Saturday, March 28, 2015

जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही


श्रीराम - श्रीकृष्ण ह्या लोकोत्तर महापुरुषांच्या कार्यावरती अतुलनिय महाकाव्ये लिहिली गेली. ह्या दोघांनी आपले एकंदरच आयुष्य किती व्यापुन टाकले आहे ह्याचा विचार करताना मजा वाटू लागते. रोजच्या लहान सहान गोष्टी घ्या. कुणा भावंडामध्ये प्रेम दिसलं की - "बघा राम-लक्ष्मणांसारखी जोडी आहे" असे आपण म्हणतो. लहान मुलांच्या लीला ह्या "कृष्णासारख्या" असतात. आज्ञाधारी मुलगा हा "रामासारखा" असतो तर सतत मुलींच्या गराड्यात असलेला "कान्हा" असतो. उदाहरणे सुद्धा आपली जागा बदलत नाहीत. एक मर्यादा पुरुषोत्तम दुसरा अमर्याद पुरुषोत्तम. दोन व्यक्ती दोन टोके. ह्यांना आपल्या आयुष्यातून वजा केले तर? संस्कृती समजवणारी २ महाकाव्ये, अनेक कथा, हजारो काव्ये, हजारो गाणी, हजारो चित्रे निघून जातील. जगण्यातून "राम" निघून जाईल. माझ्या मते श्रीराम हा आत्म्याप्रमाणे आहे तर श्रीकृष्ण मना सारखा आहे. आत्म्याला जन्मभर शरीराची मर्यादा सांभाळावी लागते मन मात्र अमर्याद संचार करु शकतं. शरीरातुन आत्मा गेला कि देह निष्प्राण होतो अशी समजुत आहे .... आयुष्यात अथवा एखाद्या गोष्टीत राम राहिला नाही असेच आपण म्हणतो. तेच मनाबाबत म्हणाल तर मन आपल्या ताब्यात नसून आपण मनाच्या ताब्यात असतो हे कुणालाही मान्य होईल.पण आपली गोची अशी आहे की स्वत:वर मर्यादा आलेल्या चालत नाही आणि अमर्याद वागणं आपल्याला झेपत नाही.

याक्षणी मी मुद्दामहुन रामावरती लिहायला बसलोय. म्हणजे हा विषय अनेक दिवस डोक्यात होताच, व्हॉट्सअ‍ॅपच्या एका ग्रुपवरती राम - सीता - अग्निदिव्य वगैरे अगदि जुजबी चर्चा झाली त्याने परत ह्या विषयाने डोक्यात बागडायला सुरुवात केली. आधी अनेक वर्ष मलाही ह्याबाबत काही कळत नव्हतं. राम आपोआप IPC खाली आरोपीच्या पिंजर्‍यात ऊभा केला जात असे. पण मग हळुहळू काही गोष्टी नव्याने वाचनात येऊ लागल्या काही गोष्टी आपणहुन उलगडल्या जाऊ लागल्या. २०१४-२०१५ मध्ये राहुन आपण काही शे अथवा काही हजारवर्षांपूर्वीची समाजव्यवस्था व समाजमान्यता काय होती हे समजून घ्यायला हवे. आपण उलटे करतो त्यांना समजून घेण्या ऐवजी आपली मते आपण आदर्शांवरती लादतो. मात्र आपण २०१५ चे भारतीय संविधान त्या काळाला लागु करुन चालणार नाही ह्याची जाणीव होत गेली तशी विचारांना वेगळी दिशा वेगळी वाट मिळाली.

श्रीराम अथवा श्रीकृष्ण ह्यांना आपण आधीच देवत्व देऊन त्यांच्या प्रत्येक कृतीला गुदमरवून टाकतो. यांनी केली ती दैवी योजना होती म्हणून विचार चिरडून टाकले जातात. पण त्यांना माणसात आणले तर त्यांनी "माणूस" म्हणून केलेले कार्य अवाढव्य आहे ह्याची जाणीव होऊन मग ही माणसे  Larger than life बनतात. रामाबाबत विचार करतोय तेव्हा सगळे काव्य फुलोरे आपण बाजूला ठेवू. अमानवीय गोष्टी, चमत्कारांची जळमटे दूर करु. तसेच आधीच रामाला आरोपिच्या पिंजर्‍यात न ढकलता रामायणकालीन व त्याबरोबर अगदि अलीकडच्या काळाचाही विचार करुन बघायचा हा प्रयत्न आहे. लोकांना माझी मते पटतीलच असेही नाही व ती पटवून घ्यावीतच असाही हट्ट नाही.

मुळातच रामायण अथवा रामाचे आयुष्य हे "मर्यादा" सांभाळण्यात गेले आहे. समाजमानस व राम दोन्ही चौकटी मोडणारे नाहीयेत हे लक्षात घ्यावे लागेल. यद्यपी शुद्धम् लोक विरुद्ध नाकरणीय़म्‌ नाचरणीयम्‌ ..... चांगली गोष्ट असली तरी बदल नको. आहेत ते नियम काटेकोरपणे पाळू, उगीच प्रवाहा विरुद्द जाणारा रामही श्रीकृष्णाप्रमाणे क्रांतिकारी वगैरे नाही आणि जनता त्याहुन नाही. "जैसे थे" परीस्थिती मान्य करणारे समाजमानस रामायणात सतत डोकावते. मला याक्षणी कुठले कांड व त्यातील नेमका श्लोक आठवत नाही मात्र रामाच्या एका पूर्वजाला काही नियम मोडले म्हणून राज्यत्याग करावा लागल्याचा उल्लेख वाचल्याचे स्मरते. रामाची निवड देखिल सभा भरवुन दशरथाचे मोठे लांबलचक भाषण होऊन मग झालेली आहे. मी म्हातारा झाल्याने मला राज्य चालवणे आता जमत नाही असा सूर लावून ज्याला "जाणीव" अथवा ताकद नाही तो राज्य चालवण्यास उपयुक्त नाही वगैरे वगैरे बरेच काही सांगुन दशरथ रामाचे व त्याच्या गुणांचे कौतुक करुन राम हे राज्य चालवायला माझ्या दृष्टिने योग्य आहे असेही मत मांडतो. मात्र पुढे तो जनतेला विचारतो कि "तुम्हांला हे मान्य आहे का? राम तुम्हांला राजा म्हणून चालेल का? अजुन कोणाचे/मध्यस्थांचे काही विरोधी विचार असतील तरी त्यांनी नि:शंक मनाने मांडावे त्यातुन भलेच होऊ शकेल!" -


यदीदम् मेऽनुरूपार्धं मया साधु सुमन्त्रितम् |
भवन्तो मेऽनुमन्यन्तां कथं वा करवाण्यहम् ॥१५॥
यद्यप्येषा मम प्रीतिर्हितमन्यद्विचिन्त्यताम् |
अन्या मद्यस्थचिन्ता हि विमर्दाभ्यधिकोदया ॥१६॥ (अयोध्या कांड सर्ग २)

हे ऐकल्यावर सर्व जनता खुष झाली सर्वजण रामाचा जयजयकार करु लागले. त्यावर दशरथ गंमतीने म्हणतो - "अरे हे काय? रामाला राजा म्हणून तुमची मान्यता मिळताच मी तुम्हांला अप्रिय झालो बहुदा!" थोडक्यात राजा आहोत म्हणून वाट्टेल तसा राज्यशकट हाकला जात नसे. राजा हा जनतेच्या मान्यतेवरती निवडला जात असे हेच यातून दिसते.

ही रामाला "राजा" म्हणून मान्यता मिळताना "आनंदाची" घटना ह्या करीता आधीच सांगितली कारण साधारण समाजमन व राजाची मानसिकता कुठे झुकली होती हे समजेल. राम वनवासाला निघेपर्यंत व्यक्ती अथवा लोकांच्या समुहाची आनंद अथवा दु:खाची वर्णने ही एका चौकटीबाहेर गेल्याची उदाहरणे मिळत नाहीत. रामायण हे काव्य एकंदरच पुलंच्या कथाकथना मधील त्या पिंजर्‍यातील पोपटाप्रमाणे मीरची खात खात "अहिंसा - सत्य - अस्तेय"  हेच परत परत म्हणणारे आढळते. वाली देखिल मरताना फिल्म मधल्या शेवटचे श्वास मोजणार्‍या भारत उर्फ मनोज कुमार सारखा बडबड बडबड करत - रामाशी "शास्त्रार्थाची" चर्चा करत करत शेवटी स्वत:ची चूक मान्य करुन मरतो.

यानंतर मुख्य प्रसंग म्हणजे सीतेचे अग्निदिव्य व पुढे अयोध्येत पोहोचल्यावर सीतेचा त्याग. रामायण वाचताना रामाच्या प्रतिमेला पहिला धक्का तेव्हा बसतो जेव्हा रावणवध झाल्यावरती बिभीषण सीतेला सन्मानपूर्वक रामासमोर आणतो तेव्हा पूर्ण रामायणात एकदाच रामाचा तोल सुटलेला दिसतो. सीता समोर आल्यावरती चारचौघात तो तिला अद्वातद्वा बोलतो. मी तुला मुक्त केले आहे सर्व दिशा तुला मोकळ्या आहेत तुला हवे तिथे तू जाऊ शकतेस. तुला इथे उपस्थित असलेला किंवा नसलेला दुसरा कुणी पुरुष आवडला तर तू त्याच्या बरोबर उरलेले आयुष्य व्यतीत करु शकतेस. मी तुझ्या स्वीकार करु शकत नाही. रावणाने तुझ्यावरती कशावरुन जबरदस्ती केली नसेल? वगैरे वगैरे बरेच काही आणि २-३ तुरळक ठिकाणी तर असंबद्ध बोलताना आढळतो. हा भाग आतापर्यंत वाचलेल्या संयमी रामाशी अजिबातच संगती लावता येत नाही इतका टोकाचा संतापी राम उभा केला आहे. (गदिमांनी याच प्रसंगावरती गीत रामायणात "सखी सरले ते दोघांमधले नाते" हे गाणे लिहिले आहे.)  एक अख्खा सर्ग ह्यावरतीच आहे. मग सीतेचा सहाजिक विलाप आणि संताप ह्यावरती पुढचा सर्ग आहे. सीता रामाचा धिक्कार करते आणि लक्ष्मणाला चिता रचायला सांगते. आणि अग्नीचे स्मरण करुन त्यात प्रवेश करते. म्हणजे थोडक्यात रामाने अग्निपरीक्षा मागितली नाहीये आणि सीता अग्निपरीक्षा देत नसून संतापून जीव देते आहे असा सीन आहे. तीने अग्नित प्रवेश केल्यावरती एक अख्खा सर्ग देवता खाली येऊन रामाचे व सीतेचे गुणगान करतात सीतेचा स्वीकार कर म्हणून गळ घालतात. तोवर ही अग्नीमध्ये "वेटिंग" मोडवरती. मग पुढल्या सर्गात अग्निच प्रकट होतो. सीतेचा हात धरुन रामासमोर तीला ऊभी करतो आणि ती माझ्या तेजाहुनही पवित्र असल्याची साक्ष देतो मग राम आनंदाश्रु ढाळत स्वत:च्या मुळ स्वभावाला जागुन अत्यंत मृदुभाषी झालेला आढळतो. ज्याप्रमाणे सूर्य व प्रकाश वेगळे नाहीत तसेच सीता आणि मी वेगळे नाहीच, माझा सीतेवरती पूर्ण विश्वास आहे. मात्र त्याच बरोबर अग्नी देवाची साक्ष मिळाल्याने कोणी हिच्यावरती संशय घेणार नाहीत तसेच मलाही कामांध बनून सीतेचा स्वीकार केला असे म्हणणार नाहीत. हीचे पावित्र्य इतके प्रखर आहे की रावण हिचे काहिच वाकडे करु शकणार नव्हता. असे बरेच कोडकौतुक करताना आढळतो. ४ सर्गांची संगती लागता लागत नाही.

शांत, संयमी, मृदुभाषी, एक वचनी, एकबाणी, मर्यादा पुरुषोत्तम असलेला राम अख्या रामायणातले आपले रुप ह्या ३-४ सर्गांकरतो सोडतो आणि अयोध्येला निघताना पुन्हा आपला शांत, संयमी, मृदुभाषी, एक वचनी, एकबाणी, मर्यादा पुरुषोत्तम होतो. माझा सांगायचा मुद्दा असा की हा भाग उत्तर रामायणा प्रमाणेच प्रक्षेप आहे का? अशी स्वाभाविक शंका येते म्हणजे ज्या काळात स्त्रीयांना मर्यादा घातल्या जाव्यात अशी आचरट धारणा पक्कि होत गेली व काळाच्या ओघात स्त्रीयांना घरात कोंडले गेले त्याकाळात हा भाग आला असावा का? लोकांनी मुळ वाल्मिकी रामायण नक्की वाचून माझ्याप्रमाणे त्यांनाही हेच वाटतं का ते तपासून बघावे. मला इथे रामाची वकीलीही करायची नाहीये अथवा मला हा भाग अडचणीचा वाटतो म्हणून तो प्रक्षेप आहे असेही मला म्हणायचे नाही.  एकतर मी म्हणालो तसे चमत्कार काव्य फुलोरे बाजुला ठेवुन आपण असा विचार करु की सीता संतापून अग्निदिव्याला (अथवा जीव द्यायला) तयार झाली तरी पेटलेल्या चितेत जाऊन जिवंत परत येणे अथवा अग्नीपुरुष प्रकट होणे वगैरे सरळ सरळ भाकड कथा आहेत. आता रामायण कालिन अग्नि अथवा कुठलीही दिव्ये कशे होती कल्पना नाही मात्र शिवकालात अथवा पेशवाईत कुठल्या पद्धतीची दिव्य करावी लागत त्याची कल्पना देतो. त्या दिव्यांना कुठलाही वैज्ञानिक अथवा प्रमाण आधार नाही. पंचमहाभुतांची भीती  ... खोटं बोललं तर ती शक्तीच शिक्षा करेल ही भाबडी भावना असे. अग्नीदिव्य म्हणजे एक तापलेला आगीचा लालबुंद गोळा ज्याने अग्निदिव्य घ्यायचे कबूल केले त्याला दोन हिरव्या पानांमध्ये धरुन उचलावा लागे. त्या आधी तो पुरेसा गरम आहे हे लोकांना कळावे म्हणून त्यावरती पेंढ्याच्या काड्या टाकत त्यांनी पेट घेतलेला बघितला की तो पुरेसा तापलेला गोळा उचलायचा व तिथून काही पावले जी काही पन्नास - शंभर ठरलेली असतील ती पावले शांतपणे चालत जाऊन दुसर्‍या पेंढ्याच्या भार्‍यावरती टाकायच्या म्हणजे तो पेंढा जळत असे. ह्या दरम्यान त्याचा हात पोळला, त्याने तो गोळा खाली टाकला अथवा दुसर्‍या टोकाला असलेल्या पेंढ्याला आग लागली नाही तर हा माणूस खोटं बोलतोय असं समजलं जात असे. दुसरे असे जलदिव्य. म्हणजे काय तर जो दिव्य करणार आहे त्याने पाण्यात बुडी मारायची त्याच्या शेजारी एक धनुर्धारी व दुसरा एक पोहणारा असे दोघेजण असत. ह्याचे डोके पाण्याच्या खाली गेल्याक्षणी धनुर्धर बाण चालवणार. तो बाण पाण्यात अथवा काठावर कुठेही जाऊन पडला कि पोहायला उभा असलेला माणुस तिथवर जाणार व गेल्या मार्गानेच परत येणार. हे होईपर्यंत  डोके वर काढायचे नाही. माणूस परत आला की पाण्यात डुबकि मारलेल्याला वरती खेचणार. ही अशी दिव्ये असत. ज्यांना काही लॉजिक नाही. असेच काहीसे दिव्य सीतेने केले असावे का?

