Showing posts with label दुर्ग. Show all posts
Showing posts with label दुर्ग. Show all posts

Sunday, February 9, 2014

Geography Dictates strategy

जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या "Military History of India" पुस्तकातील एका प्रकरणाचे शिर्षक - "Geography Dictates strategy" असं फार बोलकं दिलं आहे. १६७४ साली भारतात आलेला फ्रेंच प्रवासी अ‍ॅबे कॅरे चौलला उतरला, तिथुन गोवा मार्गे तो विजापुरला जाणार होता. प्रवासाच परवाना काढण्यासाठी तो मराठ्यांच्या कचेरीत गेला. बोलण्या्च्या ओघात तिथल्या अधिकार्‍याने शिवाजी महाराजांबाबत त्याला २ महत्वाच्या गोष्टि सांगितल्या ज्या त्याने टिपून ठेवल्या - १) महाराज सर्वात जास्त खर्च हेरखात्यावर करतात व त्या माहितीच्या जोरावरती मोहीम आखतात, २) महाराजांनी स्वत:च्या व शत्रूच्या प्रदेशातील भूगोलाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला असून गरज वाटेल त्या प्रदेशाचे ते नकाशे तयार करुन घेतात. ...... Geography Dictates strategy.

..... पण म्हणून दिसला उंच डोंगर की बांध दुर्ग, दिसली बरी जमिन की बांध गढी असं नसतं. त्या मागे प्रचंड अभ्यास असतो. शतकानुशकतं झिरपत आलेलं ज्ञान व तत्कालिन गरज यांचा विचार करुन दुर्ग बांधावे लागतात. दुर्गांच मुख्य काम म्हणजे संरक्षण. गावांना, बाजार पेठांना, मंदिरांना, बंदरांना, खाड्यांना, व्यापारी मार्गांना, राजधानीच्या संरक्षणासाठी तिच्या भोवती, राज्याच्या सीमांवरती अश्या ठिकाणी दुर्ग उभारावे लागतात. अनेकदा गावांभोवती अथवा बाजारपेठांभोवतीच भक्कम तट उभारले जातात. गावांभोवती असलेली संरक्षक तटबंदि अथवा खंदक अनेक ठिकाणी आजही दिसतात. मराठ्यांच्या भितीमुळे त्यावेळी कोलकत्याच्या व्यापार्‍यांनी इंग्रजांच्या मदतीने हजारो रुपये खर्चून कोलकत्याच्या बाजारपेठी भोवती भला मोठा खंदक खणायला घेतला, आजही त्याचा बराचसा भाग शिल्लक आहे त्याला - "Maratha Ditch" म्हणूनच ओळखतात.
रायगड सारखा बेलाग बुलंद दुर्ग राजधानी म्हणून निवडला तरी रायगडचे दुर्गमत्व जसे स्वत:च्या स्थानात व बांधणीत आहे तसेच त्याचे दुर्गमत्व त्याच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या गिरीशिखरांवरती अवलंबून आहे. रायगडच्या चारही बाजूंना नजर फिरवली की - महेंद्रगड, पन्हाळगड (रायगड जवळचा), माणगड, लिंगाणा, कोकणदिवा व पसरलेला सरळसोट उभा सह्याद्री अशी ती अभेद्य जागा असल्याचे लक्षात येते. अनेकदा घाटांमध्ये अनेक चौक्या असत.

गिरीदुर्ग बांधताना अनेकदा एखादि मोक्याची जागा मिळे पण गोची अशी असे की त्या महत्वाच्या जागेला तोफेच्या टप्यात ठेवू शकेल, किंवा निदान मुख्य गडाची महत्वाची रसद मधल्या मध्ये बंद पाडू शकेल अशी दुसरी जागा आसपास असे. मग नाईलाजाने तिलाही तटबंदी बांधून तिथे लहान शिबंदी ठेवावी लागे. अनेकदा मुख्य गड जिंकायचा अथवा वाचवायचा तर ती तुलनेने दुय्यम जागाच युध्दाचे केंद्र बनत असे. अश्यामुळे महाराष्ट्रात व इतर अनेक ठिकाणी गडकोटांच्या जोड्या दिसतात -> पुरंदर - वज्रगड, पन्हाळा - पावनगड, अंकाई - टंकाई, साल्हेर - सालोटा, हि प्रातिनिधिक उदाहरणे. वास्तविक नाशिककडची एक डोंगररांगच रांगच दुर्गांनी सजल्याचे कारण हेच आहे - अचल, अहिवंत, वणी, रावळा, जावळा, कण्हेरा, धोडप, कुणदेव, हदगड, चांदवड, वेताळगड वगैरे वगैरे. नावे मोजताना धाप लागेल इतके दुर्ग तिथल्या गिरी शिखरांवरती आहेत. नाशिककडून त्या भागातून येणारी - जाणारी प्रत्येक वाट किमान २ दुर्गांच्या नजरेखाली असे.

मात्र अनेकदा आधीच बांधलेल्या जागा अडचणीच्या बनत, त्या हेरुन ते गड पाडणेच शहाणपणाचे असे. महाराजांनी जसे अनेक दुर्ग बांधले तसे काही दुर्ग याच कारणाने जमिनदोस्त देखिल केले. १६४९ साली शिरवळचा कोट असाच पाडला. कारण जो कोणी शिरवळमार्गे पुढे सरके तो हमखास हा लहानसा कोट जिंकत असे व त्यात स्थान भक्कम केले की त्याचा धोका पुरंदरला होत असे. भवनगिरी पट्टण, सावशी हि अजून काही उदाहरणे, हे गड पाडण्याची आज्ञा करणारी पत्रेच उपलब्ध झाली आहेत. हे सर्व करायला अर्थात बराच खर्च येत असे, पण पुढची सुरक्षा लक्षात घेऊन तो खर्च करुन गड पाडत. दक्षिणेत देखिल महाराजांनी असेच -२/३ दुर्ग बेवसाऊ करुन पाडले. ऐन कानडि मुलखात उभारलेल्या साजरा - गोजरा जवळचा एक कोट असाच त्यांनी पाडला.

अनेकदा बेवसाऊ झालेले दुय्यम दुर्ग पुन्हा अनेक कारणांसाठी पुन्हा वसवावे लागत. १३ मे १६५९ मध्ये बांदलांना लिहिलेल्या एका पत्रात बांदलांचा देशमुख "रायाजी" वयाने लहान असल्याने मुख्य सरदार असलेल्या बाजीप्रभू देशपांडे यांना उद्देशुन त्यांनी लिहिले आहे कि "तुमच्या रहाळात (हिरडस मावळ)  जासलोडगड (हा सध्याचा कावळ्या कि दुर्गाडि याबाबत शंका आहेत.) सध्या ओस आहे, त्याला पुन्हा भक्कम करुन त्याचे नाव "मोहनगड" ठेवा. मी इथून २५-३० असामी पाठवतो आहे त्यांना तिथे आळंदा (पहारेकर्‍यांसाठीच्या इमारती) बांधून द्या." हा गड तसा छोटासाच पण अफझखान येणार त्याच्या पार्श्वभूमीवरती महाराज हे सांगत आहेत. प्रतापगड परीसरात लढाई झाली तर जीव वाचवायला विजापूरी सेना वरंधा, चिकना वगैरे घाटांकडे सरकली तर इथून त्यांवर लक्ष ठेवता येईल हा विचार त्या मागे आहे. अफझलखानाचा वध १० नोव्हेंबर १६५९ रोजी केला महाराज हि आज्ञा मे मध्ये देत आहेत हे लक्षात घ्या.


