Monday, March 9, 2009

Life is calling.... where are you?

जगणे जगणे म्हणजे नेमके काय?

कधी "चला ट्रेकला निघुया!!" अस अच्चानक ठरवुन २ बिस्किटचे पुडे आणि पाण्याची एखादी बाटली टाकुन निघालाय कधी घराबाहेर? नसाल तर निघा. ट्रेकला नाही निदान असच आसपास कुठेतरी. असेल कोणी बरोबर तर उत्तम नाहीतर एकला चालो रेऽऽ गुरुदेवांनी्च सांगितलय. डोकं फिरल्यागत वागवं अधुन मधुन, म्हणजे इतर वेळी डोकं जागेवर राहतं किंवा निदान ठिकाणावर तरी नक्किच येतं. बुट चढवावेत, कॅप घालावी डोक्यावर आणि भटकावं मग उगीच खाच खळग्यातुन - झाडा फांदितुन.

कधी गड-सुळक्यांत फिरताना खुऽऽऽप तहान लागते, तळाशी थरथरता जेमतेम अर्धा थेंब बाकी आतुन फक्त कोमट वाफ भरलेली रीकामी बाटली तहान दुप्पट करते. मग डोक्यावर असलेलं ऊन डोक्यात जायला लागतं. झक मारली आणि आलो इथे असं वाटायला लागतं. कोरड्या ओठांवरुन दमटसर जीभ फिरवुन दुरवर नजर फिरवायची पाणी दिसतय का बघायला. उन इतकं वाईट्ट असतं की घाम वाळुन मिठाचे पांढरे शिक्के उमटतात पाठीवर. कानाला उन सडकुन काढत असतं. चिकट चेहर्‍यावर धुळिची पुट चढलेली असतात. आणि जरा सावली देईल असं झाड देखिल दिसत नाही. ज्यावर चढाई करायची तो कातळ चरचरीत तापलेला असतो, मधुनच एखादा कंटाळवाणा मुरमी पट्टा लागतो. खसाखसा पाय घसरतात. सुकलेले पिवळे गवत एखाद्या ढेकळा बरोबर बाजुला होते. टिशर्टच्या बाहिने नाकाच्या शेंड्यावरचा घाम पुसुन समोरच्या सुळक्याचा अंगावर येणारा चढ निश्चयाने चढतो ती वाट सुळक्याच्या कुठल्या डाव्या-उजव्या हाताला गायब होत असते. एखादी कचकचीत शिवी स्वत:ला आणि मुख्यत: त्या वेळेला घालत त्या वाटेने पुढे जातो - आणि ..... पुढ्यात चक्क पाण्याचे एखादे टाके दिसते. प्रतिसृष्टी निर्माण केल्याच्या आनंदात चेहर्‍यावर एक विजयी हसु येतं. मधलं अंतर दोन-चार ढांगात पार करुन टाक्याच्या कडेवर उभे राहतो. पण सगळा आनंद त्या पाण्यात उडी मारुन जीव देतो.... पाण्यात एखादा उंदीर किंवा घूस मेलेली असते आणि डोकं उठेल असा सडल्याचा कुजका भपकारा नाकाला जाणवतो. क्षणभर काही सुचत नाही चिडचिड अज्जिबात होत नाही उलट अति झालं आणि हसु आलं अशी अवस्था होते.  पण तहान स्वस्थ बसु देत नाहि. पाणी प्यावं??? आणि ठरवतो - सगळं गेलं तेल लावत ... जवळपास पडलेल्या २ काटक्या उचलुन पाण्याने टम्म फुगलेला तो गोळा उचलायचे ८-१० अयशस्वी प्रयत्न होतात. कधी वजनाने काटकि मोडते, कधी ते बाहेर आलं असं म्हणता म्हणाता धप्पकन परत आत पडतं, किंवा तरंगत दुसर्‍या काठाला टेकतं. मग त्या बाजुला जाऊन तोच प्रयत्न. अखेर ते कलेवर बाहेर निघतं. त्याला समोरच्या झाडित ढकलुन बाटली काढायची, त्यात पाणी भरुन घ्यायचं आणि ऍक्वागार्डचं पाणी प्यायल्याच्या आत्मविश्वासाने ती तोंडाला लावायची.... पानी बुझाए ओन्ली प्यास बाकी ऑल बकवास म्हणत अर्धाधिक बाटली रीचवायची. - इस मे हि तो लाईफ है यार!

कधी भटकलाय वाघाचे ठसे शोधत? कदाचित समोरच्या झाडितुन दोन निखार्‍यांसारखे डोळे आपल्यालाच निरखत असतील, आपल्या प्रत्येक हालचालीवर त्याचे लक्ष असेल. आपण मात्र त्याचेच ठसे शोधत माती चाचपडत पुढे जात रहायचं. मग अचानक ठश्यांच्या काही जोड्या मिळतात, मग त्याची मोजमापे घेतली जातात पंजा आपल्यापेक्षा कदाचीत एखाद्या सेमीने मोठाच... उभट असेल तर मादा, चौरस असेल तर नर वाघ. उभट पंज्या आसपास छोटे ठसे दिसतात का? बघा!! आहेत?? मग एक आवंढा गिळायचा.... आपल्या बच्च्या सोबत असलेली आई म्हणजे वाघिणीचे नव्हे प्रत्यक्ष मृत्युच्या पावलांचे मोजमाप घ्यायचे. एकाने उभं राहुन सगळीकडे सावध नजर ठेवायची आणि मग एकाने वाकुन त्याची मोजमापे घ्यायची, त्याचे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे नमुने बनवायचे. मग जायच पुढे जवळच ताजी विष्ठा सुध्दा असेल. त्यात एखाद्या प्राण्याचे केस देखिल दिसतील त्याचा उग्र भपकारा नाकाला जाणवेल. आता हिंमत असेल तर पाऊल टाकायचे पुढे, नाहीतर गपगुमान सावधगीरीने मागची-डावी-उजवी कडची चाहुन घेत आल्या पावली सटकायचे. केलय असं? - इस मे हि तो लाईफ है यार!

कधी झोपलाय मोकळ्या आकाशाखाली? रात्री कधीतरी वाढलेल्या थंडिने अर्धीमुर्धी जाग येते, सरकलेलं पांघरुण कुरकुरत चापडताना सहज डोळे उघडतात आणि डोळे परत मिटायला तयारच होत नाहित झोप-बिप सगळ भुर्रकन कुठे तरी उडुन जाते - नजर जाईल तिथे तारेच तारे किती? दहा हजार? एक लाख? एक करोड? माहित नाही, पण या क्षितीजापासुन त्या क्षितीपर्यंत तारेच तारे. आकाश वाचता येत असेल तर दुसरं सुख नाही. तो तिथे ध्रुव तारा. ते सप्तर्षी, हा मृग का? हो नक्किच मागे व्याध आहे की आणि तो काय ऐन मध्यभागी व्याधाच्या बाणाचा तारा. क्षितीजावरचा शुक्र की काय? नाही बहुदा - शुक्र मगाशीच उगवला असेल मग कुठला बरं?? असा विचार करताना तंद्री लागते सगळ कसं भव्य दिव्य असतं? निळं आकाश थांग न लागणारं. या ब्रह्मांडाच्या अनंत पसार्‍यात आपण क:पदार्थ असल्याची जाणीव होते. मग आठवतात आपले फालतु माज, निसर्गाशी केलेली चढाओढ, उंच सुळक्यांवर चढून जग जिंकल्याचा आवेश, विनाकारण आकाशाशी झट्या घेण्याची उद्दाम भाषा.... सगळ किती निरर्थक? किती निष्फळ? आणि बाष्कळ सुध्दा. मग कधीतरी पहाटे नकळत डोळा लागतो, सकाळी उठल्यावर मग काल पाहिलेलं स्वप्नवत वाटत राहतं. - बघितलंय कधी असं "लाईव्ह" स्वप्न? नसेल बघितलं तर बघा - इस मे हि तो लाईफ है यार!


- सौरभ वैशंपायन.

Friday, March 6, 2009

लिंबलोण...