उत्तर रामायण मी आधी म्हणालो तसा सरळ सरळ प्रक्षेप आहे. कारण वाल्मिकी रामायणात शेवटच्या सर्गात रामाने पुढे दहा हजार वर्षे सुखाने राज्य केले. त्याच्या राज्यकालात कुनीच दु:खी नव्हते, रोग, वन्यप्राणी वगैरेंपासून प्रजाजन सुरक्षित होते वगैरे रामराज्याची कल्पना आहे. त्याच्या पिढ्यांनी देखिल सुख उपभोगले हे सांगुन रामायण जो कोणी वाचेल त्याचे कसे भले होईल ह्याची जंत्री दिली आहे. म्हणजे सीता - लक्ष्मणाचा त्याग वगैरे मुळ रामायणात नाही. आता तरीही उत्तर रामायणाचा विचार करायचा म्हंटलाच तर आपण हे लक्षात घ्यायला हवे की रामाची पत्नी कोण असावी? हा लोकांचा आक्षेप नसून राजाप्रमाणेच आमची राणी आदर्श व चारीत्र्याची पुतळी असावी हा आग्रह आहे. रामही जनतेच्या मागणीसाठी तिचा त्याग करतो. तिला वनात पाठवून पुन्हा तिच्याशी काहीच संपर्क ठेवत नाही. मात्र आपण हे देखिल लक्षात घ्यायला हवे की तो दुसरे लग्न करत नाही, राजा असून भूमीशय्या करतो, एकभुक्त रहातो, ब्रह्मचर्य पाळतो, यज्ञ समारंभात सीतेची मुर्ती बनवून घेतो. अखेर सीतेला धरणीने पोटात घेतल्यावर आपला देखिल अवतार संपला ह्याची जाणीव होते ... थोडक्यात त्यालाही आयुष्यात रस उरत नाही मात्र स्वत: देहत्याग करण्या आधी एका घटनेत तो शब्द दिला असल्याने लक्ष्मणाचा देखिल त्याग करतो. कथेनुसार होते असे की रामाच्या अवतार समाप्तीचा निरोप घेऊन काळपुरुष रामाला भेटायला येतो व सांगतो मी देवलोकांतुन काही निरोप घेऊन आलो आहे. तो तुला सांगायचा आहे मात्र आपल्या बोलण्याच्या मध्ये कुणीही खंड पाडू नये. राम त्याला वचन देतो की जर कोणी मध्ये आलंच तर त्याला देहांत प्रायश्चित्त देईन. बाहेर सर्वात विश्वासु म्हणून लक्ष्मणाला पहार्‍यावरती उभे करतो. थोड्याच वेळात दुर्वास तिथे येतात व मला रामाची भेट हवी म्हणून हट्ट करतात. लक्ष्मण प्रेमाने, आदराने, गयावया करुन सर्व प्रकारे त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो. पण उलट ते अजून चिडतात व रघुकुलासकट अयोध्येलाच शाप देण्याची धमकि देतात. नाईलाजाने लक्ष्मण त्या खोलीचा दरवाजा उघडून दोघांच्या बोलण्यात व्यत्यय आणतो. काळपुरुष अदृष्य़ होतो. राम दुर्वासांची भेट घेतो. मात्र काळपुरुषाला दिलेल्या शब्दानुसार राम लक्ष्मणाला बोलावतो आणि सांगतो - "मी तुला माझ्यापासून दूर जायला सांगतो आहे, कारण माझ्यापासून दूर जाणे हेच तुला मृत्युसमान आहे! हेच तुझे देहांत प्रायश्चित्". लक्ष्मणही रामाला नमस्कार करुन सरळ शरयुवरती जाऊन जलसमाधी घेतो. म्हणजे राजपदासाठी एकट्या सीतेचा त्याग केला का तर नाही. राजा म्हणून दिलेला शब्द पाळायला त्याने लक्ष्मणाचाही त्याग केला आहे. राजमर्यादा सांभाळताना त्याने स्व:ता सगळ्या मर्यादा आखून घेतल्या व त्या पाळल्याचे रामायण - उत्तर रामायण सांगते. तिथे त्याने स्त्री - पुरुष भेद केला नाही.

सीतेवरती रामाचे किती निरातीशय प्रेम होते हे त्याच्या सीता हरणानंतरच्या विलापातुन दिसते. सीतेसाठी अठरा पद्मं वानर जमा करतो, जीव पणाला लावून तो युद्ध करतोच की. त्या ३-४ सर्गांनंतर परत राम - सीता दोघही "जैसे थे". अख्या रामायणतल्या त्या तीन असंबद्ध सर्गांसाठी रामाला एका बाजूने सरसकट झोडपले जाऊ नये. इतकेच म्हणणे मांडायला मी हा लेख लिहिला आहे. उत्तरकालात स्त्रीयांना धार्मिक रुढी परंपरांच्याखाली दडपून टाकायला कुणीतरी रामाचा वापर केला हा रामाचा दोष नाही. २०१५ चे नियम व रामायणकालिन नियम हे एक असूच शकत नाहीत. मी उत्तर रामायणाला तसेही फारसे महत्व देत नाही. मुळ वाल्मिकी रामायण मी म्हणालो तसे वाचून बघावे. माझे म्हणणे पटतय का त्याचा विचार व्हावा.

बाकी राम हा म्हणालो तसा आत्मा बनला आहे. आपल्या संस्कृतीत अखेरचे नाम हे रामनाम असावे असे मानले जाते इतका राम अभिन्न भाग झालाय. उत्तरेपासून दक्षिणेत लंकेपर्यंत ते पार तिथे पलीकडे इंडोनेशियापर्यंत रामायणाच्या पाऊलखुणा सापडतात. वडिलांनी दिलेल्या शब्दाखातर वनवास स्वीकारायचा, वनवासात पत्नीचे अपहरण झाल्यावरती शोध घेत घेत दंडकारण्य ओलांडायचे,  राज्य मिळवून देऊन सुग्रीवावरती उपकार करुन त्याची मदत घ्यायची, रावणाच्या राज्यात सत्तेची इच्छा कुणाला आहे हे ओळखुन बिभिषणाशी संपर्क साधायचा, समुद्रातुन सेतु बांधायचा, रावणाचा पराभव करुन त्याला मारुन त्याच्या पाठीराख्यांची गठडी वळायची, राजकिय, सामरिक व इतर नीती नियमांचा - आदर्शांचा - कारणांचा - परिणामांचा विचार करुन ते राज्य स्वत: न उपभोगता बिभीषणाच्या पदरात टाकणे आणि परत येणे ..... हे सगळं भव्य दिव्य आहे.त्याने दिपून जायला होतं आणि समर्थ रामदास मनाच्या श्लोकात म्हणतात तसा राम पाठीराखा भासायला लागतो आपोआप हात जोडले जातात व मुखातुन श्लोक बाहेर पडतो -

समर्थाचिया सेवका वक्र पाहे।
असा सर्व भूमंडळी कोण आहे?
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥

 - सौरभ वैशंपायन

Saturday, January 24, 2015

मै तो सुपरमॅन ...

मध्ये काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवरती मेसेज आला होता, संभाजी महाराजांबाबत. शंभूराजांचं अमानवी वर्णन त्यात केलं होतं. उंची सात फुट काय? आणि तलवारीचं वजन ६५ किलो काय? सिंह-वाघांचे जबडे हाताने उभे फाडत ... वगैरे वगैरे बरच काही. कपाळाला हात लावावा इतकाही तो मेसेज विशेष नव्हता. त्या आधी शिवाजी महाराजांवरती देखिल एक मेसेज फिरत होता - व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाने रायगडवर येऊन तिथली माती बॅग मध्ये घेतली, सुभाषबाबू हिटलरला भेटायला गेले तेव्हा हिटलर शिवरायांवरचे पुस्तक वाचत बसला होता; अश्या अनेक सुरस रम्य कथा त्यात होत्या. हे मेसेज हसून सोडून द्यायचे असतात.

आपले राष्ट्रपुरुष हे "अमानवी" किंवा १००% आदर्शांचा  आणि फक्त सद्गुणांचाच तितका पुतळा असायलाच हवेत हा आपला हट्ट का असतो हे मला समजत नाही. मुघलांसमोर हार न मानलेले सगळे महायोद्धे अश्या अनुयायी + मावळ्यांसमोर आपली तलवार निमुटपणे म्यान करतात. मला शाळेच्या अभ्यासक्रमात जनार्दन लवंगारेंचा "महापुरुषांचा पराभव" म्हणून एक धडा होता. महापुरुषांचा पराभव हा शत्रू करत नाहीत तर त्याचे अनुयायीच करतात हे सप्रमाण त्यांनी सांगितले होते. तो धडा दुसर्‍या चालीवरती वाचायची गरज मला वाटली. म्हणजे नेत्याने - आदर्शाने जे नीतीनियम घालून दिले त्याला हरताळ फासणे हा वेगळाच मुद्दा आहे, मात्र आपल्या आदर्शाने काडीचीही चूक करता कामा नये ... नव्हे!!! त्यांनी चूक केली असेल तरी ती चूक नव्हतीच हा जो काही आपल्या समाजाचा हट्ट असतो त्याचे कौतूक करावे तितके कमी आहे.

ते क्षत्रियकुलावतंस शिवाजीराजे झाले म्हणून झोपतानाही कंबरेला तलवार असायलाच हवी ही अपेक्षा करणारे आपल्याकडे बहुसंख्य मिळतात हे स्वानुभवाने सांगतोय. बरं, चार खर्‍या गोष्टि ह्यांना ससंदर्भ समजवाव्यात तर "महापुरुषांचा" अपमान झाला असं गावभर बोंबलत फिरतात. आजकाल सोशल नेटवर्किंगच्या साईट्स असल्याने भोंग्याच्या रिक्षांचे पैसे देखिल भरायची गरज उरलेली नाही. म्हणजे जसं पोरगं उकाड्याने कितीही कावलं असलं तरी बहुतांशी आयांचा त्याला गोंड्याची कानटोपी चढवायचा जो हट्ट असतो; त्याच पद्धतीने इतिहासातील महापुरुषांच्या मोठेपणाची हौस ह्या महाभागांनाच असते. मोबाईलवरती आलेले मेसेज व कादंबर्‍या हे ह्या महाभागांचे "संदर्भ" असतात. वरुन ते महापुरुष जातीनिहाय वाटून घेतलेले असतात. आंबेडकरवादि सावरकरांकडे बघत नाहीत, सावरकरवादि गांधींकडे बघणार नाहीत, गांधीवादी कुणाकडेच बघणार नाहीत.

मी तरी खोटं का बोलू? ८-१० वर्षांपूर्वीपर्यंत मी सावरकरांपलीकडे बघत नव्हतो. पण वय, वाचन, अक्कल वाढत गेली तशी निदान दुसर्‍या बाजूचं म्हणंणं ऐकायची तयारी झाली. फाळणीच्या बाबतीत डॉ आंबेडकरांचे बरेचसे विचार "प्रॅक्टिकल" होते. वास्तवाला धरुन होते तर सावरकरांचे विचार हे कितीही राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेले होते तरी ते आत्यंतिक आदर्श असे "हिंदू" विचार होते. व मुळात हातातली परीस्थिती कुठल्याही कारणाने निसटल्यावर सावरकरांचे ते विचार प्रत्यक्षात येऊ शकत नव्हते ह्याची जाणीव झाली. शिवाय स्वा. सावरकर अथवा डॉ. आंबेडकर हे "इतिहासकार" खचितच नव्हेत ह्याची जाणीव झाली. ते "विचारवंत" होते असं म्हणता येईल व त्यांच्या दृष्टिने समाज जसा होता अथवा व्हायला हवा होता ती उदाहरणे इतिहासातून हुडकून लोकांसमोर ठेवली. स्वा. सावरकरांवरती जसा आत्यंतिक व एकांगी हिंदूत्वाचा शिक्का मारुन लोकं मोकळे होतात तसेच डॉ आंबेडकरांवरती देखिल धम्माबाबत त्यांनी जे विचार मांडले त्यावर धम्मप्रसारासाठी डॉ. आंबेडकरांच्याही १०० वर्ष आधीपासून काम करणार्‍या जगभरातील संस्थांनी "श्रीयुत आंबेडकरांनी त्यांना हवा तो धम्म मांडला खरा धम्म नव्हे!" अशी टिका केली होती. या प्रकारच्या समकालिन टिका आपण लक्षात घ्यायला हव्यात. त्यांच्यात काही तथ्य असेल तर निदान ते ध्यानात घ्यायला हवे.

मुळात महापुरुष असोत अथवा आपल्या दृष्टिने खलपुरुष असोत पहिल्यांदा त्या गुणदोषांसकट इतिहासातील ते पात्र स्वीकारायला हवं. तरच इतिहास समजायला सुरुवात व मदत होते. खलपुरुषांचा चांगला गुण अथवा महापुरुषाचा वाईट गुण नाकारुन काही मिळणार नसते ना इतिहास बदलणार असतो. शिवाय जे कर्तृत्व गाजवले अथवा ज्या चूका झाल्या त्या पूर्वायुष्यात कि उत्तर आयुष्यात ह्यावर विचार व्हायला हवा. आधी चूका करुन नंतर इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावे असे काही अचाट - अफाट करुन दाखवले असेल तर उत्तमच. मात्र राघोबांसारखे आधी अटकेपार झेंडे गाडायचे व नंतर इंग्रजांशी चुंबाचुंबी करायची असे असेल तर कपाळाला हात लावावासा वाटतो. अर्थात अटकेपारचा झेंडा ही जमेची बाजू घ्यायची व उत्तर आयुष्यातून काय करायचं नाही? हे शिकायचं. इतिहास हा धडा घेण्यासाठी असतो. एकमेकांच्या उरावर बसण्याकरता नव्हे हे समजून घ्यायची वेळ आली आहे.