शत्रुची प्रगत शस्त्रात्रे व आजूबाजूला फायदेशीर ठरेल अशी परीस्थिती लक्षात घेऊन दुर्ग वसवावे लागतात. तोफा आल्या आणि दुर्ग बांधणीचे तंत्रच बदलले. महाराजांनी जे दुर्ग बांधले अथवा दुरुस्त करुन घेतले त्यात मोठा बदल म्हणजे गडाचा दरवाजा नेहली दोन बुरुजांच्या आड लपवला - त्यालाच गोमुखी रचना म्हणतात. अर्थात त्याने तोफेचा गोळा कधीच दरवाज्यावरती थेट बसत नसे. अनेकदा तटांची उंची मुदामहुन लहान ठेवत कारण तोफेतुन सुटलेला गोळा परस्पर तटबंदिवरुन पलीकडे निघून जात असे. काहिवेळा तटबंदि देखिल फारशी भक्कम नसे चार - सहा गोळ्यात ती ढासळेल अशी असे मात्र त्याच्या आजूबाजूचा प्रदेशच असा असे कि तोफा त्या भागात आणणे जवळपास अशक्य सोपे उदाहरण म्हणजे वाळवंटातील गडकोट .... आजूबाजूला नजर जाईल तिथवर रेतीचा समुद्र, तोफा वाळूत फसायची १००% हमी, त्यामुळे आजूबाजूचा प्रदेश अश्यांचे दुर्गमत्व आपोआप वाढवत असे.
महाराजांनी असे ३६० हुन अधिक दुर्ग राखले होते. "उद्या खासा आलमगिर दख्खनेत उतरेल, माझा येक येक कोट त्याविरुध्द येक येक वरुस लढला तरी त्याला दख्खन काबिज करावयास ३६० वरुसांचे आयुष्य लागेल!" हा दांडगा आत्मविश्वास त्या महामानवाच्या मनात होता. त्याचा इतिहासही आपल्याला माहित आहे. त्यानंतर मराठा साम्राज्य वाढले, अटक ते कटक या पट्यात क्वचितच असा गड असेल ज्यावर भगवा फडकला नसेल. अटक, पेशावर, लाहोर, मुल्तान, आग्रा, अगदि लाल किल्यावरती तब्बल १४ वर्ष भगवा फुरफुरला होता.
ज्या गडकोटांनी आपले स्वातंत्र्य मिळवून दिले, ते अबाधित राखले त्यांचे मोजकेच पैलू, व इतिहास आज आपल्याला माहित आहेत. मराठ्यांनी किमान एकदा पाय ठेवलेल्या ठिकाणी भेट देऊ असे ठरवले तरी ओरीसातील कटक पासून ते आजच्या पाकिस्तानातील अटकपावेतो जावे लागेल. या दुर्गांचा इतिहास बोलका केला पाहिजे. त्यांचे दुर्गमत्व प्रकाशात आणायला हवे. कदाचित तरच आपण इतिहासाच्या ऋणातुन अंशात्मक मुक्त होऊ शकू.
 - सौरभ वैशंपायन.

Monday, February 4, 2013

स्पंदने


भर थंडित त्याच्या अस्ताव्यस्त पहुडल्या उघड्या, काळ्या, थंडगार पडलेल्या अंगावरती मी हात टेकवला, खरंतर मलाच तेव्हा आधाराची गरज होती. त्याच्या थंड पडलेल्या देहातली धुगधुगीही अजूनही जाणवत होती. त्याच्या राकट कणखर देहातल्या नसां हाताला जाणवत होत्या. त्यात कधीकाळी गरम लाव्हाच वाहिला होता. त्याचे श्वासही सुरु होते. मी दूरवरती नजर फिरवली. उन्हं चढायला नुकतीच सुरुवात झाली होती. मी देखिल दूरुन त्याला भेटण्यासाठी बराच वेळ चालून आल्याने माझ्या अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्याच. मी आल्याचा त्याला आनंद झाला होता की नव्हता मला कळत नव्हतं. बहुदा त्याला त्याचं सुखं दुखं काहीच नसावं. त्याची सध्याची एकंदर अवस्था गीतेच्या स्थितप्रज्ञाची झालीये. कधीकाळी ज्यांच्या बापजाद्यांना त्याने सर्वतोपरी मदत केली होती आज त्यांचे वंशज त्याकडे फार अनोळखीपणे बघतात. ओळख दाखवणारे अर्थात माझ्यासारखे हजारो रोज त्याला भेटायला येतातही, काही त्याच्या जुन्या आठवणी जागतात. पण त्याला भेटायला येणारे अर्धाधिक तर उलट त्याला नवीन जखमाच देऊन जातात. अश्या अनोळखी माणसांमुळे असेल कदाचित विरक्ती हाच त्याचा स्वभाव बनला आहे. त्याच्या सध्याच्या अवस्थेकडे बघून कधीकधी फार गलबलून येतं. त्याचं डोकं मांडिवरती घेऊन त्याला प्रेमाने थोपटता आलं असतं तर किती बरं झालं असतं असंही वाटून जातं. त्याची अवस्था मात्र समाधी लागल्यागत असलेल्या संन्याश्यासारखी क्वचित स्वत:त गुंगलेल्या निष्पाप मुलासारखी. कधी कधी काही ओळखीचे आवाज आले की चेहर्‍यावरती ओळखीचे हसू येतं, वळून बघतो देखिल, पण तितक्यापुरतच. इतरवेळी गुडूप अंधारात स्वत:ला हरवून टाकतो. त्या अंधारात त्याला बघणारं कोणी नसतं. मग डोळे मिटून उसासे टाकत शांत झोपला कि रोज रात्री त्याला स्वप्न पडतात. त्याचे जूने वैभवाचे दिवस त्याला दिसतात त्याच्या डोईवरती चढवलेली मोठी पागोटी, अंगावर खास त्याच्यासाठीच घडवलेले दागिने ..... अचानक त्याला वास्तवाची जाणीव येते तो दचकून जागा होतो, परत परत विस्कटलेली पागोटी, तुटलेले दागिने बघतो त्यालाही मग भरुन येतं. त्याच्या डोळ्यांच्या कडांनाही पाणी साठतं, छाताडावरती वाट्टेल ते घाव सहन करणार्‍या त्याला, ते अश्रू घरंगळताना कोणीतरी पाहील ह्याची तितकी भीती वाटत रहाते. त्याच्या सुदैवाने त्याचवेळी आकाशात वीजा कडाडून पाठोपाठ धो धो पाऊस सुरु होतो त्याचे अश्रू आणि पाऊस यातला फरक फार कुणाला समजत नाही. ज्यांना समजतो ते त्याच्या जवळ जातात. त्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच्या विशाल, पिळदार देहापुढे सगळेच हात चिमुकले वाटतात. पण तरीही मी त्याला बिलगतो, त्याच्या निधड्या छातीवरती डोकं ठेवतो. नीट कान देऊन ऐकलं तर त्याच्या हृदयाची लयबद्ध स्पंदने देखिल ऐकू येत रहातात - शिवाजी ... शिवाजी ... शिवाजी ... शिवाजी.