काल संध्याकाळी माझ्या मैत्रिणीकडे गेलो होतो. गेल्यावर काकुने हसतमुखाने दार उघडले. हॉल मध्ये समोरच्या भींतीला L आकाराची बैठक, उजव्या हाताला पुस्तके नावे दिसतील अशी नीट रचुन ठेवलेली पुढे आतल्या खोलीत व स्वयंपाकखोलीत जाणारा दरवाजा. आत जाऊन बसलो घरच्यांबरोबर नमस्कार - चमत्कार झाले आणि समोरच्या भिंतीवरील शोकेस कडे लक्ष गेलं.... भरपुऽऽऽर मेडल्स आणि ट्रॉफिज हारीनं मांडुन ठेवल्या होत्या अर्थात मोजल्या नाहित म्हणा किंवा मोजायची हिंमतच झाली नाहि म्हणा पण हृतिक रोशनला सुध्दा दोन्हि हातापायाच्या बोटांवर मोजता येणार नाहित इतकि नक्किच होती. मी मनातल्या मनात माझ्या २ ट्रॉफिजना उगी-उगी केलं. शेजारीच भारतरत्न डॉ. कलामांच्या हस्ते बालश्री स्वीकारतानाचा तिचाच फोटो होता. घरात २ विद्यार्थी असल्यावर पुस्तकांचा जेव्हढा सहाजिक पसारा होतो तोहि होता मात्र एकुण घर व्यवस्थित. हे सगळं सांगायच कारण मला तिचं घर आवडलं, म्हणजे माणसं मोकळी वाटलीच पण तिच्या घरात सुरक्षित’ वाटलं. आता मला कोणी मारायला वगैरे फिरत होतं म्हणून मी तिच्या घरात लपलो वगैरे नव्हतो, पण सुरक्षित वाटलं हे मात्र खरं ... काहि ठिकाणं, मंदिरे, जागा, वास्तु, घरं किंवा घरातले काहि ठराविक भाग असे असतात कि तिथे आपल्याला सुरक्षित वाटतं. म्हणजे ब्रह्मांडात काहिहि उलथापालथ झाली तरी इथे आपल्याला धक्का लागणार नाहि अशी वेडि समजुत देखिल होते.

काहि जण याला वास्तुपुरुषाचा आशिर्वाद म्हणतील, काहि दिशांना महत्व देतील, कोणी मनाचे खेळ म्हणतील तर काहि जण अगदि काहिहि बोलतोस म्हणुन उडवुनहि लावतील. पण मला असं खुप जाणवतं. अगदि कोयना अभयारण्यात आम्हि ज्या झाडाखाली चुल पेटवायचो ते झाड उगीचच मला आवडु लागलं होतं. कदाचित २-३ दिवसांच्या सवयीने असेल पण पुढले ६-८ दिवस त्या झाडाजवळ असलं कि खुप सुरक्षित वाटायचं. सकाळी जंगलातुन पाय तुटेस्तोवर भटकायच, मग जेवुन दुपारभर आणि संध्याकाळी जवळच्याच दुसर्‍या एका झाडाखाली बसुन प्राणी निरीक्षण करायचो पण त्या दुसर्‍या झाडाचा ’लळा’ नाहि लागला. तसेच एक झाड त्या अभयारण्यात वरच्या डोंगराळ भागात होते, उंऽऽचपुरे आणि भक्कम. म्हणजे अगदि अष्टसात्विक भाव वगैरे काय म्हणतात ते जागृत व्हावेत असं सुंदर झाड होतं.

आता आपलं घर सवयीचं असल्याने मालकिचं असल्याने तसा फरक पडत नसला तरीहि घरातली एखादि खोली किंवा त्या खोलीचा एखादा विशिष्ट भाग हा आपलासा वाटतो. लहानपणी मी पलंगाशेजारच्या कपाटाला पाठ टेकायचो आणि माझ्या भोवती उरलेल्या २ बाजुंनी उश्या उभ्या करायचो. कधी तो माझा किल्ला असायचा कधी ती माझी गाडि व्हायची तर कधी माझं ऑफिस... पण कोपरा तोच. आत्याच्या घरी स्वयंपाक खोलीत देवघराखाली टेबल आहे त्याची देवघराखालची आणि गॅलरीचा दरवाजा अंगावर उघडणारी जेमतेम जागा मला खुप आवडते. आत्याशी मी अध्यात्मापासुन ते राजकारणापर्यंत जगभरच्या विषयांवर तिथे बसुनच गप्पा मारल्या आहेत. अश्या अनेक जागा होत्या - आहेत. काकाच्या घरातली बेडरुम मधली खिडकी जवळची जागा आवडते. अगदि उन आलं तरी शक्यतो तिथेच बसतो. माझ्या काहि मित्रांकडे देखिल अशी भावना होते.

काहि घरे - ठिकाणं अशी असतात कि कितिहि वेळा गेला तरी आपलेपणाची कींवा मी म्हणतो तशी सुरक्षीततेची भावना नाहि होत. म्हणजे ती जागा वाईट किंवा असुरक्षित असते असं नाहि पण जीव रमत नाहि तिथे. सारखि चुळबुळ होत राहते...का? ते माहित नाहि.

असो, तर एकुण काय अश्या जागांना कुणाची दृष्ट लागु नये इतकिच इच्छा. अश्या जागांवरुन मी मनातल्या मनात मी एकदा लिंबलोण उतरवुन टाकतो .... कालच एका नव्या जागेची दृष्ट काढुन आलोय त्याचीच हि गोष्ट.


- सौरभ वैशंपायन.

Tuesday, February 24, 2009

खूण

जा सखे गं शोधुन ये मोहन मुरलीवाला,
कुठे हरवला? ना कळे, ना क्षण उसंत जीवाला - १

काल रातीला भेट जाहली कालिंदिच्या तीरी,
श्याम - सावळा समोर आणिक चुकार पावा करी - २

रात्रभर जागी होती चांदणवेडि चंद्रकला,
जरा स्पर्शता तरंग उठले कालिंदिच्या गुढ जला - ३

स्पर्श असे कि मोरपिस जणु शरीरभर थरथरते,
क्षितीजावरती शुक्र मनोहर रात्र अशीच सरते - ४

श्याम सावळ्या मिठीत अलगद सावरले मी मला,
कुणा न कळता वाट पहाते कदंब तरुच्या तला - ५

(श्याम - सावळ्या मिठीत अवचित किनखापी जर खुपते
कुणा न कळता ओठांवरची अजुन पण खूण जपते - ५)

- सौरभ वैशंपायन.

Saturday, November 29, 2008

पण लक्षात कोण घेतो……?

२६ नोव्हेंबर २००८, रात्रीचे ९ वाजुन ४० मिनिटे ....मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पासुन मृत्युचे चालु झालेले तांडव आत्ताशी कुठे शमतोय. अजुन ताज धुमसतेच आहे. दहशतवाद हा ऑक्टोबर १९४७ पासुनच भारताच्या पाचवीला पुजलाय. १९४७ च्या काश्मीर हल्ल्यापासुन परवाच्या घटनेपर्यंतचा प्रवास कसा झाला हा फार मोठ्ठा प्रश्न आहे. त्यावर शेकडो पुस्तके आणि हज्जारो लेख लिहुनहि झाले आहेत – होतील. पण किमान १६ अतिरेकि समुद्र मार्गाने मुंबई सारख्या भारताच्या अति महत्वाच्या आणि आर्थिक राजधानी म्हणावल्या जाणार्‍या शहरात उतरुन भारताच्या पोलिस-लष्कर-NSG यांसारख्या भक्कम यंत्रणांशी थोडि थोडकि नव्हे तर ४८ तासांपेक्षा जास्त झुंज घेतात. आपल्याकडिल अत्याधुनिक हत्यारे वापरुन १५३ व्यक्तींचा जीव घेतात. १४ पोलिस आणि ३ NSG चे जवान शहिद होतात. नागरीकांची तर गणनाच नाहि. पण हे किती दिवस २? ४? १०? नंतर सगळं विसरणार. मग परत एखादा बॉम्बस्फोट होईतो आम्हि झोपणार. हे चक्र असच सुरु राहणार. कदाचित या जगाच्या अंतापर्यंत(किंवा पाकिस्तानच्या). मुळात नागरीकांमध्येच जाणीव नाहि. वर्क स्पीरीट च्या नावाखाली मुंबईला सलाम ठोकले जातात. मग एखाद्या दिवशी सगळी मुंबई मिनिटभरासाठी स्तब्ध होऊन श्रध्दांजलीचा कार्यक्रम होतो. बाऽऽऽऽस झालं काम. दहशतवादाला धर्म नसतो वगैरे तत्वज्ञान ओकले जाते.