शेकडो वर्षांनी अथवा काही दशकांनी आपल्याला एकसंध इतिहास दिसू शकतो, आधीच्या व नंतरच्या घटना संगतीवार दिसतात पण त्याकाळी तो इतिहास "LIVE" असतो हे आपण लक्षात घ्यायला हवं. दुसरी गोष्ट  इतिहासातील पात्रांची मनोभूमिका आपण अनेकदा लक्षात घेत नाही. सर्वात मोठे उदाहरण छत्रपती शंभूराजे. आजकाल - "शंभूराजे मुघलांना जाऊन मिळाले ते शिवाजी महाराज व शंभूराजे यांचा मुघलांना चकवायला ठरवलेला संयुक्तिक राजकिय डाव होता." असं सांगितलं जातं. पण त्यात घरातल्या स्त्रीयांना कसं काय समाविष्ट केलं ह्याचं उत्तर कोणी देत नाही. वर्षभर आघाडी शांत ठेवायची म्हणून भूपाळगड प्रकरण होऊ देतील? भूपाळगडावरती सातशे जणांचे हात तोडले गेले, भूपाळगड पाडला गेला. हे केवळ एक डाव म्हणून शिवराय कसे होऊ देतील? ती संभाजी महाराजांची तरुण वयातल्या उसळत्या रक्ताची चूक होती हे लक्षात घ्यायला हवं. उलट संभाजीराजे त्यांच्या शीघ्रकोपी स्वभावाला धरुनच वागले. शीघ्रकोप हा त्यांचा स्वभाव होता त्याला कोणी काहीच करु शकत नाही. त्या शीघ्रकोपी व्यक्तित्वासकट त्यांचा इतिहास मान्य करायला हवा. आणि हा शीघ्रकोप पुढेही गोवा स्वारीत पोर्तुगीज विजरई दिसल्यावर वहात्या पाण्यात घोडा घालणे असो अथवा कलशाची बाजू घेऊन शिर्क्यांवर केलेला हल्ला असो कायम दिसून येतो. एखादा गुण चांगला की वाईट हा प्रश्नच नाही परीस्थितीनुरुप तो गुण चांगला - वाईट असा बदलू शकतो. त्यामूळे शीघ्रकोपी शंभूराजांचे व्यक्तित्व एकदा लक्षात घेतले की इतिहास सुटसुटित होतो.

संभाजीराजांची मनोभूमिका अत्यंत शांतपणे लक्षात घ्यायची गरज आहे. सख्खी आई नाही. वयाच्या नवव्या वर्षी राजकारणासाठी मुघलांचा मनसबदार म्हणून जावं लागतं, मागोमाग आग्र्याचं जीवघेणं संकट, जीव वाचावा म्हणून का होईना पण खुद्द वडीलांनीच जिवंतपणी श्राद्ध घालणं,  मग परत मुघलांशी शांतता हवी म्हणून पुन्हा मनसबदार होणे. हे सगळं वयाच्या १२-१४ पर्यंत बर्‍याच अंशी अनाकलनिय असेलही. वडील सांगतात ते चांगलच असेल हा समजूतदारपणा असेलही, पण शारीरिकच नव्हे तर जे वैचारीक दृष्ट्या उमलण्याचं फुलण्याचं वय असतं त्या वयात संभाजीराजे जगावेगळ्या मनस्थितीतून गेले ह्यात वाद नाही. अश्या घडामोडी कुणा पिता-पुत्राच्या आयुष्यात आल्यासं दुसरं उदाहरण नाही. उलट म्हणूनच मुघलांना जाऊन मिळणे अथवा पुढे शिवाजी महाराज जिवंत असताना अघोर मार्गाला जाऊन केलेला कलषाभिषेक असो, संभाजी महाराजांच्या जुन्या दुखावलेपणाची संगती लागायला सुरुवात होते. आज ३५०-३७५ वर्षांनी आपण बघताना शिवराय हे सगळं सगळं स्वराज्यासाठी करत होते हे आपल्याला समजतं पण आपण मागे जाऊन संभाजीराजांच्या त्या त्या वयात स्वत:ला त्या जागी ठेवायचा प्रयत्न जरी केला तरी मनात शेकडो प्रश्न उभे रहातात.

जे घडलं त्यात चूक ना महाराजांची होती ना संभाजीराजांची त्या - त्याक्षणी एक राजा अथवा राजपुत्रच नव्हे तर एक व्यक्ती म्हणून जे वाटलं ते त्यांनी केलं. आपण दोहोंची बाजू समजून घ्यायला हवी. खासकरुन शंभूराजांची. आणि बाजू समजून घेणे म्हणजे जे कटू घडलं त्यावर मखमालिशी करणं नव्हे. संभाजीराजे अत्यंत बुद्धीमान होते आणि अश्या माणसांची घुसमट लवकर होते. त्यांच्या मनासारखं व त्यांना आव्हान देईल असं काम मिळालं नाही की अश्या बुद्धीमान लोकांच "आपली इथे किंमत नाही" हे मत फार लवकर बनतं. कदाचित अश्याच परीस्थितीत मनाचा कोंडमारा होऊन ते मुघलांना जाऊन मिळाले. मात्र ते ज्या तिरमीरीत उठून मुघलांना जाऊन मिळाले त्याहून जास्त ओढीने स्वराज्याकडे परत आले. आपलं ऐकणारं इथे कोणीच नाही संतापाच्या भरात आपण आपल्याच माणसांना त्रास दिलाय हे ज्याक्षणी लक्षात आलं त्याक्षणी त्यांनी परतायचा निर्णय घेतला.

दुसरी गोष्ट बाकरें गुरुजींना दिलेले दानपत्र एक -एक ओळ सुटी करुन वाचली की संभाजीराजांचे संपूर्ण व्यक्तीमत्व तपशीलवार डोळ्यासमोर उभे रहाते. ते स्वत: संभाजीमहाराजांनी दिलेले दानपत्र असल्याने ऐतिहासिक दृष्ट्या ते अमुल्य आहे. यामध्ये ते आजोबा शहाजीराजे व वडिल शिवाजी महाराज यांच्या शौर्याची, पराक्रमाची, दानशूरतेची, प्रजाहीतासाठी असलेल्या तळमळीची प्रचंड स्तुती करतात. मात्र शिवराय "वडिलांच्या भूमिकेत कमी पडले" असा सूर एका वाक्यात दिसून येतो. ते सगळं वाचताना पंचपक्वानात कचकन दाताखाली बारिकसा खडा यावा तसं एकक्षण वाटतं, पण संभाजीराजांच्या बाजुचा विचार करता यात मला काहीच वावगे वाटत नाही. मी परत सांगतो जे घडलं त्यात चूक ना महाराजांची होती ना संभाजीराजांची. शिवाजी महाराजांना स्वराज्याचा गाडा हाकायचा होता. पण त्यात ते कुटुंबाला वेळ देऊ शकले नाहीत आणि ते शक्यही नव्हतं. अन्यथा स्वराज्य उभं रहातंच ना. पण वडिलांकडून मुलाच्या ज्या अपेक्षा असतात त्यांची अपेक्षा संभाजीराजांनी उमलत्या वयात केली असेल व व्यस्त वेळामुळे महाराज त्या पूर्ण करु शकले नसतील तर संभाजीराजांची घालमेल होणं स्वाभाविक होतं.

वडील - मुलाच्या नात्यातला हा तडा इतरही अनेक थोरा मोठ्यांच्या बाबतीत दिसून येतो. मग ते लोकमान्य टिळक - श्रीधरपंत टिळक असोत अथवा महात्मा गांधी व हरीलाल असोत. लोकमान्य टिळक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात वैचारिक भूमिकेत अजिबात पटत नसे. त्याचे पडसाद अगदी केसरी विरुद्ध मूकनायक अश्या स्वरुपातही उमटले. पण लोकमान्य टिळकांचे पुत्र श्रीधरपंत हे मात्र बाबासाहेबांचे जीवलग मित्र बनले. बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते की बाळ गंगाधर टिळक हे खरे लोकमान्य नव्हेत. तर श्रीधरपंत हेच खरे लोकमान्य. श्रीधरपंत देखिल बाबासाहेबांना इतके जवळचे मानत की त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी शेवटचे पत्र लिहीले ते डॉ आंबेडकरांना. श्रीधरपंतांचं असं जाणं बाबासाहेबांनाही भावनिक पातळीवरती फार हेलावून टाकणारं होतं. तीच गोष्ट गांधीजी व त्यांचा थोरला मुलगा हरीलालची. तुम्ही असाल जगासाठी बापू - महात्मा ... "माझे वडील कुठे आहेत?" हा त्यांचा स्वाभाविक प्रश्न होता. व त्यांना तो प्रश्न पडायचे कारण सर्वात मोठा पुत्र असल्याने वडिलांचा आपल्या हातातून सुटत चाललेला हात त्यांनी अनुभवला होता. इंग्लंडला जाऊन वकिलीच्या उच्च शिक्षणाबाबत वडिलांनीच घेतलेली विरोधाची भूमिका ही "स्वातंत्र्यसैनिक" म्हणून घेतलेली होती. तो नकार एक तरुण, काहीतरी करुन स्वत:ला सिद्ध करायला धडपत असणारा "मुलगा" म्हणून हरीलाल यांच्या मनाला लागणं हे आपण समजून घ्यायला हवं. ह्या नात्यांच्या नाजूक गाठी हलक्या हातानेच सोडवाव्या लागतात. दोहोंची भूमिका समजून घ्यावी लागते.

इतिहास हा दरवेळी तलवारींनी खेळलेला - रक्ताळलेला नसतो. त्याला नात्याचेही अत्यंत हळवे पदर असतात. ते हातावर बसलेल्या फुलपाखरागत हळुवार हाताने सांभाळावे लागतात ह्याचं भान आपल्याला यायला हवं. एकदा संभाजीराजांची मनोभूमिका अंशत: अनुभवली तरी संभाजीराजे मुघलांना जाऊन मिळाले ह्यावर पांघरुण घालायची गरज उरत नाही. उलट नंतर त्यांचा त्या सगळ्यातून बाहेर पडून डोळे दिपवून टाकणारा पराक्रम व मृत्यूलाही धीरोदात्तपणे सामोरे जाणारी वीरवृत्ती अजून लखलख करत तेजाळते.

मी काय लिहीलय हे कदाचित काही त्रस्त समंधांना समजणारही नाही. तो त्यांना महापुरुषांचा अपमान, संभाजीराजांना बदनाम वगैरे करण्याचा डाव वाटेल कारण ती लोकं झोपतानाही कंबरेला एक अदृष्य़ तलवार लटकवून झोपतात. ह्याच त्रस्त समंधांपासून इतिहास जपण्याची विनंती करणारा हा लेख. आपले महापुरुष सुद्धा "माणूस" होते "सुपरमॅन" नव्हते. त्यांनाही राग-लोभ-प्रेम-तिरस्कार-भीती-करुणा अश्या सहाजिक मानवी भावना होत्या. त्यांच्या हळव्या भावना आपण समजून घेण्याचा साधा प्रयत्नही केला नाही तर स्वत:ला अनुयायी तरी का म्हणवून घ्यायचे? आपले हट्ट व अवाजवी अपेक्षांचे ओझे इतिहासातील महापुरुषांच्या खांद्यावर टाकणे आपण थांबवायला हवे. एखाद्या मेसेजमध्ये कधीच न घडलेल्या गोष्टी ठोकून देऊन महापुरुषांना मोठे करण्याइतके आपण मोठे झालो नाही ह्याची जाणीव ठेवावी. महापुरुषांनी आधीच इतके करुन ठेवले आहे की त्यांना खोट्या ठिगळांची गरज नाही. त्यामुळे जगातल्या सगळ्याच गोष्टिंची अपेक्षा एकाच व्यक्तीकडून करण्यात काही हशील नाही हे आजकालच्या वैचारीक "सुपरमॅन" असलेल्यांनी समजून अमानवी मेसेज तयार करणे अथवा अजून पुढे दहा जणांना पाठवणे थांबवायला हवे.

अजून काय लिहीणे? सुज्ञ असा!

 - सौरभ वैशंपायन.

Wednesday, January 21, 2015

परींदे - Birds in War.

"मेरी इजाजत के सिवा यहॉं परींदा भी पर नही मार सकता!" हा संवाद अनेकदा आपण ऐकला असेल. पण पूर्वीपासून खरोखर ह्याचा प्रत्यय युद्धभूमीवर येत असे. पूर्वी एखाद्या किल्याला/गावाला वेढा दिला की शत्रू शरण येईपर्यंत तो वेढा राबवला जात असे. मग बाहेरुन मदत मागायची कशी? सोप्पे उत्तर, प्रशिक्षित केलेले "कबूतर" पाठवायचे. त्याच्या पायाला चिठ्ठी बांधायची व सोडायचे. मग अश्या कबुतरांना थांबवण्यासाठी प्रशिक्षित तीरंदाज नेमले जायचे. पण बाण असा जाऊन जाऊन किती उंच व किती दूर जाणार? मग उपाय म्हणून "ससाणे" पाळून त्यांना प्रशिक्षित करत व ते ससाणे कबुतरांवरती सोडले जात. पण समजा एकाचवेळी ढीगभर कबुतरं उडवली तर? .... ससाण्यांचीही मग फौज तयार केली जात असे. जोवर शत्रू टेकीला येत नाही तोवर आत - बाहेर कोणी जाणार नाही ..... "पाखरु" पण नाही.


ससाणे वगैरे पाळण्याचे उल्लेख ४ हजार वर्षाहुन जुने आढळतात. मेसेपोटेमिया मध्ये ह्याची सुरुवात झाली असे समजले जाते. तरी पण  साधारण हे असे ससाणे, गरुड वगैरे पाळण्याची पद्धत मुख्यत: उझबेगीस्तान, मंगोलिया, किरगिझस्तान वगैरे भागात फार पुरातन आहे. पुढे हुणांनी ती पद्धत युरोपात नेली तर मंगोलांनी आपल्याकडे. म्हणूनच आपणही अनेक मुघल शासक मनगटांवरती ससाणे वगैरे घेऊन उभे असलेले अनेक चित्रात बघतो. सम्राट अकबराचे एक असेच चित्र प्रसिद्ध आहे. शहजहान सकट इतर अनेक मुघलांची, चांद-बीबी वगैरेंची देखिल अशी ससाणे हातावरती घेतलेली मुघल शैलीची चित्रे आहेत. अर्थात ही चित्रे समकालिनच होती असेही म्हणता येत नाही. रंगीत चित्रे तर सरळ सरळ गेल्या १५०-२०० वर्षात काढली गेली यात शंका नाही. एकंदरच ससाणा हे सामर्थ्य, क्रुरता, वेग, बेदरकारपणा, शौर्य वगैरेंचे प्रतिक मानले गेले. त्यामुळे ससाणे पाळणं हा छंद मुघल शासकांत दिसून येतो. तसे तर पूर्वीचे अनेक शासक, अनेक प्राणी पक्षी पाळत. मोर, पांढरी कबुतरं व पोपट वगैरे तर फारच सहज आढळून येतात. वाघ, बिबट्यांचे बछडे लहानपणीपासून बाळगून ते देखिल पाळले जात. पण अशी चित्र म्हणून आढळतात ती बव्हंशी ससाण्याला मनगटावर बसवलेलीच.

