाक २२) धूळनाक २३) धोंडनाक २४) नागनाक २५) पदनाक २६) पुजनाक २७) बदनाक २८) बाणनाक २९) माळनाक ३०) मायनाक ३१) मेघनाक ३२) येमनाक ३३)येसनाक ३४) रामनाक ३५) राजनाक ३६) राणनाक ३७) लाहालानाक ३८) वामनाक ३९) सटवानाक ४०) संभनाक ४१) सिवनाक ४२) सुकनाक ४३) सुबनाक ४४) सिदनाक

ह्यावरुन इतके नक्कीच उघड आहे की पेशव्यांवरती जो जातीभेदाचा सरसकट आरोप केला जातो त्याला ऊभा छेद देणारे हे संदर्भ आहेत. उत्तर पेशवाईत महारांच्या गळ्यात मडके आणि कंबरेला खराटा बांधला जात असे ह्याला एकही समकालिन पुरावा ऊपलब्ध नाही. तशी काही प्रथा असती तर किमान एक लिखित पुरावा अगदि सहज मिळाला असता तो देखिल इंग्रजांच्या जवळच्या काळातील. इंग्रज अथवा परकियांकडूनही एकही ओळ ह्यावर लिहीली गेली नाही. त्याकाळातील समाज सुधारकांकडून असे काही लिखाण उपलब्ध नाही. ह्या सगळ्या ऐकिव गोष्टी आहेत व एकाचे दोघांना दोनांचे चारांना करत पसरलेले आहे.
लेखनसीमा।

- सौरभ वैशंपायन

=============
संदर्भ -
१) निवडक श्री. म. माटे : खंड २
२) पेशवे थोरले माधवराव रोजनीशी

2 comments:

Unknown said...

सौरभ वैशंपायन,
आपल्या ब्लॉगचे शीर्षक सहज सुचलं म्हणून तसे सहज वाचनात आले म्हणून श्री म माट्यांच्या पुस्तकातील उल्लेख व माहिती वाचून रंजन तर झालेच पण त्या बरोबर तुमच्या सारख्या अभ्यासू व्यक्तीचा परिचय झाला... महार मांग आणि अन्य जमातींना वाटून दिली गेलेली कामे किती जेखमीची व मानाची होती याची धावती कल्पना येते. मी हवाईदलातील सेवेतून निवृत्त झाल्यावर पुण्यात विमान नगर भागात राहतो. कोजागिरी कार्यक्रमाला पुण्यातील कोण कोण जाणार आहेत? मलात्यांच्या बरोबर जाता येईल का? यावर अधिक बोलायला आवडेल माझा मो क्र 9881901049 आहे.

Unknown said...

चांगल्या संदर्भानी हा मुद्दा मांडलात पण तरीसुद्धा २१ व्या शतकात देखील या वर्गाबद्दल इतका आकस, राग कशासाठी?

याला इतकी काही कारणं आहेत का याचा देखील विचार करावा लागेल
कारण सर्वच लोक इतका ऐतिहासिक तपशील लक्षात घेत नाहीत
सर्वसामान्य लोक या वर्गासोबत इतकं अंतर राखून का आहेत ?