 - सौरभ वैशंपायन.

Tuesday, January 29, 2013

दुर्ग भांडार




सहा - सात महिन्यांपूर्वी माझ्या ओळखीच्या व्यक्तीच्या अल्बममध्ये मी दुर्ग भांडारचे फोटो बघितले होते. त्यादिवशीपासून दुर्ग भांडारला जायची संधी शोधत होतो. माझ्या ओळखीचे जे काही २-३ ट्रेकिंग ग्रुप आहेत त्यातल्या सगळ्यांची डोकी या प्लानवरुन खाऊन झाली होती. अखेर परवा २६ जानेवारीच्या मुहुर्तावरती पोदार कॉलेजच्या ग्रुप बरोबर जायची संधी मिळाली.

दुर्ग भांडार हा नाशिक जवळील ब्रह्मगिरीच्या डोंगराचाच एक भाग आहे. दररोज शेकडो व शनिवार - रविवारी हजारो लोकं ब्रह्मगिरी व जटा मंदिरात दर्शनासाठी येतात पण फारच कमी लोकांना पुढे एखादा दुर्ग आहे ह्याची कल्पना असते. माझ्या आजवरच्या अविस्मरणिय ट्रेक्सपैकी दुर्ग भांडार पहिल्या पाचांत ठेवायला हरकत नाही. जटामंदिरवरुनच पुढे अक्षरश: १५-२० मिनिटांच्या अंतरावरती हा दुर्ग सह्याद्रिच्या काळ्याकभिन्न कातळात "खोदून" काढलेला आहे. अर्थात जटामंदिर ते गड मधली वाट ही रेताड, भुसभुशीत, ढिसाळ, वगैरे शब्दांना आपल्यात सामावणारी व जेमतेम ’एक पाय नाचू रे गोविंदा’ करत पार करावी लागत असल्याने त्या दिशेला कोणी फिरकत नाही. चूक झाली तर डाव्या बाजूला २०-२५ फुटांचा अतिशय तीव्र उतार व मग थेट दरी आहे. ज्यांना ट्रेकची फार सवय नाही त्यांच्यासाठी कींवा आयुष्यातल्या पहिल्याच ट्रेकसाठी हा गड नक्किच नाही.


मी वर म्हणालो तसा कातळात "खोदून" काढलेला हा माझ्या पाहण्यातला पहिलाच गड आहे. मुळात तिथे गडाची मुख्य डोंगराहुन वेगळी अशी बांधणी दिसतच नसल्याने गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्या शिवाय खात्रीच होत नाही की इथे कुठलाही दुर्ग असेल. जवळ गेल्यावर ५-६० फुटांवरुनही प्रथमदर्शनी त्याचे प्रवेशद्वार हे सुरुवातीला पाण्याचे खोदलेले टाकेच असावे असे वाटते. कारण या वाटेच्या आधीच्या ट्प्यावर खरंच एक पाण्याचे टाके आहे. वापरात नसल्याने पाणी अस्वच्छ आहे. मात्र एकदा का त्या चिंचोळ्या वाटेपाशी पोहोचलो की मती गुंग करणारे, अफाट मेहनत व सुरक्षिततेच्या दृष्टिने जबर शक्कल लढवलेले बांधकाम ..... नपेक्षा "खोदकाम" दिसते. उजव्या हाताच्या भिंतीत इतर गडांप्रमाणेच शिवकालिन असणारे हनुमानाचे शिल्प दिसते. आणि मग थोड्या सरळसोट उतरणार्‍या साधारण फुटभर उंचीच्या ५०-५५ पायर्‍या एखाद्या गुढ भुयारात उतराव्यात तश्या खाली घेऊन जातात. एका वेळि एकच माणूस जाऊ शकेल इतपतच जागा. हा कातळ पहारींनी, छिन्नी-हातोड्याने तब्बल ६० फूट तरी सरळसोट खोदला आहे. वरती बघितलं की आकाशाची भगभगीत पट्टी तेव्हढी दिसत रहाते. 

खाली पोहोचलो की अजुन एक अनपेक्षित गोष्ट आपली वाट बघत असते. ते म्हणजे गडाचे केवळ दोन - अडिच फुटि उंचीचे व फक्त तीन फुट लांबीचे पहिले प्रवेशद्वार. गडात शिरणार्‍या माणसाला आधी इथेच गुडघे टेकावे लागतात. लहान मुलाप्रमाणे रांगतच तिथून बाहेर पडावे लागते. हे तंत्र इतके जबरदस्त आहे की आतल्या बाजूला एक - दोन पहारेकरी जरी तलवार घेऊन बसले तरी ह्या गडाचे अगदी आरामात रक्षण करु शकतात. दरवाज्यातून प्रवेश करताना आधी डोके आत घालावे लागते दोन्ही हात जमीनीवरती टेकले असतात, गुडघे टेकल्याने कुठल्याही दिशेला सरकायचा वेग उरला नसतो आणि त्यातून चिंचोळी जागा. आत शिरु पाहणार्‍याचे डोके धडापासून विनासायास वेगळे होण्याची संपूर्ण खात्री.

हा पहिला रांगता प्रवेश झाला की उजवीकडे वळायचं,  दुसरी गंमत वाट बघत असते - दोन्ही बाजूला दरी आणि मध्ये जेमतेम ८-१० फुटाचा कातळ ज्यावरुन चालत दुसर्‍या टोकाला जायचं असतं. भणाण वारा असला तर दरीत फेकले जाण्याचे शक्यता असतेच. सुदैवाने वारा नव्हता पण इथे दुसरा त्रास वानरांचा होतो. आम्ही आत प्रवेश करताच उजव्या हाताच्या एका शिळेवरती अतिशय स्वस्थ चित्ताने तो बसला होता. यांना माणसांची इतकी सवय झाली आहे की अगदि एकट्या वानरालाही हाकलवून लावायचे प्रयत्न जवळपास निष्फळ असतात. फार फार तर आपल्यावरती उपकार केल्यागत फुटभर जागा बदलतात. हा टप्पा पार करुन पलिकडच्या कातळकड्याकडे पोहोचलं की डाव्या हाताला पुन्हा नवीन "लोटांगण" असतच. गडाचे दुसरे प्रवेशद्वारही अगदी तसेच. शिवाय यातुन आत गेलं की आधीच्या प्रवेशद्वारासारखं थेट वरपर्यंत पायर्‍या दिसत नाहित जवळपास ९० अंशात वळत जाणार्‍या फुटभर उंचीच्या पायर्‍या आहेत.