एकंदरच ससाणा हा जगभरातील संस्कृतीत मानाचे स्थान पटकवलेला पक्षी दिसून येतो. इजिप्शियन संस्कृतीत तर तो रक्षकाच्या रुपात देखिल दिसतो. मानवी धडांवरती ससाण्याचे डोके असलेली अनेक चित्रे आढळुन येतात. इजिप्शियन राजांच्या मुकुटावरती पुढील बाजूस नाग व मागच्या बाजूला ससाण्याचे पंख पसरलेले चित्र अथवा मुर्ती मिळतात.चीन, जपान मध्ये तिसर्‍या - चौथ्या शतकात, अरबस्तानात ५ व्या शतकात, तर युरोपात आठव्या शतकात ससाणे पाळण्याचे स्पष्ट उल्लेख मिळायला सुरुवात होते. कुराणात ससाणा, शिकारी कुत्रे वगैरेंनी केलेली शिकार "हलाल" समजली जात असल्याने अरबस्तानात देखिल शिकारीसाठी ससाणे पाळले जात. १३ व्या शतकात तैमुर मिर्झा नामक अरबी इसमाने "बाझ नामा-यी नासिरी" हा ससाण्यांवरील ग्रंथच पर्शियन भाषेत लिहीला.

इसवीसन ९०३ मधली किएव्ह मधली एक कथा सांगितली जाते - की ड्रेव्हलियन्सने किएव्हच्या राजाला मारल्याने "ओल्गा" ही त्याची बायको किएव्हची राज्यकर्ती बनली. किएव्ह व ड्रेव्हलियन्समध्ये दिर्घकाळ युद्ध सुरु होतं. नवर्‍याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी तीने अनेकदा ड्रेव्हलियन्सना खोटे बोलून फसवून ठार केले. नंतर ड्रेव्हलियन्सचा एक मोठा गट तीने पकडला त्यांनी गयावया केल्यावरती त्यांना प्रत्येकी ३ चिमण्या व ३ कबुतरे द्यायला सांगितली. मागणी विचित्र होती. पण जीव वाचवायला त्यांनी ती मिळवून दिली. तीने ड्रेव्हलियन्सना सोडून दिले. जशी संध्याकाळ झाली तशी तीने त्या कबुतरांच्या व चिमण्यांच्या पायाला दोर्‍याने व ओल्या कापडातुन "सल्फरचे" तुकडे बांधुन त्यांना सोडून दिलं म्हणे. त्या चिमण्या व कबुतरे आपल्या नेहमीच्या घरातील वळचणीत शिरले थोड्याचवेळात त्या सल्फरचा हवेशी संयोग होऊन ते पेटले व ड्रेव्हलियन्सचे अख्खे गाव आगीच्या वेढ्यात पडले. अशी एक कथा "ओल्गा ऑफ किएव्ह" म्हणून मिळते.

आधी सर्व सामान्य शिकारी जमातींचा म्हणून ओळखला जाणारा हा वारसा पुढे पुढे प्रतिष्ठेची बाब समजली जाऊन फक्त आर्थिक वा शासकिय उतरंडित उच्चवर्गियांचा हा "छंद" झाला. FALCONRY मध्ये केवळ ससाणा न रहाता इतर अनेक ताकदवान पक्षी समाविष्ट झाले. इतकेच कशाला पुढे पुढे युरोपात तर कोणी कुठला ससाणा अथवा तत्सम पक्षी पाळायचा ह्याचे काटेकोर नियमच बनले. सम्राट, राजा, राणी, राजपुत्र, राजकन्या, प्रधान, दरबारी लोक, धर्मगुरु, शासकिय अधिकारी अशी ती उतरंड लागत गेली. सम्राट असे तो सुवर्ण गरुड, गिधाड, व ससाण्यातील "मर्लिन" नामक प्रजात पाळू शकत असे, बाकी कोणाला हे पक्षी पाळायचे अधिकार नव्हते. राजा "ग्रे-फाल्कन" प्रजात बाळगत असे, राणी अथवा राजकुमार "पेरीग्रीन" प्रजातीचे ससाणे पाळत असत. अर्थात युरोपातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रजाती पाळायचे नियम होते. मात्र ढोबळ मानाने वरीलप्रमाणेच नोंदि मिळतात.


मात्र पुढे पुढे हा केवळ छंद न रहाता "युद्धात" वापरायचे साधन बनला. वरती सांगितले तसे शत्रुकडून संदेश घेऊन उडलेली कबुतरं; हे ससाणे मधल्यामध्ये पकडून ठार करत. अगदि दुसर्‍या महायुद्धापर्यंत ह्याचा वापर केला जात असे. पहिल्या महायुद्धात तर फ्रेंच व जर्मन्स संदेश वहनाचा खात्रीशीर मार्ग म्हणून कबुतरे वापरत. अगदि ही पोस्टल सर्विस "पाठीवरती" मिरवली जात असे. व गरज पडेल तिथुन ह्या कबुतरांना सीमेवरुन मुख्य तळाकडे अथवा शत्रुच्या सीमेपलीकडे सोडले जात असे. पहिल्या महायुद्धातला हा सरसकट वापरला गेलेला
प्रकार होता. स्वीस सैन्याने देखिल ह्याचा वापर केला. अमेरीकन सिग्नलिंग सर्विसच्या कबुतरांनी फ्रेंचांची फार मोठी मदत केली. इतकेच काय तर "चेर अ‍ॅमी" नामक कबुतरीने त्या काळतले अत्यंत महत्वाचे असे १२ संदेश अत्यंत योग्यवेळी पोहोचवल्याने तीला फ्रेंचांकडून चक्क "Croix de Guerre with Palm" म्हणून "मरणोत्तर" अवॉर्ड दिला. आपल्या शेवटच्या खेपेत बिचारीला पंखात, छातीत व पायात छर्रे लागुन ती गंभीर जखमी झाली तरीही तीने तो अत्यंत महत्वाचा संदेश पोहोचवून ७७च्या डिव्हिजन मधील २०० अमेरीकन सैनिकांचे प्राण वाचवले. अमेरीकन्सनी फ्रेंच सरहद्दिवरती अशी १२ कबुतर केंद्रे उघडली जिथे कबुतरे येऊन संदेश पोचवत. तब्बल १५०० कबुतरे त्यांनी यासाठी वापरली. अश्या कबुतरांना war/homing pigeons म्हणत. त्यांना ठार मारणं अथवा जखमी करणं देखिल 21A कायद्याखाली गुन्हा ठरवण्यात आलं होतं. "homing pigeons देशाचे महत्वाचे काम करत आहेत. त्यांना मारु नका, सरकारला मदत करा. त्यांना ठार करणं, जखमी करणं हा गुन्हा असून असे करताना कुणी आढळल्यास त्याची माहीती पोलिस, लष्कर वगैरेंना द्या. गुन्हेगाराला ६ महिन्यांची कैद, १०० पाउंड दंड अथवा दोन्हीची शिक्षा आहे." असे संदेश देणारी पत्रके जागोजागी लावली होती. शिकार करणार्‍यांची माहीती देणार्‍याला ५ पाउंडाचे बक्षिस सुद्धा होते.


दुसर्‍या महायुद्धात तर कहर तेव्हा झाला जेव्हा जर्मन सेनाधिकारी व नाझींच्या क्रूर अश्या SS संघटनेचा सर्वेसर्वा "हिमलर" हा स्वत: कबुतरांचा प्रेमी होता. व तो "German National Pigeon Society" चा अध्यक्ष देखिल होता. त्याने जर्मनीतील शक्य तितकी कबुतरे पकडायचा त्यांना पाळायचा व प्रशिक्षित करायचा घाट घालता.  या कबुतरांचा वापर निरोप पोचवणारी यंत्रणा म्हणून करायचे ठरवले. ब्रिटिश गुप्तहेर संस्था MI5 हिने अश्या कबुतरांचा छडा लावायचे व ती थांबवायचे ठरवले. ब्रिटिश कागदपत्रांनुसार अशी कबुतरे १९४० पासूनच बेल्जियन, बाल्कन प्रदेश व पश्चिम हॉलंडमधील छुप्या "गेस्टापोंना" निरोप पोहचवायला ये जा करत. मग ब्रिटिशांनी ह्याला आळा घालण्यासाठी "ससाण्यांची गस्त" सुरु करायचे ठरवले. शेकडो ससाणे प्रशिक्षित केले गेले व त्यांनी अश्या कबुतरांना पकडायला अथवा ठार करायला सुरुवात केली. ब्रिटिश कागदपत्रांत दोन पकडल्या गेलेल्या कबुतरांबाबत एक गंमतीशीर नोंद आढळते. त्यांना "युद्धकैदि" ठरवले गेले - "Both birds are now prisoners of war working hard at breeding English pigeons." एकिकडे माणसे तर जीव खाऊन लढतच होती मात्र त्या बरोबर जर्मन कबुतरे विरुद्ध ब्रिटिश ससाणे असं आकाशातलं विचित्र युद्ध देखिल सुरु झालं होतं. 


दुसर्‍या महायुद्धात शह - काटशह देणे सुरु होते. निरोप अथवा खुणांसाठी चिन्हे काढलेले वीजेचे खांब, विशिष्ट
पद्धतीने कापणी केलेली शेते, घराबाहेर लटकवलेल्या संस्थयास्पद वस्तू ह्या MI5 चे लक्ष बनल्या होत्याच पण कुणी कबुतर पाळणारा आढळलाच तर MI5 त्याला कधीही चौकशीसाठी उचलेल याचा भरवसा उरला नव्हता. याच दरम्यान ब्रिटनने देखिल कबुतरांचा "उडते बॉम्ब" म्हणून जर्मन विमानांविरुद्ध अयशस्वी वापर केला होता. MI5 खेरीज MI14  व MI16 देखिल ह्यावर विचार करु लागली होती. ह्या कबुतरांच्या अंगावरती अगदि जीवाणूंच्या डब्या लावून शत्रू प्रदेशात सोडायच्या कल्पना त्यांच्या डोक्यात आल्या होत्या. ४०० कबुतरांना यासाठी प्रशिक्षण द्यायचे ठरले होते मात्र हा प्रोजेक्ट गरजेपेक्षा खूप जास्त खर्चिक आहे असा शेरा मारुन हे प्रकार थांबवले गेले.


पहिल्या महायुद्धात तर कबुतरांच्या गळ्यात कॅमेरा अडकवून शत्रुंच्या प्रदेशांचे वरुन फोटो काढण्याचे प्रयत्न जर्मन्सने केले होते. अर्थात हाती फार काही लागले नाही. पण ती कल्पना भन्नाट होती यात वाद नाही. नंतर तसा प्रयत्न कुणी केल्याचे उदाहरण नाही. मात्र दुसर्‍या महायुद्धात ब्रिटिशांनी तब्बल अडिच लाख कबुतरांना ह्या युद्धात खेचले. व या पैकी ३२ कबुतरांना 21st डिकन्स मेडलने गौरविल्याची नोंद आहे. हा पुरस्कार म्हणजे प्राणी - पक्षी यांचा "व्हिक्टोरीया क्रॉस" समजला जातो. वरती उल्लेख केलेल्या अमेरीकन "चेर अ‍ॅमी" कबुतरीप्रमाणेच ब्रिटनचे "विल्यम ऑफ ऑरेंज" नामक कबुतर "21st डिकन्स मेडल" या शौर्य पुरस्काराचे मानकरी ठरले. त्याच्या मुळे अर्नहेमच्या युद्धात तब्बल २००० ब्रिटिश सैनिकांचे प्राण वाचले. जर्मन्सच्या सुसज्ज वेढ्यामुळे संदेश पोहोचवायला रेडियो सेटचा वापर करता येत नव्हता तेव्हा विल्यम ऑफ ऑरेंजने ती कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. यासाठी साडेचार तासात त्याने तब्बल ४०० किमीचा प्रवास केल्याची नोंद आहे.  पण ब्रिटिशांना रानटी ससाण्यांचा वेगळाच प्रश्न उभा राहीला अनेकदा हे ससाणे ब्रिटिशांचे निरोप आणणारी कबुतरेच ठार मारत. विशेषत: दक्षिणेकडे इंग्लिश चॅनल पार करुन येणारी कबुतरे ह्या ससाण्यांच्या भक्ष्यस्थानी पडत. अश्या ६०० रानटी ससाण्यांना त्यावेळी गोळ्या घालून ठार केले. अनेक घरटी नष्ट केली. अनेक अंडी नष्ट केली. अखेर रोनाल्ड स्टिव्हन्सने कबुतरांप्रमाणेच ससाणे पकडून त्यांना लष्करी उपयोगासाठी वापरता येईल हे सुचवले.

अमेरीका व जपानच्या मधील उत्तर पॅसिफिक महासागरात "मिड वे" बेटांवरती अमेरीकेने १९४०च्या आसपास आपला नाविक व हवाई तळ बनवला. इथून जी विमाने ये-जा करत त्यांच्यासाठी सर्वात मोठा धोका होता तो इथे असलेल्या "सीगल" पक्षांच्या. ते एखाद्या क्षेपणास्त्रासारखे विमानांवरती येऊन धडकत अथवा विमानांच्या इंजिनमध्ये ओढले जात त्याने विमानचे नुकसान होई अथवा संपूर्ण विमानच कोसळण्याचा धोका होता. त्यांना सुरुवातीला शॉटगन्सने ठार केले जाई पण सीगल्सची संख्याच इतकी प्रचंड होती की ह्या प्रकारांना आळा बसत नव्हता. एक उपाय म्हणून तिथे अमेरीकन नेव्हीने काही ससाणे पाळले आणि त्यांच्या भीतीने धावपट्टिच्या बाजूने सीगल फिरकणे जवळपास बंद झाले. आज जगभर अनेक ठिकाणी ही पद्धत वापरली जाते.


आज FALCONRY हा जगभरात लोकप्रिय खेळ/छंद म्हणून ओळखला जातो. जगभरात फाल्कनर्सचे क्लब्स आहेत. त्यांच्यात स्पर्धा देखिल घेतल्या जातात. शर्यतीच्या घोड्यांची जसी खास पैदास केली जाते तशीच ससाण्यांची, घुबडांची, गरुडांची खास पैदास केली जाते. दोन वेगवेगळ्या प्रजातींचे असे शिकारी पक्षी वापरुन मिश्र प्रजातींच्या ससाण्यांची, गरुडांची वगैरे पैदास करतात. अर्थात युरोपियन देशात व अमेरीकेत ह्यावरती कडक नियम घातले आहेत. कतार, युनायटेड अरब अमिरात वगैरे देशात देखिल हा प्रचंड लोकप्रिय खेळ आहे.  मंगोलियामध्ये तर घोडेस्वारी व  FALCONRY हे जवळपास त्यांच्या संस्कृतीचे भाग आहेत. मंगोलियात ह्याचा उत्सव करतात व त्या निमित्ताने स्पर्धा भरवल्या जातात.

मला पक्षांच्या युद्धातील सहभागाबाबत या  लेखाच्या निमित्ताने अनेक दुवे वाचनात आले. अनेक क्लब्सच्या साइट्स बघितल्या, हजारो फोटो बघता आले. कुठला फोटो निवडू हा प्रश्न पडावा असे त्यात शेकडो सुंदर सुंदर फोटो होते पण खालच्या फोटोपाशी आलो आणि त्या फोटो वरची लिहीलेली कॅप्शन १००% पटली त्याच चित्राने FALCONRY व युद्धातील पक्षी याची तोंडओळख करुन देणार्‍या लेखाचा शेवट करतो -



 - सौरभ वैशंपायन.