काल पंतप्रधान गरीऽऽऽब चेहरा घेऊन सगळ्याचा “कडक” शब्दात निषेध नोंदवत होते. क्षणभर वाटुन गेले हे आवाहन दहशतवाद्यांना दाखवले तर दया येऊन ते परतीची वाट धरतील इतका बापडा चेहरा आणि त्याहुन खालचा स्वर लावुन आमचे पंतप्रधान “प्रत्युत्तराची” भाषा करत होते. आमचे राष्ट्रपती-पंतप्रधान स्वत:च्याच ऑपरेशन केलेल्या पायांवर उभे राहतात हिच मोठी गोष्ट आहे असे सारखे वाटते. मी लिहिलेलं हे सगळं खुप आक्रस्ताळेपणाने किंवा अपमानकारक वाटेल पण हा आजच्या तरुण पिढीचा संताप आहे. जे भ्रष्टाचारी नेते मेले पाहिजेत ते ठणठणीत आणि जे जवान-किसान जगायला हवेत ते असे मरत आहेत.

मूळात ४८ तास झुंज घेऊ शकतील इतका दारुगोळा घेऊन हे यमदुत आत येतात कसे हा प्रश्न विचारल्यावर अजुनच नविन माहिती हाताशी लागते – ते सगळे किमान ३ महिने मुंबईत होते. दक्षीण मुंबईची खडा न खडा माहिती जमा करुन ते परत पाकिस्तानात गेले तिथे सगळी तयारी करुन कराची-गुजरात-मुंबई असा प्रवास करुन त्यांनी हा आकांत घडवला. खोलवर विचार केल्यास हे सगळे चक्र एकमेकांत खुप गुंतले आहे. पाकिस्तानासारखे असंतुलित व नेहमी हुकुमशहांच्या आणि मुल्ला-मौलवींच्या प्रभावाखाली राहिलेले राष्ट्र असताना त्याचा भारतावर परीणाम होणारच. अफगाणिस्थानात अल कायदा पुन्हा बळकट होतोय, गेले काहि दिवस इराण अमेरीकेशी अरेरावीने बोलतोय, ओसामा-अयातुल्लाची तत्वज्ञाने तिथल्या मदरश्यांतुन तरुणांच्या टाळक्यात ठसवली जात आहेत इतकि कि इंजिनिअर असलेले तरुण अल्लाहसाठी जिहाद करायला फिदायीन हल्ले करत आहेत. म्हणुनच अमेरीका-ब्रिटन-इस्राइल या ३ नावांनंतर “भारत” हा देश चौथ्या क्रमांकावर आहे हे विसरुन चालणार नाहि. त्यातुन चीन सारखे राष्ट्र भारता विरुध्द इथल्या शक्तींना छुपी मदत करते हे काहि नविन नाहि. दहशतवाद कीती पसरलाय हा विचार केला तरी हा देश कसा चालतोय याचे कौतुक करावे लागेल… वर काश्मीर, पंजाबात खलीस्तानवादी, नेपाळ सीमेपासुन विदर्भापर्यंत पसरलेले माओवादि, आसाम मधले फुटीरतावादि, सिक्किम-अरुणाचलप्रदेशावरची चीनची वखवखलेली नजर, भारताच्या कुशीतला कृतघ्न बांग्लादेश, खाली उत्तर श्रीलंकेत लिट्टे, त्यातुन वेगळा द्रविड देश असावा अशी मागणी करणारी माणारे या देशात आहेत याची जाणीव बहुदा लोकांना नाहिये. हे कमी की काय अंदमान-निकोबार मध्ये बांग्लादेशी घुसखोरी करत आहेत. भारत - श्रीलंकेच्या बरोबर खाली अमेरीका-ब्रिटनचा संयुक्त नाविक तळ “दिएगो गार्सिआ” आहेच. आणि हे सगळे काहि संत नव्हेत. आंतराष्ट्रिय राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो. आपल्या देशाचा नागडा स्वार्थ इतकीच प्रत्येकाची खरी बाजु असते.

आपण जागतीक पातळीवर युनो अथवा सार्क सारख्या आंतराष्ट्रिय व्यासपिठांची “शक्तीपिठे” कधीच केली नाहित. मात्र पाक काश्मीर मध्ये भारत जवळपास “कयामत ढा रहा है!” हेच चित्र निर्माण करत फिरत होता-आहे. याचा परीणाम भारताला नक्किच भोगावा लागला होता. आता परत अमेरीकेचा नवनिर्वाचित अध्यक्ष ओबामा परत तेच त्रिपक्षीय वाटाघाटिचे गाणे गाऊ लागलाय. भारताने कुठल्याहि परीस्थीतीत फक्त द्वि-पक्षीय वाटाघाटीचा हट्ट सोडुन चालणार नाहि. खरतर काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असुन आज दुसर्‍या देशा बरोबर सीमा आखाव्या लागत आहेत. हे घोंगडं पं. नेहरुनी भिजवुन ठेवलय. “डोमेलच्या पुढे जाऊ नका! कारण त्यापुढे भारताशी इमान नसलेली कट्टर माणसे आहेत!” हि मेजर सेन यांना दिलेली सुचना भारताला आज महाग पडतेय. तेव्हा भारताला काश्मीर घेणे सहज शक्य होते तेव्हा काहि कारणांनी तो घेतला नाहि त्याचा फार मोठा इतिहास आहे. जागे अभावी इथे सगळा देता येत नसला तरी थोडक्यात सांगायचे तर फारुख अब्दुल्लाचा बाप शेर-ए-कश्मीर उर्फ शेख अब्दुल्ल याला स्वतंत्र कश्मीर हवा होता त्यासाठी त्याने पाकिस्तानच्या गळ्यात गळे घातले होते मात्र पाकिस्तान आपल्याला फसवत आहे हे कळल्यावर हाच शेख दिल्लीत पळत आला, नेहरुंनी त्याला मदत केली पण अशी त्रांगड निर्माण करणारी मदत जी आज भारताला त्रास देणारी ठरलीये. बर पुढे याच शेख अब्दुल्लाचे नेहरु-गांधी घराण्याने किती गालगुच्चे घेतले हे जगाला माहित आहे. त्याचा मुलगा फारुख अब्दुल्ला हा अजुनहि स्वतंत्र काश्मीरचा फुत्कार मधुन-मधुन टाकत असतोच आणि इतके करुन हाच फारुख अब्दुल्ला, राज ठाकरें विरुध्द शिवाजी पार्क वरील समाजवादि पार्टिच्या मेळाव्यात एकोप्याच्या गप्पा मारतो. बहुदा असे विनोद भारताखेरीज कुठे घडत असतील असे मला वाटत नाहि. आज ठरवले तरी युध्द आणि जगाची नाराजी ओढावुन ती निभावुन नेण्याची आर्थिक-सामाजिक-राजकिय-सामरीक ताकद भारतात येत नाहि तोवर संपुर्ण काश्मीर भारताला जिंकता येणार नाहि ये उघडे-वाघडे सत्य आहे. कारण यात पाक-भारतच नव्हे तर चीन व अमेरीकेचे हितसंबध गुंतले आहेत हे सांगणे न लगे. शाक्सगम, मानसरोवर च्या पलीकडिल भाग चीनचे साम-दाम-दंड-भेद वापरुन ६२ पासुन थोडा-थोडा करत बळकावलाय.

पाकचे असे तर या बाजुला चीन पाकिस्तानला अग्वादा बंदर बांधण्यात मदत करतय. श्रीलंकेला लिट्टे विरुध्द लढायला चीन हत्यारे पुरवतय. त्यामुळे श्रीलंका चीनची मांडलिक बनलि तर भारतालाच त्याचा त्रास होणार आहे. आणि आमचे करुणानिधी तमिळींना न्याय मिळावा म्हणुन लिट्टेची मदत करायला भारत सरकारला भाग पाडायचे उद्योग करत आहेत. लिट्टे काहि सत्संग भरवणारी धर्मदाय संस्था निश्चित नाहिये. आपला एक पंतप्रधान याच लिट्टेने ग्रासला होता. आपला शेजारी म्यानमार तिथे हुकुमशाहिच आहे, मादाम स्यु कि अजुन किती वर्ष तुरुंगात घालवणार आहेत? या प्रश्ना बरोबरच म्यानामारला चीन मदत करतोय हे जास्त धोकादायक आहे कारण अरुणाचलप्रदेशची शेकडो किलोमीटरची सीमारेषा म्यानामारला लागली आहे. भारतीय पंतप्रधान चीनच्या पारंपारीक प्रतिस्पर्धी असलेल्या जपानला भेट देऊन आल्यावर चीनची अस्वस्थता बघण्यासारखी होती. चीन भारताला सगळीकडुन घेरतय. या ड्रॅगनचा विळाखा आत्ताच खिळखिळा केला पाहिजे.