वरती कुठलंलही इमारतीचं बांधकाम दिसत नाही, कींवा तसे कुठलेही पुरावे दिसत नाहित. सरळ नाकासमोर चालत गेलं की उजव्या बाजूला थोडं खाली पाण्याची दोन टाकी खोदली आहेत. पैकी एक टाकं त्यातल्या त्यात स्वच्छ आहे असं मानता येतं, दुसरं टाकं मात्र हिरवट पाण्याने भरलेलं आहे. तिथुनच पुढे दोन मिनिटांवरती कातळ फोडून तयार केलेला बुरुज आहे. वास्तविक बुरुजापेक्षाही तो एखादा सज्जा असल्यागत फोडून काढला आहे तोफा अथवा बंदूंकांचा मारा करायला कुठलीही सोय, जंग्या नहियेत. मला पाणी वाहून जायलाही काही व्यवस्था दिसली नाही, पण ती असावी अन्यथा पावसाळ्याच्या दिवसात इथे छातीभर पाणी साठेल. या बुरुजात उतरताना काळजी घ्यावी लागते डाव्या बाजूला दरी आहे, अजिबात चूक न करता इथून बुरुजात उतरावं लागतं. बुरुजात उतरलं की खाली त्र्यंबकेश्वर दिसतं. अजून उजवीकडे बघितलं की खाली गंगाद्वारकडे जाणारा रस्ता व समोर ब्रह्मगिरीचा डोंगर दिसतो. परत संपूर्ण मागे वळलं व बुरुजात जिथून उतरलं तिथे जाऊन उभं राहीलं की समोर थोडंस डाव्या हाताला हरीहर गड व बसगड दिसतो. बास संपला गड. या गडात पहाण्यासारखं म्हणाल तर जवळपास काही नाही पण अनुभवण्यासारखं खूप काही आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे व आधीच्या प्रवेशद्वाराजवळ जे मारुतीचे शिल्प कोरलेले दिसते त्यावरुन हा शिवकालीन गड असावा. जो नावाप्रमाणेच खजिना अथवा परचक्र आल्यास महत्वाच्या व्यक्तींना लपायला देखिल वापरता येऊ शकेल असा असावा, मात्र परत सांगतो वरती कुणाला रहता येईल, अन्न, दारुगोळा, खजिना साठवता येईल असं काही बांधकाम अथवा अवशेष दिसत नाहीत. त्यामूळे हा नक्कि कधी व का बांधला हे समजायला काही मार्ग नाहिये. मी आजवर वाचलेल्या इतिहासातही याचा उल्लेख मला मिळालेला नाही.

बुरुजातच फतकल मांडून आम्ही पोटपूजा सुरु केली. तासभर आराम - गप्पा झाल्यावरती परत निघालो. तोच रस्ता, तीच लोटांगणं मग त्या लोटांगणासहित फेसबुकच्या प्रोफाईलला डकवता येईल असा फोटो काढण्याची प्रत्येकाची धडपड सुरु झाली. आम्हा ६ जणांचा ग्रुप थोडा मागे पडला. आम्ही कातळकड्याच्या ८ फुटी चिंचोळ्या पट्टिवरती आलो आणि  समोरुन ५-७ वानरांचं टोळकं उभं राहीलं, डाव्या दरीतून  अजून दोघं वर आली, मागे वळलो तर एक जण आधीच येऊन उभा होता. त्यांनी फार हुशारीने जागा निवडली होती. पुढे - मागे माकडं डावी-उजवीकडे दरी. धीट तर इतके होते कि घाबरवायला पाण्याची रिकामी बाटली वाजवली तर ३ लहान पिल्लं पुढे येऊन तीच बाटली धरायचा प्रयत्न करु लागली. एक जण पुढे झाला व त्याने सरळ एका मुलीच्या ट्रॅकपॅन्टचा कोपरा चिमटीत पकडला. आता कुठलीही आक्रस्ताळी हालचाल जीवावरती बेतू शकत होती किंवा त्यांचा हल्ला ओढावून घ्यायला कारणीभूत ठरु शकत होती. गपगुमान एकमेकांची बॅग पकडून झुकझुक गाडि बनवली. त्यांच्याशी नजर न मिळवता मधला ५० फुटांचा पट्टा शब्दश: जीव मुठीत धरुन पार केला. त्यांच्या सरावल्या नजरांनाही आमच्या हातात खाण्यासारखं काही दिसलं नाही त्यामू्ळे त्यांनीही मग काही आडकाठी केली नाही. हे दिव्य पार करुन पुन्हा त्याच ढेकळांच्या घसरड्या वाटेवरुन तोल सावरत अखेर जटा मंदिर गाठलं. दुर्ग भांडारचा ट्रेक पूर्ण झाला होता. सगळे  जण या अनुभवाने "cloud 9" वरती पोहोचले होते.

परत येताना डोक्यात एकच विचार आला - ताजमहाल किंवा राजस्थानातले सुंदर राजवाडे बांधणे हे अर्थात फार मोठे व कलेच्या दृष्टिने अजोड आहे. मात्र त्याचवेळी सह्याद्रिच्या कातळकड्यातून अशी सर्वथा अजिंक्य वाटावी अशी जागा कोरुन काढणं जास्त कठीण आहे. त्या दोन्ही दरवाज्यांत घालावी लागणारी लोटांगणं हि त्या कारागिरांना, मजूरांना व ज्याच्या डोक्यात ही कल्पना आली त्यालाच घातली असं मी अजूनही समजतोय. थोडक्यात किमान एकदा घ्यावा असा हा अनुभव आहे. 

 - सौरभ वैशंपायन.

Tuesday, April 19, 2011

संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग!



गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राला प्रणाम करताना - "राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा |" असे त्याचे वर्णन केले आहे. दगडांच्या देशा म्हणजे "गड - कोटांचा" देश. आज एकट्या महाराष्ट्रात सुमारे साडेतीनशेहुन अधिक किल्ले आहेत. शिवछत्रपतींनी स्वराज्याचे स्वप्न पाहीले व ते प्रत्यक्षात उतरवले ते गडकोटांच्यावरील असलेल्या त्यांच्या विश्वासावरतीच. निर्वाणाआधी शिवाजी महाराजांकडे जवळपास तीनशे साठ किल्ल्यांचा ताबा होता. म्हणुनच समर्थांनी त्यांचे "गडपती" असे सार्थ वर्णन केले आहे. पुरंदरच्या तहानंतर महाराजांकडे १८ किल्ले होते. सुभेदार तानाजी मालुसरे यांनी बलिदन देउन "सिंहगड" जिंकून १९ वा किल्ला स्वराज्यात आणला आणि त्यानंतर ८ वर्षात महाराजांकडे अडिचशेहुन अधिक किल्ले होते. हे वाचून मती गुंग होते. जिथे एक एक किल्ला घ्यायला मुघल - विजापुरकरांना महिने किंवा चक्क अनेक वर्ष लागत (उदा. जिंजीचा वेढा जवळपास ९ वर्ष चालला होता) तिथे मराठे कधी एखाद्या रात्री हल्ला करुन किल्ला जिंकत.  आज ना उद्या खुद्द दिल्लीपती दख्खनमध्ये उतरणार हे महाराजांना माहीत होते. आपल्या एका किल्ल्याने एक वर्ष झुंजवले तरी मुघलांना किमान ३६० वर्षे युध्द खेळावे लागेल अश्याच दृष्टिने महाराजांनी गडकोट बळकट केले होते आणि म्हणूनच औरंगजेबाच्या राक्षसी वरवंट्याखाली महाराष्ट्राचं स्वातंत्र्य याच गड - कोटांनीच टिकवले. तीनशे वर्षे चालत असलेली विजापुर, गोवळकोंडा यांसारखी राज्ये त्याने बागेत फिरायला जावं तितक्या सहजतेने घेतली. पण जनरल सह्याद्रि व अतिचिवट मराठ्यांनी औरंगजेबाच्या माथ्याला टेंगळे आणली. आणि "आलमगीर" म्हणावणारा तो इथेच तोबा तोबा करत तीन हात जागेत विसावला.