Wednesday, January 7, 2015

वाण्याची गोष्ट

आयुष्यात प्रथमच लहान मुलांसाठी काहीतरी लिहीलंय. कविता सुचताना मजा वाटली, पण एकंदर कठिण काम होतं. लहान लहान ८-१० शब्दांचीच कडवी करा, त्यातच यमक बसवा. बोजड शब्द नकोत. त्यात गोष्ट असायला हवी. मोठ्यांच्या दृष्टिने कविता कितीही निरर्थक असली तरी लहान मुलांना मजा वाटून ते त्यांच्या डोळ्यांसमोर उभं रहायला हवं. हे इतकं सांभाळताना मुख्य गोष्ट मात्र पूर्ण बोंबलली, ती म्हणजे लहान मुलांसाठी असल्याने जास्तीत जास्त ५-७ कडव्यांत कविता संपायला हवी होती. माझी एक मैत्रिण म्हणाली "कविता मजेदार आहे, पण लहान मुलांसाठी तू जवळपास "खंड-काव्य" लिहीलं आहेस!" :-D :-D .....  तसं तिच्या म्हणण्यातलं तथ्य मान्य करायला हवं कारण मुलांना एका जागी इतका वेळ बसवत नाही. मात्र तरीसुद्धा ही कविता इतरांना वाचायला द्याविशी वाटली. लहान मुलांच्या एखाद्या कार्यक्रमात कवितेतून गोष्ट म्हणून मात्र ही सादर करता येईल १० मिनीटांची काव्य - नाटुकली टाईप काहीतरी निघू शकेल यातून. :-p

===========

हिरवे नावाचे,
कोरडे गाव,
गावात होता,
पाण्याला भाव.

गावात होता,
हुशार वाणी,
धान्या बरोबर,
विके पाणी.

जमवली त्याने,
भरपुर नाणी,
मुलगी त्याची,
सुंदर शहाणी.

मुलीचं म्हणे,
करीन लग्न,
सुखी संसारात,
होईल मग्न.

पण .....

बबलू टबलू,
गाव-गुंड,
ताडमाड उंच,
चाल थंड.

बबलू बारीक,
टबलू लठ्ठ,
डोक्याने पण,
दोघे मठ्ठ.

बबलू टबलू,
दाणगट फार,
करती चोरी,
देती मार.

बबलू टबलू,
घरात आले,
वाण्याचे सगळे,
पैसे नेले,

वाण्याला लागली,
खूप मोठी चिंता,
मुलीचे लग्न,
कसे होईल आता?

कोण पैसे,
परत आणेल?
बबलू टबलूला,
फटके हाणेल?

गावातला पिंट्या,
कवि - गायक,
लोकांना वाटे,
त्रासदायक.

कविता करी,
फार टुकार,
लोक म्हणती,
बेकार बेकार.

आवाज त्याचा,
खूप भसाडा,
काचा फुटती,
जाऊन तडा.

वाण्याला सुचली,
मोठी युक्ति,
गुंडांपासून,
मिळेल मुक्ति.

पिंटूला बोलावुन,
केला प्लॅन,
पिंटू बसला,
लावून ध्यान.

वाणी गेला,
बबलूकडे,
पैज लावली,
सोन्याचे कडे.

पैज होती,
भलतीच धीट,
पिंटूच्या कविता,
ऐकायच्या नीट.

बबलू गेला,
पिंटूसमोर,
कवितेला म्हणे,
देईन वन्समोअर.

कविता ऐकुन,
मोजुन पाच,
बबलू झाला वेडा,
करु लागला नाच.

टबलूला ह्याचा,
आला राग,
हिरवे गावात,
भागमभाग.

पिंटुची त्याने,
पकडली मान,
पिंटुने घेतली,
मोठी तान.

टबलूचे फुटले,
दोन्ही कान,
कानात बोटे,
सोडली मान.

बबलू टबलू,
दोघे मिळुन,
गावाबाहेर,
गेले पळुन.

 - सौरभ वैशंपायन

Wednesday, December 17, 2014

आशा

ऑक्टोबर २०१० मध्ये मी अफगाणिस्थान वरती "दुर्दम्य" म्हणून अगदिच छोटा लेख लिहीला होता. एक अफगाण मुलगा "कब्रस्तानात" ऊभा राहुन पतंग उडवण्याची "मजा" घेतोय असा तो फोटो होता. त्या फोटोचा परीणाम माझ्यावरती अजूनही असेल असं वाटलं नव्हतं. २ दिवसांपूर्वी तेच चित्र जसंच्या तसं आठवलं आणि पुढील कविता सुचत गेली.
=================


दूर जाती रक्तरेषा
ओसाडलेल्या तप्त देशा,
चालत्या कलेवरांच्या
डोळ्यात उमटे मौन भाषा ||१||

आक्रोशुनि निस्तब्ध झाल्या
खुणा थडग्यांच्या अशा,
डोळ्यातुनी अश्रु हरवले
हरवल्या रस्त्यांच्या दिशा ||२||

पाऊस आगीचा का पडावा?
का पडावी पदरी निराशा?
का भीतीने गोठुन जावी
क्षितिजावरी हसरी उषा? ||३||

बुलबुलाने बेभान गावे,
विसरुनी अडकल्या हिंस्र पाशा,
पतंगाने उंच जावे,
सोबतीला घेऊन आशा ||४||

- सौरभ वैशंपायन

Sunday, December 14, 2014

।।प्रतिभा।।


कोण अशी तू? कुठे निघालीस?
इथे कशी तू? चांदणवेळी?
चिंब कशी तू? दवात न्हालिस?
कुंतल ओले रुळती भाळी - १

अंधाराचे वसन लपेटुन
आलिस कोठुन उत्तररात्री?
प्रलय-निर्मिति, शांति - भ्रांति
घेऊन भिडलिस येऊन गात्री - २

अंधाराच्या वसनावरती
जरतारी चांदण नक्षी,
उडुगणांच्या आधाराने
भरारणारा प्रवास पक्षी - ३

थांब जराशी, निसटुन जाशी,
घेउन चुंबन दुरावशी का?
शकुंतला तू? की उर्वशी?
की यक्ष विरहिणी अभिसारिका? - ४

आवाज कसला मंजुळ मंजुळ?
पैंजण तर तू ल्याले नव्हते,
गुंगी कसली? शुद्ध हरपली
पण मधुरसांचे प्याले नव्हते - ५

कुशी बदलता डावी जराशी,
कर्णफुले तुझी खुपली अंगी
काय टोचले? पापणी उचलता
तु निजलेली मम वामांगी - ६

घेऊन जवळी तुज, मिटले डोळे,
पूर्व क्षितिजावर केशर आभा
जे घडले ते स्वप्नी राहीले
कागदावरती उरली "प्रतिभा" - ७

 - सौरभ वैशंपायन.

Friday, November 7, 2014

चिरंजीव





काही माणसं "गेली" असं म्हणवत नाही. मुळात ती गेली आहेत ह्यावरच विश्वास बसत नाही. कारण ती रोज आपल्या बरोबर असतात. ती कुठल्या क्षणी कुठल्या कारणासाठी आपल्या आसपास प्रकट होतील सांगता येत नाही. भाई, तुम्ही "जाऊन" १४ वर्ष झाली असं म्हणायला अजूनही जीभ रेटत नाही ... यापुढेही रेटणार नाही. जोवर तुमच्या चाहत्यांच्या संग्रहात - व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, गणगोत, पूर्वरंग, अपूर्वाई आणि अशी अजून ढीगभर पुस्तकं किंवा निदान यातलं एक पुस्तक जरी असेल तोवर तुमचं चिरंजीवीत्व अबाधित आहे.

खरं सांगायचं तर दु:ख एकाच गोष्टिचं आहे, समोरा समोर तुम्हांला कधी ऐकायला, बघायला, भेटायला नाही मिळालं. २००० साली तुम्ही "गेलात" असं लोकं जे म्हणतात .... तर ... त्यावेळी नुकतेच पुलं वाचायला लागलो होतो. म्याट्रिक मध्ये आम्हांला तुमचा "अंतु बर्वा" होता, अर्थात शालेय पुस्तकातील जागा, त्या वयातली मुलांची विनोद समजण्याची कुवत हे सगळं बघुन परीक्षेच्या हिशोबाने ५-७ मार्कांपुरता ठेवुन बरीच काटछाट करुन तो आम्हांला दिला होता. तिथुन पुलं वाचायला सुरुवात झाली होती. मी आजही तुम्ही लिहिलेलं एक आणि एक अक्षर वाचलंय, साने गुरुजी आणि तुम्ही माझे आदर्श आहात वगैरे गटणे स्टाइलने काही बोलणार नाहीये, कारण ते तसंच आहे. मी अजून पोरवय, वंगचित्रे, जावे त्यांच्या देशा, गांधीजी वगैरे पुस्तकं अजिबात वाचली नाहीयेत. मला तुम्ही अनुवादित केलेलं "एका कोळियाने" आवडलं नव्हतं( .... किंवा मी ते वाचलं तेव्हा समजुन घेण्याचं माझं वय नव्हतं अस देखिल म्हणता येईल.). आणि हे तुम्हांला मी हक्काने सांगु शकतो.

लोकं तुम्हांना "विनोदि" लेखक म्हणून ओळखतात हा तुमच्यावर लादलेला आरोप आहे. तुम्ही लिहिलेली रवींद्रनाथ : तीन व्याख्याने, किंवा रेडिओवरती तुम्ही केलेली भाषणे जी पुढे पुस्तकांच्या रुपाने २ भागात प्रसिद्ध झाली ती वाचून  केवळ विनोदि लेखक म्हणणे हा सरळ सरळ आरोप होईल. "हसवणूक"च्या मुखपृष्ठावरचा त्या लालचुटूक नाकाच्या विदूषकाचा तुम्ही धरलेला मुखवटा लोकांनी तुमच्या चेहर्‍यावर फिक्स करुन टाकला. पण विनोद हे तुमचे केवळ माध्यम होते. खर्‍या अथवा काल्पनिक व्यक्तीचित्रांतील विनोदामागची विसंगतीने भरलेली ठसठसती जखम फार नाजूकपणे उघडी केलीत. कधी कधी तर व्यक्तिचित्रणातले चटका लावून जाणारे शेवटचे वाक्य लिहिण्याकरता आधीचं अख्खं व्यक्तीचित्रण लिहीलत असं वाटून जातं. तशीच वेगवेगळ्या प्रसंगात अनेक व्यासपिठांवरुन तुम्ही केलेली भाषणे ऐकून तुम्हांला किती लहान लहान बाबतीत समाजाचं सजग भान आहे हे समजतं. तुमच्या विनोदाने कधी कोणाच्या मनावरती ओरखाडा काढला नाही. मात्र आणिबाणीच्या काळात त्याच विनोदाला धारदारपणा आणायला तुम्ही बिचकला नाहीत. माझ्या सारख्या लाखो टवाळांना खर्‍या अर्थाने विनोद आवडायला लावलेत. त्यांनाही "कोट्याधिश" बनवलंत.

हे सगळं लिहीण्याचा प्रपंच इतक्यासाठीच की माझ्यात जे काही थोडंफार शहाणपण, सामाजिक भान आहे, "माणूस" म्हणून समोरच्याला समजुन घ्यायची इच्छा आहे त्यात माझ्या आजी-आजोबा, आई-वडील, अत्यंत जवळचे नातेवाईक यांच्या शिवाय तुमचाही वाटा आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय. आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचतय यावरही माझा विश्वास आहे. कारण तुम्ही कुठल्याही क्षणी आसपास प्रकट होऊ शकता हे मला माहीत आहे, अगदी कधीही .... आत्ता यशोधनला पुण्यात फोन लावला तर "हॅलो" ऐवजी दुपारची झोपमोड झाल्याने आवाजाला जो नैसर्गिक तुसडेपणा येतो त्याच तुसड्या आवाजात "काय आहे???" विचारेल तेव्हा .....  किंवा यमी पेक्षा सहापट गोरा असलेला माझा मित्र भेटल्यावर ...... ट्रेकला गेल्यावर चिखल - मातीत उठबस करुन आमची चड्डी शंकर्‍याच्या चड्डीहुनही अधिक मळखाऊ होईल तेव्हा ..... कुणी नव्याने बांधायला घेतलेले घर दाखवायला नेईल तेव्हा ....... किंवा अगदी पानवाल्याच्या गादिसमोर उभे असू तेव्हा देखिल तुम्ही आसपासच असाल. कारण आधीच म्हणालो तसे तुम्ही "चिरंजीव" आहात.

 - सौरभ वैशंपायन

Monday, October 13, 2014

।।मुक्ति।।


अज्ञाताच्या वाटेवरती,
जीव खाऊनी मी पळतो,
कोSहम्? कोSहम्? प्रश्न सदोदित,
रात्रंदिन मजला छळतो - १

किती जन्माचे फेरे गेले?
देह मज मिळतो-जळतो,
किती पुण्य गाठीला आहे?
की पापाने आत्मा मळतो? - २

धाप लागता क्षणिक थांबुन,
अदमास घ्यावया मी वळतो,
दूर तिथे कुणी ऊभा सावळा,
अन् मुक्तिचा मतलब कळतो - ३

- सौरभ वैशंपायन

Monday, September 1, 2014

पावनखिंड




आषाढाची रात्र वादळी,
चाले मनात थैमान,
करकर करकर लवती झाडे,
जणू प्रमत्त सैतान - १

पन्हाळ्यात त्या चाले लगबग,
उडली का लग्नाची धांदल?
स्वतंत्रतेचे लग्न "शिवाशी",
वरातीमधुनी सहाशे बांदल - २

अंधाराच्या घोंगडीवरती,
वीजा रेखती लखलख नक्षी,
रात्र विषारी जहरी काळी,
डोह कालिया यमुना वक्षी - ३

कंसाचे पहारे बसले,
अडकुन पडला देवकीनंदन,
कालियांनीच भरले डोह,
कसे करावे यमुना लंघन? - ४

उडी घेतली डोहामध्ये,
कालियाचे करण्या मर्दन,
ओढुन तोडुन जहरी विळखे,
निसटुन जाई कृष्ण प्रतर्दन - ५

क्षण क्षण जवळी येता मृत्यु,
अपुला परका कुणी बघेना,
राजा अमुचा जगावेगळा,
शिवरायाचा पाय निघेना - ६

मरो लाख पण हवा जगाया,
लाखांचा पोशिंदा नेता,
उडवा तितुक्या तीनदा तोफा,
खेळण्यावरी तुम्ही पोचता - ७

धरुन ओंजळ ज्योति भवती,
नाव सोडली दर्यावरती,
फुंकर घाली तो वडवानल,
त्यात समुद्रा उधाण भरती - ८

आल्या आल्या लाटा आल्या,
उठली आरोळी दीन! दीन!!
हर महादेव! प्रत्युत्तर आले,
कंठामधुनी शेकडा तीन - ९

खिंडीतुन त्या रुद्र उतरला,
पाठीमागे तीनशे भैरव,
करु अभिषेक रिपू रक्ताचा,
या मातीला देउ गौरव - १०

मृत्युही सरकुन व्हावा मागे,
अशी फिरे तलवार,
खिंडीला त्या रोखुन धरले,
प्रहर उलटले चार - ११

जखमांनी तो देह विव्हळता,
महाभारत पुन्हा घडले आजी,
व्यूहचक्रातील कौरव जौहर,
सौभद्र पुन: अवतरला बाजी - १२

झाली इशारत उडल्या तोफा,
राजा माझा आहे सुखरुप,
सार्थक झाले आयुष्याचे,
जगण्याचे ना उरले अप्रुप - १३

श्वास अडकला कंठामध्ये,
थांबले हृदयाचे स्पंदन,
लांघुन गेले जीवन रेषा,
ना तुटले मातीचे बंधन - १४

क्षण क्षण करीता सरली शतके,
खिंड जाहली इथेच पावन,
साक्ष अजुनी देते येथील,
खळखळणारे निर्झर जीवन - १५

- सौरभ वैशंपायन

Sunday, August 17, 2014

बलसागर भारत होवो!