प्रत्येक जण झाल्याप्रकाराचा राजकिय लाभ उठवणार. विरोधी पक्ष सरकार-सुरक्षा यंत्रणा झोप काढत होतं का? हा प्रश्न विचारणार. सरकार म्हणणार येणारा डोक्यावर पट्टि बांधुन थोडिच येतो कि मी आतंकवादि आहे म्हणुन? आम्हि आता अमुक एक दल आणी समिती स्थापन करु. अश्या समित्या स्थापन होणार चौकशी होणार सरकार बदलले कि आपला स्वार्थ साधणारे निष्कर्ष काढायला लावणार किंवा नविन समिती बसवणार मग “तारीख पे तारीख” पडत राहणार १३ वर्षे खटले चालणार अर्धे आरोपि म्हातारे होऊन मरणार, काहि तुरुंगात जास्त सुरक्षीत राहणार, मसुद अझर सारखे सुदैवी आणि लंबी पहुच असलेले अतिरेकि एखाद्या विमान अपहरणानंतर सुटुन पाकिस्तानात जाणार मग “जैश-ए-मुहम्मद” सारखे आत्मघातकि जिहादि पथक स्थापन करणार, अफझल गुरु तुरुंगात मानव अधिकारवाल्यांच्या उपकारावर एकेक दिवस पुढे ढकलत राहणार. मात्र अफझल गुरु जिवंत कसा या अस्वस्थतेने संसदेवरील हल्ला आपल्यावर झेलणार्यांचा नातेवाईक त्यांची मरणोत्तर शौर्य पदके परत करतोय याची दखल कोण घेणार? लाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽज वाटायला हवी त्याची, शौर्य पदके परत केली जातात – कोणासाठी एका आतंकवाद्यासाठी????? आणि सरकार अफझलला लटकवण्या ऐवजी निलाजरेपणाने आतंकवाद्यांच्या मुलांना आर्थिक मदत देत फिरतय. वाऽऽऽऽऽऽऽऽऽ. प्रत्येक नागरीकाला याची लाज वाटायला हवी. येत्या निवडणुकीत अश्या सरकारला त्यांची “जागा” दाखवायला हवी. हा प्रकार म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा झाला.

सरकार कुठलेहि असो आतंकवादा विरुध्द लढणारी एक यंत्रणा पाहिजे. कडक कायदे हवेत इतके कि आतंकवाद्यांनी मरणाची भीक मागितली पाहिजे. पण हे सगळे काहि आज म्हंटले आणि उद्या उभे राहिले इतके सोप्पे नाहिये . राजकिय स्वार्थ सोडुन सगळ्यांनी एक मुखाने कठोर कायदे निर्माण करुन ते राबवायला हवेत. याच बरोबर नागरी सुरक्षेची अंतर्गत सुविधा असली पाहिजे त्यासाठी डिजास्टर मॅनेजमेंट ची सुदृढ यंत्रणा देखिल दुसर्‍या बाजुला उभी केली पाहिजे. ती आधी़च केली असती तर गुजरात मधुन जी बोट बोट मालकाला ठार मारुन बळकावली आणि पुढे जे झालं ते कदाचीत झालं नसतं अथवा निदान आटोक्यात आणता आलं असतें. किंवा नरीमन हाऊस बाहेर जी फाजील बघ्यांची गर्दि जमुन पोलिसांचे काम उगीच वाढवत होती ती जमा झाली नसती. अमेरीका - युरोपिअन राष्ट्रे अथवा इस्राइल सारख्या काहि राष्ट्रांत किमान ३ वर्षांचे सैनिकी प्रशिक्षण दिले जाते. भारताला आर्थिक दृष्ट्या हे सध्या शक्य नसले तरी NCC सारखी शक्य तितकी आपत्कालीन मदत दले यासाठी शाळा पातळी पासुन ते जेष्ठ नागरीकांपर्यंत बनवली पाहिजेत. याचा उपयोग अश्या घटनांच्यावेळी होईलच पण नैसर्गिक आपत्तीत देखिल बरेच नुकसान टाळता येईल. आपला नविन शेजारी संशयास्पद हालचाल करत नाहिये ना? तो जास्तीत जास्त वेळ घरातच घालवत नाहिये ना? जास्त ओळख न वाढवता अलिप्त राहुन आपले व्यवहार करतोय का? असे प्रश्न देशाच्या सुरक्षेसाठी विचारणे गरजेच आहे. गाडित आजुबाजुला ठेवलेली एखादि बॅग सहा-आठ स्टेशन नंतर हलली नसेल तर ती कोणाची आहे? हा प्रश्न विचारला पाहिजे.

या अश्या यंत्रणां खेरीज समाजात अनेक बाबतीत आज जागरुकता येणे फार गरजेचे आहे. संजय दत्तवर AK ४७ जवळ बाळगल्याचा आरोप असताना त्याचे चित्रपट हिट होतातच कसे? चिंकारा मारुन सलमान खान सुटतो कसा? आणि सुटल्यावर त्यावर बहिष्कार टाकायचे सोडुन तो सुटल्याचा आनंद मनवलाच कसा जातो? सलमान-संजय म्हणजे काहि दैवी अवतार नव्हे, उलटे टांगुन बडवुन काढावे हि तो यांची लायकि. कधी कधी तर प्रश्न पडतो कि इथल्या लोकांची बौध्दिक पातळी इतकि खालावली आहे का?? संजय दत्तला मध्ये ९३ च्या सुनावणीसाठी कोर्टाने बोलावले तर दोन तरुणींना त्यांचे (अनावश्यक)मत विचारले तर म्हणे “तो किती चांगला दिसतो असं करेल असे नाहि वाटत!” तिच गोष्ट सलमान खान सुटुन आल्यावर त्याच्या बंगल्या समोर शेकड्यांनी जमलेले लोक फटाके फोडुन आनंद मनवताची दृष्ये केवळ उबग आणणारी होती. आणि हे तर काहिच नाहि, ज्यांचे एन्काउंटर करायला कधीकाळी पोलिस बंदुका सरसावुन धावत होते. आज त्यांच्या Z+ सिक्युरीटिसाठी सरकार खर्च करतं कारण ते निवडुन संसदेवर जातात. ते जातात कसे हा प्रश्नच आंम्हाला कधी पडत नाहि.?? फुलन देवी, अरुण गवळी, पप्पु कलानी हे निवडले जातातच कसे? त्यांना निवडणुकिला उभे राहुच कसे दिले जाते? इतका का कायदा गाढव आहे? समाजात या सगळ्या बद्दल जागृती निर्माण होत नाहि तोवर हे असंच घडत राहणार.

हे सगळं लिहिल तर आहे, पण हे लक्षात कोण घेतो………? परत ये रे माझ्या मागल्या नाहि झालं म्हणजे मिळवलं.


- सौरभ वैशंपायन.
(२८/११/२००८))

Tuesday, November 18, 2008

जागो रे….

CCNA च्या परीक्षेसाठी आयडेंटिफिकेशन प्रुफ लागेल म्हणुन मी त्या डॉक्युमेंट्सची जमवजमव करु लागलो तेव्हा माझ्या लक्षात आले.............. मी अजुन माझे VOTER ID CARD काढलेलेच नाहिये. हे सांगणे काहि भुषणावह नाहिये, उलट २४ वर्षांच्या मुलाकडे अजुन VOTER ID CARD नाहिये हि अत्यंत चुकिची गोष्ट आहे. मागच्या निवडणुकिच्या वेळी मी लक्षच दिले नाहि. मात्र आता ती चुक सुधारेन म्हणतोय. तुमचे भारतीय नागरीकत्वा बरोबरचे राहत्या ठिकाणेचे प्रुफ म्हणुन तर तुम्हि त्याचा सगळीकडे वापर करु शकताच पण महत्वाचं म्हणजे तुम्हि तुमचा मतदानाचा हक्क बजावु शकता. तुमचे एक मत फरक पाडु शकते. मी अधिक माहिती करीता टाटा ने चालवलेल्या “जागो रे!” मोहिमेच्या साईटवर चक्कर टाकुन आलो. अतिशय छान आणि माहितीपूर्ण साईट आहे. आम्हि गरीबी, भ्रष्टाचार, अन्याय, सुरक्षा यांच्यावर ताशेरे ओढतो पण मतदानाला कितीजण बाहेर पडतात? खरतर ९०% पेक्षा कमी मतदान होणं हि आपल्या मतदारसंघाला लाज आणणारी गोष्ट आहे. कश्मिरात निदान अतिरेक्यांच्या धाकाने कमी मतदान होतं इथे आमचा आळस नडतोय! मग झोपडपट्टितले दादा पैसे घेतात आणि आजुबाजुची त्यांची अनुयायी आणि चेले मंडळी त्याच्या एका शब्दाखातर अथवा धमकिखातर सांगितल्या निशाणीवर ठप्पा लावतात. मग पैसे चारुन सत्तेवर येणारे अनेक महाभाग नगरपालिकेत, विधानसभेत आणि लोकसभेत बसतात. प्राथमिक इंग्रजी धड बोलु न शकणार्‍या शिक्षणमंत्र्यांच्या हातात आमच्या शिक्षणाचे सुकाणु दिले जाते, घोटाळे करणारे, मर्डर चार्ज असलेले गुन्हेगार उजळमाथ्याने पोलिस संरक्षणातुन फिरतात. आणि आम्हि ये रे माझ्या मागल्या करत “सिस्टिमला” दोष देत सकाळची ८:१०ची गाडि पकडण्याच्या चिंतेत हरवुन जातो.