भारतात अगदी रामायण - महाभारत कालापासून "दुर्ग" ही संकल्पना दिसते. याशिवाय मनुस्मृती, कौटिलिय अर्थशास्त्र, देवज्ञविलास यात दुर्गांचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. मनुस्मृती दुर्गांवर पुढील भाष्य करते - 

धनुदुर्गं महीदुर्गमब्दुर्गम्‌ वार्क्षमेव वा ।
नृदुर्गं गिरिदुर्गं वा समाश्रित्य वसेत्पुरम ॥
सर्वेण तु प्रयत्नेन गिरिदुर्गं समाश्रयेत ।
एषां हि बाहुगुण्येन गिरिदुर्गंविशिष्यते ॥

पैकि - धनुदुर्ग म्हणजे सभोवार अनेक कोस पाणी पुरवठा नसणारा किल्ला. महीदुर्ग - बारा हात उंच तटबंदी असलेला किल्ला. अब्दुर्ग - सभोवार पाण्यामुळे नैसर्गिक संरक्षण मिळालेला किल्ला. वार्क्षदुर्ग - दाट झाडित लपलेला किल्ला. नृदुर्ग - हत्ती, घोडे, रथ, पायदळ यांचं संरक्षण असलेला किल्ला. गिरिदुर्ग - डोंगरावरील किल्ला.

तर राजा कृष्णदेवरायाच्या काळातील लाला लक्ष्मीधर याने देवज्ञविलास मध्ये दुर्गांचे ८ प्रकार सांगितले आहेत - 
प्रथमं गिरिदुर्गंच, वनदुर्ग द्वितीयकम्‌।
तृतीयं गव्हरंदुर्गं, जलदुर्गं चतुर्थकम्‌॥
पंचमं कर्दमं दुर्गं, षष्ठं स्यान्मिश्रकं तथा।
सप्तमं ग्रामदुर्गं स्यात्‌, कोष्ट्दुर्गं तथाष्टकम्‌॥

यात डोंगरी किल्ला, वनदुर्ग, गुहेचा किल्ला म्हणून उपयोग करणे, पाणकिल्ला, दलदलीतील किल्ला, मिश्रदुर्ग, गावकूसा भोवतीचा कोट किंवा लाकडि कोट असलेलं ठिकाण असे आठ प्रकार सांगितले आहेत.



महाराष्ट्रात अनेक सत्तांनी दुर्ग जिंकले अथवा नव्याने बांधले. त्यात सातवाहन, राष्ट्रकुट, चालुक्य, यादव, विजयनगर, मराठे या सत्ता होत्या तर तुघलक, खिलजी, मुघल, बिदरशहा, निजामशहा, आदिलशहा, सिद्दि, पोर्तुगिज, इंग्रज हे शुध्द परकिय देखिल होते. त्यामुळे महाराष्ट्रात बहुविध शैलींचे किल्ले बांधले गेले. अनेकदा मुळ बांधकामात बदल करुन त्यावर आपली शैली उभारायची असे प्रकार देखिल सर्रास दिसतात. महाराष्ट्रात आधिक्याने आढळतात ते गिरीदुर्ग आणि अर्थातच तेही मुख्यत: सह्याद्रिच्या रौद्ररम्य रांगेत. त्याशिवाय गेली अनेक शतके समुद्राच्या थपेडा खात उभे असलेल्या भक्कम जलदुर्गांनी देखिल महाराष्ट्राचे वैभव वाढवले आहे.


सध्यातरी आपण मुख्य विचार करणार आहोत तो शिवछत्रपतींनी बांधून घेतलेल्या दुर्गांचा व मराठ्यांच्या दुर्गांवरची व्यवस्था साधारणत: कशी होती याचा. शिवाजी महाराजांकडे भले ३६० किल्ले होते, पण त्यांनी नव्याने बांधुन घेतलेले किल्ले साधारण १८ - १९ असावेत. त्यात मुख्यत: राजगड, तोरणा, प्रतापगड, रायगड हे डोंगरी तर पद्मदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी हे समुद्रि किल्ले येतात. गड बांधणीत प्रत्येकवेळि महाराजांनी नवनवे तरीही यशस्वी प्रयोग केले. एखादा संपूर्ण दुर्ग किंवा दुर्गाचा महादरवाजा मराठ्यांनी बांधला हे ओळखण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे त्याचे गोमुखी प्रवेशद्वार. किल्ल्याचा महादरवाचा थेट दिसणार नाही असा दोन बुरुजांच्या आत बांधायचे तंत्र महाराजांनी वापरले. यामुळे शत्रूला थेट तोफ तर त्यावर डागताच येत नाही पण महादरवाज्या समोर आल्या खेरीज शत्रुला त्यावर हल्ला चढवताच येत नाही मात्र यावेळि शत्रू महादरवाज्या समोरील चिंचोळ्या जागेत आला कि तट बुरुजांच्या जंग्यांतून ३ ठिकाणहून त्यावर भरपूर मारा करुन त्याला सहज परास्त करता येते.


पूर्वी महादरवाजा फोडायला हत्ती वापरत. मग त्याला अटकाव करायचे मार्गही शोधावे लागत. त्यासाठी दरवाज्यावर मोठे मोठे अणकूचीदार खिळे लावत म्हणजे धडक मारायला हत्ती बिचकायचे. त्यावर शत्रू असा उपाय करत असे कि दरवाज्या समोर उंट आडवा टेकवून हत्तीला त्या उंटावर धडक द्यायला लावत म्हणजे उंटामुळे हत्तीला ते खिळे दिसत नसत. म्हणजे हत्तीच्या व खिळ्यांच्या मध्ये उंट मेला तरी पलिकडचा दरवाजा फुटत असे. मग यावरचे उपाय म्हणजे  एकतर महादवाज्याकडे येणार्‍या वाटेतला काहि भाग हा इतका चिंचोळा  वा नागमोडि ठेवायचा कि "हत्ती" त्यातून आत येऊच शकणार नाही, दुसरे - दरवाज्यांच्या पुढे हत्तीला धावत यायला मोठी जागाच ठेवायची नाही, तिसरे - दरवाज्या समोर उंच पायर्‍या बांधायच्या व चौथे - दरवाजा थेट समोर न ठेवता उजव्या किंवा डाव्या भिंतीत ठेवायचा. तरीही काही कारणाने समजा महादरवाजा शत्रूच्या हाती पडलाच तरी आत आल्या आल्या थेट किल्ल्यात प्रवेश नसे समोर एक भक्कम भिंत उभी असे म्हणजे संपूर्ण U टर्न किंवा ९० अंशात वळावे तर समोर पुन्हा उंच पायर्‍यांची वाट असे त्याने सहाजिक शत्रूची गती कमी होई आणि या वळणार्‍या वाटेवरती मारा करता येईल अशी सोय आत असे. या खेरीज साधारण डोंगराच्या मध्यावरच तटबंदी घालून डोंगराचा जास्तीतजास्त भाग स्वत:साठी सुरक्षित करायचा आणि शिवाय मग बालेकिल्ला अजून उंचीवर बांधायचा हे तंत्र आपल्याला रायगड, राजगड, प्रतापगडावर देखिल दिसतं.