वास्तविक हा लेख लिहीवा असे वाटण्यास २ गोष्टी कारणीभूत ठरल्या १) ३-४ महीन्यांपूर्वी माझ्या काही मित्रांना भेटलो होतो, गप्पांच्या ओघात  त्यातल्या अंबरीश फडणवीस व निनाद कुलकर्णी यांनी सबव्हर्जन ह्या विषयाला हात घातला होता तेव्हापासून ते फिट्ट डोक्यात बसलाय आणि २) नरेंद्र मोदि काश्मीरचा दुसर्‍यांदा दौरा करुन आले. सीमे पलीकडून सारखा सारखा होणारा गोळीबार लक्षात घेऊन त्यांनी पाकला चार खडे बोल सुनावले होते. मात्र दुसर्‍याच दिवशी पुन्हा पाकने तीच खोडी काढली. लगोलग माझ्या काही मित्रांनी "बघूच मोदि काय करतात?" असा लाडीक बालहट्ट धरला. मग त्यांच्याशी बोलताना खूप काही बाहेर येत होतं ते कुठेतरी एकत्र करावं ह्या उद्देशाने हा पोस्ट!

     ===========================================================



नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान कसे बनले ह्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आपल्याला मागे जावं लागेल ..... तब्बल ३० वर्ष मागे. तसं तर लेखांच्या संदर्भांसाठी आपल्याला शेकडो वर्ष मागे जावं लागेल व एक धागा खरोखर तितका मागे जातो देखिल. पण मोदिंच्या पंतप्रधान पदाचे रहस्य मात्र ३ दशके मागे जाते. १९८५ मध्ये निकाल लागलेला "मुहम्मद अहमद खान विरुद्ध शहाबानो खटला." हो! हा तोच खटला आहे जिथुन राजीव गांधीच्या हातातील कॉंग्रेसने; प्रतिगामी मुस्लिमांची वोट बॅंक आपल्या बाजूने वळवायला शहाबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय बदलला. त्यावरुन खूप मोठे गहजब झाले. मुस्लिमांना झुकते माप दिल्याने जनसंघ, विश्व हिंदू परीषद आदि खूप खवळले. मग पारडी समसमान करायला राजीव गांधी सरकारने एक आणखि निर्णय घेतला - "अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी सर्वांसाठीच खुली करण्यात येईल!" पुढचा इतिहास बाबरी जमीनदोस्त करणे - मुंबई दंगे - केंद्रात वाजपेयी सरकार वगैरे करत पोहोचतो २००२ गुजरात - गोध्रापाशी. मोदिंना गुजरात दंग्यामुळे कॉंग्रेस व मिडीयाने जमेल तिथे फटकवायला सुरुवात केली. तब्बल १२-१३ वर्षे भारतीय जनता तेच बघत होती. सगळे एकाच मुद्यावरुन ह्या माणसावरती तुटून पडले आहेत पण हा शांत आहे, दुसरीकडे गुजरातमध्ये पहील्याहुन अधिक वेगाने व नजरेत भरेल अशी प्रगती दिसू लागली होती. गुजरातमध्ये जो माणूस जाऊन येई तो तिथल्या बदलाबाबत बोले. आपल्याकडे एक मानसिकता असते रोज रोज शेजारच्या घरातल्या पोराला आई-बाप बडवत असतील तर त्याची आपल्याला आपसूक दया येते. त्यातून ते पोरगं हुशार असून त्याला चापटवत असतील तर आपल्याला आई-बापाचाच राग येतो. तेच नरेंद्र मोदिंच्या बाबतीत झालं.

बरं कॉंग्रेसने १० वर्षात खूप काही भरीव करुन दाखवलं होतं का? तर तसं पण नाही. २००४ मध्ये अशांत समंध असलेल्या  कम्युनिस्टांचा टेकू घेऊन आलेल्या सरकारमुळे अनेक गरजेचे ते निर्णय घेऊ शकले नाही व नंतर २००९ मध्ये तुलनेने भक्कम सरकार आलं तर हजारो कोटींच्या घोटाळ्यांची उड्डाणे सुरु झाली. राष्ट्रकुल घोटाळा, आदर्श घोटाळा, 2G घोटाळा, कोलगेट घोटाळा, गांधी घराण्याचे जावई रॉबर्ट वड्रा आणि DLF च्या व्यवहाराचं गौड बंगाल सगळं जनता बघत होती. त्यातच अण्णा हजारेंच आंदोलन, रामदेवबाबांचं आंदोलन त्या आंदोलनांना चिरडण्यासाठी कॉंग्रेसने उचललेली पाऊले त्यांच्यावरचा जनतेचा रोष वाढवायला मदतच करत होती. त्यातच संपूर्ण देशाला क्लेषकारक असं निर्भया प्रकरण झालं. जनता पुन्हा रस्त्यावरती उतरली. त्यांच्या आंदोलनाला आटोक्यात आणायला सरकारने चक्क वॉटर कॅनन, अश्रुधुराचा वापर केला आणि जनतेचा संयम संपला. आता जनता उघड उघड कॉंग्रेस विरुद्ध बोलू लागली. हे कमी की काय महागाई डायन जनतेचे खिसे साफ करु लागली. सरकारचा जनतेशी शून्य संपर्क, जनतेत पराकोटीचा रोष, महागाई, असुरक्षितता ह्या सगळ्या पार्श्वभूमी वरती नरेंद्र मोदि राष्ट्रिय राजकारणात उतरले व कल्पने पलीकडे यशस्वी झाले. भले भले तथाकथित व स्वयंघोषित विचारवंत जे - "नरेंद्र मोदि हुकूमशहा आहेत!", "नरेंद्र मोदि भारताचे पंतप्रधान कधीच होऊ शकणार नाहीत!", "भारतीय जनता खूनी माणसाला नाकारेल" वगैरे मुक्ताफळे उधळत होती त्यांच्या आजवरच्या सगळ्या अनुभवाला, गणितांना फटकारुन जनतेने एकहाती सत्ता भाजपाला दिली. निवडणूकी आधी मी मी म्हणणारे टिव्ही वरुन गायब झाले.


खुद्द भाजपाला इतके यश मिळेल याची खात्री नव्हती. म्हणून त्यांनी देखिल निवडणूकिच्या आधी अनेक स्थानिक पक्षांची मोळी बांधली. पण गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश सारख्या ठिकाणी १००% तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश वगैरं सारख्या ठिकाणी तब्बल ९०% यश भाजपाच्या - मित्रपक्षांच्या पारड्यात पडले. विरोधक साफ आडवे झाले. त्या दरम्यान विरोधकांवरती मोजता येणार नाही इतके विनोद सोशल नेटवर्किंग साइट्सवरती फिरत होते. दशकानुदशके एकाच घराण्याच्या हातात पक्षाची सूत्रे दिल्याने पक्षांतर्गत लोकशाहीचा "प्रवाह" संपूर्ण आटला व कॉंग्रेसला पटाशीच्या दातांवरती आपटावं लागलं. इतकं असूनही अजूनही कॉंग्रेस गांधी घराण्याच्या दावणीलाच बांधला आहे. व तो जितका काळ गांधी घराण्याला मिठ्या मारुन राहील तितका गाळात रुतत जाईल. कॉंग्रेस संपवायला गांधी घराणेच फार मोठा हातभार लावत आहे. आज कॉंग्रेसकडे सभागृहाचे विरोधी पक्षनेते पद देखिल नाही. काल अंटोनी समीतीने फाऽऽऽऽर मनन चिंतन करुन जो निष्कर्ष काढला तो देखिल केवळ गांधी घराण्याची उरली सुरली इभ्रत राखायलाच काढला गेल्यांचं स्पष्ट दिसतय. गेल्या आठवड्यात सभागृहातील हौदात चक्क राहुल गांधी उतरले बहुदा झोप पूर्ण झाल्याने आळोखे पिळोखे देत ते चुकुन पुढे आले असावेत. लग्गेच टिव्ही वरती राहुल गांधी आक्रामक वगैरे निष्कर्ष काढुन विचारवंत मोकळे झाले. मात्र तेच राहुल गांधी परवा  "जातिय हिंसा विरोधी बिलवरती" योगी आदित्यनाथ कॉंग्रेसच्या आजवरच्या पापाचा पाढा वाचून दाखवत होते तेव्हा टेडि-बेअर गत गपगुमान बसले होते. बहुदा त्यांनी परवा हौदात उतरुन त्यांचा ह्या वर्षातला कोटा पूर्ण केला आहे. विरोधी पक्ष नेतेपद तर नाहीच नाही वरुन उपसभापती पदावरती AIADMK च्या तंबीदुराईंची केलेली निवड कॉंग्रेसचा सभागृहातील आवाज अजूनच क्षीण करुन गेली. परवा देखिल ते विरोधकांना ज्या पद्धतीने थांबवून योगी आदित्यनाथांना बोलायला सांगत होते, मला क्षणभर त्यांच्यात गोअरिंग दिसला, राइशस्टॅगमध्ये हिटलरच्या विरोधात बोलणार्‍यांना गोअरिंगने दुर्लक्षित करत खड्यासारखे बाजूला काढून टाकले त्याची आठवण झाली.


ह्या सगळ्या घटनांची सुरुवात शहाबानो केसपासून कशी हे कदाचित अजून अनेकांना पडलेले कोडे आहे. तर शहाबानो केस ही एखाद्या स्ट्रायकरसारखी ठरली जीने ह्या खेळीला सुरुवात केली. एका धर्माला दुसर्‍याची भीती दाखवा, एका राज्याला दुसर्‍या राज्याशी वाद घालायला लावा, सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करा हे धंदे आजवर कॉंग्रेस करत आली. जनतेला ते दिसतही होतं पण त्यांना पर्याय मिळत नव्हता. मोदिंना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करुन भाजपाने ती संधी घेतली व हिंदूंना अचानक आपला तारणहार त्यांच्यात दिसला. मोदिंना बदनाम करायला विरोधकांनी जे अस्त्र सोडलं व अल्पसंख्यांकांचा खूनी म्हणून त्यांची प्रतिमा रंगवली त्याच वेळी त्यांना हे समजलं नाही की आजवरती त्यांनी जाती - धर्माचे जे घाणेरडे राजकारण खेळले त्याचे नवीन अर्थ जनतेच्या मनात रुजले होते. अल्पसंख्यंकांचा शत्रू हा हिंदूंना आपला तारणहार वाटावा ही देशाच्या एकतेला वास्तविक घातक गोष्ट आहे हे मान्य करायलाच हवं, मात्र ती केवळ बागुलबुआ न रहाता प्रत्यक्ष स्थिती झाली आहे हे नाकारता येत नाही. हिंदूंना असं वाटावच का? तर - काश्मीरी पंडित आपल्याच देशात २०-२५ वर्ष विस्थापित रहात आहेत तेव्हा मानवतावादी व सर्वधर्मसमभाव वगैरे बाबत बोलणारे बोलके पोपट मुके होतात हे त्यांनी बघितलं होतं. सैन्यात मुस्लिमांची नेमकी संख्या किती? वगैरे माहीती काढण्याचा UPA सरकारचा हीन प्रयत्न लष्करप्रमुखांनी सार्वजनिक रीत्या हाणून पाडलेला लोकांनी बघितला, आसाम मध्ये बांग्लादेशी घुसखोरांमुळे स्थानिक हिंदू बोडो प्रजातीचे साडे तीन लाख लोकं बेघर होतात पण कॉंग्रेस चुप्प बसली. भिवंडित जागेवरुन वाद होऊन २ पोलिस हवालदार काही माथेफिरु मुस्लिमांचा जमाव ठेचून मारतो आणि कोर्टाचा निर्णय असून सुद्धा सरकारने आजवर तिथे पोलिस स्टेशन उभारले नाही, बर्मा ह्या तिसर्‍याच देशा मध्ये बौद्ध विरुद्ध घुसखोर मुस्लिम अशी दंगल झाली त्याचे पडसाद उठावेत कुठे? तर मुंबईत? पोलिसांच्या गाड्या जाळतात, पोलिस जखमी होतात, महीला कॉन्टेबलचे विनयभंग होतात, दंगेखोर अमर जवान ज्योतीची लाथा घालून तोडफोड करत होते आणि सरकार ढिम्म!!! हे जनता बघत होती.

जनतेला हिंदूंचा तारणहार शोधावा लागला तो कॉंग्रेस व ह्या तथाकथित मानवतावादी पोपटांमुळेच. लगोलग न्यायालयांचा व चौकशी करणार्‍या समितीचा निर्णय आला मोदि गुजरातमध्ये २००२ मध्ये घडलेल्या प्रकारात निर्दोष आहेत आणि मग तर सहिष्णू असलेल्या हिंदू समाजाचा त्यांच्यावरती डोळे झाकुन विश्वास बसला व तो त्यांनी मतांच्या रुपाने मोदिंच्या झोळीत टाकला. तो विश्वास इतका मोठा होता की मुस्लिम वोट बॅंक शिवाय उत्तरप्रदेशातील व त्यामुळे देशातील सत्ता मिळत नाही ह्या समिकरणाला मोदि व शहांनी पार पुसून टाकले. त्यांनी उत्तर प्रदेशात आजवर न घडलेली गोष्ट घडवून आणली. मुस्लिम वोट बॅंकचा आधार न घेता सत्ता हस्तगत केली. त्यालाही आता ३ महीने झाले. दुसरीकडे मुस्लिमांतही मोदिंबाबत मत बदलु लागल्याचे आशादायी चित्र आहे. ह्या ठिकाणी मी आत्ताच एक गंमतीशीर गोष्ट सांगु इच्छितो - २०१९ मध्ये देखिल मुस्लिम वोट बॅंकशिवाय हा करीश्मा नरेंद्र मोदिंनी पुन्हा करुन दाखवला तर २०२४ पासून कॉंग्रेसची पाऊले हळुहळू "हिंदुत्ववादि" होण्याकडे पडू लागतील. मरण्याआधी "हिंदुत्ववादि" कॉंग्रेसला वोट देणे हे माझे स्वप्न आहे. लोकं हे वाचून माझ्यावरती हसतीलही पण हे कठिण असलं तरी अशक्य नाही. राजकारणाची वारांगना कुणाला काय करायला लावेल हे सांगता येत नाही.