सुशिक्षित म्हणवणारे आम्हि आमचा हक्कच बजावत नाहि. टाटाच्या त्या साईटवर – “तुम्हि या आधी कधी मतदान केले आहे का?” या प्रश्नावर ४५% लोकांनी “होय!” तर ५५% लोकांनी “नाहि!” असे उत्तर दिलेय. म्हणजे जे इंटरनेट वापरु शकतात, ज्यांना लिहिता-वाचता येते किमान पातळीवरील चांगल्या-वाईटाचा विचार करु शकतात त्यापैकी ५५% टक्के लोकांनी मतदानच केलेले नाहिये. दुर्दैवाने मीहि त्यातला एक आहे. पेज थ्री वरील लोकं फक्त फोटो काढुन घेण्यासाठीच मतदान केंद्रांवर येतात याबाबत मी नि:शंक आहे. झोपडपट्ति अथवा मेंढरे कॅटेगरीतली माणसं पैसे, दारु, चिकन यांना भुलुन सांगेल तिथे शिक्का मारतात. मग मध्यमवर्गिय माणुस काय करतो? घरी बसुन “हॅट सालं देशाचं काहि खरं नाहि! अमुक एक पार्टि आली तर देशाला विकुन खाईल, तमुक पार्टी आली तर धार्मिक तंटे वाढतील, सोम्याने इतक्या करोडचा घोटाळा केला होता तरी जिंकला! गोम्या चांगला आहे पण लोकं मागे नाहि त्याच्या! ” असे म्हणत मान झटकुन नेमेची येतात निवडणुका” या ठेक्यावर ते विचार उडवुन देतो!

VOTER ID CARD मिळवण्यासाठी काय करावं लागतं याची देखिल माहिती नसते. असली तरी बरेचजण त्याकडे लक्ष देत नाहि. असो, जास्त डोकं न खाजवता याबाबत माहिती हवी असेल तर सरळ TATAच्या http://jaagore.com/ या साईटवर जा. तिथे “REGISTRATION PROCESS” वर क्लिक करा - http://jaagore.com/faq.html#1 इथे तुम्हांला हवी ती सगळी माहिती मिळेल.

“अपने को क्या करनेका है!?” या मुंबईय़्य़ा भाषेतील प्रश्नाने सगळ्याची वाट लावली आहे. मात्र हा प्रश्न मी तरी पुन्हा विचारणार नाहि. येत्या ७-८ महिन्यात महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आहेत. त्यात ज्याचे माप त्याच्या पदरात टाकायला मी तयार होतोय. सगळे एक प्रश्न विचारतात – “सगळेच चोर आहेत साले,काय फरक पडणार?” तर त्यांना सांगतो – मग त्यातल्या त्यात कमीतकमी चोर असेल त्याला वोट करा.

उठा, दाखवा तुमची ताकद! “YOU” can make a difference!

निवडणुकिच्या दिवशी जर तुम्हि वोट करत नसाल तर तुम्हि झोपला आहात, आपणच झोपलो तर देश कसा जागेल? जागो रेऽऽऽ


- सौरभ वैशंपायन.

Wednesday, October 22, 2008

पालपुराण!

ईऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ असे ओरडुन तीने मला घट्ट मिठी मारली. मला नक्कि काय झाले ते समजले नाहि, पण लग्गेच फिल्म मध्ये दाखवतात तसे बासरीचे प्रसन्न background music कानात आपसुक वाजायला सुरुवात झाली. मुळात काय झाले हेच माहित नसल्याने तीने ती मिठी आनंदाने, दु:खाने कि घाबरुन मारली होती हे मला कळेनासं झाल. पण सुरुवातीला तिने जो ईकारान्त स्वर काढला होता त्यावरुन घाबरुन तिने मला मिठी मारली असावी असा अंदाज मी बांधला(कारण मुली ८०% वेळा हाच स्वर वापरतात आणि हा आनंदाचा देखिल असु शकतो you never know). तिच्या मिठीतुन सुटण्याचा अज्जिबात प्रयत्न न करता मी शांतपणे विचारले “काय झाल?”, “ भिंतीवर बघ” - ती, मी म्हणालो “घड्याळ आहे! मग काय झालं?” तशी माझावर डाफरली “इडियट, उजवीकडे बघ! २-२ पाली आहेऽऽऽऽत!” मग मी उजवीकडे बघितले दोन पाली एकमेकांकडे तोड करुन भिंतीवर चिकटल्या होत्या. मध्येच एक पाल चुकचुकली पण हे चुकचुकणे समोरच्या पालीसाठी होते कि हि सुंदर कन्यका माझ्या मिठीत आल्याबद्दल होते ते मला समजले नाहि. मी तिला म्हणालो “अग घाबरतेस काय? पाल म्हणजे काय मगर आहे कि डायनॉसोरस?” तशी रडवेल्या स्वरात म्हणाली “ते बरे, त्यांची भिती तरी वाटते किळस नाहि!” तसा मी अजुनहि शांत होतो. इथे कोणाला घाई होती मिठी सोडवण्याची? पण ती मध्येच माझ्यावर ओरडली “अरे बघतोस काय? हाकलव ना त्यांना!” आणि मग लहान मुले हॉरर फिल्म बघताना डोळ्यांच्या कडेतुन किंवा बोटांच्या फटितुन बघतात तशी एका डोळ्याने ती पालींकडे बघायला लागली.

नाईलाजाने मी पालींना “शुकऽऽ हुश्शऽऽहुर्रऽऽ“ असे त्यांना झेपतील असे आवाज काढुन हाकलवायचा प्रयत्न करु लागलो. हि एका डोळ्याने तो चित्तथरारक प्रसंग बघत होतीच. पण झाल उलटंच त्यातली शिशुपाल(लहान पाल) वर सरकण्याऐवजी चार बोटं खालीच सरकली तशी खसक्कन मान वळवुन “आंऽऽऽऽऽ“ असा अनुनासिक स्वर तिने काढला आणि माझ्या शर्टचा चोळामोळा करत तिने तिची पकड अजुन घट्ट केली. तिचे लक्ष नाहि असे बघुन मी हाताने पालीला “जा” ऐवजी “ये-ये” अशी खुण करु लागलो. परत मी “शुकऽऽ हुश्शऽऽहुर्रऽऽ“ असे आवाज काढुन बघितले, न जाणो हिच “पाली भाषा” असायची आणि त्या आवाजांपैकी एकाचा अर्थ “खाली ये” असा असेल तर? म्हणून मी नेटाने आवाज काढणे सुरु ठेवले होते. आता मात्र ती पाल वर-वर गेली, तशी दुसरी पाल परत चुकचुकली. प्रत्येक ५ सेकंदानी ’इकडुन’ प्रश्न येत होता “गेल्या का? – गेल्या का?” . मी उत्तर न देता फक्त “शुकऽऽ हुश्शऽऽहुर्रऽऽ“ असे आवाजच काढत होतो त्यावरुन त्या अजुन आहेत असे तिला आपोआप समजत होते व त्यामुळे ती जैसे थे स्थितीत उभी राहिली. व्वा! काय प्रसंग होता? पाली भिंतीला चिकटल्या होत्या आणि ती मला!

अखेर त्या दोन्हि पाली कुठल्याश्या कपाटामागे लुप्त झाल्या(बॅड लक). मी फारच जड अंत:करणाने तीला “हुं गेल्या गं!” असे सांगितले तशी मग ती दोन पावले मागे सरकली. परत-परत भिंतीच्या या टोका पासुन त्या टोकापर्यंत नजर भीरभीरवत ती बाजु झाली. मग जीवाचे असे हाल करुन वर लाडिक आवाजात “ओह सॉरीऽऽ“ असेहि म्हणाली. “मोस्ट वेलकम!” हे शब्द मी जीभेकडुन पडजीभेकडे ढकलले. “मला ना लहानपणा पासुन पालीची किळस वाटते! एकदा माझ्या अंगावर पडली होती, तेव्हापासुन पाल म्हंटलं कि ….यॅक !” असं म्हणुन तीने चेहरा शक्य तितका वाकडा केला. मी मनातल्या मनात त्या पालीची दृष्ट काढुन टाकली.