शिवछत्रपतींनी बांधून घेतलेल्या किल्ल्याचं अजून वैशिष्ट्य म्हणजे मुख्य दरवाजाकडे जाणार्‍या वाटांच्या उजवीकडे किल्ल्याचा कडा व तटबंदि असते. याचं कारण श्री प्र. के. घाणेकरांनी त्यांच्या "अथा तो दुर्गजिज्ञासा" या पुस्तकात देताना सांगितलं आहे कि  पूर्वी मुख्य लढाई ही ढाल - तलवारींनीच होई. शिवाय बहुसंख्य माणसे ही उजव्या हाताचा जास्त वापर करणारी असतात. सहाजिकच तलवार उजव्या हातात असे व ढाल ही डाव्या मनगटाच्या वरील भागात चामड्याच्या पट्ट्यांनी आवळून "बांधली" जात असे. याचा विचार करुन शत्रूला याचाच वापर त्याच्या विरुध्द करण्याच्या दृष्टिने हे दुर्ग बांधले. हल्ला करताना तटबंदि उजव्या बाजूला असली कि सहाजिक त्यांच्या उजव्या बाजूवरुन बाण, बंदूका, उकळते तेल व मुख्यत: दगड - धोंडे यांचा मारा होणार. हा मारा चूकवण्यासाठी (मुख्यत: दगडांचा) त्या सैनिकाला तलवार मध्ये घालता येत नसे अन्यथा तलवारीला खांडे पडून तलवार निकामी होई मग त्यासाठी ढाल वरती उजव्या बाजूला धरणे क्रमप्राप्त होते अन्यथा चाळिस - पन्नास फुटांवरुन फेकलेला लहानसा गोटा अगदी जीवघेणा देखिल ठरु शकतो. पण मग त्यासाठी तलवार डाव्या हातात घ्यावी लागेल. ह्याने  समजा वरुन होणारा मारा चूकवत शत्रू दरवाज्या नजिक आलाच तर अचानक मराठ्यांची लहानशी टोळी दरवाज्या बाहेर हल्ला करायला आल्यास पुन्हा ढाल - तलवारीची अदलाबदली करणे जवळपास अशक्य असे त्याने शत्रूचा मारा निष्प्रभ होई.


शिवछत्रपतिंनी राजाभिषेकानंतर रघुनाथपंतांकडून 'राज्यव्यवहारकोश' तयार करवून घेतला. त्यात सातवे प्रकरण किल्ल्यांवर आहे. तर शिवकालोत्तर कालात लिहिल्या गेलेल्या रामचन्द्रपंत अमात्य यांच्या "आज्ञापत्रात" आठव्या प्रकरणात किल्ल्यांचे महत्त्व, त्यांची रचना व व्यवस्था यावर उहापोह केला आहे. खरतर दुर्गांचे महत्व विषद करणारे ’आज्ञापत्रातील’ ते "दुर्ग" प्रकरण मुळापासून वाचण्यासारखे आहे. तरी या कारणाखेरीज आज्ञापत्र या करीता महत्वाचे आहे कि शिवछत्रपतींच्या आज्ञेवरुन रघुनाथपंतींनी राज्यव्यवहारकोषात सुमारे १४०० फार्सी अथवा मराठी भाषेबाहेरील शब्दांना गिर्वाणभाषेतील प्रतिशब्द दिले आहेत. त्यात अर्थात किल्ल्यांवरील वास्तू अथवा बांधल्या गेलेल्या भागांना असे प्रतिशब्द दिले आहेत. मुळात "किल्ला" हा शब्दच फार्सी आहे. संस्कृत भाषेत आपण त्याला "दुर्ग" म्हणतो, ज्याचा भेद करणे दुर्गम आहे तो दुर्ग. याशिवाय बालेकिल्ल्यास "अधित्यिका", माचीस "उपत्यिका",  खंदक म्हणजेच परीखा असे अनेक शब्द सांगता येतील. शिवाय - चर्या (तटावरची नक्षीदार दगडांची रांग), नाळ (दोन तटांमधली माणसांच्या वावरण्याची जागा (जशी संजीवनी माचीत आहे), जिभी/हस्तीनख (दारासमोरील आडोसा), जंग्या (तटांमधून बंदूका/तीरांचा मारा करायला ठेवलेली जागा), फांजी (तटावरची चालण्याची जागा), रेवणी (खंदक व तट यांच्यातील तटाबाहेरची जागा) असे शब्द किल्यांच्या अनेक भागांसाठी वापरलेले आढळतात.


किल्ल्यांची बांधणी कशी आहे ते बघुन त्याची शैली समजते, बुरुज जर गोलाकार असतील तर ती भारतीय शैली, ’चौकोनी’ असतील तर ते ब्रिटिशांनी बांधलेले तर भिंतीच्या पुढे किंचीत अधांतरी पण भक्कम असलेले किंवा पंचकोनी बुरुज असतील तर ते पोर्तुगिज बांधणीचे आहेत असे समजायचे. काही वेळा भारतीय बांधणीत देखील षटकोनी अथवा अष्ट कोनी देखिल बुरुज आढळतात पण ते क्वचित. उदा राजगड बालेकिल्ल्याचे दोन्ही बुरुज देखिल असेच कोनातील (त्यांना चार कोन आहेत) आहेत. दुपदरी किंवा चिलखती बुरुज ही संकल्पना आपल्याला शिवछत्रपती निर्मित दुर्गांच्या बांधकामात अनेकदा दिसते. बुरुजांच्या बांधणी शिवाय त्या किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावरची चिन्हे, तो किल्ला कोणी बांधला अथवा कोणाकडून जिंकून घेतला हे दर्शवतात. उदा कमळ असेल तर ते देवगिरी सत्तेचं प्रतिक आहे, गंडभेरुंड (द्वीमुखी गरूड) असल्यास विजयनगरचं साम्राज्य, शरभ किंवा सिंह असल्यास आदिलशहा किंवा मराठे, क्रॉस असल्यास पोर्तुगीजांचा किल्ला, गणपती असल्यास पेशवाई काळातील बांधकाम असं सहज ओळखता येतं.  शिवाय अनेकदा विजयाचे चिन्ह म्हणून दुसर्‍यांची प्रतिकं आपल्या प्रतिकांच्या पंज्यात अथवा शेपटित धरलेले दर्शवितात, उदा - काहीवेळा गंडभेरुंड शरभाच्या पायाखाली किंवा सिंहाच्या शेपटित हत्ती धरलेला दाखवतात.


वरील गोष्टि बर्‍याच अंशी माहितही असतात, आता आपण बघूया कि किल्ल्यावरची व्यवस्था कशी असे? - त्यासाठी असे "कान्हूजाबता" म्हणजे कानून+जाबता थोडक्यात सांगायचे तर "नियमावली". केंद्रिय सत्तेकडून ही नियमावली बनत असे. त्या किल्ल्याचा मुख्य असे किल्लेदार. मराठी कागदपत्रात त्यासाठी ’हवालदार’ असाही शब्द वापरलेला आढळतो, वास्तविक हवालदाराचे सुध्दा २ वेगवेगळे उल्लेख आहेत एक ’परगण्याचा’ तर दुसरा ’किल्ल्यावरचा’. सध्या फक्त किल्ल्यापुरता विचार करु. तो हवालदार किल्ला व त्याच्या परीसरातील न्याय, मुलकि व लष्करी कामांसाठी जबाबदार मानला जात असे. मात्र कुठलीही नेमणूक तो किल्लेदार थेट करु शकत नसे. तो फारफार तर शिफारीस करु शकत असे मात्र निर्णय केंद्रिय सत्ताच घेत असे. हे किल्लेदार त्या पंचक्रोशीच्या बाहेरचे असत. याचे कारण, समजा शत्रूने उद्या त्या किल्लेदाराच्या कुटुंबाला पकडून समोर उभे केले तर मानसिक दबावाखाली तो शरण जाण्याची शक्यता असे. कुटुंब दूरच्या कुठल्या गावात असेल तर हि शक्यता उरत नसे.