 आता सर्वात महत्वाचा विषय मोदिंसमोरील आंतरराष्ट्रिय पातळीवरची आव्हाने कुठकुठली आहेत? आजूबाजूला नजर टाकल्यास जगभर काय सुरु आहे ते आपण बघू शकतोय. जागतिक मंदि, अरब स्प्रिंग, मग युरोपातील मंदी, इराक, इराण, इजिप्त मधले सत्ताबदल, सिरिया मधले मानवी हत्याकांड,  इराक - अफगाणिस्थान मधून टप्याटप्याने अमेरीकन सैन्य मागे घेण्याची केलेली ओबामांची घोषणा, युक्रेनच्या निमित्ताने रशियाची दंडेली, शपथविधीला मोदिंनी SAARC मधील देशांच्या प्रमुखांना बोलावणे,  BRICS परीषदेत घेतलेले आर्थिक निर्णय, काही दिवसांपूर्वी अमेरीकेचे संरक्षण सचिव चक् हॅगेल ह्यांनी दिल्लीमध्ये भारत - अमेरीक - जपान अशी फळी उभारण्याबाबत केलेले वक्तव्य, मोदिंचे भूतान व नेपाळ दौरे, पाकिस्तान मध्ये नवाज शरीफ विरुद्ध इम्रान खानने उठविलेलं रान -  हे सगळं तोडून बघितलं तर वेगवेगळे विषय आहेत मात्र हा कोलाज म्हणून एकत्र बघितलं तर डोकं गरगरायला लागतं.


मोदिंबरोबरच आपल्यासमोर भविष्यात काय मांडून ठेवलय हे जाणून घ्यावं लागेल त्यासाठी आपल्याला आपल्या आजूबाजूला काय घडलं? अथवा घडतय हे बघावं लागेल. अनेकदा आपल्याला न कळत आपण देशाचे नुकसान करत असतो. आपल्याला माहीतही नसतं की आपण आत्ता करतोय त्याचे परीणाम समाजावरती १० वर्षांनी नेमके काय होणार आहेत. ते आपल्याकडून कोणीतरी करुन घेत असतो. "मॅट्रिक्स" बघितलाय? तस्सच. खरोखर सामाजिक पातळीवरती तसं घडत असतं. त्याला SUBVERSION म्हणतात.  युरी बेझमेनोव्ह यांनी सबव्हर्जन बाबत फार सविस्तर सांगितले आहे. एखादा देश, त्याची संस्कृती, धर्म, आर्थिक व्यवहार, सामाजिक जाणीवा, राष्ट्रिय अस्मिता यांना सुरुंग लावून ती उध्वस्त करायची व तिथे आपल्याला हवं ते रुजवायच, उगवायचं, पोसायचं. बरं! तो देश आपले शत्रु राष्ट्रच असायला हवं असा काही नियम नाही! आंतरराष्ट्रिय राजकारणात कोणी कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. म्हणूनच आपल्या राष्ट्राचा नागडा स्वार्थ जिथे असेल त्या जगातील कुठल्याही कोपर्‍यात आपल्याला हवं त्या ठिकाणी कळ फिरवायला सुरुवात करायची. त्यात ४ पायर्‍या असतात -
1) Demoralization (१५ ते २० वर्ष)
2. Destabilization (साधारण ५-६ वर्ष)
3. Crisis (५-६ महीने)
4. Normalization

हा विषय इतका मोठा आहे की ह्यावरती एखादं पुस्तक होऊ शकेल. आपण सबव्हर्जनचा शक्य तितका धावता, ढोबळ व सुटसुटीत आढावा घेऊ. ज्यांना ह्या विषयाची उत्सुकता असेल त्यांनी मी दिलेली लिंक व युरी बेझमेनोव्ह ह्या नावाचा गुगल - युट्युबवरती सर्च करुन बघावा.

 1) Demoralization (१५ ते २० वर्ष) - Demoralization चा डिक्शनरी मधला अर्थ  destroying the moral basis for a doctrine or policy असा आहे. पहीली पायरी १५-२० वर्षांची असते. ती अश्याकरीता की बालवाडीत ..... सॉरी फारच "गावंढळ" वाटलं का? ..... तर KG - KG जे म्हणतात ते तिथे लहान मुल सोडलं की पुढल्या २० वर्षात मास्टर्स/डॉक्टर्स/इंजिनिअर्स वगैरे छाप घेऊन शिक्षणाच्या कारखान्यातून ते बाहेर पडतं. ह्याच दरम्यान त्याच्या मनात, डोक्या्त, भावनांमध्ये डोळ्यांसमोर जे घडतं कानांना जे ऐकू येतं ते जाऊन बसतं त्याला आकार यायला लागतो. वैचारीक द्वंद्व सुरु राहतं. ह्या संपूर्ण काळात समजा उदा. त्या व्यक्तीवर १५-२० वर्षात "कम्युनिझम हेच सर्वोत्तम!" हा एकच विचार सतत सतत सतत बिंबवत राहीलो तर ती व्यक्ती वयाच्या ऐन विशी-पंचवीशीतच कट्टर डाव्या विचारांनी भारुन जाईल. मात्र त्याच सोबत समाजातील इतर घटक हाताशी धरावे लागतील. त्यात धर्म, शिक्षण, सामाजिक राहणीमान, पॉवर स्ट्रक्चर, प्रसारमाध्यमे आणि संस्कृती ह्यांना दूषित करावं लागतं. ह्या १५-२० वर्षात "घडणार्‍या" पिढ्यांना "बंडखोर" करावं लागतं. त्या देशापेक्षा बाहेरील तत्वज्ञान (जे सबव्हर्जन घडवून आणणार्‍या देशातील असते) किती महान आहे हे हळूहळू रुजवावं लागतं. त्यांच्या पूर्वजांच्या लहान चूका देखिल कानकोंड होऊन जावं इतक्या मोठ्या करुन दाखवायच्या. धर्माच्या बाबतीत संभ्रम निर्माण करायचे. आपला धर्म काहीतरी चूकिच्या संकल्पना सांगतोय असं सतत नव्या पिढीला वाटत राहीलं पाहिजे. आणि असं वाटण्यासाठी खोट्या धार्मिक संघटना/ धर्मगुरु ऊभे करायचे. ते संभ्रमात असतानाच त्यांच्या समोर चूकीचे आदर्श व नेते ऊभे करायचे. उदा. राज कपूर यांचे चित्रपट बघा. एक कलाकार म्हणून ते निश्चितच फार मोठे होते मात्र जवळपास सगळ्या चित्रपटांचा आशय "लुळी-पांगळी श्रीमंती आणि धट्टिकट्टि गरीबी" असाच आहे. गरीब रहा, श्रीमंत झालात म्हणजे तुम्ही लबाड आहात असंच चिंत्र उभे करणारे सगळे चित्रपट. अथवा चित्रपटातूनच पोलिस, न्यायव्यवस्था कशी भ्रष्ट असते हे बिंबवत रहायचं मात्र त्याच बरोबर खलनायकी चरीत्राच्या व्यक्तींना "हीरो" बनवायचं, व्यवस्था आणि समाजाच कसा "गुन्हेगार" निर्माण करतो हे गरजेहुन खूप जास्त मोठं करुन दाखवायचं. ह्या मिडियाच्या मायाजाला शिवाय खरोखरची न्याय व्यवस्था, अधिकारी व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, एकाच वेळी देशातील वेगवेगळ्या भागांतील स्थानिक राजकारणांतील वाद चिघळवणे, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तयार करणे हे वेगवेगळ्या पातळ्यांवरती एकाचवेळी करत रहाणे. ही पहीली पायरी. म्हणजे स्थानिक लोकांनाच एकत्र करुन पढवायचं, फितवायचं. लाचखोर बनवायचं. राजकारणात बाहेरुन पैसा ओतायचा व आपल्याला हवी ती माणसं निवडून आणायची. त्यांना निवडून देणार स्थानिक जनताच मात्र काम ते दुसर्‍या देशाचे करत असतात ..... त्यांच्याही नकळत.


2. Destabilization (साधारण ५-६ वर्ष)
- ह्यात त्या देशाच्या आर्थिक बाजूला शक्य तितकं अस्थिर करायचं. आधीच्या २० वर्षात परीस्थितीच अशी निर्माण करायची की सरकारला जनतेच्या छोट्यातल्या छोट्या बाबतीत हस्तक्षेप करावा लागेल. ह्याने जनतेतील असंतोषाला एकत्र आणायला मदत होते. कामगार व कंपनी मालकांत बेबनाव तयार करणे. लहान मोठे संप आंदोलने घडवून आणत रहाणे. कामचूकारपणा वाढवणे. कमी श्रमात अथवा मुल्यात प्रत्येक बाबतीत जास्त मोबदला मिळवण्याची मानसिकता (एका वर एक फ्री, अमुक गोष्टीत १०% जास्त वगैरे) तयार करणे.चंगळवादाला शक्य तितकं प्राधान्य देणे, कर्जांचे सढळ हस्ते वाटप करायच्या सोयी उपलब्ध करणे. अश्या बाबी ह्या पायरीत केल्या जातात. पण ह्या लहान लहान गोष्टिं बरोबर दोन जमातीं, भिन्न भाषिकांमधले तणाव वाढवणे, "असंतुलन" तयार करणे. सरकारी बाबूंना लाच खायला घालून आणि आपल्याला हवी ती माणसं सत्तेत आणून त्या राष्ट्राच्या परराष्ट्र व संरक्षण निर्णयांना पोखरणे ह्या यातल्या पायर्‍या आहेत. अफगाणिस्थानचा इतिहास बघितला तर केजीबी ने अफगाणिस्थानमध्ये खल्क व परचम अश्या दोन्ही एकमेकांच्या विरोधात असणार्‍या पक्षांना हाताशी धरुन हेच केलं होतं. ही पायरी पार पाडली की खरी कसोटी सुरु होते.

3. Crisis (५-६ महीने) - मुख्य संघर्ष. जो आपण खल्क X परचम मध्ये बघू शकतो, जो आपण अरब स्प्रिंग मध्ये बघू शकतो, जो सध्या इराकमध्ये सुरु आहे, जो २-३ वर्षांपूर्वी सुदानच्या फाळणीला कारणीभूत ठरला.अशी शेकडो उदाहरणे देता येतील ज्यात अमेरीका व रशियाने आगीत तेल ओतायचे काम केले. ह्यात देशभर प्रचंड तणाव निर्माण होतो आणि एक वेळ अशी येते जिथे "ठिणगी" पडते. देश २ अथवा त्याहून जास्त विभिन्न मानसिकतेत विभागला जातो. ह्यात सरकार विरुद्ध जनता, दोन धर्म, दोन पक्ष, लोकशाही विरुद्ध हुकूमशहा, हुकूमशहा विरुद्ध जनता असे अनेक संघर्ष असू शकतात. अश्यातही दोन्ही बाजूंना मदत करणे चालू ठेवायचे. आपल्या सर्वात जवळील उदाहरण म्हणजे २०११ मधले "जनलोकपाल" आंदोलन. मला इथे हे सर्वप्रथम प्रामाणिकपणे मान्य केले पाहीजे की त्या आंदोलनातून भ्रष्ट्राचाराविरुद्धचा लढा वगैरे ऊभा राहून पूर्ण व्यवस्थेतच प्रचंड क्रांती वगैरे होईल अश्या सुखस्वप्नात मी देखिल होतो. त्यावेळी हे काय चाललय त्याचा विचार करायला देखिल अवधी नव्हता इतक्या वेगाने ते घडत होतं. अथवा अकलेवरती पडदा आपसूक पडला होता की त्याबाबत विचारच करायची इच्छा नव्हती. पण ते फार भयानक व देशाला अराजकाच्या दिशेने फरपटत नेण्याचे काम होते हे आज समजते आहे. आपल्या सुदैवाने ते प्रकरण हाताबाहेर गेलं नाही. म्हणूनच "आप" हा डोक्याला "ताप" आहे. हा पक्ष आपल्या-आपणच जितक्या लवकर विरघळून नामशेष होईल तितकं चांगलं. तर अश्या ठिणग्या पाडणार्‍या संघर्षानंतर येते शेवटची पायरी - Normalization.


4. Normalization - इतका संघर्ष झाला राष्ट्राचे प्राण कंठाशी आले आणि अचानक शेवटची पायरी अशी "नॉर्मल" वगैरे? तर ह्याचाच अर्थ - "लोहा गर्म है। मार दो हतोडा।"  परकीय राष्ट्राचा हस्तक्षेप (उदा- रशियाचा अफगाणिस्थान मध्ये अथवा अमेरीकेचा इराक - लिबिया मध्ये), जनतेतील यादवी (उदा. - सुदान, अथवा  सध्याचे इराक मधले ISIS) अथवा शस्त्रधारी संघटना (जसा भारतात नक्षलवाद आहे) तयार करायच्या. त्यांना शस्त्र, प्रशिक्षण, पैसा यांचा पुरवठा करत रहायचा. हा संघर्ष इतका टीपेला न्यायचा की दोघेही आपापसांत लढून दुर्बळ होत राहीले पाहीजेत मात्र तरीही समोरच्याला धुळीत मिळवायची महत्वाकांक्षा मात्र तितकीच वाढून ती जवळपास पूर्ण होण्याच्या पातळीवरती आली की शेवटची पायरी - Normalization. ह्यात वेळ पडली तर एका गटाची बाजू कशी न्याय्य अथवा तिथल्या जनतेला मदतीची कशी गरज आहे हे जगाला बोंबलून सांगायचे व उघडपणे आपली सारी शस्त्रात्रे घेऊन त्यांच्या बाजूने उतरायचे व टप्याट्प्याने तो देश आपल्या कह्यात आणायचा. की झालं सगळं "नॉर्मल."


तसं बघायला गेलं तर भारत अनेक शतके ह्या ४ टप्यांतून आलटून पालटून जातो आहे. गेली अडिच हजार वर्षे भारताने केवळ आक्रमणच बघितले आहे. नर्मदेच्या वरच्या प्रदेशात खास करुन पंजाब, व गंगा - यमुनेच्या सुपिक व संप्पन्न खोर्‍यातील उत्तर- प्रदेश, दिल्ली, बिहार ह्यांनी हजारो मुंडक्यांच्या राशी देखिल बघितल्या आहेत. भूमीपुत्रांच्या रक्ताचे महापूर बघितले आहेत. हिंदू धर्मावरील शक, कुशाण, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मांची सतत होणारी रक्तलांछित आक्रमणे सहन केली आहेत. पहीले ही आक्रमणे तलवारींनी होत, मग तराजूंनी झाली. आजच्या युगात हे आक्रमण बौद्धिक व आर्थिक आक्रमण आहे. ब्रेन ड्रेनची समस्या सोबतीला आहेच. म्हणूनच परवा लाल किल्यावरुन पहील्यांदाच पंतप्रधान म्हणून बोलताना मोदिंनी भारतीयांना बाहेर शिका मात्र इथे येऊन उत्पादन करा असे आवाहन केले त्याला फार मोठा अर्थ आहे. त्या आधी भारतरत्न श्री अब्दुल कलाम यांनी असेच भावनिक आवाहन केले होते.