मग मला उगीच सुरसुरी आली –

मी: बर झालं ना मी बंगाली नाहिये ते?

ती: का?

मी: बंगाली असतो तर बहुदा माझे आडनाव “पाल” असते. (यावर ती खीखी करुन मनापासुन हसली.) पण मग मला सांग…

ती: काय?

मी: समजा माझे आडनाव “पाल” असते तर आत्ता तु मला मिठी मारली असती का? कि भिंतीवरची पाल आणि हा मनुष्य पाल यांच्यात गोंधळुन उभी राहिली असतीस?

ती: आता हा फालतु प्रश्न आहे, मुळात तुझे आडनाव पाल असते तर मी तुझ्याशी मैत्रीच केली नसती.(आईचा घो रेऽऽ! पोरगी स्मार्ट आहे यार, साला हा विचारच केला नव्हता!)

मी: “अगं घरात असावी एखदि पाल!”

ती: शीऽऽऽऽऽऽऽ ती कशाला?

मी: अगं म्हणजे झुरळं होत नाहित घरात (आता अजुन काय सांगणार? खर कारण म्हणजे मगाचा ऍक्शनरीप्ले होत रहावा हेच होतं)!

ती:यॅऽऽऽक, अशी पाल वगैरे असेल तर मी परत नाहि हं येणार तुझ्या घरी! त्या पालींना घराबाहेर काढ आधी.(आयला, आला का प्रॉब्लेम? समस्त पाल जमात माझ्यासाठी अडचण ठरत होती. उद्या केलं प्रपोज आणि फक्त घरात पाली आहेत म्हणुन ती नाहि म्हणाली तर?)

मी: बरं बाई! तु गेल्यावर हाकलवीन झालं समाधान?

ती गेल्यावर आधी त्या पालींना घरा बाहेर हुसकावलं(बिचार्‍यांनी माझ्या आयुष्यात काहि अतिसुंदर क्षण आणल्यावर असे करणे शुध्द कृतघ्नपणा होता हे मला समजत होतं, पण माझाहि नाईलाज होता. माझ्या लग्नानंतर नक्कि परत बोलविन या बोलीवर त्यांना बाहेर हुसकावले!) . आणि लगोलग काहि गोष्टिं ठरवुन टाकल्या – १)आम्रपाली हा चित्रपट बघायचा नाहि. २)अर्जुन रामपालचे चित्रपट बघायचे नाहित(तसहि कोण त्या ठोकळ्याला बघतोय?) ३)श्री नायपाल(कि नायपॉल? एकच ते) यांच्या पुस्तकाला कितीहि पुरस्कार मिळाले तरी ते वाचायचे नाहि ४)पाली गावात जायच नाहि, अष्टविनायकांपैकी सात जणांनाच भेट द्यायची. आणि ५)निदान “होकार” येईपर्यंत पाल अथवा पाली अश्या कुटल्याहि उच्चाराशी संबधित गोष्टिंची आपण संबध ठेवायचा नाहि.


तुर्तास इतकच!

------------------------------------------
डिस्क्लेमर: दुर्दैवाने हि घटना व यातली "ती" अजुन तरी पुर्णत: काल्पनिक आहे. हे ज्या दिवशी खरे होईल त्या दिवशी हा डिस्क्लेमर काढण्यात येईल याची आगाऊ नोंद घ्यावी.
------------------------------------------


- सौरभ वैशंपायन.

Monday, October 20, 2008

वेठबिगारी

सध्या घरात वेठबिगारीवर काम करतोय. म्हणजे दिवाळी आधीची आवराआवर!
दिवाळी टु दिवाळी काहि काम करायची असतात त्यापैकी एक म्हणजे माळा आवरणे, पलंग, मोठ्ठे लोखंडि कपाट, ह्या गोष्टि पोटात खड्डा पडेपर्यंत जोर लावुन (विनाकारण)जागेवरुन हलवायच्या असतात. चुकुन "अग जाऊदे ना! कोण कपाटं हवलुन त्याच्या मागे बघणार आहेत?" असा प्रश्न तोंडुन निघुन गेला कि "हे बघ हे मलाहि समजत तु अक्कल शिकवायची गरज नाहिये, सांगतेय ते नीमुटपणे कर, तुझ्यापेक्षा ३० पावसाळे जास्त बघितले आहेत मी, हां आता तु शिकव मला, मागच्या वर्षी देखिल हेच म्हणाला होतास, कपाटामागे किती जंजाळ आहे ते माहिती आहे का? दोन आठवड्यांपूर्वी रद्दी काढायला सांगितली होती ती तश्शीच, मित्र-मैत्रिणींच्या हमाल्या करायला सांगा एका पायावर तयार मी चुकुन काहि सांगितल तर तोंड वाकडे, आमची कींमतच नाहिये कोणाला!!!!" अशी सगळी हुकमी वाक्ये एका नजरेतुन टपाटप पडतात. म्हणुन मग काहिहि न बोलता हो हुक्म म्हणत झाडु, पोतेरी, पिशव्या, केरभरणी अशी अस्त्रे-शस्त्रे बळजबरी हाता कोंबली जातात. "अरे उंच आहेस ना? नुसता हात वर केलास तरी छतापर्यंत झाडु पोहचतो तुझा, मला मेलीला खुर्ची घ्यावी लागते!" अशी प्रस्तावना करत या गोष्टिंनी तुम्हांला एखाद्या बंदुकिप्रमाणे लोड केलं जातं.

कालहि आईने हसत-हसत चहाचा कप हातात दिला - "आज ओट्याखालची आवराआवर करायची आहे!" मी काहिहि उत्तर/रीऍक्शन/प्रतिक्रिया न देता पेपर मध्ये तोंड घातले.

आई: "अरे काय म्हणतेय मी?"

मी: "हं"

आई: "मग जरा थोबाड उघडुन करतो म्हण कि"

मी: "हं, करतो!"

आई:"हे बघ आधी पुढचे डबे काढुन इथे ठेव ओलं कापड देते डब्याची झाकणं पुसुन ठेवत जा दोन्हि कामं होतील!"

मी: "हे बघ मला ज्या गोष्टिंची अडगळ वाटेल ते मी फेकणार थांबवणार नसशील तरच ओटा डिपार्टमेंटला हात लावणार. एकतर ओटा हा फारच संवेदनशील भाग आहे घरातला. दिवसभरातुन किमान एक हजार एकशे एक वेळा पुसला जातो!"

आई: "...आणि म्हणुनच तो स्वच्छ राहतो. मेलं एक दिवस काय काम करायला सांगितलं तर अटि घालतात, आमची किंमतच कुठे आहे!"

मी: "ऑफर आपके सामने है! हां या ना?"

आई: "ठिक आहे पण मला दाखव आणि मगच टाक."

मी: "म्हणजे थोडक्यात जैसे थे?"

आई: "चहा पिऊन झाला कि लग्गेच कामाला लाग, मला नंतर तिथे स्वयंपाक करायचा आहे!" (माझ्या प्रश्नाला आईने मुरलेल्या राजकारण्या प्रमाणे "कट" मारला होता.)


भारतात बालमजुरांची वयोमर्यादा फक्त १४ असल्याचे दु:ख झालेल्या काहि क्षणांपैकी काहि क्षण गोंजारत मी कामाला सुरुवात केली. या "बायका" कॅटेगरीचं मला फाऽऽऽऽऽऽर कौतुक वाटतं. "लागेल कधीतरी" या घोषावर अनेक चित्रविचित्र किंवा त्याच त्याच गोष्टि जमा केल्या जातात. मी सामान काढलं तसं मागे उभं राहुन "हळु, तेल आहे!" किंवा "ग्लासचा बॉक्स सांभाळुन काढ. मागच्यावेळी बाबांनी त्यातला एक फोडुन झालाय ऑलरेडि!" अशी हतविर्य करणारी वाक्ये(हुकुम) "चॅलेंज" खेळल्या सारखी "मेरा एक और" करत टाकली जात होतीच.