मुलकि वा आर्थिक कामांसाठी किल्लेदाराला जबाबदार धरले जाई त्याच्या हाताखाली अनुक्रमे सबनिस > कारखानिस > फडणीस (सबनिस व कारखानीस या दोघांच्या हाताखाली वेगवेगळे फडणीस असत) > दफ्तरदार > कारकून अशी फळी असे. पैकि सबनीस जमाखर्च बघत व किल्लेदाराच्या अल्पकालिन अनुपस्थितीत किल्लाची जबाबदारी सबनिसांकडे असे, सबनिस साधरणत: ब्राह्मण जातीचा नेमत. तर कारखानीस किल्ल्यावर अथवा किल्ल्याच्या परीसरात होणारे उत्पादन, रसद व किल्ल्याचे जतन/डागडुजी यांकडे लक्ष पुरवत असे, बहुतेकदा कारखानीस कायस्थ प्रभू असत. गरज असताना किल्ल्यावरील खजिना उघडताना त्यावेळि किल्लेदार, सबनिस, कारखानिस आणि फडणवीस हे तिथे उपस्थित असणे गरजेचे असे. तसेच धान्याचे कोठार उघडायचे असल्यास कोठिदार किंवा कोठावळ्याला असेच उघडता येत नसे त्यावेळि कारखानीस तिथे उभा रहात असे. यांच्याशिवाय किल्ल्यावर तासकरी (घटिकापात्रांवर लक्ष ठेवुन तासांचे तोल वाजविणारा) असत, किल्ला मोठा असेल तर एकापेक्षा जास्त तासकरी असत. त्यांचा पगार सरकार करी. किल्ल्यावर अथवा पायथ्याशी दोन - दोन गवंडि, सुतार, चांभार मुद्दाम आणून वसवले जात. त्यांना सरकारातून पगार मिळत असे. ऐकून नवल वाटेल पण अशी कला असणार्‍यांना सामान्य सैनिकापेक्षा जास्त पगार मिळत असे. आज्ञापत्रात यांखेरीज जोशी, वैद्य, जडिबुटिची माहीती असणारे वैदू. रसायनवैद्य असावेत असे आज्ञापत्र म्हणते.


लष्करी हुद्यांमध्ये किल्लेदाराच्या हाताखाली सरनौबत > तटसरनौबत असत. यांच्याच हुद्याच्या जवळचे म्हणावेत असे नाईक > तटसरनाईक देखिल असत. किल्ला जितका मोठा वा महत्वाचा तिथे यांची संख्या एकाहून अधिक असे.


गडाच्या परीघात महार - मांग यांचे "मेटे" असत. यांना मेटकरी म्हणत. गड यांच्या खांद्यावर शांतपणे डोके ठेवून झोपत असे. कारण परचक्र आल्यास त्याची पहिली लाट हे बहाद्दर आपल्यावर घेत. गडाभोवतालची गस्त हेच घालत. त्यांना आजूबाजूची जमिन कसून गुजराण करावी लागत असे मात्र त्यांवर कुठलाही कर लावला जात नसे. व्यवस्थेत त्यांना आदर होता. किल्ल्याच्या आसपासच पेठा असत. गडावरच्या वस्तू याच बाजारातून मिळत व बाजाराला गडाचे संरक्षण. पावसाळ्यापूर्वी  किल्ल्यावरच्या सगळ्या वस्तू शाकारण्याची व्यवस्था करावी लागे, गहू - बाजरीच्या पेंढ्यांनी घरे, दारूची कोठारे, बुरूज, दोन तटांना जोडणारी ठिकाणे, दरवाजे हे शाकारले जात. त्यासाठी सरकार खालच्या गावातून वेठे (मजूर) बोलावून घेई व बाजारभावानुसार काही हजार गवताचे भारे मागवून घेत.


प्रत्येक किल्ल्याचा वार्षिक अहवाल असे. सरकारातून एक अधिकारी येऊन "AUDIT" करत असे. कधी कधी नव्याने जिंकलेल्या किल्ल्याची पहाणी करुन त्याची डागडुजी, त्याला लागणारे सैन्य, सैन्याला लागणारे धान्य, युध्दकाळाची बेगमी आधीच करुन ठेवण्यासाठी अधिकचा पण बाजूला काढावा लागलेला धान्यसाठा, पाण्याची व्यवस्था, तेल, मीठ, जीरे, मोहरी यांसारखा छोटा खर्च देखिल जमेस धरला जात असे. शस्त्रे सरकारच देत असे. दरवर्षी त्यांची संख्या मोजली जात असे. त्यांची संख्या कमी अथवा जास्त झाली तर त्याची चौकशी होत असे. गुन्हेगाराला कडक शासन होई. कुठली शस्त्रे कोणी बाळगावी याचे नियम होते. परवानगिशिवाय वाघनखे बाळगायची बंदि होती. दुतर्फा खर्च म्हणून एक प्रकार असे म्हणजे एका किल्ल्यावरचा माणूस काही कारणाने तात्पुरता अथवा कायमचा दुसर्‍या किल्ल्यावर नामजाद झाला तर त्याचा पगार नव्या ठिकाणी दिला जात असे मात्र त्याची नोंद पूर्वीच्या किल्ल्यावर देखिल केली जाई. तसेच त्याच्या जमिनीचा कर नविन ठिकाणहून सरकारात जमा होत असे.


सर्वसाधारणपणे किल्लेदाराचा पगार सर्वात जास्त असे साधारण ५००-६०० रुपये. शिवाय त्यांना अब्दागिरेचा मान असे. त्याखालोखाल मग सबनीस, कारखानिस, सरनौबत, तटसरनौबत अशी उतरती भाजणी असे. मात्र क्वचित किल्लेदार नविन असला व सबनिस, कारखानिस हे जुने जाणते व खूप अनुभवी असले तर त्यांचा पगार नवख्या किल्लेदारापेक्षा जास्त असे. या सगळ्यांत विशेष मान होता तो गोलंदाजांना किंवा "तोपचींना". अचूक ठिकाणी तोफा डागण्याचे तंत्र अनेक वर्षे युध्दात आघाडिवर राहून त्यांनी आत्मसात केलेले असे, त्यामुळे यांनाही कधी कधी अगदि कारखानिसांइतका पगार देखिल असे. मोठ्या किल्ल्यांवर ५ पर्यंत तोपची सहज असत. शांतता काळात व मुख्यत: पावसाळ्यात अर्थातच तोफांची काळजी घेण्याचे जोखमीचे काम त्यांवरच असे. सामान्य सैनिकाचा पगार हा साधारण ५ रुपये असे. यातही १/३ - १/३ - १/३ अशी वाटणी करुन अन्न, वस्त्र व मोहरा यात तो पगार विभागून त्याला दिला जात असे.