सध्या मोदि सरकार जे करते आहे त्यावर UPA सरकारची सावली असणे फार सहाजिक आहे. सरकार बदलले की पटले नाहीत तरी एका रात्रीत गेल्या सरकारचे सगळे निर्णय विरुद्ध दिशेला नाही नेता येत. कारण आधीची १० वर्षे त्याचा खूप मोठा प्रवास झालेला आहे. त्यामुळे रेल्वेची भाव वाढ असो, जेटलींनी मांडलेले बजेट असो अथवा मोदिंनी काही नवीन केलेल्या घोषणा असोत त्यावरती विरोधक जेव्हा म्हणतात की ही तर आमचीच योजना होती तेव्हा त्या मागची कारणे समजून घ्यायला लागतात. त्यात अनेकदा राष्ट्रिय - आंतरराष्ट्रिय आर्थिक - राजकीय हितसंबध असतात. राष्ट्राचा वेळ - पैसा गुंतलेला असतो. एका रात्रीत ही दुकाने गुंडाळणे कधीच शक्य नसते. मोदि सध्या तरी दिल्लीची साफ सफाई करत आहेत. कॉंग्रेस कार्यकालातले दिल्लीमध्ये १० वर्ष चिकटलेले बहुतांशी सरकारी बाबू म्हणे त्यांनी दिल्लीच्या बाहेर रवाना केले आहेत व त्या जागी नवे अधिकारी बसवले आहेत. त्यांना त्यांच्या निर्णय प्रक्रियेत टांग अडवणारे कोणीच नकोय. भविष्याची तरतूद ते आत्ता करुन ठेवत आहेत. ह्या सगळ्या प्रक्रियेला अजून चार सहा महीने जातील. शहांच्या मार्फत ते पक्षांतर्गत फार मोठे बदल घडवून आणत आहेत. फार सावधपणे व चतुराईने मोदि एक एक आघाडी शांत करत आहेत. त्यामुळे रोज सकाळी उठून काय करत आहेत मोदि? हे विचारण्यात सध्या तरी हशील नाही. मी तरी वैयक्तिक पातळीवरती मोदिंना आधीचे प्रकार निस्तरुन त्यांचे धोरण राबवणे ह्यासाठी ३ वर्षांचा कालवधी दिला आहे.


हे झालं अंतर्गत आघाडीबाबत, आंतरराष्ट्रिय परीस्थिती काय आहे? सद्य स्थितीत अरेबिक देश अजूनही अरब स्प्रिंग मधून सावरले नाहीयेत. त्यांच्या आयुष्यातून "वसंत" केव्हाच निघुन गेलाय, उरल्यात नुसत्या "स्प्रिंग" ज्याने ते देश अस्थिरतेत जगत आहेत. बहुतांशी अरब देशांची परीस्थिती तेलही गेले तुपही गेले हाती राहीले धुपाटणे अशी झालीये. त्यातुनच जिहादिंना पोषक वातावरण तयार झाले आहे. अरब राष्ट्रांतला जिहाद हा pendulum wave इफेक्ट आहे. एका देशाला धक्का दिला की पुढचा आपोआप अस्थिर व्हायला लागतो. अरब स्प्रिंग हा "जिहाद" नसला तरी pendulum wave इफेक्ट होता. जिहादिंचे सध्याचे रणक्षेत्र आहे इराक व सिरीया. एकदा का इराक - सिरिया मध्ये ISIS आले की लिबिया, अफगाण व पाकिस्तान मधल्या तालिबानींना बळ मिळेल. अखेरीस ISIS हे अल-कायदाचेच प्रतिबिंब आहे. जिहादिंची दुसरी दृष्टि जाईल इजिप्तवरती तिथे मुस्लिम ब्रदरहुड ला हाड-हुड करुन हाकलवलंय पण मुस्लिम ब्रदरहुडचं नेटवर्क तगडं आहे. रंकाळा तळ्यातल्या अमरेवेलीप्रमाणे आहे, कितीही साफ करा, उपटून फेका तिथे रान माजणार. मुस्लिम ब्रदरहुडचे धागे भारतात - महाराष्ट्रात पर्यंत पोहोचले आहेत. इंडियन मुजाहीदिन वगैरे मुस्लिम ब्रदरहुडच्या शेंड्याकड्ची नवीन कोवळी पालवी आहे हे कायम लक्षात ठेवायला हवं. तसंही कल्याण मधले चार तरुण इराकमध्ये ISIS ला जाऊन सामिल झाल्याची बातमी आली होती. ही तर नुसती सुरुवात आहे. ISIS च्या अबु-बक्र-अल-बगदादी याने स्वत:ला खलिफा ठरवून जगभरातील मुस्लिमांना खिलाफत जिवंत करण्याची अनेक आवाहने गेल्या २ महीन्यात केली आहेत. मोरक्कोपासून म्यानामारपर्यंत पसरलेल्या मुस्लिमांना त्याने जिहादचे आवाहन केले 

आहे.  ह्यात गंम्मत म्हणजे ह्यांनीच ऐन रमजान महिन्यात इराक - सिरीया सीमे दरम्यान मृत्युचा नंगा नाच करताना शेकडो येझिदी, शिया व कुर्द लोकांचे शिरकाण केले आहे. इराक फुटण्याच्या मार्गाकडे चालु लागला आहे. तो फुटला तर किमान ४ छकले होतील. शिया - सुन्नी - कुर्द, तुर्कमान असे उपगट आहेत. परत कुर्द आणि अरबांत शिया - सुन्नी विभागणी वेगळी. म्हणजे शिया अरब - सुन्नी अरब, शिया कुर्द, सुन्नी कुर्द वगैरे वगैरे. बरं इराक फुटून प्रश्न सुटणार नाहीच. जिहाद वगैरेंच्या कातड्याखाली तेल विहिरींसाठी मारामारी आहे सगळी. आता अमेरीकेला इथल्या तेलाची काही पडली नाहीये आता. अमेरीका फारसं लक्ष घालणार नाही. कुत्ता जाने चमडा जाने! हा सगळा घाणेरडा खेळ सुरु व्हायला कुठेतरी अमेरीकाच जबाबदार आहे हे मात्र नक्की. इराकचे काय होईल ते येत्या २-३ वर्षात दिसेलच मात्र त्यामुळे तेलाच्या किंमती वर खाली होत रहाणार व त्याचा थेट फटका आपल्याला बसतच रहाणार. 

तरी पण क्षणभर समजा की अमेरीकेने मध्ये हस्तक्षेप करुन बगदाद वाचवले तरी ते काय चाटायचे आहे? बगदाद वाचवून इराक शांत ठेवायचे दिवस नाहीयेत. सद्दामच्या पाडावानंतरही अमेरीका ते करु शकली नव्हती आता तर संपूर्ण आनंदि आनंदच आहे. मग जिहादींचा मागणी तसा पुरवठा करणारे लिबिया - इराक - पाक असे ३ जण तयार आहेतच. मागोमाग अमेरीकेने सैन्य काढून घेतल्याने अफगाणिस्थानची भूमी जिहादिंसाठी मोकळी होतेच आहे. इतिहास साक्षी आहे जेव्हा जेव्हा अफगाणिस्थान पडला अथवा चूकिच्या हातात गेला त्याचा थेट फटका भारताला बसला. भले आता भारतीय भूमीतून पाकिस्तान नावाचे राष्ट्र तयार झाले आहे. पण भारत - अफगाणिस्थान संबध तेच राहीले आहेत. आणि म्हणूनच दिल्लीत कुठलेही सरकार येवो अफगाणिस्थानवरती पकड ठेवायचे हर तर्‍हेचे उपाय आपण करतो. पुरंदर - वज्रमाळसारखे आहे हे. पुरंदर वाचवायचा तर लढाई "वज्रमाळसाठी" करावी लागत असे अगदी तसेच.


हे सगळं फार गुंतागुंतीच आहे. धोक्याची सूचना एकच - मोरक्कोपासून सुरु होणारी मुस्लिम देशांची रांग पार इंडोनेशियापर्यंत पसरली आहे त्यात केवळ इस्त्राइल, भारत, नेपाळ व कंबोडिया या बिगर मुस्लिम देशांची पाचर आहे. न जाणो पुढल्या १-२ दशकांत कुणाला खिलाफतीचा उमाळा आलाच व भारतातील काही मुस्लिम संघटनांनी त्या खिलाफतीला पाठिंबा द्यायचे ठरवलेच तर त्यावेळी गांधींनी खिलाफतीला पाठिंबा द्यायचा जो आत्मघातकी निर्णय घेतला तसाच आत्मघातकी निर्णय आजच्या युगातला कोणी गरीबांचा गांधी घेणारच नाही असे नाही. उलट अश्या गोष्टी करायला इथले निधर्मी पोपट तयारच असतात. आझाद मैदानावरती जे काही झाले ते बघता मी मांडतो आहे तो मुद्दा फार गंभीर आहे हे लक्षात घ्या. कसलीच शाश्वती नाही. मला सगळ्याच मुस्लिमांना एकाच पारड्यात मुळीच टाकायचे नाहीत. पण हिंदुंचा विश्वास गेली अनेक शतके धक्के खाऊन डळमळीत झालाय हे वास्तव आहे.  इथे पानिपतावरती मरहट्यांबरोबर राष्ट्र वाचवायला इब्राहीमखान गारदी देखिल असतात हे मान्य करुन देखिल आधी नादिरशहाला व नंतर अब्दालीला जिहादि निमंत्रणांच्या अक्षता पाठवणारे अनेक शाह-वलीउल्लाह आणि नजिब आजूबाजूला दिसायला सुरुवात होते. आणि स्वत:चे मत नसलेले कुंपणावरचे सगळे "अवधचे नवाब" ऐनवेळी अब्दालीला जाऊन मिळतात व त्यानेच मराठ्यांचे पानिपत होते हा इतिहास आहे. हा इतिहास लक्षात घ्यावा इतकीच अपेक्षा.


आता राहीला मोदि पाकिस्तान - चीन विरुद्ध काय करणार? तर प्रत्येक समस्येचे उत्तर "युद्ध" नसते. शपथविधीलाच SAARCच्या प्रमुखांना बोलवून मोदिंनी पहील्याच चेंडूवरती सिक्सर मारला होता. "मी आलोय" हे तर त्यांनी जगजाहीर केलंच पण भारताला आजूबाजूच्यांशी सौदार्हपूर्ण संबध हवेत हे जाहीर केलं. लगोलग भूतान व नेपाळ हे चीनच्या कच्छपी जाऊ लागलेले देश कुरवाळायला सुरुवात केली. नेपाळ दौरा विशेष महत्वाचा होता असं मला वाटते. नेपाळ - भारत खुली सीमा असल्याने नेपाळमधून अनेक दहशतवादी, ISI ची पिलावळ घुसखोरी करत असते. आजवर अनेक खतरनाक अतिरेक्यांना भारत - नेपाळ सीमेवरती अटक झाली आहे हे लक्षात घ्यायला हवं. मोदिंनी एका नेपाळी मुलाला आसरा देऊन त्याला परत त्याच्या कुटुंबाशी भेट घडवून दिली, हे दिसायला लहान असलं तरी ह्याचे sub-conscious पातळीवरती वेगळे परीणाम साधता येतात, नेपाळींचे मन ह्या साध्या घटनेनी पण जिंकता येते. पशुपतीनाथ मंदीराला काही टन चंदन व काही आर्थिक मदतीच्या मोबदल्यात जर भारत नेपाळकडून त्यांनी वापरुन उतु जाणारी वीज बिहार - उत्तर प्रदेशात वळवणे, ISI च्या हालचालींना पायबंद, भारतातील माओवादी नक्षलवाद्यांना होणारी शस्त्रास्त्रांची आवक रोकणे, चीनच्या कह्यातुन नेपाळची सुटका ह्या गोष्टि साध्य करु पहात आहेत. नेपाळमध्ये माओवादी नेता "प्रचंड" एकदा अल्पकाळ का होईना पंतप्रधान बनला होता ही गोष्ट डोळे उघडून बघितली तर खूप काही समजू शकेल की नेपाळची पाऊले कुठे वळत आहेत. व ती आत्ताच ठिक करायची गरज आहे. अजून पाच वर्ष मोदिंनी हे पुढे रेटलं तर SAARCचं अघोषित नेतेपद आपोआप भारताकडे चालुन येईलच. पण भारता भोवती चीन जे असंतुष्ट देशांचे कडे उभारुन भारताला बांधू पाहत आहे त्याला तोडता येईल. येत्या २-३ वर्षात मोदिंनी श्रीलंका, बांगलादेश व अगदि पाकिस्तानचा दौरा केल्यास मला विशेष वाटणार नाही. अर्थात त्यासाठी पाकिस्तान शांत हवा. सध्या इम्रान खानने नवाज शरीफ यांच्या विरुद्ध जे रान पेटवले आहे त्याची परीणीती काल त्याच्या गाडीवरती गोळीबार होण्यापर्यंत पोहोचली आहे तो वाचला असला तरी त्याच्या आंदोलनाला आता अधिकच धार येणार. पाकिस्तानी लष्कर नेहमीच अश्या घटनांची फार आतुरतेने वाट बघत असते. वर्षभरात परत पाकिस्तानात लष्करशहा येणारच नाही ह्याची काही एक शाश्वती नाही. तसे झाल्यास भारत - पाक संबधांचे आयाम पुन्हा कुशी बदलतील.


हे सगळं लिहीण्याचा प्रपंच इतक्या करीताच की दर वेळी काय करत आहेत मोदि? हा प्रश्न उताविळपणे विचारला जाऊ नये. त्यांना थोडा वेळ द्यावा. हिंदू संघटन व बलवान करण्याची ही संधी काळाने फार मोठ्या अंतराने दिली आहे ती वाया जाता कामा नये. सबव्हर्जनचा धडा लक्षात घ्या. भारताला वाचवायला हिंदू धर्म बलशाली व्हायला हवा. इथे नोंद कराविशी वाटते की बलशाली म्हणजे खुनशी अथवा उन्मादित नव्हे. हे बल समर्थ रामदासांनी शिकवलेले, छत्रपती शिवरायांनी मिळवलेले आणि थोरल्या बाजीरावांनी वाढवलेले आणि शिंदे - होळकरांनी जपलेले बल आहे. इतिहास नीट वाचा मराठा साम्राज्याचा भाग असलेली भूमीच आज भारतात आहे बाकीचा "पाकिस्तान" झाला आहे. दुसरी गंमतीची गोष्ट ज्या ठिकाणी मराठा साम्राज्य बलशाली होती त्याच भागात मोदिंना भरघोस मतदान झाले आहे. कश्मीर, बंगाल, दक्षीण भारत ह्या ठिकाणी मराठा साम्राज्य नव्हतेच अथवा तुलनेने क्षीण होते ... मोदिंना ह्या ठिकाणी यश मिळाले नाहिये हे लक्षात घ्या. भले हा योगायोग असेलही पण इतिहासाचे एक चक्र पूर्ण झाले आहे. मोदि हा हिंदूंचा एक "CHANCE" आहेत. तो वाढवायचा की फुकट घालवायचा हे आपल्या विचारांवरती अवलंबून आहे.

 - सौरभ वैशंपायन