डब्यांची पहिली रांग संपल्यावर मग अलीबाबाची खरी गुहा उघडली. रीकाम्या बरण्या, बरण्यांची झाकणे, टप्परवेअर(हा एक घाणेरडा प्रकार असतो, बायकांना जाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽम कौतुक असतं या प्रकाराचं. इतका बेक्कार प्रकार मी अजुन पाहिला नाहिये.) दुधाचे २ कुकर, चकलीचे साधारण ५ सोर्‍ये( सोर्‍येच ना?) पिशवीत पिशवी पिशवीत पिशवी असे काहितरी काळॆ-मिठ किंवा तत्सम काहितरी हाताला लागत होते.

हे सगळं काढताना मी चेहर्‍यावर आयुष्यभराचे त्रासिक भाव आणुन "काय हे? बरण्या-बरण्या-बरण्या-बरण्या, सोर्‍ये-सोर्‍ये-सोर्‍ये-सोर्‍ये, झाकणं-झाकणं-झाकणं-झाकणं" अशी प्रत्येक गोष्टिची चारवेळा यादि करत होतो. मागुन आईने एकदा ऐकल, दोनदा ऐकलं मग आईने ऐकवलं - "बघु ना! तुझी बायको आली कि बघुच! तेव्हा तीने काहिहि केलं तरी चकार शब्द काढणार नाहिस. लिहुन ठेव!" मग मी "काहि म्हणालीस का?" असे भाव करुन परत ओट्याखाली डोकं घातलं. मग परत डोकं बाहेर काढुन आईला विचारलं - "आई!! आजीनी बाबांना असंच म्हंटल असेल का गं?" असा सरळ साधा प्रश्न केला. त्यावर आईनी "अनुल्लेखाने मारणे" हा उपाय वापरला. मला आजकाल आईची भीती वाटते काहिहि झालं तरी आई माझ्या होणार्‍या बायकोवर जाऊन पोहोचते. ती कोण आहे ते अजुन तरी मला माहित नाहि(म्हणजे तश्या मी बर्‍याच जणी आईला सुन म्हणुन ठरवुन ठेवल्या आहेत!) पण तिला जिथे असेल तिथे बर्‍याच उचक्या लागत असतील हे नक्कि!(त्यातल्या प्रत्येकिला विचारलं पाहिजे "काल तुला उचक्या लागल्या होत्या का?" म्हणजे पत्रिका वगैरे बघायला नको ना!)

असो, तर सध्या वेठबिगार म्हणुन काम करतोय, मोबदला म्हणुन दोन कप चहा, दोन वेळच जेवण आणि झोपायला थोडि जागा दिली जाते. विनोद सोडा पण आवरायला काढलेली जागा दुसर्‍या दिवशी बघुन "वा! बर झालं आवरलं. आता पुढच्या दिवाळीपर्यंत आराम!!" असा विचार येतो आणि सुटलो बाबा एकदाचा म्हणुन निश्वास टाकतो न टाकतो तोच "अरे पंखे पुसायचे आहेत आज!" असा आईचा खुऽऽऽऽऽप प्रेमळ आवाज येतो तिच्या हातात एक चहाचा वाफाळता कप असतो आणि चेहर्‍यावर "आज इतक तर कर उद्या काय करायच ते आज ठरवुन ठेवते!" अश्या आशयाचे स्मित असते. मग चहा संपवुन परत "बालमजुर" वेठबिगारीला जुंपला जातो!

- सौरभ वैशंपायन.

Friday, October 17, 2008

विक्रमादित्य



११,९५३ – ११,९५३, अरे नाहि नाहि शेअरमार्केट चा निर्देशांक नाहिये हा. सकाळी प्रत्येक क्रिकेट रसिक हि संख्या घोकतच उठला असेल. करोडो रुपयांचे कोलगेट स्माईल देणार्‍या, स्विपशॉट किंवा लॉंग ऑफ ला चेंडु तडकावणार्‍या सचिन तेंडुलकरच्या एखाद्या पोस्टरला त्यांनी मनोभावे नमस्कार केला असेल आणि “सच्चिन धाऽऽऽऽऽऽऽऽऽव रे! धाव!” अशी आर्त साद त्या क्रिकेटच्या देवाला घातली असेल. “सचिन तेंडुलकर लारापेक्षा फक्त १५ धावा मागे”, “सचिन विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर” अश्या मथळ्यांशिवाय “आज सचिन विश्वविक्रम घडविणार” या वाक्यासमोर “उद्गारचिन्हा” ऐवजी “प्रश्नचिन्ह” बघुन माझ्याप्रमाणेच अनेकांची “खचकली” असेल. “इडियट सालेऽऽ हा काय प्रश्न झाला का?? झक मारायला पत्रकार आणि क्रिडा समिक्षक झाले का?? तेंडल्या म्हणजे काय यांना म्युनसिपाल्टिचा बेजबाबदार अधिकारी वाटाला काय??” असे प्रश्न चेहर्‍यावर आपसुक आले असतील. तर काहि विघ्नसंतोषी समाजकंटक किंवा ऑस्ट्रेलियाचे कट्टर भारतीय समर्थक “सचिनने आज १३ धावा केल्या तरी बस झालं!” , “सचिन म्हातारा झालाय, सचिनला हाकला” असे म्हणत कडकडा बोटं मोडत बसले असतील.

पण “सचिन संपला” हि गोष्ट ०८-०८-२००८ किंवा ०९-०९-२००९ या दिवशी जगबुडि होणार इतकीच धादांत खोटि आहे. जेव्हा डॉन ब्रॅडमन म्हणाले “सचिन माझ्यासारखाच खेळतो!” तिथे अवघा संदेहो तुटला आहे. सचिन हा प्रत्यक्ष इश्वरी अवतार आहे या एकाच गोष्टिवर मी डोळॆ झाकुन विश्वास ठेवतो. ब्रायन लारा हा देखिल माझासाठी देव असला तरी तो गावकुसा बाहेरचा देव झाला. माझ्या देव्हार्‍यात सचिन-गावस्कर-कपिल-कुंबळे-गांगुली हे पंचायतन आहे. यातल्या शेवटच्या ३ नावांवर काहिजण हसतील देखिल पण हसोत बापडे, भारत जिंकावा म्हणुन मी व अनेकांनी केलेले अनेक नवस याच पंचायतनाने पूर्ण केले आहेत यात वाद नाहि. गावस्कर-कपिल यांना प्रत्यक्ष खेळताना पाहिल्याचं फारच अंधुक आठवतय. कपिलने विश्वचषक उचलला तेव्हा माझा जन्म देखिल झाला नव्हता. पण तरी त्यांचं देव्हार्‍यातील पारंपारीक स्थान मी हलवले नाहिये. पाकिस्तानच्या १० गड्यांना एकहाती तंबुत पाठविणार्‍या कुंबळेचा बॉल बर्‍याचदा सुतापेक्षाहि सरळ जातो हे माहित असुनहि मी त्यावर तुडुंब खुष आहे. त्याला कोणी कितिहि डिवचल तरी त्याला जे काहि सांगायच-करायचय ते तो मैदानात सिध्द करतो. सौरव गांगुलीबाबत म्हणाल तो उद्दाम आहे पण महाराजा उद्दाम वागणारच. साध्या सोज्वळ भारतीय संघाला त्यानेच “अरे” ला “का रे?” विचारायची हिंमत दिली हे कोणी नाकारु शकत नाहि. इंग्लंडला नॅटवेस्ट सीरीज जिंकल्यावर त्याने टि-शर्ट गरगरवुन फ्लिंटॉप आणि कंपनीला जी काहि म्हणुन खुन्नस दिली होती त्यासाठी मी त्याच्यावरुन १०० ग्रेग चॅपेल ओवाळुन टाकले आहेत. मध्ये त्याच्या माजोरडेपणामुळेच वर्षभर त्याला टिममधुन बाहेर ठेवलं होतं. पण पिंजर्‍यात गेला म्हणुन वाघ गवत खात नाहि हेच त्याने धडाकेबाज पुनरागमन करुन सिध्द केलं. सध्या महाराजाचं संस्थान खालसा होण्याच्या मार्गावर आहे पण तो महाराजा होता आहे आणि राहिल. तर सचिन – सौरव गांगुली किंवा कुंबळे यांना हातात कधी बॅट न पकडलेल्यांनी किंवा सोबर्सला आपणच बॅटिंग शिकवली होती अणि वॉर्नला आम्हिच चेंडु वळवायला शिकवल होतं अश्या तोर्‍यात टाकुन बोलणार्‍यांचा मला मनस्वी राग आहे. तसा तर सचिनला किंवा अनिल कुंबळेला नावे ठेवणारा प्रत्येक जण माझासाठी समाजकंटक असुन त्यांना किमान ५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा द्यावी अशी एक जनहित याचिका मी न्यायालयात दाखल करायच्या विचारात आहे.