वर सांगितलेला सगळा खर्च हा "सनदि खर्च" म्हणून अंदाजपत्रकात आधीच नोंद होत असे, व तसे पैसे गडावर पाठवले जात. जो पगार वाटला जात असे त्यासाठी सरकारातून "हजेरनविस" येत असे किल्ल्यावरील सगळ्या सैनिकांची तो स्वत: किल्लेदार, सबनिस, कारखानीस यांच्या समक्ष हजेरी घेत असे व नोंद केलेली संख्या बरोबर आहे का? हे बघत असे. ती बरोबर असल्याची खात्री झाली कि मगच स्वत:कडिल पैसे किल्लेदार - सबनिसाकडे देत असे. मात्र कधी कधी अचानक काही कामे निघत, वीज पडून नुकसान होई, दुष्काळ पडल्याने ठराविक कोट्याचे धान्य गडाच्या आसपासच्या गावांना वाटावे लागे इ.इ. ह्या अनाहुतपणे उपटल्या खर्चांना "गैरसनदि खर्च" म्हणत. हा खर्च किल्लेदार आधी करत असे व मागहुन त्याची पडताळणी, हिशेब करुन मग सरकारातून तो खर्च किल्लेदारास मिळत असे.


गडावर कुठल्याही धर्माचे देवस्थान असेल तर त्याचा खर्च सरकार करत असे. त्याला दिवाबत्तीची सोय करुन दिली जात असे. नंदादिपात किती तेल असावे याचे माप कागदपत्रात "छ-टाक" म्हणजे सहा टाक असावे असे दिले आहे तर माणसाला अन्न शिजवायला "नव टाक" अशी नोंद आहे. आज आपण छटाक, नवटाक  वेगळ्या अर्थी वापरतो ते सोडा, पण त्याचेही लिखित नियम असत. सरकारचे वेगळे तूपाचे भांडार असे एक खाण्याचं तूप दुसरं नासकं तूप. नाव नासकं असलं तरी ते जखमेवर बांधण्यासाठी अनेक वर्षं साठवलेलं तूप असे. नासक्या तूपातून जखमा "बांधत" अथवा "तळत". बांधण्यापर्यंत काय ते समजतही, पण ’जखम तळणं" काय प्रकार आहे? तर त्यांचे हात - पाय कलम होत त्यांचा रक्तस्त्रावाने मृत्यू होऊ नये म्हणून हात कलम केल्यावर लोंबणारे मांस - जखम उकळत्या तूपात पटकन बुडवून बाहेर काढली जाई कि ती जखम "सील" होई.


किल्ल्यावरती अनेक सण उत्साहात साजरे होत. पण मुख्य सण "दसरा". या दिवशी गडावरती नवं निशाण लावत. गडाच्या रक्षणकर्त्या देवतेची पुजा करत. त्याच बरोबर किल्ल्याच्या परीसरातील अतृप्त आत्मे, पिशाच्च यांचीही शांती करण्यासाठी प्रत्येक किल्ल्यावर रेड्याचा बळी देत. हा सगळा खर्च सरकार करे. आधी रेड्याच्या नाकाचा टवका कापून त्याच्या नाकातील रक्त गाळत किल्ल्याला फेरी मारत व फेरी पूर्ण झाली कि किल्लेदार स्वत:च्या हाताने रेड्याचा बळि देई. सैनिकांत त्याचा प्रसाद वाटला जाई. दिवाळित शोभेचे दारुकाम होई. गोळा न घालता दारू ठासून तोफा उडवल्या जात. त्यांनाच चंद्रज्योती म्हणतात.


अजूनही शेकडो लहान - मोठ्या गोष्टि आहेत जसे किल्ल्याचे दरवाजे उघडणे - बंद करण्याचे नियम, किल्लेदाराला सरकारी कामासाठीच किल्ला तात्पुरता सोडावा लागला तर अधिकार कुणाकडे द्यावेत याचे नियम, गडावरती राजप्रासाद असेल त्याची व्यवस्था, वर्षभर तोफगोळे व दारू दमट होऊ नये म्हणून घ्यायची काळजी, हत्यारांची घ्यायची काळजी, गडावरती व गडाभोवताली कुठली झाडे, वृक्ष अथवा झुडुपे असांवित? किल्ल्यावरच्या कचर्‍याचे काय करावे? गडावरची पाण्याची व्यवस्था कशी असावी याबाबत काटेकोर नियम असत.


शिवछत्रपतींच्या किल्ल्यांविषयी आजवर अनेक पुस्तके आली. एकेका किल्ल्यावर इतिहास व व्यवस्था असे एक एक पुस्तक निघाले तरी किमान ३०० पुस्तके निघतील इतका हा विषय मोठा आहे, एका लेखात तो बसणे कदापी शक्य नाही. याच किल्ल्यांनी मराठ्यांना स्वातंत्र्याची चव चाखवली. देशासाठी झुंझताना सह्याद्रि, जंगले व कोकण - गोव्यात फेसाळणार्‍या समुद्राने साथ दिली. या शिखरांवर त्यांच्या पायथ्याशी, किंवा भर समुद्रात आपला इतिहास घडला. अनेक वीर या किल्ल्यांसाठी, महाराजांसाठी, स्वराज्यासाठी लढताना कामी आले. त्यांचा मुकुटमणी देखिल तिथे रायगडावर चीरनिद्रा घेत पहुडला आहे. त्यांचा जन्म झाला गडावर, आयुष्यभर तो महामानव लहान मोठ्या गडकोटांवर वावरला व अखेरचा श्वास देखिल गडावरच घेतला. ते सर्वार्थाने "गडपती" होते. या सगळ्याची आठवण आपण ठेवली पाहीजे. आज आपले गडकोट काळ गिळत आहे. जंगल माजून बुरुज ढासळत आहेत, काही निर्बुध्द आणि कद्रू लोक त्यांच्या भिंतींवर आपली नावे कोरुन ती ठिकाणे विद्रुप करतात तेव्हा मनाला खूप त्रास होतो. समुद्रात नुसता तीनशे फुटि पुतळा उभारुन काहीही फायदा नाही. आपल्या ऐतिहासिक ठेव्याविषयीच जागरुकता नसेल तर त्या नव्याने बांधलेल्या तीनशे फुटि पुतळ्यानी काय मेलेली मने जिवंत होणार? ऐतिहासिक स्मारके हि स्फुर्ती घेण्यासाठी असतात कि कचरा करण्यासाठी? याविषयी समाजाला भान येत नाही तोवर सर्व फुकट आहे. फक्त ज्या वेगाने गडकोट नष्ट होत आहेत ते बघता दोन पिढ्यांनी महाराष्ट्राला "दगडांच्या देशा" अशी हाक मारता येणार आहे का? यावर विचार व्हावा इतकिच अपेक्षा.

बहुत काय लिहिणे? सुज्ञ असा!
विज्ञापना, राजते लेखकावधि ॥

शिवशक ३३७,  चैत्र पौर्णिमा (हनुमान जयंती, शिवपुण्यतीथी).

 - सौरभ वैशंपायन.

============
संदर्भ -
१) अथा तो दुर्गजिज्ञासा - प्रा. प्र के घाणेकर.
२) १७ एप्रिल २०११ रोजी जनसेवा समिती आयोजित दुर्गजिज्ञासा या कार्यक्रमातील श्री निनाद बेडेकर, श्री पांडुरंग बलकवडे व प्रा. घाणेकर यांची व्याख्याने.
३) आज्ञापत्रातील "दुर्ग" प्रकरण.