असो, तर मुळ मुद्दा ११९५३ या संख्येचा आहे. सचिन रमेश तेंडुलकर हा (देव)माणुस ब्रायन लारा नामक व्यक्ती पेक्षा फक्त १५ धावांनी मागे होता. बंगरुळ कसोटितच हा विक्रम तो मोडणार असे वाटत असताना हाय रे दैवा घात ची झाला. वैयक्तीक १३ धावांवर असताना तो बाद झाला होता. मात्र आज(१७-१०-०८) त्याने ८८ धावा ठोकत आपल्या अर्धशतकांचेहि अर्धशतक साजरे केलेच पण त्याने लाराचा ११,९५३ धावांचा विक्रम मोडला आता १२,०२७ धावांसहित तेंडुलकर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. तसे बघता सचिन विक्रम करण्यासाठी कधीच मैदानात उतरत नाहि पण तो मैदानात उतरला कि किमान ५ सामन्यांमागे एखादा विक्रम त्याच्या नावावर आपोआप घडत जातो. आज फलंदाजी मधले कुठले असे विश्वविक्रम सचिनच्या नावावर उरले आहेत हा पीएच डि करण्यासारखा विषय आहे. आता त्याच्या पाठी लारा ११,९५३, ऍलन बॉर्डर ११,१७४, स्टीव वॉ १०,९२७, राहुल द्रविड १०,३४१ आणि रीकी पॉंन्टिंग १०,२३९ असे पाच जण त्यातल्या त्यात ’जवळ’ आहेत त्यापैकी लारा, बॉर्डर आणि स्टिव वॉ हे तर क्रिकेट मधुन निवृत्त झाले आहेत. आणि द्रविड-पॉन्टिंग त्यापेक्षा किमान १६०० धावांनी मागे आहेत.

१५ नोव्हेंबर १९८९ या दिवशी त्याने वयाच्या १६व्या वर्षी कराचीत पाकिस्तान विरुध्द आपल्या कारकिर्दिची सुरुवात केली. आणि ३५ वर्षांचा सचिन आजहि भल्या-भल्यांच्या तोंडचे पाणी पळवत धावतोच आहे. आजवर त्याने ४१७ एकदिवसीय सामन्यांत एकुण ४२ शतके व ८९ अर्धशतकांसहित, ४४.३३ च्या सरसरीने १६,३६१ धावा कुटल्या आहेत. यात सर्वोच्च धावसंख्या आहे १८६* आहे. गोलंदाजीत ४४.१२ च्या सरासरीने १५७ विकेट्स मिळवल्या आहेत. १५२ कसोटी सामन्यांत एकुण ३९ शतके व ५० अर्धशतकांसहित ५४.०२ च्या सरासरीने १२,०२७ धावा काढल्या आहेत. २४८* या कसोटितील सर्वोच्च धावा आहेत.

सचिनला कॅप्टनशीप फारशी मानवली नाहि. नाहि म्हणायला टायटन कप जिंकला वानखेडेवर, पण तो अपवाद ठरला. त्याकडुन कर्णधारपद काढुन घेतले आणि परत त्याची फलंदाजी बहरली. तो नंतर गांगुली, द्रविड, सेहवाग, कुंबळे, धोनी यांच्या सोबत खेळाला पण त्याने कुठेहि आपण फार कोणी मोठे असल्याचे दाखवले नाहि. कर्णधार-प्रशिक्षक-निवड समिती यांच्या बरोबर त्याचे कधी वाद झाले नाहित. त्यांनी ठरवल त्या क्रमांकावर तो फलंदाजीला उतरला. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा सचिन म्हणुनच सर्वांचा आदर्श ठरला. हरभजन-सायमंड वादात तोच सर्वप्रथम हरभजनच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. वैयक्तीक आयुष्यात देखिल त्याने कधीहि वाद-विवादांना उपजु दिले नाहि. तो मध्ये सलग ३-४ सामन्यांत एकेरी धावसंख्येवर बाद झाला तेव्हा प्रेक्षकांनी त्याचे हुर्यो उडवली होती. पण सचिन खचला नाहि. खुद्द लतादिदि त्याच्यामागे उभ्या राहिल्या व त्यांनी विनंती केली "सचिनवर प्रेम करा, त्याची हुर्यो उडवु नका!" आणि सचिन "परत" आला.

सचिन तेंडुलकर एक गारुड आहे. सगळ्यांना लहानपणी तेंडुलकर व्हायची स्वप्ने पडतात. सगळ्यांना सचिनची प्रसिध्दी दिसते, त्याचे मान-मरातब दिसतात, त्याची पारीतोषके, दिसतात, त्याच्या जाहिराती आणि त्याची फेरारी दिसते पण सचिनची मेहनत किती जणांना दिसते? सचिनला एका मुलाखतीत विचारले तुझ्या यशाचे रहस्य काय? त्यावर सचिन उत्तरला: “there in no shortcut to success! Hardwork is the only way!” मेहनत-मेहनत-मेहनत हिच सचिनची त्रिसुत्री आहे. विनोद कांबळीची एक आठवण इथे सांगण्यासारखी आहे – "मागे एकदा इंग्लंड दौर्‍यावर गेले असताना सकाळी ६ वाजता भिंतीवर पलीकडुन काहितरी सतत धपऽधप असं आपटत होत, मी बघितले तर शेजारच्या खोलीत सचिन रबरी चेंडु घेऊन मॅचची तयारी करत होता!!" कदाचित बाकिचे खेळाडु व सचिन यांच्यात हा फरक आहे आणि म्हणुनच सचिन ग्रेट आहे.

सचिनने निवृत्त व्हावे असे म्हणणारे आता किमान पुढील २ सीरीजपर्यंत गप्प बसतील. तरी सचिन २०११ चा वर्ल्डकप खेळेल याबद्दल मला खात्री आहे. किंवा किमान त्याने एकदिवसीय सामन्यात ५० शतके व १०० अर्धशतके करावीत तर कसोटीत देखिल ५० शतके व ७५ अर्धशतके करावीत आणि मग वटल्यास निवृत्त व्हावे अशी "रास्त" अपेक्षा आहे. इथे त्यावर अपेक्षा लादल्या जात आहेत असे वाटेलहि पण सचिनला पुढील ३ वर्षात एकुण १९ शतके अज्जिबात कठीण नाहियेत.

आज सचिन सर्वोच्च धावा काढणारा फलंदाज झाला आहे. एक भारतीय आणि त्यातुन मराठी माणुस असे झेंडे उभारत चालल्याचा सार्थ अभिमान आहे. त्याचे नाव आता विक्रमादित्यच ठेवायला हवे. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवराय या दोन मराठी दैवतांची माफी मागुन या तिसर्या दैवतासाठी मी म्हणेन – “विक्रमांचा महामेरु। भारतीय संघासी आधारु। अखंड स्थितीचा निर्धारु। “श्रीमंत” योगी॥“


- सौरभ वैशंपायन.

Thursday, September 11, 2008

आठवण....

आठवते का? आकाशावर उमटुन गेली होती लाली,
आठवतो का? तोच रक्तीमा फुलला होता तुझ्याच गाली. - १

आठवले का? हळवे स्पर्श, नीसटती त्यांची हुरहुर,
आठवली का? उशीर होता लटक्या रागाची कुरबुर. - २

आठवतो का? ओंजळित फुलला होता चाफा धुंद,
आठवला का? सुवास कसला? चोरला त्याने तुझाच गंध. - ३

आठवली का? अधीर वचने अधराची अधराला,
आठवले का? चुकार अश्रु बिलगते पदराला. - ४

आठवते का? मी निघतो म्हणता घट्ट मीठि विणलेली,
आठवली मज, मला शोधती नजर तुझी शिणलेली. - ५

- सौरभ वैशंपायन(मुंबई).

Tuesday, September 9, 2008

श्यामसखा

कुणी नसावे दुरवर परी,
श्यामसखा जवळी असावा,
श्रावणधारांसवेच अलगद,
श्यामसखा बरसुनी जावा - १

श्यामसख्याच्या निळाईत अन मग,
गौरतनु हे रंगुन जावे,
वेणु त्याने लावताच ओठी,
सप्तसुरात दंगुनी जावे - २

श्यामसखा असा बरसता,
चंद्र लाजुनी चुरुन जावा,
सैलावल्या केसात अन मग,
स्पर्श जरासा उरुन जावा - ३

- सौरभ वैशंपायन.